मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मीही कवि होणार!

मेघवेडा · · जे न देखे रवी...
अलिकडे 'आव आव, झटपट कवि बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा! बर्‍याच दिवसापासून वाटतोय तिटकारा उठसूट प्रसवणार्‍या काव्यमक्षिकांचा. पण आज 'प्रेयसी'मुळे कहर झाला! होणार, मीही कवि होणार, छंद नको मज, नकोत वृत्ते अलंकारही नकोत भलते गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार! यमक तेवढे ठाऊक मजला तितके पुरते कवी व्हायला अंत्यपदे जुळवुनी, बाकिचा कचरा मी भरणार.. मीही कवि होणार कविता म्हणजे हवीच प्रीती द्विपुएव सर्वनाम चित्ती विशेषणांच्या खिरापतीने तुझे पोट भरणार.. मीही कवि होणार! हात घेतला जेव्हा हाती, पाऊस पडता ओली माती हाती माती साथी घेउनि काव्यशिल्प घडणार, मीही कवि होणार! प्रेमासह जर निसर्ग असला डब्बल ज्याक्पॉट नक्कि लागला रूपक नि चेतनागुणोक्ति बोनसमधि मिळणार.. मीही कवि होणार! रोज एक या फ्रीक्वेन्सीने कविता पाडीन जलदगतीने प्रतिसादाच्या शून्या पाहून नाही डगमगणार.. मीही कवि होणार! कविता माझ्या नसतील भारी लोकांना ना आवडल्या तरी विडंबकांना मुबलक कच्चा माल मी पुरवीणार.. मीही कवि होणार! चर्चा व्हावी अशी आशाअपेक्षा आहे! ;)

वाचने 11036 वाचनखूण प्रतिक्रिया 35

रेवती Wed, 11/30/2011 - 18:58
खी खी खी भारी, खरच भारी झालिये कविता. एक शंका: हे जे टोमणे मारलेत ते मला तर नव्हेत?;) नुकत्याच मला मिळालेल्या पुरस्काराबद्दलची असुया सांडलिये का?;)

मोहनराव Wed, 11/30/2011 - 19:04
फुटलो!! काय सांगु.. मस्त झालीय कविता!! पण नवकवींच्या आनंदावर विरझण घालताय तुम्ही असं नाही वाटत का तुम्हाला? ;)

सुहास.. Wed, 11/30/2011 - 19:33
हाण्ण , हाण्ण लेका ! प्रेमासह जर निसर्ग असला डब्बल ज्याक्पॉट नक्कि लागला रूपक नि चेतनागुणोक्ति बोनसमधि मिळणार.. मीही कवि होणार! =)) =)) अरे काय रे ! फु ट लो अक्षरशः

अन्या दातार Wed, 11/30/2011 - 19:40
अहो, नवकवींना-लेखकांना प्रोत्साहन द्यायचे सोडून तुम्ही हे काय करताय. हे काही बरोबर नाही ;) रच्याकने: मागे घासूगुर्जींनी कविता करण्याचे काही मार्गदर्शक लेख लिहिले होते. त्याचा तर इफेक्ट आत्ता दिसत नाहीये ना?

ह्हा ह्हा ह्हा ह्हा :bigsmile: बापरे बाप...प्रत्येक वाक्या गणिक हसू वाढतच आहे... हा सलग सरसकट पंचनामाच म्हणायला हवा...त्या कवि-तांचा :-D बाबौ ...खतरनाक हाय हो हे प्रकरण ...वाचनखूण आपोआप साठवली गेली आहे.... ;-)

किसन शिंदे गुरुवार, 12/01/2011 - 09:47
उदयोन्मुख कविंच आणी त्यांच्या कवितांच अगदी खतरनाक पध्दतीने पोस्टमार्टम केलयंत. :D :D =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

सुहास झेले गुरुवार, 12/01/2011 - 10:41
हा हा हा .. लैच भारी
कविता माझ्या नसतील भारी लोकांना ना आवडल्या तरी विडंबकांना मुबलक कच्चा माल मी पुरवीणार.. मीही कवि होणार!
आता ह्या कवितेचे विडंबन किंवा रसग्रहण येऊ द्यात ;-)

चित्रा गुरुवार, 12/01/2011 - 11:04
रोज एक या फ्रीक्वेन्सीने कविता पाडीन जलदगतीने प्रतिसादाच्या शून्या पाहून नाही डगमगणार.. मीही कवि होणार! छान कविता. लै भारी.

मेघवेडा गुरुवार, 12/01/2011 - 17:51
सगळ्या वाचक, प्रतिसादकांचे आभार. वर म्हटल्याप्रमाणेच गेले काही दिवस या बल्कमध्ये जन्म घेणार्‍या काव्यमक्षिकांचा - अथवा जालीय अतिसाराचा (श्रेय : श्री . रमताराम) - प्रचंड तिटकारा होत होता (अजूनही होतोच आहे.). याचा अर्थ मी स्वतःला लै भारी कवी समजतो आणि नवकवींची उमेद खच्ची करु इच्छितो आहे असा मुळीच नव्हे. मी कवी नाही. मला फक्त कविता फार आवडतात. पण अलिकडे जे चाललंय ते चित्र बरं नाही. कुणीही उठतो, काहीही लिहितो आणि स्वतःला कवी म्हणून मिरवू पाहतो. अरे काय त्याला नाद, लय, छंद, अलंकरण? बरं हे सगळं नाही तरी निदान आशय? काहीकाहींकडे तर त्याचंही दुर्भिक्ष असतं! बरं विषय काय? प्रेम, प्रेयसी, निसर्ग, माझी तू, तू अशी, तू तशी.. अरे काय चाललंय?! माणूस प्रेमात पडला की कविता करतो हे खरंय! पण त्याला 'कविता' कशाला म्हणतात हे ठाऊक असलं तर बरं! उगाचंच काहीतरी "तू तशी आहेस तू अशी आहेस, तू हेच करतेस नि तू तेच करतेस" अशी नेहमीच्या साच्यातली वाक्यं लिहून "मी कवी आहे" म्हणून मिरवणं हे आपल्याला पटत नाही. अरे इतकं सोपं असतं का कविता करणं? बघा जरा बोरकरांच्या प्रेमकविता -
"बोलायचे कितीतरी मनी येतो मी योजून, तुला पाहता पाहता परी जातो विसरून! असे मुकाट्याने वाटे तुला पाहत राहावे उदकात विस्तवात न्हात जळत राहावे! आणि तूंही विचारावे मला आणखीन काय शब्दवैभव असून माझा व्हावा निरूपाय!" किंवा रेग्यांची 'पुष्कळा' बघा- पुष्कळ पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन पुष्कळातली पुष्कळ तू, पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी!
किती साध्या शब्दात आशयगर्भ, नादमय रचना आहेत या! या खर्‍या कविता आणि हे खरे कवी. उगाच आपलं "किती नाजूक ती लाजते लाजत माझ्या कडे बगते तुझ्या हसण्याने संजीवनी मिळते तुझ्या असण्याने शांतता मिळते" असलं काहीतरी लिहून "मी कवी आहे" म्हणणं हा कविता या प्रकाराचा नि त्या कवित्वाचा अपमान आहे! :) विवेक खोत यांनी (हे वाचलंच तर) रागावू नये शांत चित्तानं याचा विचार करावा. आणि हा आरोप केवळ त्यांच्यावर नसून त्यांची कविता केवळ निमित्तमात्र आहे, हे लक्षात घ्यावं. मला स्वतःला मुक्तछंद हा प्रकार छंदबद्ध काव्याच्या तुलनेत कमी आवडतो. काव्य म्हणजे त्यात नाद हवाच हा आपला माझा समज आहे. मुक्तछंदातही नाद असू शकतो पण अलिकडे मुक्तछंदाच्या नावाने जी काय बोंब चालते (गद्यामधि 'एण्टर' पेरुनि!) ते सगळं विनोदी आहे! उगाच काही गद्यांतल्या शब्दांच्या क्रमात फेरफार करून, क्रियापदांचं वाक्यातलं स्थान बदलून मुक्तछंद होत नसतो. मग सरळ काव्यमय गद्यच लिहा की. ते अधिक बरं! उगाच कवी होण्याचा अट्टाहास कशाला? हे असले प्रकार बरेच पाहिले नि तीळपापड झाला! खूपच दिवसांपासून वैताग वैताग झाला होता त्यात कालच्या 'प्रेयसी'ने बांध फुटला! कुणी म्हणेल तुला कुणी अधिकार दिला इतरांच्या रचनांची अशी चिरफाड करण्याचा आणि त्यांच्यावर आरोप करण्याचा? लाख म्हणू दे. मी कवी नाही पण काव्य या गोष्टीचे काही प्रोटोकॉल्स आहेत, नियम आहेत एवढं मला कळतं. लिहिण्याला नकार नाही. लिहा.. खुशाल लिहा! पण तुम्ही लिहिलेलं त्या नियमांत बसत नसेल तर त्याला कविता म्हणू नका! हे प्रोटोकॉल्स, नियम पाळले जावेत असं मनापासून वाटतं आणि अलिकडे बरेचसे जण त्याची तमा बाळगत नसल्याने वाईट वाटतंय म्हणून हे मतप्रदर्शन. परवाच 'खुपते तिथे गुप्ते' चा मंगेश पाडगांवकरांसोबतचा एपिसोड पाहिला. त्यांनी या विषयावर भाष्य करताना खूप सुंदर शब्दांत सांगितलं -"ही काही नवी गोष्ट नाही. जुन्या काळातही चांगले लिहिणारे होते तसेच वाईट लिहिणारेही होते. आताही आहेत. फक्त अलिकडे 'कविता' लिहिणार्‍यांनी काही वाचलेलंच नसतं! अरे बाबा तू कविता करतोस हे ठीक. पण तू वाचलेस का बोरकर, कुसुमाग्रज, रेगे, करंदीकर? तर नाही मग तुला कळणार कशा कविता?!" वास्तविक मी काही पहिला नि एकटाच नव्हे असं वाटणारा पण मला राहवलं नाही म्हणून मांडलं बुवा सगळ्यांसमोर. इतकंच. असो अति झालं. :)

In reply to by मेघवेडा

चित्रा Fri, 12/02/2011 - 10:16
वरील प्रतिसादाशी काही अंशी सहमत. >अरे बाबा तू कविता करतोस हे ठीक. पण तू वाचलेस का बोरकर, कुसुमाग्रज, रेगे, करंदीकर? तर नाही >मग तुला कळणार कशा कविता?!" पाडगावकरांचे म्हणणे थोडेफार समजते, पूर्ण नाही. बोरकरांच्या, कुसुमाग्रजांच्या तरुणपणी त्यांनी लिहीलेल्या कवितांपैकी काही फसलेल्या तर काही कशाच्या तरी आहारी गेलेल्या मी दाखवू शकते. विशेषतः कुसुमाग्रजांच्या काही कवितांमधून त्यांचा कवी म्हणून प्रवास स्पष्ट दिसतो असे माझे मत आहे. तरीही तेव्हा आणि आत्तामधला एक मुख्य फरक असा आहे की आताचे कवी हे नवथर असताना त्यांना आंतरजालाच्या या अतिजलद माध्यमामधून चटकन कविता लोकांपुढे आणता येतात. जसे कुसुमाग्रजांना किंवा बोरकरांना त्या काळात जमणे शक्यच नव्हते. प्रसिद्ध होणारी कविता ही संस्करणानंतर प्रसिद्ध होत असावी असा अंदाज आहे. तरीही त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या कवितांपैकीही काही कविता मला साधारण वाटतात (अर्थात त्यांच्या प्रतिभेच्या मानाने) तेव्हा प्रसिद्ध न झालेल्या कविता त्यामानाने अधिकच कमजोर असणार असे वाटते. बोरकरांनी संस्कृत काव्ये वाचली असतील असे वाटते. पण कुसुमाग्रजांनी कोण वाचले असतील? पाडगावकरांनी कोण वाचले असतील? माझे मत - वाचावे जरूर - आणि नुसतेच बोरकर, कुसुमाग्रज असे नाही, तर देशोदेशींचे कवीही वाचावे, पण लिहावेही स्वतः . ते केल्याशिवाय तयारी होणार नाही. (मीही कविकिरडूपणा केलेला आहे म्हणूनही हे लिहीत असेन, पण असे माझे मत आहे खरे. ) पण याचा अर्थ जालावरील लेखक/कवींनी रोज उठून (कधीकधी बारा तासांच्या आत) एक लेख/कविता लोकांना वाचायला लावावे असे वाटत नाही. एवढा धावता फलक क्रिकेटच्या म्याचचाही पाहिला नाही कितीक दिवसांत.

In reply to by चित्रा

मेघवेडा Fri, 12/02/2011 - 15:35
पण लिहावेही स्वतः . ते केल्याशिवाय तयारी होणार नाही.
लिहावंच. इव्हॉल्व्ह होण्याकरिता त्या प्रोसेस मधून जावंच लागेल. त्याला नकार नाहीच. आणि जे उत्तम उतरलंय ते लोकांपर्यंत पोचवायलाही हवंच. खाली सोनल कर्णिक वायकुळ म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक कविला आपली प्रत्येक कविता काय दर्जाची आहे ते नक्की कळत असतं. तुम्ही म्हणताय "प्रसिद्ध होणारी कविता ही संस्करणानंतर प्रसिद्ध होत असावी" हेही बरोबर. पण आता ते होत नाही. आता कविता प्रसिद्ध करणं विनामूल्य उपलब्ध असल्यानं जो तो करू शकतो. तेव्हा ती जी संस्करणाची पायरी आहे या अख्ख्या प्रोसेसमधली ती आता कवीनं स्वतःच करायची आहे! झाली कविता की टाक आंतरजालावर असं धोरण येथे कामाचं नाही! अशानं लोकांना फिल्टरिंग करावं लागतं ते चुकीचं आहे. हे लिहिणार्‍यानं स्वतःच करायचं आहे. शिवाय मुळात जे अलिखित (आणि लिखितही) नियम आहेत त्यांची लिहिणार्‍याला जाण असायला हवी - अन्यथा ते फिल्टरिंग आणि फाईन ट्युनिंग जमणारच नाही.. आणि याच गोष्टीचा तर अभाव जाणवतो या बल्कमध्ये पडणार्‍या कवितांमध्ये. ही जाण एक तर उपजत असू शकते, शिक्षणाद्वारे (केवळ शालेय/अकॅडमिक नव्हे) ते संस्कार घडू शकतात आणि मग अधिक वाचनातून ते येऊ शकतं. पुन्हा तुम्ही म्हणताय तसं "विशेषतः कुसुमाग्रजांच्या काही कवितांमधून त्यांचा कवी म्हणून प्रवास स्पष्ट दिसतो" - हेच होतकरूंकरता उत्तम शिक्षण/स्टडी मटिरियल नव्हे काय?

In reply to by मेघवेडा

चित्रा Fri, 12/02/2011 - 19:28
हेच होतकरूंकरता उत्तम शिक्षण/स्टडी मटिरियल नव्हे काय? आहे ना. >त्याप्रमाणे प्रत्येक कविला आपली प्रत्येक कविता काय दर्जाची आहे ते नक्की कळत असतं. कळतं, पण वळत नाही, किंवा कळतच नाही. http://www.misalpav.com/node/18992 येथे मी नवीन लेखक/कवींना मार्गदर्शन करता येईल का असा प्रश्न विचारला होता. अनेकांनी याला नवीन लेखक/कवींना उपयुक्त ठरतील अशी उत्तरेही दिली होती. पण या सर्वासाठी वेळ द्यावा लागतो. तो कोणी देते असे वाटत नाही. रोज एक कविता लिहीणारे कवी नक्की कालच्या कवितेपेक्षा आज आपण काय वेगळे लिहीले याचा विचार करायची स्वतःलाही उसंत देत नाहीत असे वाटते. असो, तुमच्याशी मतभिन्नता असली तर ती मुक्तछंदाबाबतीत आहे, बाकी कवींनी किती आणि किती वेळा कविता या आंतरजालीय माध्यमातून छापाव्या याबद्दलच्या विचारांबद्दल नाही. कवितेसाठी वृत्ते, छंद वापरता आले तर उत्तमच आहे. पण ते न करू शकणार्‍यांनी गद्यातच लिहावे असा नियम नाही. गद्य हा फॉर्मही त्या कल्पनांसाठी बरोबर आहे असेल नाही. शिवाय कवितांमध्ये सर्व वृत्ते, छंद असूनही घिशापिट्या कल्पना वापरल्याने (चंद्र, सूर्य, तारे, प्रेम) त्यात कवीचे कसब/कारागिरी जाणवते, पण अर्थ मनात घर करत नाहीत.

In reply to by मेघवेडा

नमस्कार, विश्लेशण बरचस पटल. अश ब-याचशा वाईट कविता वाचनात येतच असतात. महजालावर पुर्वि खास कवितन्चे ब्लोग शोधुन वाचायचे. आता ते सोदुन दिलय याच कारण तेच. "अरे बाबा तू कविता करतोस हे ठीक. पण तू वाचलेस का बोरकर, कुसुमाग्रज, रेगे, करंदीकर? तर नाही मग तुला कळणार कशा कविता?" हे नितान्त खर आहे. ज्या दिवशी तुमच वाचन सम्पेल त्या मिनिटाला तुमच्यातला लेखक किन्व कवि देखिल सम्पतो हे अनुभवाने सान्गु शकते. मी सुद्ध कविता करते (हे इथे लिहायल सुद्ध भीती वाटते) आणि मुक्त्छान्द ह प्रकार मल खुप आवडतो. ़उसुमग्रज आणि गुलझार यान्च्याइतक तो कोणाला सुन्दर झेप्लाय अस मला तरि वाटत नाहि पन तो मुद्द निराळा. प्रत्येक कविला आपली प्रत्येक कविता काय दर्जचि आहे ते नक्कि कळत असत. तरीही काहीन ती प्रसिद्ध करण्याच मोह आवरत नाही. प्रसिद्धिच्या अपेक्शेने देखिल बरच लिखाण केल जात हे सत्य आहे, लागला तर लागला मटका. त्याचवेळी माध्यम उप्लब्ध असल्याने जो तो आपल लि़खाण छपत सुटतो. पुर्वी निदान त्या लिखणाची परीक्शा होत असे. प्रसिद्ध करणे अथव होणे हे इतके सहज नव्हते. आता ते विनमुल्य सहज उप्लब्ध आहे. आनि कुठलीहि गोष्ट अशी सहज मिळु लागली कि तिचि किमत आणि दर्जा दोन्हिहि खलवत जायला वेळ लागत नाही. बाकी कवितेइतकच तिच विश्लेशण सुन्दर. सोनल

सुहास.. गुरुवार, 12/01/2011 - 18:17
सगळ्या वाचक, प्रतिसादकांचे आभार. वर म्हटल्याप्रमाणेच गेले काही दिवस या बल्कमध्ये जन्म घेणार्‍या काव्यमक्षिकांचा - अथवा जालीय अतिसाराचा (श्रेय : श्री . रमताराम) - प्रचंड तिटकारा होत होता (अजूनही होतोच आहे.). याचा अर्थ मी स्वतःला लै भारी कवी समजतो आणि नवकवींची उमेद खच्ची करु इच्छितो आहे असा मुळीच नव्हे. मी कवी नाही. मला फक्त कविता फार आवडतात. पण अलिकडे जे चाललंय ते चित्र बरं नाही. कुणीही उठतो, काहीही लिहितो आणि स्वतःला कवी म्हणून मिरवू पाहतो. अरे काय त्याला नाद, लय, छंद, अलंकरण? बरं हे सगळं नाही तरी निदान आशय? काहीकाहींकडे तर त्याचंही दुर्भिक्ष असतं! बरं विषय काय? प्रेम, प्रेयसी, निसर्ग, माझी तू, तू अशी, तू तशी.. अरे काय चाललंय?! माणूस प्रेमात पडला की कविता करतो हे खरंय! पण त्याला 'कविता' कशाला म्हणतात हे ठाऊक असलं तर बरं! उगाचंच काहीतरी "तू तशी आहेस तू अशी आहेस, तू हेच करतेस नि तू तेच करतेस" अशी नेहमीच्या साच्यातली वाक्यं लिहून "मी कवी आहे" म्हणून मिरवणं हे आपल्याला पटत नाही. अरे इतकं सोपं असतं का कविता करणं >> +१०००००००० च्यायला, एक काळ होता मिपावर दोनच कवयित्री होत्या, एक प्राजु ताई आणि एक क्रांती ताई (मला कवितेतल थोडफार कळायला लागल ते यांच्यामुळे) मग विडंबक आले एक केसु, एक रंगा काका आणि पुप्या, स्स्लाला विडंबन अशी वाटायची जशी कविताच आहे, आजकाल काय ते कवि आणि काय त्या कवयित्री ! (बाजारात वांगे-बटाटे बरे विकतात त्यापेक्षा ;) )

In reply to by सुहास..

पाषाणभेद Fri, 12/02/2011 - 23:23
>>> च्यायला, एक काळ होता मिपावर दोनच कवयित्री होत्या, एक प्राजु ताई आणि एक क्रांती ताई (मला कवितेतल थोडफार कळायला लागल ते यांच्यामुळे) मग विडंबक आले एक केसु, एक रंगा काका आणि पुप्या, स्स्लाला विडंबन अशी वाटायची जशी कविताच आहे, आजकाल काय ते कवि आणि काय त्या कवयित्री ! (बाजारात वांगे-बटाटे बरे विकतात त्यापेक्षा ) सुहास, म्हणजे इतर नंतर जे आले ते वाईट असला सरळसरळ अर्थ दिसतो आहे तुझ्या बोलण्यातून. प्राजू अन क्रांती ताईंबद्दल आदर आहेच पण येथे नंतर जे आले ते वाईट का? खुप जण आधीपासून साहित्यक्षेत्रात असतील. अगदीच बोलायचे झाले तर कदाचित प्राजू-क्रांतीताई यांच्या समकालीन. त्यांना मिपा नंतर मिळाले व ते नंतर येथे आलो. प्राजूक्रांतीयांच्या तोलाचे नंतर आले असतील किंवा अजूनही आले नसतील व नंतर येतील (किंवा असल्या बोचर्‍या चर्चा पाहून येणारही नाहीत कदाचित) म्हणजे ते काय तद्दन होय? चित्रा ताईंच्या बोलण्यात बरेचसे तथ्य आहे. माझ्या वाचनात काही दिग्गज (अर्थातच येथे नसणार्‍या - (मराठी संस्थळे कवितांसाठी, लेखांसाठी आत्ता आत्ताचे आहे)) कवींची वादग्रस्त, संशयास्पद किंवा अगदी येथे चर्चा चालू आहे तसली कारकिर्द आहे. आदराभयास्तव, समुहापासून वेगळे पडण्याच्या भयास्तव मी सांगत नाही अन वाद झाला तरी सांगणार नाही. वाईटाचे माप माझ्या पदरात पाडून घेतले आहे. असो. माझे बोलणे संपले. यापुढे हा धागा माझ्यासाठी वाचनमात्र आहे. पिरीयड.

In reply to by पाषाणभेद

चित्रा Sat, 12/03/2011 - 09:57
सुहास यांच्याकडून थोडे जनरलायजेशन होते आहे असे वाटते. पण पाषाणभेदांना जरा शांतपणे घ्या असे सुचवते. प्राजु आणि क्रांति यांच्या नंतर आलेल्या दत्ता काळेंची ही कविता पहा. http://www.misalpav.com/node/5353 किंवा ही http://www.misalpav.com/node/4736 किंवा ही पाषाणभेदांचीच http://www.misalpav.com/node/14328 पण कवितांच्या सपाट्यात चांगल्या कविता शोधणे कठीण होते हेही खरे.

राघव गुरुवार, 12/01/2011 - 18:44
मनापासून पटेश. मध्यंतरी कुठेतरी गोंधळ मांडलेला होता.. प्रतिसाद का येत नाहीत वगैरे.. रचनाच खरंतर एवढी आशयगर्भ असायला हवी की प्रतिसाद दिल्यावाचून राहवत नाही असं वाटायला हवं. मेवे, या एका रचनेनंच ज्याला जे पोहोचायला हवं ते तसंच पोहोचतंय..!! क्या बात है! :) राघव

विदेश गुरुवार, 12/01/2011 - 21:55
रोज एक या फ्रीक्वेन्सीने कविता पाडीन जलदगतीने प्रतिसादाच्या शून्या पाहून नाही डगमगणार.. मीही कवि होणार! एकदम भारी ! कवि व्हायच काय राहिल आहे -आहातच , चर्चा सुद्धा नको !