मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धारयते सः धर्मः

शरद · · काथ्याकूट
धारयते स: धर्म: श्री. यनावाला व त्यांच्या विचारसरणीचे लोक थोडा एकांगी विचार करत असतात असे वाटते. पहिली गोष्ट म्हणजे धर्म व कर्मकांड यातील फरक ते लक्षात घेतातच असे नाही. चतुर्थीला चंद्रोदयानंतर जेवण, उपासाला चालणारे/न चालणारे पदार्थ, श्राद्धाला करावयाचे पिंड, इत्यादींना विरोध करतांना ते या गोष्टी म्हणजे धर्म नव्हे या कडे दुर्लक्ष करतात. या कांडांना "चुकीचे" असे गेली हजारो वर्षे शेकडो संत/ अभ्यासक सांगत आले आहेत. तेही अयशस्वी झाले याचे कारण सर्वसाधारण माणूस यांच्याप्रमाणे "विचारवंत" नसतो. (वैयक्तिक: यनावालांची तर्कक्रीडा साधारणत: ५% वाचकही सोडवू शकत नाहीत. जालावरील उच्चशिक्षित वर्गाची ही स्थिती तर सामान्य माणसाचे काय ? ) त्याला आधाराची गरज भासते तेव्हा तो धर्माकडे वळतो व त्याचे दुर्दैव हे की त्याला जास्तकरून भेटतात ते सत्यसाईबाबा, नरेंद्रमहाराज इत्यादी. हे खरा धर्म समजावून सांगण्यात कशाला वेळ घालवतील ? ते तुमच्या अडचणीला नागबळी हे उत्तर असे सांगतात व त्याला फ़िल्मीसितारे व क्रिकेटपटूही बळी पडतात. टिव्हीवर ते लाखो लोक पहातात व त्यांचाही विश्वास वाढत जातो. गतानुगतिक जन कांडाला बळी पडू लागतात ते यामुळे. याला तुमचा विरोध आहे का ? असेल तर मग तुमचा विरोध धर्माला / धार्मिकतेला नाही आहे. धर्माची व्याख्या "धारयते स: धर्म: " अशी आहे. जनप्रवाहाला जो धारण करतो, त्याला मोडून देत नाही तो धर्म. काय सांगतो असा धर्म ? शेजार्‍याला मदत कर, चोरीमारी करू नकोस, भुकेल्याला अन्न दे, वगैरे. याला कोणी का विरोध करावा ? व याला मी विरोध करतो म्हणून मी विचारवंत अशी शेखी मिरवावी ? अनिष्ट गोष्टी कशात नाहीत ? सर्वात आहेत त्याप्रमाणे धर्मातही आहेत. विरोध करावयाचा तो त्यांना करा ना ! तुम्ही धर्म मोडावयास निघालात तर तो एखादेवेळी मोडेलही; पण पहिल्यांदी चांगल्या गोष्टी नष्ट होतील. वाईट प्रथा जास्त चिवट असतात. त्या तुम्हाला पुरून उरतील. तुम्हाला तसे व्हावयास पाहिजे आहे का ? मी एकदा श्री. यनावालांना म्हणालो होतो, " खरे तर तुमचाच देवावर जास्त विश्वास पाहिजे. तुमच्या घरातील मोलकरीण आज तुमच्या घरात चोरी करत नाही कारण तिचा देवावर विश्वास आहे. तिची गरज असली तरी ती पैसे पळवत नाही. आपण असे का करत नाही याचे तिला कारण सांगता येणार नाही पण तुम्हाला ते नक्कीच कळत आहे. तुमच्या विचारवंत नसलेल्या मोलकरणीचा धर्मावरचा विश्वास उडाला की पहिला बळी पडणार आहे तो तुम्हा विचारवंतांचा. या तथाकथित "अडाणी" लोकांच्या मनातील धर्म नाहिसा करा, ते हातात बडगा घेतील व मग पहिले टाळके फुटणार ते तुमचे." हिटलरच्या ताब्यात सत्ता आल्यावर आईनस्टाईनला पळावे लागते. गाडगेमहाराज विचारवंत होते का ? शाळेतले शिक्षणही न झालेल्या त्या महात्म्याला तुम्ही विचारवंत नक्कीच म्हणणार नाही पण त्यांनी तुम्हा विचारवंतांपेक्षा धर्मावर जास्त कठोर प्रहार जन्मभर केले. आणि महत्वाचे म्हणजे हे सर्व त्या तळागाळातील माणसांना जास्त धार्मिक बनवण्याकरिता. शनी शिंगणापूरात आम्ही चोरी करून दाखवतो हे सांगणे काय विचारवंतांचे लक्षण ? शेवटी एक प्रश्न. विचारवंत व धार्मिक कोणाला म्हणावयाचे ? नोबल पारितोषक मिळाले, मी हिंदुस्थानातला सर्वात श्रीमंत झालो, देशाचा मंत्री झालो म्हणजे मी विचारवंत झालो का ? रिक्षाचे मीटर फास्ट करण्यात काय चूक असे सांगणारे एक थोर विचारवंत पुण्यात आहेतच म्हणा. तेच धार्मिक बद्दल. रवीवारी चर्चला जातो, चतुर्थीला सिद्धी विनायकाला जातो तो धार्मिक ? मग देवाचा एक फोटोही घरात नसणारा, देवळात न जाणारा, पण पदरमोड करून विद्यार्थी सहाय्यक समितीला पैसे पाठवणारा ? शरद

वाचने 5894 वाचनखूण प्रतिक्रिया 32

यशोधरा Fri, 10/15/2010 - 12:54
>>गाडगेमहाराज विचारवंत होते का ? >> नक्कीच होते, आणि डोळस, सहृदय विचारवंत होते. > > धर्मावर जास्त कठोर प्रहार जन्मभर केले. >> धर्मावर म्हणण्यापे़क्षा रुढींवर प्रहार केले, हे अधिक योग्य वाटते.

In reply to by प्रिया देशपांडे

अरे रे ! कामात खुप व्यग्र रहावे लागते का हो तुम्हाला ? पण आज कामातुन वेळ काढुन इथे येउन मला आपले मानुन आवरायचा प्रयत्न केलात त्याचे खुप समाधान वाटले.

गांधीवादी Fri, 10/15/2010 - 13:18
>>मग देवाचा एक फोटोही घरात नसणारा, देवळात न जाणारा, पण पदरमोड करून विद्यार्थी सहाय्यक समितीला पैसे पाठवणारा ? खुद्द देव. (असल्या लोकांकडे दर वर्षी वर्गणी मागायला जाने आम्ही आमचे भाग्य समजतो. मंदिरात गेल्यापेक्षा कितीतरी जास्त समाधान मिळते ह्यांना भेटल्यावर. आमच्या धर्माची सुरुवातच इथून होते.) >>धर्म मोडावयास निघालात तर तो एखादेवेळी मोडेलही; पण पहिल्यांदी चांगल्या गोष्टी नष्ट होतील. वाईट प्रथा जास्त चिवट असतात. त्या तुम्हाला पुरून उरतील. तुम्हाला तसे व्हावयास पाहिजे आहे का ? सहमत. काय वाचवायचं आणि काय घालवायचं हे आपण खूप विचार करून ठरविलं पाहिजे. एखाद्या अवयवाला जर इजा झाली तर तो अवयव आपण लागलीच कापून टाकत नाही. सगळ्या रूढी नाहीश्या करणे हे एकदाचेच काम आहे. पण त्यातून काही चागल्या परंपरा नष्ट झाल्या तर मानव जातीला योग्य आचरण करण्यास कोणती दिशा राहणार नाही.

भाऊ पाटील Fri, 10/15/2010 - 13:19
अर्थात ह्या लेखानेही मराठीतल्या एका सुंदर संस्थळाची 'वाट' लागणे थांबणार नाहीच ह्याची खात्री आहे.

रामदास Fri, 10/15/2010 - 13:25
हे यनावाला कोण ? तुमचे खाजगी पत्र (व्यनी)चुकून बोर्डावर टाकले नाही ना ? मिपावर यनावाला हे नाव पहील्यांदाच वाचले म्हणून विचारले .

In reply to by रामदास

सहज Fri, 10/15/2010 - 14:54
यनावाला येथील एक जुने माननीय सदस्य आहेत. उपक्रमावर त्यांच्या तर्कक्रिडा नसत्या तर बहुदा मी मराठी आंतरजालावर नसतो. तर आता तुम्ही यनावाला यांना धन्यवाद अथवा दूषणे देउ शकता ;-)

In reply to by रामदास

पिवळा डांबिस Sun, 10/17/2010 - 08:31
हे श्री यनावाला कोण? मला माहिती आहे की हे उपक्रमावर एक आयडी/ सदस्य आहेत! पण मिपावर गेली दोन वर्षेतरी (तितका मी इथे मेंबर आहे!!) मी यनावाला हा आयडी इथे पाहिलेला नाही!! तेंव्हा मूळ धागाकर्त्याने जर **त दम असेल तर उपक्रमावर जाऊन श्री यनावाला यांच्याशी वाद घालावा!! इथे धागा टाकून मिपाकरांना पकवू नये!! ह्या धाग्याचा तीव्र निषेध!!!! :(

सर्व तत्त्वज्ञानी..विचारवंतांना व त्यांच्या पुस्तकांना समुद्रात बुडवायला हवे..एखाद्या तत्वज्ञनाच्या विचाराच्या मागे जावुन मग साम्य वादाचे असो वा समाजवादाचे असो वा राष्ट्रवादाचं असो वा धर्माचे असो..जेवढी मानव हत्या झाली असेल तेवढी युद्धात हि झाली नसेल.....जो विचारी तो भिकारी

श्री. यनावाला यांचे लेखन मी फार वाचलेले नाही. हा लेख श्री. यनावाला यांना अनावृत्त पत्र आहे असं समजता येईल, पण सर्व नास्तिक (किंवा अधार्मिक, किंवा विचारवंत) लोकं श्री. यनावाला यांच्याप्रमाणेच विचार करतात असं मानणं ही स्वतःचीच फसवणूक आहे.
तुमच्या विचारवंत नसलेल्या मोलकरणीचा धर्मावरचा विश्वास उडाला की पहिला बळी पडणार आहे तो तुम्हा विचारवंतांचा.
मोलकरणी फक्त विचारवंतांच्याच घरी काम करत नसणार किंवा त्यांना चोरी करायचीच असेल तर त्या मालकाच्या निष्ठा शोधणार नाहीत. तेव्हा हे वाक्य ललित लेखनाऐवजी 'धर्म', 'विचार' इथे पडल्यासारखं वाटतंय.
शाळेतले शिक्षणही न झालेल्या त्या महात्म्याला तुम्ही विचारवंत नक्कीच म्हणणार नाही ...
दुसर्‍या (विरूद्ध नव्हे!) बाजूच्या (विचारवंत?) लोकांची विचारसरणी अशी असली पाहिजे असा विचार लादल्यासारखा वाटत आहे. बाकी संदर्भ माहित नसल्यामुळे जास्त टिप्पणी करत नाही.

सहज Fri, 10/15/2010 - 14:51
कृपया हा लेख उपक्रमावर अजुन टाकला नसल्यास अवश्य टाकणे.

प्रियाली Fri, 10/15/2010 - 14:58
हा लेख उपक्रमावर टाका. तुम्हीही आपल्या राखीव जागेत सेंच्युरी मारणार्‍या बॅट्समनची भूमिका घेऊ नका.

In reply to by प्रियाली

हा लेख उपक्रमावर टाका. तुम्हीही आपल्या राखीव जागेत सेंच्युरी मारणार्‍या बॅट्समनची भूमिका घेऊ नका.
आता हिला शॅडो प्रॅक्टिस मधली सेंचुरी म्हणावे काय ? ;)

In reply to by प्रियाली

अवलिया Fri, 10/15/2010 - 18:19
हा लेख उपक्रमावर टाका. तुम्हीही आपल्या राखीव जागेत सेंच्युरी मारणार्‍या बॅट्समनची भूमिका घेऊ नका. अधोरेखित शब्द रोचक.

प्राजु Sun, 10/17/2010 - 06:39
>>रवीवारी चर्चला जातो, चतुर्थीला सिद्धी विनायकाला जातो तो धार्मिक ? नाही.. तो भाविक. >>>मग देवाचा एक फोटोही घरात नसणारा, देवळात न जाणारा, पण पदरमोड करून विद्यार्थी सहाय्यक समितीला पैसे पाठवणारा ? तो सुसंस्कृत. लेख आवडला.

चेतन Mon, 10/18/2010 - 10:53
लेख आवडला (थोडासा यानावालांचा उल्लेख टाळता आला असता तर अधिक चांगला झाला असता) चेतन अवांतरः लेख वाचणे अथवा न वाचणे ही प्रत्येक मिपाकराची मर्जी आहे. इथे धागा टाकून मिपाकरांना पकवू नये!! असल्या सल्ल्यांना **वर मारावे ;)

In reply to by चेतन

अवलिया Mon, 10/18/2010 - 11:09
अवांतराशी सहमत. ज्यांना हा लेख इकडे तिकडे कुठे कुठे टाकायला हवा असे वाटते ते ह्या लेखाची लिंक देवुन स्वतः चर्चाप्रस्ताव मांडु शकतात. :)

चिंतातुर जंतू Mon, 10/18/2010 - 14:52
वाचून अंमळ गंमत वाटली.
तुमच्या घरातील मोलकरीण आज तुमच्या घरात चोरी करत नाही कारण तिचा देवावर विश्वास आहे.
अरे देवा! हे माहीतच नव्हते. तिला पोलिसांची भीती वाटते असा माझा इतके दिवस समज होता. ज्ञानवृध्दीसाठी धन्यवाद.
तुमच्या विचारवंत नसलेल्या मोलकरणीचा धर्मावरचा विश्वास उडाला की पहिला बळी पडणार आहे तो तुम्हा विचारवंतांचा. या तथाकथित "अडाणी" लोकांच्या मनातील धर्म नाहिसा करा, ते हातात बडगा घेतील व मग पहिले टाळके फुटणार ते तुमचे." हिटलरच्या ताब्यात सत्ता आल्यावर आईनस्टाईनला पळावे लागते.
हिटलरशी तुलना थोडीशी विचित्र आणि अभिप्रेत मुद्द्याशी विसंगत वाटली. आइनस्टाइन ज्यू होता म्हणून त्याला पळावे लागले; विचारवंत होता म्हणून नाही. (दुवा पहावा). उलट आइनस्टाइनला वश करून घेता आले असते तर कदाचित हिटलर अणुबाँब बनवू शकला असता आणि त्याचे जगज्जेतेपदाचे स्वप्न इतक्या लवकर भंग पावले नसते. त्यामुळे आइनस्टाईनच्या पळून जाण्यामुळे हिटलरचा तोटा झाला असे म्हणता येईल. म्हणून आपल्या मुद्द्याशी ही तुलना विसंगत वाटते; किंबहुना विचारवंतांचे सामाजिक/राजकीय महत्त्व त्यामुळे उगीचच अधोरेखित होते असे वाटते. सबब आपल्या लेखाचा अधिक प्रभाव पडावा यासाठी ही तुलना काढून टाकावी अशी नम्र विनंती. शिवाय, या संस्थळावरच्या काही लोकांचा विचारवंतांवर जेवढा राग असतो तेवढा मोलकरणींचा नसावा असे आतापर्यंतच्या मोलकरणींविषयीच्या (आणि या संस्थळाविषयीच्या) अनुभवांवरून वाटते, त्यामुळे मोलकरणीच्या स्थळी स्वतःलाच कल्पले असते तर आशय अधिक परिणामकारकरीत्या व्यक्त झाला असता कदाचित. (पण ही नम्र विनंती सध्या तरी करत नाही).
शेवटी एक प्रश्न. विचारवंत व धार्मिक कोणाला म्हणावयाचे ? नोबल पारितोषक मिळाले, मी हिंदुस्थानातला सर्वात श्रीमंत झालो, देशाचा मंत्री झालो म्हणजे मी विचारवंत झालो का ?
प्रश्नाचा रोख गमतीशीर वाटला. एकंदरीतच मित्तल-अंबानीप्रभृतींना किंवा सुरेश कलमाडींना (तेही एकेकाळी मंत्री होते) विचारवंत कोण म्हणते हे कळल्यास गंमतवृध्दी होईल.
तेच धार्मिक बद्दल. रवीवारी चर्चला जातो, चतुर्थीला सिद्धी विनायकाला जातो तो धार्मिक ? मग देवाचा एक फोटोही घरात नसणारा, देवळात न जाणारा, पण पदरमोड करून विद्यार्थी सहाय्यक समितीला पैसे पाठवणारा ?
वरील प्रश्न वाचून असा प्रश्न पडतो की विद्यार्थी सहायक समितीला पैसे पाठवले की मनुष्य धार्मिक बनतो असे लेखकाला म्हणावयाचे आहे काय? मग घरात देवाचा फोटो लावला नाही किंवा देवळात गेले नाही तरी हरकत नाही. तसेच म्हणावयाचे होते का? असो. करमणुकीबद्दल धन्यवाद. बाकी चालू द्या.