आदिकैलास ओमपर्वतदर्शन यात्रा पार्वती सरोवर परिक्रमाभाग-६
पाचवा दिवस: सिर्खा ते गालागढ. १८ किमी. उंची ९५०० फूट
आज अठरा किलोमीटरच जायचे असले तरी आजचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे पहाटे चार वाजताच उठलो. आज आम्हाला बेड-टी मिळाला होता. चहा घेतला आणि भराभरा सर्व आवरले. आज नाश्ता सोबत बांधून मिळणार होता, त्यामुळे बोर्नव्हिटा पिऊन नाश्त्याचे पार्सल घेऊन वाटचालीला सिद्ध झालो. सिर्खाला मुक्कामाचे तंबू हे डोंगरमाथ्यावर होते. त्यामुळे थोडे पुढे जाताच खडांज्यांचा (ओबडधोबड दगडी पायर्या) उतार सुरू झाला. रात्री पाऊस पडून गेला होता त्यामुळे चिकचिक झाली होती. जपून हळूहळू उतरावं लागलं. उतरलो कसेबसे. समोर ठाकली होती कठीण रुंगलिग टॉपची खडी चढाई...
थोडे थांबून चालू लागलो. घनदाट जंगल आहे. उन्हाची तिरीपही लागत नाही. सर्वत्र वेळूची - ज्यापासून बासरी बनवतात त्या बांबूची बने होती. त्या बनामधून वारा वेणूनाद घुमवत होता. मोठमोठ्या वृक्षांवरून तशीच मोठ्या आकाराची माणसाएवढी काळ्या तोंडाची पांढर्या रंगाची केसाळ माकडे धुडगूस घालत होती. मी जरा त्यांची मजा बघत उभी राहिले. हे थोडे पुढे गेले होते. मला थांबलेले पाहून म्हणाले, "ती काही त्र्यंबकेश्वरची माकडे नाहीत, येतील अंगावर." मी घाबरले आणि पुढे धावले. दगडाला अडखळले. बूट असूनही पायाची करंगळी मुडपली. आला एकदाचा रुंगलिंग टॉप. सारे पोहोचले होते. आज आम्ही मागे राहिलो होतो. आधी बूट काढून पाहिले. उजव्या पायाच्या करंगळीचे फर्स्ट मेटाकार्पल बोन डिसलोकेट झाले होते. स्ट्रॅपिंग करायला हवे होते. इकडेतिकडे शोधले. लाकडाची मला हवी तशी ढलपी मिळाली. मग स्टिकिंग-प्लास्टरने छानशी स्प्लिंट बनवली आणि करंगळीला स्ट्रॅपिंग केले. सर्वजण माझ्याकडे कुतुहलाने बघत होते. सुनील म्हणाला, "कमाल आहे वहिनी! न घाबरता स्वतःच उपाय केलात!" हे म्हणाले, "अरे ती हेच सारे करत असते तिच्या हॉस्पिटल मध्ये." असो. सर्वानी नाश्ता केला. सुनील पित्रे म्हणाले, "हा टॉप उतरला की थोड्या अंतरावर दोन रस्ते फुटतील. उजव्या बाजूचा रस्ता शॉर्टकट आहे. आपण त्या रस्त्याने जाऊ म्हणजे लवकर पोहोचू." निघालो.
माझा पाय दुखत होता त्यामुळे मला चालायला वेळ लागत होता. सुनील पित्रे माझ्याबरोबर चालत होते. बाकी मंडळी पुढे गेली. त्यांच्याबरोबर पांडेजी गेले होते. रुंगलिंग टॉप उतरला. यथावकाश ते दोन रस्ते आले. बरोबरचे लोक दिसत नव्हते, पण आधी ठरले होते म्हणून मी आणि सुनील पित्रे त्या शॉर्टकटने निघालो. दाट जंगलातून रस्ता जात होता. चिखलही होता. खाजकुयली वारेमाप वाढलेली होती. जपून पावले टाकत होतो. तोच दिसले की दोघांच्याही बुटांवर जळवा चढल्या आहेत. मी घाबरले. सुनील माझ्या पायावरच्या जळवा काढायला लागले. मग मीही धीर करुन त्यांच्या बुटावरील जळवा काढू लागले. या गडबडीत दोघांच्याही हाताला बिच्छू (खाजकुयली) लागली. झाले! 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला' अशी आमची अवस्था झाली. जळवा काढू की आग होत असलेल्या हाताला चोळू! सुनीलने जवळच उगवलेल्या पालक नावाच्या वनस्पतीची पाने तोडली आणि त्याचा रस हाताला लावायला दिला. स्वतःच्याही हाताला लावला. क्षणात आग होणे थांबले. खरोखरच देवाची करणी अगाध आहे. बिच्छू आहे तर लगेचच जवळ त्यावर उतारा पालकही त्याच्याच शेजारी तयार ठेवला. दोन्ही संकटांतून त्याच्याच कृपेने बाहेर पडलो आणि पुढे निघालो. थोड्याच वेळात काली नदीवरचा एक झुलता पूल आला. बरोबरचे लोक कसे दिसत नाहीत असा विचार करत पूल ओलांडून पुढे गेलो.
आता नवीनच संकट समोर उभे ठाकले. पुढे रस्ताच नव्हता. डोंगर ढासळला होता. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात रस्ता नसतो. तो आपल्याला तयार करुन घ्यावा लागतो." मी म्हटले, "हरकत नाही. तुम्ही दाखवा तसा मी तयार करते." मग उजव्या हाताने डोंगराचा आधार घेत डाव्या हाताने ढासळलेल्या मातीत वाट तयार करत हळूहळू पुढे जाऊ लागलो. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात डोंगर चढताना कधीही पकडायचे नाही. तर फक्त आपल्या हाताचा पंजा डोंगराच्या भिंतीला दाबून ठेवायचा. कारण हिमालय हा ठिसूळमातीचा पर्वत आहे. आपण एखादा दगड किंवा झुडूप पकडायला जाऊ आणि तो दगड किंवा झुडूप निसटून येईल आणि आपणच पडू." रस्ता तयार करत-करत कसेबसे तो डोंगर चढून वर आलो. वरती सुंदर हिरवळीचा गालिचा पसरलेली प्रशस्त वायवाट विविधरंगी फुलांचे दागिने अंगाखांद्यावर लेवून आमची वाट बघत होती. पाठीवरची पिशवी काढून एका दगडावर बसलो. आमचे सहयात्री कुठेच दिसत नव्हते. पाणी प्यायलो. काय करावे असा विचार करत होतो, इतक्यात हे येताना दिसले. मी भान हरपून त्यांच्याकडे धावले! पाठोपाठ मीना, रोहिणी, सुनील शिंदे आणि पांडेजी आले. माझा जीव भांड्यात पडला. सर्वजण बसलो. ते सगळे दुसर्या रस्त्याने आले होते. तो मुळीच अवघड नव्हता. वाटेत त्यांनी गुटखा नावाची गावठी बटाट्याची स्वादिष्ट भाजी आणि पाव खाल्ला होता. आम्ही त्यांना लांबून डोंगर चढताना दिसत होतो. त्यामुळे ते निर्धास्त होते. सुनील पित्रे म्हणाले, "खरे सांगा वहिनी! तुम्ही घाबरला होता की नाही?" मी म्हटले, "घाबरले होते, पण माझ्या जिवासाठी नाही. कारण मी खाली पडले असते तर तुम्ही कसेही करुन मला वर काढले असतेच. पण तुम्ही जर पडला असतात तर मी काय केले असते? त्या जंगलात फक्त आपणा दोघांशिवाय चिटपाखरुही दिसत नव्हते. म्हणून मी घाबरले होते." असो.
घनदाट जंगल, माकडे, बिच्छू-पालक, ढासळलेला डोंगर अशा भयानकतेबरोबरच मनोहारी सुवासिक फुले, खळखळणारे झरे, बासरीचा नाद घुमवणारा वारा अशी शिणवटा घालवणारी मनोरंजकता असलेला हा पहाटे साडेपाचला सुरु झालेला अठरा किमी आणि साडेनऊ हजार फूट उंचीचा चित्तथरारक प्रवास संध्याकाळी साडेपाचला बारा तासांनी गालागढच्या मुक्कामी सुफळ संपूर्ण झाला..!
क्रमशः
वाचने
10104
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मुद्रितशोधन
In reply to मुद्रितशोधन by एस
__/\__
In reply to __/\__ by प्यारे१
अजिबात नाही
In reply to अजिबात नाही by एस
>>> समाजकार्य करणारे मूर्ख
In reply to मुद्रितशोधन by एस
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by खुशि
सोप्पं आहे.
In reply to सोप्पं आहे. by एस
स्वेप्स, स्वँम्प, स्वाईप्स,
In reply to स्वेप्स, स्वँम्प, स्वाईप्स, by प्यारे१
हाहाहा!
In reply to मुद्रितशोधन by एस
मुद्रितशोधन ??
In reply to मुद्रितशोधन ?? by दशानन
:-)
In reply to :-) by एस
तुमचा मुद्दा मान्य, पण मराठी
In reply to तुमचा मुद्दा मान्य, पण मराठी by दशानन
करेक्ट
In reply to मुद्रितशोधन ?? by दशानन
माझे मराठी शुद्धलेखन.
In reply to माझे मराठी शुद्धलेखन. by खुशि
मी स्वत: दहावी नापास आहे, आणि
वाचतेय.
खुप छान वर्णन
In reply to खुप छान वर्णन by कविता१९७८
आपली कर्तव्ये पार पडली की
वाचते आहे
In reply to वाचते आहे by पैसा
अहो पण
In reply to अहो पण by एस
नको मला सारे प्रतिसाद पुन्हा
In reply to वाचते आहे by पैसा
.धन्यवाद
लेख पाठवा स्वॉप्स(swaps)कडे.