भारतीय आहाराला चौरस आहार मानले जाते. तुम्ही जर आपला आहार खोलवर जाउन पाहिला तर तुम्हाला असे दिसेल की, त्यात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, ई. ह्याचे योग्य मिश्रण आहे. त्याबरोबरच आयुर्वेदात वर्णन केलेले व सणवाराला खाण्याचे पदार्थ पाहिले असता, त्या त्या ऋतूत मानवाला आरोग्यास मदत होइल असे पदार्थ सुचवलेले आहेत. इतका बारीक अभ्यास कोणत्या संस्कृतीत आहे?
विचार करा, जेव्हा "अग्री"कल्चर" हे एक कल्चर नव्हते, तेव्हाचा मानव खाद्यपदार्थ कोणते असावेत, कोणते नसावेत ह्याचा कसा निर्णय घेत असेल? अर्थातच प्रयोगातून आणि वेळ्प्रसंगी जीवाची किंमत मोजून तो ते शिकला असेल. आज लाखो वनस्पती भूतलावर असतांना आपल्याला ह्याचे ज्ञान झाले आहे की, काय खावे आणि काय खाउ नये. आपल्याला आज नेमके माहित आहे की कोणत्या भाज्या, धान्ये, औषधी वनस्पती, फळे, फळभाज्या खाव्यात; काय खाल्यावर बाधते, वगैरे. नुसतेच हेच नव्हे तर ते पदार्थ भाजून, उकडून, तळून, कच्चे कसे खायचे ह्याचेही ज्ञान झाले. ह्या ज्ञानामागे अनेक अज्ञात माणसांनी वेळप्रसंगी जीव गमावला असेल ह्याची कल्पना असणे आवश्यक आहे.
हे ज्या संस्कृतीत घडले नाही त्या संस्कृतीत मांसाहाराच्या वेगवेगळ्या पदार्थांपलिकडे त्यांची झेप गेली नाही. [मांसाहार वाइट की चांगला हा ह्या लेखाचा विषय नाही]. एस्किमोला समोर दिसतोय तो रेन्डियर; तो मांसभक्षी नाही; त्याला काय भ्यायचे; मग मारा त्याला आणि खा- हे ठरवायला काय डोके लागते?
शेती जेव्हा एक संस्कृती बनली, तेव्हा मानवाने समाजात कसे रहायचे ह्याचे ज्ञान मिळवले होते. अशावेळी, एखाद्या धान्याची लागवड कशी करायची ह्याचा विचार त्याने केला असेल व अग्रीकल्चर जन्माला आले असेल. धान्य साठवायचे कसे हे तो शिकला असेल. परंतू त्याही पुढे जाउन, भारतीय संस्कृतीत चौरस आहारचे मॉडेल ज्यांनी मांडले त्यांना नुसत्या अग्रीकल्चरच्याही वरचे ज्ञान असलेच पाहिजे.
२१ व्या शतकात जाउ पहाणाऱ्या मानवाला नुसते चवदार पदार्थ [ह्या एकाच गुणाला किंमत असलेले] खायची जेव्हा इच्छा होते तेव्हा तो स्वतःला "आधूनिक" समजतो असे दिसते. उच्च अशी भारतीय खाद्यसंस्कृती सोडून जगण्याला २१ व्या शतकात जाणे असे असेल तर ते चुकीचे आहे असे नाही का तुम्हाला वाटत? खरे म्हणजे काय खावे आणि कसे खावे ह्याचे साधे ज्ञानही आजच्या कित्येकांना नाही, कारण त्याने फूकट मिळालेले समृद्ध ज्ञान फेकून दिले आहे.
केथ्रीजी