मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सडकें थी सब मेरे बाप की..

गवि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आवारा थी रात और सडकें थी सब मेरे बाप की.. एवढी एक ओळ "दिल्ली" गाण्यात ऐकली आणि दिल्लीऐवजी पुणेच दिसायला लागलं. पुणे एअरपोर्टवर नोकरी. सकाळी सहा ते रात्री आठ. रविवारीसुद्धा सुट्टी नाही. आणि तरीही पुण्याची हवा अशी तुफान जवान की यंव रे यंव. थकवा नावाची गोष्टच नाही. रात्री नवानंतर आम्ही नवी नवी नोकरी करणारे पाच सात होतकरू मित्र एकमेकांना भेटायला नारायणपेठेत एका मोडकळीला आलेल्या वाड्याच्या वरच्या खणवजा खोलीत जमायचो. तिथे नेहमी राहणारा आमचा मित्र आम्हाला कधीच वैतागला नाही. वैतागायला काही हरकत नव्हती कारण एकतर आम्ही तिथे घुसून साध्या खोलीला "घटनास्थळ" बनवण्याएवढा आवाज करायचो. आमच्या दंग्याने खालच्या मजल्यावर माती पडायची. मग आम्ही त्या मित्राचा "आलेला" घरगुती जेवणाचा डबा झडप घालून गिळंकृत करायचो. अर्थातच एका डब्याने सहा जणांची दाढही भरली जायची नाही. म्हणून मग त्यालाही सोबत खेचून आम्ही अन्नासाठी वेगवेगळे रोड आणि पेठा पालथ्या घालायचो. एक डिफॉल्ट व्यवस्था हवीच. म्हणून आम्ही बादशाही बोर्डिंग "ठेवलं" होतं. तिथे जिथे "येथे गर्दी करु नये" असं लिहिलंय त्या बोर्डाखाली घोळका आणि गलका करत आम्ही अन्नासाठी वेटिंग करत उभे रहायचो. मी पहिल्यांदा या ठिकाणी गेलो ते स्वस्त आणि अनलिमिटेड अन्न म्हणून. काउंटरवर बसलेल्या आजोबांना मी "एक कूपन द्या.." असं म्हणून पन्नासची नोट त्यांच्या हातात दिली. त्यांनी अतिशय रागाने माझ्याकडे बघत ती माझ्या अंगावर परत फेकली. मी धसक्याने विचारलं, "का..काय झालं?" म्हातार्‍याने एक हात वर उचलून त्याची तर्जनी मागच्या भिंतीकडे डाव्या दिशेने रोखली. तर्जनीच्या बरोब्बर प्रोजेक्शनमधे पाहिलं तेव्हा "कृपया सुट्टे पैसे देणे" असं लिहिलं होतं. मला स्वस्त अन्नाची नितांत गरज असल्याने मी हे मनावर न घेता त्यांना नम्रपणे सुट्टे नसल्याचं सांगितलं. त्याने त्यावरही तोंड न उघडता रांगेतल्या माझ्या मागच्या माणसाला खूण केली.."नेक्स्ट" अशा अर्थाने. आयचा घो..नसतील सुट्टे तर नका जेवू.. …आय मीन "नसतील सुट्टे तर नका जेवू.." असं ते आजोबा तोंडाने म्हणाले नाहीत. हे शब्द माझेच आहेत. ते आजोबा कधीही एकही शब्द बोलल्याचं आम्हाला कोणालाच आठवत नाही. मुके नव्हते एवढं नक्की. पाट्यांकडे बोटं दाखवून त्यांचं सगळं संभाषण चालायचं आणि त्यामुळे काहीही अडणार नाही इतक्या पाट्या तिथे खोलीभर लावलेल्या होत्याच. मग कशाला शब्द वाया घालवायचे? तिथे एक काळा ठोकळ्यासारखा जुना फोन ठेवला होता. तो सतत ट्रिंग ट्रिंग ट्रिंग वाजत राहायचा पण आजोबांनी एकदाही तो उचलल्याचं उदाहरण आमच्या पाहण्यात नाही. त्यांना ऐकू यायचं. पण फोन उचलला तर बोलावंही लागलं असतं. म्हणजे पुन्हा अमूल्य शब्द वाया. मग माझे इतर होतकरू मित्र मदतीला आले. नाणी वगैरे जमवून एकवीस रुपये त्या स्थितप्रज्ञाला टिकवले आणि आत जाऊन थाळीसमोर बसलो. ओहो..इतकं घाऊक अन्न मी आयुष्यात खाल्लेलं नव्हतं. आचार्‍यांचा वाढण्याचा सपाटा बघून मी घामाघूम झालो. आपली ताटावरची नजर क्षणभर जरी हलली तरी ताबडतोब आमटी, ताक आणि भाजी पूर्ववत भरत असे. पोटाला तडस लागली तरी पानात अन्न टाकण्याची हिंमत होत नव्हती कारण तिथल्या असंख्य पाट्यांपैकी एकीवर "अन्नाचं महत्व" आणि न टाकण्याची ताकीद होती. बाहेर बसलेल्या कडक म्हातार्‍याचा (सॉरी..आजोबांचा) अनुभव पाहता अन्न टाकणार्‍यांवर काय कारवाई होईल याची खात्री नव्हती. मी ताटावर खूप नीट लक्ष ठेवून एका हाताने माश्या वाराव्यात तसं वाढप्यांना वारीत वारीत एकदाचं अन्न संपवलं. मग मात्र मला सवय झाली. भात मुठीत कुस्करुन खाणार्‍या मद्राशांना लाज आणेल अशा रितीने चारपाच पोळ्या मस्तपैकी आमटीत कालवून खायचो. बादशाही बोर्डिंगखेरीज अन्न मिळवायला कुठे जायचं हा निर्णय मात्र खूप किचकट प्रक्रियेतून घेतला जायचा. या जागा निव्वळ वादविवाद आणि आवाजी मतदानातून निवडल्या जात. एकाने हाटेलाचं नाव घेतलं की इतर कोणीतरी ते तत्क्षणी विनाचौकशी हाणून पाडलंच पाहिजे. तासभर त्यावर खल झाला की एक प्रोव्हिजनल ठिकाण ठरायचं. पण तोपर्यंत फार फार उशीर झालेला असायचा. त्या उशीरात भर म्हणून आमच्यातल्या एकाला बाहेर निघण्यासाठी "चला" म्हटलं की तत्क्षणी कमरेला टॉवेल लावून "थांबा मी जरा जाऊन येतो.." असं म्हणायची सवय होती. मग प्रेशर नीट डेव्हलप व्हावं म्हणून तो टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत खोलीत येरझार्‍या घालायचा. तोपर्यंत आम्ही त्याला शिव्या घालत तिष्ठत बसायचं. हे सर्व होईपर्यंत पुणेरी पद्धतीने ठरवलेलं हॉटेल बंद झालेलं असायचं. मग तिरगांव करत मटणहाऊसे,खानावळी, इराणी वगैरे शोधायचो. महिन्याच्या पहिल्या दिवशी काजूवाली मटणबिर्याणी आणि शेवटच्या दिवशी पुलाखालच्या चायनीज हातगाडी वरचा "स्वस्तोत्कॄष्ट" फ्राईड राईस. ("स्वस्त आणि उत्कॄष्ट नव्हे" तर "स्वस्त म्हणूनच उत्कॄष्ट"..!). एक प्लेट दोघातिघांत खेचाखेच करुन खायची आणि जो फास्ट खाऊ शकेल तो जास्त शिते खाईल हाच न्याय असायचा. एकतिशी महिना आला तर एकतिसाव्या दिवशी जवळजवळ भिकेकंगाल अवस्थेत (कै.) लकी मधे जाऊन ऑम्लेट बन हेच जेवण. आमच्यासारख्या गरजूंसाठी लकी सारख्या संस्था सामाजिक बांधिलकीतून रात्रीही मस्का बन, ओम्लेट बन आणि चहा पुरवायच्या. तेही पुण्यासारख्या "मिसळ संपली", "आठला बंद", "चटणी मिळणार नाही", "खिचडी फक्त मं.गु.श. मिळेल" अशा तत्वांच्या गावात.. ते काही असो…. मुख्य पोटभरीचा पदार्थ असायचा तो आमच्या गगनभेदी चर्चा आणि गप्पा. अलका टॉकीजसमोरच्या तत्कालीन दूधवाल्याकडून मलाई मारून दूध ढोसलं की आमचा खरा कार्यक्रम सुरु व्हायचा. तोंडाने अखंद बडबड करत पुण्याच्या ज्वानीनं भरलेल्या थंडीत तिथले रस्ते आणि पेठा तुडवण्याचा. गप्पा हाणताना नारायणातून शनिवारात, शनिवारातून परत नारायणात, मधेच गंधर्व, जंगली महाराज, डेक्कन, नवी पेठ कुठे भरकटत चाललोय हे आमच्यातल्या एकालाही लक्षातच येत नसे..कारण चर्चेत बेभान ना सगळेच.. काकासाहेब गाडगीळ पूल हा वादविवादाचा रंगमंच..आणि चर्चेच्या विषयांची रेंज? अगं आई गं.. द्रौपदी,महाभारत,हिजडे,मायकेल जॅक्सन,गुलाम अली,एक्स-रेटेड मूव्हीज,लाईफमधे आपल्याला नेमकं काय हवंय,पैश्यामागे धावायचं का? किती?, भारत सोडून जाणारे लोक गद्दार किंवा कसे?,स्वातंत्र्य न्येमकं कशामुळे मिळालंय, गांधी चूक की बरोबर, आपण टेक्नॉलॉजीत "मागे का?" किंवा "का मागे?" (हे दोन वेगळे विषय आहेत..!!), पॉप्युलेशन कंट्रोल, देशाची वाट नेमकी कुणी लावली, देशाची वाट लागली आहेच का?, देशाची वाट लागलेली नाहीच्च मुळी, नेहरु,अमुकचा स्वभाव तापट कसा, लिव्ह इन रिलेशन्स, दारू, व्यसनं,.. अंत नाही विषयांच्या यादीला. पहाटे दोनपर्यंतही खूपदा आम्ही गाडगीळ पुलावरच तावातावाने भांडत असायचो. दारू न पिताही सगळ्यांना कैफ चढलेला असायचा. गस्तीवरचे पोलीस येऊन हटकायचे. पण आमचे पांडू चेहरे बघून निघून जायचे. सगळ्यांचा अक्षरशः काही तासांसाठी निरोप घेऊन पहाटे दोनच्या हाडं गोठवणार्‍या थंडीत मी फटफटीवरून खडकी साईडने लोहगांवकडे एकटाच यायचो. इतका निर्जन रस्ता मी आयुष्यात फील केलेला नाही. त्या प्रवासात रात्री दीड वाजता मला वर्षभरात एकदाही एकही मनुष्य दिसला नाही की गाडी आडवी गेली नाही. एकतर आधी ख्रिस्ती स्मशानभूमी. मग नदीकिनारी हिंदू स्मशान. नदीशेजारून जाताना थंडी इतकी वाढायची की बोटं क्लचवर दाबता येऊ नयेत. हाडांवरही चरा उठवणार्‍या त्या थंडीतून मी विश्रांतवाडी गाठायचो आणि माझी नदीकाठच्याच लॉजमधे असलेली खोली स्वतःभोवती लपेटून गाढ झोपायचो. नॉस्टाल्जिक बोलायला फार आवडतं असं नाही. पण दिसतं ते हे की आता नारायणपेठेतला तो वाडा कै. झालाय. मोठ्ठी अपार्टमेंट्स उभी राहिली तिथे. लकी कै. झालंय. शॉपिंग सेंटर झालंय तिथे. पूना कॉफी हाऊस कै. झालंय. गुडलकला आता शाकाहारी थाळी मिळते आणि कामाशिवाय बसू नये असं म्हणतात. अलका समोरच्या इराण्याच्या जागी आता साबुदाणा खिचडी मिळते. अलकासमोरचा दूधवाला सुद्धा कै. झालाय. ते बादशाहीतले आजोबासुद्धा बहुधा..आता तिथे कौंटरवर इतरच कोणी व्यक्ती आहे असं ऐकतो. तो म्हणे तोंडाने बोलतो. उत्तरही देतो. झपाझप सूचनांकडे बोटं दाखवण्याची रजनीकांतला लाजवेल अशी सफाई नव्या माणसात नाही. तो कदाचित ग्राहक देवो भव म्हणून नम्रपणेही वागत असेल की काय? आणि सुट्टेही गपचूप देत असेल तर? छे बुवा..बादशाहीत जाण्याचं धाडस नाही होणार आता.. तरीही ओढ लागून पुण्याला पोचावं आणि मित्रांना फोन करून चला रे भेटूया आज रात्री गाडगीळ पुलावर, असं म्हणायला जावं तर ते "जरा हिला विचारून सांगतो" असं म्हणतात आणि मग ओशाळवाणेपणाने "या खेपेला जरा जमेलसं वाटत नाही." असं सांगतात. तेही खरंय. आमच्या सहचारिणींना कशाला असेल आमच्या द्रौपदीचा आणि महाभारताचा संदर्भ्..त्यांना काय माहीत ते बादशाहीतले आजोबा.. तशी आमचीही "ही" आहेच आता. तिने "कुठेही रात्री भटकायला जायचं नाही.." म्हटल्यावर मी ही माझ्या मित्रांना तेच म्हणणार.. "अरे..या खेपेला जमेलसं वाटत नाही..पुढच्या वेळी नक्की.." खरं तर कधीच जमेलसं वाटत नाही कारण तो जमानाच गाडगीळ पुलाखालच्या (नालासदृश..!!) पाण्यासोबत वाहून गेलाय आणि नंतरही ही खूप पाणी गेलंय त्याखालून. आता नवा जमाना. नवी विटी.. नवे डोसेवाले.. नवा ऑम्लेटपाववाला… मुन्नाभाईच्या "फिर हमारे मोहल्ले में हेमा आयी"च्या चालीवर "फिर हमारे लाईफमें मुम्बै आयी..!!" त्याविषयी परत कधीतरी.

वाचने 22356 वाचनखूण प्रतिक्रिया 59

आयला गवि, शॉल्लीट्ट!! आमच्या कल्याणनगरीतील दिवसांची आठवण करुन दिलीत. काय त्या बैठकी!! काय ते पत्त्यांचे डाव!! काय ती जागरणे!!! अहाहा!! तुमच्या लेखातः >>मी ताटावर खूप नीट लक्ष ठेवून एका हाताने माश्या वाराव्यात तसं वाढप्यांना वारीत वारीत एकदाचं अन्न संपवलं. इथे जरा हसू आलं!! त्या उशीरात भर म्हणून आमच्यातल्या एकाला बाहेर निघण्यासाठी "चला" म्हटलं की तत्क्षणी कमरेला टॉवेल लावून "थांबा मी जरा जाऊन येतो.." असं म्हणायची सवय होती. मग प्रेशर नीट डेव्हलप व्हावं म्हणून तो टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत खोलीत येरझार्‍या घालायचा. तोपर्यंत आम्ही त्याला शिव्या घालत तिष्ठत बसायचं. इथे फुटलोच!! >>आणि चर्चेच्या विषयांची रेंज? अगं आई गं.. आणि इथे साफ खपलो!!

विजुभाऊ Fri, 04/15/2011 - 14:31
बादशाही च्या त्य आअजोबांचे आडनाव "तवकर" मला अगोदर ते आजोबा कट्टर सदाशिवपेठी एकारान्त आडनावाचे असतील असेच वाटायचे पण बादशाही मेस चे एक वैशिष्ठ्य मानावेच लागेल. इतक्या वर्षानन्तरदेखील तेथील साध्या जेवणाची चव तशीच आहे. तेथील वातावरण जरादेखील बदललेले नाहिय्ये.तेथे मिळणारे पदार्थ तेच आहेत.टीपीकल जुन्या चित्रपटातील मेस मध्ये दाखवतात तशा प्रकारचे वातावरण . आणि महत्वाचे म्हणजे तेथे होणारी गर्दी देखील तशीच आहे. बादशाहीतील जेवणानंतर समाधान मिळते खरेच जेवल्यासारखे वाटते ते इतरत्र वाटत नाही. एखाद्या आय एस ओ सर्टीफाईड ऑर्गनायझेशन प्रमाणे तेथील एकुणच व्यवस्था चालवली जाते. गिर्‍हाईकाचा नंबर अजूनही पाटीवर लिहून घेतला जातो.नावाचा पुकारा होतो. जेवताना वाढायचा पदर्थांचा क्रम , ताटातील पदार्थांचे स्थान अगदी ठरवून ठेवल्याप्रमाणे असते. कस्टमर डीलाईटच्या जमान्यात चव आणि स्वच्छता या क्वालीटी निकषांवर बादशाही अजूनही बादशाह आहे.

टारझन Fri, 04/15/2011 - 14:54
च्यायला तब्बल २५-३० लायनिंची मोठी प्रतिर्कीया लिहीलेली .. मिपा अचानक गंडल्यामुळे प्रतिक्रीया गेली म्हणुन गप्प रहायचे ठरवले आहे . गवि ... एक नंबर लिखाण बरका .. सगळ्यांचं थोड्या फार फरकाने शेम टु शेम .. :) - (रात्री-बे-रात्री शर्ट्स काढुन पुण्याच्या रोडवर बाईक पळवलेला) टारझन

In reply to by टारझन

मी ऋचा Fri, 04/15/2011 - 16:16
टारु, गविच्याच लेखावर प्रतिक्रिया देताना कसं रे मिपा गंडतं तुझ?? मला यामागे काही तरी काळंबेरं असल्याचा संशय येतो आहे. >>http://www.misalpav.com/node/17613#comment-305828 उगाच आपलं काहीतरी ;)

In reply to by मी ऋचा

टारझन Fri, 04/15/2011 - 16:21
ह्या मॅटर मधे काही गोची नाहीये .. एक तर गवीने एकदम णॉस्टॅल्जिक विषयावर लिहीलंय .. ज्यावर आम्ही काळेकाकांच्या फसवनुकीचे भाग पेक्षा जास्त लिहु शकु . शिवाय खाली स्मिता. यांज कडुन माझ्या वाक्याला दुजोरा मिळतो आहे . आपण दिलेल्या लिंक मध्ये परा ह्यांनी देखील मिपा गंडल्याचे स्पष्ट लिहीले होते . :) - मी चोचा खेळुन खेळात सार्‍या खेळ माझा वेगळा !!

स्मिता. Fri, 04/15/2011 - 14:57
पुण्याची आठवण करून दिलीत हो गविदा! लेख तर इतका मस्त झालाय की मी पण पुण्याच्या त्या पेठांमधून, रस्त्यांवरून फिरतेय असं वाटलं वाचताना. मी इंजिनियरींगला असताना कॉलेज नंतर संध्याकाळी आम्ही अशीच खाद्यभ्रमंती करत असू. बहुतेक वेळा 'दुर्गा' मध्ये मिसळपाव आणि मस्तपैकी ७ रुपयाला मिळणारी कोल्ड कॉफी. ( नंतर ८ रुपयाला झाली होती... आता कितीला मिळते माहिती नाही) उन्हाळ्यात तर प्रत्येक जण त्या कोल्ड कॉफीचे २ ग्लास प्यायचो. पहिल्या ग्लासाने पहिले घसा थंड करायचा आणि दुसरा ग्लास चव घेत संपवायचा :) अधून-मधून वेताळ टेकडीवर फिरायला गेलो की तिथे त्या खाणीसमोर निदान तासभर बसून मनसोक्त गप्पा मारून मगच खाली यायचो. नॉस्टॅल्जीक करून टाकलंत... (टार्‍या सारखीच मी सुद्धा भली मोठी प्रतिक्रिया लिहिली आणि मिपा गंडलं.)

In reply to by स्मिता.

टारझन Fri, 04/15/2011 - 15:04
लाष्ट टाइम मी कोल्ड कॉफी घेतली तेंव्हा १६ रुपयांना होती बॉ .. आम्ही सुद्धा ही कोल्ड कॉफी ७ रुपये असतांना पासुन पितोय :) आणि ऋतु कोणताही असला तरी तिनचार ग्लास रिचवायचोच ;) पण दुर्गा मधली मिसळ म्हणजे मिसळीचा अपमान आहे ;) बाकी मला पण तो एमायटी कँपस लै आवडतो .. घरापासुन लै लांब पडतंय म्हणुन तिथे अ‍ॅडमिशन घेतली नव्हती .. :( :( :( ( अ‍ॅक्च्युली डिवाय च्या पोरी एमायटीच्या पोरींपेक्षा लै भारी असतात अशी कोणीतरी फुस लावली होती मला .. :) )

In reply to by टारझन

स्मिता. Fri, 04/15/2011 - 15:24
एऽऽऽ टार्‍या, ते पांढर्‍या रंगात लिहून असा तोंडावर अपमान करतोस कारे??? पण शेवटी ती फूसच होती म्हणा, खरं काय ते अ‍ॅडमिशननंतर कळलं असेल ना ;) मलाही आमच्या कॉलेजचा कँपस लई आवडायचा... आता तो पण पार बदलला असं ऐकलंय.

In reply to by स्मिता.

टारझन Fri, 04/15/2011 - 16:00
हो ना राव .. :) डिवाय ला जाऊन पण शेवटी दुरुन डोंगर साजरे च :) पोरी एमायटी च्या असो वा डिवायच्या ... फिरणार पैकावाल्या पोरांबरोबरंच .. :) शेवटी "मी एक मिडलक्लास ... " ना ? :) खि खि खि .. पण पश्चाताप वगैरे काही नाही .. कोणत्याही कँपस समोरुन गेलं की तशीच हिरवळ दिसते .. आधी एफ सी भारी वाटे .. मग सिंबीयॉसिस .. तसा मल माझ्या कॉलेज चा अभिमान आहे असेही काही नाही :) एकंदरीत कॉलेज कोणतंही असो .. पुण्यातल्या तोंडावर (उगाच) स्कार्फ न लावणार्‍या पोरींचा मला अभिमान आहे :) पण हो .. काळाच्या ओघात सगळं बदलतं .. २००१ सालचा आणि २०११ सालचा कँपस ह्यात प्रचंड बदल आहे .. नविन अ‍ॅडमिशन घेतलेली पोरं (पोरी नव्हे हं ;) ) आता चिल्लीपिल्ली वाटतात :)

In reply to by टारझन

निमिष ध. Fri, 04/15/2011 - 22:00
एमायटी च्या आठवणी .. आणि पुण्यात रात्रीचे फिरणे. आम्ही मात्र गाडगीळ पुलाच्या ऐवजी जोशी पुलावर असायचो. गरवारे कॉलेज च्या जवळ - गार वारा खात. पण मला तरी वाटते की काही इतर कॉलेज च्या पेक्षा एमायटी वरील हिरवळ जास्ती हिरवी होती. आम्ही मेकॅनिकल वाले असल्यामुळे बाहेर कट्ट्यावर बसून हिरवळ पाहण्यात दिवस जायचे. एमायटी च्या मागच्या रस्त्यावर मिळणारे पोहे, चहा, मेस गल्ली आणि त्या मेस मधले हरबरे वाटणे आणि छोले. इतका धसका घेतला होता त्या गोष्टींचा की जवळ जावला ३ वर्ष छोले खाल्ले नव्हते. आम्ही ही दुर्गाची कॉफी ७ रुपयांमध्ये प्यायली आहे. ती कॉफी थंडी च्या दिवसांत रात्री १२ नंतर दुकानाचे अर्धे शटर उघडे असताना पिताना मजा यायची. बरेच वेळा आम्ही एखादा हवालदार मोठे भुर्जी चे पार्सल घेऊन जाताना दिसायचा.

In reply to by टारझन

पण हो .. काळाच्या ओघात सगळं बदलतं .. २००१ सालचा आणि २०११ सालचा कँपस ह्यात प्रचंड बदल आहे .. नविन अ‍ॅडमिशन घेतलेली पोरं (पोरी नव्हे हं ) आता चिल्लीपिल्ली वाटतात
डोंगर म्हातारा झाला पण!? ;)

In reply to by स्मिता.

चावटमेला Fri, 04/15/2011 - 15:13
बहुतेक वेळा 'दुर्गा' मध्ये मिसळपाव आणि मस्तपैकी ७ रुपयाला मिळणारी कोल्ड कॉफी. ( नंतर ८ रुपयाला झाली होती... आता कितीला मिळते माहिती नाही) स्मिताताई, बरेच वर्षे ती ८ रु. होती, आता १५ रु. झाली आहे आणि जास्त पाणचट झाले आहे :( बाकी, लेख खूप आवडला, चर्चेच्या विषयांचे वर्णन तर एक नंबर..

मेघवेडा Fri, 04/15/2011 - 14:58
लिखाण छानच! प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भूतकाळात घेऊन जाणारं! पण खरं सांगायचं तर मला तरी हे नेहमीप्रमाणं अस्सल गवि-धारेचं लिखाण वाटलं नाही! सचिननं ४०-४५ मारले तरी त्यानं सेट केलेल्या स्टँडर्ड्सनुसार ते एक अपयशच असतं.. त्याप्रमाणं काहीसं या लेखाबद्दल झालं असावं माझ्यामते. :)

असुर Fri, 04/15/2011 - 14:59
गवि इन फॉर्म!!!! आणि पुण्याबद्दल -फॉर अ चेंज- चांगलं (जे लिहीलंय ते फार चांगलं आहे) वाचून गहिवरुन आलंय!!! :-) पुण्याबद्दल चांगल्या गोष्टी लिहीण्याची सुपारी गविंना द्यावी काय? ;-) --असुर

In reply to by असुर

मृत्युन्जय Fri, 04/15/2011 - 15:14
पुण्याबद्दल चांगल्या गोष्टी लिहीण्याची सुपारी गविंना द्यावी काय? हे म्हणजे मल्लिकाला फुल्ल कपडे घालायची सुपारी देण्यासारखे आहे ;)

मृत्युन्जय Fri, 04/15/2011 - 15:13
खरं तर कधीच जमेलसं वाटत नाही कारण तो जमानाच गाडगीळ पुलाखालच्या (नालासदृश..!!) पाण्यासोबत वाहून गेलाय आणि नंतरही ही खूप पाणी गेलंय त्याखालून. एक नंबर लिहिलय गवि गुडलकला आता शाकाहारी थाळी मिळते आणि कामाशिवाय बसू नये असं म्हणतात गुडलक मध्ये अजुनही कामाशिवाय बसु देतात. बाकी लेख खतरनाक. नॉस्टेल्जिक करुन गेला एकदम. आणि पुण्याला कितीही नावे ठेवली तरी एकदा पुण्यात राहिलेला माणूस असला म्हणजे हेच सगळे पुण्याची शान आहे हे त्याला कळते. शान ओसरायला लागली म्हणा आता. जिथे बादशाही बदलले* तिथे बाकीच्यांची काय कथा जय महाराष्ट्र, जय पुणे * बदलले म्हणजे उर्मटपणा थोडा कमी झाला ;)

In reply to by मृत्युन्जय

असुर Fri, 04/15/2011 - 15:36
* बदलले म्हणजे उर्मटपणा थोडा कमी झाला अगदीच असहमत! बादशाहीमध्ये जेवायला येणार्‍यांबरोबर कुणीही उर्मटपणा करताना दिसून येत नाही. गिर्‍हाईक म्हणजे बादशाहीतली सर्वात तुच्छ वस्तू, तिला अनुल्लेखानेच मारले पाहीजे या मताचे लोकच तिथे काम करण्यासाठी नियुक्त होतात. त्यामुळे तिथे असल्या उर्मटपणा वगैरे अमूल्य भावनांसाठी वेळ कुणाला आहे?? :-) ना मृत्युन्जय, तुम्हारा चुक्याच! आपणही पुढल्या वेळी बादशाहीतच जाऊयात जेवायला, तो काऊंटरमागच्या मनुष्याने तुझ्याकडे पाहिलं जरी तरी मी तुला बादशाहीतच पार्टी देईन!! ;-) --असुर

प्रचेतस Fri, 04/15/2011 - 15:21
गवि एकदम खुमासदार लेख, बादशाहीच्या आठवणी जाग्या केल्यात तुम्ही. तिथल्या काही पाट्या पहा येथे. डिस्क्लेमरः पाट्या जरी पुणेरीपाट्या संकेतस्थळावरील असल्या तरी त्या तेथे मीच अपलोड केल्ल्यात.;)

मराठमोळा Fri, 04/15/2011 - 15:27
छान नॉस्टॅल्जिया. आवडेश!!! आपण तरुण/कॉलेजवयीन् असतो तेव्हाच्या गोष्टी कधीच बदलू नयेत असंच वाटत. :) आणि तो काळ कितीही म्हंट्ल तरी काही केल्या पुन्हा येत नाही आणि आणताही येत नाही, पण त्या आठवणींची ही शिदोरी आयुष्यभर पुरते हे नक्की. मी कायम कॉलेजात असणार्‍या लोकांना हेच सांगतो नेहमी की आता जितकं शक्य आहे तितकं आयुष्य जगून घ्या, हे वय निघून गेल्यावर "काहीतरी राहुन गेलं" असं एकदाही वाटता कामा नये.. नंतरचं आयुष्य हे कितीही लोभसवाणं दिसत असलं तरी ह्या मदमस्त ज्वानीच्या उधाणाची सर त्याला कधीच येत नाही. :) एक वाक्य आठवलं. "जुनी पुस्तके वाचायला, जुने मित्र भेटायला आणि जुनी दारु प्यायला चांगली असते."

In reply to by मराठमोळा

सखी Fri, 04/15/2011 - 22:04
आपण तरुण/कॉलेजवयीन् असतो तेव्हाच्या गोष्टी कधीच बदलू नयेत असंच वाटत. - अगदी खरयं गवि - हा भाग जाम आवडला, आता मुंबईबद्दलही वाचायला उत्सुक.

५० फक्त Fri, 04/15/2011 - 15:36
गवि, वर मेवेनं म्हणलंय तसं वाटलं थोडं, पुढं काय असेल याची थोडी कल्पना येत होती. बहुधा आधी ब्लॉगवर वाचलेलं आहे त्यामुळं, तरी पुन्हा वाचताना कंटाळा नाही आला. @'पुण्याबद्दल विशेष माहिती नाही,' - आता टाक पुन्हा धागा मग बघ. . मुळचा पुण्याचा नसलेला आणि होणार ही नसलेला

सूड Fri, 04/15/2011 - 15:42
आवडला लेख....सवडीनं वाचायला ठेवला होता ते बरं झालं. थोडा वेळ का होईना भूतकाळात रममाण झालो. दर शनिवार-रविवारी होणारे आमचे कट्टे डोळ्यासमोरुन गेले.

किसन शिंदे Fri, 04/15/2011 - 15:53
पहाटे दोनच्या हाडं गोठवणार्‍या थंडीत मी फटफटीवरून खडकी साईडने लोहगांवकडे एकटाच यायचो. इतका निर्जन रस्ता मी आयुष्यात फील केलेला नाही. त्या प्रवासात रात्री दीड वाजता मला वर्षभरात एकदाही एकही मनुष्य दिसला नाही की गाडी आडवी गेली नाही. एकतर आधी ख्रिस्ती स्मशानभूमी. मग नदीकिनारी हिंदू स्मशान. नदीशेजारून जाताना थंडी इतकी वाढायची की बोटं क्लचवर दाबता येऊ नयेत. हाडांवरही चरा उठवणार्‍या त्या थंडीतून मी विश्रांतवाडी गाठायचो अगदी बरोबर म्हणालात गवि....... मी सुद्धा asach अनुभव ghetla आहे. बाकी तुमच्या लेखामुळे पुण्यातल्या divsanchi आठवण jhali.

प्यारे१ Fri, 04/15/2011 - 16:20
कृ शि सा न वि वि. आकार थोडा कमी केलात तर पुल (भाईकाका म्हणायला आम्ही क्ष मालक थोडीच आहोत) शोभाल. (थोडं वैयक्तिक पण प्रेमानं हो)

In reply to by प्यारे१

गवि Fri, 04/15/2011 - 16:23
आई ग्ग.. मी नुसतंच स्व. गविकाका वाचलं. मी फोटोबाहेर आहे याची आधी खात्री करुन घेतली.. घाम पुसला आता. धन्यवाद. :)

In reply to by गवि

स्व. गविकाका भारीच की हो कल्पना तुमच्या स्वतःबद्दलच्या. तुम्हाला स्व. गविकाका वगैरे कोण म्हणणार नाही फारतर दिवंगत गविकाका वगैरे म्हणू. स्वर्गात जाल याची काय ग्यारंटी. (प्रचंड हलके घ्या हो. खरंच मजेत म्हणलं आहे.) लेख लई भारी. पूर्वीपण वाचला होता तेव्हाही भयानक आवडला होता व आताही

प्रास Fri, 04/15/2011 - 17:22
आधी तुमच्या ब्लॉगवर वाचलीय पण इथे पुन्हा वाचायला छान वाटली. स्मरणरंजन आवडले.... :-)

रेवती Fri, 04/15/2011 - 18:22
छानच लिहिलय गवि! तुमचा आणि रामदासांचा धागा आला की काहीतरी छान वाचायला मिळणार याची खात्री असते. मी पुण्यात राहूनही कॉलेजला असताना फारशी हाटेलात गेले नाही. त्यामुळे कुठे काय चांगलं मिळतं हे त्याबद्दलचे धागे आल्यावरच समजतं. त्यानंतर भारतावारीत नक्की भेट देऊ असे ठरवूनही 'वैशाली' शिवाय कुठे जाणं होत नाही. एकतर सगळ्या नातेवाईकांकडे जेवणाची आमंत्रणं शिवाय स्वच्छतेचे बदललेले निकष! ;) पुणं खूप म्हणजे खूपच बदललय. तुमचा मुंबैचा लेख नक्की लिहा.

पैसा Sat, 04/16/2011 - 00:02
पुणे आणि मुंबईबद्दल काही लिहिलंत तरी आम्हाला आवडतंच! त्यातून लेखही छान आहे.

बबलु Mon, 04/18/2011 - 12:20
मस्त आठवणी. पुण्यातले मंतरलेले दिवस आठवले. (आमच्या एम. आय. टी. चा कँपस, दुर्गाची गरमागरम भुर्जी/कॉफी, गोकुळ आणि रत्नप्रभा, चैतन्य हेल्थ क्लबातील स्विमिंग / वॉटरपोलोच्या प्रॅक्टीसेस, एम. आय. टी. ग्राउंडवर तासनतास क्रिकेट / फुट्बॉल......). (वय वर्ष १६ ते २२ पुण्यात काढलेला) बबलु

वपाडाव गुरुवार, 04/21/2011 - 16:51
>>>>>खरं तर कधीच जमेलसं वाटत नाही कारण तो जमानाच गाडगीळ पुलाखालच्या (नालासदृश..!!) पाण्यासोबत वाहून गेलाय आणि नंतरही ही खूप पाणी गेलंय त्याखालून. अव्वल... णॉस्टॅल्जिक झालो..

चिगो Tue, 05/03/2016 - 17:53
गविंचा हा लेख सुटला होता नजरेतून..
माझी नदीकाठच्याच लॉजमधे असलेली खोली स्वतःभोवती लपेटून गाढ झोपायचो.
खल्लास.. जबरा लेख, मालक..

गावाच्या जागी कोणतेही नाव टाकले तरी चालेल. भावना तशाच राहतील. आणि सध्याच्या काळात "हिला विचारुन सांगतो" आणि "आज जमेलसं वाटत नाही" हे पण सेमच.

वीणा३ Fri, 05/06/2016 - 01:30
हेहे, तो निर्जन रस्ता वाचल्यावर आत्ताच मिपा वर आलेली भयकथा आठवली :D

आणि चर्चेच्या विषयांची रेंज? अगं आई गं.. द्रौपदी,महाभारत,हिजडे,मायकेल जॅक्सन,गुलाम अली,एक्स-रेटेड मूव्हीज,लाईफमधे आपल्याला नेमकं काय हवंय,पैश्यामागे धावायचं का? किती?,
ठळक केलेले शब्द ठरवून एकापुढे एक लिहिलेत की योगायोग समजायचा?