कृष्ण - १
कधी कधी वाटते......
कृष्ण होण्यापेक्षा राधा व्हावे......
पहाटेच्या चांद्रवैभवाचे रुपेरी चांद्रकण गाळणार्या कदंब वृक्षाखाली..........
सुंदर मोरपिसांच्या........
मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली.....
उदात्त युगांतीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी....
म्हणजे मग.....
द्रौपदीच्या अब्रूचे धिंडवडे निघतांना.......
साध्या सुती साडीच्या दोन हात.....
तुकड्याची चिंता करण्याची गरज उरत नाही.......
कृष्ण - २
पण मग नंतर वाटते......
राधा होण्यापेक्षाही मीरा व्हावे.........
कृष्णाच्या निळाईने भरलेल्या सहवासाची..........
स्मरणे आयुष्यभर वाहण्यापेक्षा.....
कधीतरी मी त्या गिरिधराला अर्पण होईन ही भावना.......
नाही.... ही "आशा" जास्त सुखदायी आहे.....
कृष्ण - ३
कधी कधी असही वाटते......
कृष्ण होण्यापेक्षाही अर्जुन व्हावे........
बृहन्नडा होऊन एखाद वर्ष नाचावे लागेल......
परंतु.........
घनघोर रणसंगर चालू असतांना........
काम, क्रोध, मद, मत्सर या चार घोड्यांचे लगाम हातात घेऊन.......
नुसते बसून तर राहावे नाही लागणार........
कृष्ण - ४
कृष्ण होणेही तसे फार अवघड नाही......
अहो,
अंधारकोठडीत जन्मत: मृत्यू पावणार्या......
सात भावांच्या पाठीवर जन्माला यायला कां भाग्य लागते.......
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१५/०४/२०११)
प्रतिक्रिया
15 Apr 2011 - 12:45 pm | हरिप्रिया_
मस्त लिहिलि आहे...
आवडली कविता,आणि त्यातले भाव पण...
15 Apr 2011 - 12:57 pm | निनाव
आहो मि.का : तुम्हला साष्टांग घातले तरी कमीच असे मला वाटते आहे. इतुके सुंदर कसे काय सुचू शकते..व्वाह!
भन्नाट!!!
कृष्ण होणेही तसे फार अवघड नाही......
अहो,
अंधारकोठडीत जन्मत: मृत्यू पावणार्या......
सात भावांच्या पाठीवर जन्माला यायला कां भाग्य लागते.......
>>>>>> अशक्यच!!!!!!
15 Apr 2011 - 1:02 pm | गवि
अव्वल नंबर..
झक्कास रे मिका.. काय बोलू.. प्रतिभावान आहेस..
मनापासून दाद.
15 Apr 2011 - 1:09 pm | नगरीनिरंजन
कृष्ण-१ खूपच आवडले. विशेषतः "सुंदर मोरपिसांच्या........
मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली.....
उदात्त युगातीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी...." हे फारच मस्त!
कृष्ण-२ ही छान आहे.
कृष्ण-३ मध्ये "घनघोर रणसंगर चालू असतांना........
काम, क्रोध, मद, मत्सर या चार घोड्यांचे लगाम हातात घेऊन......." हे तितकेसे आवडले नाही. रणसंगरात काम, मद कसा? त्यापेक्षा "घनघोर रणसंगर चालू असतांना, क्रोधाच्या बेफाम वारूंचे लगाम हातात घेऊन" असे योग्य वाटले असते असे वाटते. (वैयक्तिक मत.)
कृष्ण-४ ठीक वाटले पण त्यातून ध्वनित होणार्या अर्थाबद्दल साशंक आहे.
15 Apr 2011 - 1:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
>>त्यापेक्षा "घनघोर रणसंगर चालू असतांना, क्रोधाच्या बेफाम वारूंचे लगाम हातात घेऊन" असे योग्य वाटले असते असे वाटते. (वैयक्तिक मत.)
सहमत आहे. :)
>>कृष्ण-४ ठीक वाटले पण त्यातून ध्वनित होणार्या अर्थाबद्दल साशंक आहे.
यात मला अभिप्रेत असलेला अर्थ असा की कृष्णाला अवतारी पुरुष मानतात, पण माझ्यामते तो अवतारी पुरुषापेक्षा पराक्रमी पुरुष होता. त्याने केलेल्या चमत्कारांकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहीले तर लक्षात येते की त्याच्या काळासाठी ते प्रकार नविन होते म्हणुन चमत्कार मानले गेले आणि नंतर त्याला देवत्व बहाल झाल्यावर ते 'दैवी चमत्कार' झाले.
असो. हा सगळा उहापोह ख व तुन होऊ शकतो.
संयमीत प्रतिसादाबद्दल लाख लाख धन्यवाद!!
15 Apr 2011 - 1:11 pm | स्पा
खरच मनापासून दाद, छान लिहील आहेस
15 Apr 2011 - 1:29 pm | नरेशकुमार
अस्सल......
15 Apr 2011 - 2:22 pm | नंदन
मुक्तक म्हणा वा मुक्तछंद - कविता अतिशय आवडली.
15 Apr 2011 - 2:28 pm | गणेशा
मस्तच
भाग १ खुपच आवडला ..
भाग २ मस्त
भाग३ आणि ४ अजुन हवे होते त्यात काहितरी असे वाटते आहे..
बाकी लिहित रहा.. वाचत आहे...
15 Apr 2011 - 4:41 pm | प्राजक्ता पवार
छान .
15 Apr 2011 - 4:46 pm | llपुण्याचे पेशवेll
मिका,
जरी तुमचे त्याकाळातले वगैरे स्पष्टीकरण पटले नसले तरी मूळ कविता मला उमगलेल्या अर्थाने फार छान वाटली.
15 Apr 2011 - 4:49 pm | मेघवेडा
फार आवडले मुक्तक!
15 Apr 2011 - 10:52 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मीरेचा भाव आवडला.....
अप्रतिम.
15 Apr 2011 - 10:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली..........!
कृष्ण-२ खास.
-दिलीप बिरुटे
16 Apr 2011 - 5:28 am | अनामिक
चांगले आहे. कविते पेक्षा मुक्तक असल्यासारखे वाटतेय.
प्रत्येक ओळीच्या शेवटी एवढे टिंब देण्यामागे काय प्रयोजन आहे?
16 Apr 2011 - 9:08 am | प्यारे१
पु का स्फू शु
16 Apr 2011 - 11:12 am | डॉ अशोक कुलकर्णी
मीरा, राधा आवड्ले....
(अवांतर)
पण आमचा अभिमन्यू झालाय त्याचं काय?
16 Apr 2011 - 11:58 am | मिसळलेला काव्यप्रेमी
कळले नाही??
म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला?
16 Apr 2011 - 4:33 pm | निनाव
कदाचित, तुमच्या सुंदर काव्या च्या चक्रा मधे आम्ही आडकलो आहोत कि बाहेर पडता येत नाहिये - असे म्हणायचे असेल अशोक जीं ना....कारण मला सुद्धा तेच वाटते आहे.. तुमचे काव्य इतुके सुंदर असते कि पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. :)
4 Feb 2013 - 1:33 pm | स्पंदना
सारेच शापित! एकमेकाच्या आधाराने जगलेले की एकमेकाच्यात गुंतल्याने फरफटलेले म्हणावे?
मिका सुंदर. त्यातल्या त्यात राधा मला फार वेड लावते. कितीतरी रचना नुसत्या तिच्या भावना घेउनच जन्मल्या.
4 Feb 2013 - 1:44 pm | अभ्या..
मिका मिका मिका
त्रिवार _____/\_____
6 Feb 2013 - 3:33 pm | इनिगोय
+१००००
शब्दच नाहीत..
4 Feb 2013 - 1:53 pm | उपटसुंभ
कल्पना आवडली..! एकदम वेगळा विचार मांडला आहे..!
"अंधारकोठडीत जन्मत: मृत्यू पावणार्या......
सात भावांच्या पाठीवर जन्माला यायला कां भाग्य लागते..."
पण पुढे जन्म काढता यायला भाग्यच हवं ना..!
कारण कृष्णाने जन्म घेण्यासाठी आधीच्यांनी मरायलाच हवं अशी काही गरज नव्हती.ती जिवंत राहूनही कृष्णजन्म होऊ शकला असताच की. कृष्ण हा अवतार नाही असं मानलं तर त्याच्या जिवंत राहण्याचं श्रेय वसुदेव किंवा आणखी कुणाला द्यावं लागेल. मग ते त्याच्याच बाबतीत का व्हावं? आधीच्यांच्या बाबतीत का नाही ? हे भाग्यच नव्हे का ?
अर्थात हे मला उमगलेल्या अर्थावरुन. मिकांना काही वेगळा अर्थ अपेक्षित आहे का ?
4 Feb 2013 - 6:29 pm | तिमा
कृष्ण -२ हे सर्वात आवडले.
4 Feb 2013 - 9:53 pm | श्रिया
सुंदर प्रस्तुति.
5 Feb 2013 - 10:13 am | समयांत
कृष्ण ३ जास्त आवडले.
5 Feb 2013 - 7:25 pm | शुचि
चवथा भाग वाचला आणि डोळ्यात साक्षात पाणी तरारलं. कृष्णाचं दु:ख आपण जाणलत मिका.
6 Feb 2013 - 5:20 pm | प्रसाद गोडबोले
कृष्ण १,२,३ मस्त ..आवडले ...४ चा अर्थ अजुन शोधत आहे :)
6 Feb 2013 - 9:02 pm | कवितानागेश
कधी पाहिले असो वा नसो, सख्ख्या भावंडांशी असलेली जवळिक वेगळी असते.
आधीची भावंडे गेलेले, किंवा जुळ्यातले एकटेच उरलेले अश्या कुणी व्यक्ती जवळून बघितल्या, तर त्यांचा सल दिसू शकेल.
7 Feb 2013 - 3:09 pm | इनिगोय
जुळ्यातले एकटेच उरलेले .. :( कल्पनापण किती बोचणारी आहे.
6 Feb 2013 - 9:53 pm | अग्निकोल्हा
बेरकी, सगळ्याचा सुत्रधार या झालरीपेक्षा फार वेगळी कल्पना फुलवली आहे!
सुरेख.