मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कवितेची पाककृती १ : जीवदर्शी आशासूक्ते

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते (सरस्वतीदेवीला व ती नसल्यास तिच्या आईला अर्पण. तुम्ही या दोहोंपैकी कोणी नसल्यास हे तुम्हाला अर्पण नाही.) आयुष्य म्हणजे एक विडा असतो प्रेमाने लाल लाल रंगवायचा असतो आयुष्य म्हणजे एक तिढा असतो फार कठीण, पण तो सोडवायचा असतो अशी कविता करायला कोणाला आवडणार नाही? आपल्या प्रियकराला त्याच त्याच साजणगहिऱ्या हाका नवीन शब्दांनी मारायला कोणाला नाही भावणार? जिवाच्या काहिलीनंतर त्या उकळत्या तेलात एका सुंदर खुसखुशीत कवितेचा मेदूवडा तळता आला तर एखादं चर्चेचं वर्तमानपत्र वाचत, किंवा कलादालनातले निसर्गी फोटो बघत, विडंबनाच्या कुरकुरीत पेपरडोश्याबरोबर, आणि एखाद्या लावणीच्या झणझणीत सांबारात बुडवून तो कोण मिटक्या मारत खाणार नाही? अशी खुमासदार प्लेट जर एखाद्या हाटेलात किंवा घरी मित्रांना सर्व्ह केलीत, तर त्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव का होणार नाही? खूप नवशिके कवी प्रयत्न करतात, पण पदार्थ जमला नाही म्हणून निराश होऊन जातात. त्यात त्यांची काव्याच्या अन्नपूर्णेवर - सरस्वतीवर श्रद्धा नसते, साधना कमी पडते, पूजेची सामग्री कमी पडते असं नसतं. (खबरदार कोणी गैर अर्थ काढला तर!). त्यांना मंत्रांचं ज्ञान नसतं एवढंच. पूर्वी जग सोपं होतं, सुंदर होतं. त्याकाळी हे प्रश्न उद्भवतच नसत. कविताही आय.पी.एल. मधे नाचणाऱ्यांसारखी उठवळ झगझगीत नव्हती. ती साधीभोळी, मराठमोळी होती. आणि ती करण्यासाठी त्या काळी जाती असायची. त्यावर बसले की आपोआप ओव्या सर्वांनाच सुचायच्या. आजकाल नवीन तंत्रज्ञान आलं, त्यात ती जातीही गेली आणि त्या ओव्याही. जातं घेणं, आणि दळत बसणं हे कष्ट आहेत. ते कष्ट टाळण्यासाठी चक्क्या आल्या. गृहस्थाबरोबरच नोकरीला बाहेर पडणाऱ्या गृहिणीला मदत करायला घराघरात फूड प्रोसेसर आले (गृहस्थ अजूनही मदत करत नाहीत ही गोष्ट अलाहिदा). अन्नपदार्थ वाटण्यासाठी (म्हणजे देऊन टाकण्यासाठी किंवा भास होण्यासाठी नव्हे) जसे फूड प्रोसेसर वापरले जातात तसे ज्ञान वाटून त्याचा सहज खाता येईल, पचायला सोपा असा भुगा करण्यासाठी आपण वर्ड प्रोसेसर वापरतो. एकंदरीतच आजकाल संगणकाचा जमाना असल्यामुळे संगणक प्रणालीचा वापर जीवन सुकर करण्यासाठी झालेलं आहे. मग तीच प्रणाली वापरून कविता का करता येऊ नयेत? त्यासाठी रंगबावरं व्हा, उन्मुक्त व्हा, आणि ध्येयवेड्या रूपरेषा शोधत भिरभिरा - हे सगळं झंझट कोणी सांगितलंय? हे तर जातं घेऊन दळत बसण्यापेक्षाही वाईट. म्हणजे आपल्याच विश्वशोधी हुरहुरीपायी काट्यांशी झुंज देऊन निगरगट्ट झालेल्या टाचांखाली एक एक अनुभूतींचा दाणा घेऊन तो चिरडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. कोणी सांगितल्येत एवढे कष्ट? आता वरचे काही शब्द वाचून तुम्हाला वाटलं असेल, वा, घासकडव्यांची भाषा म्हणजे अशी मोरपंखी आहे, अशी मोरपंखी आहे म्हणून सांगू - की अगदी नीलगर्भच. पण खरं सांगतो, सगळेच शब्द आपले असण्याची गरज नसते. शब्दांवर कोणाचीच मालकी नसते. कवितांवर असू शकते, पण त्या तुम्ही तुमच्या फूड प्रोसेसरवर पुरेशा दळून बारीक तुकडे केले की कुठचे कुणाचे हे सांगता येत नाही. अशा मयूरसिंहासनांमधून उखडून काढलेली शब्दरत्नं काजूसारखी अॅपेटायजर म्हणून किंवा पुलावामधे कशी मिसळायची ही आणखीन एक समस्या नवीन कवी-गृहिणी कवी-गृहस्थासमोर असते. साध्या पाकक़ती करण्यासाठी पुस्तकं असतात, मिपावरती व इतर अनेक स्थळांवरती सदरं असतात. पण कवीसाठी मात्र काही नाही. आजकाल सगळं काही ग्लोबल झालेलंय - ग्लोबल वार्मिंग, ग्लोबल मार्केट, ग्लोबल संस्कृती सपाटीकरण वगैरे वगैरे. पण हा कवींचा प्रश्नही ग्लोबलच आहे. तो किमान लोकली तरी सोडवायला हवा. ग्लोबल संपन्नतेमुळे बऱ्याच लोकांची पोटं आता भरलेली असतात. तेव्हा चंद्र बघितल्यावर त्यांनाही कोणाची याद येते, नुसत्या भाकरीचीच नाही. आणि ती याद संव्यक्त (सं आधी लावला की जरा वजन येतं, बाकी काही नाही...पण कवींना असल्या गोष्टी माहीत पाहिजेत) करण्यासाठी कविता करणं ही एक सामायिक, सामाजिक, आणि मूलभूत गरज होऊन ऱ्हायलीया. त्येच्या बाबतीत आपून समद्यांना काईतरी कराया हावंय. (आरारारारारारारा... चुकीच्या बोलीत शिरलो.... आणि त्यात तीन चार ग्रामीण बोलींचं महाराष्ट्रीय एकात्मकीकरण पण झालं. आसो.) तर एकंदरीत काय की ही एक गरज आहे. आणि गरज ही तर शोधाची जननी असते. या जननीनेच आमच्या मनात जन्म दिला (थोड्या पूजेनंतर, अर्थातच) कवितक या प्रणालीचा (अर्थ: कविता करणारा; जसे वाहक - वाहणारा, भोचक - भोच करणारा, करकटक - करकट करणारा इत्यादी). ती मी लोकांना तूर्तास तरी फुकट सादर करत आहे. निदान तिची हलकी आवृत्ती तरी. आता तुम्ही विचाराल, की यामागचे आमचे बिझनेस मॉडेल काय आहे? तर लोकांना आकर्षित करणे व त्यांच्या मनात आमच्या उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण करून कधीतरी ते खिशातनं पैशे बाहेर काढतील अशी आशा करणे. तूर्तास तरी ते मॉडेल गंडलेले आहे असे कोणी म्हणेल. पण मी हे मिसळपाववर सादर करत असल्यामुळे तसे असणारा मी पहिलाच नाही, हे सूज्ञांना कळले असेलच. प्रथम काही मौल्यवान शब्द घ्यावेत. हे मौलिक असले तरी खूप स्वस्तात मिळतात, त्यामुळे ते मुक्त हस्ताने वापरावेत. शिरा करताना त्यात मोजके बेदाणे घालतात कारण बेदाणे महाग असतात व रवा स्वस्त असतो. शब्दांच्या बाबतीत तसं नसतं. त्यामुळे बेदाण्यांचाच शिरा व त्यात थोडासा रवा असे असल्याने काही बिघडत नाही. आम्ही चारोळ्यांचेच बनवलेले श्रीखंड खाल्लेले आहे. असो, तर मौलिक शब्द घ्या. सुरूवात एकानेच करा. जसे : आयुष्य, मैत्री, प्रेम, नातं, अस्तित्व इत्यादी. आयुष्य वापरण्याचा कंटाळा आला असल्यास जीवन किंवा जगणं वापरलं तरी चालेल. या मौलिक शब्दाला आपण क्ष म्हणू नंतर यमक साधणारे काही शब्द घ्यावेत जसे विडा - तिढा - किडा - पिडा - सोडा - ओढा यांना य१, य२ असं म्हणू. घरगुती उपाहारासाठी पाच-सहा पुरतात. पण फारच पिळून जनसामान्यांत मानवतावादी कवी म्हणून मान्यता करून घ्यायची असेल तर किमान दहा वापरावीत. ही शक्यतो नामं असावीत. पण जसजशी तुम्ही प्रगती कराल, तसतशी तुम्हाला क्रियाविशेषणं देखील वापरता येतील. (काही अॅडव्हान्स्ड कवी क्ष आणि य सारखेच वापरतात...पण तो पुढचा धडा) मग प्रत्येक य शब्दाला लागू असणारी क्रियापदं घ्यावीत. उदा. विडा - रंगणे, तिढा - सोडवणे, पिडा - सहन करणे यांना आपण क१, क२, क३ म्हणू त्या प्रत्येक जोडीसाठी एक विशेषण घ्यावं. उदाहरणार्थ विडा - रंगणे - लाल लाल तिडा - सोडवणे - फार कठीण त्याला आपण व१, व२, असं म्हणू आता आपली कविता तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे जुळवावे क्ष ठरवलेला आहे. प्रत्येक य, व, क साठी लिहा ---------क्ष म्हणजे एक य असतं ---------व सारखं ते क करायचं असतं जर (य,व,क संपले हे सत्य) तर (कविता संपली, बाहेर पडा) (सत्य) नसल्यास, एक ओळ रिकामी सोडा पुढचे य, व, क घ्या, "लिहा" वर परत जा. आता सूत्रप्रणालीतले तज्ञ मला या प्रणालीतल्या चुका सांगतील, व अधिक परिणामकारक प्रणाली आहेत हेही सांगतील. विशेषत: "अमुक विधानावर जा" असा प्रयोग जाणते करत नाहीत. त्यांना मी एवढेच म्हणेन की तूर्तास नवख्यांना असल्या तांत्रिक बाबींनी गोंधळवून टाकण्याऐवजी त्या अधिपद्धतीची (अल्गोची - (अल् गोची {कंस सोडवण्यासाठी अक्षय पूर्णपात्रेंना [ते प्रस्तुत हा शब्द फेटीशदुवा> असल्याचेही सांगतात > परिस्थितीत खूप कंस |दुवा| वापरत असतात] बोलवावे} असं वाचू नये)) माहिती सोप्या भाषेत द्यावी यासाठी ते आलेलं आहे. कवितक च्या प्रो आवृत्तीत हे दोष नाहीत. (अगदीच गंडलेलं नाही बरं का आमचं बिझनेस मॉडेल‍!) ही प्रणाली चालवली की खालील कविता तयार होते. आयुष्य म्हणजे एक विडा असतं लाल लाल सारखं ते रंगणं करायचं असतं आता ही वाक्यं अगदी कवितेतलं काही कळत नाही अशा वाचकांनाही भावत नाहीत. सुदैवाने कवितेतलं काही कळत नाही अशा साध्या कवींनासुद्धा ती सुधारता येतात. थोडीशी डागडुजी केली की झालं. असतं च्या ऐवजी असतो, सारखं रंगणं करायचं च्या ऐवजी रंगवणं, रंगवायचा वगैरे केलं की मी मूळ उद्धृत केलेली कविता मिळते. आयुष्य म्हणजे एक विडा असतो प्रेमाने लाल लाल रंगवायचा असतो आयुष्य म्हणजे एक तिढा असतो फार कठीण पण तो सोडवायचा असतो आहे की नाही सोपी? कवितक मध्ये अशा सर्व मौलिक शब्दांच्या याद्या तयार आहेत. सुमारे दोन लाखांवर यमकांच्या बांधलेल्या पुड्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे क्ष निवडायचे, योग्य ती यमकं निवडायची, त्याला सूचित केलेली विशेषणं निवडायची - की एक गरमागरम कविता तयार! वरच्या उदाहरणात मी थोडा अभिनव प्रयोग केला आहे हे सूज्ञांच्या लक्षात आलं असेलच. पहिल्या दोन ओळीत मी दोन वेगवेगळे क्ष - आयुष्य आणि प्रेम वापरले आहेत. आता त्यांची अदलाबदल सहज शक्य आहे. प्रेम म्हणजे एक विडा असतो आयुष्याने लाल लाल रंगवायचा असतो थोडा अधिक उत्साह असलेल्यांसाठी कवितक मधली नवीन तंत्रं सांगतो. द्विरुक्ती, आणि प्रश्निकरण. याने सध्याच्याच शिळ्या पदार्थाला नवीन फोडणी दिली जाते. खाणाऱ्याला तो शिळा आहे हे कळतही नाही. उदाहरणार्थ. तिढ्यापासून आयुष्य म्हणजे एक तिढा असतो तिढा ------------याने एक वेगळंच वजन येतं. आयुष्य म्हणजे एक तिढा असतो का? --------किंवा---- आयुष्य म्हणजे एक तिढाच का असतो? इतका कठीण तो सोडवायचा असतो का?-------किंवा--- इतका कठीण तो सोडवायचाच का असतो? याने सगळ्या कवितेला एक वेगळं व्यक्तिमत्व येतं. किंवा आणखीन एक वेगळी पद्धत म्हणजे यमकी शब्द हे सगळे तुमच्या मौल्यवान शब्दाशी यमक साधणारे ठेवावे. म्हणजे आयुष्य, धनुष्य, मनुष्य वगैरे. त्याला द्विरुक्तीची ट्रीक वापरून मी एकदोन ओळी लिहून दाखवतो आयुष्य म्हणजे आयुष्य म्हणजे धनुष्य असतं... जड असलं तरी ते पेलायचं असतं पण यमक साधणारा शब्द हा स्वतशीच यमक साधतो. तेव्हा जर क्ष = य = मन घेतलं तर आपल्याला खालच्या ओळी मिळतात. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं सगळ्यांचंच ते सेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ईश्वर आणि अल्ला यांचं ते नेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं बहुतेकांचं ते खूप लेम असतं इथे मी पहिल्या ओळीत क्ष आणि य एकच वापरले...आता काही वेळा पहिली ओळ तीच ठेवून धृपद म्हणून वापरता येते, मधल्या ओळी आणखीन कठीण प्रणालीने बनवता येतात. पण ते फार अॅडव्हान्स्ड झालं. त्याआधी प्रथम तुम्ही पावसावर वगैरे कविता लिहून थोडी प्रॅक्टीस करा. सध्याच्या ज्या कविता दिसतात त्यातले बरेच लोक असले प्रयोग करून बघताना दिसतात. कवितकमुळे मानवी कष्ट कमी होतात. लवकरच येणारे आय फोन अॅप तुम्ही घेतले तर तुम्ही मुलीला डे केअरमधून घरी घेऊन येताना रिक्षात बसल्याबसल्या एखादी कविता करू शकाल. मग काय स्वातंत्र्यच स्वातंत्र्य. हे प्रयोग करून करून कंटाळा आलेला आहे (मला तसे फारसे दिसलेले नाहीत, तरीही) त्यांच्यासाठी अधिक क्लिष्ट प्रणाली आहेत. पण त्यांविषयी पुढच्या लेखात. या पाककृतीने हजारो पदार्थ तयार होतात. ते एकाच चवीचे असले तरी दिसायला खूपच वेगळे असल्यामुळे तुम्ही खूप कमी कष्टात सुगरण/बल्लवाचार्य म्हणून मान्यता पावता. हा पदार्थ खूप गोड गोड, खुसखुशीत व हलकाफुलका लागतो. त्यात कोलेस्टरॉल वगैरे हृदयाला त्रास देणारे घटक नसल्याने तो कितीही वेळा खाता येतो. पोटात आगही होत नाही (तसे तिखटजाळ पदार्थ आवडणाऱ्यांसाठी आम्ही लवकरच जळजळीत गजला कशा लिहाव्यात यावर लिहू.) त्यावर "वा: छान गं", "मस्तच गं", "पाणी आलं गं", "सुंदर कल्पना गं", "कसं सुचतं गं", "किती सहज शब्दात सांगितलंय" अशा प्रतिक्रिया हमखास आपल्या आप्त-मित्रांकडून येतात. एकदोन कडवी उद्धृत होणंही येतंच. जर तुम्ही तरुण असाल, व याला चाली लावून लोकांपुढे सादर केले तर तुम्हाला आधुनिक पिढीचा आवाज म्हणून मान्यता मिळते व तुमच्या कविता प्रचंड पॉप्युलर होतात. या लेखमालेतल्या पुढल्या लेखांत आम्ही सदाबहार प्रेमकाव्ये, तू व मी (किंवा तो व ती) चे पद्य संवाद, हिरवीकंच रानओली निसर्गचित्रं या सोप्या पदार्थांची कवितक प्रणालीद्वारे निर्मिती कशी करावी यावर मार्गदर्शन करू. नंतर थोडे कठीण पदार्थ - जहाल गजला, सामाजिक कविता, रूपकात्मत भाष्ये कशी करावी याचाही अभ्यास करू. जमल्यास कुठच्याही कवितेला छप्परतोड प्रतिसाद कसा द्यावा याची प्रणाली सापडते का याचाही शोध घेऊ. त्यानंतरच्या पायऱ्यात प्रतिबिंबांचा जादूटोणा करणे, वगैरेसारखे अधिक क्लिष्ट विषय हाताळू. या प्रत्येकासाठी अधिपद्धती वेगळी असते. ती काय असते हे जाणून घेतले की एकंदरीतच काव्य म्हणजे काय हे समजण्यास मदत होते. निदान तुमचा व तुमचे काव्य वाचणाऱ्यांचा तरी तसा समज होतो. समजणे आणि समज होणे यात तसा फारसा फरक नाहीच शेवटी. मी वाचकांना अशी विनंती करतो की प्रेम हा क्ष घेऊन व तुम्हाला सुचणारे विशिष्ट व्यवसायातले य घ्या. यमकांची अट थोडी ढिली झाली तरी चालेल. तयार होणारी कविता खाली प्रतिसादात डकवा. तुम्हाला किती चांगली कविता होईल याचं आश्चर्य वाटेल. (हिंट इतर क्षची पेरणी अधूनमधून करावी) तर मंडळी, तुमचे स्वत चे क्ष, य, क, व, घ्या आणि क्षणात शस्वी वी व्हा! (आणि कविता डकवा) कवितकची आवृत्ती इथे मिळेल (कदाचित). त्यात सध्या काही कीडे असल्यामुळे तुम्हाला भिंतीवर डोकं आपटल्याचा भास होईल. पण नाहीतर ती प्रणाली हातीच चालवूनसुद्धा कविता करता येतील. मी वापरलेलं मयूरसिंहासन.

वाचने 35372 वाचनखूण प्रतिक्रिया 64

पाकृ आवडली. लगेच बनवायला घेतली. खाली देत आहे. अस्तित्त्व म्हणजे एक राडा असतो नेटाने रोज रोज भोगायचा असतो अस्तित्व म्हणजे एक गाडा असतो फार जड पण ओढायचा असतो

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

धनंजय Wed, 03/03/2010 - 22:47
क्ष : सृजन, लेखन, कविता, गाणे, कलाकार (य, क, व) : (गोल, जोडणे, कडबोळी) (मोल, चुकवणे, पुरते) (बोल, बडवणे, तिरकिटधा) (तोल, सावरणे, थोडक्यात) (रोल, वठवणे, हुबेहूब) शैली : प्रश्नात्मक ओळी - - - सृजन म्हणजे काय मोल असते? पुरते कधीतरी चुकवायचे असते? लेखन म्हणजे काय गोल असतो? कडबोळी साच्याने जोडायचा असतो? कविता म्हणजे काय बोल असतो? उगाच तिरकिटधा बडवायचा असतो? गाणे म्हणजे काय तोल असतो? नाचताना थोडक्यात सावरायचा असतो? कलाकार म्हणजे काय रोल असतो? तात्पुरता हुबेहूब वठवायचा असतो? - - -

In reply to by धनंजय

राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 01:16
गृहपाठ म्हणजे एक खात्मा आहे त्यात या धड्याचा आत्मा आहे पूर्ण मार्क कधीच देत नाहीत म्हणून...

In reply to by धनंजय

अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 01:20
क्ष: स्वातंत्र्य (य, क, व): (आज, उगवणे, प्रकाश) (माज, उतरणे, जमिन) (लाज, वाटणे, विहिर) (खाज, असणे, विकार) (बाज, झोपणे, अंधार) ...... हे सर्व असूनही कविता प्रणालीप्रमाणे बनवता येत नाही. कोणी मदत करू शकेल का?

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 01:35
डागडुजी करताना पादपूरकं बदलावी. प्रश्नांतून उत्तरे शोधावी. स्वातंत्र्य कुठे आहे आज? वगैरे..

In reply to by राजेश घासकडवी

अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 02:38
स्वातंत्र्य कुठे आहे आज? उगवलेल्या वर्तमानास पूसतो परवशतेत का प्रश्नांचा माज? उतरतांना जमिनीस पूसतो पारतंत्र्यात कसली असावी लाज? खचतांना थिजून पूसतो का व्यक्त करण्याची खाज? 'चिरंतन' मुक्त उत्तरतो --------- कृपया प्रयत्नपूर्वक पाडलेल्या वरील ओळींचे गुणांकण करावे.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 03:47
हा प्रयत्न निश्चितच चांगला आहे. पण गहन सामाजिक आशय असलेल्या कविता करण्याची स्थलकालाची मर्यादा तुम्ही ताणता आहात असं वाटतं. मुळात कवितकचा धडा गोड, हलकंफुलकं काव्य कसं करावं हे शिकवणारा आहे. असे तिखटजाळ प्रश्न पुसण्याने अश्रू पुसण्याची पाळी न येवो. तोंड भाजणार नाहीत, पण जिभेला तर्रारी येईल अशा बेताच्या ज्वलंत कविता करण्याचे धडे नंतर येतीलच.

In reply to by राजेश घासकडवी

अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 04:01
हिंटप्रमाणे कशीबशी कविता तयार केली. सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे केल्या. त्यावर असा शेरा. प्रयत्नांसाठी तरी काही गुण दिले जावेत. 'क्ष' चूकलेला दिसतोय. क्ष कसा निवडावा यावर विस्तारपूर्वक मार्गदर्शन करावे.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

Nile गुरुवार, 03/04/2010 - 07:06
कोठुन येते मला कळेना प्रसवता ही कविवर्याला कसे सुचते ते समजेना कॅलफोर्न्याच्या घासकडव्याला लेखे नाही काव्ये नाही काय राहीले डकवायाला? धडे काही कळले नाही काय जाहले प्रसवायाला? खुळ्या मनाचे खुळे बोल हे भोके पडीती पण कवितेला शीघ्र रचना करिती, परि ती दिव्य कसबे कसली त्याला? बालकवींची क्षमा मागुन.

प्रमोद देव Wed, 03/03/2010 - 09:40
छान आहे पदार्थ. खुसखुशीत वाटला हातावर घेऊन नुसताच चाटला ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

टारझन Wed, 03/03/2010 - 09:44
किती दिवस लागले भौ लेख कंप्लिट करायला ? :) हळु हळु वाचून पुर्ण करून प्रतिक्रिया देतो .. अंमळ १३% च वाचलंय ! सुंदर आणि अभ्यासपुर्ण लिहीलंय हो ! -(क्रमश: वाचक) टारेश किबोर्डबडवी

In reply to by टारझन

राजेश घासकडवी Wed, 03/03/2010 - 09:49
खदखदती भावना आणि (इतरांच्या) अस्तित्वाच्या जहरी बोचण्या असतील तर असा लेख चार ते पाच तासात सहज पडून जातो...;) शिवाय, आमच्याकडे "लेखनिक" प्रणालीदेखील आहे, त्याने काम सुकर होतं. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

शुचि गुरुवार, 03/04/2010 - 00:01
इतरांच्या अस्तित्वाच्या जहरी बोचण्या =)) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

दुव्यावरील कवितकाच्या आवृत्तीबरोबर काही होमवर्कही होता. एक प्रश्न पुढीलप्रमाणे: खालील कवितेत गाळलेल्या जागा भरा ती आरशाकडे रिक्त बघते, आवर्तनांच्या वेदनांचे प्रतिबिंब शोधते तोच दिसतो खिन्न -------- --------- -------------- ---------------- हा प्रश्न कसा सोडवावा याबाबत मार्गदर्शन अपेक्षित आहे.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

राजेश घासकडवी Wed, 03/03/2010 - 10:27
तुम्ही खूपच पुढच्या वर्गातले प्रश्न विचारता आहात. आत्ता मी उत्तर देतो, पण वर्गाबरोबर राहा. नाहीतर प्रायव्हेट ट्यूशन लावा. ती आरशाकडे रिक्त बघते, आवर्तनांच्या वेदनांचे प्रतिबिंब शोधते तोच दिसतो खिन्न आनंदी खिन्न नाही दिसत पण गवसले बिंब तृप्तीच्या आचमनांनी भरलेला आरसा ती पाहतो

मुक्तसुनीत Wed, 03/03/2010 - 10:27
ती आरशाकडे रिक्त बघते, आवर्तनांच्या वेदनांचे प्रतिबिंब शोधते तोच दिसतो खिन्न ..... .... क्लिन्नमनोगती मोटारीच्या उध्वस्त धर्मशाळॅतला संध्यासूक्ताच्या यात्रिकाचा काजळमायांकित डोहकाळीम्यातला शीतयुद्धाच्या सदानंदाचा नियतीच्या बैलाचा हरित बिलोरी वेलबुटीवरचा शहनाझी सावित्री दोल्यातला रणांगणी कोसल्यावरच्या राजसी मृद्गंधजातकी सलामी पापडामधला आणि ब्रवाचक नातिचरामी शाळेकडचा ताम्रपट.

In reply to by मुक्तसुनीत

श्री सुनीत, कवितकाची पुढील आवृत्ती तुम्हाला संपादीत करण्याचे निमंत्रण आहे का? 'राजसी मृद्गंधजातकी सलामी पापडामधला' या ओळीत 'मृद्गंधजातकी'च्या जागी 'पद्मासक्त' शब्द योग्य वाटेल का?

In reply to by मुक्तसुनीत

ह्यो बाबा मराठीत का नाय लिवत? असो. आमचे एक (शहीद) मित्र पूर्वी काही क्लिष्ट शरदिन्या लिहायचे त्याची आठवण झाली, पर्र डर्र बर्र! अदिती

In reply to by मुक्तसुनीत

राजेश घासकडवी Wed, 03/03/2010 - 11:02
तुम्ही अनेक वेगवेगळ्या शहांची (मी चार तरी मोजले) मयुरासनं मोडून त्यांची शब्दरत्नं खुबीने मिसळल्याबद्दल तुम्हाला विशेष गुण मिळाले. पण प्रतिबिंबाचा जादूटोणा वापरता न आल्यामुळे, आशयगर्भतेला योग्य किनार लावता आली नाही असंच म्हणावं लागतं. आकारबंध विस्कळीत झाला. तुम्हीदेखील वेगळ्याच वर्गातल्या प्रश्नाचा विचार करत असावात असं वाटलं. खिन्नशी क्लिन्नचे ध्वनिमाधुर्य तुम्ही ठेवलं आहे, आणि दुर्गमतेचं ओझं तुम्हाला पेललं नाही, तरी वाचकाला त्याहूनही पेलणार नाही इतपत भान ठेवलेलं आहे. त्याचीही गुणवाटपात नोंद केलेली आहे.

मुक्तसुनीत Wed, 03/03/2010 - 10:47
मिसळपाववर जाऊन विसोबाला कळवा तो घासोबुवा कडवा आला म्हणून एकीकडं घेऊन कानात सांगा हळू कोणालाबी कळू देऊ नका खेचरांवरती कालच निघाला तांडा एकशे सात Xण्डा (फुल्या भरा !) जनातल्या मनात उतरला "घाशा" त्याची चांगली सेवा झाली पायजे काथ्याकूटी मठात उतरतील बुवा त्यांचे चांगली सेवा झाली पायजे सगळ्या संपादकां आताच सांगून ठेव मंडाळीना सगळ्यां "चांदण्या वाटप " यांना सगळं माफ शिव्याबिव्यांसकट तात्या म्हणतो माझी माणसं आहेत कळता कामा नये अनुस्काला अक्षर नाहीतर लष्कर बोलवील बया विसोबाच्या कानात सांगितलेली गोष्ट ऐकू गेली स्पष्ट अनुस्काला (पुन्हा एकदा कोलटकरांची क्षमा मागून !)

In reply to by मुक्तसुनीत

मुक्तसुनीत Wed, 03/03/2010 - 10:56
पंढरपूरला जाऊन विठोबाला कळवा तो बळवंतबुवा भडवा येतोय म्हणून एकीकडं घेऊन कानात सांगा हळू रख्माईला कळू देऊ नका मुंबईहून कालच निघाला तांडा एकशेसात रांडा संगती आहेत कबीराच्या मठात उतरतील बुवा त्यांची चांगली सेवा झाली पायजे च्यावाल्यांना सगळ्या आत्ताच सांगून ठेव मंडळीना शेव गाठ्या फुकट यांना सगळं फुकट शेव पुरी भाजी विठ्ठल म्हणतो माझी माणसं आहेत कळता कामा नये यातलं रख्माईला अक्षर नाहीतर ती लष्कर बोलवील बया विठोबाच्या कानात सांगिरलेली गोष्ट ऐकू गेली स्पष्ट रख्माईला

In reply to by मुक्तसुनीत

अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 01:01
कवितेच्या वर्गात विडंबन केल्याबद्दल श्री सुनीत यांचा निषेध. त्यांच्या दोन्ही प्रतिसादात वर दिलेल्या प्रणालीचे पालन झालेले नाही. या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मीही या प्रकारामुळे त्रासलो आहे. धागाप्रवर्तकांनी या प्रकाराविरुद्ध मोहीम सुरू करावी. श्री सुनीत यांनी वरच्या वर्गातल्या मुलांसमोर प्रतिभेचे कसब दाखवावे. उगाच आम्हा नवशिक्यांमध्ये न्यूनगंड निर्माण करू नये.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

मुक्तसुनीत गुरुवार, 03/04/2010 - 01:43
अक्षय, कवन कर. घाशा, कवन कर . धना, कवन कर. कवन कवन कवन. हा पहा मुसु आला. त्याला श्री. जोडा. शालजोडीतला हाणा. या बालांनो या रे या शेंबूड पुसुनि सारे या काव्य करा रे काव्य करा वेळ फुकट दवडा खरिचा काम करे , तोचि फसे बरि नाही, वृत्ती अशी ! जालावरती पडीक असा ! सुंदर काव्याची शाळा ! या बालांनो या रे या ....

In reply to by मुक्तसुनीत

राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 02:30
त्याला श्री. जोडा. शालजोडीतला हाणा. एकाच शब्दाने अनेक अर्थ सांगणं ही कला आहे. त्यामुळे ते शिकण्याची कवितक कडून अपेक्षा ठेवू नका.

In reply to by मुक्तसुनीत

अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 02:38
सुरुवातीला मजा आली मग अवघड वाटू लागले. काम करे , तोचि फसे बरि नाही, वृत्ती अशी ! म्हणजे काम केल्यास माणूस फसतो, असे काही सांगायचे आहे का? माणूस फसल्याशिवाय काम करूच शकत नाही, असा एक सर्वमान्य समज आहे. त्यामुळे वरची कविता एकाचवेळी बंडखोर वाटते पण शेवटी मूख्य प्रवाहात येण्याचे आमंत्रण देऊन कविता उपलब्ध चौकटीस मान्यही करते. (रसग्रहणाचीही प्रायवेट ट्युशन चालू असल्याने वरचे लिहिले.)

चिंतातुर जंतू Wed, 03/03/2010 - 11:26
हा पदार्थ खूप गोड गोड, खुसखुशीत व हलकाफुलका लागतो. त्यात कोलेस्टरॉल वगैरे हृदयाला त्रास देणारे घटक नसल्याने तो कितीही वेळा खाता येतो. पोटात आगही होत नाही
पण गोड गोड असल्याने तोंडास मिठी बसते. दीर्घकालीन परिणाम - शाळकरी भावुकतेने लडबडलेले चिकट बाप्ये/पोट्ट्या प्रेमात पडतात. अर्थात आपणही तसेच असाल, तर मग समानशीले व्यसनेषु... - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

नंदू Wed, 03/03/2010 - 11:37
मालिकेची सुरुवात तर छान झाली आहे. बाकी या अशा लेखासाठी ( Content & Quality both) किती माकडं टंकायला (आणि कितीवेळ ) लागतील देवजाणे ? जाता जाता, तुमच्या मयूरसिंहासनाच्या जनाकाचं Decoding केंव्हा करताय? :? नंदू

विसोबा खेचर Wed, 03/03/2010 - 18:24
उच्च दर्जाची साहित्यिक चर्चा..! घासकडवी, मुक्तराव आणि इतर मान्यवरांचे अभिनंदन आणि आभार.. :) --विसोबा.

शुचि Wed, 03/03/2010 - 23:52
>> म्हणजे आपल्याच विश्वशोधी हुरहुरीपायी काट्यांशी झुंज देऊन निगरगट्ट झालेल्या टाचांखाली एक एक अनुभूतींचा दाणा घेऊन तो चिरडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे.>> काय सुंदर ओळ आहे. अहो कविता कविता म्हणतात ती हीच की!! :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मिसळभोक्ता गुरुवार, 03/04/2010 - 01:37
साला हा ग्रासस्टांझाज एक नंबरचा वाय झेड आहे. लय भारी लेख राव ! संदीप खरेची सगळी सीक्रेट्स कळली. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

चतुरंग गुरुवार, 03/04/2010 - 01:55
ह्या ग्रासस्टांझाच्या नीलगर्भ भाषेतला लेख वाचून आता हेमगर्भाची मात्रा उगाळायला घ्यावी की काय ह्या विचाराप्रत आलोय मी! :D (वैद्य)चतुरंग

मुक्तसुनीत गुरुवार, 03/04/2010 - 04:15
ती गेली तेव्हा रिमझिम घन ओथंबोनि झरती घनव्याक्कुळ मीही रडलो नदीलाही सागर भरती वार्‍याने हलविले रान असा वारा हा बेभान नदीलाही पूर मग आले उतरून नभा अन गेले ती नव्हती संध्यामधुरा माझिया व्यथेचि पूर्ति माझिया मृत्युतच होते येते ती आणखी जाते स्वर्गंगेच्या त्या तीरी जांभूळ पिके तरुवरी हा ढोल कुणाचा वाजे अन स्कंधि कुणाचे ओझे (मुसु भावसर्गमी रमता प्रतिभेची पडली लत्ता ! हृदयस्थ वाजती तारा बाळुचे वाजती बारा !) * संपादित : काही यतिभंगांची दुरुस्ती ** येथे "यति" ही वैयाकरणी संज्ञा आहे. तेथील यतिंनी घाबरू नये.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय गुरुवार, 03/04/2010 - 04:42
क्ष, य, क, व पायर्‍या दाखवाव्या. नाहीतर क्रेडिट दिले जाणार नाही. दुसर्‍या वर्गमित्राकडून फक्त आउटपुट घेतल्याचे समजले जाईल. वर्गमित्राकडून आउटपुटसह अल्गोची पूर्ण प्रतही घेण्याची तसदी घेतल्याशिवाय परीक्षार्थ्याला अभ्यासातले गांभीर्य कळले, हे लक्षात येत नाही.

In reply to by धनंजय

राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 05:13
बरं, जे दिलंय ते तर तपासून पाहू.... यमकांचा क्रम वेगवेगळ्या कडव्यांत वेगवेगळा आहे. यावरून प्रणाली नीट वापरली नाही - डागडुजी करताना ताजमहालाला विटा लावल्या हे कळतं. -२ वर्गमित्रांच्या काही मूळ ओळी बदलून न साधलेल्या छंदात बसवण्याचा कवीला नाद दिसतो. त्यामुळे ते कवितेच्या खांद्यावरचे ओझे होते -२ कविता कुणाविषयी आहे हे नीट कळत नाही. मध्येत ती असते, थोडा निसर्ग भटकल्यावर मी येतो, एक ओझंवाला येऊन जातो. आणि शेवटी एकदम मुसु, बाळु, आणि यतीन येतात. भरकटलेली. -२ कवितेचा संदेश एकदम शेवटच्या ओळींत आल्यासारखा वाटतो. मग या दोन वेगवेगळ्या कविता एकत्र करण्याचे प्रयोजन कळत नाही. निदान सर्वांना तरी नाही. -२ हस्ताक्षर सुंदर आहे. +२

In reply to by मुक्तसुनीत

नंदन गुरुवार, 03/04/2010 - 06:10
थोडे वै'चित्र्यं' असले तरी हे कवितक ग्रेसफुल आहे. 'भय इथले संपत नाही' ची मात्र अकारण आठवण झाली ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्तसुनीत गुरुवार, 03/04/2010 - 05:01
क्रेडीटासाठी लढविली खिंड कवतिकि राग ये "वैद्या"च्या चित्ती बैसला रागे तो हट्टी "बाळु"च्या गाण्याची ही रीत जी जी जी जी जी जी परि मुसु नाही डगमगे पेटिला धगें तमा ती नाही "पायर्‍यां"ची स्फूर्तिला नाही क्रेडीटाची इन्स्पिरेशनच्या नावाचा घोळ हो जी जी जी जी जी जी

राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 06:00
मिस्सळपाव... मिसळपाव मिसळपाव, भलतीच चवदार खाण्यास राव उसळ तर्री, कांदा शेव ताटलीमध्ये घालून ठेव कोथिंबिर लिंबू वरतून पिळ आणि ओरपून खाव अरे मिस्सळपाव.... अरे हाटेलीत आले.. हाटेलीत आले चकाट्या पिटाया कवितेची पाकृ शिकून घ्याया विडंबनांचं फुटलं पेव पहिली बिगरी बाजूला ठेव एकदम म्याट्रीक पीएचडी कर अन् मिरवून दाव अरे मिस्सळपाव... अरे प्रोफेसर घास्की प्रोफेसर घास्की चष्मा सावरतात वर्गातल्या कार्ट्यांचे पेपर तपासतात धनंजयाचा गृहपाठ चोख बाकी सर्व आगाऊ लोक प्रायव्हेट ट्यूशन्स सगळ्यांना लाव आणि पैसा कमाव अरे मिस्सळपाव... मुसु आणि बाळू मुसु आणि बाळूची जमली गट्टी कविता पाडायला पेटली भट्टी कोणी हट्टी कोणाची कट्टी स्वातंत्र्याची, पवाड्याची पट्टी वाचनं वाढव ट्यार्पी सुधार आणि बोर्डावर लाव अरे मिस्सळपाव

अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 07:32
प्रस्तुत वर्गचालकाने प्रस्तुत वर्गातल्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून काही शिष्ट आणि थोराड विद्यार्थ्यांना हाताशी धरून विडंबने लिहिण्यास सुरूवात केलेली आहे. प्रस्तुत धाग्यावर होत असलेल्या प्रस्तुत हैदोसाने कासाविस होऊन प्रस्तुत प्रतिसादलेखक मुख्याध्यापकांकडे तक्रार नोंदवण्यासाठी निवेदन तयार करत आहे. कृपया प्रस्तुत विचाराशी सहमत असल्यास प्रस्तुत प्रतिसादलेखकास व्यनिने कळवावे.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 08:35
वरील कवितेला विडंबन म्हटल्याबद्दल आक्षेप. ती मूळ कविता आहे - अग्निरथ छंदातली. जरूर मुख्याध्यापकांकडे तक्रार करावी. अभिजात आणि स्वसिद्ध काव्य विद्यार्थ्यांपुढे ठेवणे हे कवितानिर्मितीविषयक पाठ्यक्रमाला अनुसरूनच आहे.

In reply to by राजेश घासकडवी

अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 03/04/2010 - 09:10
एकतर कवितेचा पहिलाच धडा आहे. त्यात एखादी रचना कविता आहे की विडंबन हे विद्यार्थ्यांनी कसे ओळखावे हे अजुन शिकवलेले नाही. तेव्हा एखाद्या रचनेला विद्यार्थ्याने चुकीची संज्ञा वापरल्यास त्यात काय आक्षेपार्ह आहे? प्रस्तुत वर्गचालकांचा उपरोल्लेखित आक्षेप आक्षेपार्ह आहे.

युयुत्सु गुरुवार, 03/04/2010 - 10:37
गुरुजी, गुरुजी मला एक चारोळी करायची आहे... पण जमतच नाही. काही काही सासर्‍यांची मौज मोठ्ठी न्यारी असते सुने पुढे शेपुट घालून पौरुष यांचे उभेच असते ... ... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 10:54
काही काही सासर्‍यांची मौज मोठ्ठी न्यारी असते सुने पुढे शेपुट घालून पौरुष यांचे उभेच असते माकडापासून माणूस झाला डार्विनचे हे खरे वाटते शेपूट झडली तरीही फार बिघडलेले नसते राजेश

युयुत्सु गुरुवार, 03/04/2010 - 11:08
शेपूट झडली तरीही फार बिघडलेले नसते च्या ऐवजी शेपूट झडली तरीही फार काही नडत नसते चालेल का? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/04/2010 - 20:17
पाककृती उशिरा वाचली. राजेश, ही घे शब्दांची बकेट सहज, हा घे फुलांचा गुच्छ आणि मिसळवपावावर जा जातांना येण्याची नोंद कर आज बुधवार आहे उद्या गुरुवार असेल आणि 'दिलीप' तू पण त्यांच्यात सामील हो आणि येतांना प्रतिसाद लिहून ये वृत्त, यमक मात्रा, कविता,कविता,कविता, मालिनी, भुजंगप्रयात, देवप्रिया, मंदाक्रांता,शिखरिणी मुक्तछंद, मुक्तछंद,मुक्तछंद, वृत्त वृत्त वृत्त वृत्त मात्रा मात्रा मात्रा मात्रा [अरुण कोलटकरांची क्षमा मागून ] -दिलीप बिरुटे

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 03/04/2010 - 22:24
मुंबईच्या लोकल्स लोखंडी असतात.. म्हणुन प्रवासी का एक्मेकाच्या बोकांडी बसतात? नाहि आज सण तरी भोजनात पुरण वरण.. नाहि वाळवंट तरी का बांधता उरण ला धरण समुद्रात मासे खुप छान पोहत होते म्हणुन का रस्तावर कोणी पुस्तके विकत होते? सत्य नारायणाच्या पुजेला घातला घाट जेवायचा? आम्हि पण ठरविला आहे बेत डोहाळ जेवणाचा तुमच्या नातवाच तोंड एकदा आम्हाला पाहु द्या.. अन दुस~या लग्नाचा बार आम्हाला ऊडवु द्या १३ वा झाला तरी अजुन सुतक उतरत नाहि... कितिहि साखर घाला बासुंदी गोड होत नाहि उघडले चपटीचे बुच प्यायला कसा ढस्साढस्सा चमचा भर ईनो पाण्यात कसा फुलला फस्सा फस्सा एक पोरगी नाहि पटत ,म्हणे लग्न करा.. विमान मागन पेट्लय.लवकर आकाशात उडी मारा पायजम्याची नाडी तुटली म्हणुन पायजमा फेकत नाहित टी.व्ही चि ऍटेना तुटली मह्णुन कुणी इस्त्री विकत घेत नाहित