मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद

राजघराणं · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602 ********************************************************************************************************** पूर्वपिठीका प्रा शेषराव मोरे हे शिक्षणाने इंजिनिअर आहेत. कुरुंदकरांच्या परंपरेतले आहेत. काही वर्ष इंजिनिअरिंग कॉलेज मधे नोकरी केल्या नंतर त्यांनी ती सोडली आणी नंतरचे आयुष्य इतिहास, धर्मचिकित्सा ह्या विषयांना वाहून घेतले. पुरोगामी राष्ट्रभक्त म्हणून त्याना संबोधता येइल. सावरकरांवरच्या सर्व आरोपांना उत्तरे देणारे त्यांचे २ ग्रंथ वाचनीय आहेत. सावरकरांचे हिंदुत्व - सत्य आणी विपर्यास आणी सावरकरांचे समाजकारण एक चिकित्सक अभ्यास अशी त्या ग्रंथांची नावे आहेत. यदी फडके , रावसाहेब कसबे वगैरे पुरोगामी विचारवंतांनी सावरकरांवर केलेल्या टीकेला मोरेंनी दिलेली सडेतोड उत्तरे या ग्रंथांतून मिळतील. दैनिक सामनातून १० वर्षापूर्वी प्रसिद्ध होणारे त्यांचे "अप्रिय पण" हे सदर अजूनही स्मरणात असेल. प्रा मोरेंना सावरकरांचे आंधळे अनुयायी मात्र म्हणता येणार नाही. १८५७ चा जिहाद हे मोरेंचे पुस्तक याची साक्ष आहे.४०० पानांचे हे पुस्तक तब्बल २०० इंग्रजी , मराठी ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेले आहे. ह्यातली एकही ओळ संदर्भाशिवाय लिहिलेली नाही. सावरकरांच्या २५ व्या वर्षी लिहिलेल्या स्वातंत्र्यसमर या ग्रंथात १८५७ मधे हिंदू मुस्लिम ऐक्य झालेले होते असे प्रतिपदित केलेले होते. त्यावेळी सावरकर हिंदुत्ववादी न्हवते. सावरकरांच्या पुस्तकात - दिन दिन च्या घोषणा, हिरवी निशाणे, जिहाद वगैरेंचे उल्लेख शंभराहून जास्त वेळा कौतुकाने आलेले आहेत. मोरेंचे निष्कर्श सावरकरांशी जुळणारे नाहित. मोरेंचे सर्व विचार पटोत अथवा न पटोत पण त्यांचे मुद्दे विचारार्ह आहेत यावर दुमत होण्याचे कारण नाही. भुमितीच्या प्रमेयाप्रमाणे त्यांनी सदर पुस्तक वाक्यावाक्याला मुस्लिम आणी इंग्रज अभ्यासकांचे पुरावे देत लिहिले आहे. ********************************************************************************************************* १८५७ च्या घडामोडीत वहाबी मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. ख्रिश्चनांच्या विरुद्ध धर्मयुद्ध इस्लामच्या परंपरेत होतेच ते पुनरुज्जीवित करण्याचा वहाबींचा प्रयत्न होता. वहाबींची चळवळ ही भारतातील ईंग्रज राजवटीची शत्रू होती, यात वादच नाही. पण ती इंग्रज विरोधासाठी जन्मलेली चळवळ नाही. भारतातील मुस्लिमांचे राज्य अबाधित रहावे या प्रेरणेची ती चळवळ आहे. या मूळ प्रेरणेसाठी सुरवातीला मराठ्यांचा विरोध, शीखविरोध आणी नंतर इंग्रजविरोध हे टप्पे आपोआप निर्माण झाले. नरहर कुरुंदकर (जागर,२४०) ********************************************************************************************************* त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद (संदर्भ : १८५७ चा जिहाद. प्रा शेषराव मोरे. राजहंस प्रकाशन. ) १. जिहादपूर्व दोनशे वर्ष वर्ष: मौलवींची गुरुशिष्य परंपरा सम्राट अकबर खर्‍या इस्लामपासून मार्गभ्रष्ट झाला आहे. त्याला पदच्युत करण्यासाठी शेख सय्यद अहमद सरहिंदी या महान धर्मपंडिताचा उदय १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात होतो. राष्ट्रीय पुरुष म्हणून त्यांचा गौरव करताना मौलाना आझाद म्हणतात - "शेख सय्यदांमुळे अकबराच्या गैरस्लामी दिने इलाही चळवळीवर प्राणांतिक आघात झाला व ती कायमची नष्ट झाली". सरहिंदींचे महान विचार होते - राम व रहीम एकत्र मानणे हा मूर्खपणाचा कळस होय. इस्लामचा मान हा कफिरांचा अवमान करण्यात आहे. झिजियाचा खरा उद्देश काफरांची मानहानी करणे हा आहे. सत्यधर्माचा खरा मार्ग (शरा) हा तलवारीच्या धारेखाली असतो.मुजादिद अल सानि या नावाने इतिहास सरहिंदीना ओळखतो. अकबराचा मुलगा (सलीम) जहांगीर हा बापाचेच धोरण पुढे चालवू पहात होता. त्याविरुद्ध सरहिंदीनी गर्जना केली- " सैन्याने आता बादशहाच्या आज्ञा पाळू नयेत. " आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी सरहिंदींनी शेकडो शिष्य देशभर पाठवून दिलेले होते. जहांगिर भडकला. त्याने सरहिंदींना सरळ बेड्या ठोकल्या. दिल्लीच्या उच्चासनावर बसलेल्या जहांगिराला आपल्या मांडीखाली काय जळतय याची कल्पना नसावी. सरहिंदींच्या शेकडो प्रचारकांनी आपले काम चोख बजावले होते. सैन्यावरील सरहिंदीची पकड असंतोष पैदा करू लागली. झक मारत जहांगिर सरहिंदीना सोडतो; एवढेच न्हवे तर सैन्याचे प्रमूख धर्मोपदेशक म्हणून त्यांची नियुक्ती करतो. इथुन सुरू होतो इतिहासाचा एक वेगळा अध्याय. मुल्ला मौलवींच्या सैन्यावरील पकडीची बखर. धर्मगुरूंच्या राजकीय उलाढालींचा इतिहास. सरहिंदीच्या शिकवणीला आलेले गोंडस फळ म्हणजे शिष्योत्तम औरंगजेब होय. औरंगजेबाचे राज्य पुढे उताराला लागले. पुढ्चे शतक मुघल साम्राज्याच्या र्‍हासाचे होते. मराठे शिरजोर बनू लागले. सरहिंदींची विचारकूस जन्म देते शाह वलिउल्लाह यांना (१७०३ ते १७६२). पानिपतच्या तिसर्‍या युद्धासाठी अब्दालीला आमंत्रण देताना ते लिहितात - "... थोडक्यात येथील मुस्लिमांची स्थिती शोचनीय झाली आहे. राज्य व प्रशासनाचे सर्व नियंत्रण हिंदूंच्या हातात गेले आहे. श्रद्धाहीन काफरांच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी; हे अमीर ; अल्लाहच्या विनम्र सेवकाची प्रार्थना ऐका". १७६१ चे पानिपत मराठी भाषेत एक वाक् प्रचार बनून उरते पण त्या आधीच १७५७ सालीच प्लासीच्या लढाइत इंग्लंडचा युनियन जॅक डौलाने फडकलेला असतो. आता भारतभर तोच फडकणार असतो. १७६४ च्या बक्सारच्या लढाइनंतर हे चित्र अधिकच स्पष्ट होते. त्यावेळी शाह वलिउल्लाह पैगंबरवासी झालेले असतात. त्यांच्या विचारांचा झेंडा घेउन उभा ठाकतो त्यांचा सख्खा मुलगा. शाह अब्दुल अझीज. १८०३ साली ब्रिटीश दिल्लीचे स्वामी झालेले असतात. शाह अब्दुल अझीज फतवा जारी करतो - भारत हा आता दार उल हरब (युद्धभूमी) झालेला आहे. त्याला दार उल इस्लाम करणे ओघाने फतव्यात येतेच! दक्षिण आशियाच्या मुस्लिम इतिहासातील सर्वात महत्वाचा व युगप्रवर्तक फतवा म्हणून याचा उल्लेख मुस्लीम अभ्यासक करतात. ह्या फतव्याच्या आधार केवळ १८५७ लाच घेतला गेला असे नाही; १९२१ मध्ये मौलाना आझादांनी याच फतव्याचा उल्लेख करत मुस्लीमांनी ब्रिटिश इंडियातून हिजरत करून अफगाणिस्तान मधे जावे असे म्हटले होते. ब्रिटीशांना हिदुस्थानातून हाकलून द्यावे यासाठी पुकारायचा जिहाद ह्याच फतव्यातून जन्म घेणार होता. (सरहिंदी) मुजादिद अल सानि चे शिष्य वलिउल्लाह - वालिऊल्लाह पुत्र अब्दुल अझीज चे पटटशिष्य - सय्यद अहमद शहिद - त्यांचे पट्टशिष्य अलिबंधू आणी अलिबंधूंचा पट्टशिष्य म्हणजे बहादुरशहा जफर अशी थेट नाळ जोडता येते.पकिस्तानात ती जोडतात. १८५७ चा उठाव यशस्वी झाल्यास बहादुरशहा जफर हाच हिंदुस्थानचा घोषित सम्राट होता. खुल्क खुदाका, मुल्क बादशहा और अंमल झासी की रानी का अशा टाइपची घोषणा नानासाहेबांनीही दिली होती. १८५७ यशस्वी झाल्यास लोकशाही प्रस्थापित होणार न्हवती किंवा पेशवे हिंदुपदपादशाहीची द्वाही फिरवणार न्हवते. खुल्क कोणाचा ? मुल्क कोणाचा ? आणी अंमल कोणाचा हे आधीच ठरले होते ! मुस्लिम इतिहासकार ही गुरुशिष्य परंपरा फार महत्वाची मानतात. वलिउल्लह यांची चळवळ आज वहाबी म्हणून ओळखली जाते. ही गुरुशिष्य परंपरा पाकिस्तानात मोगल राजवटी एव्हढीच महत्वाची मानली जाते. http://storyofpakistan.com/the-mughal-empire/ २. उठावपूर्व स्थिती आणी कारणे : १८५७ चा उठाव घडण्यासाठी तत्कालिक आणी ऐतिहासिक कारणे दिली जातात. ब्रिटिशांनी संस्थाने खालसा करणे, आर्थिक पिळवणूक, ब्रिटिशांचा धर्मप्रसार अशी १८५७ ऐतिहासिक कारणे दिली जातात. काडतुसाला गाय आणी डुकराची चरबी लावल्याचे धार्मिक कारण दिले जाते. मुद्दा असा आहे की धार्मिक कारणांनी सर्वसामान्य हिंदू पेटून उठतो काय ? औरंगजेबाच्या सैन्यातले किती हिंदू शिवाजी महाराजांना येउन मिळाले ? अधिकतर संस्थाने कोणाची खालसा झाली होती ? ब्रिटीशांच्या धर्मप्रसाराने कोण अधिक चिडणार होते ? हिंदू की मुसलमान ? शिवछत्रपतिंचा महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा का पडला होता? हा उठाव मुख्यतः उत्तर भारतात झाला.(झासी, कानपूर, मीरत, दिल्ली, आग्रा, अलाहाबाद). या ठीकाणी प्रामुख्याने कोणाची राज्ये होती ? ब्रिटीशांच्या सैन्याचे तीन विभाग होते. १)मुंबई २) मद्रास ३) बंगाल. सर्व मुख्य उठाव बंगाल तुकडीतच का झाले ? त्यातही त्यात घोडदळच का आघाडीवर होते ? बंगाल घोडदळात कोणाची संख्या लक्षणीय होती ? हिंदू की मुसलमान ? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मोरेंनी प्रस्तुत ग्रंथात लिहिलेली आहेत. ********************************************************************************************************** १८५७ चा उठाव हा वस्तुतः ब्रिटीशांविरुद्ध मुस्लिमांनी घोषित केलेला जिहाद होता. .. हा उठाव सय्यद अहमदनी ब्रिटीश राजवटीमुळे भारत "दार उल हरब" झालेला आहे म्हणून जे आंदोलन सुरू केले होते त्याचे पुनुरुत्थान होय. हा उठाव म्हणजे भारताला "दार उल इस्लाम" करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला प्रयत्न होता. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (समग्र आंबेडकर वाङमय खंड ८ पृष्ठ २९५. महाराष्ट्र शासन) ********************************************************************************************************* ३. १८५७ घटना कशा घडत गेल्या. : सावरकर उवाच जानेवारी १८५७ : बातमी पसरली - गायीच्या आणी डुकराच्या चरबीची नवी काडतुसे येत आहेत. ती दातानी तोडावी लागणार आहेत. जानेवारी ते मार्च १८५७: बातमीबरोबरच क्रांतीचा गुप्त संदेश देणार्‍या चपात्या फिरवल्या जातात. १, १८५७ चे स्वातंत्र्यसमर मधे या चपात्यांना उद्देशून सावरकरांनी म्हटले आहे " जा ,हे क्रांतीच्या देवदूता, तसाच पुढे जा ! आपली प्रियतमा तिच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करण्यास तयार झालेली आहे....ही शुभवार्ता तिच्या लेकरांना कळवण्यासाठी दहादिशांना धावत जा ! तीरासारखा पुढे जा ! ... हे मायावी देवदूता .... (१८५७ - ७५) १६ मार्च १८५७ : सादिक अल अखबार या दिल्लीच्या व्रुत्तपत्राची हेडलाईन : पर्शियातील दरबारी लोकांनी आपल्या सम्राटाला सल्ला दिला की आपण ब्रिटीशांविरुद्ध जिहाद करून हिंदुस्थान जींकून घ्यावा. याविषयी सावरकर लिहितात - " १८५७ चे आरंभी दिल्लीच्या मशिदींवरून याच अर्थी सार्वजनिक जाहिरनामे फडकू लागले ! ' फिरंग्यांचे ताब्यातून हिंदुस्थानची मुक्तता करण्यासाठी इराणी सैन्य लवकरच येत आहे. तेंव्हा या काफिर लोकांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी समरांगणात उडी घ्यावी" (१८५७ - ६५). हेच सावरकर उत्तरायुष्यात हिंदुत्ववादी झाले. गांधींनी अफगाणिस्तानच्या अमिराला आवताण धाडले होते तेंव्हा सावरकरांनी पायताण उगारले होते. २९ मार्च १८५७ : मंगल पांडे गोळी झाडतो. (मंगल पांडेचे मार्गदर्शक मित्र म्हणून नक्कीखान आणी वहाबी नेता पीर अली याचा सावरकरांकडून गौरवपूर्ण उल्लेख. ) (१८५७ -६७, २८५) १० मे १८५७ : मीरत चा उठाव (घोडदळाकडून प्रारंभ). बंडखोर कैदी मुक्त. अनेक ब्रिटिशांना कायमची मुक्ती. याविषयीचे सावरकरांचे भाष्य मुळातुनच वाचण्यासारखे आहे !. ११ मे १८५७ : बंडखोर सैन्य दिल्लीत दाखल. बहादुरशहा जफर ला बादशहा घोषित केले. आज्ञापत्रांवर बहादुरशहाची राजमुद्रा झळकू लागली. " विजयाचा अधिपती ! धर्माची ज्योत ! इस्लामचा संरक्षक - सम्राट मुहंमद बाहदुरशहा." याविषयी सावरकर लिहितात " बादशहाचे राज्याहरोहण म्हणजे जुन्या मोगल सत्तेची पुनःस्थापना न्हवती. ते हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक होते." (१८५७ -२२८) १९ मे १८५७ : दिल्लीतील सर्व ख्रिश्चनांचे शिरकाण त्यानंतर दिल्लीत हिंदूंविरुद्ध जिहादची घोषणा. सावरकर लिहितात - काही माथेफिरू मुस्लिमांनी हिंदूविरुद्ध जिहादची घोषणा केली. (१८५७ - २३०) जून १८५७ : उत्तर भारतात बंडाचा वणवा पेटतो. सावरकर लिहितात - लखनौला तर मशिदी मशिदीतून मौलवींनी जिहाद सुरू करण्यासाठी उघड व्याख्याने देत असावे. पाटणा व हैद्राबाद येथे रात्रीरात्रीतून सभा भरत व निरनिराळ्या मौलवींकडून लोकांस स्वातंत्र्ययुद्धाचे व स्वधर्मयुद्धाचे शिक्षण देण्यात येई. (१८५७ - ६६) १ नोव्हेंबर १८५८ : शिखांच्या मदतीने ब्रिटीश बंड चिरडतात राणीचा जाहिरनामा प्रकाशित. सावरकर - शिखांनी देशद्रोह केला असे म्हणतात. (१८५७ - १२४) शिखांच्या भूमिकेबद्दल सरदार खुशवंतसिंगांचे विचार - " मीरत आणी दिल्लीच्या बंडखोरांनी मोगल साम्राज्याच्या पुनःस्थापनेची घोषणा केली. आपल्या वाडवडिलांवर मोगलांनी केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या एकत वाढलेल्या शिखांचा - बहादुरशहा जफर सम्राट होण्याला तीव्र विरोध होता. शिखांनी दिलेल्या संरक्षणात होडसन ने राजपुत्रांना ठार केले. शीखांनी त्या बहादुरशहापुत्रांची प्रेते चांदनी चौकात लटकवली ..... त्याच ठीकाणी.... जेथे गुरु तेग बहादुरांना औरंगजेब बादशहाने ठार केले होते." शिखांनी हा सूड उगवला होता : मेलेल्या मुस्लीमांच्या प्रेतांवर एक एक सपाटे लगावित ते ओरडत होते - हा घ्या गुरु गोविंदसिंगांसाठी... आणी हा ... आणी हा ..आणी हा ... तीन गुरुंसाठी. (१८५७ -१२४ हा संदर्भ समग्र सावरकर वाङमय खंड चार १८५७ चे स्वातंत्र्यसमर पृष्ठ १२४ असा वाचावा. वीर सावरकर प्रकाशन, मुंबई. १९६३) ४. ऊठावाचे प्रेरक, नायक आणी लाभधारक हिंदू की मुसलमान ? नानासाहेब पेशवे : २० एप्रिल १८५९ रोजी नानासाहेबांनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्र प्रामाणिक आणी वीरश्रीयुक्त आहे: " मी असहाय्य म्हणून बंडखोरांना मिळालो ... सैनिक माझ्या (मूळ) प्रदेशातले न्हवते.... दबावाखातर मला बंडखोरांना मिळणे भाग पडले.... आता माझा नाईलाज आहे. मी तुमच्याशी लढायला तयार आहे.मी एकटाच राहिलो आहे. आपली लौकरच गाठ पडेल आणी त्यावेळी तुमचे रक्त सांडून ते गुढगाभर खोल साचेल. तुमच्यासारख्या सामर्थ्य वान राष्ट्राचा मी शत्रू आहे याचा मला अभिमान आहे. मरण तर एके दिवशी यीलच, त्याला भितो कोण ?" नानासाहेबांचे हे निर्वाणीचे पत्र त्यांचा स्वदेशाभिमान आणी शौर्य तर दाखवतेच पण ते कोणत्या परिस्थितीत १८५७ च्या बंडात सामिल झाले ते ही दाखवते. हे माफीपत्र नाही. गनिमीकावा नाही. ब्रिटीशांना दिलेले उघड अव्हान आहे. नाइलाजाने आपण बंडात सामिल झालो असेच नानासाहेब म्हणतात. फौजेची घोषणा होती - खुल्क खुदाका, मुल्क बादशहा , हुकुम नानासाहेब और फौज बहादुरका तात्या टोपे यांनी म्हटले आहे : पायदळाच्या आणि दुसर्‍या घोडदळाच्या तुकड्यांनी आम्हाला घेरले आणी नाना व मला खजिन्याच्या खोलित कैदी म्हणून ठेवले. त्यानंतर बंडवाल्यांनी आम्हाला बरोबर नेले. झाशीची राणी नाइलाजाने युद्धात पडली पण शेवटच्या हौतात्म्याने भावी पिढ्यांसमोर आदर्ष निर्माण करून गेली. तात्या, नाना किंवा झाशीची राणी देशभक्त आणी स्वाभिमानी होते यात शंका नाही; १८५७ च्या उठावात ते नाखुशीने आले पण आपल्या तेजाने झळाळून उठले. १८५७ सालीच इंग्रज पराभूत झाले असते तर ? या देशात लोकशाही येणार होती काय ? हिंदुपतपातशाही येणार होती काय ? या प्रश्नात अजून एक प्रश्न आहे..... तर देशाचे भविष्य काय असते ? हमीरपुरचा अलिबक्ष, बांद्याचा नवाब, मौलाना लियाकत अलि, हाजी इमादुल्लाह, बुलंदशहरचा वलिदाद खान, आग्र्याचा वजिर खान्,अलिगडचा गौस मुहम्मद खान, अयोध्येचा मौलाना अहमदशहा, आझमगडचा मुझफ्फर जहान; गोरखपूरचा मुहम्मद हसन, राहतगडचा नवाब, मुरादाबाद चा मज्जूखान हे या उठावाचे ऊठावाचे प्रेरक, नायक आणी लाभधारक होते. हिंदुस्थानचा घोषित बादशहा होता : बहादुरशहा जफर हे छायाचित्र १८५८ चे इंग्रजांच्या कैदेतल्या बादशहाचे आहे. बादशहा शायर होता. बादशहाला कैदेत टाकले. त्याच्या दोन मुलांची शिरे कापून ती त्याच्या समोर पेश करण्यात आली. त्यावेळी इंग्रजांचा एक हुजर्‍या बादशहाला म्हणतो, "दमदमाये में दम नही अब खैर मानो जान की ! ऐ जफर, ठंडी हुई अब तेग हिंदुस्थान की !!" त्यावर उसळून डोळ्याचा अंगार फेकीत बादशहाने दिलेला जवाब इतिहास सांगणारा मंत्र ठरला. "गाजीयों में बू रहेगी जब तलक ईमान की ! तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की !!" यातल्या गाजी आणी इमान या शब्दांचे अर्थ जरूर पहावेत. http://www.islambasics.com/view.php?bkID=999999&chapter=9 ५. उठाव काळातील जिहादी जाहिरनामे या जाहिरनाम्यांचा सर्वधर्मसमभावी म्हणून गौरव केला जातो. संख्या शेकड्यात आहे. विस्तारभयास्तव केवळ बहादुरशहा व नानासाहेबांचे मोजके सर्वधर्मसमभावी जाहिरनामे बघू. बहादुरशहाचे जाहिरनामे : @ इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सामिल होणे हे हिंदू व मुसलमान यांचे अनिवार्य कर्तव्य आहे. @विविध मार्गांनी येथील धर्माना नष्ट करण्याचे काम इंग्रज करत आहेत. तेंव्हा सर्व हिंदूनी गंगा, तुळस व शाळिग्राम यांची तर सर्व मुस्लिमांनी खुदा व कुराण यांची शपथ घ्यावी की; इंग्रजांना ठार मारणे हे आपले धर्मकर्तव्य आहे. (येथे मुस्लिमानी खुदाची अन कुराणची शपथ पण हिंदूंनी मत्र आपल्या देव आणी धर्मग्रंथांची शपथ न घेता झाडे, नदी अन दगडाची शपथ घ्यायची आहे. अल्लाशिवाय इतर सर्व देव हे सैतानाची रूपे आहेत हा वहाबी विचार यामागे आहे. अल्लसोबत इतर देवताना मान देणे यास शिर्क असे म्हणतात कट्टरवाद्यांच्या लेखी तो महान गुन्हा आहे. ) @ रोहिलखंडाच्या नवाबाला पठवलेल्या आदेशात बहादुरशहा लिहितो - खुदाच्या क्रुपेने हिंदुस्थानातून कुफ्र व शिर्क यांचे उच्चाटन झाले असून इस्लामची प्रस्थापना झाली .. आता शरियत विरोधी एकही गोष्ट घडता कामा नये. नानासाहेबांचे जाहिरनामे : @ सर्वश्रेष्ठ व सर्वशक्तीमान खुदाच्या कृपेने व बादशहाच्या शत्रुसंहारक सुदैवाने ... ख्रिश्चन लोकाना पकडून नरकलोकी पाठवण्यात आलेले आहे. त्याबद्दल आनंद साजरा केला पहिजे. @काफिर इंग्रज या देशात व्यापार करण्याच्या मिशाने आले @ दयामाया न दाखवता काफिरांची कत्तल करा त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल. हि शिकवण नानासाहेबाच्या धर्माची नाही हे उघड आहे. आणी त्याच्या नावाने कोण जाहिरनामे काढत होता हे पुस्तकात उलगडले आहे. ६. ऊठाव काळातील हिंदू मुस्लिम संघर्ष बहादुरशहाचा पुत्र व गादीचा सांभाव्य वारस जवानबख्त याने - एका वेळेस एक शत्रू - हे धोरण स्पष्टपणे व्यक्त केले होते. " काही दिवसांतच आम्ही काफिर इंग्रजांना पायाखाली तुडवू व त्यानंतर हिंदूंना ठार करू." (तळटीप पान १६७) ब्रिटीशांना हाकलून देण्यासाठी हिंदूंच्या सहकार्याची आवश्यकता होती; तेंव्हा त्यांना चुचकारून धक्क्याला लावण्यात आले. पण वहाबींची मूळ प्रेरणा इस्लामी मूलतत्ववादाची असल्याने एकतेचे गारूड फार काळ टिकले नाही. उठावकाळातील हिंदू मुस्लिम संघर्ष मोरेनी २० पानात लिहिला आहे. ******************************************************************************************************* हिंदू मुस्लिमात संघर्ष न होणे देशासाठी आवश्यक आहे. पण हा सत्यशोधन टळणे हा त्यासाठीचा मार्ग न्हवे. १८५७ चा जिहाद हे पुस्तक पूर्ण वाचल्यानंतरच मोरेंचा जिहाद नेमका कशाविरुद्ध आहे ते कळू शकेल. ******************************************************************************************************

वाचने 17197 वाचनखूण प्रतिक्रिया 29

अर्धवटराव Tue, 05/22/2012 - 21:39
या विचारसरणीचा प्रभाव आजदेखील आहे काय? असेल तर त्याला कबुल करुन डोळसपणे भिडण्याची हिम्मत-वकुब-शहाणपणा सध्या कुठल्याही मुत्सद्यात आहे काय ? अर्धवटराव

भडकमकर मास्तर Tue, 05/22/2012 - 21:52
आभ्यासपूर्ण लेख आवडला... फक्त शीर्षक बदला.. म्हटलं मोरे कधी जिहाद करायला गेले ?? मोर्‍यांच्या मते जिहाद, मोरे म्हणतात, " जिहादच" ...वगैरे शीर्षके उपयुक्त ठरावीत...

मोरे सरांचे हे पुस्तक यापूर्वीच वाचले आहे... पण तरिही लेखाची मांडणी,थोडक्यात महत्वाच्या मुद्यांना केलेला स्पर्श मननीय आहे... अता मोरेंच्या काश्मिर-एक शापित नंदनवन चाही परिचय येऊ दे.. :-)

पानिपत संबधी पाकिस्तानी व अफगाणी लोकांचे मत काय होते ह्या बद्दल जाणून घेयासाठी जेव्हा मी त्या लोकांसमोर हा विषय छेडला. तेव्हा वली उल्लाह ह्यांचा उल्लेख पहिल्यांदा एकाला. त्याने धर्म भारतात पुनर्स्थापन करण्यासाठी अब्दाली ला बोलावले व योजनापूर्वक इस्लाम च्या पुनर्जीवन करण्यसाठी आलेला मसीहा अशी अब्दाली ची इमेज तयार केली. व पुढे अब्दाली ने आपला शब्द खरा केला आणि वली उल्लाख चा आशीर्वाद घेऊन स्वदेशी परतला. मात्र त्यांनतर अटक पर्यंत परत मराठ्यांनी कब्जा मिळवला तो इंग्रज येई पर्यंत कायम होता हेहि त्यांना माहित आहे. बाकी रोचक माहिती आहे. सध्या अफगाण व पाकिस्तान मधील राडे पाहता स्वधर्मीय एकमेकाचे गळे चिरत आहेत हे पाहून त्या वली च्या आत्म्याला किती क्लेश होत असेल. लाहोर च्या एका चौकात अब्दाली ची एक तोफ ठेवली आहे. हिंदू विरुद्ध धर्म युद्ध जिंकल्याची आठवण म्हणून अशी सुद्धा माहिती मिळाली.

बॅटमॅन Wed, 05/23/2012 - 01:54
मस्त सारांश. अभ्यास नसल्यामुळे फार बोलत नाही, पण एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मोरे यांच्या पुस्तकाचा रोख हा १८५७ चा उठाव हा मुस्लिमकेंद्रित असून मुघल बादशहा आणि इस्लाम यांच्या पुनरुत्थानाकरिता होता असे सिद्ध करण्याचा आहे. आता विचारसरणी कशीही असो, इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी ती पथ्यावर पडली तर त्यातील न्यून उघडे कशाला करावे? म्हणजे त्या विचारसरणीचे जे काही अपाय सध्याच्या काळात दिसत असतील ते असोत, पण त्यासाठी त्या काळच्या लोकांना शिव्या का घाला? हा तर्कविसंगत प्रकार वाटतोय मला तरी. जे झालेच नाही, पण होऊ शकले असते (मोरे यांचे विवेचन खरे मानून) त्यावर टीका कशाला? १८५७ चा उठाव हा इंग्रजांना घाऊक शिव्या घालण्यासाठी आधीच इतका उपयुक्त आहे, त्यात परत हिंदू मुस्लिम वगैरे कशाला फूट पाडा? मुसलमानांच्या धर्मवेडाला शिव्या घालण्यासाठी इतिहासात दुसरी अनेक ठिकाणे उपलब्ध आहेत, इथे त्याला फारसे महत्व देऊ नये, या मताचा मी आहे.

In reply to by बॅटमॅन

हुप्प्या Wed, 05/23/2012 - 02:23
अगदी हाच विचार अमेरिकेने केला होता. रशियाला हाकलून देण्याकरता कट्टर धर्मांध मुस्लिमांची मदत घेतली तर काय बिघडते? मुजाहदिन कितीही डोकेफिरु असोत. जर ते रशियाला पराभूत करण्याला कारणीभूत असतील तर त्यातील न्यून का उघडे करावे? पण हे केल्यानेच अल कायदा, बिन लादेन, अल जवहिरी वगैरे मंडळींची मांदियाळी अफगाणिस्थान येथे जमली आणि अशा लोकांनी रशिया निघून घेल्यावर जो उत्पात केला त्याची निष्पत्ती ९/११ च्या हल्ल्यात आणि परिणामी अफगाणिस्तानाची (आधीच अश्मयुगातला देश) राखरांगोळी होण्यात झाला. धर्मांधांची दाढी कुरवाळली की ते पुढे आपलाच केसाने गळा कापतात. हा इतिहास विसरु नये. हे धर्मांध इंग्रजांविरुद्ध मारो काफीर को असे गर्जत लढले तेव्हा हिंदूंना कळायला हवे होते की आपणही त्याच मापाने मोजले जात आहोत. इतिहास विसरणार्‍यांना तोच इतिहास पुन्हा घडल्याचे पहाणे नशिबी येते असे कुण्या थोराने म्हटले आहे.

In reply to by हुप्प्या

टवाळ कार्टा Wed, 05/23/2012 - 06:54
>>इतिहास विसरणार्‍यांना तोच इतिहास पुन्हा घडल्याचे पहाणे नशिबी येते असे कुण्या थोराने म्हटले आहे आणि "आपण" तो इतिहास विसरुन पुढे जायला बघतो पण "ते" मात्र इतिहास परत परत आठवुन आजही संधीच्या शोधात असतात

In reply to by हुप्प्या

बॅटमॅन Wed, 05/23/2012 - 12:11
असहमत. आजच्या धर्मांधांकडे दुर्लक्ष करावे असे मी कुठेच म्हटले नाही. माझा भर १८५७ च्या उठावाच्या चित्रीकरणावर आहे. त्या उठावाचे चित्रीकरण करताना हिंदू-मुस्लिम असा भेद करू नये होता होईल तोवर असे माझे मत आहे. तसे करण्यात हिंदू व मुस्लिम या दोघांची सोय आहे हे नजरेआड करण्यात काहीच हशील नाही.

In reply to by बॅटमॅन

राजघराणं Wed, 05/23/2012 - 14:04
हिंदू आणी मुस्लिम या दोघांनाही भारतात सहजीवन अपरिहार्य आहे. त्यामुळे एकीची बीजे इतिहासातूनही शोधावी लागतील. - सहमत पण ......... १८५७ चे उदत्तीकरण करायचे ठरवले तर बहादुरशहा आणी वहाबी चळवळीलाही राष्ट्रीय म्हणावे लागेल...... माझ्या मते एकीची स्थाने शोधता येतील.... अकबर हे एक स्थान नक्की.... अशफाक उल्ला खान .... आणी तिसरे स्थान म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष .. हमीद दलवाई बस्स्स ... १८५७ चे उदात्तीकरण वहाबींच्या सोयीचे आहे. इतर कोणाच्याही नाही त्यांच्या चश्म्यातून चे आगामी भाग - भाग ३ - जनतेचा प्यारा अश्फाक भाग ४ - हमीद दलवाईंची फाळणी मुद्दा असा आहे की - १) मुस्लिम सनतन्यांबरोबर एकीची चर्चा करावी २) का मुस्लिम पुरोगाम्यांबरोबर हिंदूंची भूमिका नेहमीच बुळचट सर्वधर्म समभावाची राहिली आहे. मुस्लिमांवर प्रेम करा .. लाड नको जर त्यांचा धर्म एकतेच्या आड येत असेल तर तो ओलांडून एकता साधावी लागेल.. कुणीतरी स्पष्टपणे बोलावे लागेल

In reply to by टिवटिव

विकास गुरुवार, 05/24/2012 - 20:20
"जागर" वाचल्यावर तर मला कुरंदकर देखील पुरोगामी आहेत का नाही असा संशय आला होता. :-)

जयंत कुलकर्णी Wed, 05/23/2012 - 09:26
चांगला परामर्ष. हे वाचल्यावर आणि हे जर खरे असेल तर मुसलमान उम्माच्या इतिहासात त्याच्यापूर्वी जे घडले होते त्याला अनुसुरूनच हे सगळे होते होते. पुस्तक आजच विकत घेत आहे.

प्राध्यापक Wed, 05/23/2012 - 17:24
लेख अप्रतीमच आहे ,आणी मोरेंसारखा विचारवंत नेहमीच सत्य इतिहास पुढे आणण्यास प्रयत्नशील असतो. इतिहासात जर तर ला महत्व नाही तरी पण १८५७ चा उठाव जर यशस्वी झाला असता तर कदाचीत आजचा अखंड भारत दिसला नसता.

In reply to by प्राध्यापक

नाना चेंगट Wed, 05/23/2012 - 19:11
>>>>आजचा अखंड भारत दिसला नसता. आज अखंड भारत आहे??????????? असो. आमची टिमकी> बाकी लेखाविषयी आमचे मत असे जसे आम्ही आमच्याच एका लेखात म्हटले तसे कुणी धर्माचे अधिष्टान मुलभुत प्रेरणा असे समजून इतिहासाची मांडणी करतो, कुणी वर्णाचे अस्तित्व ही मुलभुत प्रेरणा असे समजून इतिहास मांडतो. कुणी आर्थिक अस्तित्वाची लढाई ही संकल्पना मध्यवर्ती मांडतो तर कुणी वंशराजसत्ता टिकवणे ह्या प्रेरणेने इतिहास मांडतो. इतिहास प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन मांडता येतो. मांडला जातो. हा विचार एकदा समजला की इतिहासकाराचा हेतू त्याच्या मांडणी मागे हे समजून येते. ज्याला धर्माच्या आधारावर एकीकरण अपेक्षित असते तो धार्मिक आधार सिद्ध करतो. प्रत्येक लढाई, डावपेच ही त्याच दृष्टीकोनातून समोर येते. ज्याला धार्मिक कट्टरवादाच्या विरुद्ध लढा द्यायचा असतो तो इतिहासातील धर्म निरपेक्षता मांडण्याचा प्रयत्न करतो. भांडवलशाहीच्या विरुद्ध लढणारा त्याच इतिहासाला वर्गकलहाचे रुप देतो. लेख इथे वाचता येईल. / आमचीटिमकी >

In reply to by नाना चेंगट

विकास Wed, 05/23/2012 - 20:18
मूळ लेख माहितीपूर्ण आणि चांगली मालीका! मनःपूर्वक शुभेच्छा. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. आज अखंड भारत आहे??????????? हाच प्रश्न डोक्यात आला. जो पर्यंत इतिहासाच्या पुस्तकात "फाळणी" हा शब्द आहे तो पर्यंत आजचा भारत अखंड आहे असे मानता येणार नाही. आता १९४७ साली फाळणी झालीच नाही असे म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी... कुणी धर्माचे अधिष्टान मुलभुत प्रेरणा असे समजून इतिहासाची मांडणी करतो, ...ज्याला धार्मिक कट्टरवादाच्या विरुद्ध लढा द्यायचा असतो तो इतिहासातील धर्म निरपेक्षता मांडण्याचा प्रयत्न करतो. भांडवलशाहीच्या विरुद्ध लढणारा त्याच इतिहासाला वर्गकलहाचे रुप देतो. सहमत.. फक्त जो पर्यंत तसे लिहीताना उपलब्ध असलेले इतिहासातील पुरावे वापरून हे केले जाते तो पर्यंत विश्लेषणे वेगळी असली तरी समजू शकते (सगळी मान्य होतील असे नाही). लेख इथे वाचता येईल. हा लेख इतिहासजमा झालेला/काळाच्या पडद्याआड गेलेला दिसतोय :(

पैसा Wed, 05/23/2012 - 20:08
लेख आवडला. राजा रजवाड्यांच्या आज्ञा पाळण्याची परंपरा असताना १८५७ चा उठाव ज्या स्वरूपात प्रोजेक्ट केला जातो तसा कसा काय झाला अशी शंका नेहमीच यायची. पण जेवढी माहिती देण्यात आली होती त्यामुळे गप्प बसणे भाग होते. या लढ्याची पार्श्वभूमी कळायला या लेखामुळे मदत झाली आहे. धन्यवाद! सावरकरांवर ते हिंदुत्ववादी होते असा कायमचा आरोप करणार्‍यांनाही या लेखात काही गोष्टी वाचून आश्चर्य वाटेल. मुख्य म्हणजे कोणताही अभिनिवेश न आणता या मालिकेतले लेख लिहिताय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभार!

In reply to by पैसा

विकास Wed, 05/23/2012 - 23:36
मुख्य म्हणजे कोणताही अभिनिवेश न आणता या मालिकेतले लेख लिहिताय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभार! १००% सहमत! :-) मूळ लेखासंदर्भातः मुसलमानी जिहाद असोत अथवा नसोत, यावरून हे निव्वळ "शिपायांचे बंड" होते हे म्हणणे चुकीचे ठरते असे सिद्ध होते का? सावरकरांवर ते हिंदुत्ववादी होते असा कायमचा आरोप करणार्‍यांनाही ... (@पैसा) तुम्हाला काय म्हणायचे असेल याचा मला अंदाज आला आहे, तरी शब्दांमुळे वेगळा अर्थ होऊ शकतो म्हणून लिहीत आहे... (यात सावरकरांचा बचाव नाही अथवा मोरे/कुरंदकर अथवा येथे राजघराणे चुकीचे सांगत आहेत असा मुद्दा मांडण्याचा हेतू नाही) सावरकर हिंदुत्ववादी असणे हा आरोप नसून ऐतिहासीक सत्य आहे. किंबहूना हिंदुत्व हा शब्दच मुळी सावरकरांचा आहे. वरील लेखात म्हणल्याप्रमाणे "१८५७चे स्वातंत्र्यसमर लिहीत" असताना, १९०८ साली सावरकर २५ वर्षांचे होते तर त्यांनी हिंदुत्व हा शब्द तयार केला तेंव्हा म्हणजे १९२३ साली ते ४० वर्षांचे होते. ह्यातील वय हा भाग म्हणलं तर महत्वाचा आहे म्हणलं तर नाही... तुर्तास बाजूस ठेवूयात. "१८५७चे... " जेंव्हा सावरकरांनी लिहीले तेंव्हा ते लंडनमधे होते. त्यांचा उद्देश हा तत्कालीन समाजाला जागृक करण्याचा होता. पुस्तकाच्या सुरवातीस पुस्तक लेखनामागील स्वतःची भुमिका स्पष्ट करताना सावरकर म्हणतातः
When, therefore, taking the searching attitude of an historian, I began to scan that instructive and magnificent spectacle, I found to my great surprise the brilliance of a War of Independence shining in “the mutiny of 1857”. The spirits of the dead seemed hallowed by martyrdom,. And out of the heap of ashes appeared forth sparks of a fiery inspiration. I thought that my countrymen will be most agreeably disappointed, even as I was, at this deep-buried spectacle in one of the most neglected corners of our history, if I could but show this 13 to them by the light of research. So, I tried to do the same and am able to-day to present to my Indian readers this startling but faithful picture of the great events of 1857. The nation that has no consciousness of its past has no future. Equally true it is that a nation must develop its capacity not only of claiming a past but also of knowing how to use it for the furtherance of its future. The nation ought to be the master and not the slave of its own history. For, it is absolutely unwise to try to do certain things now irrespective of special considerations, simply because they had been once acted in the past. The feeling of hatred against the Mahomedans was just and necessary in the times of Shivaji- but, such a feeling would be unjust and foolish if nursed now, simply because it was the dominant feeling of the Hindus then.
यातील दुसरा परीच्छेद वाचल्यास त्यांचा नक्की विचारप्रवाह कसा होता हे सहज समजू शकेल. यात त्यांनी शिवाजीच्या काळातील मुसलमान विरोधातील जनमानसाचे उदाहरण देत आता तसे वागायची गरज नाही असे म्हणलेले दिसते. त्याचाच दुसरा अर्थ असा की त्यांच्या दृष्टीने ५० वर्षांपुर्वीच्या (१८५७च्या) घटनांचा १९०८ सालच्या हिंदूंप्रमाणेच मुस्लीमांनी देखील अर्थ लावताना वेगळा विचार केला पाहीजे असा असू शकतो असे वाटते. त्याशिवाय त्यांनी हे पुस्तक लिहीताना लंडनमध्ये उपलब्ध असलेले तत्कालीन संदर्भ वापरले होते. त्यात जवळपास ३७-३८ संदर्भ हे इंग्लिश (एक खान नाव दिसले उर्वरीत ब्रिटीशच असावेत) लेखकांचे आहेत, तर "शिपायांचे बंड" (विनायक कोंडदेव ओक), "शिपाई उद्धेर इतिहास" (बंगाली), "झाशीच्या राणीचे चरीत्र" (पारसनीस) आणि गोडसे यांचे "माझा प्रवास" (वैद्यांनी प्रकाशिलेले) अशी मराठी-बंगाली पुस्तके आहेत. जिहादचा उल्लेख सावरकरांनी सौम्यपद्धतीने का केला असावा याचे उत्तर त्यांच्या एका संदर्भात कळू शकते: A general order was issued prohibiting the slaughter of kine throughout the country and, when once some fanatic Mahomedans wanted to insult the Hindus by declaring Jehad against them, the old Emperor, seated on an elephant and with all his Imperial officers, went in a procession through all the city declaring that the Jehad was against the Feringhis alone! Anyone found killing a cow was to be blown up or his hand cut off. अर्थात हे १९०८ सालातले त्यांचे पुस्तक... नंतर १९१० साल नंतर जेंव्हा त्यांची अंदमानला रवानगी झाली तेंव्हा तिथल्या आणि इतरत्र होणार्‍या घटना पाहून त्यांनी तेच विचार १९२३ साली हिंदुत्वामधे वेगळ्यापद्धतीने घातले.

In reply to by विकास

अर्धवटराव गुरुवार, 05/24/2012 - 00:28
>>ह्यातील वय हा भाग म्हणलं तर महत्वाचा आहे म्हणलं तर नाही... हा भाग खुप जास्त महत्वाचा आहे. ध्येयाने झपाटलेल्या तरुणाचे जगाचे अनुभव घेउन परिपक्व अश्या प्रौढात रुपांतर झाले आहे. इस्लामी धर्मभावनेला राष्ट्रहिताच्या कामी लावताना जर बाहेर देशांची मदत घेतली त्यांची निष्ठा विभागेल त्यामुळे त्या आगेशी खेळु नये हे सरळ सरळ गणित सावरकरांना उमगले. हिंदुधर्म भावना प्रज्वलीत करताना त्याची राष्ट्रीयत्वाशी अभेद्य संगत आणि हिंदुंना विज्ञानाची कास धरायची समज घालण्याचा सावरकरांचा शहाणपणा त्याकाळी तर लोकांना उमगला नाहिच, पण आज इतक्या वर्षांनी देखील या अद्वितीय खेळीकडे अडाणीपणेच बघितले जाते... खैर..चालायचेच. अर्धवटराव