मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जी ए -- काकोडकर --सु शि---गुरुनाथ नाईक

विजुभाऊ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मराठीत लिहिणारे जी ए -- काकोडकर --सु शि---गुरुनाथ नाईक एका व्यासपीठावर कधी च एकत्र आले नाहीत. किंबहुना त्यांची पुस्तकेही एका शेल्फवर कधी आली नसतील. प्रत्येकाची लिहिण्याची स्टाईल निराळी ,वाचक वर्ग निराळा, विषय निराळे. सु शि वाचणारा जी ए वाचणार नाही काकोडकर वाचणाराला गुरुनाथ नाईक वाचवणार नाही. ह्या सर्व एवंविषिष्ठ गुणांमुळे त्यांची तूलना करता येणार नाही. सुशिनी फारसे शृंगारीक लिहिले नाही. थोडेसे लिहिले तेही कॉलेज च्या तरुणाई च्या माहोलात. गुरुनाथ नाईकांची श्टाईल तर एकदम वेगळीच.ची कॅप्टन दीप,जमादार शेख , पिपरीयाचा उदयसिंह राठोड ही पात्रे त्यांच्या आयुश्यात कधीरोमॅन्टीक वागली असतील हा प्रश्नच पडतो. ठ्यां ठ्यां करत गोळ्या उडवणे. घोडा फेकणे , सूसू करत लक्ष्यवेधी बाण सोडणे हे करताना प्रेम करायला त्यांच्या पात्राना वेळच मिळायचा नाही पण समजा एकच प्रसंग हे सगळे लोक त्यांच्या स्टाईल मध्ये कसा लिहितील याची आपण कल्पना करुयात.... त्यांचे लेखन काहीसे असे असू शकेल १) पाली सारख्या पांढर्‍या पडलेल्या तिच्या हडकुळ्या बोटांचा त्याला स्पर्श झाला. त्याच्या अंगावर शहारा उमटला नाही. पाठीवर पाल पडावी आणि तेथेच चिकटून रहावी तसे संपुर्ण शरीर थरथरले. पत्र्यावर ब्लेडने चरे पाडावे तशा आवाजात त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. वातावरणात कुठेतरी शेवाळलेला वास आला. नरड्या वरच्या उंचवट्याची हालचाल करत त्याने आवंढा गिळला. करवदलेल्या स्वरात हुंकार देत त्याने डोळे मिटून घेतले. शरीराची भूक ही जिभेच्या भुकेपुढे हार पत्करते. हा अनुभव तो घेत होता. रस्त्यावरून एक कुत्रे त्याची लूत चाटत जात होते. कुत्र्याच्या तोंडातून गळणारी ती श्लेश्मल लाळ पाहून त्याला तहान आठवली. गळ्यात पोटात एकदम भडभडून आले. रक्तवर्णी सूर्याला धरायला निघालेल्या वीराला इतके हतबल, गलीतगात्र . हवालदील बनवणार्‍या शरीरधर्माला त्याने मनोमन कुर्निसात केला. शरीर नसते तर त्याने केंव्हाच सूर्याला स्पर्श केला असता. मनाच्या सगळ्याच विचाराना शरीर दुर्बल बनवते. आपल्या इच्छेच्या वासनाना वारू बनवून तुम्हाला त्यावर रडतराउतासारखे स्वार करवते. त्याने तिच्याकडे एकवार डोळे उघडून पाहीले. संभोगाची सुद्धा कोणितरी आपल्यावर बळजबरीने सक्ती करत आहे असे त्याला वाटल्....तिच्या डोळ्यातले लाचार भाव ओळखून तोच स्वतः लाचार झाला. किनपाखी वस्त्राला जरीच्या काठाने सुद्धा वेदना व्हाव्यात तसे काहीसे त्याचे मन गाभुळले झाले. २)आपल्या नाजूक हाताने तिने त्याला स्पर्श केला. त्याला अंगांगावर मोरपीस फिरल्यासारखे झाले. शिडशीडीत बोटे पाठीवरून फिरुलागली. स्पर्शांच्या वेलबुट्ट्या झाल्या. श्वासांचे महिरपी कंस होउ लागले. तीचे डोळे आरक्त झाले. चाफेकळी नासीकेतून उष्ण उच्छवास येऊ लागले. तीने ओठाना नाजूकशी मुरड घातली. त्याच्या कडे पाहून ती सूचक हसली. त्याला मग रहावले नाही. बोटात बोटे गुंफली गेली. स्पर्श भाषा बोलु लागले. तीच्या किंचीत अधीर ओठांवर त्याने बोटाचा स्पर्श केला. उस्स्स्स्स. तीने बोटाला हलकेच चावा घेतला. आणि मग ती त्याचे बोट चाखतच राहिली. पहिल्या स्पर्शाची जादू तिला हरवु द्यायची नव्हती. हा एक स्पर्श आयुषभर टिकावा तीने मनोमन प्रार्थना केली. ३) काय रे ? हे काय चालले आहे. तुला माहीत आहे. पण तू सांगितलेस तर काही बिघडेल का. ते सांगण्यात मी वेळ कशाला वाया घालवु. हम्म अं.. ऐक रे... काय. आपण पळून जाउया का त्याने काय होईल? कधीतरी पळून जायचे हे मी लहानपणीच ठरवले होते रोज प्रॅक्टीस केली असतीस तर गेला बाजार जिल्हापरिषदेची तरी बक्षीसे मिळवली असतीस जा बॉ तू माझी नेहमी खेचत असतोस. बर बाई नाही खेचत झाले. हं... ए आपण लोणाळ्याला जायचे. इतक्या पावसात? पावसातच गम्मत येते. मी नाही येणार रेखे आपली आख्खी ग्यान्ग येनार आहे. येऊ देत. पण तू? मी नाही येणार. तू काय येत नाहीस.तुझा बाप येईल मग जा घेऊन त्यानाच. या वाक्यावर पक्याच काय पण कॅन्टीन मधले सगळे पब्लीक जाम हसून बेजार . खुर्चीचे दोन्ही हात धरुनही तोल सावरता येत नव्हता. सगळे फुल्ल हसत होते चायवाला छोटू चाहाचे कप तिथेच ठेऊन पोट धरून हसत सुटला त्याला हसताना पाहू शान्त्याला हसू आवरले नाही... ४) ठाकूरची खुनशी नजर बरेच काही सांगुन जात होती. समोर उभ्या असलेल्या त्या बावळट चेहेर्‍याच्या तरुणाच्या चेहेरा आणखीनच बावळट झाला. त्याच्या हातात पिस्तुल आले केंव्हा त्याने तीन गोळ्या झाडल्या केंव्हा आणि पिस्तूल आले तसे त्याच्या पॅन्टच्या खिशात पुन्हा कसे गेले ते कोणालाच कळले नाही. त्या खोलीत आता फक्त तोच उभा होता. ठाकुरचे उजवे ढोपर फुटले होते. हातातून रक्त ठीबकत होते. उदयसिंह चौहान ला ठाकूरने अजून ओळखले नव्हते. पंचक्रोशीत त्याला ठाकूरपेक्षाही जास्त मान होता. ठाकूर अजून नीट ऐक. थोडे नमते घे. सुचेताकुमारीने मला लग्नाबद्दल विचारले आहे. तुझ्या घरात मला अकारण तंटा निर्माण करायचा नाहिय्ये. उदय मला थोडा वेळ दे. त्याने काय होईल मलाही ठाकुरांच्यातली दुश्मनी संपवायची आहे. सगळ्या चौखटपुरातली जवान पोरे अकारण दुश्मनीची शिकार होताहेत. एवढे तुला कळते ना ... मग अडतय कुठे? माझ्या खानदानाची ही रीत आहे की ज्या घरात मुलगी दिली त्या घराण्याशी दुश्मनी पत्करायची. माझ्याशी वैर का घेतो आहेस. मला वाटले तर सुचेताकुमारीला आत्ता पळवून घेउन जाऊ शकतो. माझ्या खान्दानात प्रत्येक पिढीत निदान एकाने तरी पळवून नेऊन लग्न लावले आहे. पृथ्वीराज चौहानाचे नाव लावतो आम्ही. मग दाखव पळवून तीला. आम्ही मनगटात कडे घालतो बांगड्या नाही ठाकूर इतका जोर बरा नाही. जारे तुला करायचे ते तू कर. आम्हाला करायचे ते आम्ही करु. ठाकूर आता पेटलाच होता. उदयसिंह सुद्धा तेवढाच पेटला होता. त्याने अचानक शीळ घालायला सुरवात केली. हा बाबा आता काय नवे करतोय ठाकूर व्याकूळ झाला. अचानक उदयने उडी मारली. समोरून त्याचा मस्तान घोडा दुडक्या चालीने येत होता. उदयने सुचेताकुमारीचा हात पकडुन घोड्यावर उडी मारली आणि त्या जनावराने मालकाची खूण ओळखली. तुफान वेगाने त्याने मालकाला त्या गढीतून बाहेर काढले. आणि तो धावतच राहिला. नदीकाठाशी येताच उदयसिंह चौहान ने घोड्याला इशारा केला वेग कमी करत घोडा थांबला. उदयसिंह चौहान ने सुचेताकुमारी ला खाली उतरवले तो स्वतःही उतरला. त्याने घोड्याला पाणे पाजले. झाडाला बांधले आनि झाडाच्या सावलीत त्याने दशम्या सोडल्या. डिस्क्लेमरः वरील लिखाण हे प्रस्तुत लेखकानी कधीच केले नाही. त्यांच्या स्टाइल मध्ये हे लिखाण विजुभाऊने केले आहे. ही स्वतन्त्र निर्मिती आहे

वाचने 6251 वाचनखूण प्रतिक्रिया 25

बबलु 25/07/2009 - 03:01
लै भारी विजुभाऊ !! वेगळाच प्रकार आहे हा. ष्टाईल पण जबरा !! (सुशि आणि जीएंचा एकत्रित फ्यान) ....बबलु

बिपिन कार्यकर्ते 25/07/2009 - 03:10
विजुभाऊ तुमचा हा धागा मात्र बर्‍यापैकी आवडला. प्रत्येकाची ष्टाईल नीट पकडली आहे. नंबर ३ मधे सुशिंची छोटी वाक्यांची ष्टाईल बरोब्बर. आणि ही सगळी नावे आठवून दिल्याबद्दल धन्यवाद. गुरूनाथ नाईकांचे वाचून तर आता य वर्षं झाली आहेत. बिपिन कार्यकर्ते

लिखाळ 25/07/2009 - 03:15
जीएंच्या दोन-तीनच कथा वाचल्या आहेत.. पण जीएंची लकब काही पटली नाही. जीएंची निरीक्षणे आणि त्यावरुन योजलेले शब्द टोकदार असले तरी इथे लिहिलेले शब्द उगीच बीभत्स वाटले. जीए असे लिहितील असे वाटत नाही. -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही ! :)

वाचक 25/07/2009 - 05:33
नाईकांची स्टाईल मस्तच जमली आहे, सु शि चे " बाप येईल - मग घेउन जा त्यालाच " - हे तर सरळ दुनियादारीतून आले आहे. (खाली स्वतंत्र निर्मितिचा डिस्क्लेमर दिला आहे म्हणून सांगितले) - बाकी जी एं बद्दल लिखाळांशी सहमत.

In reply to by वाचक

विजुभाऊ 27/07/2009 - 01:10
जीए असे लिहितील असे वाटत नाही. जी ए नी असे बरेच लिखाण केले आहे. हा लेख हे जी एंच्या जड शब्दबम्बाळ स्टाईलचे विडम्बन आहे थोडे एक्झॅजरेशन असेलही. पण ती स्टाईल त्यांची आहे हे सांगावे लागत नाही आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही ! या बाबत लिखाळानी किती मनमोकळेपणाने स्वतः बद्दल कबूल केलेय नै. " बाप येईल - मग घेउन जा त्यालाच " धर्मेन्द्रने एकूण किती चित्रपटात "कुत्ते कमिने " असे म्हम्टले आहे? पण ते वाक्य म्हणताच धर्मेन्द्र समोर उभा रहातो. हेही तसेच. कॉलेजच्या तरुणाईचे वातावरण त्या वाक्यांमधून बरोब्बर उभे रहाते. अन्यथा स्नेहलता दसनूरकर आणि सु शि मधे फरक आहेच ना

मुक्तसुनीत 25/07/2009 - 08:41
हा प्रकार आवडला. मनोरंजक वाटला. अनेकांचे लिखाण आपल्या मनात साठवलेले असते. शैलीचा आणि आशयाचा प्रभाव पडलेला असतो ; याचेच प्रतिबिंब चांगले आलेले आहे. जीएंच्या मूळ लिखाणापेक्षा यातले लिखाण वेगळे आले आहे हे खरे ; परंतु हे विडंबनवजा लिखाण आहे - हुबेहूब नक्कल नव्हे हेदेखील विचारात घ्यायला हवे.
परश्याने पिस्तूल काढले आणि धनंजयच्या डोक्याच्या दिशेने गोळी झाडली. ते पहाताच छोटू ओरडला "साहेब, ती पहा गोळी ". डिटेक्टिव्ह धनंजय खाली वाकले. गोळी त्यांच्या डोक्यावरून वेगाने सणसणत निघून गेली.
* लेखक *
बाबूराव अर्नाळकर
प्रकाशक . . . . . . . चारआणे माला
विजुभाऊंनी काढलेला हा धागा मस्त आहे. एस्.एम. काशिकर, बाबा कदम, आनंद यादव, नारायण धारप, ह्यांचेही लिखाण आठवून गेले.

In reply to by दत्ता काळे

आनंदयात्री 25/07/2009 - 12:57
हा हा हा !! मस्तच उदाहरण .. हसवणारी आठवण .. बाबुरावांच्या विलक्षण काळ्या पहाडाच्या कथा पण अश्याच !!

In reply to by दत्ता काळे

सुनील 27/07/2009 - 10:41
परश्याने पिस्तूल काढले आणि धनंजयच्या डोक्याच्या दिशेने गोळी झाडली. ते पहाताच छोटू ओरडला "साहेब, ती पहा गोळी ". डिटेक्टिव्ह धनंजय खाली वाकले. गोळी त्यांच्या डोक्यावरून वेगाने सणसणत निघून गेली. परशा धनंजय यांच्यापासून किती अंतरावर होता? "साहेब, ती पहा गोळी", एवढे म्हणायला, धनंजय यांनी ते ऐकायला आणि त्याप्रमाणे खाली वाकायला किती वेळ लागला असावा? पिस्तुल झाडल्यानंतर निघालेल्या गोळीचा वेग काय असतो? काही दाक्षिणात्य सहकार्‍यांबरोबर पाहिलेले रजनीकांतचे धमालपट आठवले! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by दत्ता काळे

प्रदीप 27/07/2009 - 11:32
हे वाचल्याने आजचा दिवस मजेत जाणार!! अर्नाळकरांच्या कादंबर्‍यात शृंगारिक वर्णनाची परिसीमा म्हणजे .."'का S S S S य?' विजया म्हणाली. तिचे गाल आरक्त झाले होते". अर्नाळकरांनंतर एस. एम. काशिकर आले. त्यांच्या कादंबर्‍यातील रहस्ये आठवत नाहीत, पण शृंगारिक वर्णने मात्र त्याकाळाच्या* मानाने जबरदस्त असायची. (* गोळीचा वेग तेव्हा अगदी धीमा असे. छोटूचे वरील ओरडणे, ते ऐकून धनंजयांचे खाली वाकणे व मग त्या गोळीने त्यांच्या डोक्यावरून सणसणत जाणे हे सगळे लोकलमध्ये घडले आहे. छोटू ओरडला तेव्हा गाडी कुर्ल्याहून नुकती निघालेली होती, तेव्हा विद्याविहार नव्हते (तेथील 'उपरी उपस्कर कार्यालय'ही नव्हते!), आणि गोळी धनंजयांच्या डोक्यावरून गेली तेव्हा ती घाटकोपर स्टेशनात शिरत होती. गाड्याही तेव्हा 'हळू'च चालत-- ह्या दोन स्टेशनांतील सरासरी वेग १५ कि. मी./ तासाला. जिज्ञासूंनी आता गोळीचा वेग काय होता, त्याचे गणित मांडावे).

सुनील 27/07/2009 - 10:43
लेखकांच्या मिमिक्रीचा प्रकार आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विशाल कुलकर्णी 27/07/2009 - 11:01
मस्त, आवडले ! कॅप्टन दीप,जमादार शेख , पिपरीयाचा उदयसिंह राठोड ही पात्रे त्यांच्या आयुश्यात कधीरोमॅन्टीक वागली असतील हा प्रश्नच पडतो. >> हे मात्र पटत नाही. नाईकांच्या प्रत्येक पुस्तकात कॅप्टन दिप आणि मारिया लोबोच्या आगळया वेगळ्या (प्रॅक्टिकल ;-) ) रोमान्सचे वर्णन असतेच. शेखलाही एक हिरॉईन दिल्याचे आठवतेय कुठल्याशा कादंबरीत. नाव आठवत नाही आता पण पण त्याच कादंबरीत लेखकाने तिला मारुन टाकले होते. सस्नेह (सुशिभक्त आणि नाईकांचा पंखा ) विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

ऋषिकेश 27/07/2009 - 21:06
प्रयोग आवडला ऋषिकेश

दत्ता काळे 28/07/2009 - 10:12
अर्नाळकरांनंतर एस. एम. काशिकर आले. त्यांच्या कादंबर्‍यातील रहस्ये आठवत नाहीत, पण शृंगारिक वर्णने मात्र त्याकाळाच्या* मानाने जबरदस्त असायची. - एस. एम. काशिकरांचे त्यावेळी गाजलेले कथानायक्स म्हणजे - गुरुघंटाल, घंटाकर्ण आणि पातंजली. पैकी पातंजलीच्या कथांत चंद्रलेखाचे "नेहमीचेच यशस्वी " जसे असतात त्याप्रमाणे "पिंपळाच्या झाडावर कलकल आवाज करणारा मुंजा आणि दातांचा कचकच आवाज करणारी हडळ" हमखास असे. कथानक मात्र रामसेंच्या पिक्चर्स सारखे " अत्यंत हॉरर, अंगावर काटा आणणारे, खुर्चीला खिळवून ठेवणारे एक सोज्वळ कौटुंबिक :? चित्र" असे असायचे.

विटेकर 14/10/2013 - 14:32
जी ए. आणि सु शि विशेष आवडले . जी. ए. च्या लेखनातील "नियतीशरणता" हुबेहुब उतरली आहे. उत्तम ! असेच आणखी येउ द्या ! आणि काही अस्सल ही लिहा की.

ग्रेटथिन्कर 18/10/2013 - 09:24

This font is 14pt, the line height is 20pt, it's color is orange, and the font family will be 'Garamond'. If the user's computer doesn't have 'Garamond', it will use 'Georgia'. Failing that it will use the default 'serif' font on the user's computer (this is often 'Times' or 'Times Roman' - just leave it as 'serif'). You can also specify bold text and italics if you wish!

सिरुसेरि 04/03/2016 - 12:53
जी ए -- काकोडकर --सु शि---गुरुनाथ नाईक यांचा असा एक वाचक वर्ग प्रत्येक वाचनालयांमध्ये असतो . तसेच रामचंद्र सडेकर , श्रीकांत सिनकर , बाबा कदम , यशवंत रांजणकर यांचेही लेखन अनेक जणांना आवडते .

विजुभाऊ 04/03/2016 - 15:16
वॉट्स अ‍ॅप वर फिरतय? मिपावरचे बरेच लेख वॉट्स अ‍ॅपवर सापडतात मात्र त्यात लेखकाचा कुठेच उल्लेख नसतो. तात्याचे रौषनी सुद्धा मला असेच एकाने पाठवले होते. मिपा सम्पादक मंडळ या बाबतीत तांत्रीकदृष्ट्या काही करू शकेल का? असे कोपी झालेले लिखाण आढळल्यास काय करावे हे कोणी सांगेल का?

निनाद मुक्काम … 04/03/2016 - 19:42
लेखातील वरील काही ओळी पटल्या नाहीत मी स्वतः काकोडकर ते नाईक वाचले आहेत. ह्यात उल्लेख केला त्यापैकी जी ए सोडल्यास इतर लेखकांच्या नशिबी त्यांचे साहित्य क दर्जाचे समजले गेले,त्यांना वाचकवर्ग अमाप होता पण ते ग्रेट काल्सिक साहित्य म्हणून साहित्य वर्तुळात नावाजले गेले नाहीत तेव्हा जी ए , खांडेकर असा एक वर्ग आणि नाईक धारप सिनकर ते सुशी असा एक वर्ग होता मास आणि क्लास सिनेमाच्या भाषेत वर्गीकरण करायचे तर आणि माझ्या पाहण्यात सुशी धारप काकोडकर असे अनेक लेखकांचे वाचन करणारा वर्ग होता