मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<मीच एकटा सर्वज्ञ कसा ?>

प्रसाद गोडबोले · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मीच एकटा सर्वज्ञ कसा ? या एका प्रश्नासरशी अहंमन्यतेच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन विनम्र होतं; सुरुवातीला थोड चुकल्याचुकल्यासारखं वाटते, पण अहंकार हाच अहंमन्यतेचा आधार आहे, एकदा निराहंकारी झालो की सगळा माज संपला ! कुठला वाद-विवाद नाही; कसलं भांडण नाही, कोणलाही काहीही पटवुन देण्याचा अभिनिवेशष नाही. कुठल्याही विरुध्दमताला खोडुन काढण्याचा अट्टहास नाही, कोणताही गर्व नाही, की निर्बुद्ध मीपणाचे प्रदर्शन नाही. कोणतीही टोकाचा आग्रह नाही, "स्वतःचे ते सोवळं- अन दुसर्‍याचे ते ओवळं" असलं अज्ञान नाही, कुठे डोकं आपटायला नको, की शेवटी प्रत्येक धाग्यावर होणारी स्वतःची फजीती नाही. कुठे अकलेचे दिवे लावायला नको, की अनाकलनीय भाषेत तारे तोडायला नको. कोणाशीही काहीही बोलायला नको की बोललोच तर "माझेच कसे योग्य" हे पटवायला नको, कोणत्याही प्रतिकुल मतावर "बरं बाबा, तू म्हणाशील तसं. तुझे अनुभव, त्या वरुन बनलेली तुझी मते तुला लखलाभ" असं अगदी सहज पणे बोलुन हसत हसत पुढे जायला आपण सज्ज. घरातल्या भिंतींवर लोकांना आवडतील ती चित्रे लाऊ दे अन कोपर्‍यात आवडतात ती शिल्पे ठेऊ दे बुकशेल्फ मध्ये ज्यातुन आनंद मिळतो ती वाट्टेल ती पुस्तके ठेऊ दे, आपल्याला काय गरज आहे कोणाच्या घरात डोकाऊन पहायची अन फुकटचे सल्ले द्यायची? , ते ही मागितले नसताना ! सगळे वादच थांबल्यावर स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि आणि स्वतःच्या निर्बुद्धपणाने लोकांना त्यांचे कष्टाचे पैसे कसे खर्च करावेत हे सल्ले देण्याचे वाचलेले कष्ट ! आणखी काय हवं मिपावर आणि जगातही सुखासमाधानानं वावरायला ? _____________________________________ मीच एकटाच सर्वज्ञ कसा ? इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर ! प्रश्न सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला; आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं ! कुठल्या लेखावर जायला नको, 'माझीच कशी लाल' असं जिथं तिथं दाखवुन, स्वतःचे हसु करुन घ्यायची गरज नाही, आणि चेहेर्‍यावर कायम "जितं मया" चा मास्क घालुन वेडगळपणा करायचा नाही. ज्याला जी साधना करायची ती करु दे, त्यातुन जी अवस्था प्राप्त व्हायची ती होऊ दे नाहीच झाली तरी त्याचं त्याला उत्तर शोधु दे मला काही अख्ख्या जगाला शहाणे करुन सोडायचा ठेका दिलेला नाही. जो तो आपापल्या अनुभवानुसार, आपापल्या बौध्दिक क्षमतेनुसार आपापल्या गंतव्याप्रत पोहचेल , किंव्वा पोहचणारही नाही , मला काय पडंलयं त्याचं ? एका विचारात काम तमाम ! _____________________________ एक गोष्ट मात्र नक्की, लोकांशी वावविवाद घालत बसायचं नाही ! इतकी वर्ष काय मी झक मारत होतो का ? या मनाच्या उपहासाला, एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं. मिपाकर मोठ्ठ्या मनाचे आहेत , ते नक्कीच माफ करतील ;) ! मग साधेभोळे भाविक तुमचा पिच्छा सोडतील, एखाद्या श्रध्दाळुची भोळीभाबडी मते दिसल्यावर तुम्ही लालरंगाचा डबा घेऊन धावण्याऐवजी शांत बसुन गालातल्या गालात हसाल अन उजव्या कोपर्‍यातील ते फुलीचे बटन दाबाल, सगळ्याच लोकांची बौध्दिक , मानसिक , आध्यात्मिक पातळी एक नसते हे लक्षात आल्यावर ज्याला त्याला झेपेल अशी साधना करुन स्वतःपुरती मनःशांती प्राप्त करुन घेण्यात आपल्याला काहीच हरकत नाही हे तुमच्या लक्षात येईल. अगाध तर्कशास्त्राचे दिवे पेटवणार्‍यांऐवजी, विजपुरवठा असो कि नसो , सर्वावस्थेत समभाव कसा ठेवावा हे शिकवणार्‍या साधुसंतांच्या विषयी तुमचा मैत्रभाव जागेल. "सगळी साधु, संत, साधक आणि अन्यलोकंही निर्बुध्द आहेत , मीच काय तो एक शहाणा आहे " हा नाहक मनात खोल गेलेला विचार लयाला गेला की फुकटचा निरुपयोगी अहंगंड संपेल. एक सामान्य, वस्तुनिष्ठ, इतरांच्या मतभिन्नतेचा आदर करणारा, विनम्र, सुखसंवादप्रिय, संतुलित मनाचा आणि अगदी सहजपणे "ठिक आहे बाबा" म्हणुन वादविवादांवर पाणी सोडणारा, अस्तित्वाप्रती आणि त्याच्या अनेक भिन्न लोकांना येणार्‍या भिन्न अनुभुतीं, जसे की निर्गुण , परमात्मा, आत्माराम , वस्तु , सच्चिदानंद, पांडुरंग , शिव, राम कृष्ण हरी अशा अनेक भिन्न नावांनी भिन्न रुपांनी नटलेल्या निर्विकल्प सत्याप्रती कायम कृतज्ञ असलेला, साधा, सरळ आणि इतरांच्या अगदी सारखा सामान्य माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल ! ज्याक्षणी "मीच काय तो एकटा सर्वज्ञ" हा अहंकार सोडाल त्या क्षणापासुन ! _______________________________________________________ _______________________________________________________ईत्यलम ||

वाचने 13014 वाचनखूण प्रतिक्रिया 25

कोहंसोहं१० Tue, 06/16/2020 - 22:14
"सगळी साधु, संत, साधक आणि अन्यलोकंही निर्बुध्द आहेत , मीच काय तो एक शहाणा आहे " हा नाहक मनात खोल गेलेला विचार लयाला गेला की फुकटचा निरुपयोगी अहंगंड संपेल>>>>> +१००

In reply to by शाम भागवत

कशाला ? १) ज्याला आपण काल काय लिहिलं ते आज आठवत नाही; पाहा : > > खरा साधक आपल्या ईश्वराप्रत " अखंड तैलधारावत अनुसंधान " प्राप्त करण्याच्या मागे लागलेला असतो . आणि हे एकाग्र अनुसंधान साधायचा मार्ग सोप्पा सर्व साधुसंतांनी शिकवलेला मार्ग म्हणजे नामस्मरण ! (9 Jun 2020 - 11:57 pm | मार्कस ऑरेलियस) > माफ करा पण मी नामस्मरण किंव्वा कोणत्याच प्रकारची साधना , सध्यातरी , करत नाही ! समाधी प्राप्त करण्यासाठी कोणत्याच साधनाची आवश्यकता नाही, आवश्यकता आहे ती केवळ शांतपणे विचार करण्याची ! (10 Jun 2020 - 10:26 pm | मार्कस ऑरेलियस) २) ज्याला स्वतःच्या साधनेविषयी काहीही सांगता येत नाही : > पाहा : प्रष्ण : नामस्मरणानं जी उन्मनी अवस्था प्राप्त होते म्हटलंय तो तुमचा अनुभव आहे का ? (10 Jun 2020 - 10:36 pm | संजय क्षीरसागर) उत्तर : तुमचं आयाहौस्का विषयी काय मत आहे सांगा ना ? (10 Jun 2020 - 9:19 am | मार्कस ऑरेलियस) ३) > दु:ख विस्मरणाचा मार्ग म्हणून दुसर्‍यांना गांजा ओढायला सांगतो : >पाहा : त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? >>> गांजा ! (5 Jun 2020 - 7:29 pm | मार्कस ऑरेलियस) अशा माणसाच्या पोस्टला, माझ्या लेखी काहीही किंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि Wed, 06/17/2020 - 06:51
'सत्याचा उलगडा' झाला आहे ह्याची प्रचिती देणारा प्रतिसाद येईल अशी अपेक्षा होती. पण पोस्टच्या गाभ्यालाच जस्टीफाय करणारा / दुजोरा देणारा प्रतिसाद पाहून निरंतर साधना किती गरजेची आहे ह्याची खात्री पटली! - (मुमूक्षू) सोकाजी

In reply to by तुषार काळभोर

शाम भागवत Wed, 06/17/2020 - 11:05
अध्यात्माबद्दल ज्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. ‍अजून काही केलेले नाही पण काहीतरी करावेसे वाटायला लागलेले आहे, किंवा नुकतीच वाटचाल सुरू केली आहे, असा जिज्ञासू. एकदम सुरवातीची पायरी.

गणेशा Wed, 06/17/2020 - 01:40
(आपल्या मनाचा - विचारांचा आपल्यावर इतका पगडा असतो, कि आपण त्याच्या आवर्तनातून कधी बाहेर पडत नाही.. आपल्या विचारापासून दूर जाऊ लागलो कि आपले मनच ते कसे चूक हे समजावते... या मनाचे.. विचारांचे पण एक गणित असते, अस आपल्यालाच वाटत..त्या गणिताचा इतर कसल्याही प्रमेयाशी संबंध नसतो.. मन विचार सांभाळले कि आपली वर्तणूक छान होते.. आणि हेच तर जीवनात हवे असते कोणत्या खोल ज्ञानाशिवाय आपण आपल्या मनाला.. विचारांना सत्य मानतो.. कारण हे विचारच आपल्या कृतीचे प्रतिबिंब होतात.. आणि आपण कसे राहायचे हे ते प्रतिबिब दाखवते.. हे चूक कि बरोबर माहीत नाही.. वाईट कदाचीत काही नाही.)

In reply to by गणेशा

कोहंसोहं१० Wed, 06/17/2020 - 02:14
आपल्या मनाचा - विचारांचा आपल्यावर इतका पगडा असतो, कि आपण त्याच्या आवर्तनातून कधी बाहेर पडत नाही.. >>>>>>> खरे आहे. म्हणूनच योग्य दिशा दाखवायला काही महापुरुष जन्मतात.अगदी वेगवेगळ्या कालखंडात (मग तो फरक काही हजार वर्षाचा का असेना) होऊन गेलेल्या महापुरुषांच्या कथनात, त्यांना आलेल्या अनुभवात जेंव्हा एकवाक्यता आढळते तेंव्हा निश्चितच त्यामध्ये काही तथ्य असते. विचारांच्या पगड्यातून सोडवण्याकरता अनेक संत अनेक मार्ग सांगून गेलेत. योग्य वेळ आली की आपापल्या आवडीनुसार, प्रगतीनुसार तो मार्ग आपल्याला मिळतो पण खरा अनुभव घ्यायचा असेल तर संतवाणीवर/गुरूवर विश्वास, त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे आचरण, मनन, चिंतन आणि समर्पण आवश्यक ठरते. व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे मार्गही बरेच आहेत त्यामुळे केवळ आपलाच मार्ग योग्य बाकी सगळे चूक, आणि मूर्ख म्हणत बसले तर मात्र फजिती होते आणि आहे तिथूनही माणूस बराच खाली जातो. अहंकार सोडणे सर्वात कठीण. अध्यात्मात ४ पुस्तके वाचून ज्ञान मिळेल पण अनुभव नाही. त्यासाठी अहंकार सोडावाच लागतो. बुद्धीला समजणे आणि खरा अनुभव येणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. गोडपणा म्हणजे काय हे पुस्तक वाचून सांगता येईल पण गोडाचा अनुभव घ्यायला साखर खाऊनच बघावी लागते

कोहंसोहं१० Wed, 06/17/2020 - 06:07
जिएसटीची काँप्लीकेशन्स समजू शकतील ही शक्यता शून्य ! --------> प्रश्न जीएसटीचा नाहीच आहे हे मी आधीच सांगितले आहे. माझे अपरिमित हसू तुमच्या "आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर होण्याची शक्यता होती" असल्या अविचारी विधानाकडे आहे जे अजूनही तुम्ही केविलवाण्या पद्धतीने विषय बदलून डिफेन्ड करण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून अजून हसू येतेय. किती वेळा हसू करून घेणार अजून स्वतःचे? त्यामुळे तुमचे हे प्रतिसाद अर्थशून्य आहेत. आणि स्वतःची लंगडी समर्थनं देण्यासाठी तुमच्याकडे दुसरं काहीही नाही -------> हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला लागू आहे कारण मी उदाहरण, पुरावे देऊन माझ्या म्हणणे योग्यपणे मांडले आहे. तुमच्या मात्र एकही विधानाला ना उदाहरण आहे ना पुरावा. नुसती तीच तीच बडबड. मागच्या एका धाग्यात तुमच्याकडे एकाने पुरावा मागितला आहे त्याच्या अजूनही प्रतीक्षेत. देताय ना पुरावा? "तुमच्या बाकीच्या भाकडकथा बंद करा 15 Jun 2020 - 6:02 pm | त्याचू वैलपान आणि तुम्ही जो दावा केला आहे, त्यासंदर्भात या प्रश्नांची उत्तरे द्या: मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या? उत्तरे द्या किंवा या प्रश्नांची उत्तरे नसतील तर तुम्ही एक भंपक थाप मारली हे मान्य करा"

सुबोध खरे Wed, 06/17/2020 - 10:21
असं कसं? असं कसं? मीच एकटा सर्वज्ञ कसा? हा काय प्रश्न झाला? मीच एकटा सर्वज्ञ आहे मी एकटाच सर्वज्ञ आहे मी एकटा सर्वज्ञच आहे मी एकटा सर्वज्ञ आहेच. मग जगाला सर्वज्ञान देणे हे माझे ईश्वरीय कर्तव्य नाही का?

प्रचेतस Wed, 06/17/2020 - 18:16
कहर सुडंबन आहे. ज्या त्या व्यक्तीने योग्य तो बोध घ्यावा असे.
ज्याला जी साधना करायची ती करु दे, त्यातुन जी अवस्था प्राप्त व्हायची ती होऊ दे नाहीच झाली तरी त्याचं त्याला उत्तर शोधु दे
हे बेस्ट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/18/2020 - 11:34
मीच एकटा सर्वज्ञ कसा ?
प्रत्येकालाच वाटत असते मी सर्वज्ञ आहे, मलाच जास्त कळते. ही वृत्ती कमी जास्त प्रमाणात आणि वयात सर्वत्रच असते. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे (एक असाच सर्वज्ञ) :)

गड्डा झब्बू गुरुवार, 06/18/2020 - 13:30
हे असलं लिहिण्यासाठी जी अफाट प्रतिभा लागते ती तुमच्या ठायी पुरेपूर आहे. भन्नाट लिहिलंय खूप हसलो वाचून :-)) तेवढी एक प्रेरणा लिहिली असती तर नवीन वाचकांना समजायला सोपे पडले असते. लगे राहो! और आनेदो!!

चित्रगुप्त Fri, 08/18/2023 - 04:11
सगळे वादच थांबल्यावर स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ ... आणखी काय हवं मिपावर आणि जगातही सुखासमाधानानं वावरायला ?
एक सामान्य,वस्तुनिष्ठ, इतरांच्या मतभिन्नतेचा आदर करणारा, विनम्र, सुखसंवादप्रिय, संतुलित मनाचा आणि अगदी सहजपणे "ठिक आहे बाबा" म्हणुन वादविवादांवर पाणी सोडणारा, साधा, सरळ आणि इतरांच्या अगदी सारखा सामान्य माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल !.... ज्याक्षणी "मीच काय तो एकटा सर्वज्ञ" हा अहंकार सोडाल त्या क्षणापासुन !
-- लाखमोलाचे विचार. अधून मधून असे डोळ्यात अंजन घालून घेणे गरजेचे असते.

In reply to by चित्रगुप्त

मनःपुर्वक धन्यवाद ! मी हा धागा संक्षींच्या देवाचं नाव कोणी ठेवलं https://www.misalpav.com/node/47030 ह्या धाग्याचे विडंबन म्हणुन लिहिला होता. पण आता एक स्वतंत्र लेखन म्हणुन अलिप्तप्पणे वाचताना माझे मलाच छान वाटले ! खरंच कोणाला काहीही पटवुन वगैरे द्यायची गरजच नाहीये , आपले आपण सुखासमाधानात आपला वेळ एन्जोय करु ! :)