गीत
लेखनविषय:
काव्यरस
काही गाणी अगदी कायम मनात रुंजी घालत रहातात, ती आपल्याला का आवडतात हे सहजासहजी सांगता येत नाही, पण कधीतरी अचानक काही भाव, काही शब्द मदतीला धावून येतात आणि त्या गाण्याचं आणि आपलं नातं उलगडून देतात. अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेला इथूनवेचलं आणि पहिला प्रयत्न केला.
जखमा फुलतील नव्याने,
थरथरेल मन तृणपाते,
भगव्याशा आभाळाचे
क्षितिजाशी धुरकट नाते
त्या कातरवेळी माझ्या
वेदनेस कंठ फुटावा
हुरहुरत्या सांजेला मी
माळून पूरिया द्यावा!
झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या
अन् सांजफुलांच्या वेळा
संध्येची गहिरी दु:खे
गात्रांत भरून उरावी,
मावळताना किरणांना
कविता आतून स्फुरावी
धूसरशा मेघांमधल्या
शिल्पातुन सूर झरावे,
मी ज्योतीसह थरथरता
हे एकच गीत स्मरावे,
"भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते,
मज तुझी आठवण येते!"
वाचने
2211
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
क्या बात!! क्या बात!
त्या कातरवेळी माझ्या वेदनेस कंठ फुटावा हुरहुरत्या सांजेला मी माळून पूरिया द्यावा!छानच प्रयत्न!! सुंदर!!
सुंदर रचना!
अप्रतिम ....
झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या
अन् सांजफुलांच्या वेळा
संध्येची गहिरी दु:खे
गात्रांत भरून उरावी,
मावळताना किरणांना
कविता आतून स्फुरावी
विशेष आवडले ....
खल्लास!! जियो क्रांती!!!
अफाट आहे कविता!
व्वाह!
दाद देण्याजोगाच प्रयत्न!
वा क्रांती! सुरेख! खूप सुरेख लिहितेस तू.
क्रांतीतै,
खुप सुंदर कविता!!! आवडली.. :)
स्वगत : ( मिपावर आजकाल लोकं काव्य विभाग उघडुन बघत नाहीत याला जबाबदार कोण? )
क्या बात..