बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद
वतन की मिट्टी आयी है, चिठ्ठी आयी है
अमेरिकेत आलो त्याला बरीच वर्षं झाली. नशीबाची गोष्ट म्हणजे एकाच वर्गातल्या आम्हा तिघांना एकाच युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे ती खूपच सोय झाली. आम्ही तिघे एक अपार्टमेंट घेऊन राह्यलो. एकगठ्ठा तिघं जण एकत्र असल्यामुळे साहजिकच पहिल्या थॅंक्सगिव्हिंगला इतर जनता गावोगावहून आमच्या घरी जमली. परत एकदा मोठ्ठा ओळखीचा ग्रुप जमत होता. ग्रॅड स्टुडंट असल्यामुळे बजेटं तशी मर्यादितच होती. पण दुकानात दारू खरेदी करायला गेलो तेव्हा आमच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आंद्रे शॅंपेन - बाटलीची किंमत केवळ दोन डॉलर! मिळाली. आम्ही तेव्हा आयुष्यात कधी शॅंपेन प्यायली नव्हती, त्यामुळे चांगली वाईट वगैरेचा प्रश्नच नव्हता. शॅंपेन या शब्दाचं वलयच पुरेसं होतं. 'साला शॅंपेन पियेंगे' म्हणून आम्ही तीनचार बाटल्या घेतल्या, बीअर वगैरे घेतली आणि पार्टी मस्त रंगली. जुन्या आठवणी निघाल्या. प्रत्येकाने आपापल्या युनिव्हर्सिटीच्या गमती सांगितल्या. थंडीला सगळ्यांनीच शिव्या दिल्या. टेक्सासमधल्या एकाने हे थंडी म्हणजे काय विचारल्यावर त्यालाही शिव्या दिल्या. सगळं मस्त चाललं होतं. मध्येच कोणीतरी बडे दिनोंके बाद लावलं. झालं. ती सस्त्यातली व भरपूर शॅंपेन आणि बीअर, भारतातून येऊन नुकतेच झालेले काही महिने, नव्याची किंचित ओसरलेली नवलाई, पुन्हा भेटलेले मित्र आणि जागलेल्या आठवणी.... या सगळ्या अजब मिश्रणावर या गाण्याने जी जादू केली की आत्तापर्यंत गोठून राहिलेल्या पाण्याला वाट मिळाली. त्या रात्री भले भले रडले....
नंतर बऱ्याच वेळा ते गाणं ऐकलं. ती जादू काही झाली नाही. खरं तर दिवसाउजेडी स्वच्छ डोक्याने ते गाणं ऐकलं की बटबटीत वाटतं. तेरी बीबी करती है सेवा, सूरत से लगती है बेवा... तुझ्या आईची अशी अवस्था झाली आहे, तू पैसे कमावलेस तरी किती गोष्टींना मुकला आहेस वगैरे वाक्यांचे भावना पिळवटून काढण्यासाठी, चरक रचले आहेत. चाल काही वाईट नाही, पण अधल्या मधल्या ओळी रेल्वेमधल्या भिकाऱ्याच्या तोंडून येऊ शकतील असं वाटतं. योग्य वेळ, आणि परिस्थिती लागते अशा गाण्यांसाठी....
अमेरिकेत आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी माझ्या होस्टेलमधल्या एका मित्राला पत्र पाठवलं. त्यावेळी त्याने उलट पाठवलेल्या पत्रात काहीसं गमतीनेच लिहिलं होतं, '...एव्हाना, कॉलेजात ओळखत होतो पण नंतर आमचा संपर्क राहिला नाही, अशी परिस्थिती झालेली असेल असं वाटलं होतं, म्हणून तुझं पत्र बघून आश्चर्य वाटलं....'
त्यावेळी नुकताच कॉलेजातून बाहेर पडून नवीन देशात आलेलो होतो. जुने दिवस मनात ताजे होते. पायाखालच्या जमिनीइतकीच मित्र ही भरभक्कम, चिरंतन वस्तू असते असं वाटत होतं. 'नंतर संपर्क राहिला नाही' वगैरे वाक्यं उडत उडत ऐकली होती. पण अपघाताप्रमाणे त्या दुसऱ्यांना होणाऱ्या, त्यासुद्धा आईबापांच्या पिढीतल्या लोकांना होणाऱ्या गोष्टी वाटायच्या. म्हणून मी ते वाक्य विसरूनसुद्धा गेलो.
आता मागे वळून बघताना खूप मित्रांचं तेच झालेलं दिसतं. प्रत्येकजण आपापल्या संसारात गुरफटलेला. नोकरी, करीअर, पोरंबाळं, त्यांच्या शाळा, अधूनमधून प्रवास... फुरसतके रातदिन कधी कुठे निघून गेले ते कळत नाही. फोन आहे, इंटरनेट आहे, अमुक टॉक, तमुक मेल... तरीही कॉलेजमध्ये जसे पक्के दोस्त असतो तसे कसे राहाणार? काही वेळा अचानक नावं समोर येतात, कोणी फेसबुकवर, तर कोणी लिंक्डइनवर ओळखीचं माणूस हाका मारत येतं, आणि आठवणी जाग्या करून जातं. काही गोड, काही कडू...
मी मुळातच तसा मित्र गोळा करण्यात वाकगबार नाही. लोकांपेक्षा पुस्तकं, पार्ट्यांपेक्षा शांतता, आणि सगळ्यांबरोबर ढाणढाण गाणी ऐकण्यापेक्षा घरातच मंद स्वर ऐकण्यात रममाण होणारा. त्यात एक नंबरचा विसरभोळा - लोकांची नावं, चेहेरे लक्षात ठेवण्याची मारामार, तर वाढदिवस, अॅनिव्हर्सऱ्या (किंवा ते लिहिलेल्या डायऱ्या...) कुठे सांभाळत बसणार. एकेक मित्र असे गळत गेले. काही त्याबाबतीत नशीबवान असतात. काही त्यासाठी परिश्रम घेतात. त्यामुळे त्यांच्या मैत्र्या खूप काळपर्यंत घट्ट टिकून राहातात - व्यवस्थित निगा राखल्यामुळे भक्कम राहिलेल्या बत्तिशीसारखे. माझं लहान वयातच मोजके दात लुकलुकणारं बोळकं झालं.
भारतात अनेक वाऱ्या झाल्या. पहिल्या काही वेळा पुनर्भेटीचा आनंद होता. होस्टेलवर जाऊन दोस्तांना भेटणं हे असायचंच. आयायटीशी माझं विशेष नातं. हॉस्टेल रूमच्या भिंतीवर मधुबाला काढलेली होती. ती जाऊन बघून येणं हा एक कार्यक्रम असे. नंतर राहायला आलेल्या लोकांनी अनेक वर्षांच्या रंगरंगोटीतून ती जपलेली होती. ती बायकोला अभिमानाने दाखवली होती. इतरही हौशी असायच्या. ठरलेल्या ठिकाणी भेळपुरी हादडून त्याच्या शेजारीच कुल्फी खाणं, हौस म्हणून नेहेमीच्या बसने प्रवास करणं, कुठे काय बदलतंय ते बघणं, या सगळ्यांत एक गंमत होती, एक हवेसेपणा होता. ते हळुहळू बदलायला लागलं. कधी, कसं लक्षातदेखील आलं नाही. आयायटीचं नंतर नंतर नुसतं दर्शनच असायचं, कारण त्या अवखळ हसणाऱ्या मधुबालाशिवाय ओळखीचे कोणी शिल्लक नसायचे. मित्र, लहान भावंडं हळुहळू लग्नाळायला लागले. काहींचे केस विरळ झाले, तर काही पांढरे व्हायला लागले. चेहेरे थोडे वेगळे दिसायला लागले. एकमेकांना छेद देणारी वर्तुळं मोठी होऊन दूर सरकायला लागली. आठवणी अंधूक व्हायला लागल्या.
मधुबाला पुसली गेल्याचं उडत उडत कळलं तेव्हा खूप काही हरवल्यासारखं वाटलं.
अशीच वर्षं जात होती आणि दिवसेंदिवस रस कमी होत होता. काही महिन्यांपूर्वी मी मराठी संस्थळांवर लिहायला सुरूवात केली. लेख लिहिले, लोकांचे वाचले, तावातावाने केलेल्या चर्चांमध्ये तितक्याच तावातावाने भाग घेतला. प्रतिसाद दिले, संवाद झाले, खव, खफ, व्यनिंमधून ओळखी होत गेल्या. एरवी सामान्य परिचित लोकांच्या कंपन्यांमधली राजकारणं, स्टॉक मार्केट, सिनेमे असल्या साच्यातल्या विषयांपलिकडे जाऊन मराठी वाचन, लेखन, साहित्य, समाज यांविषयी माझ्याप्रमाणेच जिव्हाळा असलेले लोक भेटले. आयड्यांची व्यक्तिमत्वं धूसरपणे दिसायला लागली. वाद, भांडणांचे संदर्भ कळायला लागले. आणि या जगाविषयी, या लोकांविषयी आपुलकी वाटायला लागली.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, अचानक, खूप काळाने पुन्हा एकदा मला भारतात यावंसं वाटलं. नातेवाईक भेटतील, आईवडिलांबरोबर वेळ घालवायला मिळेल हे नेहेमीचे जमेचे मुद्दे आहेतच. त्याहीपलिकडे यावेळी नवीन लोकांना, आयड्यांपलिकडच्या व्यक्तींना भेटण्याची इच्छा आहे. मराठी संस्थळांचं विश्व मल तसं नवीनच आहे. तरी इथे तुमच्याकडून, वाचकांकडून मला खूप आपुलकी मिळाली. चरकात घालूनही फारसा रस निघणार नाही अशी परिस्थिती येतेयसं वाटत असतानाच नवा ओलावा मिळाला. खूप दिवसांनी कोणालातरी भेटायला जावं ही इच्छा मनात जागी झाली. फिरून एकदा वाटलं...
बडे दिनों के बाद, हम बेवतनों को याद, वतन की मिट्टी आयी है...
20 मेला पोचतोय.
वाचने
10587
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी ११ जून ला पोचतो आहे
milpitas मध्ये
In reply to मी ११ जून ला पोचतो आहे by बेसनलाडू
नॉर्थ मिल्पिटास बुलवा - स्टारबक्स
In reply to milpitas मध्ये by शिल्पा ब
मजा आहे
In reply to नॉर्थ मिल्पिटास बुलवा - स्टारबक्स by बेसनलाडू
मी ही...
In reply to मी ११ जून ला पोचतो आहे by बेसनलाडू
राजेशजी मायभुमीत आपले स्वागत असो
उत्तम मनोगत
असेच म्हणतो.
In reply to उत्तम मनोगत by वाचक
सही
या हो या
जननी
गुर्जी,
२२ मे
अन्यत्र
स्वदेस
In reply to अन्यत्र by ऋषिकेश
मीही.
In reply to स्वदेस by लंबूटांग
या...
मुलांच्या उन्हाळ्याच्या
In reply to या... by श्रावण मोडक
मनातले
वन्नकम
वेल्कम सर,
हेच म्हणतो
In reply to वेल्कम सर, by बिपिन कार्यकर्ते
वेल्कम, नुसतं भारतातंच नव्हे तर या आयड्यांच्या भूलघालू जगातही.
In reply to वेल्कम सर, by बिपिन कार्यकर्ते
त्या
जावईशोध
In reply to त्या by Pain
आणि
In reply to जावईशोध by बेसनलाडू
आणि हो,
In reply to आणि by भडकमकर मास्तर
आणि हो
In reply to आणि हो, by Pain
शक्यता कमी
In reply to आणि हो by ब्रिटिश टिंग्या
रडणे
किमान-कमाल कसे ठरवायचे?
In reply to रडणे by Pain
काही
In reply to किमान-कमाल कसे ठरवायचे? by बेसनलाडू
शब्द्च्छल
काही काळानंतर = ?
In reply to शब्द्च्छल by Pain
मीपण
In reply to काही काळानंतर = ? by बेसनलाडू
आईप्रमाणेच वडिलांच्याही
In reply to काही काळानंतर = ? by बेसनलाडू
आपल्याला
प्रवासाच्या आणि भारतातील मुक्कामाच्या शुभेच्छा!
हॅपी जर्नी
हाहाहा
In reply to हॅपी जर्नी by सहज
हिंदुस्था
मधुबाला
घाश्यानं
In reply to मधुबाला by युयुत्सु
>>>
In reply to घाश्यानं by परिकथेतील राजकुमार
खुपच
परदेशात
+१ सहमत
In reply to परदेशात by अमोल केळकर
+५०
In reply to +१ सहमत by आम्हाघरीधन
+५००
In reply to +५० by टारझन
परदेशस्थ
येताना
+१
In reply to येताना by प्रकाश घाटपांडे
सुंदर लेख.
लेख आणि लेखातल्या भावना आवडल्या. तुमचे स्वागत असो.
आँ? हा लेख कसा काय वाचायचा