मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काल पाकिट रिकामे केले..

तुमचा अभिषेक · · जनातलं, मनातलं
काल पाकिट रिकामे केले.. पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता. कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला.. गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली. एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते. एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला.. आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही. एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला.. छान दाढी केलेला.. माझाच आहे हे पटकन ओळखूच आले नाही. एक बायकोने दिलेली कसलीशी सामानाची यादी निघाली.. कधी ते सामान आणल्याचे आठवत मात्र नव्हते. एक काढ्याची रेसिपी.. कधी तो काढाही प्यायल्याचे आठवत नव्हते.. एका कप्प्याला घट्ट चिकटून बसलेली कागदाची चपटी पुडी सापडली. आत माझे रक्षण करत निपचित पडलेला अंगारा होता. काही कागदी चिटोरयांची अवस्था ईतकी दयनीय होती, की न वाचताच फाडावेसे वाटले.. वाचल्यावरही काही विशेष निघाले नाही. काही विजिटींग कार्डस देखील अशीच होती. समोरच्याचे मन राखायला स्विकारली होती. बघ हं, जपून ठेवतोय असे त्याला दाखवायला पाकिटात ठेवली होती. जी ना कधी वापरली होती, ना कधी वापरणार होतो. त्यांनाही केराची टोपली दाखवली. सरतेशेवटी सर्वात आतल्या कप्प्यात एक कागदाचा चिटोरा सापडला.. कधीकाळी दिवाळीच्या मुहुर्तावर ईदवर सुचलेल्या आणि कागदावर उतरवलेल्या दोन ओळी सापडल्या.. पत्थर माती के है टुकडे सारे.. जो ईद ना होती, तो कोई चाँद ना कहेलाता! बायकांच्या पर्ससारखे पुरुषांच्या बटव्यात खजिना लपलेला नसतो... तरी शोधाशोध करता काही आठवणी ओघळतातच! - तुमचा अभिषेक ---------- ता.क. - नव्या पाकिटाला पंधरा कप्पे आहेत!

वाचने 7768 वाचनखूण प्रतिक्रिया 46

गवि Wed, 07/02/2025 - 08:52
अगदी उत्कृष्ट. मनातले. माझ्याही बाबतीत पाकिटाची कहाणी अगदी सेम टू सेम. अशी साफसफाई अनेक महिन्यांनी केली की ते अगदी सडपातळ होऊन जाते.

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 09:12
आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात सरकवतानाच्या भावना सुद्धा संमिश्र असतात. पाकीट नव्या सारखे झाल्याचा आनंद तर त्याचवेळी इतके सडपातळ करायची गरज नव्हती, काही गोष्टी राहिल्या असत्या तर चालले असते असे वाटणे..

In reply to by गवि

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 22:04
बुडावरून आठवले, ते मोठे दिसावे म्हणून देखील बरेच जण मुद्दाम पाकीट जाडजूड बनवायचे आणि फिट जीन्समध्ये कोंबायचे :) आमच्यावेळी ते एक फॅड होते.

सौंदाळा Wed, 07/02/2025 - 10:27
बरेच कागद किंवा बिले सापडतात. मजकूर गायब होऊन फक्त पांढरे कागद राहिलेले असतात. विजिटींग कार्ड पूर्वी असायचे आता जवळ जवळ बंदच. (बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि Wed, 07/02/2025 - 11:42
बादवे हे विजिटींग कार्ड चमचा म्हणून वापरुन एका ट्रेकला भेळ खाल्ली होती
हा हा. आणखी एक उपयोग असतो. अनेक हॉटेलांत रूम घेतली की एकच किल्ली मिळते. ती कार्ड रूपात असते आणि ती खाचेत सरकवून ठेवल्याशिवाय वीजप्रवाह चालू होत / रहात नाही. खाचेत सरकवायला की चेन असेल तर ठीक. त्यातून किल्ली वेगळी काढता येते. तर दोन लोक असतील आणि एकाला बाहेर जाऊन यायचे असेल तर त्याने किल्ली घेऊन जाणे म्हणजे वीज बंद. अशावेळी मी एखादे व्हिजिटिंग कार्ड त्या स्लॉटमधे घालून कार्ड किल्ली काढून घेतो.

In reply to by गवि

अनामिक सदस्य Wed, 07/16/2025 - 10:23
माझी समजूत होती की त्या की कार्डवरची स्ट्रीप महत्वाची असते वीज चालू ठेवण्यासाठी. माझ्या अनुभवात हॉटेलांत दुसर्या व्यक्तिसाठी अजून एक किल्ली पण देतात. अजून एका कार्ड वर कोड प्रोग्राम केला की झाले.

सुबोध खरे Wed, 07/02/2025 - 10:34
माझे पाकीट मी नियमित पणे स्वच्छ ठेवत आलो आहे. आणि महत्त्वाच्या पावत्या किंवा व्हिजिटिंग कार्ड्स मी कधीच पाकिटात ठेवत नाही तर घरी आल्यावर कपाटाचा एक कप्पा आहे त्यातच असतो. यामुळे आजतागायत कोणता महत्त्वाचा कागद हरवला आहे किंवा व्हिजिटिंग कार्ड किंवा र्थिक व्यवहाराची कागदपत्रे सापडत नाहीत असे कधीच झाले नाही. लष्करी सेवेमध्ये असताना देशभर इतक्या ठिकाणी फिरावे लागत असे ते सुद्धा तात्पुरत्या तैनातीसाठी ( temporary duty) कि अघळपघळ राहण्याची चैन करणे शक्य नव्हते. असे अनावश्यक कागद फेकून देण्याची माझी सवय अजूनही अनावश्यक आठवणी किंवा गोष्टींबद्दल पूर्णपणे वापरू शकलेलो नाही. (बऱ्याच प्रमाणात केले असले तरी)

In reply to by सुबोध खरे

गवि Wed, 07/02/2025 - 11:35
माझ्या वडिलांची शिस्तही अशीच दांडगी होती. बाहेरून आले की आधी सर्व कागद, पावत्या, पेन आणि इतर सर्व चीजवस्तू आपापल्या ठराविक विशिष्ट जागी बोळवून मगच पुढे बोलायचे. डॉक्टर साहेब. तुमच्यासारखे लोक पहिले की आपण खुद्द अगदीच "ह्यॅ.." आहोत असे वाटायला लागते. पुलंसारखे.

In reply to by गवि

Bhakti Wed, 07/02/2025 - 12:12
असंच लिहिणार होते.प्रतिसाद वाचून यांचे पाकिट आणि कपाट किती टापटीप असं दृश्य डोळ्यासमोरून तराळून गेलं.खरच डॉ.खरे सारख्या शिस्तीच्या व्यक्तींपुढे आपण किती गबाळे वाटू असं उगाच वाटलं.

मारवा Wed, 07/02/2025 - 11:17
Lighter tone आवडला. आणि relatable होता वाचल्या बरोबर खिसा चाचपून पाकीट काढून contents तपासले. बाकी महिला मंडळाच्या पर्स समोर तेरे पाकीट की औकात ही क्या है ? त्यात म्हणे छोटा आरसा ही असतो !

In reply to by मारवा

गवि Wed, 07/02/2025 - 11:31
पर्सेस..? त्यातून तर अडीअडचणीला एखादी इस्त्री आणि पाठोपाठ लहानसा प्रेशर कुकर देखील निघाला तरी मला धक्का बसणार नाही. ;-)

गवि Wed, 07/02/2025 - 11:37
यावरून आठवले. अशा पावत्या आणि कागद टोचून ठेवायला एका बाजूला लाकडी चकती आणि दुसऱ्या बाजूला तारेचा वळवून हुक केलेला अशी एक वस्तू पूर्वी घरोघरी असे. कोणाला आठवते का? आता ती दिसत नाही.

In reply to by गवि

कर्नलतपस्वी Wed, 07/02/2025 - 12:57
तुळईला हुक किवां मोठा खीळा ठोकून त्यात हे तारकट,जाडसर तार छत्रीच्या हॅण्डल सारखे वाकवलेले व एका बाजूला गोल लाकडी वर्तुळाकार चकती असयाची. आलेली पत्रे वाचून झाल्यावर तारकटावरच विसावयाची. पोस्टकार्डे ,अंतर्देशी किवां लग्नपत्रिका वर्षानुवर्ष एकमेकांचे ओझे सांभाळत तारकटावरच रहायचे. कधीकाळी उघडून बघीतली जायची अन्यथा धुळ जमलेली. पुर्वी प्रेमपत्र वगैरे काही नव्हते. नवरा बायकोला पत्र लिहीताना मायना सौभाग्यवती असेच काहीतरी लिहीत. खुशाली व्यतिरिक्त अन्य विषय कमीच. असो,गेले ते दिन गेले.

कर्नलतपस्वी Wed, 07/02/2025 - 13:10
सर्वांनाच भासायची असे नाही. एखादी पाॅकेट डायरी त्यात बर्‍याच लोकांचे पत्ते लिहीलेले व त्यातच थोड्या एक दोन रूपयाच्या नोटा. बिलं पावत्या,रसीदी या तारकटावरच विसावायच्या. हाॅटेलिंग,बाहेर खाणे काही नसायचे त्यामुळेच जास्त पैशाची गरज नसावी. बिडी,कडी चहापान एवढेच. चहा दहा पैसे,एक आणा भेळ,विस पैशाची भजी प्लेट,पंचवीस पैशात लस्सी ग्लास, पंचवीस पैशाचे विडीचे बंडल असेच रेट असायचे. जसे पगार वाढले चार पैसे खुळखुळायला लागले तेव्हां पाकीट व खुप नंतर बायकांची पर्स आली. बाकी लेख छान आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 21:58
पॉकेट डायरी बहुधा खूप लहानपणी वडिलाना वापरताना पाहिले आहे. त्यात पैसे ठेवले की घाईत काढताना बरेचदा त्यातील इतर कागद सुद्धा खाली कोसळायचे अजून एक त्यांची आवडीची जागा म्हणजे पॅन्टचे चोर पॉकेट. त्यांचे बघून मी सुद्धा एकदा शिवून घेतलेले. पण लपवून ठेवावे तितके पैसे त्या वयात कधी आलेच नाहीत. जी काही छोटी मोठी नोट असेल ती ठेवून हौस भागवायची.

अकिलिज Wed, 07/02/2025 - 18:36
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अनिता

गवि Fri, 07/04/2025 - 07:21
तारकट हे नाव आठवून दिल्याबद्दल आपले आणि कर्नल साहेबांचे आभार. आता आठवले. तारकिट असे आम्ही म्हणत असू. थोडासा उच्चारी फरक इतकेच.

अकिलिज Wed, 07/02/2025 - 19:07
पाकिट हे आता पैशाचे पाकिट नाहिये मुळी. तो फक्त आठवणींचा कप्पा बनून राहिला आहे. हा लेख वाचला. आणि सॅकमध्ये ठेवलेले पाकीट रिकामे करून परत भरले. आजकाल जीपे, मोबाईल पे वगैरे मध्ये पाकीट पॅण्ट्च्या खिशात न राहता, सॅकमध्ये विराजमान असते. महत्वाचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि सीमकार्ड काढायची पिन वगैरे सोडल्यास बाकीच्या आठवणी आहेत. २००२ साली पहिल्यांदा मुंबई लोकलचा पास काढण्यासाठीचे ओळखपत्र जपून ठेवले आहे. १ रू च्या नोटा, आहेरात ऐनवेळी लागतात म्हणून जपलेल्या आहेत. आता चालत पण नसतील. बाबा त्यांच्या पाकीटात रेव्हिन्यू स्टँप ठेवायचे, ती सवय मलाही लागली. हो, कधीकाळी आजीने दिलेला अंगारा पण आहे. टाकावासा वाटत नाहीये. त्याचा एक वेगळाच वास टिकून राहिलाय. तो घेतला की आजीचा हात गालावरून फिरल्यासारखा वाटतो. अभिषेक सारखी ट्रेनची रिटन तिकीटे पण होती, पण नंतर शाई पुसल्यामुळे टाकली कधीतरी. अजूनही बराच मालमसाला आहे. कां ठेवलाय माहीती नाही. टाकवत नाही. एकांतात कुरवाळायला असूदे म्हणून. तसं पाकीट भरगच्च आहे. आठवणींने भरलेलं. सॅकमध्ये असल्यामुळे टिकतंय वर्षानुवर्ष. जपतंय आठवणी.

In reply to by अकिलिज

तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 21:50
छान पोस्ट! १ रुपयाची नोट मलाही फार आवडायची. आहेर करायला लागायची ते सोडा पण दिसायची छान. आजकाल चालते की नाही कल्पना नाही पण एक रुपयाला किंमत आहे. बरणीतली एखादी गोळी येते.

सुबोध खरे Wed, 07/02/2025 - 20:21
माझ्या पाकिटात एके काळी रेवेन्यू स्टॅम्प, पोस्टाचे स्टॅम्प, क्रेडिट कार्ड, रोख पैसे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि दोन चेक असत. यशिवाय आतल्या कप्प्यात नेहमी ५०० रुपयांची एक नोट असे. कुणी उधार मागितले तर बाहेरच्या कप्प्यातीलच पैसे देत असे. आतल्या कप्प्यातील न हि केवळ तातडीच्या गरजेसाठी वापरात असे. कारण लष्करात असताना कुठे जावे लागेल याची खात्री नव्हती . अशा वेळेस हे रोख पैसे खेड्यापाड्यात सुद्धा कामास येत आणि जर तात्कालिक तैनातीस (टेम्पररी ड्युटी) अचानक जावे लागले तर तेथील मेस बिल भरण्यासाठी हे चेक हटकून कामाला येत असत. गळ्यात लष्कराचे ओळख पत्र असले तर भारतभर कुठेही जायला भीती वाटत नसे. रात्रीबेरात्री जायचा प्रसंग आला आणि गस्तीवरच्या पोलिसाने हटकले तरी या ओळखपत्रामुळे कधीच संकट आले नाही. पैसे नसले तरी कोणत्याही लष्करी ठाण्यावर जाऊन आपली सोय करता येत असे. आता काळ बदलला आहे त्यामुळे पोस्टाचे स्टॅम्प आणि रेवेन्यूए स्टॅम्प पाकिटात नसतात. पण ५०० ची नोट मात्र असतेच. इतर बऱ्याच गोष्टींची सोय भ्रमणध्वनीने केलेली आहे. म्हणूनच मी मुलांना नेहमी सांगत असतो कि एक पाचशे ची नोट पाकिटात ठेवा आपला भ्रमणध्वनी हरवला तर या नव्या पिढीची फारच गोची होते. मोबाईल नाही म्हणून पॆसे नाही आणि तातडीचे मोबाईल क्रमांक पण त्यांना पाठ नाहीत. मुलं ऐकतात पण ५०० ची नोट खर्च झाली तर पटकन दुसरी काही खिशात ठेवत नाही. परत परत आठवण करावी लागते.

नोटबंदी झाल्यापासुन पेटीएम्,फोन् पे नी गुगल पे मुळे पाकीट ठेवायची सवयच गेली. मोबाईल मुळे फॉवर ल्युबाचे गजराचे किल्लीवर चालणारे घड्याळ,रिस्टवॉच, स्वयंपाकघरातील ट्रान्झिस्टर, टॉर्च,डिजिटल कॅमेरे, कॅलक्युलेटर अशा अनेक वस्तू ईतिहासजमा झाल्या. माझ्या वडीलांचा टाईपरायटर [ज्यावर त्यांनी १० पैसे पर पान याप्रमाणे हजारो पाने टाईप केली असतील :( ] पाहुन माझ्या मुलांना भलतेच आश्चर्य वाटले होते. प्रिन्ट आणि टाईप एकत्र करणारे हे यंत्र त्यांनी प्रथमच पाहीले. आजीकडचे चावीचे भिंतीवरचे घड्याळही त्यांनी असेच "अजि म्या ब्रम्ह पाहीले" असे पाहीले. ट्रिन्ग ट्रिन्ग वाल्या टेलिफोनचेही तेच. मी स्वतः ट्राम कधीच (भारतात) पाहीली नाही. मुलाला बँकेचे पासबुक भरुन आणायला सांगितले तर त्याने "हे काय भलतेच?" असा चेहरा केला. शेवटी काय? कालाय तस्मै नमः असे म्हणुन पुढे चालावे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि गुरुवार, 07/03/2025 - 13:54
पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट ऊर्फ पेरुचा पापा... ही घरातून बाहेर पडताना आठवण्यासाठी एक चेकलिस्ट मानली जायची आणि हा शब्द प्रचलित होता. आता पेन रुमाल पाकीट हे अनेकांकडे नसते.

विवेकपटाईत गुरुवार, 07/03/2025 - 12:01
माझ्या पाकिटात मेट्रो कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि हॉस्पिटल मध्ये जाताना सीजीएचएस कार्ड ठेवतो. थोडे बहुत पैसे. बाकी काहीच ठेवत नाही.

कर्नलतपस्वी गुरुवार, 07/03/2025 - 12:14
आता फक्त ममता दिदींच्या राज्याच्या राजधानीत ट्राम आहे. भटकंती काढा लगे हात हावडा ब्रिज, काली मंदिर, रोशगुल्ले आणी पुचका खाऊन या. येताना मिपाकरांना लवंग लतिका व चमचम घेऊन या.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 07/03/2025 - 14:09
मुली आणि बायकोने वाढदिवसाला नवे कोरे पाकिट भेट म्हणुन दिले आहे.जुने अगदीच जीर्ण झाल्याने.पण माझी अजुनही हिंमत झाली नाही पाकिट बदलायची. जुन्या पाकिटाची इतकी सवय झाली आहे कि नवे पाकिट घेतले आणि ते बाहेर काढुन ठेवले तर मला असेच वाटेल कि ते पाकिट माझे नाहीच आहे.

मस्त धागा, मस्त आठवणी. दसरा दिवाळीला घर स्वच्छ लख्ख करावं लागतं तसं पाकीट अधुन मधुन स्वच्छ करावे लागतं. विविध कप्पे ही तर पाकिटांची खासियत. बाकी, आपण म्हणालात तसा विशेष असा भविष्यातील कचरा पॉकेटात असतोच असतो. लोक सर्वसाधारणपणे पँटच्या पाठीमागील खिशात पॉकेट ठेवतात पण मी उजव्या बाजूच्या खिशात पॉकेट ठेवायचो. नियमित एसटीने प्रवास करायचो तेव्हा पॉकेट मारल्या जातात म्हणून ते उजव्या बाजूला आलं. सोपंही पडतं. बाकी, विविध बँकेचे एटीएम कार्ड, पैसे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पार्किंगच्या पावत्या, कवितेच्या ओळी, आवडलेली शायरी, पासपोर्ट फोटो, पन्नास किंवा दहाच्या नोटेचा अर्धा भाग पॉकेटात मिळेल. कागदं खराब झाले की अधुन-मधुन सॉर्टींग. तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत. आता फक्त पाकीट आणि आठवणी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Wed, 07/16/2025 - 13:34
तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला ब्रँडेड पॉकेट वगैरे द्यायची त्यामुळे पाकीटं जीव लावून जपलीत
हे महत्त्वाचं. बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा Fri, 07/25/2025 - 14:56
मला वाटतं दोन सुद्धा असाव्यात कदाचित. या महिन्यात पहिलं पाकीट अन पुढच्या महिन्यात दुसरं पाकिट !

In reply to by प्रचेतस

बाकी तुम्हाला फक्त एकच मैत्रीण होती असे वरील वाक्यावरून ध्वनित होते.
मिपावर तर जरा लिहा-बोलायची प्रायवसी राहिली नाही. लगेच 'इडी'सारखे आले मागोमाग चौकशीला. आमच्या काळी आजच्या आपल्या 'चालू'वर्तमान काळात दिसतात तसे सतरा थांबे नसायचे. साठोत्तरी- सत्तरीच्या पारंपरिक प्रेम पिढीत एकालाच जीव लावण्याची शास्त्रोक्त पद्धत होती. अधुन-मधून भेटी झाल्याच तर 'लाजून हसणे आणि हसून ते पाहणे' इतकंच. उत्तरार्धात कविता, शायरी, गझलां आणि आठवणी हेच त्या प्रेमाचं फलीत असायचं. च्यायला, मिपाचं वय वाढलं पण लोक काही सुधरत नाहीत, सुधरा रे जरा. -दिलीप बिरुटे (पारंपारिक प्रियकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Sun, 07/27/2025 - 09:40
अहो तुमचा काळ जुना झाला पण भ्रमरासारखं ह्या फुलावरून त्या फुलावर गुंजारव करणारे त्या काळातही होतेच. तुमच्या काळी लोक एकालाच जीव लावायचे, कारण दुसऱ्याशी ओळख व्हायला सुद्धा वर्ष लागायचं, "लाजून हसणे" वगैरे तुमचं क्लासिक चार्म आहेच, पण आजचं प्रेम स्पष्ट आणि थेट आहे, तुमच्यावेळी लोक आठवणीत मरायचे, आता लोक ब्लॉक करून पुढे जातात. तुमच्या काळात लोक कविता शायरी करायचे आता लोक रिल्स करतात. तुमचं प्रेम म्हणजे लँडलाईनवरचा एकुलता एक कॉल, आमचं प्रेम म्हणजे व्हिडिओ कॉलवरची लॉंग डिस्टन्स डेट, तुमचं प्रेम लिहिलेलं,आमचं प्रेम टाईप करून सेव्ह केलेलं, जेवलीस का विचारणारं आणि फुल्ली बँक्ड अप.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी Sun, 07/27/2025 - 10:38
करण्याची खरी पद्धत ही आशी आहे..... दर्दी खलाशा सारखं प्रेम करावे नव्या बंदरात नवे पाखरू शोधावे

In reply to by प्रचेतस

गणपा Sun, 07/27/2025 - 11:14
बाकी अश्या आठवणी जागवून आम्हालाही मैत्रीणी होत्या बरका हे सांगून आपलं आपणच मोरपीस फिरवून घेतलं आहे हे चाणक्ष वाचकांनी हेरलं आहेच म्हणा. ;)

In reply to by प्रचेतस

मारवा Mon, 07/28/2025 - 05:23
जेवलीस का? जे 1 झालं का? असाही टाईप केला जातो हा अनेक विशेषणे लावता येतील असा प्रश्न आहे. ऑनलाईन प्रेमीयुगुलांमधील सर्वाधिक वापरला गेलेला प्रश्न आहे. हा मला मनोरंजक वाटतो प्रेमळ वाटतो Time pass वाटतो Ice breaker वाटतो. पण थोडा विचार केल्यावर असे वाटते की प्रत्येक प्रेमी पिढीचा एक keyholder प्रश्न असतो मुळात जे प्रेमात पडलेले असतात ते तासन् तास बोलतात तर ते काय बोलतात असे अप्रेमिना प्रश्न पडत असतो नेहमी. तर असे आहे की त्यांना बोलायचं काही नसतं फारसे त्यांना सहवासातून एकमेकांच्या उपस्थितीत मोठा आनंद स्त्रवत असतो dopamine ,oxytosin च्या लाटा येत असतात . मग हे प्रश्न आपले काहीतरी बोलायचं म्हणून असतात तो.मधुर आवाज ऐकून मधुर शांतता भंग करण्यासाठी असतात बॉलीवूड चे गाणे जसे म्हणते कुछ ना कहो.. कुछ भी ना कहो.. क्या कहना है ? क्या सूनना है ? पण कधी कधी काही ना बोलायचे असते मग मुलगा म्हणतो क्या खूब दिखती हो बडी सुंदर लगती हो (प्रेमात आंधळा म्हणा किंवा ब्युटी लाइजे इन ...म्हणा मुलगी पण वेडीच असते और फिर तारीफ किसे अच्छी नहीं लगती ? मग मुलगी म्हणते कहते रहो फिरसे कहो अच्छा लागता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. म्हणून ते.पुन्हा पुन्हा जे1 झालं का अस असत असो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti Sun, 07/27/2025 - 20:44
+१ पारंपरिक प्रियकर!शब्द आवडला गेलाय :) -भक्तीआज्जी ;)

गणपा Sun, 07/27/2025 - 11:34
पुरुष कधी स्वतःच पाकीट स्वतः विकत घेत नाही म्हणतात. माझ्या बाबतीत ते खरं ठरलंय आजवर. सगळ्यात पहिलं आईकडून मग बहिणीकडून भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्ट, मग कॉलेजात असताना मैत्रिणींकडून बड्डे गिफ्ट, पुढे बायकोकडून अश्या क्रमाने पाकिटं मिळतच गेली. कितीही जीर्ण झालं तरी हे पाकिटं आपल्याला 'लाभतंय' हा विश्वास एवढा ठाम असतो की ते स्वतः हून बदलायची हिंम्मत होतं नाही. एकेकाळी पाकिटं येवढं फुगलेलं असायचा की रिक्षावाल्यांसारख एका कुल्यावर तिरकं बसावं लागायचं. हल्ली UPI आणि डिजि लॉकर आल्यापासून अनेक प्लास्टिक आणि कागदी ऐवजाना थारा मिळत नाही त्यात त्यामुळे ते रोड झालंय. कधी ट्रेनने प्रवास झालाच तर मात्र न चुकता हात मागच्या खिशात जातो आणि आपसूक पाकिट पुढल्या खिशात येऊन स्थिरावत. अलीकडे तर लोकल ठिकाणी फिरताना पाकिटं नेणंच सोडून दिलंय. लेख आवडला, प्रत्येक पुरुषाला अपील होईल असा काहींना नकळत भूतकाळाची सैर घडवून आणेल असा. बायकांची पर्स हा एक स्वतंत्र PhD चा विषय आहे. :D