मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रिक्तता.... शून्य

शुचि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
या इंटर्व्ह्यूला मला एक प्रश्न विचारला गेला होता जो मला खूप आवडला कारण तो प्रश्न मला अतिशय "इनसाइटफुल" असा वाटला. प्रश्न हा होता की "तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करता?" जसे माणसाचे मित्र त्याच्याबद्दल बरच काही सांगतात त्याचप्रमाणे एखादा माणूस त्याच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करतो हे त्याच्याबद्दल खूप काही सांगून जातं असं मला वाटतं. आपण सगळेच जणं आपापला रिकामा वेळ कोणत्या ना कोणत्या कामांनी, विचारांनी भरून काढत असतो. कोणी नाना व्याप मागे लावून घेतो तर कोणी व्यसने, कोणी चांगल्या सवयी अंगी बाणवतो तर कोणी चिंता करत बसतो. नीट पहाल तर आयुष्य हाच एक रिकामा वेळ आहे. आणि जो तो आपल्या परीने हा रिकामा वेळ भरून काढत आहे. क्वचित एखादा अवलिया (नाना नाहीत), संत पुरुष असा निघतो जो की या रिक्ततेला न घाबरता तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतो. विशेष काही न करता, तटस्थ अवलोकन करीत तो संपूर्ण जीवन व्यतीत करतो. पण असा महात्मा विरळाच. आपण सामान्य लोक जरा मोकळा वेळ मिळाला की बेचैन होतो आणि स्वतःमागे व्याप वाढवून घेतो. जशी शांतता ही शब्दाच्या पातळीवरील रिक्तता तसेच मौन हे वाणीच्या पातळीवरील पोकळी. मौनी साधू हे साधना म्हणून मौन पाळतात. उपास ही आहार या पातळीवरील रिक्तता. ती देखील सहजसाध्य नाहीच. संपूर्ण कडकडीत उपास हा कष्टसाध्यच असतो. ध्यान (मेडीटेशन) ही विचारांच्या पातळीवरील शून्यता. ध्यान किती प्रचंड अवघड आहे हे सर्वशृत आहेच. अशा रीतीने रिक्तता, पोकळी, शून्यता या गोष्टी नगण्य नसून अतिशय कष्टसाध्य आहेत. किंबहुना आपण जर थोडे शांत झालो तर लक्षात येईल आपला मूळ स्वभाव हाच "शून्य" आहे. म्हणजे आपलं आयुष्य बघा रिकामा वेळ जो आपण भरून काढतोय, आपलं मन हा कोरा घडा आहे ज्यात आपण विचार ओततोय. आपण मूळात मौन आहोत नंतर आपण शब्द उच्चारत आहोत असं काहीसं. अवर ट्रु नेचर इज स्पेस .... शून्य!

वाचने 6233 वाचनखूण प्रतिक्रिया 32

बेसनलाडू Wed, 12/01/2010 - 01:02
पुढील ध्वनीचित्रफीत पाहिल्यावर हा लेख एका लेखिकेने लिहिला आहे, यावर विश्वास ठेवणे फारच अवघड वाटते - (विश्वासार्ह)बेसनलाडू

In reply to by रेवती

बेसनलाडू Wed, 12/01/2010 - 03:21
नथिंग बॉक्स च्या कृपेने असा धागा काढणे लेखकाला जमलेच नसते कदाचित! लेखात म्हटल्याप्रमाणे तो महात्मा/संत/बैरागी असता कदाचित :) (लेखक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

रेवती Wed, 12/01/2010 - 03:27
धाग्याचे नाव नथिंग बॉक्स्....आणि लेख काहीच नाही. मग हे शून्य शब्दात मांडायचं तरी कुणी? तर लेखिकेनं. शुचितैचा इंटरव्ह्यु घेणारा बुवा असेल म्हणून मोकळ्या वेळात काय करता हा प्रश्न आला. . . याचा अर्थ साधूसंताचे साहित्य त्यांचे नव्हतेच? पहा स्त्रियांची कमाल!;)

In reply to by रेवती

बेसनलाडू Wed, 12/01/2010 - 03:45
शुचितैचा इंटरव्ह्यु घेणारा बुवा असेल म्हणून मोकळ्या वेळात काय करता हा प्रश्न आला. प्रश्नकर्ता आहे प्रश्नकर्ती नाही असे मानल्यास आणि त्यांनी ही ध्वनीचित्रफीत पाहिलेली नाही असे गृहीत धरल्यास प्रश्नच खारीज ठरतो. (प्रश्नकर्ता)बेसनलाडू याचा अर्थ साधूसंताचे साहित्य त्यांचे नव्हतेच? पहा स्त्रियांची कमाल!;) हा प्रेक्षणीय आशावाद आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे एक पुरुष (चुकून) म्हणाला (चाचा नेहरू?) आणि त्यावर आपल्या शत्रूवर प्रेम करा, असे दुसरा (महा)पुरुष म्हणाला (गांधीजी?) त्यामुळे पुरुष एकंदरीतच आपल्या शत्रूवर प्रेम करण्यात कुशल असतात. काही स्त्रिया याला 'आळशी'पणाचे लेबल चिकटवून अपमान करतात खरे; संतसाहित्य हे संतांचे नव्हतेच असे म्हणण्यामागच्या आशावादात असाच अपमान करण्याचा हेतूही लपलेला दिसतो. आपल्यातल्याच 'नथिंग बॉक्स'ची इतकी परिपूर्ण जाणीव पुरुषांना नि केवळ पुरुषांनाच होऊ शकते, यात काही वाद नाही. सबब, केवळ पुरुषच संतपदाला पोचू शकतात ;) (ह. घ्या.) (संशोधक)बेसनलाडू

मूकवाचक Wed, 12/01/2010 - 03:39
"संत पुरुष असा निघतो जो की या रिक्ततेला न घाबरता तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतो. विशेष काही न करता, तटस्थ अवलोकन करीत तो संपूर्ण जीवन व्यतीत करतो." यासाठी प्रसन्न व्यक्तिमत्व, बाह्यांगी साधी राहणी, मुद्देसूद आणि तेच ते बोलणे यावे लागते. "निराकार सगळ्या आकारांना जन्म देतो. सगळे आकार निराकारातच विलीन होतात", "तुम्ही सगळे करून सवरुन निराकाराच आहात", "ती खारुताई पहा किती छान बागडते आहे, माणसे का बुवा इतकी हिंसक असतात?" असली सुभाषितवजा निरुद्देश बेंगरूळ बडबड जगभरचे सगळे प्रश्न मीच सोडवणार आहे अशा ठामपणे करण्याचे कौशल्य साधावे लागते. 'निर्णयरहित सजगता' वगैरे आपल्यासकट कुणालाच बापजन्मात साधणार नाहीत अशा संकल्पनांची पैदास करावी लागते. (शक्यतो) पाश्चिमात्य देशातले (पुरेसे) भगतगण जमवावे लागतात. यात एकदोन तरी गर्लफ्रेंड असणे उत्तम. एकदा रिकामटेकडेपणाने आरामात जगण्याच्या सगळ्या सोयी जमा झाल्या की निम्मे काम साधले. मग विशेष काही न करता, तटस्थ अवलोकन करीत संपूर्ण जीवन व्यतीत (की व्यथित) होते. कुठलीच डेडलाईन, धावपळ वगैरे नसल्याने अंतरंगीचा बहर वगैरे मरेतोवर व्यवस्थित टिकून राहतो. असो.

In reply to by मूकवाचक

यकु Wed, 12/01/2010 - 04:15
>>>>'निर्णयरहित सजगता' वगैरे आपल्यासकट कुणालाच बापजन्मात साधणार नाहीत अशा संकल्पनांची पैदास करावी लागते. झाला का त्रास सुरू ?

In reply to by यकु

मूकवाचक Wed, 12/01/2010 - 21:52
ताटस्थ्या नांव समाधी । म्हणे त्याची ठकली बुद्धी । ते समाधी नव्हे त्रिशुद्धी । जाणावी नुसधी मुर्छा आली ॥ - एकनाथी भागवत

ए.चंद्रशेखर Wed, 12/01/2010 - 07:09
रिकामा वेळ घालवण्याचे सर्वात उत्तम साधन निष्क्रियता हे असते असे माझे तरी मत आहे. आपल्याला रिकामा वेळ आहे व तो आपण निष्कारण फुकट घालवतो आहोत असे वाटून माणूस बैचैन हो ऊ लागला की त्याचे मानसिक स्वा स्थ्य बिघडले आहे असे समजावे. शब्दांच्या पातळीवरील रिक्तता,विचारांच्या पातळीवरील शून्यता असल्या कल्पना डोक्यात येऊ लागल्या की तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे असे समजावे. मग जपजाप्य कर, पूजाअर्चा कर असल्या निरर्थक कर्मकांडांच्यात माणूस मनाची शांती मिळवू पाहतो. ती अर्थातच मिळत नाही. या विषयावरचे माझे हे ब्लॉगपोस्ट ज्यांना रुची असेल ते वाचू शकतात. चंद्रशेखर

In reply to by ए.चंद्रशेखर

बेसनलाडू Wed, 12/01/2010 - 09:03
रिकामा वेळ फक्त जपजाप्य, पूजाअर्चादी आध्यात्मिक किंवा इतर कर्मकांडे करूनच सत्कारणी (?) लावण्याचा प्रयत्न केला जातो, असा काहीसा तुमच्या प्रतिसादाचा सूर दिसतो आहे. तो मला बराचसा एकांगी वाटला. रिकामा वेळ वाचनलेखनादी छंद जोपासणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे इत्यादी मार्गांनी सत्कारणी (पुन्हा ?) लावता येतोच. (छांदिष्ट)बेसनलाडू रिकामा वेळ घालवण्याचे सर्वात उत्तम साधन निष्क्रियता हे असते असे माझे तरी मत आहे. याच्याशी मात्र पूर्ण सहमत! सरळ एक मस्त झोप काढावी तंगड्या ताणून! कुणीतरी सत्पुरुषाने एक वाक्य ऐकवलेले आठवते - दुनिया में सिर्फ ढाई सुख होते हैं| एक अच्छा खाना, दूसरा अच्छी नींद और बचा हुआ आधा वह जिसके लिए हम ये दो सुख बरबाद करते हैं| :) मला वाटते असा सद्विचारी, द्रष्टा महात्मा विरळाच! (सदासुखी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

नगरीनिरंजन Wed, 12/01/2010 - 09:20
>> रिकामा वेळ वाचनलेखनादी छंद जोपासणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे इत्यादी मार्गांनी सत्कारणी (पुन्हा ?) लावता येतोच. वेळ घालवण्यासाठी छंद करणे आणि आवड म्हणून करणे यातही फरक असतोच. निव्वळ रिकामा वेळ घालवण्यासाठी केलेल्या छंदात आणि जपजाप्यादी कर्मकांडात फारसा फरक नसावा. आपल्या मूळ नैसर्गिक अस्तित्वापासून खूप दूर आल्याने हे सगळे प्रश्न निर्माण झालेत असं मला वाटतं. निसर्गात क्षणोक्षणी चालणार्‍या अस्तित्वाच्या लढ्यात सतत वर्तमानात आणि सजग राहिलं जातं आणि सगळा वेळ तसा रिकामाच असतो आणि नसतोही. बाकी त्या अडीच सुखांच्या कल्पनेशी एकदम सहमत. सगळा हा जगाचा डोलारा पोट भरल्यावर आणि सुरक्षित झोप घेण्यासाठी निवारा मिळाल्यावर उरलेल्या मोकळ्या वेळात उरलेल्या अर्ध्या सुखासाठी केलेल्या उद्योगांमुळे तयार झाला आहे.

In reply to by बेसनलाडू

ए.चंद्रशेखर Wed, 12/01/2010 - 09:25
छंद जोपासणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे किंवा झोपणे म्हणजे काहीतरी करणेच आहे. ही निष्क्रियता नव्हे. यापैकी कोणतीही गोष्ट केली तरी आपण रिकामा वेळ सत्कारणी लावला असेच वाटत राहणार. ते तसे वाटणे हेच तर मानसिक स्वास्थ्य बिघडवते. आपण माझे ब्लॉगपोस्ट वाचलेत का. त्यात हा मुद्दा मी विस्ताराने लिहिला आहे.

In reply to by ए.चंद्रशेखर

बेसनलाडू Wed, 12/01/2010 - 10:14
छंद जोपासणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे किंवा झोपणे म्हणजे काहीतरी करणेच आहे. ही निष्क्रियता नव्हे. कसे काय? बाकीचे एकवेळ ठीक, पण झोपणे ही निष्क्रियता कशी नाही? मी तर बुवा झोपलो असताना काहीही 'करत' नाही :) श्वासोच्छवास चालू असतो; पण त्यासाठी खर्च होणारी शारीरिक ऊर्जा नियंत्रित 'करता आली' असती किंवा ती एक ऐच्छिक क्रिया असती, तर अंगभूत आळशीपणामुळे तेही 'करणे' टाळलेच असते :) बाकीच्यांचे माहीत नाही. (झोपाळू)बेसनलाडू गाणी वगैरे ऐकूनही किंवा चित्र काढून, पुस्तके वाचून, लिहून मला काही 'अचिवमेन्ट'चे फीलींग येत नाही; कारण या सगळ्यातून काही अचीव करण्यासाठी मी काही करत नाही. किंवा वेळ सत्कारणी लावल्याचे फीलिंग येण्यासाठीही नाही. मला जे 'करावेसे वाटते' ते मी करतो, यातच मला वाटते सगळे येते. ज्यावेळी जे काही 'करावेसे' वाटत नाही, त्यावेळी 'करू नये'; 'करावेसे वाटते' असे वाटले तर यथामती, यथाशक्ती करायचा प्रयत्न करावा. इतके हे साधेसोपे आहे. त्याला उगाच निष्क्रियता वगैरे बोजड शब्दांच्या लोढण्यात कशाला अडकवायचे? वेळ सत्कारणी लावल्याची भावना निर्माण होणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य बिघडवणे हे मला पटत नाही. असो. (सुस्पष्ट)बेसनलाडू

स्पंदना Wed, 12/01/2010 - 07:55
शुची हे अस विचार करण हेच मुळी पहिला चॅलेंजींग आहे . अन तो विचार शब्दात मांडण तर त्या हुन अवघड! आता विचार काय मी पाहु नाही शकत पण लेख अप्रतिम! वरील व्हिडीओ तर लय भारी!

आत्मशून्य Wed, 12/01/2010 - 21:57
जणू मन हे सध्दा (भोग घेण्याचे) एक इंद्रीय आहे, मग मूळ प्रश्न हाच उरतो की जर सर्व मनोशारीरीक पातळीवर आहे तर या आयुष्याचे/ देहाचे प्रयोजन काय ? किंबहुना आपण जर थोडे शांत झालो तर लक्षात येईल आपला मूळ स्वभाव हाच "शून्य" आहे मला तसे वाटत नाही, कारण आपण शांत झालो तर काही वेळाने आपोआप दंगा करायची ऊर्मी येतेच. एकदाचे शांत झालो बूवा (तेसूध्द्दा देहाच्या बाब्तीत)असे फक्त देहाने प्राण सोड्ल्यावरच घडते. म्हणून तूम्ही असे म्हणूच शकत नाही की आपला मूळ स्वभाव हाच "शून्य" आहे. कारण आपण तेथेसूध्दा फार काळ टीकत नाही, हा फार तर असे म्हणता येइल की शांत झाल्यावर फ्रेश वाटते, तर दंगा केल्यावर थकल्यासारखे. म्हणून शांततेकडे आपण आकर्शित होतो तर दंगा करायला प्रेरीत. आणी हे आकर्शण हे प्रेरणेपेक्षा कमी कश्टात अनूभवास येत असल्याने त्याच्या परीणामाने ते आपल्याला थोडे जास्त जवळ्चे वाटते ? पण तरीही या दोन्हीही गोश्टी आपण कायम स्वरूपी स्वीकरू शकत नाही. म्हणून तो आपला मूळ स्वभाव ठरत नाही....