मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सौदागर

फारएन्ड · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ये बहुत लंबी कहानी है! सनातनपुर आणि पालीनगर अशा भरदार नावाच्या गावातील तेवढ्याच भरदार नावांचे राजेश्वर (राजकुमार) आणि दादावीर (दिलीप कुमार) यांची. त्या डोंगरदर्‍यांत इकडे तिकडे फिरणारा एक माणूस यांच्या कहाण्या सांगेल... कारण तेथे बहुधा तोच एक शिल्लक राहिला असावा, बाकी गावकर्यांपैकी अर्धे यांची दुश्मनी झाली तेव्हा तर उरलेले अर्धे पुन्हा दोस्ती झाली आहे हे माहीत नसल्यामुळे एकमेकांना मारून मेले असावेत. एक मात्र जाणवते: तेव्हा बरे यांना असे ठाकुर, मुखिया, जमीनदार वगैरेंच्या नादी लागणारे लोक मिळत होते. आताचे गावकरी, "तुमचे दोस्ती का दुश्मनी काय ते एकदा नक्की ठरवा, आम्हाला आमची कामं आहेत" म्हणून मोकळे झाले असते. तर ह्या दोघांची फारच मैत्री, "इमली का बूटा बेरी का पेड" टाइपची (म्हणजे काय कोणास ठाऊक). एवढी लंबी कहाणी आहे की यांचे डबल लहानपण दाखवले आहे. म्हणजे खरे लहानपण व तरूणपण सुद्धा. कोण राजकुमार व कोण दिलीपकुमार कळावे म्हणून ते तरूणपण वाले अभिनेते मिमिक्री केल्यासारखे यांची स्टाईल मारत संवाद म्हणतात. लहानपणी एकाच्या पायाला लागते म्हणून दुसरा काही दिवस आपलाही एक पाय गुढघ्यात दुमडून बांधून फिरतो (बाकी ती दोरी सारखी निसटत कशी नाही हे एक आश्चर्यच आहे). गुलशन ग्रोवर राजकुमारच्या बहिणीची छेड काढतो तेव्हा दिलीपकुमार आणि त्याच्यात मारामारी होते, जेव्हा राजकुमार ते पाहतो तेव्हा त्याला पहिला राग त्याने आपल्या मित्राला मारल्याचा येतो. बहीण वगैरे सगळे नंतर. असेच ते वयाने आणखी मोठे होऊन नकली च्या ऐवजी खरे राजकुमार व दिलीपकुमार होतात. साधारण पन्नाशीचे झाल्यावर राजकुमारच्या लक्षात येते की आपल्या बहिणीचे दिलीपकुमारवर प्रेम आहे. तेव्हा दोघांचे लग्न ठरते. पण तेवढ्यात दिलीप कुमार तिकडे एका गावी लग्नाला जातो, तेथे हुंड्यासाठी नवरा मुलगा अडून बसतो. लग्न मोडायची वेळ येते तेव्हा दिलीपकुमार स्वत:च त्या मुलीच्या गळ्यात हार घालतो. वास्तविक तेव्हा दिलीपकुमार एवढा म्हातारा दिसतो की वधुपिता म्हंटला असेल "नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो". कारण त्या मुलीच्या डोळ्यात मुर्तीमंत भीती उभी दिसते ती लग्न मोडण्याची नव्हे तर अवघे पाउणशे वयमान असलेल्या या दादावीरची. पण राजकुमारच्या बहिणीचे काय? होणार्‍या नवर्‍याने कोणालातरी वाचविण्यासाठी तिच्याशी लग्न केले हा हिच्यावर फार मोठा कलंक असल्याने आता ती Poison असे लिहिलेल्या बाटलीतून विष घेते, त्यात तिला वाचवायचे प्रयत्न करण्याचे सोडून सगळे राजकुमार ला तुझ्या मित्राने हिला कसे फसवले वगैरे डॉयलॉग मारत बसतात. पुन्हा एवढ्या वर्षांच्या दोस्तीत तू एखादी गोष्ट का केलीस विचारायची पद्धत नसल्याने डायरेक्ट जानी दुश्मनी चालू होते. मग सगळे आणखी मोठे होतात (वयाने). यांचे लग्न वगैरे व्हायच्या आधीच हे म्हातार्‍या रूपात दिसतात आणि मग यांची मुलेच काय नातवंडे सुद्धा मोठी होऊन इलु इलु म्हणायला लागेपर्यंत आणि त्यानंतरही तसेच राहतात. पहिली काही वर्षे ही दुश्मनी राज कुमारच्या साईडने असते (पुन्हा खुलासे वगैरे भानगड नाही. "मगर मेरी बात तो सुनो", "मुझे कुछ नही सुनना" च्या ऐवजी थेट कारण लोकांनी सांगितले असते तर अनेक चित्रपट १५-२० मिनिटातच संपले असते :-) ). पण दिलीपकुमार चा मुलगा राजकुमारच्या लोकांकडून मारला जातो (असे दिलीपकुमारला वाटते) त्यामुळे आता दोन्ही कडून चालू होते. मग नंतर एकदा राजकुमारलाही अडकवण्यात येते. चाकू खुपसलेला कोणीही पडलेला दिसला की हिंदी पिक्चरमधल्या सर्वात निर्दोष माणसाला सगळे सोडून तो चाकू आपल्या हातात घेऊन बघण्याची काय सवय असते कळत नाही. त्यामुळे लगेच राजकुमार रंगे हाथ पकडला जातो. त्यात बाकी दुनियेला यांच्या दुश्मनीत भलताच इंटरेस्ट! त्यामुळे एकवेळ भारत पाक सीमेवर नसेल एवढी यांची स्वत:ची फौज अगदी गणवेष वगैरे घालून बियास नदीच्या दोन्ही तीरावर कायम उभी असते. दोन कुटुंबातील वैर कंट्रोल करणे का कोणास ठाऊक पोलिसांना अशक्य असल्याने मग सरकार थेट मिलिटरीलाच बोलावते त्यामुळे ते ही येतात. मग यांचे कोण, त्यांचे कोण आणि मिलिटरीवाले कोण हे आपल्याला कधीच नीट कळत नाही. एकदा फारच होते तेव्हा तो मिलिटरी ऑफिसर त्यांना काय जबरदस्त धमकी देतो "तुम्ही गोळीबार थांबवला नाहीत तर मी सरकारकडे तुमचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यासाठी अपील करीन". That should do it! . इकडे हे दोन्ही तीरांवर बंदुका घेऊन एखादी मुलगी जरी एका बाजूने पाण्यात शिरली तरी गोळीबार करतायत आणि तिकडे तो मिलिटरी ऑफिसर विहीत नमुन्याचा अर्ज, परवान्याची मूळ प्रत वगैरे करत सर्कारी कार्यालयात खेटे घालतोय असे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले :-) विवेक मुश्रन आणि तेव्हाची मनिषा कोइराला यांत कोण जास्त गोंडस दिसतो ते सांगणे अवघड आहे. एवढ्या टाईट बंदोबस्तात हे दोघे मात्र पाहिजे तेव्हा एकमेकांना भेटत असतात. त्या आधी याला लहान असतानाच दुश्मनीतून वाचविण्यासाठी एका गुहेत राहणार्‍या बाबाकडे "शस्त्रविद्या" शिकायला पाठवलेला असतो. हा तोपर्यंत गुहेत राहिलेला आणि मनिषा शहरातून आलेली. पण हा तिला इंग्रजीतील शॉर्टफॉर्म चा कन्सेप्ट समजावतो... म्हणजे " T " म्हणजे " tea ", " C " म्हणजे " See " (आधी मला वाटले कॉफी) इत्यादी. मग तो I L U म्हणतो. आता मुळात प्रेमात पडण्याच्या वयात असलेल्या शहरी मुलीला एवढी क्लियर हिंट दिल्यावरही I L U म्हणजे काय हे कळायला ते पन्नास वेळा म्हणावे लागते, ते ही लहान मुलांना गाणे शिकवतात तशा हालचाली करत, तेव्हा कळते. पण दुश्मनी वाढतच असते. "मै ज़मीन पे रहके भी आसमान मे उडता हू" वगैरे संवाद इकडून तिकडून एकमेकांवर सोडले जातात. आणखी एक कारण होते म्हणजे राजकुमारचा नातू दिलीपकुमारच्या गावातील मुलीला फसवतो. पण त्यांना ते एकदम तिला बाळ झाल्यावरच कळते. मधे ८-९ महिने पत्ताच नाही. अशा बर्‍याच गोंधळानंतर अचानक परत दोस्ती का व कशी झाली ते कळतच नाही. विवेक मुश्रन व मनिषा कोइराला यांचे प्रेम जाहीर होते व ते होळी भोवती फेरे वगैरे मारतात (त्या वेळी असे आई वडलांकडे रागाने बघत दिसेल त्या आगी भोवती फेरे मारायचे बरेच फॅड आले होते. पाहा: दिल वगैरे). पण एवढ्या वर्षांतील गोष्टींचे खुलासे फारसे कोणी करताना दिसत नाही. एकदम राजकुमारला दिलीपकुमार काहीतरी गुन्हा करण्यापसून वाचवतो, सांगतो की यांनी (व्हिलन्स) हे सर्व केले आहे, तो होळीला याच्यावर रंग फेकतो की दुश्मनी खलास! मग एवढे प्रेम उतू जाते की एकमेकांच्या गालांवर चापट्या मारणे, सॉफ्ट टॉईज घेऊन गाणे म्हणणे, पलंगावर उशा एकमेकांना मारणे ( pillow fight ) वगैरे "मर्दाना हरकती" करतात. पण नेत्यांची दिलजमाई होऊन त्यांनी प्रीतीभोजन करावे आणि इकडे त्याचा पत्ताच नसल्याने कार्यकर्त्यांत मारामार्‍या व्हाव्यात तसे यांचे लोक मारत आणि मरत राहतात. उरलेल्यांना अमरीश पुरी आणि इतर व्हिलन्स तसेच देशी कमी पडले म्हणून कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव user friendly कशाला पाहिजे?) वगैरे मारतात. त्यात मुकेश खन्ना दलीप ताहिल बरोबर कड्याजवळ मारामारी करत असताना राजकुमार मधेच ओरडतो की आता हे आपले दोस्त आहेत. लगेच कड्याला लटकणार्‍या एकाला दुसर्‍याचे "आजा मेरे भाई" वगैरे चालू. तेवढ्यात अमरीश पुरीने गोळी घातल्याने दोघेही खाली पडतात व आपण त्या सिमेंटच्या जाहिरातीसारख्या संवादांतून वाचतो ("ये दीवार टूटती क्यूं नही?"). यात सौदागर नावाचा काय संबंध आला? मला कळाले नाही, तुम्हाला कळाले तर सांगा

वाचने 16279 वाचनखूण प्रतिक्रिया 37

फारएन्डभाऊ, महान आहात! _/\_ हसून हसून वेड लागलंय हे सगळं वाचून! जे कोणते पंचेच आवडले ते इथे लिहून दाखवायचे तर जवळजवळ आख्खा लेखच टाकावा लागेल प्रतिसादात, पण
... कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव user friendly कशाला पाहिजे?) ...
हे कहर आहे!
"नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो".
हे वाचून भडकमकर मास्तरांनी केलेली 'दिलवाले दुल्हनिया'ची चिरफाड आठवली. अमरीश पुरी शेवटी काजोलला शाहरूखबरोबर जाण्याची परवानगी देतो तेव्हाचं मास्तरांनी लिहीलेलं स्वगत आणि हे वाक्य, एकदम क्लास, उच्चकोटी!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघवेडा Wed, 09/01/2010 - 14:28
... कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव user friendly कशाला पाहिजे?) ... हे कहर आहे! असेच म्हणतो! युजर फ्रेण्डली म्हणे.. =)) =))

अमित.कुलकर्णी Wed, 09/01/2010 - 09:37
अपेक्षेप्रमाणेच छान. यात आमच्या अतिशय आवडत्या संवादाचा उल्लेख हवा होता असे वाटते - दि. - उठा बंदूक और चला गोली रा - हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे. लेकिन वो गोली हमारी होगी, बंदूक हमारी होगी और वक्त भी हमारा होगा!

दिपक Wed, 09/01/2010 - 09:45
__/\__
चाकू खुपसलेला कोणीही पडलेला दिसला की हिंदी पिक्चरमधल्या सर्वात निर्दोष माणसाला सगळे सोडून तो चाकू आपल्या हातात घेऊन बघण्याची काय सवय असते कळत नाही.

मृत्युन्जय Wed, 09/01/2010 - 10:17
खरे सांगायचे तर मला परदेसचे विडंबन एवढे आवडले नव्हते (तो चित्रपट भिक्कार आहे यात मात्र वाद नाही). पण हे म्हणजे कमाल आहे. मी वेडा झालो हसुन हसुन. तेवढी त्या शेवटाची पण थोडी चिरफाड केली असतीत तर परीक्षण सकळ संपुर्ण झाले असते.

नाटक्या Wed, 09/01/2010 - 10:55
आई शप्पथ पडलो.. खल्लास निरिक्षण आहे.. __/\__ एकदा इथून तिथून मिथून किंवा गेलाबाजार रजणीकांथ यांच्या एखाद्या सिनेमा बद्दल लिहाच...

श्रावण मोडक Wed, 09/01/2010 - 11:03
याचा धागा उघडायचा नाही हा निर्धार काही केल्या टिकत नाही. हुच्च, हुच्च, केवळ हुच्च. त्यात ही अदिती, आता इथं कशाला त्या मास्तरांच्या धाग्याचा दुवा द्यायचा!!! :)

In reply to by श्रावण मोडक

माझ्या मिपावरच्या सुरूवातीच्या दिवसात मास्तरांच्या त्या धाग्यामुळे मला मिपा आवडलं. मी पण सकाळी बराच वेळ तो धागा पुन्हा एकदा चिवडण्यात बराच वेळ "घालवला"!

राजेश घासकडवी Wed, 09/01/2010 - 11:45
साधारण पन्नाशीचे झाल्यावर राजकुमारच्या लक्षात येते की आपल्या बहिणीचे दिलीपकुमारवर प्रेम आहे.
आणि तिकडे तो मिलिटरी ऑफिसर विहीत नमुन्याचा अर्ज, परवान्याची मूळ प्रत वगैरे करत सर्कारी कार्यालयात खेटे घालतोय
विवेक मुश्रन आणि तेव्हाची मनिषा कोइराला यांत कोण जास्त गोंडस दिसतो ते सांगणे अवघड आहे.
अरारारारारा... किती कोट करू, किती कोट करू... अब्ज अब्ज मनी येते. मस्तच. भाऊ, दर आठवड्याला एक असा रतीब आला पायजेलाय. तुमचा रेट काय तो बोला.

चाकू खुपसलेला कोणीही पडलेला दिसला की हिंदी पिक्चरमधल्या सर्वात निर्दोष माणसाला सगळे सोडून तो चाकू आपल्या हातात घेऊन बघण्याची काय सवय असते कळत नाही.
आणखी एक कारण होते म्हणजे राजकुमारचा नातू दिलीपकुमारच्या गावातील मुलीला फसवतो. पण त्यांना ते एकदम तिला बाळ झाल्यावरच कळते. मधे ८-९ महिने पत्ताच नाही.
शॉ ल्ले ट __/\__ मालक. बर्‍याच दिवसांनी खळखळून हसलो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा Wed, 09/01/2010 - 15:24
"हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे. लेकिन वो गोली हमारी होगी, बंदूक हमारी होगी और वक्त भी हमारा होगा!" हे ठाऊक नव्हतं काय? ;)

गणेशा Wed, 09/01/2010 - 15:43
मस्त लिहिले आहे एकदम. राजकुमार आज असते आणी त्यांनी हे वाचुन म्हंटले असते .. ओ हमारी भुल थी ! अब हम acting kare.nge , जरुर करेंगे , लेकीन ओ कथा हमारी होगी , पिच्चर हमारी होगी और वक्त भी हमारा होगा!"

योगी९०० Wed, 09/01/2010 - 16:01
तुमचे आणि सुभाषभाऊंचे फारच वाकडे दिसतेय.. खुप मजा आली वाचून..सर्व पंचेस झकास... यावरून एक कौल टाकावा म्हणतोय की सुभाष घईंचा कोणता चित्रपट सर्वात बकवास होता..

In reply to by योगी९००

मृत्युन्जय Wed, 09/01/2010 - 19:14
आयला. हो की. हे लक्षातच नव्हते आले. पुढचा पिक्चर यादे असेल की त्रिमुर्ती? दोन्हींची गणना हिंदी चित्रपट्सृष्टीतील माइल्स्टोन म्हणुन होउ शकेल.

प्रचेतस Wed, 09/01/2010 - 18:55
मला मात्र सौदागरचा पल्लवी जोशी कुणालला(दिलीपकुमारच नातू) शोधत येते तो सीन फार आवडतो. जी..जी...... मुझे..कुणालसे मिलना हे.......इति पल्लवी जोशी कुणालसे मिलना हे......!!!!!.. इति. अमरिश पुरी(बहुतेक चुणिया मामा) खर्जातल्या आवाजात. हां........पल्लवी आओ बछडी आवो....अमरीश पुरी गाभुळलेल्या आवाजात......ड्रायव्हरचे डोळे वासनेने वखवखलेले. एकदम लाजवाब अभिनय. पल्लवी जोशी गाडीत बसते.. नंतर फक्त गाडीचा एरीयल शॉट. बॅकग्राउंडला तिचे किंचाळणे. पुढच्या दृश्यात अमरीश पुरी जोरजोरात झांझ वाजवत बसलेला. धिन..धिधिन धिन धिण..

पैसा Wed, 09/01/2010 - 20:06
पण ते सगळं "पिच्चर " संपेपर्यंत तुम्ही जागे कसे राहिलात?

मुक्तसुनीत Wed, 09/01/2010 - 21:59
फारएंड ला बॅन करा. नोकरी घालवणार आमची. वेड्यासारखा हसत होतो. फारएंड , शिसानविवि , मुजरा , कुर्निसात नि काय काय. :-)

उपेन्द्र Wed, 09/01/2010 - 23:03
एका गाण्यात सौदागर शब्द आहे ना .. बास झालं.. एकदम राडाच केलाय राव तुम्ही.. पण परीक्षण लिहायला पूर्ण ष्टोरी लक्षात आली आणि लक्षात राहिली म्हणून मानलं तुम्हाला.. कारण परत पाहिला असाल तर तुम्ही आणखीनच थोर.

सहज गुरुवार, 09/02/2010 - 09:41
हुच्च! 'वाना बी कणेकर' मंडळींनी शिकावे असे लेखन बाकी ह्या सिनेमा करता फिल्मफेयर बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड घईसाहेबांना मिळाले होते. :-)

In reply to by सहज

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/02/2010 - 10:01
'वाना बी कणेकर' मंडळींनी शिकावे असे लेखन
'वाना बी फारएन्ड' असं काही वर्षांनी म्हटलं जाईलच! पण फारएन्ड पांचट लिहीत नाही आणि उच्च निरीक्षणशक्तीमुळे हुच्च विनोद करतो त्यामुळे कणेकर म्हणणं ... असो!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज गुरुवार, 09/02/2010 - 10:18
आजवर सिनेमा परिक्षणे म्हणजे विनोद कमी व पांचट वैयक्तिक टिका जास्त अशी कणेकरी इश्टाईल व तश्याच शैलीचे अंधानुकरण म्हणजे उत्तम परिक्षण हा कित्ता गिरवणार्‍यांनी, फारएन्ड यांचे लेखन पाहून शिकावे असा अर्थ आहे. मी फारएन्ड यांचे कौतुकच केले आहे. 'वाना बी फारएन्ड' असं काही वर्षांनी म्हटलं जाईलच! +१