निराशजनक पराभव.....
लेखनप्रकार
२०२१ च्या टी-२० विश्वचषकातील काल भारताचा न्यूझीलंड संघासोबत एक महत्त्वाचा सामना होता . खरतर भारत आणि न्यूजीलंड दोघेही आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध हरल्यानंतर ह्या सामन्यात विजय मिळवणे पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना गरजेचं होत.
२०-२० क्रिकेट प्रकारातील जगातील सर्वोत्कृष्ट बॅटर च्या यादीतील फलंदाजांनी खचाखच भरलेल्या भारतीय संघाकडून नेहमीप्रमाणे खूप अपेक्षा होत्या पण मागच्या सामन्याप्रमाने इथेही १३३ कोटी भारतीयांच्या पदरी निरशाच पडली. सुरुवात झाली ती सलामीला आलेल्या ईशान किशन च्या विकेटने. आपल्या पहिल्यावहिल्या विश्वचषकातील पहिलाच सामना खेळणाऱ्या ईशान ने खरतर संभाळून खेळ करत संधी मिळेल तेव्हा प्रहार करायला हवा होता पण इथे त्याला अतिआत्मविश्र्वास नडला व मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्यानंतर के ल राहुल आणि पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळालेल्या रोहित शर्मा यांनी काही चांगले फटके खेळून आशा दाखवल्या पण ते दोघेपण खराब फटका खेळून बाद झाले..आणि पॉवरप्ले संपायच्या आतच भारत अत्यंत दबावाखाली आला. त्यानंतर मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केलेला विराट ही दबावाखाली चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्यानंतर आलेले हार्दिक पंड्या आणि जडेजा खेळपट्टीवर तग धरून तर राहिले पण लौकिकाला साजेसा खेळ करू शकले नाहीत. २० ओव्हरस् मध्ये भारतीय फलंदाज फक्त ११० धावा करू शकले. त्यांनी गोलंदाजांना त्यांचा खेळ दाखवण्यासाठी काही ठेवलंच नव्हत त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा निराशाजनक पराभवाला सामोरं जावं लागलं...
ह्या विश्वचाकातील भारताचं आव्हान जवळ जवळ संपल्यातच जमा आहे. कारण भारताला सेमीफायनल मध्ये खेळायचं असेल तर भारताने राहिलेले सगळे सामने जिंकणे तर गरजेचं आहेच पण अफगाणिस्तान ने न्यूझीलंड ला हरवणे पण गरजेचे आहे आणि ते होणं शक्य नाहीये.
ह्या पराभवाची कारणं अनेक सांगता येतील. त्यातील पाहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे काल भारतीय संघ अत्यंत दबावाखाली दिसत होता. रोहित, विराट सारख्या अनुभवी फलंदाजांनी त्यांचा नैसर्गिक खेळ केला नाही. हार्दिक, जडेजा १७-१८ व्या ओवर मध्ये मोठे फटके खेळण्याऐवजी एक-एक धाव का घेत होते यामागचे कारण समजू शकलं नाही. एवढ्या मोठ्या मॅच मध्ये रोहित शर्मा जो नेहमी सलामीला येतो त्याला मागे ठेवून नवख्या ईशान ला वरती का पाठवले हे ही समजल नाही....हा सगळा दबाव नव्हता तर आणखी काय होत..
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये. आता हेच पहा ना जून महिन्यात कसोटी चॅम्पियनशिप चा सामना खेळण्यासाठी बाहेर पडलेला भारतीय संघ ५ महिने झाले तरी अजून भारतात परतलेलाच नाहीये. २३ जुनची फायनल खेळल्यानंतर भारत महिन्याभरात इंग्लंड विरूद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळला त्या मालिकेतील ५ वा सामना आयपीएल खेळण्यासाठी रद्द करून भारतीय खेळाडू घाईघाईने यूएई ला रवाना झाले आणि ७-८ दिवसातच आयपीएल खेळण्यासाठी पण सज्ज झाले आणि आयपीएल संपून १० दिवस पूर्ण होत नाहीत तोवर भारताला पाकिस्तान विरूद्ध विश्वचषकातील पहिला सामना पण खेळावा लागला. त्यातुलनेत आयपीएल न खेळलेले इंग्लंड आणि पाकिस्तानचे ताजेतवाने खेळाडू पूर्ण भरात आहेत आणि म्हणूनच दोन्ही संघ गुणतालिकत पहिल्या स्थानावर आहेत..त्यामुळे मला वाटतं नियामक मंडळाने वर्षाचा कार्यक्रम आखताना फक्त मिळणाऱ्या पैशांचा विचार न करता खेळाडूंचा विचार करणं गरजेचं आहे. खेळाडूंनी पण फिटनेस व मानसिक ताण तणावांचा विचार करून अधूनमधून क्रिकेट पासून दूर राहणं महत्वाचं आहे. नाहीतर ह्यापुढेही आपण विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत वारंवार अपयशी होत राहू.
वाचने
7651
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
अफगाणिस्तान ने न्यूझीलंड ला हरवले तर अफगाणिस्तान सेमी ला जाऊ शकतो भारत नाही.
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये.>>>>>प्रत्येक सामन्याचे वाजवून पैसें घेतात. फुकट नाही खेळत.
दोन सामन्यात भारताने एकूण दोन विकेट घेतल्या तर लिँअम लिविंग्स्ट्नने तीन!
भारत पेट्रोलची किंमत पार करू शकला नाही!
अरारा..परत हरलो व्हय
टाॅस जिंका, बाॅलिंग निवडा आणि मॅच जिंका
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज मधले दिग्गज फलंदाज देखील, पहिल्यांदा बॅटिंग करतांना ढेपाळले...
In reply to नशीबाचा खेळ आहे by मुक्त विहारि
धीम्या आणि पहिल्या डावानंतर रंग बदलणाऱ्या खेळपट्ट्या यामुळे हा वर्ल्डकप कंटाळवाणा वाटू लागलाय आता...
In reply to धीम्या आणि पहिल्या डावानंतर by सुजित जाधव
पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ हरत असल्याने, फक्त टाॅस पुरतेच वाचतो
पूर्ण मॅच बघायची गरज नाही...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ चे नेतृत्व एखादा पप्पू करतोय कि काय ?
अरे काय चाल्लंय काय ?
क्रिकेट हा खेळच बंद करावा. अती लाडावलेले पोरगे आहे ते.
In reply to क्रिकेट हा खेळच बंद करावा. by पाषाणभेद
सहमत आहे
टॉसला खूप महत्त्व दिलं जात आहे. पण २०-२० विजेता संघ कुठल्याही परिस्थितीत चांगला खेळ करणारा असायला हवा. इंग्लंडने आज टॉस हरल्यानंतर आणि ४७/३ अवस्थेतून बाहेर पडून एक चांगलं लक्ष ठेवलं श्रीलंकेसमोर.
२०-२० च्या गडबडीत फलंदाज चेंडू जमिनीलगत खेळून, गॅप शोधून धावा करण्याचं कौशल्य विसरले आहेत बहुतेक, विशेषत: भारतीय फलंदाज, आयपीएलच्या ओव्हरडोस मुळे.
थोडक्यात काय तर सध्याचा भारतीय संघ २०-२० विजेता होण्यास लायक नाही. सत्य परिस्थिती स्वीकारून पुढील २०-२० वर्ल्ड कप ची तयारी सुरू करणं जास्त योग्य होईल.
In reply to टॉसला खूप महत्त्व दिलं जात by श्रीगणेशा
चांगली फलंदाजी केली होती ...
थोडक्यात सांगायचे तर, टाॅस जिंका, गोलंदाजी निवडा आणि मॅच जिंका...
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये.
हेच मुख्य कारण आहे.
आयपीएल असायला हरकत नाही. पण आयपीएल खेळाडू व आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू वेगळे असावे. आयपीएल मध्ये अत्यंत चमकदार कामगिरी करणारे व त्यात पूर्ण उर्जा संपविणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यात ढेपाळतात हे अनेकदा दिसलंय.
त्यामुळे आयपीएल मध्ये खेळणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात असणाऱ्या खेळाडूंना आयपीएल मध्ये खेळण्याची परवानगी देऊ नये. In reply to दुसरं एक कारण असू शकत ते by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to दुसरं एक कारण असू शकत ते by श्रीगुरुजी
खरतर ह्यावर्षीची आयपीएल वर्ल्डकप झाल्यावर घ्यायला हवी होती. बीसीसआय ने खेळाडूंचा विचार न करता फक्त गल्ला भरण्यासाठी आयपीएल खेळवली...आता भोगा म्हणावं कर्माची फळं....सगळ्या बाजूंनी टीका चालू झाली आहे बीसीसआय आणि आयपीएल वर...
In reply to दुसरं एक कारण असू शकत ते by श्रीगुरुजी
हे जरी अगदी मान्य केलं की आयपीएलमुळे हानी होत आहे..
तरी कोणता सुपरस्टार खेळाडु आयपीएल सोडुन फक्त आंतरराष्ट्रीय सामने खेळायला तयार होईल... सगळे आंतरराष्ट्रीय दर्जातुन निवृत्ती घेउन फक्त आयपीएल खेळतील..
खेळाडुची साधारण कारकीर्द १० वर्षे धरली तर त्यात तो जास्तीत जास्त पैसा कमावणे हे ध्येय ठेवेलच... बाकी देशासाठी खेळणे खूप मानाचे आहे वगैरे ठीक आहे.. पण उद्या आपण स्वतः ह्या कात्रीत सापडलो तर आपणही त्या १० वर्षे विंडो मधे आर्थिक फायदा मॅक्सिमाईज करायचा प्रयत्न करुच... हेमावैम...
In reply to हे जरी अगदी मान्य केलं की by बेकार तरुण
ज्यांना फक्त पैशासाठी आयपीएल मध्येघ खेळायचंय त्यांना अडवू नये. फक्त त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये. आयपीएल मध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा आहे व तेथे टिकणे अत्यंत अवघड आहे. नुसते वेडेवाकडे फटके मारून आयपीएल मध्ये सुद्धा फार काळ टिकता येणार नाही.
In reply to ज्यांना फक्त पैशासाठी आयपीएल by श्रीगुरुजी
गुरुजी तुमचं म्हणणं पटत आहे, पण ते व्यवहार्य नाही..... उदा... ९०% गुण मिळवणारा खेळाडु नक्कीच आयपीएलच खेळेल... अन उरलेला गाळ, ज्यांना आयपीएल खेळायला कोणी घेणार नाही ते राष्ट्रीय संघात अशी परिस्थीती होईल...
२ - ५ कोटी २ महिन्यात मिळवायची संधी असताना त्यावर कोण पाणी सोडेल.
In reply to गुरुजी तुमचं म्हणणं पटत आहे, by बेकार तरुण
बरोबर, ह्यापेक्षा BCCI ने वेळापत्रक आखताना आणि टीम निवडताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. इंग्लिश खेळाडूंनी स्वतःहुन IPL न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या खेळाडूनीही प्राधान्यक्रम ठरवायला हवा.
In reply to गुरुजी तुमचं म्हणणं पटत आहे, by बेकार तरुण
राष्ट्रीय संघात खेळूनही भरपूर संधी, पैसे, प्रसिद्धी, जाहिराती वगैरे मिळतात. निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयुष्यभर घसघशीत निवृत्तीवेतन मिळते. पुढेमागे निवडसमितीत स्थान, प्रशिक्षक वगैरे होण्याची संधी मिळते. फक्त आयपीएल खेळून यातल्या बऱ्याचशा गोष्टी मिळणार नाहीत. २-४ वर्षे आयपीएल खेळून नंतर अपेक्षित कामगिरी जमली नाही तर कायमस्वरूपी गच्छंती होऊ शकते. वर्षातून दीड महिना आयपीएल खेळली की पुढील साडेदहा महिने करण्यासारखे काहीच नसते. बहुसंख्य आयपीएल खेळाडूंची कारकीर्द ३-४ वर्षांपेक्षा जास्त नाही.
अफगाणिस्तान ने न्यूझीलंड ला