मराठा लाईट इनफंट्री - भाग - ७ (अंतीम भाग.)

जयंत कुलकर्णी जनातलं, मनातलं
भाग - ७ अंतीम. या लढाईत मराठयांचे मजबूत नुकसान झाले. पण त्यांना थांबून चालणार नव्हते. त्यांनी लगेचच उरलेल्या सैनिकांची जमवाजमव केली आणि पुढ्च्या लक्षावर लक्ष केंद्रित केले. ते होते सॅंटेरो नदीच्या आसपासची शत्रूची ठाणी. दुपारपर्यंत हे उद्दिष्ट त्यांनी मोठ्या तडफेने पार पाडले आणि बर्‍याच जर्मन सैन्याला युध्दकैदी केले. ही मोहीम त्यांनी एवढ्या तडफेने चालवली की असे म्हणतात जर्मन सैन्याला सावरायला वेळच मिळाला नाही. या भयंकर लढाई नंतर मात्र या बटॅलियनला विश्रांती देण्यात आली. या सेनिओ नदीच्या युध्दात मराठा रेजिमेंटचे ४ आधिकारी आणि १०९ सैनिक धारातिर्थी पडले. या महत्वाच्या युध्दानंतर दोस्तराष्ट्रांच्या सेनेची खचलेलेल्या जर्मन सैन्याची ससेहोलपट करत उत्तरेकडे आगेकूच सुरू झाली. त्यात मराठ्यांच्या तिनीही बटॅलियन्स सामील होत्या. २३ आणि २९ एप्रिल रोजी पो नदीचे विस्तीर्ण पात्र पार करून हे सैन्य पुढे गेले तर आल्प्स पर्वताने त्यांची वाट अडवली. त्या मुळे त्यांना थांबावेच लागले. पो नदी मराठ्यांनी रणगाड्यावर बसून पार केली. (बहुदा पाणी कमी असावे त्या महिन्यात). अशी - 5-2 MLI  DDShermans crossing of Po ८ व्या इंडियन डिव्हिजनच्या गुप्तहेर खात्याने त्यांच्या मुख्यालयाला ३० एप्रिल रोजी जो अहवाल पाठवला त्यात त्यांनी स्पष्ट्पणे म्हटले होते “शत्रूच्या सैन्याची अवस्था अत्यंत शोचनीय झाली आहे” “थोड्याच दिवसात जर्मन सैन्याने बिनशर्त शरणागती पत्करली आणि चार वर्षे चाललेले हे युध्द संपूष्टात आले. नाईक आणि ब्रिगेडियर मराठे या लढाईत शौर्य गाजवून, भारतात यायला तारांटो बंदरात जहाजात चढले. त्याचे नाव होते – “ अर्व्हेडिस इटालिया”. वाचक मित्रहो ही लेखमाला इथेच समाप्त करतो. मराठा लाईट इन्फंट्रीच्या बर्मामधल्या जपानी सैनिकांच्या विरुध्दची कामगिरी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातील कामगिरी, या बद्दल परत केव्हातरी. तो पर्यंत या विषयावर आपली रजा घेतो. लेखमाला समाप्त. जयंत कुलकर्णी. ता.क. आपण जर ही लेखमाला वाचली असेल तर परत एकदा एकच मागणे मागतो - सैनिकांना आदराने वागवा. लक्षात ठेवा त्यांना या पेक्षा जास्त अपेक्षा आपल्या कडून नाही. आणि माझ्यासाठी, - ही लेखमाला आवडल्यास जरूर कळवा.
वर्गीकरण
लेखनप्रकार

24 टिप्पण्या 12,293 दृश्ये

Comments

मराठमोळा नवीन

In reply to by Nile

सहमत.. सुंदर लेखमाला!! जयंत कुलकर्णी साहेबांचे आभार.

नन्दादीप नवीन

मला वाटत "आदराने वागवा" हे सान्गण्याची गरज नाही.....जो सैनिकांप्रति आदर दाख्वत नाही तो खरच जगण्यास लायक नाही असे मी समजतो.......

इन्द्र्राज पवार नवीन

"सैनिकांना आदराने वागवा. लक्षात ठेवा त्यांना या पेक्षा जास्त अपेक्षा आपल्या कडून नाही....." ~~ हे मी स्वतः (पंजाबमध्ये फिरताना) अनुभवले आहे. साधारणतः एक दिड वर्षापूर्वी गुरुदासपूर येथे बलवंत सिंग नामक मित्राकडे काही कामानिमित्त दिल्लीतील अन्य दोन मित्रासमवेत जाण्याचा योग आला होता. काम झाल्यानंतर त्याच्या घरातील ज्येष्ठांनी जेवणासाठी आग्रह केल्याने आम्ही तीन मित्र थांबलो होतो. वेळ होता तो पर्यंत घर पाहत असताना एका भिंतीवर 'सुभेदार अजित सिंग, फोर्थ सिख रेजिमेन्ट" असे नाव लिहिलेला एक मोठा फोटो दिसला. फोटोखाली अगदी दिसेल न दिसेल असे फिकट झालेले वाक्य होते "MAHAVEER CHAKRA ~ 1965 Indo-Pak War ~ Posthumously ". आम्ही तिघे साहजिकच प्रभावित झालो व बलवंतला उत्सुकतेने विचारले तर ते त्याचे थोरले काका असल्याचे सांगून त्यांना 'बर्खी, लाहोर' या गावी झालेल्या धुमश्चक्रीत वीरमरण आल्याचे सांगितले. इतके दिवस काकाच्या पराक्रमाबद्दल कधीच काही का सांगितले असे विचारले; तर तो अगदी सहजपणे उदगारला, "अरे इन्दर भाई, वो तो उनका फर्ज था, मेहेज निभाया और चलो एक अवॉर्ड मिला, बस्स...इससे ज्यादा कुछ नही. ऐसी कुरबानीयॉ तो इस गाव मोहोल्ले का हर घर देता आया है बरसोसे...." ~~ ही विनम्रता अचाटच. इकडची आठवण झाली. कुठल्यातरी फालतू तालुका पातळीवरील संघटनेने 'आदर्श नगरसेवक' म्हणून एक नारळ शाल दिली तर दुसर्‍या दिवशी पेपरात पैसे देवून अभिनंदनाचे फोटो आणले जातात....अन् खरा हाडाचा सैनिक (आणि त्याचे आप्तदेखील) म्हणतो, 'मी वेगळे काय केले? फक्त देशाप्रती माझे कर्तव्य पार पाडले.." आणि त्याबदल्यात काय मागतात तर फक्त "याद रखो वो कुर्बानी..." बस्स. श्री.जयंत कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे "या पेक्षा जास्त अपेक्षा आपल्या कडून नाहीत." सुंदर आणि प्रभावशाली लेखमालिका. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितले आहे की, माझ्या हिंदी भाषिक मित्रांत या मालेचे सार सांगितले आहे. तुम्ही दिलेले फोटोही त्यांना दाखविले. धन्यवाद...मालिकेबाबत. इन्द्रा

Pain नवीन

मालिका अतिशय आवडली. कृपया इथेच संपवू नका. आणि सैनिकांच्या अनादराबद्दलः आजपर्यंत कधी केला नाही, कधीही करणार नाही.

जयंत कुलकर्णी नवीन

नमस्कार ! ज्यांनी ही लेखमालिका वाचली आणि त्यांना त्यांना ती भावली हे प्रतिक्रीयांवरून दिसून येतेच. मला सर्व वाचकांचे आभार मानायलाच हवेत. सगळ्यांचे वेगळे आभार मानत नाही कारण त्याने प्रतिसादांची संख्या उगचच वाढते. मला वाटते त्यासाठी सगळे मला क्षमा करतील. आपला,