अचुम् आणि समुद्र (भाग १)
मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे.
मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला:
“अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे,
शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे.
ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे,
तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.”
मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात.
यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता.
असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ?
मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो :
मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे !
हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले: