अमृतसर ५ - खादाडी
पंजाबी खाणं म्हटलं की डोळ्यापुढे सरसो का साग, मकई रोटी, छोले भटुरे, आलु गोबी, तडका दाल, पनीर चे नाना चमचमीत पदार्थ, खुसखुशीत रोट्या, नान, पराठे, कुलचे डोळ्यापुढे येतात. जोडीला पंचरंगा आचार आणि मसाला पापड हवेतच. भरल्या पोटी हौसेनं लस्सी हाणणं आलच. त्यात अमृतसर हे कुलचा साठी प्रसिद्ध.
लस्सी ही पिण्याची चीज नसून खायची चीज आहे हे इथे समजते.
लस्सीमध्ये मलई नेहेमीच घालतात पण ग्यानचंदच्या लस्सीमध्ये मलई बरोबरच मस्तपैकी अंड्याएवढा ताज्या लोण्याचा गोळाही असतो. लस्सीच्या ग्लासाबरोबर चमचा का देतात ते इथे खरं समजतं. सकाळ दुपार संध्याकाळ लस्सी ही हवीच. इथली सुरेख हवा आणि रुचकर पदार्थ यामुळे चार घास जास्तीच जातात. खरतर सकाळी नाश्त्याला पराठे, कुलचा वगैरे खायची सवय नाही पण इथे येउन इडली डोसा खायचा म्हणजे हद्द झाली. मिठाया या साजुक तुपात बनतातच पण दाल माखनीमध्येही साजुक तुपाचा घमघमाट असतो. सरसोच्या तेलातल्या जवळपास पिकवलेल्या अगदी ताज्या भाज्या अप्रतिम.
इथे होटेलची आणि खाद्यगृहांची रेलचेल. मी जिथे जिथे गेलो ती सर्व ठिकाणे चविष्ट निघाली. फ्लॉवर ही सर्रास आणि सर्वत्र मिळणारी भाजी पण अमृतसरच्या बिग ब्रदर ढाबामध्ये आलु गोबी खाण्यातली मजा काही औरच. हिरवट देठ शिल्लक असलेले फ्लॉवरचे रस्रशीत तुरे आणि मोहरीचा झणका केवळ अद्वितीय. अमृतसरचा चना अमृतसरी तर लाजवाब. चमचमीत पण जळजळीत नाही असे रुचकर अन्न हे इथले वैशिष्ट्य. आपल्या कडे सर्वसाधारणतः छोले भटुरे मागवले की तेलात चपचपलेल्या भल्या मोठ्या पुर्या आणि लाल तवंगाचे छोले मिळतात. इथल्या चविष्ट छोल्यांवर तेलही तरंगत नसते आणि बटुरेही तेलकट नसून खुसखुशीत असतात. वर लोणी हवेच. जोडीला कांदा आणि मिरच्या. सरसो का साग आणि मक्याच्या रोट्या खरोखरच अप्रतिम. सरसोच्या भाजीवर आल्याच्या उभ्या कापांबरोबर ताज्या लोण्याचा गोळा असतो हे खासच. दालही नाना प्रकारची मां की दाल, दाल महारानी दाल माखनी सगळे दाट आणि सौम्य. पंजाबी थाळीही उत्तम होती. मात्र एका माणसाला संपवायला जडच. मी माझी पत्नी बहीण आम्ही पडलो तृणभक्षी. त्यामुळे मांसाहारा विषयी काय लिहिणार? मात्र चिरंजीव, भाची आणि मेव्हणा बोटं चाटत कोंबडीचा फडशा पाडताना दिसले. खासियत म्हणावी तर 'माखन' मधला बटर फिश. या लोकांना हा प्रकार फारच आवडला होता.
जेवण झाल्यावर आणि फिरता फिरता खायचे पदार्थ म्हणजे गुलाब जांब आणि त्याही पेक्षा जिलबी. कुव्याची जिलबी, लॉरेन्स रोडची जिलबी अशी नाना प्रसिद्ध ठिकाणं मात्र सगळ्याच जिलब्या उत्तम आणि अर्थातच साजुक तुपातल्या. मिठाई मध्ये पतीसा छान मिळत असं ऐकुन होतो. प्रत्यक्ष घ्यायला गेलो तेव्हा समजलं की पतीसा म्हणजे जवळपास सोनपापडीच, फक्त जरा पातळ आणि साजुक तुपामुळे मृदुमुलायम. वर बदाम पिस्त्याचे काप मुबलक लावलेले हे सांगायलाच नको.
या सर्वांपेक्षा सवाई अशी रात्री हॉलगेट वर जाऊन खाल्लेली दाट चविष्ट मलई कुल्फी, बदाम कुल्फी, पान कुल्फी आणि अर्थातच माझी आवडती केशर पिस्ता कुल्फी, त्यावर रबडी आणि शेवया.
इथे दोन हॉटेल मला जरा विशेष आवडली ती म्हणजे अटारीच्या अगदी अलिकडचं सरहद आणि जालंदर जवळचं हवेली.
सरहद हे विस्तिर्ण आणि आल्हाददायक झुळुक देणार हॉटेल. या मालकाच्या डोक्यात हिंदुस्थान पाकिस्तान मैत्रीचं प्रचंड कौतुक. कदाचित त्याचे नातेवाईक तिकडे पलिकडे राहिले असावेत. आमचा सारथी सांगत होता की सिमेच्या आरपार जा ये करण्या साठी अनेक भुयारे होती. खलिस्तान पर्वात ती सर्व नष्ट केली गेली. असतीलही. देश विभागला गेला कुण्या इकडच्यांचे जिवलग तिकडे राहिले आणि तिकडच्यांचे इकडे. इथे प्रवेश करताच लक्ष वेधुन घेतात ते खास ट्रक शैलीत रंगवलेले टेम्पो. वाहतुकीचे आणि सामानाचे. त्या कलाकारानं आपलं नाव कलाकृतींवर लिहिलं होतं आडोश्यासाठी उभ्या केलेल्या पत्र्यांवरही त्याची कलाकारी दिसत होती. बाहेर ऐसपैस जागेत टेबल खुर्च्या मांडलेल्या. नुसताच परिसर नाही जेवणही उत्कृष्ठ होतं.
हवेली हे अमृतसर दिल्ली, अमृतसर चंदिगड मार्गावरचं 'थांबलच पाहिजे' अस हॉटेल. हॉटेल ला लागुन हवेली विलेजही आहे. वर्दळीची सहज व्यवस्था होइल अस प्रशस्त आवार. गाड्या उभ्या करायला बाजुलाच एक छोटं मैदान आणि जालंदरच्या अलिकडे अगदी महामार्गावरचं सोयिस्कर ठिकाण. इथे एका शाळेची सहलही आलेली होती, नाश्ता संपवुन त्यांना वहनात बसवायचं काम शिक्षिकांना लागलं होतं. प्रवेश करताच उजव्या हाताला एक विहीर आणि हीर रांझा स्टाइलमध्ये केलेले पाणी पिणारा आणि पाणी पाजणारी यांचे पुतळे. अगदी उथळ विहीर ही शोभेची होते. बाहेरुन विहीरीचा आभास आणि आंत पाण्याचा हौद. मात्र येणारे तमाम पर्यटक त्या विहीरीचं पाणी काढायला रहाटावर जात होते. पर्यट्कांच्या फोटोशूटची ती प्रसिद्ध जागा असावी. डाव्या अंगाला फरसाण, मिठाया, जिलब्या, असे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल होते; पानाची गादी होती. हॉटेलची सजावट मोठी कलात्मक होती. मुख्य भोजनकक्षा बाहेर वरांडा होता. एका टोकाला सांझा चुल्ह्यावर रोट्या भाजणार्या युवती तर दुसर्या टोकाला म्हणजे प्रवेशद्वाराजवळ चोपडी घेउन बसलेले लालाजी. वरांड्यात शिवराय पसार झाले तसे भले मोठे पेटारे.
आत प्रवेश करताच डावीकडे साक्षात टाटा ट्रकची आक्खी केबीन! मंद प्रकाश योजना. निवांत कारभार, उंच भव्य छत आणि बसायल ऐसपैस जागा. लख्ख पितळेची भांडी चकाकत होती. भिंतीवरच्या फळीवर जुना रेडीओ आणि बाजुला यंत्रावर चारा कापणारे सरदार दांपत्य. या सर्वाला साजेसं सुग्रास जेवण आणि दाट मलईदार लस्सी. कोचावर रेंगल्या वर जराशी डुलकी काढावी असा विचार प्रबळ होत होता.
खटकरकलांहून निघालो तेव्हा वाटेत उसाचे मळे लागले. आम्ही सारथ्याला विचारले की जवळपास गुर्हाळ असेलच? गुर्हाळ नाही पण आपल्या शेतावरचा गूळ विकणारी दिसली. उतरुन जवळ जाउन पाहतो तर काय, मस्त रवाळ पिवळा धमक गुळाचा बारिक भुगा. लाळ गळायचीच बाकी होती. पोळी वर साजूक तूप् चोपडायचं, त्यावर हा गूळ पसरयचा आणि गुंडाळी करुन हाणायची या कल्पनेनच भूक चाळ्वली. शेजारी आणखी एक प्रकार पाहायला मिळाला. 'गुळाची मिठाई' ताजा गुळ वड्या पाडण्या आधी त्यावर खोबर्याचे काप, धने, तीळ, बडिशेप असे पेरायचे आणि मेदुवड्या एवढे चपटे गोळे करायचे. हा प्रकार भरपेट जेवण झाल्यावर अन्नपचनास उत्तम असे त्या बाईने म्हणजे लक्ष्मीने सांगितले. ते खरे असावे. हवेलीमध्ये बडेशेपेबरोबर असे गुळाचे तुकडेही मुखवास म्हणुन दिले होते. तुम्ही मुंबईकर का असे लक्ष्मीने माझ्या पत्नीकडे - किंबहुना तिच्या पोशाखाकडे पाहुन विचारले. म्हणाली तुम्ही बरं काहीही मनाप्रमाणे नेसू शकता. आम्हाला ओढणी डोक्याव्रर घेउनच वावरावे लागते.
इथली जमीन सकस आणि भाज्याही रसरशीत. प्रवासात बंगा गावाजवळ एक शेतकरी त्याच्या वाफ्यातली पालेभाजी घेउन आला होता. कसले अजस्त्र मुळे! पण ताजे आणि रसरशीते. पाहिल्यावर याचा चट्का करुन कधी खातोय असे व्हवे असे. कोवळा पाला कोशिंबिर करुन खायला झकास. मग भरले तेही गाडीत.
सरहद मधुन बाहेर पडल्यावर उसाचा रस दिसला. आम्ही गाडी थांबवली मात्र नुकतीच लस्सी पिउन झाली असता त्यावर रस पिण्यास महिला वर्गाने सक्त मनाई केली आणि आमची अक्कल काढली. ती हौस राहुनच गेली.
वाचन
20919
प्रतिक्रिया
0