मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गावपातळीवरची एक अफलातुन राजकारणी खेळी

कानडाऊ योगेशु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एका विधानसभेच्या निवडणुकीतील रणधुमाळीत जवळुन पाहीलेला किस्स्सा. अमुक अमुक दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी घड्याळात दुपारचे २-४५ झाले होते तेव्हा एक स्त्री तिचा उम्देवारी अर्ज दाखल करण्यासाठी नियमाप्रमाणे आवश्यक असल्याने तिच्यासोबत ४ सहकार्यांना घेऊन आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिथे असलेले अधिकारी आधी चरफडले पण वरुन आदेश होते कि ३ वाजेपर्यंत येणारे अर्ज व्यवथित पडताळणी करुन एक तर जमा करुन घेणे अथवा परत पाठवणे. त्यानुसार अधिकार्यांनी अर्जाची छाननी करण्यास सुरवात केली. सदर महीला अ-हिंदु धर्माची होती व अर्जात कुठल्या पक्षातर्फे निवडणुकीला उभे आहेत त्या जागी एका लोकप्रिय पक्षाच्या नावाशी साधर्म्य असणार्या पक्षाचे नाव लिहिले होते. सदर पक्ष हा रजिस्टर्ड पक्ष नव्हता त्यामूळे महिलेला सांगण्यात आले कि ह्या ह्या कारणांनुसार तुम्हाला ह्या पक्षातर्फे निवडणुक लढवता येणार नाही. व तुमचा अर्ज रद्द होईल.पुन्हा वरुन "शक्यतो अर्ज रद्द न होईल" असे पहा असा आदेश असल्याने तिला सांगण्यात आले कि ह्याला एक पर्याय अजुनही आहे. तुम्ही अपक्ष म्हणुन निवडणुक लढवु शकता पण त्यासाठी कमीत कमी १२ कार्यकर्त्यांचे अनुमोदन घ्यावे लागेल. घड्याळात दुपारचे २.५५ होत आले होते. तिला सांगण्यात आले कि तुम्ही ३ च्या आत अर्ज दाखल करायला आला आहात म्हणुन तुम्हाला ३.३० पर्यंत वेळ देण्यात येतोय परंतु तोपर्यंत तरी १२ कार्यकर्त्यांना बोलवा व त्यांचे अनुमोदन म्हणुन सह्या घ्या. सदर महिलेने हे करण्यासाठीही दिलगिरी व्यक्त केली. सर्व कार्यकर्ते आता इतरत्र गेले असतील त्यामुळे त्यांना बोलावणे अशक्य आहे. अधिकार्यांना नाईलाजाने महिलेचा अर्ज रद्द करावा लागला. ह्यात विशेष बाब ही कि सदर महीला ह्याआधीही मागे निवडणुकीला उभी राहीली होती. जेव्हा तिला विचारले गेले कि अर्ज भरायची शेवटची तारीख वेळ तुम्हाला माहीती नव्हती का? त्यावर तिचे उत्तर असे होते कि आम्हाला आताच अर्ज दाखल करायला सांगितले वगैरे.महीलेचा एकुण आविर्भाव एखाद्या मुरलेल्या राजकारण्यासारखा जरी नसला तरी अगदी नवख्या राजकारण्यासारखाही नव्हता. त्यामूळे कोणाच्या तरी सांगण्यावरुन आता आलो ह्या उत्तरावर अधिकारी संभ्रमित झाले. अधिकार्यांनी सर्वतोपरी सहकार्य करायचा प्रयत्न करुन सुध्दा उमेदवाराकडुन सहाय्य न मिळाल्यामुळे अर्ज परत पाठवावा लागला. हे सर्व चालु असताना व अर्ज रद्द होणार हे निश्चित होत असताना अर्ज पडताळणी करणार्या टीममधील अधिकारी व्यक्तीला त्या भागातील आमदाराचा फोन आला. सदर आमदार हा लोकप्रिय रजिस्टर्ड पक्षाचा होता. अधिकारी चक्रावले कि हा ह्या स्त्रीचा उमेदवारी दाखल करुन घ्यायला स्वतः रदबदली का करतोय.? अधिकार्यांनी सर्व कारणे सांगुन असा अर्ज दाखल करणे अशक्य आहे व बेकायदा आहे व आमची नोकरी ही जाऊ शकते वगैरे सांगितल्यावर त्या आमदाराने सांगितले कि सदर महिला अ-हिंदु असुन तिला उभे केले तर दुसर्या लोकप्रिय पक्षाची त्या धर्माची मते फोडता येतील वगैरे. आश्चर्य म्हणजे सदर आमदार स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करायला एक सेलिब्रिटी व हेलिकॉप्टर व सोबत जंगी लवाजमा घेऊन आला होता. त्यामुळे इतक्या शेवटच्या क्षणी अशी खेळी खेळण्यामागचा उद्देश काय असावा असा प्रश्न तेथील अधिकार्याना पडला. सर्व कार्यकालीन कामे करुन निवांत झाल्यावर दिवसात घडलेल्या गमतीजमती चर्चा करत असताना पुन्हा हा प्रश्न चर्चेमध्ये आला आणि तेव्हा अनुमान असे निघाले कि सदर लोकप्रिय आमदाराला दुसर्या पक्षाची वोटबँक नुसती फोडायचीच नव्हती तर ती ही मते स्वतःकडे वळवायची होती व सदर महिलेला केवळ एक प्यादे म्हणुन वापरले गेले होते. व ही महिला आतापावेतो ह्याच भ्रमात होती कि हा आमदार व त्याचा पक्ष आपल्याला मदत करतोय. अर्थात आमदार व त्याच्या पक्षाने तरी तसेच इम्प्रेशन पाडले होते .आतापर्यंत त्यामहिलेने केवळ स्वतःचा प्रचार केला असता पण आतापावेतो ह्या आमदार व त्याच्या पक्षाकडुन मिळालेला पाठिंबा पाहता व जे घडले त्यात ह्या आमदाराची काहीही चूक नाही (महीला उमेदवार कार्यालयात असतानाच व तिचा अर्ज खात्रीने रद्द होणार हे माहीत असताना (किंबहुना तशीच तजवीज केली होती) तिच्या उपस्थितीतच अधिकार्याला फोन करुन तिच्यासंबंधी दस्तुरखुद्द आमदारसाहेबांतर्फे रदबदली करण्यात आली. ह्यामुळे आमदारसाहेबांची नीयत साफ आहे असा संदेश सदर महिले पर्यंत व तिच्या प्रभावक्षेत्रात पोहोचणे काही अशक्य नवह्ते) पुढचा प्रचार ही महीला व तिचे कार्यकर्ते आता ह्या आमदारासाठी व पक्षासाठीच करणार हे उघड होते. थोडक्यात ह्या खमक्या आमदाराला त्या महिलेच्या धर्मातील लोकांची फक्त मते फोडायचीच नव्हती तर स्वतःकडे वळवायचीही होती. व एकुण रागरंग पाह्ता आमदारसाहेब त्यात नक्कीच यशस्वी होणार ह्याबद्दल तेथील अधिकारी वर्गाची खात्री पटली. मुरलेले राजकारणी एखाद्याला हातोहात कसे उल्लु बनवतात ह्याचे उदाहरण म्हणुन नंतर काही दिवस हा किस्सा कुजबुजीच्या स्वरुपात तेथील कर्मचार्यांमध्ये चर्चिला जात होता.

वाचने 6286 वाचनखूण प्रतिक्रिया 15

Nitin Palkar Sat, 11/24/2018 - 10:05
सद्सद्विवेक बुद्धी शाबूत असणारी सर्वसामान्य माणसे म्हणूनच राजकारणापासून लांब राहतात.

In reply to by Nitin Palkar

कानडाऊ योगेशु Sat, 11/24/2018 - 11:30
तुम्ही (तुम्ही आम्ही आपण सर्व ह्या अर्थाने) राजकारणापासुन जरी दूर राहीला तरी राजकारण तुमच्यापासुन दूर राहत नाही. असे वा तसेही तुम्हाला तुमची खेळी खेळावीच लागते अन्यथा तुमचा वापर एक प्यादे म्हणुन केला जाऊ शकतो. नात्यातील एक व्यक्ती मुख्य कार्यपालन अधिकारी ह्या हुद्द्यावर काम करते आहे.त्या व्यक्तीशी चर्चा करत असताना जाणवले कि ज्यांना आपण गरीब बिचारे समजतो ते ही जसे वाटतात अगदी तितके गरीब बिचारे नसतात. किंबहुना आपण तसे दिसावे ही त्यांच्या पध्दतीने त्यांनी केलेली एक सोय असते.

योगी९०० Sat, 11/24/2018 - 13:50
असे बरेच किस्से आहेत... अनंत गिते यांनी मागच्या लोकसभा निवड्णूकीत सुनिल तटकरे विरूद्धअगदी निसटता विजय मिळवला. या निवडणूकीत सुनिल तटकरे या नावाचा अजून एक उमेदवार होता. त्या डुप्प्लिकेट उमेदवाराने जेवढी मते खाल्ली ती जर तटकरेंना मिळाली असती तर ते सहज जिंकले असते. (अर्थात तटकरे जिंकून यायला हवे होते....अशी माझी इच्छा नव्हती). ही डुप्लिकेट उमेदवारी गितेंनीच साँन्सर केली असावी.... अगदी जवळचे एक उदाहरण आहे. एक लांबचे ओळखीचे खासदार...२०१० च्या निवडणूकीत जिंकून आले. त्यावेळी त्यांच्या विरूद्ध एक दुसर्‍या धर्माचा तगडा उमेदवार होता. यांनी मग त्याच्याच नावाचा (आणि धर्माचा) माणूस शोधून त्याला उमेदवारी अर्ज भरायला लावला. त्याच्यासाठी पत्रके पण छापली व प्रसारही केला. वर काही पैसे ही दिले...त्या माणसाने अपेक्षेप्रमाणे काही हजारात त्या तगड्या उमेदवाराची मते खाल्ली आणि यांच्या विजयाला हातभार लावला.

In reply to by योगी९००

कानडाऊ योगेशु Sat, 11/24/2018 - 15:21
योगी९०० तुम्ही लिहिलेले किस्से ही बिलंदरपणा दर्शवतात पण हे उघडउघड डावपेच होते. मी उल्लेखिलेल्या किश्श्यात प्रत्यक्ष महिला उमेदवाराला शेवटपर्यंत गाफिल ठेवण्यात आले. तेथील अधिकार्याच्या मनात एका क्षणी त्या स्त्री उमेदवारापर्यंत ही माहीती पोहोचवण्याची प्रचंड उबळ आली होती पण महत्प्रयासाने त्याने ती दाबली.

नाखु Sat, 11/24/2018 - 15:44
निवडणुकीच्या वेळी एकाच नावाच्या (नाव आडनाव एकच)तीन चार उमेदवार म्हणून रिंगणात होते त्याची आठवण झाली. लेख आवडला. वाचकांची पत्रेवाला नाखु पांढरपेशा

पण निवडणुकीला उभे रहाण्यात नक्की काहीतरी स्वार्थ असावा. पुणे लोकसभा मतदार संघात २०१४ साली एकूण २९ उमेदवार उभे होते त्या पैकी फक्त दोन उमेदवारांना १०% पेक्षा जास्त मते मिळवता आली तर ३ उमेदवारांना १% ते १०% च्या दरम्यान मते होती, तर इतर २४ उमेदवारांना तर १% पेक्षा कमी मते मिळाली होती. या चोवीस मधले ९ उमेदवार तर ५०० पेक्षाही कमी मते मिळवणारे होते. इतकी कमी मते मिळवणारे हे लोक निवडणुकीला का बरे उभे राहिले असावे? साधारण अशीच परिस्थीती भारतातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पहायला मिळते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नाखु Sun, 11/25/2018 - 22:37
क्ष रक्कम खर्च करण्याची मर्यादा असते. हे बाजारबुणगे अधिकृत सधन उमेदवाराच्या प्रचार खर्च आपल्या नावे करुन देतात बदल्यात तोडपाणी झाल्याशी मतलब.(असं ऐकलं आहे) खखो उमेदवार बुणगे आणि कट्टर समर्थक जाणे. नाखु पांढरपेशा मिपाकर

सुबोध खरे Sat, 11/24/2018 - 19:14
ती महिला इतकी भाबडी असेल हि शक्यता फार कमी आहे विशेषतः ती मागच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभी होती म्हणून. झाडून सगळे राजकीय पक्ष असे दुय्यम उमेदवार अपक्ष म्हणून उभे करतात. उदा. कोळीवाडा असेल तर ज्या पक्षाचा उमेदवार तेथून भरपूर मते मिळवण्याची शक्यता असते तेथे दोन तीन असे कोळी समाजातील प्रतिष्ठित उमेदवार उभे करतात. या उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी प्रथितयश उमेदवार पैसे देतात हा त्यांचा फायदा असतो आणि जर उमेदवारी मागे घेतली नाही तर प्रतिपक्षाच्या फायदा असतो. हे असे सर्रास सर्वच्या सर्व मतदारसंघात चालते. म्हणून प्रत्येक मतदारसंघात असे छोटे छोटे उमेदवार रिंगणात दिसतात. सोमवार पेठ पुणे येथे माझ्या माहितीचे एक उमेदवार झाडून सर्व निवडणुकीत उभे राहत आणि खिसा गरम झाला कि शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेत. हा त्यांचा जोडधंदा साधारण ८-९ वर्षे चालू होता. तेंव्हा अशा छोट्या मोठ्या गोष्टी राजकारणात चालूच असतात. आपण पाहत राहणे आणि त्यातल्यात्यात चांगला उमेदवार निवडून देणे एवढेच आपल्या हातात असते. .

माहितगार Sun, 11/25/2018 - 14:26
ह्यात गावपातळी काय आहे? इंदिरा गांधींनी स्वतःच्याच पक्षाचा राष्ट्रपती उमेदवार पाडण्याचे काम राष्ट्रीय पातळीवर केले. राजकारणात पडद्या आड बरेच काही चालू असते. दुसर्‍या बाजूला केवळ नाव मागे घ्यावे म्हणून पैसे मिळतात म्हणून नित्यनेमाने प्रत्येक निवडणूकीत नाव मागे घेण्याच्या तारखे पर्यंत फॉर्म भरुन ठेवणारे उमेदवारही असतात. ते एक सरखी नावे भासवणे ते एक सारख्या पक्षाची नावे भासवणे हि नियमीत क्लृप्ती आहे. आपल्याला हव्या त्या पक्षाचे चिन्ह माहित असेल तर मतदार यास फार फसत नाही. आणि स्वतःच्या नेहमीच्या राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे चिन्ह मतदात्यांना सहसा व्यवस्थित माहित असते. सर्वसाधारण पणे मतदात्याचा राजकीय पक्ष वा नेता दुसर्‍या कुणा नेत्यास वा पक्षास पाठींबा देतो आणि पाठींबा दिलेल्या पक्षा बाबत नेत्या च्या निवडूक चिन्ह आणि नावांबाबत मतदाता संभ्रमात असेल तर मात्र अधिक मतांचे नुकसान होण्याची शक्यता असावी असे वाटते.

In reply to by माहितगार

कानडाऊ योगेशु Mon, 11/26/2018 - 09:50
>ह्यात गावपातळी काय आहे? ओ.के. विधानसभेच्या निवडणुका असल्याने राज्यपातळी म्हणु शकतो. पण अर्ज जमा करणे, पडताळणी करणे वगैरे कामे तहसील कार्यालयात चालु असल्याने गावपातळी असा उल्लेख केला. परुंतु ह्या निमित्ताने आपण सर्वच राजकारणाने कसे वेढले गेलो आहोत हे निर्दशनास आले. सर्व काही माहीती असुनसुध्दा वरुन येणारे फोन व त्या फोन कॉल्स ना द्यावी लागणारी टेम्प्लेट उत्तरे वगैरे सर्व पाहुन अधिकार्यांना वैताग आला होता.

In reply to by कानडाऊ योगेशु

माहितगार Mon, 11/26/2018 - 10:19
.....सर्व काही माहीती असुनसुध्दा वरुन येणारे फोन व त्या फोन कॉल्स ना द्यावी लागणारी टेम्प्लेट उत्तरे वगैरे सर्व पाहुन अधिकार्यांना वैताग आला होता.....
तसे पहाता निवडणूक राबवणार्‍या न्कर्मचार्‍यांचा संस्थात्म्क अनुभव भारतीय लोकशाही एवढाच मोठा असणार. तात्पुरते स्ट्रेस आऊट झाले तरी ह्या प्रक्रीया त्यांना नित्याच्या झाल्या असणार. मला वाटते या निवड्णूका तटस्थपणे कंडक्ट करणार्‍या आधिकार्‍यातून आणि अर्ज मागे घेणार्‍या राजकारण्यातून काही साहित्यिक अथवा आत्मवृत्त लेखक जन्मास आले तर ते अधिक रोचक ठरेलच पण समस्या अधिक नेमकेपणाने समोर येण्यास आणि समस्यांना तोडगे शोधले जाण्यात अधिक व्यवस्थित मदत होऊ शकेल असे वाटते.
...परुंतु ह्या निमित्ताने आपण सर्वच राजकारणाने कसे वेढले गेलो आहोत हे निर्दशनास आले. ...
एकदा लोकांनी लोकांची लोकांसाठीची लोकशाही चालवायचे म्हटले की राजकारणाने वेढले जाणे स्वाभाविक आहे. अर्थात उचित अनुचित याचे भान यावे म्हणून विवीध स्तरावरील लोकांचे अनुभव पुढे येणे ,आपण या धागा लेखातून चर्चा केली तशी चर्चा होत रहाणे नक्कीच गरजेचे असावे

In reply to by माहितगार

कानडाऊ योगेशु Mon, 11/26/2018 - 10:30
>एकदा लोकांनी लोकांची लोकांसाठीची लोकशाही चालवायचे म्हटले की राजकारणाने वेढले जाणे स्वाभाविक आहे. सौ टके कि एक बात कही सर तुम्ही. सर्वच अधिकारी तसे नवखे होते.आतापर्यंत केवळ राजकारण दूरवरुन पाह्त आलो आहोत. वा राजकारण फार फार तर उंबर्यापर्यंत आले इतपतच दूर (वा जवळ )आहोत अशी धारणा होती. पण ह्या निमित्ताने आपण कुणाच्या तरी खेळीचा एक भाग होतो आहोत ही जाणीव झाली. अनुभवी झाल्यावर हा प्रकारही अधिकार्यांच्या रूटीनचा भाग होऊन जाईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

माहितगार Mon, 11/26/2018 - 11:37
...अनुभवी झाल्यावर हा प्रकारही अधिकार्यांच्या रूटीनचा भाग होऊन जाईल.....
अपवाद वगळता बहुतेकांच्या . रुटीनचा भाग होण्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल पण, समस्या मुळातून समस्या समजणे समस्या विषयक संवेदना आणि उपाय शोधण्याची इच्छा होणारे, रुटीन खुपणार्‍या आणि व्यक्त होणार्‍या माणसांचीही लोकशाहीस नक्कीच गरज असावी असे वाटते.

धुळे लोकसभा २०१९ निवडणूकीत अनिल गोटे ह्यांनी फुगाहे चिन्ह घेतले होते. नंतर ६ महीन्यानी झालेल्या विधानसभेला फूगा हेच चिन्ह भाजप पुरस्कृत (शिवसेना ऊमेदवार असतानाही) अपक्ष ऊमेदवार राजवर्धन कदमबांडे ह्यांनी घेतलं. गोटे ह्यांना शिटी हे चिन्ह मिळालं. गोटेंचे फूगा चिन्ह असलेले जूने पोस्टर्स जाणून बुजुन समाज माध्यमात पसरवण्यात आले. बर्याच गोटे समर्थकांना कळालेच नाही की फुगा चिन्ह गोटेंचे आहे की कदमबांडेंचे. त्यामुळे विधानसभेला कदमबांडेंनी गोटेंची भरपुर मते खाल्ली. व गोटेंचा पराभव झाला ६ हजार मतांनी.