मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग.....!

इन्द्र्राज पवार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सध्या सुट्टीचा आनंद घेणे चालू असल्याने संस्थळावर चित्रपटविषयक धागे भरपूर प्रमाणात दिसत आहेत; त्यात ही एक छोटीशी भर. चित्रपट पाहून झाल्यानंतर बरेच दिवस त्याचे कथानक, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातील मधुर गाणी आपल्या मनात रुंजी घालत असतात व ज्यावेळी एकमेकाबरोबर संवाद साधत असताना या बाबीशिवाय अचानक असेही आपण म्हणतो कि, "अर्रे त्याप्रसंगत अमिताभ किती हळवा दाखविला आहे रे, इतके दिवस झाले तरी सिलसिला मधील तो प्रसंग मी विसरू शकत नाही." इ. इ. ~~~ तद्वतच कुणाबरोबर न बोलताही एकांत क्षणी आपण अशा काही प्रसंगाची मनातल्या मनात उजळणी करत (विशेषता रात्रीच्या निवांत समयी....) बसतो व काही काळ का होईना त्या दुनियेत रममाण होऊन दिवसभराचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करतो. हीच बाब मनात ठेऊन हा धागा "चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग" या शीर्षकाने गुंफीत आहे. सुरुवातीस दहा चित्रपट घेतलेले आहेत की ज्यातील त्यासमोर दर्शविलेले प्रसंग त्या त्या वेळी हृदयाला स्पर्शून गेले होते व आजही मनात तसेच टवटवीत आहेत. (हे चित्रपट महान होते की रद्दड होते हा सवाल येथे नाही, तर केवळ त्यातील "एक प्रसंग", इतकाच निवडीचा निकष आहे.) १) स्वदेस >> शाहरुख खान आपल्या गावासाठी तेथील हट्टी तसेच काही मनमिळाऊ, काही शहाणे गावकरी आणि मित्रांच्या सक्रीय मदतीने गावात वीज आणण्याचा प्रयत्न करीत असतो व कित्येक दिवसांच्या प्रयोगानंतर त्या गावात ``वीज` अवतरते. ज्या क्षणी विद्युत प्रवाह जागृत होतो आणि संयंत्राद्वारे सर्वत्र पसरले जातो, त्यावेळी कॅमेरा एका छोट्या झोपडीत गेलेला आहे, आणि तेथील ९० वर्षाच्या आसपास असलेल्या एका म्हाता-या स्त्रीच्या डोळ्यावर केंद्रित होतो. बल्बमधून लख्ख प्रकाश तिच्या चेह-यावर उमटतो आणि ती स्त्री उदागारते ~ "बिजली -------". खरोखर एका शब्दात आशुतोष गोवारीकर यांनी त्या गावाची नस पकडली आहे. हा प्रसंग स्वदेसच्या अन्य कोणत्याही बाबीपेक्षा कायमचा घर करून राहिला आहे. २. मशाल >> दिलीपकुमार यांची चित्रपटातील पत्नी वहिदा रेहमान रात्रीच्या वेळी जखमी अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर पडली आहे, आणि दिलीपकुमार येणा-या जाणा-या मोटारींना थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे, आजूबाजूच्या इमारतीमधील लोकांना ओरडून मदतीची हाक घालीत आहे, पण सगळेजण निव्वळ दगड झाले आहेत, हा बेंबीच्या देठापासून किंकाळ्या मारीत आहे, वहिदा जखमामुळे विव्हळत आहे, आणि याची धावपळ वाया जाते. वहिदा प्राण सोडत असताना दिलीपकुमार यांनी जो अभिनय केला आहे, त्यामुळे हा प्रसंग हेलावून टाकतो. आजही याची जाणीव होते कि हे दोन कलाकार अभिनयाच्या बाबतीत शिखरे होती. ३. प्यासा >> कवी विजय ~ घरातील लोकांनी "निकम्मा" म्हणून टाकून दिलेला बेकार युवक. एक कप चहाला महाग. भुकेने कासावीस म्हणून हा पदवीधर तरुण बिग बझारच्या बाहेर उभारून एका ग्राहकाच्या पिशव्या उचलून त्याच्या मोटारीत ठेवण्याचे हमाली काम करतो. त्याबद्दल शेटजी त्याला एक रुपयाने नाणे देतो. कसाबसा हॉटेल मध्ये गेलेला विजय भात आमटी मागवून (१९५० ला रुपयाला थाळी मिळत असणार !) बकाबका घास गिळत असताना, गल्ल्यावरील मालक त्याला खोचकपणे विचारतो, "अर्रे आजतरी पैसे आणलास काय?" यावर विजय आपल्या हातातील तो बंदा रुपया त्याच्या दिशेने फेकतो. मालक रुपया झेलतो, पाहतो आणि ओरडतो, "अर्रे हा तर खोटा रुपया आहे !!" झटक्यात विजयच्या घशात घास अडकतो व हतबुद्ध होऊन तिथेच थांबतो. हा प्रसंग प्रत्येक बेकार तरुणाच्या मनावर झळझळीत ओरखडा काढणारा आहे. ४. तेरे मेरे सपने >> देव आनंद्पेक्षा विजय आनंदचे म्हणून जे काही चित्रपट गाजलेले आहेत त्यातील 'तेरे मेरे सपने' हा एक. यात शहरात नव्याने वैद्यकीय व्यवसाय सुरु केलेला व झोपडपट्टीत एक छोटाश्या टपरीवजा जागेत दवाखाना उघडलेला देव आनंद. त्याच्याकडे पेशंट नाहीत पण एके दिवशी तेथील एक स्त्री, जी studio मध्ये कलाकारांना मेक अप करण्याचे काम करीत असते, त्याच्याकडे लगबगीने येते (कारण पूर्वी एकदा तिच्या हाताचे डाग याने घालविलेले असतात) आणि गाडीतून studio मध्ये आणते. तिथे प्रसिद्ध नटी "मालतीमाला" (हेमा मालिनी) जोरजोराने रडत असते व स्तुडिओमधिल कुणालाच तिच्या रडण्याचे कारण काळात नसते. 'डॉक्टर आले डॉक्टर आले' असे म्हणत ती स्त्री देव आनंदला हेमा मालीनिजवळ नेते. हा कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण ती अजिबात दाद लाऊ देत नाही. निराश झालेला देव आनंद मागेपुढे बघत नाही व त्या प्रसिद्ध नटीच्या मुस्कटात फाडकन लगावतो. एका क्षणात तिचे रडणे तर थांबते पण सा-या स्तुडिओत सन्नाटा पसरतो. हा एक प्रसंग जो जालीम औषधासारखा मनावर कोरून राहिला आहे. ५. मंडी > शबाना आझमी, स्मिता पाटील, नसीर, आणि अन्य कितीतरी समांतर चित्रपट चळवळीशी संबधित असलेल्या कलाकारांनी जिवंत केलेला चित्रपट. यात गावातील एका मोठ्या व्यापाराचा मुलगा, ज्याला नुकतेच मिसरूड फुटले आहे, तो एका बैठकी दरम्यान स्मिता पाटीलचे गाणे ऐकतो आणि वयाला अनुसरून चक्क तिच्या प्रेमात पडतो. ती तर नायकीनच दाखविली असल्याने "गमतीला बरा" अशा भावनेने त्याला चिडविण्यात मजा अनुभवत असते. मात्र मंडीची मालकीण शबाना आझमी हिला हे संबध बिलकुल पसंद नसतात. एकदा तर स्मिता व तो तरुण घर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असतात, मात्र शबानाला त्याचा सुगावा लागतो. ती सुरुवातीस स्मिताला चांगल्या पद्धतीने समजविण्याचा प्रयत्न करते, पण ती बाधत नाही हे पाहिल्यावर निर्वाणीचे अस्त्र म्हणून तिच्याकडे पाहत म्हणते, "तुला असे वाटत असेल की मी तुझ्या सुखाच्या आड येत आहे, पण वेडे त्याच्याबरोबर तू या जन्मात लग्न करू शकत नाहीस." स्मिता गोंधळून तिच्याकडे पाहते व विचारते, "कारण?", शबाना क्षणभर थांबते व शांतपणे उत्तरते "कारण, कारण तो मुळात तुझा भाऊ आहे, तू देखील त्याच व्यापा-याची मुलगी आहेस." बस्स, स्मिताच्या चेह-यावरील या वेळेचे भाव पुन्हा पुन्हा पाहायला हवेत. ६. बेनाम > एका मोठा कंपनीत चांगल्या पदावर असलेला अमिताभ, त्याची पत्नी मौशुमी व त्यांचा एकुलता एक मुलगा. टिपिकल शांत समाधानी कुटुंब. पण एके दिवशी पार्टीला जात असताना रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या एका शोध पत्रकाराला अमिताभ आपल्या गाडीतून दवाखान्यात काय पोहोचवितो व त्यामुळे त्याच्या आतापर्यंतच्या शांत जीवनात जे वादळ येते त्यामुळे त्याचे विश्व कसे हादरून जाते, त्यावरील हा एक सुंदर चित्रपट. याला धमक्या तर येत असतातच, पण एके दिवशी त्याच्या मुलाचे अपहरण देखील केले जाते. हा हैराण व कोलमडून पडतो, पोलीस इन्स्पेक्टर याचा मित्र बनतो तो याच्या समजूतदार स्वभामुळे. एकदा याच्या सोसायटीत एक भुरटा चोर शिरतो व पोलीस त्याला त्या टोळीशी संबधित म्हणू धरतात व ते आणि अन्य बघे त्या चोराला खूप पिटतातदेखील. पण ज्यावेळी तो अमिताभकडे मदतीच्या अपेक्षेने पाहतो, त्यावेळी याला कळून चुकते कि हा आपल्या मुलाच्या अपहरण करणा-यापैकी बिलकुल नाही व फौजदार मित्राला त्याला सोडून देण्याविषयी सांगतो. फौजदार सहज कुतूहलाने अमिताभला विचारतो, "तुझ्यावर असा प्रसंग आला असतानादेखील तुझ्या मनात त्या चोराविषयी दया कशी आली?" यावर अमिताभ हलक्या आवाजात म्हणतो, "जाऊ दे बिचा-याला, कमीत कमी मला दुवा तर देईल, कुणी सांगावे, त्याच्या दुव्यामुळे माझा मुलगा तरी परत मिळेल." हा खरा बाप ! ७. कलयुग >> शशी कपूर यांचा कमालीचा चित्रपट. महाभारताच्या कथानकावर आधारित. आधुनिक "पांडव" घराण्यातील अर्जुनाचे लग्न. शशी कौरव घराण्याचा "कर्ण" असल्याने याच्यावर आधुनिक पांडवांची खप्पा मर्जी. पण ज्येष्ट लोकांचे व याचे संबध चांगले असल्याने यालाही लग्नाचे रीतसर निमंत्रण मिळाले आहे. मात्र याला लग्न समारंभात पाहून अर्जुनाचा मस्तकशूळ उततो. याच्याकडे एक "द्रौपदी" (रेखा) सोडली तर कुणी बघतही नाही. लग्नासाठी आणलेली भेट देण्यासाठी तो अर्जुनाजवळ जातो तर याच्याशी तो हस्तान्दोलन देखील न करता बेगुमानपणे नूतन पत्नीला पुढे घेऊन अन्य पाहुण्यांशी बोलत राहतो. असा अपमान होऊनदेखील याच्या चेह-यावर कोणत्याही प्रकारची कटुता आलेली दाखविली गेली नाही. मात्र असा प्रसंग कायमचा लक्षात राहिला आहे. ८. मुगले आझम > हा संपूर्ण चित्रपट कायमपणे लक्षात राहण्याच्या योग्यतेचा आहे व गेली ५० वर्षे याने रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले आहे. यातील एक अतिशय काव्यमय प्रणय प्रसंग म्हणजे सलीम व अनारकलीची गावाबाहेरील एक वाड्यात झालेली प्रथम भेट. पडद्यावर दूर कुठूनतरी तानसेन गात असल्याची जाणीव व त्या पार्श्वभूमीवर अनारकलीच्या चेह-यावर सलीमने ते मोरपीस फिरविणे. सर्वसामान्य निरीक्षण, परीक्षक, रसिक या सर्वांच्या मते आजही हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात चांगला प्रणय प्रसंग म्हणून या चित्रपटातील या दृश्याकडे पाहिलं जाते. एका शब्दाचाही उपयोग न करता एखादा प्रसंग कसा जिवंत करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सलीम अनारकलीची भेट, जी कायमपणे लक्षात राहिली आहे. ९. हम दिल दे चुके सनम > या त्यातल्यात्यात अलीकडील चित्रपटाबाबत बरेच काही लिहिले बोलले गेले आहे, जात आहे. हा चित्रपट ऐश्वर्यासाठी खूपच गाजला तसेच संयत हाताळणीमुळेही . पण मला आजही यातील अखेर अखेरच्या सीन मधील तिचा अजयवर एक प्रकारे सूड घेण्याचा प्रयत्न म्हणून ती खात असलेल्या हिरव्या मिरच्या आठवतात. बाप रे ! कोणत्याही भांडण तंट्याशिवाय एक स्त्री एका पुरुषाला "आपणास तू अजिबात आवडत नाही" हे कशा रीतीने सांगेल याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणून हा प्रसंग कायमचा ध्यानात राहिलेला आहे. १०. रंग दे बसंती > आमीर आणि कंपनी यांचा गाजलेला तसेच कलात्मक म्हणूनही नावाजलेला. यात शेवटी आकाशवाणी केंद्रात आमीर व त्याचा मित्र, सैनिकांनी केलेल्या गोळीबारात मरणोन्मुख अवस्थेत फरशीवर पडलेले आहेत, आणि या सर्वांची ती इंग्लंडमधील मैत्रीण त्यांची अवस्था पाहण्यासाठी तिथे आली आहे. आमीर त्या अवस्थेतही आपल्या मित्राकडे पाहून हसतो. मित्र विचारतो, "साल्या मरायला लागल्यास, आणि तिला पाहून हसतोस काय?" यावर आमीर उदगारतो, "अर्रे आता नुकताच हिच्यावर मी प्रेम करायला लागलो होतो, व लग्नही करणार होतो, पण हासू आले ते या बाबीबाबत कि, जर माझे हिच्याशी लग्न झाले असते, तर साल्या, आमची पोरे कशी झाली असती या विचारावर ? काळी कि गोरी ?" व्वा !! किती सहजगत्या हा नट इतके सुरेखरीत्या सादरीकरण करतो. असो. वाचून प्रतिक्रियाही द्या, आणि आपल्याही मनात घर करून राहिलेय चित्रपट प्रसंगाबाबत भरभरून लिहा. धन्यवाद.

वाचने 33245 वाचनखूण प्रतिक्रिया 131

टारझन Sun, 04/18/2010 - 11:53
मस्त रे इंद्रराज ... छाण लेख आहे ... स्वदेस आणि प्यासा चे वर्णन खासंच !!! अजुन येऊ दे भाऊ ... :) -(चित्रपट प्रेमी) फिल्मी टारझन

In reply to by टारझन

धन्यवाद टारझन जी > असे प्रसंग चित्रपट पाहणं-या सर्वांच्याच हृदयात घर करतात. मात्र जेव्हा ते क्षण आपण अशा फोरमवर उघडे करतो त्यावेळी जो आनंद होतो त्याची खुमारी काही वेगळीच असते. मी जरूर आणखीन काही असे क्षण आपणा सर्वांशी चर्चेला आणण्याचा प्रयत्न करीन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

II विकास II Sun, 04/18/2010 - 13:15
मेरे पास माँ है | , कुत्ते, मै तेरा खुन पी जाउगॉ, हे राहीलेच की. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

In reply to by II विकास II

धन्यवाद विकास जी > नक्कीच आपण उल्लेख केलेले दोन्ही जातीचे संवाद All Time Hit आहेत. पण मी अशांचा उल्लेख केला (वा करीन) जे हळुवारपणे मनाला भिडले आहेत. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अरुंधती Sun, 04/18/2010 - 13:36
लेख छान झालाय :-) मला पिक्चर संपल्यावर त्यातील प्रसंग अभावानेच लक्षात राहतात. पण तेच जर पिक्चरोत्तर त्या पिक्चरवर भरपूर काथ्याकूट झाला तर थोडेफार लक्षात राहण्याचे चान्सेस असतात. त्याप्रमाणे मायामेमसाब पिक्चरमधील बरेचसे प्रसंग लक्षात आहेत व त्यांचे दिग्दर्शन, छायाचित्रणही आवडले. पिक्चरमधील सुरुवातीची माया जास्त आवडली. फारुख शेखचे तिच्या वडीलांना तपासायला येणे, त्याचे गोंधळलेपण, तिचा अल्लड मिष्किलपणा व आपल्याच जगात वावरण्याची मस्ती.... छान जुळून आले आहे. ''संसार'' ह्या घिसेपिटे कौटुंबिक चित्रपटातीलही अनेक प्रसंग आजही डोळ्यांसमोर येतात. रेखा व अनुपम खेरच्या समर्थ अभिनयाच्या जोरावर पिक्चर तरला. त्यात रेखाचा पती, राज बब्बर, जेव्हा आपल्या स्वतःच्या गरजा व आपला खर्चच ह्या घरात सर्वात जास्त होता ह्या अनुमानापर्यंत येतो तो प्रसंग, अनुपम खेरची उद्विग्नता व चिडचिडाट, अरुणा इराणीचा घरकामाच्या बाईचा ''लाऊड'' अभिनय, सीमा देवचा संयत अभिनय, शेखर सुमन - शफी इनामदार -अजिंक्य देव - अर्चना जोगळेकर यांच्याही छोट्याशा पण पूरक भूमिका व कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय... या सर्वच गोष्टींनी हा पिक्चर लक्षात राहिला. असे अनेक चित्रपट आहेत, जे कदाचित दर्जेदार नसतील, फार आवडलेही नसतील, पण तरी त्यातील प्रसंग लक्षात आहेत. अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

"..... प्रसंग अभावानेच लक्षात राहतात." हा आपला अनुभव कमीजास्त प्रमाणात सर्वांचाच असतो. पण खरोखरी काही चित्रपट हे काव्य बनून आपल्या हृदयात शिरतात आणि मग त्यांच्याशी एक प्रकारचा आपुलकीचा संवाद सुरु होतो (मी हा अनुभव घेतला आहे, अर्थात मी ज्या ठिकाणी राहतो तो परिसर रहदारीपासून खूप दूर व तलावकाठ शेजारील असल्यामुळे विशेषत: रात्रीच्या वेळी वर उल्लेख केलेल्यापैकी अथवा अन्य हिंदी, इंग्लिश चित्रपटातील असे निवडक प्रसंग साक्षात मूर्त स्वरुपात समोर उभे ठाकतात व नकळत एका अनामिक ओढीने मीही त्यात गुंफला जातो. शेवटचे आपले मत योग्य आहे ~~ चित्रपट दर्जेदार असेल वा नसेल, पण निदान एखादी तरी फ्रेम अशी येते कि जी कायमची सोबती होते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by मॅन्ड्रेक

पाहिला पाहिजे. पण आता अर्थातच डीव्हीडीवरच शक्य आहे. धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मी-सौरभ Mon, 04/19/2010 - 00:12
सरफरोशः आमिर खान आणि मुकेश रुषी एकत्र येतात तो प्रसंग अमर अकबर अन्थनी मधला जखम पुसणारा आनि आरश्याला पट्टी लावणारा अमिताभ सरकारनामा: 'सत्कार करा.....' अजुन खुप आहेत... ----- सौरभ :)

In reply to by मी-सौरभ

होय. सरफरोशमधील तुम्ही लिहिलेला हा प्रसन्ग खूपच प्रभावी आहे. अ अ अ मधिल प्रसन्ग जुन्या "कोहिनूर''ची कॉपी आहे तरीही लक्षात राहतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

स्मृती Mon, 04/19/2010 - 08:01
अगदी खरं आहे. चित्रपटातील काही प्रसंग मनःपटलावर कोरले जातात... असाच एक प्रसंग. चित्रपट 'सागर'. चित्रपटातला प्रेमाचा अपरिहार्य त्रिकोण.. कमल हासन डिम्पलच्या एकतर्फी प्रेमात... ऋषी आणि डिम्पलच्या जन्मजन्मांच्या आणाभाका झालेल्या.. त्यात परत कमल आणि ऋषी जिगरी दोस्त... तर प्रसंग असा की कमल काहीतरी कामात आहे.. एकदम देवदास मूडमध्ये.. आणि ऋषी कुठूनतरी त्याला शोधत येतो.. कधी एकदा मित्राला डिम्पलबद्दल सांगतो असं त्याला झालंय.. तर तो येतो आणि त्याच्या बडबड्या स्वभावानुसार कमलला आपल्या प्रेमाचे, भेटींचे किस्से सांगत सुटतो. या दृश्यात पूर्णवेळ कमलचा क्लोज-अप घेत कॅमेरा फिरतो. त्यात कमल हासनने, दुखा:ने - अपेक्षाभंगाने, पिळवटून जाण्याचे; तरीही संयत असे जे भाव दाखवलेत ते केवळ शब्दातीत! शेवटी सगळं असह्य होऊन त्याचे डोळे लाल लाल होतात आणि भरून येतात... ते लपवण्यासाठी तो पटकन जवळ असलेल्या पिंपातलं पाणी स्वतःच्या चेहऱ्यावर उडवतो आणि ऋषीशी बोलण्यासाठी वळतो... बास, ते डोळे, तो चेहरा, ते पाणी उडवणं... कत्ले आम!!

फारएन्ड Mon, 04/19/2010 - 10:00
अपघातात जखमी पूनम ढिल्लो ला तिच्या घरी अमिताभ सोडतो आणि त्याला धन्यवाद देण्यासाठी हात मिळवल्यावर संजीव कुमार च्या हाताला रक्त लागते आणि मग लक्षात येते की अमिताभच्या हातालाही जखम झालेली आहे आणि रक्त येत आहे. तेव्हा तो म्हणतो "एक मिनीट मुझे लगा मेरा अपना ही खून है" (हा चित्रपट न पाहिलेले कोणी असतील तरः अमिताभ हा संजीव कुमार चा लग्नाआधीच्या संबंधातून झालेला मुलगा असतो) सलीम-जावेद, अमिताभ, संजीव कुमार. आणखी काय पाहिजे? :)

वेताळ Mon, 04/19/2010 - 10:15
शेवटी पडद्यावर दी एन्ड ही अक्षरे उमटलीत व मी झोपेतुन जागा झालो. हा प्रसंग अगदी माझ्या मनावर कोरला गेला आहे. एक सुंदर अनुभव. वेताळ

In reply to by वेताळ

व्वा व्वा.... मान गये उस्ताद !! नेमका असाच अनुभव कित्येकाना विविध चित्रपट पाहताना आला असणार, तर त्याचाही एक नवा धागा होऊ शकेल. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

आशिष सुर्वे Mon, 04/19/2010 - 10:23
'आनंद' चित्रपटाचा शेवटचा प्रसंग.. राजेश खन्नाचे ते पूर्वध्वनीमुद्रित संवाद.. ''ए बाबू मोशाय''.. ते अमिताभचे दचकून वर पाहणे.. राजेशचा तो हसरा चेहरा आणि तो गेलाय हे दिसत असूनही ते स्वीकार न करणारा अमिताभ! 'सिंहासन' चित्रपटाचा शेवटचा प्रसंग.. निळू फुलेंचा तो हतबल चेहरा.. शेवटी वेड्यासारखे हसत सुटणे! मनावर कायम कोरले गेलेले हे प्रसंग!! ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

अप्रतिम आठवणी.... अभिनयाची शिखरं म्हणाल तर गुरूदत्त बद्दल सहमत... दिलिपकुमारबद्दल असहमत. व्यक्तिशः मला तो कलाकार वगैरे म्हणून अजिबात आवडत नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपीन जी ~~ मी मनापासून सांगतो कि आपले दिलीपकुमार यांच्याविषयीचे मत वाचल्यावर केवळ वाईटच नव्हे तर धक्कादेखील बसला. अर्थात अभिनयाच्या बाबतीत वा कलाकारांच्याबाबातीत वैयक्तिक आवडी निवडी असू शकतात किंबहुना असाव्यात, कारण त्याशिवाय चर्चेला वाव मिळत नाही. ("सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो" यात चर्चा करण्यासारखे काय आहे?). मी याच ठिकाणी आपल्या या मतावर दीर्घ उत्तर द्यावे का याचा विचार करीत होतो, पण नंतर लक्षात आले की 'चला यावर एक धागा तयार करता येईल'. (आपली परवानगी असेल तर !!) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

दिलीपकुमारचा 'मुघल-ए-आझम'सोडून एकही पिक्चर पाहिलेला नाही. तोच पहिला पाहिला, आणि ही सुंदर मधुबाला या म्हतार्‍या दगडाच्या प्रेमात का पडली हे कोडं शेवटपर्यंत सुटलं नाही. दगड अभिनय म्हणून नाही, चेहेरा म्हणून! त्यानंतर दिलीपकुमारचा पिक्चर दिसला तर एकतर टी.व्ही. बंद तरी करायचे नाहीतर चॅनलतरी बदलायचे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे राम !!!!! आता काय बोलावे ~~ किंवा काय लिहावे ~~ बाबा, मुक्त सुनीत तुम्हीच या मदतीला, मला एकट्याला हे प्रकरण झेपणार नाही असे वाटते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

टारझन Tue, 04/20/2010 - 17:31
मला एकट्याला हे प्रकरण झेपणार नाही असे वाटते.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ऑप्शन ला टाका प्रकरण ... ;) थ्री इडियट्स मधला एक सिन आहे शेवटी ... चतुर रामलिंगम व्हायरस ने रँचो ला दिलेला पेन घेऊन जातो ;) तेंव्हा माधवन आणि शर्मन ओरडतात .. "आरे तो पेन घेऊण चाल्लाय ... " .. तेंव्हा रँचो ने एक फारंच अर्थ पुर्ण वाक्य म्हंटलेले आहे .. आठवा पाहु कोणते ? " - टारेश धडेशिकवी

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत Mon, 04/19/2010 - 20:37
अभिनयाची शिखरं म्हणाल तर गुरूदत्त बद्दल सहमत... दिलिपकुमारबद्दल असहमत. व्यक्तिशः मला तो कलाकार वगैरे म्हणून अजिबात आवडत नाही. चला या निमित्ताने कार्यकर्त्यांशी पहिल्यांदा असहमत होता आले ! त्यांच्याशी सतत सहमतच असल्याचा मला ज्याम कंटाळा आला होता. ;-) बिपिनराव , होऊन जाऊ द्या एकदाच युसुफखानबद्दल खडाजंगी ;-) कसे म्हणता !

In reply to by मुक्तसुनीत

एम. एस. तुम्हीही दिलीपकुमार (तसेच एकूणच "अभिनय क्षमता" या विषयावर....) बद्दल लिहिण्याचा विचार करा ना.....कि मी लिहू? अर्थात श्री. बिपीन कार्यकर्ते यांची परवानगी असेल तर. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by मुक्तसुनीत

प्रदीप Tue, 04/20/2010 - 10:45
परवानगी वगैरे अगदी शब्दशः नाही घ्यायचे ह्या संदर्भात. दिलीपकुमारबद्दल लेख लिहावयाचा म्हणजे एक लंबी साँस लेना आवश्यक है. उसके बाद मे एक प्रदीर्घ पॉज..... मग इकडे तिकडे पहात प्रस्तावना...... मग लेख.....

In reply to by प्रदीप

दिलीपकुमारबद्दल लेख लिहावयाचा म्हणजे एक लंबी साँस लेना आवश्यक है. उसके बाद मे एक प्रदीर्घ पॉज..... मग इकडे तिकडे पहात प्रस्तावना...... मग लेख..... आणि लेख लिहिताना एक एक ओळ एक एक महिन्यांनंतर ;) (ह. घ्या.) @ मुसु / इन्द्रराज : आता नाही आवडत मला दिलिपकुमार... काय करणार? पण तुम्ही लेख टाका हो... इथे इतके लोक काय वाट्टेल ते लिहित असतात, कैच्याकै धागे टाकत असतात... घेतात कोणाची परवानगी? ;) ... मग तुम्ही दिलिपकुमारबद्दल का होईना पण लिहिणार असाल तर नक्कीच आवडेल. लिहाच तुम्ही... त्यानिमित्ताने दिलिपकुमारचा अभिनय या विषयी कळेल तरी काही तरी... :D बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हो, आणि एखाद्या चित्रपटात त्याचा चेहेरा अगदीच बद्दू म्हतारा दिसत नसेल तर तो चित्रपटही पहाता येईल मला! ;) >> इथे इतके लोक काय वाट्टेल ते लिहित असतात, कैच्याकै धागे टाकत असतात... घेतात कोणाची परवानगी? ... अगदी! इंद्रराज, तुम्ही लिहाच. मुसुंना काय सांगायचं परवानगीबद्दल! ;) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ये हुई ना कुछ बात !! अदिती, बिपीन, टारझन, प्रदीप आणि हो मुक्त सुनीत >> चला एकदाचे हिरवे निशाण मिळाले, आता लिहितोच दिलीपकुमारबद्दल, आणि असे लिहितो कि अदिती ने विचारले पाहिजे "या चित्रपटांच्या डीव्हीडी बाजारात उपलब्ध आहेत ना?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन Tue, 04/20/2010 - 19:43
>>आता नाही आवडत मला दिलिपकुमार... काय करणार? पण तुम्ही लेख टाका हो... इथे इतके लोक काय वाट्टेल ते लिहित असतात, कैच्याकै धागे टाकत असतात... घेतात कोणाची परवानगी? +१ इथे मी ( उगाच वाद वाढवायचा म्हणुन ) बिकांशी सहमत आहे ... दिलिपकुमार हा अत्यंत रटाळ अशा अभिनेत्यांमधला एक होता, उगाच पब्लिकने त्याला का डोक्यावर चढवला ते देव जाणे ! फार्फार तर भारतभुषणपेक्षा किंचित उजवा म्हणता येईल, नाही तर आहे काय त्यात ? त्या काळी बहुतेक जास्त ऑप्शन नव्हते म्हणुन तो भाव खाऊन गेला असेल नायतर काय .... जाऊ देत ! ( हे ही आपले उगाच काड्या टाकायच्या म्हणुन, आता होऊ द्यात सुरु ;) माझे तर स्पष्ट मत असे आहे की म्हणजे दिलिपकुमार म्हणजे आजच्या पिढीतला झायेद खान ( हाण्ण तिच्यामायला ) ) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे Tue, 04/20/2010 - 19:49
सहमत आहे. मला ही कधी आवडला नाही बॉ. त्यापेक्षा आमचा सुनील दत्त परवडला. ;) तो मनोजकुमार ही विनाकारण त्याची श्टाईल मारुन करीयर खराब करुन गेला. (पण मनोजकुमार शॉल्लीड सिरीयस कॉमेडी करायचा हा.)

In reply to by मराठे

मेघवेडा Wed, 04/21/2010 - 01:15
चायला कसला खत्रुड सीन आहे राव!! =)) =)) खतरनाक कॉमेडी!! मरायला ट्येकल्येला अशोककुमार 'कदम कदम बढाये जा' ऐकून बेडवरच कदमताल करू लागतो!! च्यायला!! एकदम जबरा!!!! हहपुवा!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मराठे

जे.पी.मॉर्गन गुरुवार, 05/06/2010 - 14:56
मेलो.. खपलो तिच्यायला !!!! आज बहुतेक नोकरीवरून काढतायत मला !!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by मराठे

चिगो Wed, 10/28/2015 - 12:56
अरारारा.. काय भारी सीन आहे.. आणि काय तो खर्जातला आवाज तोंडझाकू मनोजकुमारचा.. आणि इतक्या सगळ्या 'राष्ट्रीय नेत्यांचे' फटू घरात? कि ऑफीसात झोपलाय अशोककुमार? ;-)

In reply to by छोटा डॉन

मनिष Tue, 04/20/2010 - 22:05
आपल्या सम्द्या दोस्तांशी बाडीस :) दिलिपकुमार म्हणजे आजच्या पिढीतला झायेद खान ---> =))

In reply to by छोटा डॉन

अन्या दातार Sun, 05/23/2010 - 13:32
युसुफ खानपेक्षा अभिनयात व देखणेपणात सरस म्हणजे फक्त आणि फक्त जॉय मुखर्जी. अभिनय एक वेळ बाजूला ठेवू; देखणेपणात जॉय म्हणजे सगळ्यात भारी.....

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रदीप Tue, 04/20/2010 - 20:42
आणि लेख लिहिताना एक एक ओळ एक एक महिन्यांनंतर
तमाम संस्थलावरील 'क्रमशः' लेखकांना त्या त्या संस्थळावरील दलिप-लेखक असे आता म्हटले पाहिजे!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग Tue, 04/20/2010 - 20:44
होऊन जाऊ दे धागा! तिकडेच आतषबाजी करु!! ;) (खुद के साथ बातां : ना! रंगा, निशानेपाकिस्तान के बारे में ऐसे नहीं बोला करते, ना! ;) ) (निशाने'ना''ना')चतुरंग

झुम्बर Mon, 04/19/2010 - 16:07
उम्बरठा मधला सुन्या सुन्या मैफिलित माझ्या गाण्याचा प्रसन्ग ..... स्मिता पाटील च देखण सावळ रुप .... काळ्जाचा ठाव घेणारे डोळे.... अविस्मरणीय....

शुचि Mon, 04/19/2010 - 17:29
मला तरी लहानपणी ज्ञानेश्वरी सिनेमात, ज्ञानेश्वर समाधी घेतात तेव्हा डोळ्यांतून गंगा जमुना लागल्या होत्या. बाकी सिनेमे आठवत नाहीत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

In reply to by शुचि

सिनेमातच का...."ज्ञानेश्वर समाधी" हा विषयच डोळ्यांतून पाणी काढण्यास समर्थ आहे, मग ते लेखन स्वरुपात असु दे अथवा व्याख्यान स्वरुपात ! (तुम्ही म्हणता तो कोणता चित्रपट? "ज्ञानेश्वरी" अशा नावाचा कि दुसराच ?) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

शुचि Mon, 04/19/2010 - 20:18
सॉरी हं मला वाटतं मराठी चित्रपट - संत ज्ञानेश्वर. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

वेताळ Mon, 04/19/2010 - 20:27
अगदी माहेरची साडी बघताना डोळ्यातुन एकीकडे बंगालचा उपसागर व दुसरी कडे अरबी समुद्र खळाळत होता. अप्रतिम सिनेमा आहे .अगदी आवर्जुन पहावा. वेताळ

In reply to by इनोबा म्हणे

मेघवेडा Tue, 04/20/2010 - 03:42
अक्षरशः ड्वाले पानावले !! :) .. सॉरी :( ही द्यायची होती..!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्रशु Mon, 04/19/2010 - 22:23
जुने देवदास पाहिले नाहित, पण नविन देवदास मध्ये, देवदास चंद्र्मुखीला विचासतो, 'ईश्क करती हो मुझसे?' त्यावर ती म्हणते 'यही पुछा होता, सांसे लेती हो चंद्र्मुखी....' हा प्रसंग मला आवडतो.. त्यात माधुरीने सुंदर अभिनय केलाय, डोळ्यांच्या पापण्या वर न करता तीने हा पुर्ण प्रसंग लीलया सादर केलाय...

सुचेल तसं Tue, 04/20/2010 - 03:36
हॅलो ब्रदरः पुंगी म्हणत सलमान जे काही करतो ना ते अगदी मनावर कोरलं गेलं आहे. मेला: चित्रपटातला ट्विंकल खन्नाचा एक एक सीन. आप मुझे अच्छे लगने लगे: अमिशा पटेलचं रडणं, किंचाळणं अगदी नॅचरल वाटतं. धूम, निल आणि निक्की मधील उदय चोप्राची अ‍ॅक्टिंग. यादें: जॅकी श्रॉफचा डान्स, स्टाईल, इत्यादि.

सन्जोप राव Tue, 04/20/2010 - 06:25
प्यासा >> कवी विजय ~ घरातील लोकांनी "निकम्मा" म्हणून टाकून दिलेला बेकार युवक. एक कप चहाला महाग. भुकेने कासावीस म्हणून हा पदवीधर तरुण बिग बझारच्या बाहेर उभारून एका ग्राहकाच्या पिशव्या उचलून त्याच्या मोटारीत ठेवण्याचे हमाली काम करतो. अरे वा! नवीन माहिती. पन्नाशीच्या दशकातही भारतात ऑरगनाईज्ड रीटेल आउटलेटस होती की! कशाला मग ते वॉल मार्टचे कौतुक? किशोर बियाणी, तुस्सी ग्रेट हो! पदुकोणजी, जिवाला त्रास करुन घेऊ नका. सुट्टीचे दिवस आहेत. जीझस काय म्हणाला ते आठवा. 'यांना माफ कर..' वगैरे... सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

In reply to by सन्जोप राव

सुचेल तसं Tue, 04/20/2010 - 06:34
माझ्या मते लेखकानी ते चुकून लिहिलं असावं. पण प्रसंग छान लिहिले आहेत त्यांनी. तुम खुबसुरत चांद देखो, उसमें कितने गढ्ढे है ये क्यों देख रहे हो

In reply to by सुचेल तसं

सन्जोप राव Tue, 04/20/2010 - 06:58
देवळात जाताना चपला काढून ठेवाव्यात, एवढीच अपेक्षा. बाकी जाऊ दिले आहेच. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

In reply to by सन्जोप राव

मिसळभोक्ता Tue, 04/20/2010 - 07:53
देवळात जाताना चपला काढून ठेवाव्यात, मलाही नेमके "बिग बझार"च खटकले होते. बाकी, अभिमान मध्ये शेवटी जया भादुरी रडली, तो शीन आठवून देखील आमच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा डेव्हिडने देखील त्याच्या कारकीर्दीचा कळस गाठला आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अमोल नागपूरकर Tue, 04/20/2010 - 11:01
शोले मधील अमिताभ माउथ ऑर्गन वाजवत असतानना जया भादुरी ग्यआलरित येते तो सीन. इतक्य मारधाड युक्त फिल्म मध्ये इतका हळुवार सीन !!!!!!!!!

अमोल नागपूरकर Tue, 04/20/2010 - 11:11
पिन्जरा मध्ये शेवटचा कोर्टातील सीन. सन्ध्या श्रीराम लागून्चे निर्दोषीत्व सिद्ध करताना तीची वाचा जाते. त्यायोगे त्यान्ना फाशीची शिक्षा होत असली तरि जनमानसातील आदर्श प्रतिम मात्र कायम राहते.

वेताळ Tue, 04/20/2010 - 11:20
त्या पेक्षा अमर अकबर अ‍ॅथनी मध्ये मां निरुपमा च्या डोक्यावर फांदी पडुन डोळे जातात ,तो सीन काळजाला घरे पाडुन जातो. नंतर साईबाबांच्या आरती वेळी ती रस्त्यावर कोलमडुन पडते व तिचे डोळे परत येतात हा सीन तर निव्वळ अप्रतिम आहे. वेताळ

मलाही नेमके "बिग बझार"च खटकले होते. ओ हो !!!! सॉरी, सॉरी ... संजोप राव, सुचेल तसे, आणि मिसळ भोक्ता ~~ तुम्हा सर्वांसाठी खुलासेवजा एकच नोट लिहितो. बिलकुल सही फरमाया आपने ~ मी "बिग बझार" असे म्हणायला (वा लिहायला...) नको होते. पण काल रात्री आपणा सर्वांचे मेसेज वाचल्यावर पुन्हा ती "प्यासा"ची DVD पाहिली. ते दृश्य मुंबईच्या फोर्ट भागात घेतल्याचे जाणवते व तो शेठजी सामानाने भरलेल्या भल्या मोठ्या पिशव्या "त्या" दुकानातून आणीत आहे, घामाघूम झालेला आहे, आणि भुकेला विजय पैशासाठी कासावीस होऊन दुकानाच्या बाजूनेच शेठजीकडून त्या पिशव्या "हमाली" म्हणून आपणाकडे घेतो. आता लिखाणाच्या वेळी मला आजच्या सवयीनुसार फोर्ट मधील त्या मोठ्या दुकानास सहजगत्या "बिग बझार" असे लिहावेसे वाटले. खरय, वास्तविक १९५०-५५ च्या काळात बिग बझार ही संकल्पना अस्तित्वात नव्हती.... किंवा दुस-या नावाने ते स्थळ ओळखले जात असेल. गलती के लिये माफ कर दो भाई लोग ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

प्रदीप Tue, 04/20/2010 - 20:34
ते दृश्य मुंबईच्या फोर्ट भागात घेतल्याचे जाणवते
ते दृश्य तसेच 'प्यासा'चे बरेच चित्रीकरण कलकत्यात झाले आहे. सदर दृश्य मुंबईच्या फोर्टच्या कुठल्याही रस्त्यावरील नाही. जाता जाता, असे वाचून आहे की 'प्यासा'च्या नायकाची भूमिका दिलीपकुमार करणार होता. पण मुहूर्ताच्या शॉटसाठी साहेब आलेच नाहीत (किंवा त्यांच्या डायलॉग-संवयीनुसार अगदी उशिरा आले). तेव्हा ऐनवेळी म्हणे गुरु दत्त स्वतःच त्या भूमिकेत उभा राहिला. कधीकधी अनपेक्षितपणे वाईटातून चांगले घडते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे! दलिपकुमारसकट प्यासाचे काय झाले असते त्याचा विचारही करवत नाही!

In reply to by प्रदीप

सन्जोप राव Tue, 04/20/2010 - 21:57
दलिपकुमारसकट प्यासाचे काय झाले असते त्याचा विचारही करवत नाही! मला करवतो. (खालील उतार्‍यात कणेकरी पुनरावृत्ती झाल्यास क्षमस्व) 'वो शादी के रास्ते चली गयी और मै बरबादी के वास्ते' हे खोलपणे म्हणणारा आणि 'मितवा' अशी तलतच्या आवाजात आर्त हाक घालणारा , रफीच्या भावभीन्या आवाजात 'सुख के सब साथी दुख में न कोय' मधील एकेक भाव चेहर्‍यावर आणणारा, 'आठ बजनेमें अब जादा देर नही है रायसाहब' अशा साध्या वाक्यात जान ओतणारा, 'ऐसे वीराने में इक दिन घुटके मर जायेंगे हम' या शब्दांचे, संगीताचे आणि मुकेशच्या आवाजाचे सोने करणारा, 'तुझे चांद के बहाने देखूं, तू छत पर आजा गोरिये' मधली सगळी नटखट अदा एका क्षणात पेश करणारा, 'चैन कैसा जो पहलू में तूही नही' यातली विरहाची आग अत्यंत सहजपणे चेहर्‍यावर दाखवणारा, ''आयी है मेरे गम पे जवानी' म्हणत परत हातात जाम घेताना एका व्यसनी माणसाचा कुणाला न कळालेला दर्द दाखवणारा 'हम इस खून से आसमां पर इन्किलाब लिख देंगे, क्रांती लिख देंगे' म्हणून मनामनांत शोले चेतवणारा, 'मार डालो उसे, कर डालो उसका खून लेकिन मैं अपने फर्ज से गद्दारी नही करुंगा' असे एकीकडे सुनावणारा तर दुसरीकडे 'हाथ तो गर्म है डाक्टरसाब' असे आर्तपणे म्हणणारा..... असे बरेच काही करणारा 'दलीप' 'प्यासा' मध्ये असता तर काय झाले असते हा विचार मला करवतो. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

In reply to by प्रदीप

बोका-ए-आझम Wed, 12/09/2015 - 11:23
एका संदर्भानुसार - त्याने नुकतंच देवदासचं चित्रीकरण संपवलं होतं आणि त्याला नैराश्याचा त्रास व्हायला लागला होता. पण गुरुदत्तला दुखवायचं नव्हतं म्हणून त्याने चित्रपट सरळसरळ न नाकारता चित्रीकरणासाठी न जाण्याचा मार्ग स्वीकारला. गुरुदत्तने वाट पाहिली आणि शेवटी वैतागून स्वतः मेक-अप केला आणि विजयची भूमिका केली, कारण जर चित्रीकरण रद्द झालं असतं तर स्टुडिओचं भाडं, कलाकारांच्या तारखा, बाह्य चित्रीकरणाचं वेळापत्रक या सगळ्याच गोष्टी कोलमडून पडल्या असत्या. गुरुदत्त असलेली दृश्यं राज खोसलांनी दिग्दर्शित केली. (बहुतेक. चूभूद्याघ्या)

अमोल नागपूरकर Tue, 04/20/2010 - 17:08
गाइड मध्ये 'आज फिर जीने कि तमन्ना है' गाण्याआधीचा प्रसन्ग. (ते गाणे ही खूप सुन्दर आहे.) देव आनन्द वहीदाला घुन्गरू घेउन देतो. ती ते घालून भर बाजारात फिरते. जणू त्या पैन्जणामुळे तीचा लग्नानन्तर घुस्मटलेला श्वास मोकळा झाला असतो.

In reply to by अमोल नागपूरकर

"पैन्जणामुळे तीचा लग्नानन्तर घुस्मटलेला श्वास मोकळा झाला असत...." बिलकुल सही निरीक्षण .... त्यातही रोझी मिश्किलपणे राजूला हुकूम देते "ओ गाईड, चलो हमे शहर दिखाव...!" हा प्रसंगही अप्रतिम ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

संदीप चित्रे Wed, 04/21/2010 - 00:07
संपूर्ण सिनेमा !!!!! सॉरी पण एक प्रसंग सांगायला गेलो की दुसरा म्हणतो, "का रे बाबा, मी तुझं काय घोडं मारलंय? " :) त्यामुळे 'शोले' संपूर्ण !!! ---------- 'अग्निपथ'मधे विक्रम गोखलेचा मुलगा बच्चनचा उल्लेख "वो गुंडा?"असा करतो तेव्हा बच्चनचा चेहरा ! 'अग्निपथ'मधेच 'विजय चौहान की बहिन को उठा के ले गये' म्हणतानाच बच्चन !! ----------- शाहरूख खान मला 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया'मधे(च) जितका आवडलाय तितका बाकी कुठल्यास सिनेमात आवडला नाहीये. 'चक दे...'मधला त्याचा 'सत्तर मिनट' हा सीन आणि शेवटी भारतीय संघ सामना जिंकतो तेव्हा शाहरूखच्या चेहर्‍यावरसे भाव... फँटास्टिक ! --------- 'कौन' सिनेमातल्या शेवटच्या फ्रेममधले उर्मिला मातोंडकरच्या चेहर्‍यावरचे भाव ! -------- 'मृत्युदंड'मधे माधुरीच्या घरात शिरून घमकावणारे मोहन जोशी -------- 'नरम गरम'मधे 'रात को खायेंगे' म्हणणारा ओमप्रकाश --------- 'दिल चाहता है..'मधे 'पीटेगा स्साला' म्हणणारा आमिर ! --------- अजून भरपूर आहेत पण इथेच थांबतो :)

In reply to by संदीप चित्रे

अमोल नागपूरकर Wed, 04/21/2010 - 09:49
शाहरूख खानने फक्त 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया'मधे(च) वेगळी भूमिका केली आहे. इतर सर्व चित्रपटात त्यने डी डी एल जे मधील राहुलच साकारला आहे !!!!!

अमोल नागपूरकर गुरुवार, 05/06/2010 - 12:22
सारान्श चित्रपटातील प्रसन्ग. अनुपम खेरचे विमानतळावर एक पार्सल आलेले असते. तो ते सोडवण्यासाठी जातो. तिथे त्याला लाच मगितली जाते. कस्टम अधिकारी त्याला म्हणतो, " यहा सभी लोग अपना रन्गीन टी वी , वी सी आर लेने आते है." अनुपम उसळून म्हणतो ," आपको पता है, इस पार्सल मे क्यान है? इसमे मेरे मरे हुए बेटेकी अस्थिया है. क्या वो लेने के लिये भी मुझे आप लोगोन्को रिश्वत देनी पडेगी. " अनुपमचा अभिनय खरेच पाहण्यासारखा आहे. सारान्श पिक्चरही ग्रेटच. महेश भट्ट एकेकाळी खूप चान्गला डायरेक्टर होत. अर्थ, सारान्श, नाम, डैडी, दिल है के मानता नही, हम है राही प्यार के असे अविस्मरणीय पिक्चर्स त्याने दिले. मग काय झाले कुणास ठाउक. पण भटसाहेबान्ची गाडी जिस्म, पाप, मर्डर, राज ह्या रुळान्वरून धावू लागली. ह्या नावन्वरून्च अधोगती लक्षात येते !!!!!!!

In reply to by अमोल नागपूरकर

इन्द्र्राज पवार गुरुवार, 05/06/2010 - 14:28
खरंय..... अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा प्रसंग आहे. अनुपम खेर यांच्या प्रदीर्घ वाटचालीतील सारांश हा "माईल स्टोन" आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

कानडाऊ योगेशु गुरुवार, 05/06/2010 - 15:50
खरंय..... अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा प्रसंग आहे. अनुपम खेर यांच्या प्रदीर्घ वाटचालीतील सारांश हा "माईल स्टोन" आहे. सारांश हा अनुपम खेरचा पहिलाच चित्रपट होता. म्हणजे त्याच्या कारकिर्दीची सुरवातच माईल स्टोनने झाली म्हणायची.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

अमोल नागपूरकर गुरुवार, 05/06/2010 - 16:34
हो. आणि मला तरि त्याची हीच भूमिका सर्वश्रेष्ठ वाटते. २८ वर्षान्च्या त्याने ६० वर्षाच्या व्यक्तिची भूमिका अगदी समरसून केली आहे. त्याकरिता त्याला पदार्पणातच वेल डिझर्वड फिल्म्फेअर मिळाले. नन्तर अनुपमने अनेक उत्तम चरित्र भूमिका, विनोदी भूमिका आणि खलनायक (आठवा ,'कर्मा') केल्या. सन्जीव कुमारनन्तर तो हिन्दी सिनेमाला लाभलेला सर्वोत्तम अष्टपैलू अभिनेता असावा. तो एक्दा म्हणाला होता की 'सर्वोत्तम नायिका ही क्याटेगरी सोडून त्याला इतर सर्व श्रेणीन्मध्ये उत्तम अभिनयाचे पुरस्कार मिळाले आहेत. ' दुर्दैवानी त्याच्या वाट्याला आजकाल खूप आचरट भूमिका येतात. आणि त्याहून दुर्दैव म्हणजे तो त्या करतो !!!!

In reply to by अमोल नागपूरकर

इन्द्र्राज पवार गुरुवार, 05/06/2010 - 17:19
".....आणि त्याहून दुर्दैव म्हणजे तो त्या करतो !!!!..." ही खरंतर एका जातीवंत कलाकाराची शोकांतिका ! फारच थोडे कलाकार असे असतील की ज्यांनी आपल्या प्रतिमेला धक्का लाऊ दिला नसेल. (सध्या मला तरी "आमीर खान" मध्ये हा "जर्म" दिसतो..... सिनेमा आणि त्याबाहेरसुध्दा...! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by अमोल नागपूरकर

एस.योगी Wed, 10/28/2015 - 12:07
१. 'आखरी रास्ता' मधील "डेव्हिड" चा वयापेक्षा मोठा अभिनय. २. 'सामना' मधील निळू फुलेंचा प्रवेश - "जगदंब , जगदंब" या वाक्यातून संपूर्ण सिनेमाभर ते हुकुमत गाजवतील याचा अंदाज येतो ...

satish kulkarni गुरुवार, 05/06/2010 - 14:05
2 आखे १२ हाथ- ६ खुन्यापैकि एकाला त्याच्या मुलाला भेटायचे असते तर त्याच्या आइला त्याला.... तो त्याला भेटतो आणि त्याची आइ त्याला... दोघान्च्या चेहर्यावरील भाव पाहुन घ्यावेत नुसते.. शहिद मनोज कुमार च्या शहिद मधील भगतसिन्ह , सुखदेव आणि राजगुरु याना फासावर देतात ते द्रुश्य.... अजुन बरेच आहेत.. शोले सम्पुर्ण... जाने भि दो यारो...

रानी १३ गुरुवार, 05/06/2010 - 16:34
=)).....सगळ्या प्रतिक्रिया भन्नाट..... ह. ह. पु. वा.

रानी १३ गुरुवार, 05/06/2010 - 16:34
=)).....सगळ्या प्रतिक्रिया भन्नाट..... ह. ह. पु. वा.

जे.पी.मॉर्गन गुरुवार, 05/06/2010 - 17:55
शाहरुख मुळातच मठ्ठ असता तर काहीच अडचण नव्हती... पण साल्याला अ‍ॅक्टिंग करता येते आणि तरी साला माती खातो. स्वदेस मधला शाहरुख आईनेमेटे की कुठल्याश्या स्टेशनवर लहान मुलाच्या हातून "पचास पैसेका एक ग्लास" विकत घेतलेलं पाणी पितो तो प्रसंग. तेव्हाचे शाहरुखच्या डोळ्यातले भाव केवळ अप्रतीम ! मला तो प्रसंग बघितल्यावर "गांधी" मध्ये किंग्जले आपल्या अंगावरचा पंचा समोरच्या अर्धनग्न बाईसाठी पाण्यात सोडतो तो प्रसंग आठवला.

In reply to by जे.पी.मॉर्गन

इन्द्र्राज पवार गुरुवार, 05/06/2010 - 19:07
".....मला तो प्रसंग बघितल्यावर "गांधी" मध्ये किंग्जले आपल्या अंगावरचा पंचा समोरच्या अर्धनग्न बाईसाठी पाण्यात सोडतो तो प्रसंग आठवला....." हो ! अगदी हेलावून टाकणारा हा प्रसंग.... एक शब्द नाही... केवळ "गांधीं" ची तो पंचा पाण्यात ढकलणे.... त्या स्त्री ची तो पंचा आपल्या अंगावर घेण्याची घाई. हे द्र्श्य मी पाहिलेल्या चित्रपटात होते; पण आता ज्या ज्या वेळी सदरचा चित्रपट टीव्हीवर (कोणत्याही चॅनेलवर....) पाहिला असता नेमका हा सीन कापला गेला आहे. कारण काय असेल याचा अंदाज येत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

आशिष सुर्वे गुरुवार, 05/06/2010 - 19:55
अजून एक प्रसंग .. मनावर कायम कोरून राहिलेला .. 'रोजा' चित्रपटात जेव्हा अतिरेकी तिरंग्याला जाळण्याचा प्रयत्न करतात.. तेव्हा अरविंद स्वामीचे तिरंग्याला वाचवण्यासाठी हात बांधलेल्या अवस्थेत ते तिरंग्यावर झोकून देणे!! प्रसंग पहाताना चटकन मनात येते.. अर्रे, जर मी त्याजागी असतो, तर मी सुध्दा हेच केले असते!! अजूनही तो प्रसंग पहाताना अंगावर शहारा येतो .. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

मारवा Tue, 10/27/2015 - 19:56
मला पियानीस्ट मधला तो प्रसंग तो ज्यु पियानीस्ट तिथे त्या बेवारस घरात, अनेक दिवसांपासुन एकटाच नाझी सैनिकांपासुन जीव वाचवायला त्या उजाड घरात लपुन बसलेला. तिथे तो उपाशी अनेक दिवसांचा , दाढी वाढलेली, दशा झालेली, सैरभैर , भयभीत कसाबसा जगतोय. बाहेर आवाज होताय बंदुकीच्या गोळ्यांचे, रणगाड्यांचे , सैनिकांचा आवाज येतोय. हा हैराण एकटाच कसाबसा जगतोय तिथे ,हा एकेकाळचा ग्रेट पियानीस्ट सुंदर समृद्ध आयुष्य जगलेलां हा शोधतोय खाण्यासाठी काहीतरी मग तो जर्मन सैनिक येतो अचानक, चौकशी करतो मग एक चान्स देतो त्याला त्या घरात असलेला एक पियानो वाजवायला उत्सुकतेने आणि मग तो पियानीस्ट त्या अवस्थेत पियानोवर बसतो ...... इथे पहा https://vimeo.com/23290368

In reply to by मारवा

भंकस बाबा Tue, 11/10/2015 - 03:48
आधी हा पियानिस्ट फ़क्त बोटे पीयानोवर चालवण्याचा अभिनय करतो. त्या युध्याच्या धामधुमित देखील त्याचे पियानो प्रेम तसुभरहि कमी होत नाही. तो फ़क्त बोटे चालवण्याचा अभिनय करतो कारण पियानोचा आवाज ऐकून त्याची चाहूल लागण्याची शक्यता असते.

या सगळ्यात सदमा चा रेल्वे स्टेशनवरचा शेवटचा सीन,कमल हसन डोक्यावर मडकं घेऊन माकडा सारख्या उड्या मारून रेल्वेत बसलेल्या श्रीदेवीला पूर्वीचं आठवून द्यायचा प्रयत्न करतो,एकदम बेहतरीन सीन