मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फर्जंद: थरारक युद्धपट!

निमिष सोनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(हा लेख २० जून २०१८ या दिवशी लिहिला असून त्या दरम्यान आणि नंतर वारेच दिवस मिसळपाव वर काहीतरी कारणास्तव मला लेख अपलोड करता येत नव्हते. म्हणून आता टाकत आहे) काल रात्री "फर्जंद" बघितला. तिसरा आठवडा सुरु असूनसुद्धा हाऊसफुल होता. स्टोरी (कथा), स्क्रीनप्ले (पटकथा), लिरिक्स (गीत लेखन)आणि डायलॉग (संवाद)अशा चार गोष्टी आणि त्यासुद्धा पहिल्याच चित्रपटात दिग्पाल लांजेकर याने समर्थपणे हाताळल्या आहेत. अमितराजचे संगीत आणि केदार दिवेकरचे पार्श्वसंगीत (बॅगराउंड म्युझिक) दोन्ही छान आणि समर्पक आहेत. त्यात नाविन्य आहे त्यामुळे ऐकायला छान रीफ्रेशिंग (ताजेतवाने) वाटतं. दोन गाणी मस्त आहेत: शिवबा आमचा मल्हारी आणि अंबे जगदंबे. कथा थोडक्यात अशी आहे की, सिंहगड जिंकला जातो आणि शिवराज्याभिषेक जवळ येऊन ठेपला असतो. मात्र पन्हाळा किल्ला बेशक खानच्या (समीर धर्माधिकारी) अजूनही ताब्यात असतो. बेशकचा भाऊ असतो - कामद खान! बेशक कडून नागरिकांवर आणि स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारांच्या बातम्यांनी शिवाजी महाराज (चिन्मय मांडलेकर) अस्वस्थ होतात. नेताजी पालकर उशिरा आल्याने पूर्वी पन्हाळा हातातून निसटलेला असतो, असे शिवाजी म्हणतात. मग त्यांना पन्हाळा जिंकल्याशिवाय राज्याभिषेकात अर्थ नाही असे वाटू लागते आणि जिजाऊ (मृणाल कुलकर्णी) तसेच अनाजी पंत (राहुल मेहेंदळे) बहिर्जी नाईक (प्रसाद ओक) यांचेशी विचार विनिमय करून ते पन्हाळा जिंकण्यासाठी कोंडाजी फर्झंद याला (अंकित मोहन) बोलावणे धाडतात. शिवाजींच्या मते तो शूर वाघ आहे! तो नंतर त्याच्या मर्जीतल्या फक्त साठ मावळ्यांना एकत्र करून (गुणाजी, गुंडोजी, मर्त्या रामोशी वगैरे) पन्हाळा जिंकून दाखवतो. त्याने प्रत्येकाला एकत्र करण्याचे प्रसंग थोडे थोडे "फास्ट अँड फ्युरीयस" च्या डोमिनिक टोरेटो आणि टीमची आठवण येते. बहिर्जी नाईक ठिकठीकाणी जाऊन वेषांतर करून शिवाजी महाराजांसाठी गुप्तहेरगिरी करत असतात. तसेच आस्तादने गुंडोजी छान रंगवला आहे. चित्रपटासाठी खर्च खूप केला आहे पण साठ जण गड चढतांना मात्र नीट दाखवलेच नाही आहेत, जे (माझ्यासारख्या) प्रेक्षकांना अपेक्षित होते (क्लिफ हँगर चित्रपटासारखे थोडेसे!). मोहिमेची तालीम करतांना थोडे उभट चढ चढतांना दाखवतात पण जेव्हा खरोखर मोहीम सुरु होते तेव्हा मात्र निराशा होते. थोडक्यात गड चढण्याचे विशेष असे प्रसंग नाहीतच! एवढी एक गोष्ट सोडली तर सगळं चांगलं आहे. काही प्रसंग बघताना "लगान" ची आठवण होते आणि शेवटची फर्जन्दची अति-थरारक टॉपलेस फाईट बघतांना "गजनी" मधल्या आमीरच्या (टॉपलेस) आणि पोलिसाच्या फाईटची आठवण होते. युद्ध, द्वंद्व, मारामाऱ्या, शस्त्रास्त्रे, हाणामारी यात हा चित्रपट हॉलिवूडच्या तोडीचा झाला आहे. हाणामारी चे सीन अक्षरशः धुमाकूळ घालतात! चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास भयंकर थरारक आणि श्वास रोखून बघायला लावणारा आहे. प्रशांत नाईक या अॅक्शन डायरेक्टरची कमाल म्हणायला हवी! अंकित मोहन (स्टार प्लस महाभारतातील अश्वत्थामा) अमराठी असून सुद्धा त्याने ग्रामीण मराठी डायलॉग उत्तम म्हटले आहेत आणि विशेष म्हणजे सिल्वेस्टर स्टॅलोन, आर्नोल्ड श्वार्झनेगर, रेम्बो, विन डीझेल, दारासिंग, सनी देओल, सलमान, ह्रितिक, अजय देवगण वगैरे सगळे जण लाजून लाजून चूर होतील आणि तोंडात बोटे घालतील असे द्वंद्व आणि अॅक्शन सीन त्याने दिले आहेत. प्रसाद ओकचा सोंगाड्या आणि त्याचे किसना (निखील राउत) सोबतचे शेवटचे प्रसंग तसेच केसर (मृण्मयी देशपांडे) हे दमदार आणि उत्स्फूर्त अभिनयामुळे चांगलेच लक्षात राहतात. समीर (बेशक) आणि शिवाजी (चिन्मय) यांचा अभिनय उत्तम. समीर तर डोळ्यांनीच घाबरवतो. केसर कामद खानला मारते, बहिर्जीला सोडवते. तिने पण एका छोट्याश्या फाईट सीन मध्ये जान आणली आहे. तसेच अधून मधून चित्रपटात चपखलपणे विनोदाची पेरणी केली आहे. विशेषत: भिकाजी चांभार याला पकडून आणतात तो प्रसंग! जिजाऊ यांचेकडे काही छान डायलॉग आलेले आहेत: "गजरा हा देव आणि कलावंतीण डोके येथे ठेवल्यास त्याचे नशीब बदलते. जागा बदलली की नशीब बदलते पण दृष्टीकोन (आणि जागा) बदलली की नशीब पालटते सुध्दा!" "स्त्री मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे!" "काळ आडवा आला तरी त्याला उभा फाडायची ताकद आहे आमच्या लेकरात!" तसेच इतर काही डायलॉग छान आहेत जसे: "आपण सावध असल की शत्रू आपले काही करू शकत नाही!" "आमच्या रक्ता रक्तात शिवाजी हाये. जिथं सांडल तिथं हजार शिवाजी जनमतील!" इंग्रजी सब टायटल मुळे काही गोष्टी मला कळल्या जसे: सूरमा म्हणजे brave warrier! उध उध म्हणजे Arise! जागृत हो! (उध उध अंबाबाई) मराठीत अशा प्रकारचा युद्धपट/थरारपट प्रथमच आला आहे आणि त्याचे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन स्वागत करायलाच हवे!! - निमिष सोनार, पुणे

वाचने 9925 वाचनखूण प्रतिक्रिया 29

सही रे सई Fri, 07/20/2018 - 20:14
हा चित्रपट बघायचा होताच, पण तुम्ही "युद्ध, द्वंद्व, मारामाऱ्या, शस्त्रास्त्रे, हाणामारी यात हा चित्रपट हॉलिवूडच्या तोडीचा झाला आहे" असं लिहिल्यामुळे अता अधिक उत्सुकता लागली आहे बघायची. उत्तम चित्रपट परिक्षण !!

सोमनाथ खांदवे Fri, 07/20/2018 - 20:34
' चिन्मय मांडलेकर हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चपखलपणे बसले आहेत का ? ' हा चित्रपटातील मुख्य गाभा सोडून बाकी ' सर्वोत्कृष्ट चित्रपट परीक्षण '.

ट्रम्प Sat, 07/21/2018 - 14:09
सोनार साहेब , तळी तरी किती उचलावीत याला मर्यादा असतात !! तुम्ही जुन्या काळातील शिवाजी महाराजांचे चित्रपट पाहिलेत का ? कुठलेही स्पेशल ईफेक्ट नसताना चंद्रकांत आणि सूर्यकांत अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकां समोर इतिहास उभा करत होते , त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही हा चित्रपट आणि चिन्मय मांडलेकर चा अभिनय . दिवस आणि रात्र यातील फरक नकळनाऱ्या माणसाकडून परीक्षण लिहलं गेलं आहे असं वाटतंय . या सिनेमा पेक्षा झी टी व्ही वरील संभाजी सिरीयल लाखपटीने चांगली आहे .

In reply to by ट्रम्प

चांदणे संदीप Sat, 07/21/2018 - 14:51
ते सीरियलचं सोडून बाकी प्रतिसादाशी सहमत! हॉलिवूडच्या तोडीचा सोडा किमान साऊथवाल्यांच्या तोडीचा तरी करायचा होता सिनेमा. Sandy

In reply to by ट्रम्प

धर्मराजमुटके Sat, 07/21/2018 - 20:09
प्रतिसादाशी सहमत ! चिन्मय मांडलेकर तोंड उघडत नाही तोपर्यंत बराचसा शिवाजी महाराज वाटतो. तोंड उघडल्यानंतर नाही. मी पुर्ण चित्रपट पाहतांना मनातच चंद्रकांत आणि सुर्यकांतच्या शिवाजी ची तुलना सतत करत होतो. अर्थात महाराजांवर चित्रपट बनवणे हे एक शिवधनुष्यच आहे. मात्र प्रयत्न बरा आहे असे म्हणेन.

संपत Mon, 07/23/2018 - 16:31
मी असं पूर्वी वाचलंय की हा किल्ला कोंडाजीने हशम म्हणजे मुसलमान सैनिकांची फौज वापरून जिंकला. आता नक्की लक्षात नाही.मिपावरील जाणकारांना ह्याबद्दल काही माहीत आहे का?

मराठी कथालेखक Mon, 07/23/2018 - 18:14
या चित्रपटाबद्दल आला त्यावेळी मला त्याबद्दल विशेष काही कुतूहल निर्माण झाले नव्हते. पण तुमचे समीक्षण वाचले आणि मग bookmyshow वर चित्रपटाची माहिती बघितली . चित्रपट अजून चित्रपटगृहांत चालू आहे. ८८% लोकांनी पसंत केला आहे. चित्रपटाने आतापर्यंत ९ कोटींचा व्यवसाय केला आहे. तिसर्‍या आठवड्यात ३ कोटींचा व्यवसाय झाला आहे. सध्या दिवसाला तेरा खेळ (पुणे + पिंपरी चिंचवड) चालू आहेत. म्हणजे अजून व्यवसाय होण्यास वाव आहे. हे सगळं पाहून चित्रपटाबद्दल उत्कंठा वाढली आहे. तुलनेकरिता : आपला मानूस या अलिकडच्या यशस्वी मराठी चित्रपटाने २० कोटींचा व्यवसाय केला.

In reply to by सोमनाथ खांदवे

मराठी कथालेखक Tue, 07/24/2018 - 15:40
तुमच्या दिव्य नजरेतून तुम्हाला फर्जंद सिनेमा कसा वाटला
१) दिव्य नजर म्हणजे काय ? २) माझी नजर दिव्य आहे किंवा कसे हे आपणास काय ठावूक ?

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक Wed, 07/25/2018 - 12:43
काय झालं ? माझ्या प्रश्नांची उत्तरे अजून दिली नाहीत तुम्ही.. आणि प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर उगाच माझ्या प्रतिसादांवर फालतू आणि वैयक्तिक टिपण्णी करण्याच्या भानगडीत पडू नका...

In reply to by मराठी कथालेखक

ट्रम्प गुरुवार, 07/26/2018 - 09:37
कवी , साहित्यिक, चित्रकार , शिल्पकार या कलाकारांच्या मना मध्ये नवनवीन कल्पना येत असतात व त्यांच्या हातून सृजनशीलते चा सतत आविष्कार होत असतो , म्हणून मी ' दिव्य दृष्टी ' म्हणालो . आन यव्हढं बी कळत न्हाय व्हय तुमाला ? आशे कशे तुम्ही मराठी कथालेखक ?

In reply to by मराठी कथालेखक

ट्रम्प Mon, 07/23/2018 - 22:22
युद्धातील स्पेशल इफेक्ट आणि शिवाजी महाराजांच्या भूमिके साठी चांगला कलाकार यावर 5 कोटी जरी खर्च केले असते तर किमान 50 करोड च्या पुढे हा सिनेमा जाऊ शकला असता पण आर्थिक आणि मानसिक कुवत नसल्या मूळे मर्यादा आल्या असतील .

In reply to by ट्रम्प

मराठी कथालेखक Tue, 07/24/2018 - 14:12
आर्थिक आणि मानसिक कुवत नसल्या मूळे मर्यादा आल्या असतील
शक्य आहे. पण इतक्या मर्यादा असताना जर चित्रपट चांगला चालत असेल तर यापुढे आणखी चांगले ऐतिहासिक चित्रपट बनवण्यास आणि ते चालण्यास वाव आहे असे म्हणता येईल. सुर्यकांत्/चंद्रकांत यांचे शिवाजी राजे आणि त्यांच्याशी निगडीत कथानकांवर आधारित अनेक चित्रपट होते असे मी ऐकून आहे (बघितले नाहीत), पण असे चित्रपट बनवणे जवळपास इतिहासजमा झाले आहे असे वाटत असताना जर हा चित्रपट व्यवसाय करत असेल तर ते बघून काही दिग्गज निर्माते /दिग्दर्शक इतिहासाकडे आकर्षित होवून अधिक चांगले चित्रपट बघायला मिळतील अशी आशा करता येईल. शिवाजी महाराजांच्या जीवनावर एखादा बिगबजेट हॉलीवूड चित्रपट बनायला हवा (यापुर्वी बनला आहे का ?) आणि एकाच वेळी अनेक भाषांत प्रदर्शित व्हावा.

In reply to by पुंबा

निमिष सोनार Tue, 07/24/2018 - 18:04
गजरा म्हणजे फुले ही देवाजवळ ठेवली तर त्यांचे नशीब वेगळे पण तीच फुले/गजरा करून कलावंतीण (तामाश्यातील कलाकार) च्या डोक्यावर माळला तर त्याचे नशीब वेगळे!!

सोमनाथ खांदवे Tue, 07/24/2018 - 18:17
शिवाजी महाराजांच्या जीवनावर एखादा बिगबजेट हॉलीवूड चित्रपट बनायला हवा (यापुर्वी बनला आहे का ?) आणि एकाच वेळी अनेक भाषांत प्रदर्शित व्हावा. अगदी बरोबर , पुण्यातील पर्वती ला मॉर्निंग वॉक करणाऱ्यानीं थेट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करू नये .

ट्रम्प Tue, 07/24/2018 - 19:15
शिवाजी महाराजांच्या जीवनावर एखादा बिगबजेट हॉलीवूड चित्रपट बनायला हवा (यापुर्वी बनला आहे का ?) अहो काय करताय ? मराठी कथालेखक ना तुम्ही मग तुम्हाला सिनेमा हॉलिवूड मध्ये बनला की नाही या बेसिक !! बेसिक !!! गोष्टी माहीत पाहिजे हो . नवीन पिढीचे नेतृत्व करणारे असाल तर चंद्रकांत / सूर्यकांत यांचे सिनेमे पाहिले नसतील हे एक वेळ समजू शकतो .

In reply to by ट्रम्प

मराठी कथालेखक Wed, 07/25/2018 - 12:33
अहो काय करताय ? मराठी कथालेखक ना तुम्ही मग तुम्हाला सिनेमा हॉलिवूड मध्ये बनला की नाही या बेसिक !! बेसिक !!! गोष्टी माहीत पाहिजे हो
आता नाही माहीत.. काय करणार ना ? आणि माझं GK इतकं कमी म्हणूनच नवीन पिढीचे नेतृत्व वगैरे काही करण्याच्या भानगडीत मी पडत नाहीये.. पण आता तुम्ही इतकी प्रतिसाद देण्याची मेहनत घेतलीच आहे तर अजून एक मेहेरबानी करावी. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देवून माझ्या अल्पज्ञानात काहीशी भर घालावी. धन्यवाद !!