मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समिकरणे

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
उणे अधिक का उणे? न कळली ही समिकरणे गुणिले सुख, भागिले दु:ख, उरली मग स्मरणे! बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी? सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे? जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे? तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी अधोरेखिते, विरामचिन्हे अन् अवतरणे!)

वाचने 3138 वाचनखूण प्रतिक्रिया 15

धनंजय Fri, 08/20/2010 - 06:21
मला वृत्त/बहर समजू येत नाही. मात्र क्रान्ति यांची रचना असल्यामुळे "वृत्त नाही" असे म्हणायला कचरतो.

In reply to by मदनबाण

दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी? सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे? अ प्र ति म. . . -दिलीप बिरुटे

In reply to by घाटावरचे भट

धनंजय Sat, 08/21/2010 - 20:05
दुसर्‍या कडव्यापासून मीटर असे आहे : ८ || ८ || ८ मात्रा मात्र असे असल्यास पहिल्याच कडव्यात यतिभंग होतो आहे. अनुभवी क्रान्ति असे वैचित्र्य कशामुळे आणत आहेत? मुद्दामून केलेल्या यतिभंगाचा (मुद्दामून घातलेल्या वर्ज्य स्वरासारखा) भावनेशी किंवा सौंदर्यानुभवाशी काही संबंध असावा. मात्र मला तो येथे कळत नाही.

In reply to by धनंजय

यतिभंग होत असला, तरी एक उत्कृष्ठ "चमत्कृती" निर्माण होत असल्यामुळे (मलातरी) खटकत नाही. एखादी तान किंवा आलाप घेऊन एक मात्रेतलं तोंड दीड, सव्वा, पाऊण किंवा अर्ध्यामात्रेत घेऊन समेवर येण्याची जी मजा आहे तसा प्रकार आहे त्यात.

राजेश घासकडवी Tue, 08/31/2010 - 13:30
पण काहीतरी खटकलं. हे अर्थातच क्रान्तिंनी निर्माण केलेल्या उंच मानदंडांपोटीच... मोजमापांच्या, समीकरणांच्या, सिंटॅक्सच्या थीममध्ये पाचपैकी फक्त तीन कडवी बसतात. बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे ऐवजी बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते त्या खोलीच्या अथांगतेने मी गुदमरणे असं काही जास्त शोभून दिसलं असतं... पुन्हा कवयित्रीची कविता कशी असावी हे सांगण्यापेक्षा, मुळात काय अपेक्षा निर्माण झाल्या होत्या ते सांगण्याचा प्रयत्न आहे. जर गजलच्या गुच्छात तीन लाल व दोन निळी फुलं ठेवून मुद्दाम उठाव देण्याचा प्रयत्न असेल तर... व्यक्तीशः मला तो विशेष आवडला नाही असंच म्हणावं लागेल.