मराठीत लिहिणारे जी ए -- काकोडकर --सु शि---गुरुनाथ नाईक एका व्यासपीठावर कधी च एकत्र आले नाहीत. किंबहुना त्यांची पुस्तकेही एका शेल्फवर कधी आली नसतील.
प्रत्येकाची लिहिण्याची स्टाईल निराळी ,वाचक वर्ग निराळा, विषय निराळे.
सु शि वाचणारा जी ए वाचणार नाही काकोडकर वाचणाराला गुरुनाथ नाईक वाचवणार नाही.
ह्या सर्व एवंविषिष्ठ गुणांमुळे त्यांची तूलना करता येणार नाही. सुशिनी फारसे शृंगारीक लिहिले नाही. थोडेसे लिहिले तेही कॉलेज च्या तरुणाई च्या माहोलात. गुरुनाथ नाईकांची श्टाईल तर एकदम वेगळीच.ची कॅप्टन दीप,जमादार शेख , पिपरीयाचा उदयसिंह राठोड ही पात्रे त्यांच्या आयुश्यात कधीरोमॅन्टीक वागली असतील हा प्रश्नच पडतो. ठ्यां ठ्यां करत गोळ्या उडवणे. घोडा फेकणे , सूसू करत लक्ष्यवेधी बाण सोडणे हे करताना प्रेम करायला त्यांच्या पात्राना वेळच मिळायचा नाही
पण समजा एकच प्रसंग हे सगळे लोक त्यांच्या स्टाईल मध्ये कसा लिहितील याची आपण कल्पना करुयात....
त्यांचे लेखन काहीसे असे असू शकेल
१) पाली सारख्या पांढर्या पडलेल्या तिच्या हडकुळ्या बोटांचा त्याला स्पर्श झाला. त्याच्या अंगावर शहारा उमटला नाही. पाठीवर पाल पडावी आणि तेथेच चिकटून रहावी तसे संपुर्ण शरीर थरथरले. पत्र्यावर ब्लेडने चरे पाडावे तशा आवाजात त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. वातावरणात कुठेतरी शेवाळलेला वास आला. नरड्या वरच्या उंचवट्याची हालचाल करत त्याने आवंढा गिळला. करवदलेल्या स्वरात हुंकार देत त्याने डोळे मिटून घेतले. शरीराची भूक ही जिभेच्या भुकेपुढे हार पत्करते. हा अनुभव तो घेत होता. रस्त्यावरून एक कुत्रे त्याची लूत चाटत जात होते. कुत्र्याच्या तोंडातून गळणारी ती श्लेश्मल लाळ पाहून त्याला तहान आठवली. गळ्यात पोटात एकदम भडभडून आले.
रक्तवर्णी सूर्याला धरायला निघालेल्या वीराला इतके हतबल, गलीतगात्र . हवालदील बनवणार्या शरीरधर्माला त्याने मनोमन कुर्निसात केला. शरीर नसते तर त्याने केंव्हाच सूर्याला स्पर्श केला असता. मनाच्या सगळ्याच विचाराना शरीर दुर्बल बनवते. आपल्या इच्छेच्या वासनाना वारू बनवून तुम्हाला त्यावर रडतराउतासारखे स्वार करवते.
त्याने तिच्याकडे एकवार डोळे उघडून पाहीले. संभोगाची सुद्धा कोणितरी आपल्यावर बळजबरीने सक्ती करत आहे असे त्याला वाटल्....तिच्या डोळ्यातले लाचार भाव ओळखून तोच स्वतः लाचार झाला. किनपाखी वस्त्राला जरीच्या काठाने सुद्धा वेदना व्हाव्यात तसे काहीसे त्याचे मन गाभुळले झाले.
२)आपल्या नाजूक हाताने तिने त्याला स्पर्श केला. त्याला अंगांगावर मोरपीस फिरल्यासारखे झाले.
शिडशीडीत बोटे पाठीवरून फिरुलागली. स्पर्शांच्या वेलबुट्ट्या झाल्या. श्वासांचे महिरपी कंस होउ लागले. तीचे डोळे आरक्त झाले. चाफेकळी नासीकेतून उष्ण उच्छवास येऊ लागले. तीने ओठाना नाजूकशी मुरड घातली. त्याच्या कडे पाहून ती सूचक हसली. त्याला मग रहावले नाही. बोटात बोटे गुंफली गेली. स्पर्श भाषा बोलु लागले. तीच्या किंचीत अधीर ओठांवर त्याने बोटाचा स्पर्श केला. उस्स्स्स्स. तीने बोटाला हलकेच चावा घेतला. आणि मग ती त्याचे बोट चाखतच राहिली. पहिल्या स्पर्शाची जादू तिला हरवु द्यायची नव्हती. हा एक स्पर्श आयुषभर टिकावा तीने मनोमन प्रार्थना केली.
३) काय रे ? हे काय चालले आहे.
तुला माहीत आहे.
पण तू सांगितलेस तर काही बिघडेल का.
ते सांगण्यात मी वेळ कशाला वाया घालवु.
हम्म
अं..
ऐक रे...
काय.
आपण पळून जाउया का
त्याने काय होईल?
कधीतरी पळून जायचे हे मी लहानपणीच ठरवले होते
रोज प्रॅक्टीस केली असतीस तर गेला बाजार जिल्हापरिषदेची तरी बक्षीसे मिळवली असतीस
जा बॉ तू माझी नेहमी खेचत असतोस.
बर बाई नाही खेचत झाले.
हं...
ए आपण लोणाळ्याला जायचे.
इतक्या पावसात?
पावसातच गम्मत येते.
मी नाही येणार
रेखे आपली आख्खी ग्यान्ग येनार आहे.
येऊ देत.
पण तू?
मी नाही येणार.
तू काय येत नाहीस.तुझा बाप येईल
मग जा घेऊन त्यानाच.
या वाक्यावर पक्याच काय पण कॅन्टीन मधले सगळे पब्लीक जाम हसून बेजार . खुर्चीचे दोन्ही हात धरुनही तोल सावरता येत नव्हता. सगळे फुल्ल हसत होते
चायवाला छोटू चाहाचे कप तिथेच ठेऊन पोट धरून हसत सुटला
त्याला हसताना पाहू शान्त्याला हसू आवरले नाही...
४) ठाकूरची खुनशी नजर बरेच काही सांगुन जात होती.
समोर उभ्या असलेल्या त्या बावळट चेहेर्याच्या तरुणाच्या चेहेरा आणखीनच बावळट झाला. त्याच्या हातात पिस्तुल आले केंव्हा त्याने तीन गोळ्या झाडल्या केंव्हा आणि पिस्तूल आले तसे त्याच्या पॅन्टच्या खिशात पुन्हा कसे गेले ते कोणालाच कळले नाही. त्या खोलीत आता फक्त तोच उभा होता. ठाकुरचे उजवे ढोपर फुटले होते. हातातून रक्त ठीबकत होते.
उदयसिंह चौहान ला ठाकूरने अजून ओळखले नव्हते. पंचक्रोशीत त्याला ठाकूरपेक्षाही जास्त मान होता.
ठाकूर अजून नीट ऐक. थोडे नमते घे. सुचेताकुमारीने मला लग्नाबद्दल विचारले आहे. तुझ्या घरात मला अकारण तंटा निर्माण करायचा नाहिय्ये.
उदय मला थोडा वेळ दे.
त्याने काय होईल
मलाही ठाकुरांच्यातली दुश्मनी संपवायची आहे. सगळ्या चौखटपुरातली जवान पोरे अकारण दुश्मनीची शिकार होताहेत.
एवढे तुला कळते ना ... मग अडतय कुठे?
माझ्या खानदानाची ही रीत आहे की ज्या घरात मुलगी दिली त्या घराण्याशी दुश्मनी पत्करायची.
माझ्याशी वैर का घेतो आहेस. मला वाटले तर सुचेताकुमारीला आत्ता पळवून घेउन जाऊ शकतो. माझ्या खान्दानात प्रत्येक पिढीत निदान एकाने तरी पळवून नेऊन लग्न लावले आहे. पृथ्वीराज चौहानाचे नाव लावतो आम्ही.
मग दाखव पळवून तीला. आम्ही मनगटात कडे घालतो बांगड्या नाही
ठाकूर इतका जोर बरा नाही.
जारे तुला करायचे ते तू कर. आम्हाला करायचे ते आम्ही करु.
ठाकूर आता पेटलाच होता.
उदयसिंह सुद्धा तेवढाच पेटला होता. त्याने अचानक शीळ घालायला सुरवात केली.
हा बाबा आता काय नवे करतोय ठाकूर व्याकूळ झाला.
अचानक उदयने उडी मारली. समोरून त्याचा मस्तान घोडा दुडक्या चालीने येत होता. उदयने सुचेताकुमारीचा हात पकडुन घोड्यावर उडी मारली आणि त्या जनावराने मालकाची खूण ओळखली. तुफान वेगाने त्याने मालकाला त्या गढीतून बाहेर काढले. आणि तो धावतच राहिला. नदीकाठाशी येताच उदयसिंह चौहान ने घोड्याला इशारा केला वेग कमी करत घोडा थांबला. उदयसिंह चौहान ने सुचेताकुमारी ला खाली उतरवले तो स्वतःही उतरला. त्याने घोड्याला पाणे पाजले. झाडाला बांधले आनि झाडाच्या सावलीत त्याने दशम्या सोडल्या.
डिस्क्लेमरः वरील लिखाण हे प्रस्तुत लेखकानी कधीच केले नाही. त्यांच्या स्टाइल मध्ये हे लिखाण विजुभाऊने केले आहे. ही स्वतन्त्र निर्मिती आहे
लै भारी विजुभाऊ !!