मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फाशीपेक्षा काही अजून?

गवि · · काथ्याकूट
आधी नुसतीच माहिती..गायीची माहिती असते तशी.. अफगाणिस्तान,बांगलादेश, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, भारत, इराण, इराक, जपान, कुवेत, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सिंगापूर, अमेरिका, विएतनाम, येमेन हे सर्व देश मृत्युदंड देतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान या सर्व देशांनी मृत्युदंडाची शिक्षा कायद्यातून काढून टाकली आहे. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी फाशी रद्द केली आहे असे एकूण देश : ब्याण्णव. फक्त स्पेशल गुन्ह्यांसाठी फाशी राखून ठेवली आहे असे देश: दहा.. (बाय द वे याला काही अर्थ आहे का च्यायला..?) फाशी देण्याची तरतूद आहे पण गेल्या दहा वर्षात वापरली नाही असे देश: बत्तीस फाशी चालू आहे आणि रेग्युलर देतातही असे देश: चौसष्ठ. कायदेशीर मारण्याच्या पद्धती: फासाला लटकावणं, विजेचा शॉक, विषारी इंजेक्शन,फायरिंग स्क्वाड, डोकं उडवणं, गॅस चेंबर. मोस्ट कॉमन ते अनकॉमन या क्रमानं दिलेत. इतिश्री विकिपीडिया प्रसन्न.. आता माहिती संपली. आता खोबरं घातलेल्या कांदे पोह्यांसारखा उहापोह. उगीच बॅकग्राउंड बनवत नाही.. एकूणात टर्मिनल किंवा कॅपिटल पनिशमेंट असावी का नाही हा "गे-लेस्बियन", "लिव्ह इन रिलेशन", "हिंदू-मुस्लीम" इतकाच चघळण्याचा चटकदार विषय. तो तसा राहू नये आणि एक नक्की, खात्रीचं कन्विन्सेबल मत आपल्या देशात तरी तयार व्हावं अशी दिल से इच्छा आहे. फाशी विरोधकांचे मुद्दे: -क्रूर आणि अमानवी..कायदेशीर खून. म्हणून तो नकोच. -चुकीचा निर्णय होण्याची शक्यता. (कोणतीही न्यायव्यवस्था फुलप्रूफ नसते हे गृहीतक) फाशी म्हणजे चुकीचा निर्णय बदलण्याची संधीच न ठेवणं.. -जगण्याचा मूलभूत अधिकार गुन्हेगारालाही आहेच. मग फाशी कशाला? -जन्मठेपही पुरेशी वचक बसवणारी असते मग फाशी कशाला.. ? -फाशीने गुन्ह्यांची संख्या कमी होत नाहीये. म्हणून ती इफेक्टीव्ह नाहीये. फाशीच्या बाजूनं असणा-यांचे मुद्दे: - सेन्स ऑफ जस्टीस. न्यायाचं समाधान. खून के बदले खून. आय फॉर आय. जिवासाठी जीव.. - जन्मठेपेपेक्षा कमी खर्चिक. - गुन्हेगाराला जिवंत ठेवलं तर नंतर सुटण्याची, पळून जाण्याची संधी राहते. फाशीने ही संधी मिळत नाही. - जन्मठेप ही जास्त त्रासदायक आहे. त्यापेक्षा फाशीने सुटका मिळते. -चुकीचा न्याय हा जसा फाशीच्या बाबतीत होऊ शकतो तसाच जन्मठेपेच्याही बाबतीत होऊ शकतोच. आता...... विमान अपहरणाच्या धमकीनं स्वहस्ते दहशतवाद्यांना गाडी घोडा करून सोडून यावं लागणं. अफझल गुरुजींची फाशी थांबून राहणं. शेकडो लोक फाशी होऊनही प्रत्यक्ष एक्झेक्युशन न झाल्यानं रोज मरणाची वाट पाहत बसलेले असणं. अशा खूप खूप मोठ्या पार्श्वभूमीच्या कॅनव्हासवर सरळसोट उत्तर मिळणं अशक्यच दिसतंय असे माझे प्रश्न: मृत्युदंड भयानक की जन्मठेप ?(सश्रम कारावासात मनुष्य "ऑक्युपाईड तरी राहतो..विनाश्रम कारावास दिला तर?, खोलीत चौदा वर्षं नुसतं बसून राहणं..हे नीट विचार केला तर मरणाहूनही भयानक वाटतं का?!!) मृत्युदंडाचा वचक, भीती खरंच बसते का? मृत्युदंड कायद्यातून काढून टाकावा का? कायद्याने शिक्षा देण्यात "सूडभावना" असण्यात गैर काय? सूड ही "लेजिटिमेट" विषयवस्तू नाहीये का?

वाचने 11127 वाचनखूण प्रतिक्रिया 29

सहज Tue, 11/16/2010 - 13:16
अजुन एक महत्वाची माहीती पाहीजे की भारतात गेल्या १० वर्षात किती खटल्यात आरोपींना देहांताची शिक्षा द्यावी म्हणुन सरकारी पक्षाने चालवले. त्यातील किती खटल्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत फाशीची शिक्षा कायम केली गेली व दिली गेली. एकांतवास ह्या शिक्षेबद्दलही (तुरुंगाधिकार्‍याचे अस्त्र) जाणकारांनी लिहावे. मृत्युदंडाचा वचक, भीती असेल असे सकृतदर्शनी तरी दिसत नाही. गुन्हेगारीचा आलेख, संख्या यावर प्रसन्नदा व इतर जाणकार प्रकाश टाकतीलच. अतिशय थंड डोक्याने, योजनापूर्वक हीन कृत्य (यात मनुष्यवध, देशद्रोह, लहानांवर लैंगीक अत्याचार इ इ )करणार्‍यांना फाशीची शिक्षा हवीच असे माझे मत.

अवलिया Tue, 11/16/2010 - 13:32
बाकी कोणत्याहीगुन्ह्यासाठी कुणालाही फाशी असो वा नसो मात्र धार्मिक / अध्यात्मिक कारणांसाठी समाधी घेणार्‍यांवर फाशीसारखी सक्त कारवाई करावी जेणेकरुन लोक अशा प्रवृत्तींपासुन दूर राहून एक सुसंस्कृत आणि सभ्य समाज बनण्याकडे वाटचाल सुरु होईल असे आम्हास वाटते.

In reply to by अवलिया

सहमत आहे. (यापूर्वी होऊन गेलेल्या आध्यात्मिक/ धर्मिक समाधिस्थांवर पोस्ट ह्यूमस फाशीची कारवाई करता येईल काय?) (विचारमग्न)

स्वैर परी Tue, 11/16/2010 - 13:36
परवा पेपरात वाचले.. दिवाळीच्या दिवशी आपल्या मैत्रिणीकडे जानार्या एका मुलीवर २ नराधमानी बलात्कार केला. अशा नीच माणसाना फाशी नाही दिली पाहिजे तर काय केले पाहिजे?

गवि Tue, 11/16/2010 - 13:53
आंतरराष्ट्रीय दहशतवादी, ज्यांना सोडवण्यासाठी जगभरात प्रचंड उपद्रवमूल्य उभं राहू शकतं (विमान अपहरण वगैरे) ते सोडून बाकीच्यांना एका बंद खोलीत (आकाशही दिसणार नाही अशा) कसलीही सश्रम वगैरे शिक्षा न देता नुसते बसवून ठेवले तर ती जास्त त्रासदायक/क्रूर शिक्षा नाही वाटत? टिल डेथ द्यावी हवी तर. मेल्याहून वाईट्..असं मला वाटतं.

In reply to by गवि

छोटा डॉन Tue, 11/16/2010 - 14:40
>>एका बंद खोलीत (आकाशही दिसणार नाही अशा) कसलीही सश्रम वगैरे शिक्षा न देता नुसते बसवून ठेवले तर ती जास्त त्रासदायक/क्रूर शिक्षा नाही वाटत? +१, सहमत आहे. ते जास्त डॅमेजर आहे, माणसाचा आत्मविश्वास आणि मनोनिग्रह साफ कोलमडुन पडतो ह्यामुळे. अवांतर : मालक, तुम्हाला "अंडा सेल" नावाचा प्रकार माहित नाही का ? तिथेही आरोपीला अशा एका खोलीत (?) बंद केले जाते की तिथे धड बसता येत नाही आणि उभारताही येत नाही, झोपण्यासाठीही व्यवस्थित जागा नसते. प्रकाश आणि हवेबाबतही बोंबाबोंब असते. अमेरिकेने ९/११ च्या केसमध्ये पकडलेल्या लोकांना 'ग्वाटेनामो'मध्ये अशाच भयंकर प्रकारे टॉर्चर केले होते अशी बातमी होती. एका अंधार्‍या आणि चिमुकल्या नळकांड्यात ( सिलिंडर टाईप ) बंद करुन ठेवायचे, ३-४ तासातच माणुस पार अवघडुन कोलमडुन पडतो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

गवि Tue, 11/16/2010 - 14:47
अंडा सेल विषयी खूप ऐकलंय. पण तो फक्त थोडावेळ अति नाठाळ कैद्यांना वठणीवर आणण्यासाठी वापरतात (काही दिवस) कसलाही छळ सुद्धा न करता, खायला प्यायला देऊन साध्या पण बंद खोलीत मरेपर्यंत बसवून ठेवणं खूपच भयानक असेल. बोलणे नाही, मनोरंजन नाही. शिविगाळ / मारहाणही नाही. काही महिन्यांतच कैदी मरणाची भीक मागेल असं वाटतं.

गवि Tue, 11/16/2010 - 13:44
याच्याही पुढे शेवटी माझा एक प्रश्न आहे पहा. "सूड" कायदेशीर का असू नये? एका व्यक्तीच्या पाच सहा वर्षांच्या लहान पोरीवर कोणी बलात्कार करून खून केला, आणि त्या दोषी व्यक्तीला शिक्षा देण्याचा हक्क त्या बापाला (आईलाही) सरळ सरळ दिला किंवा त्यांनी "घेतला" तर अराजक होऊ शकेल. किंवा बहुतेक वेळा ते दुबळेच असतील आणि काहीच करणार नाहीत. म्हणून सजा फर्मावण्याचा आणि ती दिलेली पाहण्याचा काहीतरी लॉ असिस्टेड रिव्हेंज राईट त्या आई बापांना (फॉर दॅट मॅटर "अफेक्टेड" व्यक्तींना) द्यावा का? काय चूक आहे?

चिरोटा Tue, 11/16/2010 - 13:54
तीनदा शेवट झालाय. फाशी झालेले बहुतांशी गुन्हेगार समाजाच्या गरीब स्तरातले असतात आणी त्यांना चांगले वकील मिळत नाहीत ह्याचाही विचार व्हावा.

नितिन थत्ते Tue, 11/16/2010 - 14:26
गुन्हेगाराला शासन करणे आणि सूड या दोन गोषीत गल्लत होत आहे असे वाटते. सूड या गोष्टीत दोषी माणसाला शिक्षा हीच कल्पना नेहमी नसते. उलट त्याने जशा प्रकारचे नुकसान केले तशाच प्रकारचे नुकसान करणे अशी कल्पना सूडाची असते. त्याने माझी गाय मारली म्हणून मी त्याची गाय मारली. यात दोन गायी मेल्या पण मूळ गुन्हेगार तसाच राहिला. याउलट फॉर्मल दंडव्यवस्थेत गुन्हा करणार्‍यालाच दंड होण्यावर भर असतो. आणि गुन्हा न करणार्‍याला काही होऊ नये अशी अपेक्षा असते. म्हणूनच गुन्हा याच व्यक्तीने केला आहे हे 'वाजवी शंकांच्या पलिकडे' (Beyond Reasonable Doubt) सिद्ध करण्यात वेळ खर्च होतो. दंडव्यवस्था नसेल तर समाजाचे अस्तित्वच धोक्यात येईल. "लॉ असिस्टेड रिव्हेंज" ची कल्पना मध्ययुगात होतीच. भरचौकात फाशी देणे, हत्तीच्या पायी देणे वगैरे. आता ती सुसंस्कृत समजली जात नाही.

In reply to by नितिन थत्ते

छोटा डॉन Tue, 11/16/2010 - 14:35
संपुर्ण सहमती आहे. आपल्या देशात सध्या अस्तित्वात आहे ती न्यायव्यवस्था आणि न्यायपद्धत ( काही अपवाद सोडुन ) अतिशय उत्तम आहे असे वाटते. बाकी कायदे कितीही कठोर आणि अचुक असले तरी त्याची अंमलबजावणी आणि उपयुक्तता ही ते कायदे ज्यांच्यासाठी बनवले आहेत त्यांच्या समजुतदारपणा, आकलन आणि त्यांचा कायद्याप्रती असणारा आदर ह्यावर अवलंबुन असते असे वाटते. आपल्या देशात नेमकी "कायद्याप्रती नागरिकांचा आणि कायदेरक्षकांचा आदर" हीच बाब कमी आहे त्यामुळे कायदाच्या प्रभावी अंमलबजावणी होते नाही व सध्या अस्तित्वात असलेली न्यायव्यवस्था ठिसुळ आणि अकार्यक्षम वाटते. त्यातच आपल्या काही नेतेमंडळींनी ह्या कायद्याचा असा काही वापर केला की आता हे सर्व सोडुन अधिक कठोर ( आणि अमानुषपणाकडे जाणारे ) कायदे असावेत असा एक मतप्रवाह बनत चालला आहे. आपल्याकडे जरी व्यवस्थित न्यायदानाचे प्रमाण जरासे कमी असले तरी शक्यतो 'चोर सोडुन सन्याशाला फाशी' हे प्रकार घडत नाही. शिवाय पुन्हा अपिल करण्याच्या पद्धतीमुळे एखादा 'चुकुन' फाशीवर चढला असे घडत नाही ( एखादा अपवाद असु शकतो व तो मला माहित नसु शकतो ). आपल्या कायद्याची व न्यायव्यवस्थेचा पाया "१०० दोषी सुटले तरी चालतील पण १ निर्दोष बळी जायला नको" ह्या तत्वावर आधारलेला आहे व त्यामुळेच बहुदा न्यायदानाला उशीर होऊ शकतो. बाकी चर्चा उत्तम आहे, वाचतो आहे. जमेल तशी भर घालत जाईन. - छोटा डॉन

In reply to by नितिन थत्ते

गवि Tue, 11/16/2010 - 14:38
त्याने माझी गाय मारली म्हणून मी त्याची गाय मारली. यात दोन गायी मेल्या पण मूळ गुन्हेगार तसाच राहिला. हे उदाहरण बिनतोड आणि लाजवाब आहे. आय मीन, तू माझ्या मुलीवर बलात्कार केलास तेव्हा आमची वेदना तुला जाणवावी म्हणून मीही तेच कृत्य तुझ्या मुलीशी करणार्. हा सरळ सरळ मूर्ख विचार आहे. तसा न्याय मला अपेक्षित नव्हता. जे काही करायचं ते थेट त्या आरोपीलाच. कॉन्सीक्वेन्शियल डॅमेज अलाउड नाही करायला पाहिजे. पण जो "अफेक्ट" झाला त्याला काहीतरी हक्क पाहिजे शिक्षा देण्याचा. पण हे वर वरचे झाले. मला बराच विचार करून परत माझा मुद्दा रेप्रेझेंट करावा लागेल.

In reply to by रणजित चितळे

गवि Tue, 11/16/2010 - 16:35
आपण मानवी हक्क कमिशन चे तर नाही ना. असं का बरं वाटावं तुम्हाला? अफझलची फाशी रद्द किंवा विलंबित करण्याची मागणी नाहीच आहे पोस्टमधे मुळी. अधिक इफेक्टिव्ह काय (की भयंकर काय..!!) ते चाललं आहे..

नगरीनिरंजन Tue, 11/16/2010 - 21:12
फाशी देण्यापेक्षा विदर्भात, मराठवाड्यात शेतकरी करायचं. उपाशी मरेल किंवा इतके हाल होतील की स्वतःच गळफास लावून घेईल. शिवाय पुनर्वसन केल्याबद्दल सत्ताधारी श्रेय घेऊ शकतील आणि आत्महत्या केल्याबद्दल विरोधक गदारोळ करू शकतील. (हा प्रतिसाद तुम्हाला असंवेदनशील तर वाटत नाही ना?)

मनोहर काकडे Wed, 11/17/2010 - 01:21
नथुराम गोडसेला फाशी दिले नसते तर गांधी अमर झाले असते व नथुराम गोडसे लवकरच संपाल असता. पण काहिंना गांधींना संपवायचे होते व नथुराम गोडसेला जिवंत ठेवायचे होते तसेच घडते आहे. नथुराम गोडसेची आता पुण्यतिथी साजरी व्हयला लागली आहे. काही वर्षांनंतर गांथी वधासाठी विष्णूने घेतलेला अकरावा अवतार म्हणून नथुराम गोडसेंची पुजाही होऊ लागेल. विष्णूने घेतलेले अवतार हे कुणाच्या ना कुणाच्या वधासाठीच होते. ज्यांना आपण देव मानतो. खरे तर आपण हिंसेचेच पुजक आहोत म्हणून गांधींसारख्याला या देशात स्थान नाही. आता बराक ओबामांने मणीभवन अमेरिकेत हलवावं हेच बरं.

In reply to by मनोहर काकडे

मृत्युन्जय Wed, 11/17/2010 - 10:14
विष्णूने घेतलेले अवतार हे कुणाच्या ना कुणाच्या वधासाठीच होते. ज्यांना आपण देव मानतो. खरे तर आपण हिंसेचेच पुजक आहोत म्हणून गांधींसारख्याला या देशात स्थान नाही. सगळे देव, शिवाजी महाराज, राणा प्रताप, ४ युद्धात शहीद झालेले सैनिक हे सगळे चुकीचे होते आणि गांधी एकटे बरोबर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

In reply to by मनोहर काकडे

नगरीनिरंजन Wed, 11/17/2010 - 10:20
>>आता बराक ओबामांने मणीभवन अमेरिकेत हलवावं हेच बरं. बरोबर. अमेरिकेसारखा अहिंसक देश या जगात दुसरा कोणता आहे बरे?

In reply to by मनोहर काकडे

टाइट होऊन विमान वर तरंगायला लागतं तेंव्हा असंच फाशी वरुन नथुराम, मग अमेरिका, ओबामा व्हाया विष्णुचे अवतार, शिवाजी राणा प्रताप इ. इष्टॉप घेत पेट्रोल संपेपर्यंत उडत राहतं... चालू द्या! (तरंग विहारी)

चिंतातुर जंतू Wed, 11/17/2010 - 16:26
लैंगिक अत्याचाराबद्दल फाशी असावी का यावर माझ्या एका मैत्रिणीनं रोचक मुद्दा उपस्थित केला होता: फाशीची शिक्षा होणारच आहे तर मग बलात्कारित स्त्रीचा जीव गेला तरी काय बिघडलं असं तर्कशास्त्र जर बलात्कार्‍यानं वापरलं आणि खूप अघोरी अत्याचार केले, तर बलात्कारित बाईचा नाहक बळी जाणार नाही का? त्यापेक्षा फाशीची शिक्षा नसेल तर बाईचा जीव जाण्याची शक्यता कमी होते. 'शिर सलामत तो पगडी पचास' या न्यायानं मग तिचा लैंगिक अत्याचाराला फाशीची शिक्षा देण्याला विरोध होता.

In reply to by चिंतातुर जंतू

गवि Wed, 11/17/2010 - 16:54
पाचेक वर्षं किंवा जन्मठेप मिळणार असेल तरी जीव घेतीलच हे कृत्य करणारे लोक. असेही तोंद उघडू नये म्हणून बळी घेतातच. बाकी जिथे अत्याचारित स्त्री गप्प राहण्याची खात्री आहे तिथे ते ओळखीचेच असतात स्त्री दहशती खाली असते आणि त्या बाबतीत असंही काही करता येत नाहीच. बलात्काराला फाशी नकोच. पण बलात्कारामागून खून केला असेल तर लैंगिक इच्छा भागवण्यापोटी खून केला म्हणून फाशी हवी असं वाटतं. किंवा मरेपर्यंत कैद. ही जास्त भयानक आहे.