मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सच्चा माणूस!

श्रावण मोडक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जून २००७ च्या सुमारची घटना. संजय संगवईचं निधन झालं होतं. त्याच्या आठवणी मी 'मनोगत'वर जागवल्या होत्या. लेखनावर एक प्रतिक्रिया आलेली दिसली. पत्रकारितेतील माझ्या अनुभवांविषयीचा उल्लेख त्यात होता. मी या व्यवसायात आहे हे फारसं कुणाला ठाऊक असण्याचं कारण नव्हतं. जालावरच मी नवा. सदस्याचं नाव पाहिलं, 'भोचक'. मी उडालो. हा कोणाचा भोचकपणा, स्वाभाविक प्रश्न आला. काही कळणं शक्य नव्हतं. व्यनि करणं शक्य होतं. माझ्या स्वभावानुसार ते काही झालं नाही. मीही नंतर फारसा रस दाखवला नाही. त्याची आणि माझी अखेरपर्यंत भेट न होण्याचं कारण तिथं असावं का? हे मनाचे खेळ. ते व्यक्त केले तर विवेकी मंडळींच्या लेखी मी मूर्ख ठरेन. पण न केले तर हा कोंडमारा त्या, एरवी नसलेल्या पण कायमच असलेल्या, मन नामक गोष्टीला कायमच सोसावा लागेल. *** जालावरचा वावर वाढला तसा हा भोचक एके दिवशी अचानक सामोरा आला. जालावरच. "वेबदुनियाच्या मराठी आवृत्तीचे काम पाहतो," एके दिवशी व्यनितून एकमेकांना फोन नंबर दिल्यानंतर माझं आणि त्याचं बोलणं झालं. त्यानंच फोन केला. बोलू लागला. भरभरून बोलत होता. पहिलाच संवाद असला तरी. हा अभिनय. अभिनय कुलकर्णी. वेबदुनिया म्हणजे पत्रकारितेचं जालीय रूपडं. एक गोष्ट कळली - भोचकपणाचा "अधिकार" असलेला गृहस्थ दिसतो. 'सकाळ'च्या नाशिक आवृत्तीत होता. अर्थातच, मी तिथून बाहेर पडल्यानंतरच्या काळात. पण त्याच्याबरोबरीचे काही जण माझ्याही काळात होते. ओळखी इकडून-तिकडून निघतातच. जग गोल आहे आणि तसं छोटंही आहेच. मग संवाद वाढत गेला. मग त्याचं लेखन समोर आलं. त्यातूनही परिचय होत गेला. भेटायचं, भेटायचं ठरत गेलं, राहूनही गेलं. *** नर्मदा आंदोलन या विषयावर मी लिहिलेलं वाचून एकदा म्हणाला, "तुम्ही इकडं येता तेव्हा आधी सांगा, एक-दोन दिवस जास्त ठेवा. माझ्याकडं या. आपण इथूनच जाऊ. मला तुमच्यासोबत यायचं आहे." माझा या विषयातील अभ्यास केवळ महाराष्ट्राचा. मी मध्य प्रदेशात गेलो नाही, त्याविषयी लिहिलेलंही नाही. मी त्याला तसं म्हणालो तेव्हा लगेच म्हणाला, "यासाठी तर याच. कारण तुम्ही लिहिता ते महाराष्ट्रापुरतं, पण आम्हाला हा भेदही कळत नाही की मध्य प्रदेशात वेगळं काही असेल. यासाठीच या." इंदूरला काही मी गेलो नाही. *** मी फारसा व्यनि किंवा खरडीवाला माणूस नाही. त्यामुळं फोन. क्वचित त्याच्याशी जीमेलवर बोलणं व्हायचं. माझ्या एका 'नोंदीं'नतरचा एक संवाद - अभिनय: लेखन आवडलं म्हणावं की कुंठीत झालेल्या विकासाचं दुःख मानावं, असं काहीसं झालंय. लेखनात शिरल्यानंतर वेगळीच भावना मनाचा ताबा घेते. त्यात आपण ज्या ऐहिक पातळीवर जगतो, त्याचीच लाज वाटायला लागते. ज्या गोष्टींचा आपण बाऊ करतो, त्या इतरांसाठी किती दूरच्या असतात, याची जाणव होते. आणि मग अपराधित्वाची भावना पछाडते. ता.क.: बालपण मोखाड्यासारख्या (जि. ठाणे) ग्रामीण भागात गेल्याने यातल्या अनेक समस्यांची कल्पना होती. पण आजही तिथे हीच परिस्थिती आहे, हे पुन्हा पाहिल्यावर फार अस्वस्थ वाटते. मी: ही टोचणीही अनुचितच, अन्याय्य अशा स्वरूपात काही विचार सुरू आहेत. अभिनय: ...९९ टक्के आदिवासी भागात असलेल्या अतिशय मागास भागात दहावीपर्यंतचे शिक्षण होऊनही आता कुणास ठाऊक मीही इतका का कोरडा झालोय असं वाटतं. हे वाचलं की मग पुन्हा अस्वस्थ होतो. माझे एक सुह्र्द वय वर्षे ७२. सध्या इगतपुरीजवळ एक प्रोजेक्ट करताहेत. आदिवासी मुलांसाठी शाळा नि बरेच प्रकल्प त्यात एकत्र आहेत. त्यांना जमेल तशी पैशांची वगेरे मदत करतो. पण तेही दिल्यासारखे म्हणून. मनाला पटत नाही. मध्यंतरी कोकणात रहाणार्‍या धनंजय कुलकर्णींविषयी वाचलं तेव्हाही असाच अस्वस्थ झालो. मी: पण ही माणसाची मर्यादा असते. अभिनय: मध्यंतरी बरेच दिवस कपडे घेतले नव्हते. म्हणून एकदम काही कपडे घेतले. बरेच पैसे त्यासाठी मोजले. पार ब्रॅंडेड वगैरे नव्हते पण घेतल्यानंतर लाज वाटली स्वतःचीच. मागे कधी तरी सुंदरलाल बहुगुणा नाशिकला व्याख्यानासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते. कपड्यांची कितीशी गरज लागते. दोन. फार त्यापलीकडे फार गरज नसते. तरीही हव्यास किती करतो आपण हे सगळं आठवलं नि. अस्वस्थ व्हायला झालं मी: आपला प्रॉब्लेम सांगू का, आपण गरजांची व्याख्याही नीट करीत नाही. बहुगुणा आले, बोलले की त्या हिशेबात गरजेची व्याख्या होते, मेधाताई आल्या, बोलल्या की त्या हिशेबात, सातपुड्यात जाऊन काही पाहिलं की त्या हिशेबात, पुण्यात दैनंदिन आयुष्यात परतलो की, त्या हिशेबात. या सगळ्यात स्ट्रायकिंग द बॅलन्स हा महत्त्वाचा. तिथं जो सोस थांबवता येत असेल तोच फक्त आवश्यक असतो. मी अनेकदा म्हणतो, की पहाडावरून उतरून पाणी आणणं हाही त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. तो सुकर करणं हे महत्त्वाचं. कारण त्याच हिशेबात डोंबिवली ते व्हीटी प्रवास करणं हाही जीवनशैलीचा भाग आहे. तो सुकर करणं तितकंच महत्त्वाचं. अभिनय: तुम्ही म्हणताय ते खरंय. कपड्यांचा खर्च झाल्यावर मी मनाशी ठरवलं. आता किमान दोन वर्षे तरी कपडे घ्यायचे नाही. तशी गरजच नाही. उगाच सोस करायचा नाही. नुकताच कम्प्युटर घेतला. आधी होता तो दहा वर्षापूवीचा, सेलेरॉन होता; फारच मागास होता. म्हणून नवाच घेतला. पण तो खर्च केल्यानंतर या सगळ्याची गरज होती का असा प्रश्न पडला. शेवटी याचा काही निदान घरच्यांसाठी उपयोग करता येईल, अशी समजूत घातली. 'हा काही सोस नाही. गरज आहे. त्यामुळे तो आवश्यकच होता,' अशी समजूत घातली. तरीही आत खटकत राहिलंच. मी: बरोबर. आत का खटकलं? नीड आयडेंटिफिकेशन पक्कं नसल्यानं तसं होतं का याचा आपण विचार केला पाहिजे. अभिनय: अगदी खरंय. मला मोबाईलचा अजिबात सोस नाही. कितीतरी वर्षे मी तोच मोबाईल वापरतो. एक हरवला तेव्हा नवा घेतला तोही स्वस्त. उपयुक्तता पाहिली. पण मध्यंतरी सहज एमपी थ्री आणि इतर सुविधा असलेला मोबाईल पाहिला नि विचार आला, घ्यावा काय? पण म्हटलं गरज नाही तर का घ्यायचा? पण आजच्या काळात ज्यात कॅमेरा आहे असा घेतल्यास व्यावसायिक फायदाही होईल, असाही विचार आला. शेवटी तो विचारच मी सध्या बाजूला टाकला. आधी पैसे नव्हते, तेव्हा असे काही विचारही येत नव्हते. आता थोडे पैसे हातात आले की खर्चाचे विचार येतात काय? इतर काहींसारखे आपण काही शॉपोहोलिक नाही, हे खरे. पण तरीही अवाजवी खर्च करतो काय, असं वाटायला लागतं. गरजा नक्की पक्क्या करूनच त्यासाठी खर्च करायला हवा. मग गिल्टी फील रहात नाही. मुख्य म्हणजे विवेक हवा... संवेदनशीलता, विनय, अभ्यासू वृत्ती वगैरे शब्द वापरण्याची वेळ क्वचित येऊ नये आणि अशा प्रसंगात तर येऊच नये. *** अगदी अलिकडचा एक संवाद. मी: ओ पत्रकार. लिहा की नक्षलींच्या प्रश्नावर. काय राव, एवढं पब्लिक म्हणतंय, तर बसलात गप्प. अभिनय: अहो, अभ्यास नाही ना तेवढा. सगळे पैलू तपासायला हवेत. त्या विषयाचं नीट वाचन करायचंय. मुख्य त्या भागात फिरायला आवडेल. बघूया कधी जमतंय. मी: करा. करा... लवकर करा. अभिनय: आम्ही मानवतावादी भूमिकेतून काही बाजू मांडायला जावं, नि लोकांनी धरून हाणावं, असं होईल. नक्षलवादी चळवळीला म्हणजे त्यातल्या हिंसाचाराला पाठिंबा नसला, तरी त्यातल्या प्रश्नांच्या धगीशी सहमत आहे ना. मग लोक अगदी पिच्छा पुरवतील. त्यासाठी संदर्भ गोळा करून नीट लिहावं लागेल. म्हणजे उत्तरं देता येतील. मी: मी वाचणार आहे. अभिनय: माझं वास्तव्य आदिवासी भागातच होतं, दहावीपर्यंत, पण त्या प्रश्नाकडे पहाण्याइतकी प्रगल्भ नजर तेव्हा नव्हती. त्यामुळे आता पुन्हा ते सगळं नीट पहावंसं वाटतंय. अभ्यासावं वाटतंय. मी: आता अ‍ॅक्च्युअली तोच बेल्ट तर माओवाद्यांच्या टार्गेट वर आहे. अभिनय: रायगडात सेझवरून जे झालं, ना तसंच काही दिवसांनी जव्हार, मोखाड्याकडे होईल, असं मला दिसतंय. कारण जमिनीचे भाव वाढायला लागलेत. आमच्या भागातील ग्रामीण भागात कम्युनिस्टांचा निर्विवाद प्रभाव आहेच. त्यामुळे माओवादही त्या आधाराने वाढला तर नवल नाही. अभिनय नव्हता हा. सच्चेपणा होता, त्याच्यातल्या विद्यार्थ्याचा. त्याच्यातील माणसाचा. *** दोनेक महिन्यापूर्वी फोनवर बोलणं झालं. नर्मदा आंदोलनाचा एक सत्याग्रह इंदूरमध्ये त्याच्या वृत्तांकनाच्या निमित्ताने काही कार्यकर्त्यांशी झालेली भेट, त्यातून त्या प्रश्नाचं नव्यानं झालेलं थोडं आकलन याविषयी भरभरून बोलला. नेमके प्रश्न विचारत होता. आंदोलनाच्या भूमिकेविषयी, माझ्या आकलनाविषयी. आपण काय करू शकतो याविषयी. पुढे काही दिवसात पुन्हा माझ्या 'नोंदी' प्रसिद्ध झाल्या. त्याच काळात तो रावेरखेडीला जाऊन आला होता. ते सांगत होता एके दिवशी फोनवर. तिथं दिसलेली नर्मदा, पाण्याचा तो फुगवटा, इंदूरला मिळणारं नर्मदेचं पाणी, रावेरखेडीच्या परिसरातील शेतीची समृद्धी वगैरे... मी सहज त्याला म्हटलं, नर्मदेच्या त्याच भागात भारतखंडातील पहिली शेती झाली असं अँथ्रोपोलॉजी सांगते. लगेच त्याचा अँटेना जागा झाला असावा. मग त्याविषयीच्या सामग्रीची चौकशी सुरू झाली. बोलणं सुरू राहिलं. मी लिहिणार आहे, इतका शब्द त्यानं त्या दिवशी दिला. मला तेवढंच हवं होतं. *** आज पहाटे ४.११. मोबाईलवर नोकिया ट्यून गुंजू लागली. क्षणातच बंद झाली. पाहिलं, मुंबईहून अतुल जोशी. यावेळी? याच्याकडून मिसकॉल तर शक्यच नाही. चुकून बटण दाबलं गेलं असेल, झोपेत वगैरे, माझा मनाशीच विचार. पुन्हा झोपेच्या आधीन. अज्ञानातला आनंद हा असा असतो हे नंतर कळणार होतं. सकाळी ६.१०. नोकिया ट्यून. पाहिलं, ललित चव्हाण. फोन घेतला, "काय रे?" आवाज ललितच्या बायकोचा. "मी ललित चव्हाणांची बायको बोलतेय मनीषा." एक क्षण श्र्वास अडकलाच. हिचा फोन कसा काय? असंख्य शक्यता! "इंदूरचे अभिनय कुलकर्णी आहेत ना, त्यांची बायको भाग्यश्री इथं आहे. अभिनयला अॅक्सिडेंट झाला आहे. ती बोलतीये..." शांत सुरात भाग्यश्री, "मोडकसर, भाग्यश्री बोलतेय. आम्ही इंदूरहून येत होतो. इथं अॅक्सिडेंट झाला. त्याची डेथ झाली आहे..." "व्हॉट?..." एकशेएक टक्के मी हादरलो आहे. सूर कोलमडलेला. सावरतो. पुढच्या गोष्टी होतात. मग मी मित्राशी बोलतो. तपशील कळतो. अभिनय कुलकर्णी या माणसाला मी कधीही भेटलो नाही. आज किंवा उद्या मुंबईत भेटायचं हे आमचं ठरलं होतं. ती भेट राहून गेली. आठवणींच्या कल्लोळातून मी बाहेर येतो तेव्हा पहाटेची आठवण शेवटची असते. पहाटे ४.११ ते सकाळी ६.१० या काळातील अज्ञानातील आनंदाची कल्पना मला येते आणि मी पुन्हा थिजून जातो.

वाचने 29425 वाचनखूण प्रतिक्रिया 73

स्वाती दिनेश 20/07/2010 - 11:28
काय लिहू? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विनायक पाचलग 20/07/2010 - 11:37
काय लिहू?
...... :( :( :(

In reply to by स्वाती दिनेश

केशवसुमार 21/07/2010 - 03:11
अभिनय न करता जगलेला अभिनय सकाळ मध्ये अभिनय वर दीपक रोकडे यांचा लेख.. पहिल्या पानावर सगळ्याना लेखाचा दुवा दिसावा म्हणुन इथे प्रतिसाद दिला आहे

अस्मी 20/07/2010 - 11:29
:( - अस्मिता

In reply to by आनंदयात्री

प्राजु 21/07/2010 - 10:44
हेच म्हणते.. :( - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

Nile 20/07/2010 - 11:45
अभिनयशी एकदाच संवाद झाला, तो विषयच असा होता की ते आठवल्यावर फारच वाईट वाटतंय! त्या संवादाची आठवण बोचरीच राहिल... -Nile

३_१४ विक्षिप्त अदिती 20/07/2010 - 11:55
संयत, विचारी प्रतिसाद देणारा आयडी अशी 'भोचक' यांची प्रतिमा होती. स्वतःलाच 'भोचक' म्हणवून घेणं, "आहेच मुळी मी भोचक", "आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो" अशी वाक्य स्वतःबद्दलच लिहीणार्‍या आयडीमागच्या माणसाबद्दल थोडी उत्सुकताही होती. जालीय वावर वाढल्यानंतर अभिनयशी व्यनी, खरडींमधून ओळखही झाली. इंदूर फार लांब आहे, तिथे मी कधी जाईन माहित नाही, पण कधी या बाजूला भोचकभाऊचं येणं झालं तर त्याला नक्कीच भेटू या असा विचारही मी अनेकदा केला... ही टोचणी नेहेमीच राहिल. अदिती

चित्तरंजन भट 20/07/2010 - 12:10
मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळासाठी मदतीचे आवाहन केल्यावर त्यांचा मला उपक्रमावर व्यक्तिगत निरोप आला होता. त्यात त्यांनी काही अतिशय चांगल्या सूचना केल्या होत्या. त्यातून त्यांची ह्याविषयीची अतिशय प्रामाणिक कळकळ व एकंदरच जी सहज मदत देऊ करण्याची वृत्ती दिसली होती ती अत्यंत लोभसवाणी वाटली होती. अभिनय कुलकर्णी ह्यांचा जालांवरील अनेकांशी संपर्क असावा. एक सुचवावेसे वाटते. तुम्ही जसं जीमेलवरचं बोलणं संपादित करून इथे टाकलेले आहे तसे त्यांच्याशी संपर्कात असलेल्या इतर सुहृदांनीही केल्यास ती एक सार्थकशी श्रद्धांजली ठरावी. त्यांना श्रद्धांजली.

ऋषिकेश 20/07/2010 - 12:09
वाचता वाचता लेख धुसर झाला! पुन्हा दिसु लागल्यवर प्रतिक्रीया द्यायला बसलो पण काय लिहु हेच कळत नाहिये कुलकर्णी परिवाराला सहनशक्ती मिळो ही प्रार्थना ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

बिपिन कार्यकर्ते 20/07/2010 - 12:15
कधीही प्रत्यक्षात न भेटलेला माणूस इतका जीव लावून जातो. चटका लावून जातो. म्हणून वाटतं की खरं आयुष्य जगला हा माणूस. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आळश्यांचा राजा 20/07/2010 - 13:44
अगदी. अगदी. फार वाईट वाटतंय. आळश्यांचा राजा

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गणपा 20/07/2010 - 13:46
.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वाहीदा 20/07/2010 - 19:52
....... त्यांच्या ब्लोग वर त्यांच्या लेकीचा फोटो बघीतला अन गलबलायला झालं नकळत तिच्या फोटोवरुन मायेचा हात फिरवला दैव ... नशिब ... नेहमीच जिंकतो अन चटका देऊन जातो :-( संध्याकाळ झाली पण ही बातमी काही मनाचा ताबा सोडत नाही ... खुप सुन्न करुन गेली ~ वाहीदा

अमोल केळकर 20/07/2010 - 14:47
अरेरे फार वाईट झाले. श्रध्दांजली अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विसोबा खेचर 20/07/2010 - 15:17
---- -- Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

प्रियाली 20/07/2010 - 15:19
भल्या सकाळी इतकी वाईट बातमी. :( सुन्न झालं डोकं.

In reply to by प्रियाली

मिसळभोक्ता 20/07/2010 - 21:35
मनोगतापासूनचा स्नेही गेला. -- मिसळभोक्ता

ज्ञानेश... 20/07/2010 - 15:22
:( भोचक यांना श्रद्धांजली.

धमाल मुलगा 20/07/2010 - 15:40
खरं तर 'कोण हे भोचक?' 'काय त्यांचा माझा संबंध?' असे प्रश्न पडतील...प्रॅक्टिकली विचार केला तर, पण.... तरीही सकाळी बातमी ऐकल्यापासुन काहीतरी भयानक विचित्र मनस्थिती झालीये. "अरे धम्या, इंदुरात या की जोडीनं! इकडे पंचमढीला जाऊया, मांडवा फिरुया, सराफ्यात हादडुया.." असा नेहमी आग्रह करणारा हा सहृद कधी परका वाटलाच नाही. अगदी पहिला फोन झाला आमचा तेव्हाही कुणा त्रयस्थाशी बोलतोय असं वाटलंच नाही.. बक्कळ गप्पा व्हायच्या. ह्या मित्राची सामाजिक जाण, प्रगल्भता लख्ख जाणवायचं, पण म्हणुन समोरच्याला 'आपल्याला ह्यातलं काहीच कळत नाही बुवा' अशी भावना स्पर्शही करणार नाही ह्याची खबरदारी संभाषणातुन आपसुकच घेणारा असा हा मित्र! कोण कुठला 'भोचक', नात्याचा ना गोत्याचा, पण सकाळपासुन विषण्ण वाटतंय, मधुनच गप्पा आठवतात आणि डोळे भरुन येताहेत... मैत्रीमध्ये वितुष्टं येऊन काही मित्र आले आणि गेले, पण असा कधीच न परतण्यासाठी गेलेला हा माझा पहिलाच मित्र! काळजाला चटका लाऊन गेला. भाग्यश्रीताईला हा दुर्दैवी प्रसंग पार पाडण्यासाठी देव बळ देवो! खरं तर प्रश्न पडलाय आज..कोण देव? तो पुचाट? जो गणंग गाळ इथेच ठेवतो आणि सोन्याची काळिजं असलेले असे चांगले लोक घेऊन जातो?

स्वाती२ 20/07/2010 - 16:12
फार वाईट बातमी! बातमी वाचून न कळत डोळे वाहू लागले. देव त्यांच्या कुटुंबियांना हा घाव सोसायच बळ देवो.

सुनील 20/07/2010 - 16:14
बाप रे! सकाळी सकाळी इतकी सुन्न करणारी बातमी! कधीही भेटलो नव्हतो, तरीही गलबलून येतय. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

घाशीराम कोतवाल १.२ 22/07/2010 - 16:30
खरच सुन्न करणारी बातमी मागे एकदा राज ठाकरेंच्या धाग्यावर त्यांच्याशी चर्चा झाली होती अत्यंत संयमी व्यक्तीमत्व वाटले मला ते अभिनय कुलकर्णी उर्फ भोचक ह्यांना मिपा परिवारा तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली हि त्यांच्या अपघाताच्या बातमीची लिन्क ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम

दीपक साळुंके 20/07/2010 - 16:42
कालच त्यांच्या ब्लॉगला भेट दिली होती आणि आज दुपारी ही बातमी कळली. प्रचंड धक्का बसला ! :(
योगायोगानं मी वाचणारा पहिलाच होतो. रात्रीची झोप अस्वस्थ होतीच. सकाळी डोळा उघडला तेव्हाही ही बातमी पिच्छा सोडत नव्हती. आंतरजालावरचे संबंध हे खरंच जालापुरते असतात का? ह्या प्रश्नाने पुन्हा एकदा मला भंडावून सोडले. भोचक ह्या आयडी मागच्या व्यक्तीला मी कधी भेटलो, बोललो किंवा जीटॉकही केलेले नव्हते. तरिही त्यांच्या मिपावरच्या मोजक्या वावरातून ही एक वेगळी व्यक्ती आहे इतका ठसा माझ्यामनावर उमटला होता. त्यांचे इंदूरसंबंधीचे लेखन मला कायम भुरळ घालत आले मी ते आवडीने वाचत गेलो. प्रतिक्रिया देत गेलो. आयडीचे कवच अलगद गेले आणि एक व्यक्ती म्हणून मनात स्थान मिळाले. आता पुन्हा अभिनय कुलकर्णींकडून काही लिहिले जाणार नाही आणि तेही अशा कारणाने ह्याचे मनस्वी दु:ख आहे. ज्यांचा ह्याहूनही जास्त संपर्क त्यांच्याशी होता त्यांचे काय हाल झाले असतील हे समजू शकतो. इतकी असहायता फार कमी वेळेला अनुभवावी लागते. त्यांच्या पत्नीला, मुलीला आणि इतर कुटुंबियांना जगण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. (इथून पुढे कधी मी 'भोचक' हा शब्द नेहेमीच्या अर्थाने वापरु शकेन असे वाटत नाही..) (साश्रु)चतुरंग

In reply to by चतुरंग

महेश हतोळकर 20/07/2010 - 17:31
शब्दा शब्दाशी सहमत. मी ही त्यांच्याशी कधीच बोललो नाही किंवा खरडा-खरडी केली नाही. पण त्यांच्या लेखांना एक स्थान होते (राहिल).

In reply to by चतुरंग

चित्रा 20/07/2010 - 18:35
सकाळीच ही बातमी वाचून हतबल असल्याची जाणीव झाली. त्यांच्या पत्नीला, मुलीला आणि इतर कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना. त्यांच्या दु:खात सहभागी आहे.

रेवती 20/07/2010 - 18:05
अभिनय कुलकर्णींच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो! 'भोचक' म्हटलं कि इंदूर आठवायचं....... रेवती

अरुंधती 20/07/2010 - 18:25
श्रध्दांजली.... आणि त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना. अरुंधती http://iravatik.blogspot.com/

अभिरत भिरभि-या 20/07/2010 - 18:49
प्रतिक्रिया वा लेखावर ज्यांचे नाव बघितले की खाली लिहिलेला मजकूर उत्तमच असणार अशा काही व्यक्ती असतात. अशा यादीत मी हा "भोचक" हा "आयडी" टाकला होता. त्यांचा इंदूरवरचा लेख खूपच आवडल्याने स्वतःलाच तो रेफरन्ससाठी इमेल केला होता. असे त्यापूर्वीही कधी केले नव्हते आणि त्यानंतरही केले नाही. काही माणसे समाजासाठी अ‍ॅसॅट असतात पण दुर्दैवाने धमुशेठने म्हटल्याप्रमाणे गणंग गाळ मागे राहतो आणि लखलखते सोने निघून जाते. ईश्वरेच्छा बलियसि .. आता त्याच पांडुरंगाने हे डाँगराएवढे दु:ख सोसण्याची ताकद त्यांच्या आत्मियांना द्यावी एवढी प्रार्थना .. !

वेताळ 20/07/2010 - 19:47
........ वेताळ

संदीप चित्रे 20/07/2010 - 19:51
फेसबुकवर सम्राट फडणीसची पोस्ट पाहिली आणि थोड्या वेळातच ट्विटरवर नंदनचा ट्विट पाहिला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हे वापरून चोथा झालेलं वाक्य आहे पण अजून काही सुचत नाहीये. रंगाने त्याच्या श्रद्धांजलीत शेवटी कंसात वापरलेल्या वाक्याशी पूर्णपणे सहमत.

टिउ 20/07/2010 - 19:55
सुन्न झालंय डोकं! काय लिहावं काही सुचत नाहिये... भोचक नाशिकचेच असल्याने एक दोनदा त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यापेक्षा जास्त ओळख नव्हती. तरीही एक मित्र/जवळची व्यक्ती हरपल्यासारखं वाटतंय! :(

ज्ञानेश... 20/07/2010 - 20:19
काही दिवसांपुर्वीच भोचक यांनी मराठी आंतरजालाबद्दल माहितीपूर्ण असा लेख 'लोकमत' मधे लिहिला होता- http://onlinenews1.lokmat.com/php/detailedsuppliment.php?id=Manthan-52-1-03-07-2010-1eccb&ndate=2010-07-04&editionname=manthan श्रद्धांजली !

In reply to by ज्ञानेश...

आळश्यांचा राजा 21/07/2010 - 13:08
आपण केवळ एक चांगला आणि सच्चा माणूस, (कधीही न भेटता देखील झालेला) सखाच गमावलेला नाही, तर एक प्रगल्भ विचार आणि कृती करणारा माणूसही गमावलेला आहे. फार नसतात अशी माणसं. हा विचार मनात येऊन अजूनच जास्त दु:ख होतं.

विकास 20/07/2010 - 20:34
अभिनय कुलकर्णी नावाची व्यक्ती गेल्याचे सकाळी उपक्रमावर पाहीले आणि माहीत नसूनही अस्वस्थता आली. नंतर अभिनय म्हणजेच भोचक समजल्यावर तर अजूनही वाईट वाटले. कोणीतरी न पाहता देखील, जवळची व्यक्ती गेल्याची भावना आली. भोचक यांच्यांशी कधी कधी व्य.नि.ने संवाद झाला होता. पण नंतर पुढे काही कारण नसताना संवाद करायचे राहून गेले होते... आता ती हूरहूर कायमच राहणार. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पाषाणभेद 20/07/2010 - 20:53
त्यांच्या मुलीने शेवटी हंबरडा फोडला तेव्हा डोळ्यात पाणी आले. फारच दुर्दैवी अंत.

In reply to by पाषाणभेद

आमोद शिंदे 21/07/2010 - 07:43
हे इथे द्यायलाच हवे होते का? :-( असो... (अस्वस्थ) आमोद

मराठे 20/07/2010 - 21:07
भावपूर्ण आदरांजली

भानस 20/07/2010 - 21:51
माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये अभिनय गेलाय यावर. अतिशय दु:ख झाले. देव भाग्यश्रीला व लेकीला हे जीवघेणे दु:ख सोसण्याची ताकद देवो. विनम्र श्रध्दांजली.

क्रान्ति 20/07/2010 - 22:15
वहाणं एक्ढंच आपल्या हाती असतं! त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती देवानं द्यावी. क्रान्ति अग्निसखा

उदय 20/07/2010 - 22:36
भोचक यांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी आहे.

मस्त कलंदर 21/07/2010 - 00:31
एखाद्या व्यक्तिला न भेटताही तिच्याबद्दल चांगलं मत तयार होतं... भोचक त्यांपैकीच एक.. कधीमधी खरडाखरडी चालायची एवढा काय तो त्यांच्याशी झालेला संवाद.. सकाळी उठल्याउठल्या टीव्हीवर बातमी पाहिली.. त्यात फक्त अपघाताचा उल्लेख होता, कुणाची नांवे नाही सांगितली. आणि नंतर बिकांचा फोन आला अन् एकदम मन विषण्ण झाले. सारा दिवस असाच गेला.. मिपाचे पान समोर होते, पण कुठला धागा उघडून वाचावा, प्रतिक्रिया द्यावी असे वाटतच नव्हते. अगदी या धाग्यांवरही. जणू काही असे घडलेच नसावे अशी खोटी समजूत घालून घेतल्यासारखी दूर राहिले... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

भडकमकर मास्तर 21/07/2010 - 01:57
.

आमोद शिंदे 21/07/2010 - 02:05
भावपूर्ण श्रद्धांजली!

जृंभणश्वान 21/07/2010 - 02:27
भावपूर्ण श्रद्धांजली

राजेश घासकडवी 21/07/2010 - 05:41
लेख वाचून अनेक गोष्टी दाटून आल्या. सर्वप्रथम अर्थातच इतक्या तरुण, धडाडीच्या व प्रामाणिक माणसाचा अकाली मृत्यू झाल्याचं वाचून सुन्न झालं. माझी त्यांची ओळख नाहीच - जे काही माहीत आहे ते मिपावरच्या प्रतिसादांमधून व त्यामुळे वाचलेल्या ब्लॉगवरील लेखनातून. श्रामोंनी लिहिलेल्या संवादामुळे एक धूसर पण आवडावी अशी व्यक्तीरेखा डोळ्यासमोर आली. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली. जाता जाता - मिपा परिवारातल्या अनेकांनी जितक्या आत्मीयतेने त्यांच्याबद्दल श्रद्धांजली, हळहळ व प्रेम व्यक्त केलं आहे ते वाचून अशी माणसं जवळ आहेत याचंही बरं वाटून गेलं.

निरन्जन वहालेकर 21/07/2010 - 07:52
लेख वाचून डोळे पाणावले. विनम्र श्रद्धांजली!!

इरसाल 21/07/2010 - 09:57
ह्या माणसाने दोन दिवस मला बराच त्रास दिलाय. मी मिसळपावचा मागील ४-६ महिन्यान्पासुंचा वाचक अगदी रोजच वाचतो पण प्रतिक्रिया देत नाही अधूनमधून एखादी देत असतो. अभिनय चा अपघात झाला धुळ्याजवळ मी शिरपुरचा जेव्हापासून हे वाचलेय दोन दिवस फार फार अस्वस्थ वाटतेय.कधी न पाहिलेला भेटलेला माणूस अचानक मनाला इतकी हुरहूर कशी लावू शकतो ?

सन्जोप राव 21/07/2010 - 10:20
भोचक यांना श्रद्धांजली. या माणसाचे खरे नावही मला माहिती नव्हते. मग हे असे उन्मळून पडल्यासारखे का वाटत आहे? सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है

jaypal 21/07/2010 - 10:36
काळाने घाव घातला कसा क्रुर डाव साधला भोचक हा दुर नेला आम्हांपासुन............................... भोचकरावांची समक्ष कधी भेट झाली नाव्हती पण एक खरड मित्र मी गमवला. cry *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

अनुप्रिया 21/07/2010 - 11:40
http://72.78.249.107/esakal/20100721/5142307982347373788.htm http://72.78.249.107/esakal/20100721/5679147109758160547.htm सौजन्य - इ सकाळ सोनाली

डॉ.श्रीराम दिवटे 21/07/2010 - 11:47
कुलकर्णी परिवारावर कोसळलेल्या डोंगराएवढ्या दुःखात मीही सहभागी आहे.

श्रीयुत संतोष जोशी 21/07/2010 - 18:45
विनम्र श्रद्धांजली!! हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
कधीही न पाहिलेल्या माणसाविषयी एवढे वाटायला लावणारी व्यक्ती गेली! छे, काळ निर्दयी खराच. ईश्वर त्यांना नक्कीच शांती देईल. त्यांच्या कुटुंबियांस तो धैर्य देवो. हीच प्रार्थना! आपले http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.

शुचि 22/07/2010 - 17:56
भाग्यश्री आणि त्यांची मुलगी या बिकट काळातून सावरून , लवकरात लवकर बाहेर पडोत. काळ हेच या दु:खौघावरचं औषध. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||