Skip to main content

सुभाषित संग्रह

लेखक सुवर्णा यांनी गुरुवार, 22/01/2009 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना बरीच छान सुभाषिते शिकले होते. तेव्हा पाठही होती. त्यातली आता बरीचशी आठवत नाहीत. म्हणुन ती कुठे तरी संग्रहीत करण्याची गरज भासली. पूजा आणि मी हा प्रयत्न करतॊ आहॊत... १) पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्‌ । मूढै: पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥ अर्थ - या पृथ्वीवर फक्त तीन रत्ने आहेत. पाणी, अन्न आणि सुभाषिते. मूर्ख लोक मात्र दगडाच्या तुकडयांना "रत्न" असे म्हणतात. २) रामाभिषेके जलमाहरन्त्या । हस्ताच्युतो हेमघटो युवत्या: ॥ सोपाणमार्गेण करोति शब्दं। ठंठंठठंठंठठठंठंठठ: ॥ अर्थ - रामाच्या अभिषेकाकरीता पाणी आणत असताना युवतीच्या हातून सोन्याची घागर (हेमघट) पडली. आणि ती पाय -यांवरून घरंगळत जाताना आवाज झाला ठंठंठठंठंठठठंठंठठ: .. हे सुभाषित चरणपुर्ती किंवा काव्यपुर्ती या प्रकाराचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये फ़क्त चौथा चरण देवून आधीचे ३ चरण रचायचे असतात. 3) वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत:। स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौह्र्दम ॥ अर्थ - जंगलामध्ये वणवा लागला असताना वारा अग्नीला मदत करतो. मात्र तोच वारा दिव्याची ज्योत (दुर्बल अग्नी) विझवतो. दुर्बलाला कोण मित्र असतो?? (कोणीही नसतो) ४) कमले कमला शेते । हर: शेते हिमालये । हरि: शेते समुद्रे च । मन्ये मत्कुणशन्कया ॥ अर्थ - लक्ष्मी कमळामध्ये झोपते. शंकर हिमालयामध्ये झोपतो. विष्णू समुद्रामध्ये झोपतो. बहुतेक ढेकणांच्या भीतीने... :) 5) उद्यमेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथै: । न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृग: ॥ अर्थ - प्रयत्न केल्यानेच कार्ये पूर्ण होतात. केवळ स्वप्ने बघून (मनोरथे करुन) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करत नाही. (त्यासाठी त्याला शिकार करावीच लागते). ६) किं वाससा तत्र विचारणीयाः वसः प्रधानं खलु योग्यतायाम्॥ पीतांबरम वीक्ष्य दधौ स्वकन्यां चर्माम्बरं वीक्ष्य विंषं समुद्रः॥ अर्थ - कपड्यांवर काय अवलंबून असते? तर बरंच काही असते. पीतांबर नेसलेल्या विष्णूला समुद्राने आपली मुलगी दिली आणि चामडं गुंडाळणा-या शंकराला विष दिले. ७) कस्तुरि जायते कस्मात्‌ को हन्ति करिणां शतम्‌। भीरु: करोति किं युध्दे मृगात सिंह: पलायते ॥ अर्थ- कस्तुरी कोणापासून मिळते? शंभर हत्तींची हत्या कोण करतो? भित्रा मनुष्य युध्दामध्ये काय करतो? हरणापासून सिंह पळतो. स्पष्टीकरण - शेवटचे चरण थोडेसे संभ्रमात टाकणारे आहे. "सिंह हरणापासून पळतो". actually, यात पहिल्या ३ चरणांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि चौथ्या चरणात त्याची उत्तरे आहेत. कस्तुरी कोणापासून मिळते? - हरणापासून शंभर हत्तींची हत्या कोण करतो? - सिंह भित्रा मनुष्य युध्दामध्ये काय करतो? - पळतो
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26222
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्| अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः|| क्र.७ सारखे एक - भोजनान्ते च किं पेयं जयंतः कस्य वै सुतः| कथं इंद्रपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभं|| हंसः श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसो हंसो बको बकः|| किंवा काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयो:| वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः|| अजून आठवली की लिहिन. - भटोबा (९वी अ)

छान छान ! उपक्रम चांगला आहे ! आवडला ! ** बाकी , पूजा आणि मी हा प्रयत्न करतॊ आहॊत... तुम्ही दिसलात येथे पण पुजा नाही दिसली... ह्.घ्या.

शैले शैले न माणिक्यम्, मौक्तिकं न गजे गजे | साधवो न हि सर्वत्र, चंदनं न वने वने|| शतेषु जायते शूरः, सहस्त्रेषु च पंडितः | वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवति वा न वा || -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

क्षणशः कणश्चैव विद्यामर्थं च साधयेत! क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम ! क्षणा़क्षणाने ज्ञान आणि कणाकणाने धन मिळवावे.क्षणाचा त्याग केल्यास विद्या कोठुन मिळणार आणि कणाचा त्याग केल्यास धन कोठुन मिळणार?

शृंगार वीर करूणा, अद्भुत हास्य भयानकः| बीभत्स रूद्र शांतःच, काव्ये नव रसा: मतः|| काव्यातले नवरस. -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ कुचकलशयुगे वा कृष्ण सारे क्षणानाम । चरतु जडमते ना सज्जनानां ना मते वा मतिकृत गुणदोषा मां विभुं न स्पृशान्ति ॥ अर्थ न समजल्यास खव मधे वाचा. --अवलिया अवलियाची अनुदिनी

छान आठवणी जागृत झाल्या सुभाषिते वाचून.. आशा नाम मनुष्याणाम् काचित् आश्चर्यशृखंला | यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पन्गुवत् ||

नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने। विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥ (१०वी तुकडी 'ब') पुण्याचे पेशवे Since 1984

विद्या विवादाय धनं मदाय शक्ति: परेषां परिपीडनाय| खलस्य साधोर्विपरीत मेतदं, ज्ञानाय दानायच रक्षणाय|| अर्थः दुष्ट माणसाची विद्या ही वादविवादासाठी असते.संपत्ती ही उन्मत्त होण्यासाठी असते;आणि शक्ती ही इतरांना त्रास देण्यासाठी असते. परंतु सज्जनांचे ह्याच्या उलट असते.कारण त्यांची विद्या ही ज्ञान मिळविण्यासाठी असते. संपत्ती ही दान करण्यासाठी असते; आणि शक्ती ही इतरांचे रक्षण करण्यासाठी असते.

In reply to by वृषाली

आम्ही हे जरा वेगळं शिकलो... विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्ति: परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतद् ज्ञानाय दानाय च रक्षणाय||

In reply to by घाटावरचे भट

आपण लिहिलेले हे शाळेतील अभ्यासक्रमातील आहे आणि मी लिहिलेले हे संस्कृत साहित्यातील अमर सुभाषिते यातील आहे. वाक्यरचना जरी वेगळी असली तरी अर्थाचा बोध एकच आहे.!!!!!

चांगला उपक्रम ... भाषांसु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाणभारती तस्मात हि काव्यं मधुरम तस्मादपि सुभाषितम |

अरे पण या सुभाषितांचा अर्थपण लिहा की... माझ्या सारखे संस्कृत न येणारेपण असतील की मिपावर. (आधीच आमच्या सुदलेखनाच्या नावानं बोंबा... त्यात संस्कृत कसं कळावं?) ~X( ~X( ~X( अनामिक

सातव्यासारखे एक कोडे मलापण आठवले - भोजनाते च किम्‌ पथ्यम्‌, जयंता: कस्य वै सुता: कथां विष्णुपदम्‌ प्रोक्तं, तक्रं शक्रस्य दुर्लभम्‌ ताक, इंद्र आणि अशक्य असे शेवटच्या चरणातले शब्द, पहिल्या ३ प्रश्नांची उत्तरे आहेत. * बाकी सर्व सुभाषिते वाचून शाळेत रट्टा मारलेली अजुन २ आठवली - नववीला होती बहुतेक सूर्याची स्तुति कम प्रार्थना होती एक- कल्याणानां त्वमसि महसां भाजनं विश्वमूर्ते धुर्यां लक्ष्मीमथं मयि भृशं देहि देव प्रसिद यद्‌ यद्‌ पापं प्रतिजही जगन्नाथ नम्रस्य तन्मे भद्रं भद्रं वितर्‌ भगवन्‌ भूयसे मंगलाय । आणि एक शंकराची चंद्रमय शब्दांनी स्तुति होती- चंद्राननार्धदेहाय चंद्रांशुसितमूर्तये चंद्रार्कानलनेत्राय चंद्रांर्धशिरसे नम: सुभाषित म्हणले, की सज्जन, दुर्जन, चंदन, सुगंध असले शब्द आठवतात.

चांगला उपक्रम, वर लिखाळांनी सांगितल्याप्रमाणे उपक्रमावर पण अवश्य पहा :-) एक आवडणारे, आठवणीप्रमाणे येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म:। ते मर्त्यलोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति (भतृहरीचे नितिशतक) ज्या व्यक्ती विद्या, तप, दान, ज्ञान, शील, तसेच कुठच्याही सद्गुणांनी युक्त नसतात, त्या "खायला काळ आणि भुईला भार"असतात. अशा व्यक्ती ह्या मनुष्य नसून नुसत्या चरत राहणार्‍या पशूंसारख्याच असतात. अशाच अर्थाचे एक विवेकानंदांचे वाक्य आहे:
Get up, and put your shoulders to the wheel-------------how long is this life for? As you have come into this world, leave some mark behind. Otherwise, where is the difference between you and the trees and stones?They, too, come into existence, decay and die.

वरमेको गुणी पुत्रो नच मूर्खशतान्यपि एकश्चंद्रस्तमो हन्ति, नच तारागणोपि च - १०० मूर्ख मुले असण्यापेक्षा एकच गुणी मुलगा असणे चांगले. रात्री अनेक तारका आकाशात असल्या तरी, अंधार दूर करायला एकटा चंद्र पुरेसा असतो. आपद्गतम् हससि किम् द्रविणान्ध मूढ लक्ष्मी स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् एतान् प्रपश्यसि घटाङ्जलयंत्रचक्रे रिक्ता: भवन्ति भरिता: भरिताश्च रिक्ता: - श्रीमंतीचा गर्व असणार्‍या मूर्खा, संकटात सापडलेल्यांची अशी चेष्टा करू नको. लक्ष्मी कधीच एके ठिकाणी स्थिर नसते ! मोटेला लावलेल्या घागरी पाहा. भरलेली रिकामी होते, आणि रिकामी झालेली पुन्हा भरते...तसेच हे !! आणि एक मजेशीर.... सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च - सगळ्यांचा चहा हृदयातल्या "ष्टो" वर केला. नंतर लक्षात आले, आणि पोहे पण केले !!!! ("संस्कूत्र" दहावीतच सोडले, त्यामुळे सूदलेखणात चू. भू. द्या. घ्या.)

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तवचार्जुन -- खूप मे महिने असेच गेले...आणि तुझा जन्म चार जूनला झाला

In reply to by सचिन

ह्याच्यावरुन आठवले तमसो मा ज्योति:गमय चा अर्थ आम्ही, "तुमची आई जोतिबाच्या देवळात गेलीय" असा सांगायचो :)

In reply to by जृंभणश्वान

याच न्यायाने "जाड्याप" हा संस्कृत शब्द आहे हे अर्थातच माहित नसल्याने "नि:शेष झालेला तो जाड्या पहा" असे "या कुंदे तुषार हार धवला " या श्लोकाच्या अंती वाटायचे .

In reply to by सचिन

खूप मे महिने असेच गेले...आणि तुझा जन्म चार जूनला झाला कवीला नक्की काय म्हणायचे आहे? :-) अशाच संदर्भात कधीकाळी ऐकलेला एक पीजे आठवला: संस्कृतमधे कुठल्यातरी साहीत्यात (मूळ रामायण नसावे) रामाच्या तोंडात वनवासाला जात असताना अयोद्धेकडे बघत लक्ष्मणाला उद्देशून वाक्य आहे की "तेनो दिवस: गतः", अर्थात ते (अयोद्धेतील) सुखाचे/प्रेमाचे दिवस आता दूर गेले... वर्गात ह्या वाक्याचे भाषांतर करायला सांगितल्यावर एका विद्वानाने केले, "तरीही दिवस गेलेच..." मास्तरांनी त्याला उरलेला दिवस कसा घालवायला लावला असेल याची कल्पना केलेली बरी :-)

In reply to by विकास

"तरीही दिवस गेलेच..." भन्नाट विनोद !! पोस्ट ग्रॅजुअशनला आमच्या वर्गात एक पूर्वी कॉन्वेंटमधे मधे गेलेली मराठी मुलगी होती. सेमिस्टर संपत यायला लागल्यावर जो तो आपापल्या घरी जायची वेळ येऊन ठेपली. कँटीन मधे आमची मैत्रीण म्हणाली : "कसे दिवस गेले काही समजलेच नाही ना !" बाकीचे का जोरजोरात हसत आहेत ते बिचारीला कळाअयला ५ मिनिटे लागली !

सुभाषिते उधृत करणार्‍या सर्व लोकांचे आभार. हा धागा वाचताना वेळ अतिशय चांगला गेला. लिखाळांचेही अनेक आभार !

वा! हा फारच छान धागा आहे. मला सुचणारी ही सुभाषिते! घृष्टं घृष्टं पुनरपि पुनः चंदनं चारुगंधं छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकाण्डं दग्धं दग्धं पुनरपि पुनः कांचनं कांतवर्णं प्राणांतेपि प्रकृति विकृतिर्जायते नोत्तमानां|| अर्थात - कितिही उगाळावे, चंदन सुगंधीच; कितिही तुकडे करा ऊस गोडच; कितिही तापवा, सुवर्णाची चकाकी तशीच; प्राणावर बेतले, तरी उत्तमांची गती बिघडत नाही. गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः राम रावणयोर्युद्धं रामरावणयोरिव|| अर्थात - आकाशाची तुलना? आकाशाशीच, सागराची सागराचीच. तद्वतच, राम रावणांच्या युद्धाची तुलना दुसर्‍या कोणाशी होऊ शकत नाही. जानामि नागेंद्र तव प्रभावो, कण्ठे स्थितो गर्जसि शंकरस्य स्थानं प्रधानं न बलं प्रधानं स्थाने स्थितो कापुरुषोपि शूरः|| अर्थात - हे नागराजा, तुझा मोठेपणा काय ते मला माहीत आहे, शंकराच्या गळ्यात राहून भय दाखवतोस; बळ नव्हे तर स्थान हेच महत्वाचे; अशा ठिकाणी राहून एकादा दुबळाही शूर भासतो. आणि हे एक तर फारच प्रसिद्धः उष्ट्राणां लग्नवेलायां गर्दभा: मंत्रपाठका: परस्परं प्रषंसन्ति अहो रूपमहोध्वनि:|| अर्थात - उंटांच्या लग्नाला मंत्रपठणाला बसले गाढव; एकमेकांची तारीफ करतात, (गाढव उंटाना) वा वा काय रूप आहे - काय जोडा जमलाय; (उंट गाढवाना) वा वा काय सूर लावलाय! संस्कृतातले श्लोक / सुभाषिते मराठीत भाषांतरित करणे हे ठीकच आहे. पण गदिमांसारख्याची थोरवी ही की त्यानी संस्कृतातील श्लोकाला तोडीस तोड असे कडवे गीतरामायणात 'बोलता बोलता' रचले. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महादधौ, समेत्यच व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः|| अर्थात - दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाहि गाठ. क्षणिक तेवि आहे बाळा मेळ माणसांचा!!! गदिमांना आणि त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम!

अधिष्टानं तथा कर्ता करणं च पृथा विग्वधम् विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पश्चमम्.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

संस्कृत सुभाषितांबरोबर त्यांचे अर्थही सांगा ही विनंती .....ज्याप्रमाणे सुवर्णाने धागा सुरू करताना सांगितले.