मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे .... भाग-२

छोटा डॉन · · काथ्याकूट
पहिल्या भागाचे प्रतिसाद ८० च्या आसपास गेल्याने व ते आता वाचण्यास अवघड पदत आहे ही सत्य परिस्थीती असल्याने "भाग-२" सुरु करणे अपरिहार्य झाले आहे. बर्‍याच जणांचा सुर ही चर्चा महत्वाची आहे असा आहे व ह्या चर्चेत अनेक मतमतांतरे येत आहेत ... सुरवातीच्या भागात ड्रुपलच्या मर्यादेमुळे दुसर्‍या पानावर गेलेले प्रतिसाद वाचणे व त्याचा ट्रॅक ठेवणे अवघड जात आहे ... म्हणुन हा दुसर्‍या भागाचा प्रपंच ... पहिला भाग आपल्याला संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे .... इथे वाचता येईल ... आता चर्चेला वळण यावे म्हणुन मी काही प्रतिसादातले काही मुद्दे इथे फक्त कॉपी-पेस्ट करत आहे ... चर्चेसाठी ह्याचा उपयोग झाला तर उत्तमच आहे :) मेघना म्हणते : ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात. माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली. श्रावण मोडक म्हणतात : धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता यांचा विचार कशाला करायचा? या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवूया असे का म्हणतो? कारण, या साऱ्या चर्चेत कुठं तरी धर्म, परमेश्वर, नियती या तिन्ही गोष्टी अपौरूषेय ठरतात. त्या तिन्ही गोष्टी अपौरुषेय नाहीत, अशी धारणा झाली तर बरेच अवकाश खुले होते विचार करण्यासाठी. कारण या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही. एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो. घाटपांडेकाका म्हणतात : अश्रद्धेच्या अतिरेकापेक्षा माणुस महत्वाचा म्हणुन मी जातो. माणसे जोडायला वेळ लागतो पण तोडायला वेळ लागत नाही. भोचक म्हणतात : माझा देवावर विश्वास, श्रद्धा होती का हा मलाही पडलेला प्रश्नच. पण देवावरचा विश्वास उडण्याऐवजी त्याच्यावर श्रद्धा का ठेवायची याची कारणं शोधण्याचा प्रयत्न याच काळात सुरू झाला. या शोधातच मुळ विश्वासच डळमळीत झाला. मी तेव्हा नास्तिक होतो का? हा मलाही आज प्रश्न पडतो. नास्तिकतेच्या जवळ कुठेतरी होतो, असं वाटतं, पण आस्तिक्यपण पूर्ण सुटलं होतं, असंही नाही. केली ती साधी. सत्यनारायणाची. त्या पुजेवरही विश्वास होता असं नाही. कारण जहाजाच्या बिनडोक कथेवर काय विश्वास ठेवणार? पण पु्न्हा तीच भूमिका घरावर काही एक संस्कार व्हायला पाहिजे, म्हणून चार गोष्टी व्हाव्यात. पण मी नास्तिक आहे का? की आस्तिक हा मलाही पडलेला प्रश्न. मधल्या काळात नास्तिकपणाच्या टोकाला गेलेला मी आता तिथून थोडा वळालो. विरोध कोणताच करत नाही, पण स्वतःहून कोणतीही धार्मिक गोष्ट करण्याकडे कल नसतो. त्यामुळे कुणाच्या चुकीच्या पद्धतीलाही विरोधही फारसा करत नाही. याचा अर्थ धार्मिक अकर्मता अंगी बाणलीय असंही नव्हे. पण बिनडोक न पटणार्‍या प्रथा, परंपरा नाही पाळायच्या हे मात्र ठरवलंय. ऐकणारं कुणी असेल तर त्यामागची भूमिका समजावूनही सांगतो. पण त्याला पटावीच हा आग्रह नसतो. तावातावाने भांडण्याची हौसही आता जिरलीय. त्यामुळे स्वतःपुरतं जे चांगलं वाटलं ते करतो. जेथे चांगलं वाटतं,(भलेही ते मंदिर असो वा मशीद) त्यावेळी तिथं जातो. मन प्रसन्न करणारं ऐकावसं वाटलं तर ऐकतो. शंकराचार्यांच्या ओम पूर्णमिदं ची अध्यात्मिक अनुभूती छान वाटते. अथर्वशीर्षाची वर्णनं मी सृष्टीला लावतो. (या अर्थाने देवाच्या जागी मी निसर्ग रिप्लेस केलाय, असं म्हणता येईल.) बाकी मी आस्तिक-नास्तिक, धार्मिक की अध्यात्मिक हा मलाही पडलेला गुंता आहेच. ही गुंतवळ सुटत नाही नि सोडवतही नाही. खराटाशेठ म्हणतात : नास्तिकपणा किंवा अधार्मिकपणाचे अनेक पैलू आहेत. एक पैलू धर्म आंणि कर्मकांडे यांना विरोध या अंगाने जाणारा असतो. या पैलूत आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बसू शकतात. म्हणजे देव आहे असे मनातून वाटणारे पण तो या दगडाच्या किंवा इतर मूर्तीत आणि कर्मकांडात नाही असे वाटणारे आस्तिकही यात येतात. काही जण आस्तिक पण असतात आणि कर्मकांडांना ही हरकत नसते. पण या कर्मकांडांना पॉझिटिव्ह वळण द्यावे असे वाटणारे आणि तसा प्रयत्न करणारे असतात. वर कोणीतरी आश्रमाला दान देण्याविषयी लिहिले आहे. काही जण खरोखरच नास्तिक म्हणजे देव नाहीच अशा मताचे असतात. बहुधा 'माझा नास्तिकपणा या समोरच्या व्यक्तीला दु:ख देण्याइतका महत्त्वाचा आहे का?' हा दृष्टीकोन असतो. देव या संकल्पनेचा काहीही अर्थ सांगितला तरी 'विश्वातील घटनांचे नियंत्रण करणारा आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम हव्या तशा प्रकारे घडवू/बदलू शकणारा' हा अर्थ देवाच्या संकल्पनेपासून कधीही दूर करता येण्यातला नाही. कारण हा अर्थ काढून टाकला तर देव असला काय आणि नसला काय? बहुतेक आस्तिकांनाही अशा देवाचे माहात्म्य वाटणार नाही. तर वरील प्रकारची क्षमता बाळगणारी कोणतीही शक्ती या विश्वात नाही असे मी मानतो. पुण्याचे पेशवे म्हणतात : डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा नियम सर्वत्र लागू आहे असे मला वाटते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या आहेत त्या या उत्क्रांतीचे टप्पे पार करत आल्या आहेत असे मला वाटते. स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. एखादी धार्मिक गोष्ट मला पटली नाही तरी मी ती पाळतो. त्यावर जास्तीत जास्त विचार करून ती का करावे असे म्हटले असेल याचा शोध घेतो. केवळ कोणीतरी लिहीले सांगितले म्हणून माझ्या संस्कृतीत सांगितलेली एखादी गोष्ट मी टाकाऊ मानत नाही. तसेच जी जी संतचरित्रे मी आजवर वाचली त्यात त्या त्या संतानी परमेश्वराची भक्ती, नामस्मरण, उपासना श्रेष्ठ हेच सांगितले आहे. आणि तेवढे कारण मला''देव' मानायला पुरेसे आहे. भाग्यश्री म्हणते : मी जरा श्रद्धाळू आहे! पण त्यासाठी रोज देवळात गेलेच पाहीजे, देवाचे नाव घेतलेच पाहीजे, पन्नासदा येताजाता नमस्कार केला पाहीजे असं मला मुळीच वाटत नाही.. कुठल्याही मूर्तीसमोर गेल्यास मला केवळ शांत शांत वाटते! पण म्हणुन मी दिवसातून हजारवेळा नाही जात.. देवपूजा करताना, संस्कृत श्लोक, आरत्या, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणायला मला फार आवडते. पण एखाद दिवस नाही झाले यातले काही तरी बिघडत नाही.. मला असं वाटतं, आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीशी आपण कसे वागू तसं काहीसं माझं देवाबरोबर होते.. रोजचा कॉन्टॅक्ट नसला तरी काही बिघडत नाही.. पण कधीतरी तिथे जाऊन मन मोकळे केले, शांत केले की बरे वाटते. नंदन म्हणतो : आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे मान्य करण्यास खर्‍या विज्ञानवाद्याला अडचण नसावी. पण या अज्ञाताच्या नावाखाली धर्माच्या नावावर खपवल्या जाणार्‍या अनेक गोष्टींमुळे प्रतिक्रियात्मक म्हणून एक जवळजवळ तितकीच कट्टर मनोवृत्ती तयार होऊ शकते. या पार्श्वभूमीवर श्रावण यांनी स्पष्ट केलेली भूमिका संतुलित वाटते. लिखा़ळ म्हणतात : काळजीपूर्वक आपली मते तपासत राहणे हे चांगलेच असते. मते बदलतसुद्धा असतात. बदलाचे एकदा जसे स्वागत होते तसे पुन्हा सुद्धा व्हावे. तेव्हा संकोच होऊ न द्यावा. मॄदुला म्हणतात : कोणाच्या श्रद्धाविषयाच्या आड मी येत नाही आणि माझ्या मतांच्या आड कोणाच्या श्रद्धा येऊ देत नाही. पण अश्या विषयात, एकदा एका दिशेने चालू पडल्यावर परतीची वाट नाही. कदाचित, सश्रद्धांचेही असेच होत असावे. जसे मला लोकांना देव आहे हे पटतेच कसे याचे मनोमन आश्चर्य वाटते, तसे त्यांना देव नाही वाटणारे लोक नीट विचार करत कसा नाहीत याचे आश्चर्य वाटत असावे. यशोधरा म्हणते : संस्कारित मन आणि आस्तिक वा नास्तिक वृत्ती ह्या सर्वस्वी भिन्न संकल्पना नाहीत का? एखाद्या व्यक्तीचे संस्कारित असणे आणि आस्तिक वा नास्तिक असणे ह्याचा परस्पराशी काय संबंध? माझ्या मते, संस्कार ही सातत्याने घडत राहणारी एक प्रक्रिया आहे. ती काही दहा- पंधरा मिनिटांत वा दिवसांत करता येणार नाही, किंवा नुसती स्तोत्रे वगैरे पाठ करुनही ती होणार नाही. केवळ उपचार म्हणून देवाची पूजा करणे म्हणजे संस्कार नव्हेत. ह्या अश्या गोष्टींना संस्कार कसे समजता येईल? देवाचे स्तोत्र आहे म्हणजे ते केवळ उपचार म्हणून म्हणायचे असे का? त्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न केला तर कुठे बिघडते? हे स्तोत्र लिहिण्यामागे लिहिणार्‍याने काय विचार केला असेल, असे कधी वाटत नाही का? माझ्या मते, साध्या सरळ शब्दांत संस्कार म्हणजे एखाद्याची वागायची पद्धत आणि (त्या व्यक्तीची) सत् विचारशक्ती ह्यांमधली सूसूत्रता. जेह्वा सत् विचारशक्तीवर असत् विचारशक्ती मात करते तेह्वा ते कुसंस्कार ठरतात. एकूणच संस्काराची प्रक्रिया सूक्ष्म आणि तरल असणार. जी व्यक्ती स्वतःचे स्वातंत्र्य जपताना, इतरांबद्द्ल आदर जपू शकते, ती संस्कारितच आहे, भले मग तिची वृत्ती आस्तिक असो वा नास्तिक. .... धर्म आणि रुढी एकमेकांपासून अतिशय भिन्न अशा संकल्पना आहेत. धर्मामध्ये एक विशिष्ट तत्वज्ञान सांगितलेले असते, जगण्याची, वागण्याची विशिष्ट अशी प्रणाली सांगितलेली असते. आपल्या मूळ रुपात कोणताही धर्म खूप व्यापक आणि सहिष्णू असतो. मुळात हिंदू धर्म हा "धार्मिकता" ह्या अर्थी धर्म नव्हे. ती एक जीवन प्रणाली आहे. ह्यात प्रत्येक मताला स्थान आहे. आस्तिकता, नास्तिकता, सगुण, निर्गुण, निरीश्वरवाद... यादी वाढतच जाते, म्हणूनच हिंदू वेगवेगळे पंथ मानू शकतात, त्यांची दैवतंही वेगळी असू शकतात. एकच देवाला वा प्रेषिताला मानायला हवं अशी सक्ती इथे नाही. जन्माने वा कर्माने हिंदू असून, हिंदू धर्माविषयी माहिती न करुन घेता, काही अभ्यास न करता, धर्माला नावं ठेवायची मुभाही इथेच आहे, ह्याच धर्मात. आताआतापर्यंत असं कोणी केलं तर केवळ धर्मांधतेने कोणी अश्या टीकाकांराना त्रास पोहोचवल्याचं ऐकीवात नाही. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याची पूर्ण मुभा हे हिंदू धर्माचं अतिशय अभिमानस्पद वैशिष्ट्य आहे. राहता राहिल्या रुढी. ह्या व्यक्ती निर्माण करतात आणि सामाजिक जीवनात रुढी जन्म घेतात आणि नष्टही होतात. रुढी निर्माण होण्याची कारणं बर्‍याचदा समाजावर मूठभर लोकांचा वरचष्मा रहावा म्हणून निर्माण केल्या जातात. त्या नाहीश्या व्हायलाही हव्यात, पण रुढी म्हणजे धर्म, असे गृहीतक धरुन, म्हणून धर्माला का झोडपावे? हे म्हणजे, हाताला घाण लागली तर, घाण साफ करण्याऐवजी हात कापून टाकूया म्हणण्याप्रमाणेच झाले ना? पक्याशेठ म्हणतात : सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना, कुठली तरी शक्ती असणारच. ही जी काय शक्ती आहे माझ्या मते तीच देव. तिची वेगवेगळी रुपे माणसाने निर्माण केली की खरोखरीच अशी रुपे आहेत ते मला माहित नाहि पण त्या शक्तीवर माझा विश्वास आहे. ह्या शक्तीला / देवाला कर्मकांडाच्या बंधनात अडकवले माणसाने. कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही. अदिती म्हणते : जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही. किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो. अनेक आस्तिक मित्र-मैत्रिणीही जिवलग आहेत. पण माझ्यावर देवाचं अस्तित्व स्वीकारण्याची सक्ती मला चालत नाही. आपण मारे मोठमोठ्या किचकट संकल्पना, जसं देव, शक्ती, इ. मांडतो. मोठ्या संकल्पना अशासाठी म्हणाते कारण हे देव, शक्ती, निसर्ग हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही कळत. (जे कळत नाही आणि कुठल्याही प्रकारे दिसतही नाही त्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?) कदाचित हे सगळं किचकट करण्याची गरजच नसेल, आणि उत्तर असेल हे विश्व कोणीही निर्माण केलं नाही. जी काही भौतिक स्थिती होती, त्यातून हे विश्व असंच निर्माण झालं (असतं). आणि उत्तर सोपंच होतं/असतं, फक्त ते सापडण्यासाठी, दिसण्यासाठी, मान्य करण्यासाठी कोरी पाटी असावी. माझ्यासाठी देव ही काही (बर्‍याचशा?) लोकांच्या डोक्यातली एक संकल्पना आहे. जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. सूहासशेठ म्हणतात : आमच्या साठी दोन्ही सारखेच. नास्तिक म्हणतो देव नाही ..सोडुन देतो.. आस्तिक म्हणतो देव आहे .मान्य करतो.सोडुन देतो... देव आहे की नाही हे कोणी शोधत नाही...का ? का ? सा॑गा ना...लई जिकीरीच काम ना ?? कुठ आता तपश्चर्येला बसणार... तात्या म्हणतात : श्रद्धा असणे महत्वाचे ... धमालशेठ जरा वेगळे म्हणणे मांडतात : माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्‍यांना एक जाहीर आव्हान करतो, असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात? ================================================ बाकी सविस्तर आपण वर दिलेल्या लिंकवर पाहु शकता ... मंडळी, चर्चा उत्तम आणि बहुतेक मुद्देसुद चालु आहे, असेच चालु राहुद्यात. अजुन अनेक जणांना त्यांची मते मांडायची आहेत म्हणुन हा दुसर्‍या भागाचा अट्टाहास ... एक निवेदन : चर्चा करताना कॄपया वैयक्तीक विधाने, चिखलफेक, अक्कल वगैरे काढणे, नावे ठेवणे, टोमणे मारणे वगैरे जमले तर टाळा. एक तर त्याने चर्चेत "कन्ट्रस्क्टिव्ह" अशी भर पडत नाही पण उलट चर्चेचा तोल जातो, संपादकांना हातचे बाजुला ठेऊन हे सांभाळत बसावे लागते. तेव्हा कॄपया हे सिरीयसली घ्यावे अशी माझी आग्रहाची विनंती ... धन्यवाद ..!!!

वाचन 22164 प्रतिक्रिया 51