Skip to main content

कशे कावळे येती आणिक...

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 27/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावरचे धागे कावळ्यांनी शुचिर्भूत झालेत, त्यामुळे आमच्याही डोक्यात कवकवाट सुरु झाली आणि आम्ही एका अप्रतिम गाण्याचे श्राध्द घालून बसलो.. कशे कावळे येती आणिक पिंड शीवूनी जाती पंध्रवड्याची अंगत पंगत पितरांसंगे खाती साप काल मज स्वप्नी दिसला फणा काढुनी उभा राहिला जरा दचकुन जाय उठोनी काळोखाच्या राती सकाळ होता मिपा उघडले मुखपृष्ठावर काक पाहिले कळली नंतर जलावरती मज पितरांची महती लगे एक मी भटजी धरला शीधा दक्षीणे त्याला पुजला उध्दरली मंत्रांनी त्यांने तीन पिढ्यांची नाती अनुभव तुमचा सांगा मजला ह्यासाठी मी धागा रचीला फुटकळ धागे काढत फिरतो अशीच माझी ख्याती
लेखनविषय:

वाचने 11236
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

कावकाव आवडली. काव काव!!

हायला, बघावं तिकडे कावळे, साप नाग, काय चाल्लय काय? ते कावळे काकीराईट आपलं कॉपीराईट मागायला येतील ना!
सध्या मिपावरचे धागे कावळ्यांनी शुचिर्भूत झालेत, त्यामुळे आमच्याही डोक्यात कवकवाट सुरु झाली आणि आम्ही एका अप्रतिम गाण्याचे श्राध्द घालून बसलो
hehe

ओरीगिनल चालीत म्हणून बघितलं आणि डोळे पाणावले! ;) काकरंग

कवीने फक्त तीनच पिढ्याची तजवीज केली. बाकीच्या पिढ्यांच काय? कविता वाचुन सर्व पितरांना शांती मिळेल अशी आशा करतो.

काकावली चान चान आहे... आवडली. तरी म्हटले , इतका चान चान विषय आणि विडंबक आपल्या तलवारी म्यान करून का बसलेयत???

छान! चालू द्यात. >> फुटकळ धागे काढत फिरतो अशीच माझी ख्याती>> फुटकळ तर फुटकळ . वाचू नका. पण नाही.वाचणार तर खरे अन नावही ठेवणार. वर कावळ्यासारखे टोचणार्ही.

निरर्थक धाग्यांचा सुळसुळाट झालेल्या काळात हे विडंबन नक्कीच दिलासा देणारे आहे. जातील केसुशेठ, हे दिवसही जातील. (आशावादी)बेसनलाडू

केसुगुरूजी, विडंबन फर्मास ... एकदम खल्लास! फक्त त्या निरर्थक धाग्यांचं श्राद्ध घालण्यासाठी आधी त्या धाग्यांना परलोकात पाठवा पाहू, म्हणजे पितृपंधरवडा सुखात जाईल!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फक्त त्या निरर्थक धाग्यांचं श्राद्ध घालण्यासाठी आधी त्या धाग्यांना परलोकात पाठवा पाहू, म्हणजे पितृपंधरवडा सुखात जाईल!
आपण तयार केलेली भुते आपल्याच मानगुटीवर बसण्यात खरी गंमत असते. असू द्या तूर्तास. ;)

चांगले विडंबन आहे, पण त्यात फुटकळ धागे काढत फिरतो अशीच माझी ख्याती या वाक्यांनी एका लेखिकेला जे पोईंट आऊट केले आहे ते मात्र अजिबात आवडले नाही.

In reply to by Pain

माझा धागा भले फुटकळ असेल घासकडवीं सारखे हुषार लोक इथे आहेत जे त्याचं चीज करू शकतात. त्यांनी काढलेल्या स्वप्नांच्या धाग्यावर अनेकांनी मन मोकळं केलं आहे. केवढी अद्भुत स्वप्नांची दुनिया खुली झाली आहे. मी भले वेडेवाकुडे (कर्टसी - सन्जोप राव) लिहीत असेन तुम्ही आहात ना हुषार मग तुम्ही त्याचं काहीतरी चांगलं का नाही करून दाखवत? टीका करणं कसं सोप्पं असतं.

In reply to by शुचि

मी भले वेडेवाकुडे (कर्टसी - सन्जोप राव) लिहीत असेन तुम्ही आहात ना हुषार मग तुम्ही त्याचं काहीतरी चांगलं का नाही करून दाखवत? टीका करणं कसं सोप्पं असतं. मी पूर्वीच सांगितले आहे की मी वाचक आहे. त्याची खात्री करण्यासाठी फुटकळ लेख लिहून लोकांना अतिशय बेजार करायचे; दुर्लक्ष, स्पष्ट टीका आणि विडंबन या मार्गाने लोकांकडून उपेक्षा झाली की त्रागा करायचा आणि विरोधकांच्या विचाराला विचाराने उत्तर देता आले नाही की वैयक्तिक पातळीवर घसरायचे असा द्राविडी प्राणायाम करण्याची मला अजिबात गरज नाही.

In reply to by शुचि

एवढे सिरीयसली घेऊ नका हो हे.. विडंबनच ते... तुमच्यावर विडंबन होऊ शकते ईतके तरी तुम्ही कमावलेय ईथे.. हे ही नसे थोडके ! (बाकी तुमच्या पितरांच्या धाग्यामुळे माझीही अंमळ करमणूक झाली..;-))

In reply to by इंटरनेटस्नेही

असेच म्हणतो. शुचितैंचा धागा फुटकळ कसा? कोणी आपले विचार आणि अनुभव नीट समजण्यायोग्य भाषेत मांडले तर ते फुटकळ कसे? इथे कित्येक लोक आहेत ज्याना काश्मीरात इंचाइंचाने काय होतंय आणि झुरळं कशी मारावीत यात काहीही स्वारस्य नाही पण इतराना आहे म्हणून ते धागे फुटकळ होत नाहीत तसंच हे आहे. पण विडंबन एकदम झक्कास झालं आहे हे नक्की.

In reply to by नगरीनिरंजन

शुचितैंचा धागा फुटकळ कसा? कोणी आपले विचार आणि अनुभव नीट समजण्यायोग्य भाषेत मांडले तर ते फुटकळ कसे? प्रत्येक* माणसाला स्वतःचे विचार आणि अनुभव असतात, पण ते सार्वजनिकदृष्ट्या वाचनीयच असतील असे नाही. सार्वजनिक लेखनाने किमान काही अपेक्षा पूर्ण केल्याच पाहिजेत. मागे श्री. कार्यकर्ते यांच्याशी झालेल्या चर्चेत हे बोलणे झाले होते. अविस्मरणीय घटना, विनोदी कथा, अनुभव, सामजिक समस्यांबद्दलचे अनुभव, विचार, प्रवासवर्णन हे त्यातील काही विषय म्हणता येतील. या पार्श्वभूमीवर पावसात स्त्रोत्रे ऐकणे, सेवन इयर्स इच, लॉग इन केल्यावर आधी काय करता आणि आत्ताचा पितृपक्ष हे सगळे पाहता त्या त्यांना उपलब्ध असलेल्या इंटरनेट सुविधेचा, वेळाचा, संस्थळावर दर्जेदार वाचनाच्या अपेक्षेने येणार्‍या लोकांच्या सहनशीलतेचा अपव्यय करत असल्याचे दिसते. तिच्या कक्षातील एक्स्ट्रा खुर्ची कोणी घेतल्यास अतिशय राग येणे हाही त्यांच्या एका लेखाचा विषय होता. अरे काय हे ? शाळकरी मूल/ मुले असण्याचा दावा करणार्‍या या महिलेने त्यांची भांडणे सोडवायची, त्यांना समजुतदारपणा शिकवायचा की स्वत: त्यांच्यावर कडी करायची ? त्यापेक्षाही आपली रोजनिशी/ ब्लॉग आणि संस्थळ यात फरक न करता येणारे हे लोक इंटरनेट/ संस्थळ या अत्यंत महत्त्वाच्या शोधाचा, तंत्रज्ञानाचा गैरवापर (abuse) करत आहेत. इथे कित्येक लोक आहेत ज्याना काश्मीरात इंचाइंचाने काय होतंय तुम्हाला स्वारस्य असो नसो, तुमच्या पैशाने पोसले जाणारे सैनिक तिथे आपले जीव देउन सीमेचे, सुव्यवस्थेचे रक्षण करत आहेत त्यामुळेच तुम्ही आणि इतर देशवासीय सुरक्षित, शांत जीवन जगू शकता. तुम्हाला त्याची किंमत नसेल, माहिती करून घ्यायची इच्छा नसेल पण ते आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत. वैयक्तिक आवडनिवडः एक उदाहरण देतो. शास्त्र शाखेच्या बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र यापैकी विषय निवडण्याचा पर्याय असतो. ते सोडून तुम्ही जर शिशुगटाच्या बडबडगीतांवर परिक्षा घ्या असे म्हणू लागलात तर कसे चालेल?

In reply to by Pain

त्यापेक्षाही आपली रोजनिशी/ ब्लॉग आणि संस्थळ यात फरक न करता येणारे हे लोक इंटरनेट/ संस्थळ या अत्यंत महत्त्वाच्या शोधाचा, तंत्रज्ञानाचा गैरवापर (abuse) करत आहेत. हॅ हॅ हॅ ! आम्ही तर आजवर मिपावर ब्लोग वाचायलाच येत होतो, बॉ !

In reply to by Pain

खरं आहे तुमचं म्हणणं. बाष्कळ आणि अतिवैयक्तिक विचार टाकून त्या लोकांच्या वेळेचा अपव्यय करतात हे खरेही असेल पण मग त्या धाग्यावर अनेकांनी इतके प्रतिसाद दिले ते त्यांचा वेळ जात नव्हता म्हणूनच का? माझं एवढंच म्हणणं आहे की जर एखाद्याने लिहीलेलं आवडलं नाही तर तिकडे दुर्लक्ष करायचं, उगाच एखाद्याला टारगेट करणे चांगले नाही. तसं तर तुमच्या निकषाप्रमाणे इतरही कित्येक लेख फुटकळ या वर्गवारीत जातील. बाकी काश्मीरात आपले सैनिक कर्तव्यात कसूर करत नाहीत याबद्दल मला आदर आणि कृतज्ञता आहेच पण म्हणून इथे त्यावर दिवसेंदिवस काथ्याकूट करण्याने काय होणारे हे मला कळत नाही म्हणून मी त्यावर विचार करत नाही किंवा प्रतिसाद देत बसत नाही. पण म्हणून तो धागाच फुटकळ आहे अशी थट्टाही करत नाही. बाकी मिपावर टाईमपास करायला येणार्‍यांसाठी हे फुटकळ धागेच बर्‍यापैकी मनोरंजक सिद्ध होतात असं मला वाटतं, नाहीतर फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याएवढा सूज्ञपणा प्रत्येकाच्याच अंगी असतोच आणि अशा धाग्यांना अनुल्लेखाने मारलं गेलं असतंच. तसं झालं नाही म्हणजे त्यात बर्‍याच लोकांना काही तरी मनोरंजन होण्यासारखं मिळालं.

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजन माझी बाजू घेतल्याबद्दल आभार. पै का पेन यांचं म्हणणं ऐकलं - "शाळकरी मूल्/मुले असाल्याचा दावा करणार्‍या या महीलेने...." वगैरे वगैरे ......... अंतर्मुख होऊन विचार करेन. सरटनली नॉट माय डे .

In reply to by नगरीनिरंजन

माझं एवढंच म्हणणं आहे की जर एखाद्याने लिहीलेलं आवडलं नाही तर तिकडे दुर्लक्ष करायचं, दुर्लक्ष, टीका आणि आता उपहास इथपर्यंत प्रतिसाद येण्याइतकी प्रगती झाली आहे आता. उगाच एखाद्याला टारगेट करणे चांगले नाही. उगाच एखाद्याला ? जे कोण फुटकळ लिहितात, कौले काढतात त्या सगळ्या* धाग्यांवर मी स्पष्ट शब्दात अशाच प्रतिक्रिया देतो. फेक आयडी कालांतराने मागे पडतात, बॅन होतात पण या थांबायल तयारच नाहीत! तसं तर तुमच्या निकषाप्रमाणे इतरही कित्येक लेख फुटकळ या वर्गवारीत जातील. खरच जातात. पण ते नियमात बसत असल्याने आणि संपादकांना अमाप मोकळा वेळ नसल्याने त्यावर कारवाई होत नाही. म्हणून इथे त्यावर दिवसेंदिवस काथ्याकूट करण्याने काय होणारे हे मला कळत नाही म्हणून मी त्यावर विचार करत नाही किंवा प्रतिसाद देत बसत नाही. तो काश्मीर्विषयक धागा काढला आणि अनेक लोक त्यावर चर्चा करू लागले, शिवाय त्याअनुषंगाने इतरही अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळाली. तसे यांच्या धाग्यात घडत नाही. यांच्या मनाचे खेळ आपल्या गळ्यात सतत का मारत राहतात ? आता साहित्यीक पद असा रतीब घालून मिळत असते तर सगळेच नसते का झाले ? पण म्हणून तो धागाच फुटकळ आहे अशी थट्टाही करत नाही थट्टा नाही, गंभीर आक्षेप आहे. मी तर नविन सभासद आहे, तोही वाचक; पण आता इथल्या प्रस्थापितांनाही हेच सांगावेसे वाटले यावरून काय तो बोध घ्यावा. नाहीतर फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याएवढा सूज्ञपणा प्रत्येकाच्याच अंगी असतोच आणि अशा धाग्यांना अनुल्लेखाने मारलं गेलं असतंच. असे धागे थोडेसे असते तर दुर्लक्ष करता आले असते पण यांच्या ढिगार्‍यात चांगल्या गोष्टी पहायच्या राहून जातात, त्याचा राग येतो.

In reply to by Pain

तुम्ही म्हणता ते पटले. पण मग अशा धाग्यांवर प्रतिसाद देऊन ते धागे वर ठेवणारेही तेवढेच दोषी म्हटले पाहिजेत मग. बराच वेळ ठराविकच धागे वर असतील तर मी एक-दोन पाने मागे जाऊन पाहत असतो नवीन काही येऊन गेलं की काय ते.

अहो काय हो हे ! सगळ्या पितरांना आणि त्यांच्या पार्थिव स्पॉन्सर्स ना होलसेल मधे मुक्ती ! अरारा... काय हे अपसव्यकृत्य ! छे छे ! "काशी केली" या शब्दांची आठवण होऊन डोळे पाणावले बघा ;-)

कावडले ...... आपलं आवडले (कावळा)

येक नंबर फर्मास हो गुर्जी !! आता ह्यावर एक 'कशी कावळ्यानी थट्टा आज मांडली' येउन जाउ दे.

आज कल्ला करण्याचा दिवस दिसतोय! ;)

In reply to by मिसळभोक्ता

का बुवा? तुम्हाला काय प्रॉब्लेम? आँ? तुम्ही तुमचे प्रतिसाद देउन टाका कि राव!;) कुठे पाशवी शक्तींना आमंत्रण देताय!:)

In reply to by रेवती

पितृपक्ष आहे, मातृपक्ष नाही ! आणि एकदाची शांत केली आहे, त्यामुळे पाशवी शक्तीचे भय नाही, कुठलाही सर्पयोग नाही असे घाटपांडेकाका सांगत होते परवा.

In reply to by मिसळभोक्ता

पितृपक्ष आहे ही ही ही! धन्य आहात! लगेच उत्तर तयार! तुम्हाला सध्या तरी कुणाचं भय नाही हो पण मला नेहमीच तुमच्या प्रतिसादांचं भय असतं. कधी येउन काय बोलाल काही नेम नाही. त्यातून आमचं मन हे असं कोमल!;)

चला पितृपंधरवड्यात अमूक करू नका तमूक करू नका मध्ये विडंबन करू नका असे समाविष्ट नाही हे बरे झाले. सगळे पितर तृप्त झाले असावेत. काही उरले सुरले असतील तर आणखी विडंबने येऊ देत. आहे नवरात्र सुरु व्हायला वेळ .. गरबा खेळला, घागरी फुंकल्या तरी शेवटी मग देवीपुढे डोके टेकवावे लागते ...

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार