Skip to main content

आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग ४

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/11/2018 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
कॅंडी नंतर आमचा आजचा पुढचा बेत होता नुवारा एलीया किंवा नुवा एलीया हे थंड हवेचे ठिकाण बघणे आणि तिथेच मुक्काम करणे.शिवाय जाताना वाटेत बॉटनिकल गार्डन चहाचे मळे स्ट्रॉबेरी गार्डन रॅम्बोडा फॉल्स हनुमान मंदिर हे सर्व बघत जायचे होते. सकाळी भरपेट नाश्ता करून दिवसाची सुरुवात तर मस्त झाली. हॉटेलचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि गाडी पुन्हा वळणावळणाच्या रस्त्याने धावून लागली.आता बाहेरचे दृश्य अजूनच सुंदर आणि हिरवेगार होते. १०-१०.३०चा सुमार असूनही डोळ्याला ऊन जाणवत नव्हते. लवकरच गाडी कॅंडीच्या बॉटनिकल गार्डनपाशी येऊन थांबली.महावेळी नदीच्या काठी वसलेले आणि सुमारे १५० एकर जागेत पसरलेले हे अवाढव्य उद्यान आहे.तिकीट वगैरे काढून आम्ही सर्वजण आत शिरलो. पण एव्हढे प्रचंड उद्यान बघणे काही सोपे काम नव्हते. त्यामुळे वेळेच्या दृष्टीने आणि श्रमाच्या हिशोबाने ( तेव्हढे चालणे जीवावर आले होते. म्हणून) आम्ही विद्युत वाहनाचा पर्याय स्वीकारला.ड्रायव्हरने सफाईदारपणे गाडी चालवत आम्हाला उद्यानाची सफर घडवला सुरुवात केली. d d तऱ्हेतऱ्हेची पाम ट्री , जोड नारळाचे झाड , तोफगोळ्यासारखी फळे असलेले झाड,नागचाफा आणि विशेष म्हणजे शेकडो वर्ष जुने आफ्रिकन बांबूची बेटे बघता बघता आम्ही ऑर्किडची फुले असलेल्या विभागात आलो. i a आणि विविधरंगी ऑर्किड बघून अक्षरश: वेड लागायची पाळी आली. किती फोटो काढू आणि किती नको असे होऊन गेले. a a a a अनेकरंगी अनेकढंगी ऑर्किडची नाजुक फुले मनाला अक्षरशः भुरळ पाडत होती. a a शेवटी वेळेअभावी हि सुंदर सफर आम्ही संपवली आणि उद्यानाचा निरोप घेऊन गाडीत बसून पुढचा प्रवास सुरु केला.गाडी शहरा बाहेर पडली आणि आता घाट रस्ता लागला आणि चहाचे मळे दिसायला सुरुवात झाली.दामरो ग्रुपच्या पाट्या ठिकठिकाणी दिसत होत्या त्यावरून ही श्रीलन्केची एक महत्वाची चहा उत्पादन करणारी कंपनी असावी. एका चहाच्या मळ्यात /कारखान्यात आम्ही थांबलो आणि चहा खुडण्यापासून ते वाळवून त्याची प्रतवारी करून पॅक करेपर्यंतची प्रक्रिया बघितली. b g निघताना थोडा चहा आठवण म्हणून विकत घेतला (पुन्हा एक गाढवपणा जो सगळे पर्यटक करतात ) आणि यापेक्षा आपल्या वाण्याकडे मिळणारा टाटा किंवा रेड लेबल बरा असेल असे म्हणत आपल्याच मूर्खपणावर हसत पुढच्या प्रवासाला लागलो. l पुढचा टप्पा होता भक्त हनुमान मंदिर , म्हणजे लक्ष्मणाला संजीवनी आणताना जिथे हनुमान विश्रांतीसाठी थांबला होता ती जागा.इथे स्वामी चिन्मयानंद ट्रस्टने भोजनाची सशुल्क व्यवस्था केली आहे. d भर दुपारच्या वेळी आम्ही तिथे पोचलो होतो त्यामुळे देऊळ मात्र बंद होते.बाहेरूनच दर्शन शेरून आणि जेवून आम्ही पुढे निघालो.वाटेत रॅम्बोडा फॉल्स बघून आणि स्ट्रॉबेरीच्या मळ्याला बगल देऊन आम्ही सरळ नुवा एलियामध्ये दाखल झालो. नुवा एलीया हे ब्रिटिश लोकांनी विकसित केलेले थंड हवेचे ठिकाण आहे आणि त्यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे ग्रेगरी तलाव ज्या बोटिंग आणि इतर जलक्रीडा उपलब्ध आहेत. e विशेष म्हणजे इथे आमचा मुक्काम एका ब्रिटिश कालीन बंगल्यात होता जो मुळात एका एअर फोर्सच्या अधिकाऱ्याने बांधला आहे. बंगल्याच्या दारातून किंवा गॅलरीतून समोरच हा ग्रेगरी तलाव दिसत होता. o बऱ्याच दिवसांनी चहाचा कप हातात घेऊन तलावाकडे बघत गप्पा मारत बसण्याचे सुख अनुभवले. सायंकाळी तलावाभोवती एक चक्कर मारली आणि बोटिंगचाही आनंद लुटला. s आता हळूहळू अंधार पडू लागला होता आणि दिवसभर उन्हात फिरून थकायला झाले होते. त्यामुळे आजचा कार्यक्रम आटोपता घेऊन हॉटेलवर परत आलो आणि फायरप्लेसभोवती बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊन गाढ झोपी गेलो.

वाचने 9476
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

नाश्ता जेवणात कोणते पदार्थ होते, त्याची। चव स्थानिक वैशिष्ट्ये, एन्ट्री फी,बोटिंग तिकिटाचे शुल्क वगैरे

फोटो आता नीट दिसत आहेत. थोडे सविस्तर लिहायचे तर नाश्ता साधारण हॉटेलांमध्ये मिळतो तसाच होता. म्हणजे आम्लेट, ब्रेड, चीज, जॅम सॉस वगैरे. शिवाय काही ठिकाणी डोसा किवा शेवई उपमाहि मिळाला. साम्बार चटणी असतेच, फळे आणि ज्युसही मिळते. फळांमध्ये सगळीकडे अननस केळी कलिंगड पपई हिच चार फळे मिळाली. पण अननसाची चव अप्रतिम होती. अजुन एक म्हणजे म्हणजे व्हेज खाणार्‍या लोकांनी नाश्ता भरपेट करावा कारण बाहेर चांगले व्हेज मिळेलच असे नाहि. मासे आणि चिकन प्रेमी मात्र विनात्रास फिरु शकतात. भात आणि ताक दही सुंदर मिळते. त्यामुळे रात्रीच्या जेवणाचा प्रश्न नाही. याला नॅशनल पार्क ला जाताना तर रस्त्या च्या बाजुनेच मातीच्या भांड्यात दही लावुन विकणारी भरपुर दुकाने होती. कारण तिकडे म्हशी पालन खुप होते.त्यामुळे दुभते भरपुर. शिवाय आपल्या पिशवीत काहि कोरडे पदार्थ ठेवलेले उत्तम. राजगिरा लाडु, चिवडा, फरसाण, बिस्किटे, वगैरे कधीही कामाला येते. सगळीकडे एंट्री फी फार जास्त आहे. माणशी २० किवा ४० यु.एस.डी सहज .तो खर्च मी विचारात घेतला न व्हता त्यामुळे बजेट बोंबलले. अधिक माहिती हवी असेल तर एजंट्चे नंबर देउ शकतो. गुगलुनही मिळेलच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नवख्या भागात व्हेज जेवणाची सोय आहे का नाही ते बघूनच जाण्ययाचे नियोजन करता येईल. त्यामुळे ही माहिती विचारली. धन्यवाद

उत्तम प्रवासवर्णन.. संपूर्ण सहलीचा एकूण खर्च किती आला सांगू शकाल का? ५ जणांच्या कुटुंबासाठी किती येईल साधारण? तसं नसेल सांगता येत तर माणशी किती आला हे कळले तरी उत्तम

In reply to by गतीशील

माणशी साधारण २५ हजार विमान तिकिटासाठी आणि २० हजार सहलीसाठी (कोलंबो ते कोलंबो) असे सांगता येईल. त्यात जर तुम्ही जास्त ठिकाणे बघितली तर प्रत्येक ठिकाणी प्रवेश फी वाढु शकते किवा दिवस कमी जास्त केले तरी फरक पडु शकतो. शिवाय ३ महिने आधी नियोजन केले तर थोडे पैसे वाचतील असे वाटते. २ लहान मुले असल्यास ४ जण एका खोलीत राहु शकतात त्यानेही फरक होउ शकतो. शॉपोहोलिक नसाल तर पैसे वाचु शकतात :) ह. घ्या.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

र.च्या.क.ने. तुमच्या प्रतिसादात जड घेण्यासारखे नाहीये..

फोटो सुंदर, माहिती छान त्यामुळे स्वता (चकटफू) फिरून आल्यासारखे वाटले.