मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एलापुरातील चित्रे - उत्तर अजिंठा चित्रशैली.

प्रचेतस · · भटकंती
अजिंठा लेणीसमूहाच्या निर्मितीनंतर विशेषतः पहिल्या क्रमाकांचा विहाराचा निर्माता राजा हरिषेणाच्या मृत्युनंतर वाकाटकांच्या वैभवशाली राजवटीचा लवकरच अस्त झाला. तदनंतरच्या धामधुमीच्या काळात चालुक्य, कलचुरी अशा राजवटींनंतर येथे राष्ट्रकूटांची प्रबळ सत्ता निर्माण झाली. कलचुरींच्या काळातच एलापूर - वेरूळ येथे लेण्यांची निर्मितीची सुरुवात होऊ लागली त्या शिल्पकलेचा राष्ट्रकूटांच्या कारकिर्दित कळस गाठला गेला. वाकाटकांच्या अस्तानंतर बेकार झालेल्या शिल्पकारांच्या पिढ्यांनीच वेरूळ निर्मितीस हातभार लावला असे काही संशोधक मानतात. विहारांमधे कोरलेली जातककथा तसेच बुद्धाच्या जीवनप्रसंगांचा उल्लेख असणारी रंगेबिरंगी चित्रे हे अजिंठा लेणीचे प्रमुख वैशिष्ट्य. अजिंठा लेणीतील चित्रांची शैली जगप्रसिद्ध होऊन 'अजिंठा शैली (अजिंठा स्कूल ऑफ आर्ट्स)' ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. ह्याच शैलीत काळानुरुप थोडाफार बदल होऊन अशी चित्रे वेरुळ लेणीत रंगवली गेली. ह्या शैलीला 'उत्तर अजिंठा चित्रशैली (पोस्ट अजिंठा स्कूल ऑफ आर्ट्स)' असे ओळखले गेले. ही चित्रे कैलास एकाश्ममंदिराच्या सभामंडपातील छतावर आणि नंदीमंडपातील छत आणि भिंतींवर दिसतात. याखेरीज एलापुरातील जैन लेणीतील क्र. ३२ व ३३ - इंद्रसभा व जनन्नाथसभा ह्या दोन लेण्यांतही फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. कैलासातील चित्रांमध्ये काही पौराणिक प्रसंग, तसेच नक्षीचे रंगकाम केलेले दिसते तर जैन लेण्यांतील चित्रांमध्ये गोमटेश्वर, पार्श्वनाथ, महावीर यांची चित्रे, काही नृत्यप्रसंग, वाद्यप्रसंग, यक्ष-यक्षिणी तसेच फुलाफुलांची, चौकटीची असे नक्षीकाम चित्रांकित केलेले आढळते. वेरूळमधील शेवटच्या जैन लेणीच्या निर्मितीपर्यंत म्हणजे साधारण ११ व्या शतकापर्यंत ह्या चित्रांची निर्मिती होत राहिली. राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर ह्या अजिंठा शैलीचा उत्तर अजिंठा चित्रशैलीच्या रूपाने असलेला उरलसुरला दुवाही निखळून गेला व चित्रशैली संपूर्णपणे लयास गेली. उत्तर अजिंठा चित्रशैलीतील ह्या वेरूळलेण्यांतील डॉक्युमेन्टेशनचा शोध घेण्याचा मी बराच प्रयत्न केला पण त्याचे कुठलेही संदर्भ मला मिळाले नाहीत. त्यामुळे ह्या लेण्यांतील बहुतांश चित्रे नेमक्या कुठल्या प्रसंगांची आहेत हे सांगता येत नाही. पर्यायाने त्यांचे वर्णनही मला येथे देता येणार नाही. त्यामुळे आता पुढे फक्त येथील चित्रांची मोजकी छायाचित्रे देतो. सर्वप्रथम कैलास लेणीतील काही चित्रे पाहूयात. १. येथे नृत्यप्रसंग रंगवलेला आहे. a २. ह्याच चित्रपट्टीकेतील ही अजून एक नृत्यमुद्रा a ३. अजून एक a ४. ही सलग अशी चित्रपट्टीका a वरील तीन्ही चित्रे कैलासाच्या सभामंडपातील अंतराळाअलीकडील बाजूच्या छतावर आहेत. ह्या खेरीज नंदीमंडपातील भिंतींवर छतानजीक काही चित्रे आहेत ती पुढीलप्रमाणे ५. ह्या प्रसंगाचा अजिबातच उलगडा होत नाही. a ६. हा बहुधा रेड्यावर आरूढ यम असावा. a ७. हा एक बटू दिसतोय. a ८. नंदीमंडपातील छतावरील नक्षीकामाचे उरलेले अवशेष a ह्याखेरीज इतरही काही चित्रे येथे आहेत पण बहुतेक सर्वच ओळखण्यापलीकडची आहेत. ह्यानंतरची चित्रे बघण्यासाठी आपल्याला थेट जैन लेणीतील इंद्रसभा व जनन्नाथसभा ह्या दोन लेण्यांत जावे लागते. ह्या दोन्ही लेण्यांच्या भव्य मंडपात छतावर व भिंतींवर असंख्य चित्रे आहेत जी बघण्यासाठी विजेरीशिवाय पर्याय नाही. ९. छतावर रंगवलेले भगवान महावीरांचे ध्यानमुद्रेतील चित्र. a १०. दोन स्तंभांदरम्यान असलेले छतावरील रंगकाम a ११. a १२. भवान महावीरांचे अनुयायांसह असलेले प्रवचनमुद्रेतले चित्र a १३. हे इथले मला सर्वाधिक आवडलेले चित्र. अतिशय सुरेख समतोल साधला गेलाय ह्या चित्रामध्ये. a १४. हे अजून एक नृत्यमुद्रेतील चित्र a १५. येथे सर्व स्त्रिया बसून बहुधा महावीरांच्या प्रवचनाचे श्रवण करत असाव्यात असा त्यांच्या हात जोडलेल्या अवस्थेवरुन तर्क लावता येतो. a १६. झूम इन a १७. येथे पुरुषप्रतिमाही तशाच मुद्रेत आहेत. a १८. झूम इन a १९. हे अक अत्यंत पुसट असे चित्र a २०. हे चित्र मला थेट अजिंठ्यातील १७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील ओसरीचे भितीवर रंगवलेल्या वेस्संतर जातकातील चित्राची आठवण करुन देते. a २१. नृत्य का ध्यान का दोन्ही? a २२. हे बहुधा घोडे, हरिण दिसत आहेत. a २३. महावीरांची ध्यानमुद्रा व त्याखाली भलाथोरला वृक्ष a २४. सर्वात उजवीकडे वाघावर स्वार असा कुणीतरी दिसतोय. a २५. स्तंभांवरची देखणी नक्षी a २६. स्तंभांदरम्यानच्या छतावरची देखणी नक्षी a २७. छतावरील नक्षीचे अवशेष a २८. छतावरील नक्षीचे अवशेष a २९. गोमटेश्वराचे चित्र. महावीर छातीपर्यंत येणार्‍या जलामध्ये उभे राहून तप करत आहेत. त्यांच्या हातापायांना वेलींनी विळखा घातलेला आहेत तर बाजूला दोन अनुयायी आहेत. a वरील चित्र इंद्रसभेतील मुख्यमंडपाच्या बाहूस असलेल्या उपलेण्यात आहे. ह्या मुख्य मंडपाचे दोन्ही बाजूस अशीच उपलेणी असून त्या तील गाभार्‍यात अत्यंत अंधारात ही चित्रे रंगवलेली आहेत. ही चित्रे शोधणे माहितगाराशिवाय दुरापास्त आहे. संपूर्ण गाभार्‍याच्या तिन्ही बाजूच्या भिंती, छत यांवर ही चित्रे कोरलेली आहेत. गाभार्‍याचे दरवाजाचे आतील दोन्ही बाजूचे भिंतीवर एकीकडे गोमटेश्चर तर दुसरीकडे पार्श्वनाथ आणि इतर बाजूस व छतांवर वेगवेग़ळे प्रसंग तसेच नक्षीकाम. यातील पार्श्वनाथाचे चित्र मजकडून गहाळ झाले. ह्या उपलेण्यांतीलच अजून काही चित्रे आपण पाहूयात. ३०. गोमटेश्वर मुखदर्शन a ३१. छतांवरील रंगकाम a ३२. हे एक अतिशय देखणे चित्र a ३३. चित्रपट्टीका a ३४. फुलाचे देखणे रंगकाम a ३५. ही एक देखणी जोडी a ३६. ही अजून एक चित्रपट्टीका a ३७. झूम इन a ३८. ही अजून एक नृत्यमुद्रा a ३९. ह्यांचे दागदागिने अगदी उठून दिसत आहेत. a खाली दिलेले ह्याविषयी मी अजूनही संभ्रमात आहे. ह्या चित्रात नर्तिकेला (का नर्तकाला?) आठ हात दाखवलेले असून ती एका लयीत नृत्य करीत आहे. दोनपेक्षा जास्त असलेली चित्रे जैन लेण्यांत बहुधा नाहीतच. डाव्या बाजूचे खालचे बाजूस वादक तबला व डग्गा वाजवत आहेत. तबल्याचे हे बहुधा सर्वात प्राचीन चित्रांकन असावे. आठ हात जरी असले तरी हे जैन लेणीतील चित्र असल्याने हा नटराज शिव निश्चितच नाही हा तर्क सहजच काढता येतो. मग हे चित्र कोणाचे असावे असा प्रश्न उपस्थित होतो. माझ्या अंदाजाप्रमाणे हे चित्र बहुधा चक्रेश्वरी यक्षीचे असावे. ८ हात हे तिचे एक लक्षण आहे. ४०. हेच ते चित्र a आतापर्यंत आपण एलापुरातील लेण्यांमध्ये असलेली काही चित्रे पाहिली. यांखेरीज अशाच प्रकारची दुसरीही असंख्य चित्रे येथे रंगवलेली आहेत. प्रत्येक चित्राचे छायाचित्र घेण्यासाठी येथे जवळपास २ दिवस ठाण मांडून बसावे लागेल. वेरूळला जेव्हा केव्हा याल तेव्हा ह्या उत्तर अजिंठा चित्रशैलीतील चित्रे पाहण्यास अजिबात विसरू नका.

वाचने 10731 वाचनखूण प्रतिक्रिया 29

कपिलमुनी 05/05/2015 - 17:21
अप्रतिम आणि माहितीपूर्ण !
जी बघण्यासाठी विजेरीशिवाय पर्याय नाही.
मग त्यांनी कोणत्या प्रकाशात ही चित्रे काढली असतील?

In reply to by कपिलमुनी

प्रचेतस 05/05/2015 - 21:56
नक्की नाही सांगता येत. पण अजिंठा लेणीसारखीच दिवसाच्या विशिष्ट वेळी सूर्यप्रकाश परावर्तित करून काढली असावीत. पण ह्यातील काही लेण्यांमध्ये कुठल्याही वेळी सूर्यप्रकाश येणे अवघड आहे. अशा वेळी माझ्या मते मशालीचा उजेड वापरला गेला असावा.

In reply to by प्रचेतस

कपिलमुनी 07/05/2015 - 12:22
मशाल असती तर काजळीचा धोका निर्माण होउन चित्रे खराब झाली असती. पूर्वी असाच प्रश्न पिरॅमिडसंदर्भात उपस्थित झाला होता . पूर्ण बंद पिरॅमिड मधे सुद्धा आत वस्तू ठेवताना मशाली वापरल्या असतील तर काजळी किंवा दगडांना काळेपणा आला नव्हता. बहुधा ममी भाग १ मधल्यासारखी ट्रिक वापरली असावी.

In reply to by कपिलमुनी

प्रचेतस 07/05/2015 - 12:30
काजळीचा धोका आहेच. पण येथील काही लेण्यांत नैसर्गिक प्रकाशाचा वापर करुन चित्रे काढणे अशक्य आहे. त्यामुळे अगदी कमी तीव्रतेचा कृत्रिम प्रकाश वापरुन हे काम केले गेले असावे.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 08/05/2015 - 01:22
अंधारात चित्रे कशी रंगवली असतील ? या बद्दल दोन-तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रश्न नुस्ती चित्रे काढण्यापुरता नसून ती नंतर अनेक-- कदाचित शेकडो -- वर्षे बघितली पण गेली असणार. एक तर आजचा पर्यटक अल्प काळासाठी बाहेरील उजेडातून आत जातो, त्यामुळे जसे आपल्याला सिनेमा गृहात शिरल्यावर पहिली काही मिनिटे काहीच दिसत नाही, तसे होत असते, कारण डोळ्यांचे छिद्र aparture बाहेर असताना अगदी लहान असते, ते हळूहळू मोठे होते. गुहांमधे दीर्घ काळ बसून राहिल्यास हळू हळू चित्रे स्पष्ट दिसू लागतात, हे मला भारतीय पुरातत्व विभागाचे भूतपूर्व डायरेक्टर जनरल कै. मदन देशपांडे यांनी मी त्यांना याबद्दल विचारल्यावर सांगितले होते. दुसरे म्हणजे आजचा धूळ-प्रदूषणयुक्त शहरात, लहान लहान घरात राहणारा (हल्ली आपल्याला खूप दूरवर डोळे फोकस करण्याची सवय राहिलेली नाही) टीव्ही, मोबाईल, संगणक, वर्तमानपत्रे वगैरेंचा अतिरेकी वापर करणारा अधू दृष्टीचा माणूस आणि हजार वर्षांपूर्वीच्या, या सर्वांपासून मुक्त - नैसर्गिक वातावरणात राहणारा, नैसर्गिक अन्न खाणारा, दूरवर दृष्टीक्षेप करत राहणारा माणूस, यांच्या दृष्टी-क्षमतेतील फरक. उदाहरणार्थ आपण संग्रहालयात जुनी चिलखते , शस्त्रास्त्रे वगैरे बघतो, ती आपल्याला आज उचलता सुद्धा येणार नाहीत, ती अंगावर चढवून, मैलोनमैल पायी वा घोड्यावर दौडून पूर्वीचे सैनिक दिवस दिवस युद्ध करायचे. अर्थात तेंव्हाच्या आणि आताच्या मानवाच्या शारीरिक क्षमतेत खूपच बदल घडून आलेले आहेत. या बाबतीत एक गंमतीदार आठवण म्हणजे दिल्लीत अभिमन्यु वर नाटक झाले होते, त्यात अभिमन्युचे काम करणारा, माझ्या ओळखीचा तरूण होता. नाटकाच्या शेवटी दोन-तीन मिनिटाचा युद्ध प्रसंग होता, त्यात हातात थर्मोकॉलचे रथाचे चाक घेऊन लढण्याचा नुस्ता लटका अभिनय करणारा तो तरूण नंतर घामाघूम होऊन आत आला, आणी कोकाकोलाची बाटली तोंडाला लावून सोफ्यावर कोसळला. मला हे बघून हसूच आले होते. महाभारतातल्या खर्‍या अभिमन्यु मधे किती शक्ती असेल ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 05/05/2015 - 21:57
नाही हो. ह्या लेण्यांत जेव्हा केव्हा गेलोय तेव्हा तेव्हा तीन तासांपेक्षा जास्त कधीही नाही.

चित्रगुप्त 05/05/2015 - 23:07
उत्तर-अजिंठा चित्रशैली, ही मूळ अजिंठा शैलीचा र्‍हास होतानाच्या काळातली असावी, असे या चित्रांवरून वाटले. अर्थात सरसकटपणे असे म्हणणे योग्य ठरणार नाही, कारण प्रत्येक कलावंताचे कसब व समज हे कमी-जास्त असणारच, शिवाय हजारेक वर्षांनंतर उरल्या-सुरल्या चित्रांवरून काही मत प्रदर्शित करणेही फारसे योग्य नव्हे. पूर्वी कला, कसब, कारागिरी वगैरे एका पिढीपासून पुढल्या पिढीत लहानपणापासून संक्रमित होत असल्याने आता आपल्याला कठीण वाटणारे काम सहजपणे केले जात असावे. (आताचा प्रत्येक कलावंत हा पुरेसा मोठा झाल्यावर आपापल्या कष्टाने सुरुवातीपासून कला शिकत असतो) तसेच एकाच चित्रात दोन-तीन चित्रकार काम करायचे, हे अजूनही राजस्थान वगैरेतील पारंपारिक चित्रात बघायला मिळते. म्हणजे एक जण आधी मानवाकृती काढणार, दुसरा फक्त डोळे रंगवणार, तिसरा झाडे, चवथा इमारती, पाचवा सोन्याचे काम करणार, वगैरे. असे पाश्चात्य कलेतही होते, गंमत म्हणजे हल्लीचे आघाडीचे म्हणवले जाणारे कलावंत (उदा. मनजीत बावा, गुजराल इ.) तर या सर्वांवर कडी करून दुसर्‍यांकडून संपूर्ण चित्र, मूर्ती इ. बनवून घेऊन स्वतः धंद्याची आघाडी संभाळत असतात. आपण अतिशय आवडीने आणि समर्पणाने हे काम करत आहात, हे फार कौतुकास्पद आहे. एकादे मोठे प्रदर्शन भरवावे, आणि पुस्तकरूपात प्रसिद्ध करावे, असे सुचवतो.

कंजूस 06/05/2015 - 04:21
+१० वल्ली . एलापुरातील लेण्यांची तोंडे उत्तरेस आहेत त्यामुळे प्रखर असा प्रकाश आत येत नाही. १)अल्ट्रावाइलट कॅम्रा वापरून कोणी प्रकाश चित्रण केले आहे का? २)श्रीलंका च्या "सिगिरिया" (=स्वर्ग)आणि अजिंठा चित्र शैली यावर एक लेख लिहिणार का? [श्रीलंका भेट /कट्टा आयोजन जाहिर करा ]•

In reply to by कंजूस

प्रचेतस 08/05/2015 - 09:21
)अल्ट्रावाइलट कॅम्रा वापरून कोणी प्रकाश चित्रण केले आहे का?
याबद्दल काहीच कल्पना नाही पण बहुधा असे चित्रीकरण कोणीच केले नसावे.
२)श्रीलंका च्या "सिगिरिया" (=स्वर्ग)आणि अजिंठा चित्र शैली यावर एक लेख लिहिणार का?
सिगिरियाबद्दल काहीच माहिती नाही. अजिंठा चित्रांमागच्या थोड्याफार कथा सांगू शकेन पण चित्रशैलीच्या दृष्टीने लेख लिहिणे नाहीच जमू शकत. चित्रगुप्त काका शैलीच्या अनुशंगाने लिहू शकतील.

सुहास झेले 07/05/2015 - 03:32
अफाट.....आमच्या दौऱ्यात इथे भेट द्यायचे राहून गेले राव.. :(

यसवायजी 08/05/2015 - 07:01
चित्रांना सलाम.चित्रकारला सलाम. तुमच्या चिकाटीला सलाम. _/\_ वेरूळला जेव्हा केव्हा याल तेव्हा यापैकी कुठल्या गुहेत राहता आपण? :D जाल रे जाल.

बॅटमॅन 08/05/2015 - 14:46
हे एकदम अपरिचित आहे माझ्यासाठी. महाराष्ट्रात चक्क राष्ट्रकूटकालीन म्यूरल्स आहेत ही न्यूज़च आहे माझ्यासाठी. एकच नंबर भारी रे वल्ली!!!!

पैसा 12/05/2015 - 14:59
ही चित्रकला अद्भुत आहे! अजिंठ्याच्या चित्रांबद्दल सगळ्यांना माहीत असते. मात्र वेरूळलाही अशी चित्रे आहेत हे फार कोणाला माहीत नसतेच! माझ्याकडे 'वेरूळची लेणी' हे १९०० सालचे त्रिंबक गंगाधर धनेश्वर यांनी लिहिलेले वेरूळचे वर्णन करणारे पुस्तक डिजिटल लायब्ररीतून डाऊनलोडले आहे. त्यात या चित्रांचा उल्लेख आहे.

मदनबाण 12/05/2015 - 15:10
हापिसातुन सगळे फोटो काही उघडत नाहीयेत... घरला जाउन पाहतो. बाकी कलाकार लोकांनी छतावरची चित्रे कशी काढली असतील बरं ? म्हणजे पाण्याच्या घंगाळ्यात सुर्याचा प्रकाश परावर्तीत करुन वगर्रै किंवा इतर काही एक पद्धतीने वगर्रै म्हणु एक वेळ, पण चित्रे छतावर कशी काढली असतील ? कठीण आहे सर्व तरीही महान कलाकॄती काढण्यात कुठेही कसुर जाणवत नाही ! :)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.