मी कवयित्री कसा झालो...? अर्थात जालिंदरजींची कृपा ... भाग १
गेल्या फ़ेब्रुवारीतली गोष्ट... मला विविध आजार एकदम होताहेत असं वाटायला लागलं... म्हणजे एकाच वेळी आळशी आणि उत्साही वाटणं, झोप न लागणं , वाट्टेल तेवढं झोपणं, अति भूक लागणं आणि दुसर्या दिवशी अजिबात भूक नसणं असं काहीही सुरू होतं.. डाक्टरांनी काही प्रथमिक तपासण्या केल्या आम्ही नार्मल आहोत असं दर्शवणार्या.. मग पुढला महिनाभर आम्ही (काही इस्पितळांचा खर्च भागवण्यासाठी आणि अनेकांना रेफ़रल फ़ी मिळवून देणार्या) भारी भारी तपासण्या असतात त्याही करून घेतल्या पण त्याही नार्मल होत्या... मग आमची रवानगी एका मानसतज्ञाकडे झाली. त्यांनी आम्हाला अनेक सेशन्समध्ये बोलावून घेऊन आमच्याकडून खूप बडबड करून घेतली... साला, ऐकतोय का झोपलाय काही कळायचं नाही...सेशन संपलं की फ़ी घ्यायला बरोब्बर उठायचा...... माझ्या बालपणातली अनेक सीक्रेट्स त्याला सांगून झाली ( मी ६ वर्षांचा होईपर्यंत झोपेत लघवी करत असे, चौथीपर्यंत अंगठा चोखत असे, मी तिसरीत दोन मुलींना लग्नाचं वचन दिलं होतं म्हणून त्यांचे आई बाप एकमेकांत भांडले होते,पहिलीत असताना मी एकदा घाईघाईत स्त्रियांच्या स्वच्छतागृहात शिरलो होतो असलं सारं सारं सांगून झालं...) चौथ्या सेशनच्या शेवटी "मी माझं कसं होणार" असं त्या तज्ञाला विचारलं...त्यानं "व्हेरी कॉम्लिकेटेड केस "म्हणून खांदे उदवले. मी घाबरलो.. मग तो " ट्यूनिन्ग विथ द कास्मिक एनर्जी , ऑरा, पॅरानॉर्मल बिहेवियरल स्टडीज इन ऍपरंटली ऑटोनॉमस न्यूरोव्हॅस्क्यूलर बंडल अशी खूप बंडलबाजी केली .. मी घाबरून पळून आलो...
त्या रात्री तळमळत झोपायचे सोंग घेतले असताना आम्हाला जांभळ्या फ़िरत्या कलरचा शर्ट घातलेली हातात पिस्तुल घेऊन मल्लखांबावर चढलेली व्यक्ती दिसली.... मी "जालिंदरबाबा" मला वाचवा अशी आरोळी ठोकली... त्यांनी विचारलं "काय होतंय बाळा?" या शब्दांनी मला गहिवरून आलं. मी सारा प्रकार कथन केला...रात्री झोप लागत नाही, दिवसा कामाच्या वेळी झोप येते,डोके गरगरते, भास होतात, विचित्र व्यक्ती दिसतात,कालिदास, भवभूती, शूद्रक , शेक्सपियर दिसायला लागतात.. मग चक्कर येते आणि मग उत्साही साहसोत्सुक वाटतं..
"कधीपासून होतंय हे सारं?" जालिंदरजी.
झाले असतील एक दोन महिने...
"दोन महिन्यांत काही आगळं वेगळं केलं का?"
काही नाही.. सारं रूटीन तर चालू असतंय.."
"नीट आठवून पाहा.."
"रात्री त्रिफ़ळाचूर्ण घ्यायला लागलोय"
तसलं नका सांगू.. काही सांस्कृतिक वेगळेपण?"
म्हणजे?
समाजवादी मासिकातले लेख तर वाचायला लागला नाहीस ना?
नाही बाबा..
मग काय नवीन वाचतोस?
आठवलं.. सध्या अंतरजालावरच्या मराठी कविता वाचतो बाबा... आणि त्यावरचे प्रतिसाद.
हे म्हणताच जालिंदरबाबा युरेका युरेका असं म्हणत खांबावरून खाली उतरले... आणि मला एक सल्ला दिला.... अत्यंत मोलाचा सल्ला...
ते म्हणाले," तुझ्या सार्या मानसिक त्रासाचं कारण आहे कविता... ही कविता तुझ्या मानगुटीवर बसलेली आहे... "
मी म्हणालो," सोप्पंय .. मी आता कविता वाचायचं बंद करतो म्हणजे मी बरा होईन..."
" ते इतकं सोपं नाही पोरा.. एकदा कवितेनं झपाटलं की संपलं"
मग याला उपाय?
"काट्यानं काटा..."
म्हणजे?
या कवितेच्या भुताला कविता करूनच मारायचं...
खिखिखि
हसू नकोस...
कोणी करायची कविता?
तूच..
खिखिखि
मी सीरियसली बोलतोय...
पण मी आत्तापर्यंत जे न देखे रवीच्या कधी वाटेलाही गेलेलो नाहीये... दोन महिने प्रायोगिक कविता वाचल्या त्याची इतकी शिक्षा?
ही शिक्षा नाही, हे औषध आहे... हे औषध बनवायचे काही प्याटर्न्स मी शिकवेन
.पण एक अट आहे...
कोणती?
माझी एक परम हुशार शिष्या शरदिनी हिचं नाव घेऊन तुला कविता करावी लागेल...
कोण शरदिनी?
तुला काय करायचंय?
चालेल बाबा...पण कशी लिहू?
कशीही लिही...सुचेल ते आणि वाट्टेल ते लिही.. चालतं..तू कविता लिहायला तर लाग, तुझे सारे आजार बरे होतील..आज एक सोपा प्याटर्न देतो.
अमुकचे अमुक होताना
का आलीस तू?
पण चालेल,
तुझे अमुक आणि
तुझे तमूक
मी अत्यानंदाने जालिंदरबाबांच्या चरणावर डोके ठेवले... आणि वर पाहतो ते अदृश्य झालेले....
या सुंदर स्वप्नाने माझी झोपमोड झाली....
एकाच वेळी मला हलके हलके, दगडाइतके जड ,खोलगर्तेत फ़ेकल्यासारखे आणि वार्यावर तरंगल्यासारखे वाटायला लागले... हात थरथरायला लागले...
कालिदास माझ्या अंगात संचार करू लागला, जिभेवर अवघड अवघड शब्द फ़ेर धरून नाचायला लागले... मी झरझर कागदावर लिहू लागलो...
आणि माझ्या नकळत खालील कविता तयार झाली....
उमलत जाणारे प्राक्तनाचे ओझे
तणावाच्या पसार्यात गरगरताना
कोणी धाडलंय तुला
कल्पनेपलिकडील जगातून
माझ्या विसविशीत देहसावलीवर
हळूवार फुंकर घालायला
पण चालेल,
काळजात रुतलेला तुझा तो स्पर्श
आणि ती क्षणभंगुर भीक पेलताना
वृथा वैफल्याचा चोरटा सूर...
मला समाधान वाटले...
जालावर २००९ सालच्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कविता प्रदर्शित झाली...
कविता लिहून झाल्यानंतर माझ्या सर्व शारीरिक मानसिक तक्रारी दूर होत असत...पुढले १५ ते २० दिवस मला कधीही त्रास होत नसे...
त्यानंतर त्रास सुरू झाला की लगेच पुढची कविता करून जालावर चढवायची... त्रास बंद... अशा प्रकारे जालिंदरजी आणि शरदिनी यांच्या पुण्याईने कवितेने माझा आजार बरा केला...
असाच तुमचाही कवितेचा आजार बरा होवो , अशी इच्छा व्यक्त करून मी हे माझे स्फ़ुट संपवतो...
शरदिनीच्या काही पुढल्या कवितांबद्दलचे विवेचन पुन्हा केव्हातरी.....
(क्रमश: )
काल स्वप्नात पुन्हा गुरुजी आले आणि म्हणाले..."आता तू बरा झालास ...कायमचा... आता कितीही कशाही कोणाच्याही कविता वाचल्यास तरी तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही..".त्यामुळे आज शरदिनी प्रकटदिन सोहळा करायला हरकत नाही, असे गुरुजींचे मत पडले......
_____________
आपली शरदिनी
ऊर्फ
जालिंदर शिष्य भडकमकर मास्तर
वाचन
23920
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
त्या
मस्तच
आगागा !
च्यायला
हा हा हा!
च्यायचा घो
जाग मछन्दर गोरख आया...
हाहाहा!
In reply to हाहाहा! by प्रमोद देव
होय
मास्तर..
जबर्याच की
मास्तर...
:)
मास्तर
In reply to मास्तर by टारझन
आंबोळी
आत्ता कुठं डोकं दुखायचं थांबल.
च्यामारी
लै भारी
आयचा घो.
_/\_
ललित अन्
_/\_
In reply to _/\_ by श्रावण मोडक
असेच
एकदम भारी...
तेज्यायला
In reply to तेज्यायला by ब्रिटिश
मास्तरांच
मास्तर..
हाहा
आल्ल्ल्ख निरंजन
हे
गेल्यावर्
शब्दांना
आरं तिच्या..
बाब्बो ,
मास्तूरे!
प्रकट सोहळा
हा हा हा
च्यायला
आकाशातल्य
आमचे एक
In reply to आमचे एक by llपुण्याचे पेशवेll
+१
अशक्य आहात
मास्तर
वा!!
धन्य ते
too Good to be True !!
गुरुजी
छे
मला
In reply to मला by यशोधरा
हो नाहीतरी