कर्मयोगी! (भाग दुसरा)
कर्मयोगी! (भाग पहिला)
पूर्वसूत्र - गिरगावातले 'हिंद विद्यालय हायस्कूल' जे होते त्याच इमारतीत 'ब्रॅडले नाईट स्कूल' ह्या नावाने रात्रशाळा चालत असे. पुढे नामवंत लेखक, अर्थतज्ञ म्हणून नावारुपाला आलेले कै. गंगाधर गाडगीळ हे त्या शाळेत मला शिक्षक म्हणून लाभले.
------------------------------------
पुढे परीक्षेसाठी मी ई.डी. ससून कापडगिरणीतली नोकरी सोडली आणी व्हिक्टर ससून ह्यांच्या त्यावेळच्या प्रसिद्ध हॅमिल्टन स्टुडिओत नोकरी धरली.
तिथे काम करणारा सगळा स्टाफ यूरोपियन आणि ख्रिश्चन असल्यामुळे मला सापत्न वागणूक मिळे. त्याला कंटाळून वर्षभराने मी कोणालाही न सांगता पुण्याला पळून गेलो. हा गद्धेपंचविशीतलाच प्रकार म्हणायला हवा.
हे होतं १९४६ साल. पुण्याला जाऊन विमानदलामधे भरती झालो. ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळे त्यावेळचं रॉयल एअर फोर्स (RAF). रुजू झाल्याबरोबर मला ट्रेनिंगसाठी ३ महिने जलहळ्ळी, बंगलोरला पाठवले.
तेथे शूटिंग, परेड इत्यादी डिफेन्सचे ट्रेनिंग मिळाले. रायफल शूटिंग, स्टेनगन शूटिंग, ब्राऊनिंग मशीनगन शूटींग असे शिकायला मिळाले. ब्राऊनिंग मशीनगनमधून १ मिनिटात ११५० गोळ्या सुटायच्या.
ट्रेनिंग कोणाला नको असे विचारले असता चार-पाचजणांनी हात वर केले होते त्यात मी एक होतो. आम्हाला ट्रेनिंग नको असे म्हटले तर आम्हालाच त्यांनी ट्रेनिंगला पाठवले!
जलहळ्ळीहून माझी पाठवणी पुढल्या ३ महिन्याच्या ट्रेड ट्रेनिंगसाठी सिकंदराबादला झाली. तिथे एरिअल फोटोग्राफी हा माझ्या आवडीचा ट्रेड मिळाला नाही म्हणून नाईलाजाने एम. टी. सेक्शनमधे मला मोटर ड्रायविंगचे ट्रेनिंग घ्यावं लागलं.
ट्रेनिंगचा कालावधी संपल्यावर माझ्या नेमणुकीबद्दल मला विचारणा झाली तेव्हा मी सांगितले 'कराची' कारण मला सगळ्यांपासून लांब जायचे होते. घरी कळवले देखील नव्हते. ट्रेनिंगच्या वेळी मिळणार्या पगारातून १५ रु. वडिलांना
परस्पर पाठवण्याची व्यवस्था केली, तेव्हा कुठे त्यांना समजले की मी मिलिटरीत जॉइन झालो आणी कराचीला आहे. मोठ्या भावाला त्यांनी लगोलग तसे कळवले आणि मी नीट आहे हे समजताच त्याचा जीव भांड्यात पडला!
कराचीत मला मोठी सिक्स वीलर वॅन टेस्ट ड्राईवला दिली आणि ती नीट चालवता येते आहे असे दिसल्यावर अँब्यूलन्स ड्रायविंगची ड्यूटी मिळाली. कराचीतील क्लिफ्टन ह्या भागात माझे पोस्टिंग होते. त्याला हवाई बंदर असेही म्हणत असत.
तिथे बिल्डींगमधे सगळे एअरमेन रहात असत. तिथून आम्ही ड्यूटीवर जायचो. त्याच सुमारास नेवीचे बंड झाले. कराचीच्या अलीकडे असलेल्या केमारी ह्या भागात मी वॅन घेऊन गेलो असता तिथल्या ऑफिसरने परस्पर मला इमर्जन्सी ड्यूटीवर
येण्यासाठी सांगितले पण मी माझ्या यूनिट ऑफिसरच्या परवानगी शिवाय येऊ शकत नाही असे सांगून त्याचा आदेश धुडकावून तिथून निसटून हेडऑफिसला रिपोर्ट केले. हेड ऑफिसमधे मला सांगितलं की काळजी करु नका.
पण मग त्यानंतर मला तिकडे पाठवले गेले नाही.
१९४७ मधे युद्ध संपलं. आता नवीन सैनिकांची आणी एकूणच सैन्यदलातली इतरही भरती जरुरीची नव्हती. लोकांच्या नेमणूका रद्द होत होत्या. मला वाटायला लागलं की वर्षभर मी इथे येऊन काहीच शिकलो नाही.
नवीन शिकण्यासाठी काय करावं ही चिंता मला सतावू लागली. डेली रुटीन ऑर्डर्स (हे सैन्यात घडणार्या दैनंदिन घडामोडींचे पत्रक असते) माझ्या हातात पडायच्या. त्यातलीच एक जाहिरात वाचनात आली की
महाराष्ट्र आणी कर्नाटक सरकारचा संयुक्त 'ग्रो मोअर फूड प्रकल्प' सुरु होता त्यासाठी अॅग्रिकल्चरल ओवरसिअर हवेत. त्या पोस्टसाठी एक्स सर्विसपर्सनना प्राधान्य होते. ह्या ओवरसिअर ट्रेनिंगसाठी रिलीज होण्याची संधी मला घ्यायची होती.
त्या ट्रेनिंगसाठी सुद्धा बर्याच लोकांचे अर्ज आलेले होते त्यामधून फक्त माझीच निवड झाली! असिस्टंट टु बी.एजी. (बॅचलर ऑफ अॅग्रिकल्चर) ही पोस्ट मिळाली. त्याच्या इंटरव्यूसाठी त्यावेळी कराचीहून व्हाया अहमदाबाद मुंबई आणि
तिथून सोलापूरला आलो. सोलापुरात इंटरव्यू होऊन माझे सिलेक्शन झाले. सोलापूरहून पुन्हा कराचीला येऊन मला रिलीज करण्याचे पत्र घेऊन मी जलहळ्ळीला आलो. एवढा द्राविडी प्राणायाम करुन तिथे गेल्यावर एकदाची रिलीज ऑर्डर
हातात पडली आणि मी मोकळा झालो! सोलापूरला माझे एक वर्ष ट्रेनिंग झाले. ट्रेनिंग दरम्यान मला ४५ रु. महिना स्टायपेंड मिळत असे. ट्रेनिंगनंतर पुन्हा एकदा मुक्काम पोस्ट मुंबई. हे सगळे घडले ते साधारण जून १९४७ च्या सुमारास.
त्यावेळी माझे ओवरसिअरचे काम नोवेंबरात सुरु होईल असे सांगितले होते. मध्यंतरीच्या काळात १५ ऑगस्ट १९४७ ला हिंदुस्थान स्वतंत्र झाला, पुढच्या सगळ्याच गोष्टी अचानक बदलल्या आणी नोकरीच रद्द झाली!
आता पुन्हा काय करायचे हा प्रश्न दत्त म्हणून उभा! 'हॅमिल्टन स्टुडिओत' करायचो तेच फोटोग्राफीचं पूर्वीचंच काम का सुरु करू नये असं वाटू लागलं.
"तुम्हाला मुळात फोटोग्राफीची आवड कशी निर्माण झाली?" असे विचारताच आजोबा म्हणाले, "ती एक गंमतच आहे. गुहागरात आमचे वडील 'खोत' असल्याने वडिलांकडे गावाबाहेरची कामकरी माणसे येत. एके दिवशी त्यातला एक माणूस
वाड्याच्या दारापाशी बसलेला असताना त्याचे हुबेहूब रेखाचित्र मी काढले. ते पाहून वडील म्हणाले की अरे तू चित्रे छान काढतोस तुला फोटोग्राफर करायला हवे! तसा लहान असताना मी शाळेतही कवितांना, गाण्यांना चाली लावत असे.
एकूण कलेच्या माध्यमाकडे ओढा फार. पुस्तकी शिक्षणात जेमतेमच पास होई. असो."
स्वातंत्र्यानंतरच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टी बाळसं धरु लागली होती, त्यामुळे ह्यावेळी नुसती फोटोग्राफी न करता सिनेमांसाठी स्टिल फोटोग्राफी करावी असं मनानं घेतलं. टाईम्समधे स्टुडिओ 'शांग्रीलाची' जाहिरात आली होती.
डार्करुममन आणि फोटोग्राफर अशी पोस्ट होती. लगोलग 'शांग्रीला' फोटोस्टुडिओत जाऊन पोचलो. डार्करुम टेस्ट झाली सिलेक्ट झालो. पुढली चार वर्षे मी तिथे काम केले. काही काळाने 'शांग्रीला'चे मालक छोटूभाई गज्जर ह्यांनी ताडदेवच्या
त्यांच्या 'सेंट्र्ल' फोटो स्टुडिओत मला काम दिले. त्याचवेळी १९५१-५२ च्या सुमारास 'फिल्मकार लिमिटेड'ने काढलेल्या दीदार, छोटी भाभी, घुंगरु, शिकवा ह्या सिनेमांच्या स्टिल फोटोग्राफीचं काम आमच्या स्टुडिओने घेतले होते.
ह्या चार चित्रपटांपैकी 'दीदार' आणी 'छोटी भाभी' ह्यांची स्टिल फोटोग्राफी मी केली. हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झालेही. उरलेल्या दोनपैकी 'घुंगरु' सिनेमा बनला पण तो रिलीज झाला नाही आणि 'शिकवा' रद्दच झाला.
ती कामे संपताच छोटूभाईंनी तिथून मला लोकल स्टुडिओमधे काम दिले. तिथे नेहेमीचे साधे फोटो, ग्रुप फोटो काढण्याचे काम असे. मला ते काम कंटाळवाणे वाटू लागले. ते मी सोडले. माझी नोकरी पुन्हा सुटली पण ह्यावेळी मी एकटा नव्हतो,
मध्यंतरीच्या काळात माझं लग्न झालं होतं त्यामुळे पत्नीची जबाबदारीही होती. पुन्हा प्रश्नचिन्ह होतेच."
"तुमच्या लग्नाची हकीगत ऐकवा ना, तीही नक्कीच इंटरेस्टिंग असणार!" असे म्हणताच आजोबा हसले आणि सांगू लागले,
"त्याचं असं झालं, कोकणात रहाणार्या माझ्या धाकट्या भावाचे लग्न जमणं अवघड म्हणून वडिलांनी त्याचे लग्न जमवायचे ठरवले आणि तुझे तू लग्नाचे बघ असे मला सांगितले. आज ऐकायला थोडं विचित्र वाटतं पण त्यांचंही बरोबरच होतं
एका ठिकाणी पक्की नोकरी नसलेल्या आणी फारसं शिक्षणंही नसलेल्या माझ्याशी लग्नाला तयार होणार कोण हा मोठा प्रश्नच होता. एक दिवस प्रवासात दाते नावाचे गृहस्थ भेटले. त्यांनी चौकशी केली, म्हणाले की 'तू लग्नाचा दिसतोस, काय विचार आहे?'
मी सांगितले की कायमस्वरूपी नोकरी वगैरे नाही तर लग्न कसे करु? ते म्हणाले माझ्याकडे चांगले श्रीमंताच्या मुलीचे स्थळ आहे. बघायला काय हरकत आहे? हो ना करता करता मी बरं म्हणालो.
मांगलवाडी मधे 'कृष्णनिवास' येथे ज्या मोठ्या भावाच्या घरी मी रहात होतो तिथेच बघण्याचा कार्यक्रम झाला. गुहागरच्या ताम्हनमळ्यातले सावकार वामनराव गोखले ह्यांची पाचवी यत्ता शिकलेली कु. मैनाबाई गोखले ही वडिलांबरोबर आली.
आमची पसंती झाली. म्हणजे मला ती पसंत नसण्याचे कारणच नव्हते. त्यांनीच माझ्यासारख्या अस्थिर माणसाला पसंत कसे केले असे मी वामनरावांना विचारले. त्यावेळी ते म्हणाले की "तुला भाऊ आहेत. तू धट्टाकट्टा आहेस.
मुलीला सांभाळू शकशील ह्यात शंका नाही." हा त्यांचा त्यावेळचा दृष्टिकोन होता. लग्नाच्या बैठकीसाठी आम्ही आमचे मामा श्री. मधुकरराव वैद्य यांच्याकडे आंग्रेवाडीला गेलो. बोलणी झाली. वामनरावांनी तुमची अपेक्षा काय आहे असं विचारलं?
मामा म्हणाले, "आमची काहीही अपेक्षा नाही. लग्न करुन द्या, मुलीला काय सोनेनाणे घालाल ती तुमची मर्जी." मग माझा ठाम विचार मी त्यांना सांगितला की, "मी कोणापुढेही हात पसरणार नाही, माहेरहून माझ्या पत्नीने काहीही आणायचे नाही,
परिस्थिती असेल तसे रहायचे, दु:ख करीत बसायचे नाही, हे मान्य असेल तरच लग्न करु." सर्व अटी मान्य होऊन २५ मे १९५२ ला आमचा विवाह मामांचे परिचित श्री. घारपुरे वकील ह्यांच्या घरीच झाला.
कु. मैनाबाई वामनराव गोखले ही सौ. सरला सच्चिदानंद सावरकर बनून आयुष्यात आली. रहाण्याच्या जागेचा प्रश्न बिकट असल्याने सौ.ला लगोलग ताम्हनमळ्याला माहेरी परत पाठवणे भाग पडले.
चतुरंग
वाचने
5767
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
वाचतोय. पुढचे भाग लवकर येउ देत.
In reply to वाचतोय by सहज
हेच बोल्तो.
--अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
हा भागही छान
वाचतोय.. येऊ द्या
(रंगराव गप्पा मारताना देखील रेकॉर्ड करून ठेवतात / टिपणं घेऊन ठेवतात की काय? ;) कीती तपशीलवार दिलंय!)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
In reply to मस्त by ऋषिकेश
रंगराव गप्पा मारताना देखील रेकॉर्ड करून ठेवतात / टिपणं घेऊन ठेवतात की काय? कीती तपशीलवार दिलंय!
ऋषिकेशी सहमत **************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
वाचतेय, सह्ही आहे! पुढचे भाग लवकर येउ देत.
पुढचा भाग लवकर येउ देत... :)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
दिपाली :)
येउदेत...
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पुढचे येऊ देत लवकर..
स्वाती
थक्क करणारा प्रवास आहे.. !
पुढचा भाग लवकर येऊद्या. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to थक्क by प्राजु
थक्क करणारा प्रवास आहे. नुसताच विविध ठिकाणांचा नाही तर कामासंदर्भात पण!
In reply to असेच वाटले... by विकास
थक्क करणारा प्रवास आहे. नुसताच विविध ठिकाणांचा नाही तर कामासंदर्भात पण!
+१
नाट्यमय प्रवास आहे त्यांचा! कमाल आहे आजोबांची :)
--शाल्मली.
ग्रेट आहेत हे आजोबा.
वाचतोय