मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हरवलेलं सुख

आनंदयात्री · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माझं गाव तसं शांत आहे. म्हणजे वर्दळीच्या वेळेतही बर्‍यापैकी मोकळे रस्ते असतात. आमच्या भागात तसा उन्हाळा जरा कडकच. मग दुपारच्या वेळेस उन्हाळ्यात रस्ते, गल्ल्या अगदी मोकळ्या मोकळ्या असतात. तुरळक चुकार एखादी रिक्षा धावते, किंवा कुल्फीवाला/बर्फ का गोलेवाला पुकारा करत जातांना दिसतो. दुपारी मात्रं उन चांगलेच तापलेले असते. शिशिरातली पानगळ धुळीच्या भोवर्‍यांवर स्वार होउन गल्लोगल्ली, छोट्या मोठ्या मैदानांवर नाचत असते. आईची नजर चुकुवुन बाहेर खेळणारे एखादे चिमुरडे त्या वावटळींमधे कागदाचे तुकडे टाकण्यात मग्न असते. एखादी टिक्कल (कागदाचा गोल तुकडा) वावटळीत अडकुन गोल गोल फिरुन भुर्रकन वर उडाली की त्याच्या आनंदाला पारावार रहात नाही. गरम हवा (झळाया) सुटलेल्या असतात, झाडांची सळसळ अन तुरळक कुठुनतरी लांबुन येणार्‍या टीव्हीच्या हलक्याश्या आवाजात शांतता भरुन राहिलेली असते. अश्यावेळेस घराच्या दारांवर, खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावले जातात, त्यावर पाणी शिंपडुन त्यांच्या ओलेपणाची दुपारपुरती बेगमी केली जाते. घर सुरेख शीतल गार पडते, उन्हाच्या काहिलीने वैतागलेला जीव सुखावतो, सकाळची कामे करुन थकलेल्या आया-मावश्या जरा विसावतात. हलक्या आवाजात विविधभारती लावले जाते, हातातला पेपर अधुन मधुन वारा घेण्यासाठीही हलवला जातो. दुपारच्या जेवणात ताटात कुरडया पापड्या येतात तेव्हाच मनाला त्याची चाहुल लागलेली असते. राजासारखा तो मागावुनच येतो. केशरी पिवळसर घट्ट आमरसाने भरलेली वाटी. अगदी तुडुंब असे जेवण होते. नावापुरती शतपावली केली जाते अन वडिलधार्‍यांचे थोडे दुर्लक्ष झाले की सरळ गारेग्गार्र फरशीवर ताणुन दिली जाते. गाढ झोप लागते. कपबश्यांच्या किणकिणाटाने झोप चाळवते. एव्हाना उन्हं उतरायला लागलेली असतात गल्लीतल्या पोरासोरांचा किलबिलाट सुरु झालेला असतो. चहाचा सुगंध घरात दरवळतो. गाढ झोपेने अंग अगदी जडावलेले असते, हलावे वाटत नाही. हौदातल्या थंड पाण्याने खसखसुन हात पाय तोंड धुतले जाते, अगदीच उकाडा असेल आणी वडिलधारे बाजुला कोणी नसेल तर पट्टकन बादलीभर पाणी डोक्यावर उपडे पण केले जाते. गात्रंन गात्र सुखावते. जडपणा कुठेल्या कुठे वाहुन जातो. "चल येउन बस इकडे, मी पुसते डोके तुझे !!" असे म्हणताच आज्जीच्या पायाशी बसले जाते. ती खसखसुन डोके पुसतांना वाफाळलेला चहा एकेक घोट करुन अंगात चैतन्य वहावत असतो. उन्हं पुरती कलल्यावर झाडांना पाणी घालण्याचा कार्यक्रम ठरलेला. आधी मोठी झाडं, मग गच्चीवरच्या कुंड्या. दुपारच्या कडक उन्हात तापलेली माती पाणी पडताच मायेने ओथंबते, हलकासा मृदगंधही जाणवतो. छातीभरभरुन वास घेण्याचा प्रयत्न केला तरी मन भरत नाही. पाउसही लवकरच येणार आहे असे मनाला समजवले जाते, ते तात्पुरते. सगळी झाडं संपल्यावर गच्चीवर आणी अंगणात सडा टाकला जातो. भराभर पाणी सुकुन जाते. त्यांच संध्याकाळचं दुध पिउन झालं की उन्हं उतरल्यामुळे मुलांना बाहेर खेळायची परवानगी मिळते. रांगोळी शिकणार्‍या चिल्ल्यापिल्ल्या सडा टाकलेल्या स्वच्छ अंगणात हात आजमाउन घेतात अन मुले काहीबाही खेळ खेळतात. अगदी किलबिलाट चालु असतो !! टीण्ण टीण्ण अशी घंटी वाजवत एखादा मटका कुल्फी वाला आलेला असतो, परवाच तर खाल्ली होतेस ना अशी सबब मिळुन कुल्फीला नाही म्हणायचा मोठ्याकडुन प्रयत्न होतो पण बच्चे कंपनी ऐकत नाही, दोन वाली किंवा तीन वाली अशी करुन सगळ्यांसाठी एकेक कुल्फी घेतली जाते. कुल्फीवाला माठात हात घालुन अ‍ॅल्युमिनिअमच्या कुल्फी कॅन काढतो. वरचे रबरी बुच काढुन तित काडी खोचुन दोन्ही पंजांच्या मधे सरासर फिरवतो अन झटकन काढुन समोरच्या मुलाच्या हातात देतो, मुल चराचराला विसरलेले असते !! सुर्य कलतो, तिन्हीसांजा होतात. कातरवेळेचं भान राहु नये म्हणुन देवापुढे दिवा लावला जातो, खेळणारी लहानगी शहाणी बनुन पर्वचा म्हणतात. सातच्या बातम्या सगळ्यांनी मिळुन पाहिल्या जातात. रात्रीची जेवणं झाली की गच्चीवर अंथरुणं टाकली जातात. चंद्रप्रकाशात मोठ्यांच्या गप्पांना अन मुलांच्या दंग्याला उत येतो. शेवटी त्यांना शांत बसवायला हवे म्हणुन आजोबा एखादी छानशी शिवरायांची गोष्ट सांगायला घेतात, चांदण्या बघत - कुतुहलाने गोष्ट ऐकत एकेक पोर शांत झोपी जाते. हळुहळु मोठी माणसं पण पाठ टेकवतात. चंद्रप्रकाशात न्हायलेलं माझं गावही एव्हाना शांत झालेलं असतं, घर अन घर सुखाने निर्धास्त झोपी जाते.

वाचने 21108 वाचनखूण प्रतिक्रिया 62

बिपिन कार्यकर्ते 20/03/2009 - 17:47
जियो, यात्रीसाहेब, जियो. भर उन्हाळ्यातला एक निवांत दिवस तंतोतंत उभा केला तुम्ही डोळ्यासमोर. जबरदस्त. मजा आली वाचायला. तुम्ही पण कधी कधीच लिहिता पण जेव्हा लिहिता तेव्हा उच्च लिहिता. खूपच छान. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 20/03/2009 - 18:36
तुम्ही पण कधी कधीच लिहिता पण जेव्हा लिहिता तेव्हा उच्च लिहिता. पूर्ण अनुमोदन.... येवु द्या अजुन असेच नितांत सुंदर लेख !! वा!! --अवलिया

In reply to by अवलिया

घाटावरचे भट 20/03/2009 - 21:52
सहमत.

In reply to by घाटावरचे भट

टारझन 20/03/2009 - 23:01
मस्त रे लेका !!! बालभारतीत कधी तरी एक धडा वाचलेला .. रणरणत्या उन्हाचं वर्णंन होतं त्यात .. आपली शैली त्यासारखी वाटली !! (यात्रीपंखा) टारूयात्री

In reply to by टारझन

धनंजय 21/03/2009 - 01:51
मितभाषी पण आत कुठे स्पर्श करणारे लिहितात आनंदयात्री.

In reply to by धनंजय

सहज 21/03/2009 - 05:23
मोठा मुलगा झाला आंद्या. आता बनव स्वताची टिम - कच्ची बच्ची आणि ओरड त्यांना अरे शेबड्यांनो कुल्फ्या नका खाउ, आमरस, उन, कुल्फ्या बाधतील तुम्हाला. निस्तरायला लागत आम्हाला. :-) लेख आवडला रे आंद्या. आपण सगळे जरा अमंळ हळवी, नॉस्टॅलजीक जमात सुपरहीट लेख भौ!

In reply to by सहज

बेसनलाडू 21/03/2009 - 05:27
(घामाघूम)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

llपुण्याचे पेशवेll 02/04/2009 - 07:02
आयला हा पैलवान अधून मधूनच आखाड्यात उतरतो पण उतरला की चांदीची गदा पटकावूनच जातो. एक नंबर लिखाण. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सालोमालो 02/04/2009 - 11:00
केवळ अप्रतीम! सालो

परिकथेतील राजकुमार 20/03/2009 - 17:57
मस्त रे :) हा 'एक उन्हाळ दिवस' डोळ्यापुढे गावातला एका संपुर्ण रमणीय दिवसाचे मस्त चित्र रेखाटुन गेला. बर्‍याच दिवसानी विश्रांतीतुन बाहेर आलेली लेखणी बघुन वरे वाटले. परायात्री ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

क्लिंटन 20/03/2009 - 20:10
>>हा 'एक उन्हाळ दिवस' डोळ्यापुढे गावातला एका संपुर्ण रमणीय दिवसाचे मस्त चित्र रेखाटुन गेला. अगदी असेच म्हणतो.लेख आवडला.आणखी येऊ द्या. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्राजु 20/03/2009 - 20:30
हेच म्हणते. रणरणत्या दुपारपासून ते चंद्रप्रकाशी रात्री पर्यंत इतकं अफाट वर्णन केलं आहेस ना... लाजवाब!! संपूर्ण चित्र उभं केलंस. खास करून दुपारचं... जियो!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अनिल हटेला 21/03/2009 - 07:40
वाह !!! सुरेख लिहीलयेस !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मिंटी 20/03/2009 - 18:10
आनंदयात्री तुझ्या लेखणीची कमाल आहे...... काय सुंदर लिहितोस तु...... मस्तच..... परा म्हणतो त्याप्रमाणे पुर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.... :) बिपिनदांच्या तुम्ही पण कधी कधीच लिहिता पण जेव्हा लिहिता तेव्हा उच्च लिहिता. या वाक्याशी एकदम सहमत........ :) पण असं कधी कधी लिहिण्यापेक्षा नेहमीच लिहित रहा....... :) - अमृता अमित.

निखिल देशपांडे 20/03/2009 - 18:14
यात्रीजी मस्तच लिहिले आहे हो.... उन्हाळ्यातला दिवस मस्तच उभा केला तुम्हि..... उन्हाळ्यातला असा दिवस कधी परत जगायला मिळणार.. पण असं कधी कधी लिहिण्यापेक्षा नेहमीच लिहित रहा....... ह्या वाक्याशि सहमत

किट्टु 20/03/2009 - 18:18
मस्त लिहीलं आहेस रे....एकदम मला लहानपणीचे दिवस आठवले... पुन्हा ते दिवस कधीच येणार नाही :( असंच लिहीत जा... वाचुनच समाधान... :)

शितल 20/03/2009 - 18:26
आनंदयात्री, लेख वाचुन हे दिवस असे इतिहास जमा झाल्यासारखे वाटले. खरंच लहानपणी थोड्याफार फरकाने हेच वातावरण असेल सगळ्यांच्या घरी. :)

अनामिक 20/03/2009 - 18:35
यात्री.... सरळ हृदयावरच घात केलास रे बाबा! माझंही तसं छोटंस गाव... उन्हाळ्यातला हा प्रकार थोड्याफार फरकाने आमच्याकडेही सारखाच! दुपारच्या वेळी बाहेर उन्हात जाण्याची परवानगी नसल्याने घरातच बैठे खेळ खेळायचो... मग पत्ते, कॅरम, चेस, चिंचोके, काहीवेळा पुस्तंक (अभ्यासाची नव्हे) अशात संध्याकाळपर्यंत टिपी करायचा... संध्याकाळचा चहा झाला की झाडांना पाणी द्यायचे, बाहेर ओट्यावर - अंगणात पाणी शिंपडायचे ज्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर बाहेर बसून (शेजार्‍यांबरोबर) गप्पा मारायला शांत/शितल वाटायचे. संध्याकाळी सगळे मित्र मिळून जवळच असलेल्या बागेतल्या लायब्ररीमधे जायचो. त्यावेळी आता आहेत तसे चैन म्हणता येईल असे एकही साधन नव्हते, पण किती मजा यायची... किती सुखं होतं त्या दिवसात. आता ते सगळं संपल्यागत वाटतंय... म्हणूनच तू दिलेलं "हरवलेलं सुख" हे शिर्षक अगदी समर्पक वाटते. तुझा प्रत्येक लेख सुंदर असतो. त्यातलाच हा एक. खुप आवडला. तुला मनोमन शुभेच्छा! -अनामिक

स्वाती राजेश 20/03/2009 - 18:39
मस्त लेखन... उन्हाळ्यातील एक दिवस! असा शाळेतील निबंध लिहिल्यासारखे वाटले....:) मस्त लिखाण, साधे, सरळ, सोपी भाषा.....आणि मनात कुठेतरी जुन्या आठवणी जागे करणारे... लवकरच पुढील लेख टाका......:)

In reply to by स्वाती राजेश

टारझन 21/03/2009 - 01:37
असा शाळेतील निबंध लिहिल्यासारखे वाटले....
=)) =)) =)) =)) आग्गायायाया !! आंद्या भैताडा ... लिबंध लिवतो ? =))

बापु देवकर 20/03/2009 - 18:42
हा गाव मनापासुन आवडला....

स्वाती दिनेश 20/03/2009 - 18:49
यात्री, खूप दिवसांनी लिहिलेस,पण छान लिहिले आहेस,आवडले. स्वाती

लिखाळ 20/03/2009 - 18:52
शिशिरातली पानगळ धुळीच्या भोवर्‍यांवर स्वार होउन गल्लोगल्ली, छोट्या मोठ्या मैदानांवर नाचत असते. आईची नजर चुकुवुन बाहेर खेळणारे एखादे चिमुरडे त्या वावटळींमधे कागदाचे तुकडे टाकण्यात मग्न असते. एखादी टिक्कल (कागदाचा गोल तुकडा) वावटळीत अडकुन गोल गोल फिरुन भुर्रकन वर उडाली की त्याच्या आनंदाला पारावार रहात नाही.
वा वा .. मस्त :)
कपबश्यांच्या किणकिणाटाने झोप चाळवते.
छानंच !
कुल्फीवाला माठात हात घालुन अ‍ॅल्युमिनिअमच्या कुल्फी कॅन काढतो. वरचे रबरी बुच काढुन तित काडी खोचुन दोन्ही पंजांच्या मधे सरासर फिरवतो अन झटकन काढुन समोरच्या मुलाच्या हातात देतो, मुल चराचराला विसरलेले असते !!
खास ! लेख आवडला.. वाचताना अनेक सुंदर निवांत उन्हाळ्यातल्या दुपारी आठवल्या ! श्रीनिवास वि. कुलकर्ण्यांच्या लेखनाची थोडी आठवण झाली. त्यांच्या एका कथासंग्रहताली 'उन्हातले दिवस' ही कथा अभ्यासक्रमात होती. तिची आठवण झाली. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

टारझन 20/03/2009 - 23:03
आपली प्रतिक्रिया मोठी कशी दिसेल ह्याचा फॉर्मुला सापडला ;)

शक्तिमान 20/03/2009 - 19:16
अतिशय सुरेख! फारच छान... मलाही आमचे असेच दिवस आठवले... =D>

शिवापा 20/03/2009 - 19:40
तुम्हाला साष्टांग दंडवत हो साहेब. फारच छान लिहला.

रेवती 20/03/2009 - 19:57
उन्हाळ्यातली दुपार डोळ्यांसमोर उभी राहीली. ग्रेटच लिहिलय. एकदम भारी! रेवती

पल्लवी 20/03/2009 - 20:20
यात्री दादा.. :) सुरेख लिहिलं आहेस !! पुढचं लेखन सावकाश आलं तरी हरकत नाही, पण असाच मस्त लिही.. शुभेच्छा ! :)

चित्रा 20/03/2009 - 20:58
मिपावर आठवणींचा बहर आलेला जाणवतो आहे. उन्हाळ्यातील अजून एक काम म्हणजे पापड, चिकवड्या, वर्षाचा बटाट्याचा कीस वाळत घालणे. चिकवड्या खालच्या बाजूने ओल्या असतानाच मटकवणे.

चतुरंग 20/03/2009 - 22:07
आंद्या लेका, तू लिहितोस मस्तच. तुझा लेख वाचताना मी त्या ओळीओळीबरोबर माझ्या गावातून आणि घरातून फेरफटका मारुन आलो. "मलेऽऽऽऽई कुल्पीऽऽऽये"ची आरोळी आणि ट्णट्ण वाजणारी घंटा कानात घुमली! भर दुपारी सायकलचे टायर रस्त्यावरुन काडीने पळवत त्यामागे पळताना होणारा चटक चटक असा आवाज आला! उन्हाने तापलेल्या टाकीतल्या पाण्याने केलेली आंघोळ आठवली! तळमजल्यावरच्या हौदाशेजारच्या थंडगार खोलीत सतरंजी अंथरुन घेतलेली आमरसानंतरची डाराडूर पडी आठवली! गच्चीवर घातलेला सडा, गुलाबाच्या बागेला घातलेलं पाणी तेही आठवलं! दुपारच्या रणरणत्या उन्हात, काहिली होऊन, सोफ्याखाली पेंगणार्‍या माझ्या लाडक्या बोरीसला जवळ घेऊन त्याच्या थंडगार नाकाला हात लावून फरशीवर पडून रहाणं आठवलं! आणि बरंच काही........आठवलं आणि जीव हळवा झाला!! मस्त. फारच मस्त! जियो!! :) चतुरंग

श्रावण मोडक 20/03/2009 - 22:31
ठरवलं होतं की वाचल्या-वाचल्या प्रतिक्रिया द्यायची नाही. थोड्या जमू द्यायच्या आणि मग सगळ्यांशी सहमत असं म्हणायचं. तेच म्हणतो आता.

In reply to by श्रावण मोडक

विसुनाना 21/03/2009 - 17:00
मीही तेच म्हणतो.

प्रमोद देव 20/03/2009 - 22:49
आंदुशेठ मस्त लिवलंया! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

क्रान्ति 20/03/2009 - 22:50
उन्हाळ्याच्या इतक्या छान आठवणी गोळा झाल्या मनात लेख वाचून! आता कूलरची हवा खात असे सुन्दर सुन्दर लेख वाचत त्यांना उजाळा द्यायचा म्हणजे उन्हाळा सुसह्य होईल. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 20/03/2009 - 23:50
काय मस्त लिहिलंय रे ! -दिलीप बिरुटे

नंदन 21/03/2009 - 00:28
दर्जाचे लेखन, आनंदयात्रीसाहेब. लेख अतिशय आवडला. तुम्ही पण कधी कधीच लिहिता पण जेव्हा लिहिता तेव्हा उच्च लिहिता. - या बिपिनदांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर 21/03/2009 - 00:40
यात्रीदेवा, आत्ताच ह लेख पाहिला. कामाच्या गडबडीत तुझा इतका सुंदर लेख मिपावर केव्हा आला हे देखील कळलं नाही रे! असो. लेख नेहमीप्रमाणेच क्लास..! जियो.... तात्या.

नाटक्या 21/03/2009 - 00:52
वा! एकदम मला लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही गावी जायचो तेव्हा अगदी अशीच दिनचर्या असायची. मनापासून धन्यवाद आठवणींना उजाळा दिल्याबद्दल - नाटक्या

देवदत्त 21/03/2009 - 01:00
छान लेखन... शाळा/कॉलेजच्या वेळच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवल्या. :)

प्रिया८ 21/03/2009 - 01:30
टण्...ट्णा..ट्ण,.....टण....लेख वाचून कुल्फीवाला डोळ्यासमोर आला, शाळेच्या बाहेर उभा असणारा, आणि उन्हाळ्यात घरावरून अशीच घंटी वाजवत जाणारा . फारच मस्त होते ते दिवस!! तुमचा लेख वाचुन उन्हाळ्यात आई करायची त्या कैरीच्या पन्ह्याची आणि साखरंब्याची आठवण झाली. :)

जृंभणश्वान 21/03/2009 - 05:52
मस्तच लिहिले...फार आवडले :)

सुचेल तसं 21/03/2009 - 09:08
खूपच छान. प्रत्येक वाक्य मनाला भिडलं. Finally I will be so matured that I will react to nothing.

दिपक 21/03/2009 - 12:00
आनंदयात्रीजी, मनापासुन धन्यवाद आठवणींच्या वाटा मोकळ्या केल्यात. आत्ताच त्यांना कडकडुन भेटुन आलोय. दुपारचे रणरणते ऊन, कुल्फी, "कशाला उन्हात हुंदडताय" ह्या मोठ्यांच्या प्रश्नाला नजुमानता खेळलेले क्रिकेट, सायकलींग.. ग्रेट एक न एक शब्द आवडला. सलाम तुमच्या लेखणीला :)

In reply to by दिपक

मृगनयनी 21/03/2009 - 12:31
खूप सुन्दर! काही वर्षे पाठीमागे जाऊन वाक्य न् वाक्य अनुभवल्यासारखे वाटते! मटका-कुल्फी!!!! सगळ्यात आवडली! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

जागु 21/03/2009 - 12:27
खुप छान लिहीलत. माझ्या उन्हाळा वरुन धागा मिळाला का ? खुप सुंदर वर्णन.

बेधुन्द मनाची लहर 21/03/2009 - 15:17
अप्रतिम लेखन.... पुनम... देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.

केवळ_विशेष 23/03/2009 - 13:26
यात्रीदादा, लै उच्च लिवलंय... :)

धमाल मुलगा 29/03/2009 - 23:46
हा आनंदयात्री एक नंबरचा हलकट आहे. कधीतरी काहीतरी चिमुट्भर लिहितो अन् तेव्हढ्याश्श्या लेखातून कोणत्या ना कोणत्या आठव्णी जागवतो... काळजाला एक चटका लाऊन जातो. यात्रीशेठ, वेगळं काय बोलु? बालपणातली उन्हाळ्याची सुट्टीची आठवण जागवली तुम्ही आमची. सकाळपासून मित्र जमवून उन्हा-तान्हाची पर्वा न करता खेळलेले खेळ...सूरपारंब्या खेळताना रप्पकन आपटल्यावर गुपचुप कुटकुटी (की निरगुडी)चा पाला चोळून त्याचा रस जखमेवर लाऊन वर चोथा दाबून पुन्हा चालु केलेला खेळ.... घरी गेल्यावर उभ्या उभ्यानंच गटागटा प्यायलेलं माठातलं थंडगार गोड पाणी....त्यावरुन घरच्यांची "अरे, जरा वेळ बसुन मग पाणी पी, नाहीतर पोटात दुखेल" अशी खाल्लेली बोलणी....दुपारी जेवायला बसल्यावर बाहेरुन मित्रांच्या हाकांनी जेवणातलं उडालेलं लक्ष...."आता दुपारी उन्हात खेळायचं नाही, आजारी पडलास तर उरलेली सुट्टी अंथरुणात काढावी लागेल" असं आजीनं सुनावल्यावर कसंनुसं झालेलं तोंड... त्या उन्हाच्या काहिलीनं दुपारी मोठ्या माणसांचा डोळा लागल्यावर हळुच चपला शर्टात लपवून घरातून काढलेला पळ.... त्यानंतर वडिल घरी यायच्या वेळेपर्यंत पोटभर उंडारणं... मग घरी जातानाची ती धाकधूक...आज नक्की मार बसणार! दिवसभर घराबाहेर होतो आपण...घरी पोचल्यावर पहावं तर वडिलांनी लेकाला आवडतं म्हणुन आणलेलं रसरशीत कलिंगड किंवा आईस्क्रिम :) संध्याकाळी शेजारच्या वाड्यातल्या मोत्याबरोबर वेड्यासारखं धाव्णं किंवा त्याची साखळी आपल्या सायकलीला बांधून त्याला पळवणं..... रात्री जेवणं झाल्यावर कुणाच्या तरी एकाच्या गच्चीत सगळ्यांनी जमून पिटलेल्या चकाट्या..... कोणता ध्रुवतारा, कोणता शुक्रतारा ह्यावरुन झालेले वाद........ तूने भी क्या दिन याद दिला दे मेरे यार..... हॅट्ट साला...आता वाटतं ह्या पैश्यापायी आपण आपली जिंदगीच हरवून बसलोय. :( पैसे फेकून हवं ते विकत घेऊ शकतो, पण ते मित्र, तो दंगा, ती उन्हाळ्याची सुट्टी आणि घरच्यांनी केलेले लाड.........ते कुठल्या दुकानातुन विकत घेऊ रे? आहे का कोणत्या सुपरमॉलमध्ये सध्या अशी काही ऑफर चालु? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

घाशीराम कोतवाल १.२ 02/04/2009 - 10:44
तुने भी क्या दिन याद दिला दे मेरे यार..... हॅट्ट साला...आता वाटतं ह्या पैश्यापायी आपण आपली जिंदगीच हरवून बसलोय. पैसे फेकून हवं ते विकत घेऊ शकतो, पण ते मित्र, तो दंगा, ती उन्हाळ्याची सुट्टी आणि घरच्यांनी केलेले लाड.........ते कुठल्या दुकानातुन विकत घेऊ रे? आहे का कोणत्या सुपरमॉलमध्ये सध्या अशी काही ऑफर चालु?
साला धम्या आंद्या तोडलस मित्रा तोडलस अरे आंद्याचा लेख भारी तर धम्याचा प्रतिसाद तोडीस तोड आहे साला सगळ्या आठवणी जाग्या केल्यात मित्रांनो जियो जियो ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 13/05/2009 - 17:02
हा आनंदयात्री एक नंबरचा हलकट आहे. कधीतरी काहीतरी चिमुट्भर लिहितो अन् तेव्हढ्याश्श्या लेखातून कोणत्या ना कोणत्या आठव्णी जागवतो... काळजाला एक चटका लाऊन जातो. सहमत रे धम्या आन्द्या हे काही वेगळेच रसायन आहे. त्याच्यात एक प्रौढ मूल दडलय.

संदीप चित्रे 01/04/2009 - 19:59
सुरेख म्हणजे सुरेखच लिहिला आहेस रे... खूप आवडला :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

In reply to by संदीप चित्रे

३_१४ विक्षिप्त अदिती 01/04/2009 - 20:53
आंद्या, मोठं झाल्याचा त्रास झाला रे हे वाचून! अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

सुनील 01/04/2009 - 21:15
मस्त लिहिलयं अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहणारं! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्वसाक्षी 01/04/2009 - 21:38
असे हे लेखन भावले. फारच छान, अगदी अकृतत्रिम व ओघवते.

नरेश_ 02/04/2009 - 10:13
आपल्या लेखणीत फार मोठी ताकद आहे. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

चटोरी वैशू 02/04/2009 - 12:00
लहानपण आठवले..... आमचे गाव आठवले.... अ़क्षय्य त्रुतियेला लांब लांब झोके बांधले जायचे ....त्यावर बसण्यावरुन भावंडामधे भांडण होत असे... मग झोक्यावर बसून... लाडू - करंजी....चा आस्वाद घेतल्या जाई... खूप मज्जा यायची... गेले ते दिवस ...राहिल्या फक्त आठवणी.....

मॅन्ड्रेक 03/04/2009 - 13:34
तूने भी क्या दिन याद दिला दे मेरे यार..... हॅट्ट साला...आता वाटतं ह्या पैश्यापायी आपण आपली जिंदगीच हरवून बसलोय. पैसे फेकून हवं ते विकत घेऊ शकतो, पण ते मित्र, तो दंगा, ती उन्हाळ्याची सुट्टी आणि घरच्यांनी केलेले लाड.........ते कुठल्या दुकानातुन विकत घेऊ रे? असेच म्हणतो. at and post : janadu.

पद्मश्री चित्रे 03/04/2009 - 14:54
कडक उन्हाळ्यात आठवणींचा गारवा देणारा लेख... मुलांना पण दाखवला वाचुन आणि त्यांनी लगेच -आता सुट्टीत जास्त कुल्फि खाल्ली व गार पाण्याने आंघोळ केली, दिवस्भर खेळलं तरी ओरडणार नाही असं कबुल करुन घेतलं- ' कारण का -तर तुम्ही पण लहानपणी तेच करायचात ना? मग आम्हाला का ओरडता? आता आहे सुट्टीभर धिंगाणा.. आणि हे सर्व तुझ्या लेखामुळे झालं... :)