मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महामानवाला प्रणाम!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
समस्त मिसळपाव परिवारातर्फे बाबा आमटे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आदरांजली! या महामानवाला आमचे कोटी कोटी प्रणाम! बाबा आमटे ही व्यक्ति नसून एक संस्था होती. व्यक्ति येतात, जातात, परंतु संस्था ही नेहमी कायमस्वरुपी असते/असावी! आनंदवनच्या रुपाने बाबा आमटे ही संस्था कायमस्वरुपीच आपल्यापाशी राहील! निघून गेली आहे ती फक्त व्यक्ती! (नतमस्तक) तात्या.

वाचने 15009 वाचनखूण प्रतिक्रिया 25

प्राजु Sat, 02/09/2008 - 09:25
आनंदवनच्या रुपाने बाबा आमटे ही संस्था कायमस्वरुपीच आपल्यापाशी राहील! निघून गेली आहे ती फक्त व्यक्ती! अगदी मनातलं बोललात तात्या.. कोटी कोटी प्रणाम बाबांना..! - प्राजु

भडकमकर मास्तर Sat, 02/09/2008 - 10:04
आमचीही आदरांजली... अवांतर : आत्ता जालावर आल्यावर कळले...आज सकाळच्या वर्तमानपत्रांत दिसली नाही बातमी... ते आज पहाटे गेले का?

झकासराव Sat, 02/09/2008 - 12:11
असताना एकदा आनंवनात जावुन त्यांच्यासोबत ताडोबा फिरण्याची एक वेडी इच्छा आणि आशा होती मनात. ती राहुनच गेली की. :( बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. अमर आणि चिरंजिव झालात तुम्ही तुमच्या अफाट कार्यातुन.

पिवळा डांबिस Sat, 02/09/2008 - 16:35
कालच एका निराळ्या संदर्भात त्यांच्या काव्यपंक्ति 'क्वोट' केल्या आणि आज ही अशुभ बातमी समजली. :( बाबांच्या स्म्रूतींना सहस्र प्रणाम! दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती. (शोकाकुल) पिवळा डांबिस

चतुरंग Sat, 02/09/2008 - 21:37
त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली. कुष्ठे झडता अंगहि सगळे वाळित पडता 'माणुस' तो, त्याला उचलुन घेउन सदनी महामानव हा येइ जो, अविचल निष्ठा, अथक श्रमांनी करे 'साधना', मुनीच तो, 'वनीआनंदी' स्मृति ह्या ठेवुनी वैकुंठाला जातो तो. चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे Sat, 02/09/2008 - 22:53
महामानव बाबा आमटे या॑चे आज पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बाबा॑ची मृत्युशी शेवटची झु॑ज स॑पली. आत्ता पर्य॑त बाबा॑नी यमदूता॑ना किती तरी वेळा हसत हसत परतवून लावले होते..लग्नाच्या वेळी, वरोर्‍याच्या ज॑गलात, ऑपरेशन टेबलवर (हे तर कित्येकदा..). कितीही स॑कटे उभी राहिली तरी निर्धाराने इप्सित साध्य करणार्‍या बाबा॑ना साक्षात मृत्युनेही कुर्निसात केला असेल..

सर्किट Mon, 02/11/2008 - 12:53
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही... - सर्किट

मानस Mon, 02/11/2008 - 23:56
महामानव श्री. बाबा आमटे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कुसूमाग्रजांची "संत" ही कविता येथे देत आहे. “साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा” आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहस्त्रावधी वारकरी नेत्र तुला पाहण्यासाठी माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी. आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय प्रकाशाच्या देवळात शिरता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय म्हणून थोडं वारेपण - थोडं दिवेपण - उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी तुझ्याच मेघशील जीवनातून तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण लावण्यासाठी. लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते आकाशात हरवलेपणानं काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी. तसंच आहे माझ्या शब्दांचं क्षणाला माखलेलं हे मोठेपण. तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी? कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी. आणि तरीही - माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला जातात केव्हा तरी तडे आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्नि-रेषा. अशाच शंभर आभासात पहाट रात्रीच्या नि:शब्दातून मी पाहिले आहे तुझे शिल्पचित्र तीनशे मैलांवरूनही. सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणार्या विराट वृक्षावर अपराजित कुर्हारड मारणारा तू सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू - श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निभेर्ळ माणूस होणारा दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू - पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू - अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेठेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर - सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा रस्त्याने झुलू लागतात तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर - आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर त्याचा जयजयकार करण्याकरता. आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. आणि दोन शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर तुमच्या पायखुणा, आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी तुमच्या मखमली पालख्यांचे तुमच्या मेलेल्या मतांचे, आम्ही होतो मतवाले शूर शिपाई संरक्षण करण्यासाठी मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे. हे महामानवा, आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार - एखादा गुच्छ एखादा हार - तीस पायांवर सरपटणार्याा कॅलेंडरातील एखादा शनिवार, रिकामा रविवार. पण तरीही - त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं - आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी जुने पडते आहे नवे घडते आहे काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन. मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे तांबडेलाल, काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी. या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्याचं हात उभारून काळाच्या किनार्या वरून धावणारं संग्रामशील माणूसपण. '' तुम्ही जाता तुमच्या गावा अमुचा रामराम घ्यावा.'' हे यात्रिका, विस्कटलेल्या शरीरांचा चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन तू तुझ्या मार्गानं जा मागे वळून पाहू नकोस जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस. तुला साथसोबत आम्ही करणार नाही आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा. पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण... '' जेथे जाशी तेथे - तो तुझा सांगाती चालवील हाती - धरोनिया.''