Skip to main content

वर्ष-अखेरच्या सुट्टीसाठी ठिकाण सुचवा

लेखक लई भारी यांनी गुरुवार, 28/09/2017 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही दोघे नवरा-बायको आणि दीड वर्षाच्या जुळ्या मुली, कुठेतरी निवांत ठिकाणी जायचं म्हणतोय. २३ डिसेंबर ते १ जानेवारी असा कालावधी उपलब्ध आहे; तरी त्यातल्या त्यात गर्दी कमी असावी म्हणून २६-३० डिसेंबर असा ४-५ दिवसाचा प्लॅन करावा असं डोक्यात आहे.(मागे पुढे करू शकतो) मुली लहान असल्यामुळे खूप दगदगीचा प्रवास नकोय आणि स्थलदर्शन पेक्षा निवांत वेळ घालवणे हा हेतू आहे. त्या दृष्टीने गोवा आयडियल होते, पण खूप गर्दी असेल असे वाटते. मी सध्या कूर्ग आणि उदयपूर चा विचार करतोय. बजेट अगदी फिक्स नाही(अंदाज नाही म्हणा हवं तर), पण जास्तीत जास्त एखादा विमान प्रवास(पुण्यावरून/पुण्याला) आणि फॅमिली साठी चांगल्या सुविधा(स्विमिंग पूल वगैरे नाही, पण एकंदरीत सर्विस, चांगलं खाणं) असणार हॉटेल असावं. कोल्हापूर/पुण्यावरून स्वतःची गाडी घेऊन निघू शकतो(एक कार-सीट आहे मुलीसाठी), बस/ट्रेन मध्ये मुली किती वेळ बसू देतील हा प्रश्न आहे :) मी अगदी कोकणापासून सुरुवात करून श्रीलंकेपर्यंत विचार करून बसलोय पण काही पक्के होत नाहीय! खूप restrictions आणि बराच गोंधळ होतोय, मान्य आहे! :) त्यामुळे आपल्या सूचनांचं स्वागत आहे. (इतरही काही सूचना असतील, मुलींसोबत प्रवासासाठी, तर उत्तमच!)

वाचने 5780
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

कूर्ग किन्वा उदयपूर ? ? की दोन्ही याच सुट्टीमधे बघणार आहात ?

In reply to by कपिलमुनी

हो, दोन्ही पैकी एकच करणार आहे, पण बघताना ह्या दोन्हीचा विचार करत होतो. पण ह्यांच्याशिवाय सुद्धा काही पर्याय चालेल. 'किंवा'/'आणि' वर टंकताना अडलो होतो, पण म्हटलं अजून वेळ आहे; विचार काय दोन्हीचा करू! :)

ईकडे भरपूर निवांत वेळ असतो शीवाय गर्दिही अजीबात नसते. डिसेंबर - जानेवारी असल्यामूळे हवामानहि अतिशय उत्तम असते. मोठे मोठे मॉल्स पहण्याशीवाय ईकडे दुसरं काही पहण्यासारखं नाही तेव्हा फॅमीली सोबत भरपूर अगदि क्वॉलीटी टाईम घालवता येईल.

थायलंडचा विचार करा. ५ -६ दिवसात बसेल. बँकॉक, पट्टाया, जमल्यास फुकेट २-२ दिवस प्रत्येकी.

एक सूचना -- तटवर्ती कर्नाटक करा. दांडेलीचे जंगल, गोकर्ण, जोग धबधबा, मरवंथे, बैन्दूर, कारवार समुद्र किनारे, उडुपी, इडगुंजी,मुर्डेश्वर येथील मंदिरे. दोन दीड वर्षाच्या जुळ्या मुली आहेत तर हा प्रवास तुम्हाला स्वतःच्या मोटारीने करता येईल शिवाय पुण्याहून अंतरही आवाक्यातील आहे. कर्नाटकातिल किनारे गोव्याइतकेच सुंदर असून अतिशय स्वस्त आणि स्वच्छ असतात. शिवाय वर्ष अखेरीस दारू पिऊन धिंगाणा घालायला टिनपाट लोक नसतील. दक्षिण भारत असल्याने लहान मुलींच्या खाण्यापिण्याचीही आबाळ होणार नाही. स्वच्छ इडली डोसा दाक्षिणात्य पदार्थ ( ज्याने पोट बिघडणार नाही) आणि दुधाचे पदार्थ मुबलक मिळतात. अतिशय हिरवागार असा प्रदेश असून रस्ते पण सुंदर आहेत. स्वतःची गाडी असेल तर मुलींची खेळणी पुस्तके आणि बऱ्याच सोयीच्या वस्तू हि घेऊन जाता येतील. आपली गाडी कोणती आहे? जर मागची सीट पाडून मोठी जागा करता येत असेल तर तिथे चक्क एक गादी घेऊन जा म्हणजे दुपारी गाडी चालवताना मुली कंटाळल्या तर त्यांना गादीवर शांतपणे झोपता येईल. माझी मुले लहान असताना माझ्याकडे मारुती ८०० होती त्यात अशी सोय मी नेहमी करत असे. गाडीने जाणार असाल तर रात्रीचा प्रवास टाळा एक तर सुरक्षेच्या दृष्टीने चांगले आणि लहान मुले कंटाळतात आणि किरकिर करतात आणि त्यामुले गाडी चालवताना आपले लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. पहा हा एक पर्याय म्हणून

In reply to by सुबोध खरे

हा खरं तर अगदी माझ्या मनातला प्लॅन आहे आणि तुम्ही सांगितलेल्या बाकी विचारांशी अगदी सहमत आहे. आपली गाडी घेऊनच जावं असं खूप वाटतंय, कुटुंबाला तयार करतो ;-) सुट्टीत अनायसे कोल्हापूर-निपाणी पर्यंत जाणं होईलच, त्यामुळे प्रवास तसा अजून कमी होतोय. आणि खाण्या-पिण्याच्या बाबतीत सगळ्यांनाच ते आवडून जाईल असं वाटतंय. गाडी झेस्ट आहे, त्यामुळे सीट पाडण्याचा पर्याय नाही :( आपण सांगितल्या प्रमाणे १-२ दिवस दांडेली/घाटमाथ्यावर घालवून ३-४ दिवस तटवर्ती भागात जायला आवडेल. दांडेली भागात चांगले हॉटेल/रिसॉर्ट माहित आहे का? तसेच गोकर्ण/कारवार या भागातील सुद्धा काही हॉटेल माहित असल्यास नक्की सांगा. मित्रांसोबत हळेबीड-बेलूर-चिकमंगळूर-शृंगेरी-मुरुडेश्वर-गोकर्ण असा प्रवास अगदी ह्याच कालावधीत डिसेंबर २०१२ ला केला होता, त्यावेळी गोकर्ण चा अनुभव इतका चांगला नव्हता. पण एकंदरीत आवडलं होत सगळं, विशेषतः घाट उतरून जायच्या आधी तर खाण्या-पिण्याची चंगळ आणि एकदम शांत वाटत होत!

In reply to by लई भारी

आमच्या २०१२ च्या ट्रिप चा वृत्तांत इथे आहे. आता मिपा वर टाकायला कंटाळा करतोय त्यामुळे फक्त लिंक!

दोन लहान मुली असल्याने जमल्यास स्वतःच्या गाडीने करता येईल असे स्थळ निवडा. विमान प्रवासात आणि त्या अगोदर विमान तळावर घालवावा लागणाऱ्या वेळामुळे लहान मुलं कंटाळतात आणि किरकिरी होतात आणि त्याने तुमची पण मनस्थिती कावलेली होते. आजकाल कोणत्याही विमानतळावर मासळीबाजारासारखी गर्दी असते आणि तुम्ही जाताय ती वेळ तर जगभरातील नाताळच्या सुट्ट्यांची आहे. मुली थोड्या मोठ्या झाल्या कि हाच विमान प्रवास जास्त सोयीचा होईल.

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद! मुली लहान असल्याने भारता बाहेरचा प्रवास टाळावा म्हणतोय. त्यामुळे कुवेत/थायलंड इ. बुकमार्क करून ठेवतो :) केरळ/हैदराबाद ला जाऊन आलोय एकदा, दोन्ही आवडलं होत! बघू परत केव्हा जमतंय. गोवा मनात आहे पण गर्दी मुळे टाळतोय. काहीच नाही तर मग गोवा आहेच :)

बांद्रा ते जयपूर गरीब रथ मिळेल (3Tier AC Only more than 300 seats are available 915/- Per in last week of DEC16 as on today )