Skip to main content

झरझर झरझर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये... तिचे धावते पाय थबकतात, घरातच विलांटी घेऊन मैदानाकाठचे गवत डोळ्यांनी खुडत राहतात... ..... ‘थांब थांब पळू नकोस माजलेले गवत, त्यात सापविंचू, मी आलो आलो नको नको पळू नकोस ....’ ऐकू येते इतके स्पष्ट भुडूक अंधारावर खेळगड्याचे नाव कोरत राहते ती दोन डोळ्यांवर वाकून .... खेळातले नियम मुलीला माहित नसतात मुलाला माहित असतात, पण तो ते पाळत नाही.... नियमावाचून मुक्त खेळ तो टाळ्या किती, हसू किती अंधार उजेडावर लाटा किती! घरी निघण्याची वेळ येताच मुलगी फ्रॉक झटकते, मुलगा घाम पुसतो कोवळ्या कोवळ्या अंधाराला रानफुलांचा वास येतो.... शाळेत जाताना मुलगी वेणीत अनंत माळते त्या रानफुलांचा वास वहीतल्या रेघांवर झुलवत ठेवते... ...... कातर कातर कातर वेळी मुलगी एकदम मोठी होते देवापाशी समंजस दिवा लावते.... तिला प्रार्थना जमत नाही, शुभं करोति येत नाही, पण जोडले हात स्वस्तिक होतात फ्रॉकवरच्या फुलांमध्ये मुलाच्या घामाचा गंध शोधू लागतात.... ..... खरंच, झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये Shivkanya

वाचने 8124
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मऊशार उबदार वाळूत लिहावं तसं लेखन आहे तुमचं. कधीतरी निवांतपणे तिथेच बाजूला बसून वाचता येतं किंवा कधी ते लगेच लाटेच्या पाण्यासोबत वाहून जातं. कधी तिथल्या वाळूचा उबदारपणा हवाहवासा वाटतो कधी गरम चटकेही बसतात. त्या वाळूचे गरम चटके बसल्यावर आम्ही उठून जाऊ शकतो पण तुम्ही तिथेच आणि तसेच लिहित रहा. Sandy

In reply to by चांदणे संदीप

तुमच्या भावना पोहचल्या हो...:)) किती तो वाळूला त्रास!! :)))

अलगूज वाजते तशी ओढ वाटणारी कवीता. राग ताल नाही समजले तरी ऐकायला आवठते अशी अलगूज धून आकाशवाणी रसिक श्रोता वाचकांची पत्रेवाला नाखु

खूप छान कविता आहे. लहानपण आठवलं. लहानपणचे स्पर्धा, नियम, चाकोर्‍या नसलेले वेगवेगळे खेळ आठवले. अवांतरः आणि खरंच, आपल्या लहान मुली किती समंजस असतात आणि निवांत. मुलगे म्हणजे नुसता धांगडधिंगा आणि मारामार्‍या. बहिणीबरोबरसुद्धा सतत बरोबरी आणि भांडाभांडी. पण आपल्या बहिणीला थोडं जरी लागलं खुपलं की तितकेच भावूक होतात.

In reply to by इरामयी

बापरे! इतका निरागस भावार्थ होता का ह्या कवितेचा? मला काही भलताच अर्थ लागला होता! ह्याच कारणासाठी कविता ह्या साहित्य प्रकारापासून मी चार हात दूर राहतो. कवी/कवियत्रीला सांगायचे काही वेगळेच असते आणि वाचणारा आपापल्या परीने अर्थ लावतो. एकवेळ काहीच समजले नाही तरी ठीक पण अर्थाचा अनर्थ लावणे म्हणजे कवितेवर नकळत केलेला अत्याचारच कि!

In reply to by टर्मीनेटर

प्रत्येक गोष्ट काय अगदी उलगडूनच लिहायला हवी का? आणि तुम्ही अवांतरचा कवितेशी संबंध जोडला की काय? असू द्या.