मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोबाईलची शाळा

Bhakti · · जनातलं, मनातलं
“अन्वयी अभ्यासाची लिंक आलीये शाळेतून लवकर जॉईन हो.मला मेसेज आलाय.” अन्वयीची आई तिला ओरडून सांगून थकली होती.रोज १० वाजता शाळेची लिंक यायची.सहावीतल्या अन्वयीला tab होता.त्यावार ती गेम खेळायची,यु ट्युबवर वेगवेगळे व्हिडीओ पाहण्यात गुंग असायची.पण शाळेची लिंक आली की,टिवल्या बावल्या करायची .आईने दहादा सांगितल्याशिवाय जॉईनच नाही व्ह्यायची.हजेरी लावण्यापूर्ती जॉईन व्हायची.वोल्युम झिरो करत. अन्वयीची आई-वडिल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते.कोरोनात शाळांना सक्तीची सुट्टी जाहीर होती.त्यांच्या शाळेचे गाव अगदीच छोटे होते.वीजेची ,नेटवर्कची कमतरता होती.त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देणे अवघड होते.दोन महिने असेच गेले.अन्वयीचे वडील हाडाचे शिक्षक होते.जरी सरकारने कोणताही नियम काढला नव्हता,तरी त्यांनी झूम शाळा सुरु केली होती.गावाकडच्या शक्य तेवढ्या विध्यार्थ्यांना निरोप देत त्यांनी त्यात सहभागी केले होते. त्या गावातच मंजिरी नावाची चौथीत शिकणारी हुशार मुलगी होती.तिला शाळेची अभ्यास्ची आवड होती.बाप शेतकरी होता.शेतातच छोटास घर होत.मंजिरी आईला मदत करायची.दुपारी पुस्तक वाचायची,अभ्यास करायची. तिची मैत्रीण रेश्मा घरी आली,सांगू लागली “आपले जोशी सर ऑनलाईन शिकिवतात .”ही काय गोष्ट आहे ती रेश्माने सांगितली.मंजिरीला आता शाळेचे वेध लागले.झोप येईना.शिकायची उमेद उसळी घेऊ लागली.पण...घरी स्मार्ट फोनही नव्हता.कोरोनामुळे कोण्या मैत्रिणीच्या घरीही जाता येईना.पोरगी रोज रात्री तळमळत चांदण्या पाहायची.डोळ्यांच्या कडेला हळूच एक अश्रू तराळयचा.मंजिरीच्या आईच्या लक्षात आल. लेकीला कुशीत घेत तिने विचारलं ”मंजू काय झाल?कमून तू शांत ?” मंजिरी लहानच म्हणाली, “आई,म्हाई शाळा सुरु झालीया,लयी पोर ते मोबाईल वर शिकतात.मले बी शिकायचं.,बापूला सांग ना मोबाईल घ्यायला.” मंजिरीच्या आईला लेकीच कौतुक वाटलं,किती गुणी स्वत:हून काहीच नाही बोलली.मंजिरीच्या आईने बापाला सांगितलं.बापाला पण लेकीने शिकावं हीच तळमळ होती.मंजिरीच्या आईने डब्यात,पेटीत कुठे कुठे ठेवलेलं पैसे दिले.नुकतीच तूर विकून बाजूला पडलेल्या थोड्या पैशातून बापाने लगेच स्मार्ट फोन विकत आणला. मंजिरीला आता शाळा घरीच येणार याचा किती अपार आनंद झाला होता. रेश्माला बोलावले,तिने सांगितलं ”सर ला फोन लाव आणि सांग ते तुला add करतील.”.....मंजिरीने उत्साहात फोन लावला ”सर बापूने नवा फोन घेतलाय ,मले बी घ्या ना मोबाईलच्या शाळेत.” जोशी सर नेमके अन्वयीला शोधात होते,”ऑनलाईन लिंक आलीये जॉईन कर.”. रोजच्या या कामाला थकले होते.ते घाईतच “हो” म्हणाले.पण गडबडीत विसरून गेले. मंजिरी वाट पाहत होती कधी मोबाईल शाळा सुरु होईल.संध्याकाळ झाली शाळा काही आली नाही मोबाईलवर.दुसऱ्या दिवशी परत सरांना फोन लावला,ते अन्वयीच्या जवळच बसून होते ,तिच्याबरोबर क्लास करत होते जेणेकरून तिने टिवल्या बावल्या करू नये. सरांना ४ मिस कॉल झाले ,ते काही उचलेना.अन्वयीच्या आईने फोन उचलला “कोण?” मंजिरी म्हणाली,”बाई सरांना सांगा की व्ह...मले बी शाळेत घ्या.बापूला पण पाहाचीय मोबाईलची शाळा ..” अन्वयीच्या आईला तिच्या आवाजातली आर्तता समजली.त्यांनी स्वत: तिला जॉईन केलं. दुपारी शाळा सुरु झाली...मंजिरीचा सगळा परिवार अचंबित झाला या अनोख्या मोबाईलच्या शाळेला पाहून..मंजिरीला पुन्हा शिक्षणाचे पंख फुटले होते. -भक्ती १२/०८/२०२०

वाचने 4345 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चौथा कोनाडा 06/04/2021 - 17:40
व्वा, सुरेख कथा ! मंजिरीची शाळा शिकण्याची आस प्रभावित करून गेली. आस असलेल्या अश्या मंजिरी अन्वयीसारख्यांना कधी ओव्हरटेक करून पुढे जातात समजत ही नाही !

ज्योति अळवणी 07/04/2021 - 13:00
सत्य आहे हे आजचं! आपल्या मुलांना सगळं मिळतं म्हणून किंमत नाही आणि ज्यांना मिळत नाही त्यांना किमंत असूनही हात बांधलेले राहातात

ज्योति अळवणी 07/04/2021 - 13:00
सत्य आहे हे आजचं! आपल्या मुलांना सगळं मिळतं म्हणून किंमत नाही आणि ज्यांना मिळत नाही त्यांना किमंत असूनही हात बांधलेले राहातात

ज्योति अळवणी 07/04/2021 - 13:01
सत्य आहे हे आजचं! आपल्या मुलांना सगळं मिळतं म्हणून किंमत नाही आणि ज्यांना मिळत नाही त्यांना किमंत असूनही हात बांधलेले राहातात

Bhakti 07/04/2021 - 13:07
मुवि,चौ.को.,ननि,अ.मा.,ज्योतीजी वैचारिक प्रतिसादासाठी खुप धन्यवाद! पाय जमिनीवर आणि नजर आकाशाकडे पाहिजे एवढच म्हणेन!

Bhakti 07/04/2021 - 21:07
तुषार, सुजित धन्यवाद!