मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हमारा बिज अभियान

अजुन कच्चाच आहे · · जनातलं, मनातलं
“हमारा बिज अभियान” (महाराष्ट्र) कार्यशाळा 2009, पुणे
मध्यंतरी पुणे येथे भरवण्यात आलेल्या “हमारा बिज अभियान”च्या राज्यस्तरीय कार्यशाळेस मला उपस्थीत राहण्याची संधी मिळाली होती. या अभियानाचा मुख्य हेतू “बियाणे” या एका नैसर्गीक संसाधनाच्या खाजगीकरणा विरूद्ध जागृती आणि आंदोलन असे होते. या कार्यशाळेतील चर्चेतून पुढे आलेले काही मुद्दे इथे मांडत आहे. हरीत क्रांतीने धान्याचे उत्पन्न अफाट वाढल्याचे आकडे कायम समोर आल्यामुळे तिच्या तोट्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केल गेल. मात्र हरितक्रांति फक्त काही विशीष्ठ भागापुरतीच, जिथे संसाधनांची उपलब्धता, मुबलक पाणी व कसदार जमीन आहे अशा भागापुरतीच मर्यादीत राहीली, उदा. पंजाब, पश्चिम महाराष्ट्र. हरीत क्रांतीचा पाया म्हणजे संकरीत बियाणे. पण या जातींचे जास्तीचे उत्पादन पदरात पडण्यासाठी पाणी, किटकनाशके व रासायनिक खतांचा अतीरीक्त वापर करणे गरजेचे ठरले. त्यामुळे उत्पादन खर्च तर वाढलाच पण नैसर्गीक संसाधनेही जास्त प्रमाणात संपवली जाऊ लागली. रासायनीक खत, किटकनाशके व पाणी यांच्या अतिरीक्त वापराने झालेले काही तोटे • खत, औषधे, बियाणे यासारखी संसाधने विकत घेणे गरजेचे झाले, शेतीचा उत्पादनखर्च वाढला त्यामुळे कर्जाचे प्रमाण वाढले आणि शेतीचे कंपन्यांवरील अवलंबत्व वाढले. • पाण्याची गरज वाढली. त्याच्या अती वापराने जमीनींचा पोत बिघडला • रासायनीक खताच्या वापराने जमीन नापीक होऊ लागली • दिवसेंदिवस किटकनाशके व रासायनिक खतांचा वापर अगोदरच्या वर्षीपेक्षा जास्त करणे अनिवार्य झाले. उदा. आज पंजाब मध्ये, जिथे भारतातील जमीनीच्या फक्त 1.5% जमीन आहे, तिथे भारताच्या एकूण वापरापैकी 20% किटकनाशके वापरली जात आहेत. • फवारणीचे काम करणाऱ्यांपैकी दरवर्षी 28000 जणांचा मृत्यू विषबाधेमुळे होतो. • सुमारे 450 विषारी घटक प्राणी व वनस्पतींच्या जनुकांमध्ये जाऊन बसले आहेत जे पुढील प्रत्येक पिढीत संक्रमित होणार आहेत. • हरितक्रांतीचे माहेरघर असलेल्या पंजाब प्रांतात दर चार घरांमागे एक कॅन्सर पेशंट आहे त्यामुळे पंजाबला Cancer Capital of India असे म्हणू लागले आहेत. हरित क्रांतीचे तोटे असे अनेक वर्षांनी समोर येऊ लागले असतानाच “दुसऱ्या हरिक्रांतीचा” आवाज येऊ लागला आहे. त्याची पहीली पायरी म्हणून जनुकीय बदल केलेल्या बियाण्याचा (Genetically Modified Seeds) उदो उदो केला जाऊ लागलाय. पण याही वेळेस त्याचे व्यवस्थीत संशोधन होऊन हे तंत्रज्ञान निसर्गास घातक नाही हे ठरण्या आगोदरच त्याचा वापर चालू झाला आहे. ह्या प्रकारात जनुक अभियांत्रीकीच्या सहाय्याने जनुकांच्या पातळीवर DNA मध्ये बदल केले जातात. जनुकबदल पिकाचे एकंदर तिन प्रकार सांगीतले जातात. 1. पिकातील अन्नद्रव्यांमधे फरक केलेले पिक – उदा. गोल्डन राईस: Vit A असलेले भात, प्रोटॅटो: प्रोटीनचे प्रमाण जास्त असलेला बटाटा. 2. अंतर्गत किटकनाशक तयार करणारे पिक – उदा. BT कापूस, BT मका. 3. तणनाशकांचा परीणाम न होणारी पिके – उदा. GM सोयाबीन, GM मका, GM वांगी. असे तिन प्रकार असले तरी पहील्या अतीमहत्वाच्या प्रकारात हे दोन अर्धवट प्रयोग सोडले तर काहीच काम झालेले नाही. या विषयातले सगळे काम मोठ्या कंपन्यांच्या मदतीने, त्यांना फायदा होईल त्याच क्षेत्रात म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारातच झालेले आहे. वरील उदाहरणातील बाजारात आलेल्या या GM पिकां मागोमाग अशा प्रकारची 54 पीके येऊ पहात आहेत. या तंत्रज्ञानाचे फायदेही मोठ्या कंपन्याच जास्त प्रमाणात घेऊ लागल्या. उदा. BT Cotton बियाण्याच्या किमतीतील 60% भाग Monsanto कंपनी रॉयल्टी म्हणून घेते. जनुकबदल पिके ही घातक नसल्याचे व वाढत्या जगाची भुक भागवण्याचे एकमेव साधन असल्याचे नेहमीच सांगीतले जाते पण अनेक तोटे आपल्यासमोर येतच नाहीत. उदा. या पिकांमुळे येणारी ऍलर्जी, जमीनीत मिसळल्यानंतरही कायम राहणारे किटकनाशक प्रोटीन, इ. अशा प्रकारच्या बदलांचा इतर प्राणी-वनस्पतींवरील परीणाम आभ्यासण्यासाठी पुरेसा वेळ न देता हे तंत्रज्ञान चांगलेच असल्याची ग्वाही काही कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनीच नेमलेल्या शास्त्रज्ञांमार्फत देत आहेत. उदा. Frost Resistant Tomato: टोमॅटो जास्त काळ फ्रिजमध्ये रहावा यासाठी अतीथंड पाण्यात राहणाऱ्या एका माश्यामधले जनुक टोमॅटोत घालून हे बियाणे एक यशस्वी प्रयोग म्हणून बाजारातही आणले. मात्र पुनःपरीक्षणाच्यावेळी हे टोमॅटो आतल्या बाजूने सडतात असे लक्षात आले शिवाय प्रयोगातील उंदरांनी ते खाण्याचेही नाकारले आणि शेवटी ती जात बाजारातून मागे घ्यावी लागली. हे बदल परागीभवना मार्फत इतर वनस्पतींमध्ये नैसर्गीकरीत्या पसरू शकतात त्या मुळे जर काही वर्षांनी एखादा गुणधर्म घातक असल्याचे कळले तरी ते बियाणे नष्ट करून प्रश्र्न सुटणार नाही कारण तोपर्यंत हे बदललेले DNA परागीभवनामार्फत कोठे पोहोचलेले असतील ते कळणारच नाही. थोडक्यात हा ‘न परतीचा मार्ग’ आहे. दुसरे म्हणजे उपासमार व कमी उत्पन्नाचा मुद्दा: खरे तर भारतात आजपर्यंत कधीही माणसांच्या गरजेपेक्षा म्हणजेच 2400 Cal / day / Person पेक्षा कमी झालेले नाही. आपल्याकडील उपासमार ही सावकारी व गलथन वितरण व्यवस्था यांच्यामुळे झालेली आहे. इतकेच काय पण बंगालच्या दुष्काळाच्या वेळचेही असे संदर्भ मिळत आहेत की त्यावेळीही सरकारने नेहमीपेक्षा जास्त सारा वसूली केली होती आणि त्या धान्याचा वापर इतरत्र म्हणजे सैन्यासाठी केला होता. उत्पन्नाबद्दल म्हणावे तर आपल्याकडील काही ठिकाणचे उत्पन्नाचे आकडे आश्चर्यचकीत करणारे आहेत. उदा. तंजावूर (तामिळनाडू) मध्ये गेली कित्येक वर्षे संपुर्ण सेंद्रीय पद्धतीत भाताचे उत्पन्न हेक्टरी सुमारे 9 टन इतके घेतात. जनुकबदल केलेल्या पिकाची प्रतीकूल परीस्थीतीशी झगडण्याची ताकद कमी असते. हे पिक घेतलेल्या जमीनीतील सुक्ष्म जीवांची संख्या कमी झाल्याचेही सिद्ध झाले आहे. जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. वरील सर्व मुद्दे लक्षात घेता जनुकबदल पिके धोकादायक असण्याची नुसती शक्यता निर्माण झाली तरी Precautionary principle च्या आधारे या बियाण्यांवर बंदी घातली गेली पाहीजे. या सर्वांवर कडी म्हणजे IPR (Intellectual property rights) मध्ये “बियाणे” सामील केले जात आहे. असे झाल्यास एका नैसर्गीक संसाधनाचे खाजगीकरण होऊन भारतीय शेतीव्यवस्थेचा कणाच मोडण्याची शक्यता निर्माण होईल.

वाचने 6002 वाचनखूण प्रतिक्रिया 11

In reply to by श्रावण मोडक

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.

मदनबाण 20/10/2009 - 23:11
उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चतुरंग 20/10/2009 - 23:12
वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग

चतुरंग 20/10/2009 - 23:38
बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग

सहज 21/10/2009 - 08:56
विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?

महेश हतोळकर 21/10/2009 - 13:43
Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.

वेदश्री 21/10/2009 - 14:07
याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.

आनंद 21/10/2009 - 18:16
गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.