मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रत्नाकर मतकरी यांना आदरांजली

प्रचेतस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
a ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत. मात्र मतकरींनी त्यांच्या गूढकथांद्वारे मनोव्यापाराचा एक नवाच आयाम उघडून दिला. जेवणावळ मधली जमलेली भूते, मला विक्रम दिसतो मधलं विलक्षण गूढनाट्य, लपाछपी मधले ते तीन विल्कूंची कहाणी जी मुळात मल्टिपर्सनलिटी डिसऑर्डर दाखवते, हेडस्टडी, ड्रॅक्युला, ती दोन मुलं मधली चमकदार, पाणीदार डोळ्यांच्या दोन मुलांभोवती फिरणारे थरारनाट्य, मंदा पाटणकरची गोष्ट, हातमोजे, जंगल, चिखल, टोक टोक पक्षी, फाशी बखळ, खेकडा मधल्या एका लहान मुलाने विलक्षण पद्धतीने उगवलेला सूड, म्हणे कोण मागे आले मधला थरार, रगांधळा, असाही एक कलावंत अशा कितीतरी विविध गूढकथा. मला तर त्यांच्या गूढकथा आल्फ्रेड हिचकॉक आणि स्टिफन किंगपेक्षाही सरस वाटतात. ह्या माझ्या अत्यंत आवडत्या लेखकाला आदरांजली. मराठी साहित्यात असा गूढकथाकार होणे नाही.

वाचने 21628 वाचनखूण प्रतिक्रिया 37

चौकटराजा 18/05/2020 - 09:14
मला युवावस्थेतच मतकरी यांच्या गूढकथा वाचण्याचे वेड लागले .आज त्यांच्या एका कथेचे नाव आठवत नाही पण तिचा शेवट अत्यंत चटका लावणारा होता .एका मुलाला भिकारी म्हणून बसविले जाते. त्याला दिवशी महारोगाचा पहिला लाल चट्टा आपल्या अंगावर आढळतो व आपल्याला आता अधिक भीक मिळणार याचा त्याला आनंद होतो अशी काहीशी गोष्ट होती." जौळ " ही त्यांची एक उत्तम कादंबरी ! त्याच्या " माझं काय चुकलं " या नाटकातील एका पात्रा च्या दवाखान्यात माझ्या मोठ्या मुलीचा जन्म झाला . ( कारण ती एक सत्यकथा आहे ). मतकरीना दीर्घ आयुष्य लाभले व कारकीर्द ही ! दिलीप प्रभावळकर हे त्याचे फाईंड व त्यांची उत्तम अभिनेत्री असलेली मुलगी यांच्य बद्दल ही मला अत्यंत आदर आहे ! माझ्या अशा लाडक्या लेखकाला विनम्र पणे आदरांजली !

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 18/05/2020 - 09:17
जौळ वर सिनेमाही निघाला होता. दुःखांत कादंबरी होती ही. ह्याशिवाय एडम सारखी मराठी साहित्यात अत्यंत धाडसी असणारी कादंबरीही त्यांनी लिहिली होती

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 18/05/2020 - 11:48
"जौळ" वर "माझं काय चुकलं" हे नाटक आणि "माझं घर, माझा संसार" हा चित्रपट निघाला ! तिन्ही कलाकृती समिक्षकांनी नावाजल्या, रसिकांनी डोक्यावर घेतल्या !

In reply to by चौकटराजा

अर्धवटराव 18/05/2020 - 22:44
या नावाचे २ खंड अहेत. त्यातल्या एका खंडात त्या भीक मागणार्‍या मुलाची कथा आहे. इतर कथा देखील अप्रतीम आहेत.

माझ्या मनातलं बोललात प्रचेतसजी. मलाही मतकरींच्या गूढकथा आणि खासकरून शेवटच्या एक दोन ओळीत दिलेला ट्विस्ट फारच आवडतो. तुम्ही वर लिहिलेली सगळी पुस्तकं वाचली आहेत आणि मनापासून आवडली आहेत. या गुणी लेखकाला भावपूर्ण आदरांजली!

कंजूस 18/05/2020 - 10:23
लहानपणी पाहिलेली निम्माशिम्मा राक्षस, अदृष्य माणूस बालनाट्ये अजून आठवतात. मराठी वाचकवर्ग फार लहान आहे. त्यांचे लेखन इंग्रजीत असते तर क्लासिक्समध्ये जाऊन पुस्तकांचा प्रचंड खप झाला असता, नाटके गाजत राहिली असती. .

चौथा कोनाडा 18/05/2020 - 11:53
त्यांच्या गुढकथा जबरदस्त होत्या, कबंध्म खेकडा, शेवटची बस या कथा अजुनाही लक्षात आहेत ! जौळ तर माझी लाडकी कांदबरी, वाचल्यानंतर सुन्न झालो होतो. घटना आपल्या जवळपास कुणाच्या तरी बाबतीत घडली आहे असं सावट पडून १५ दिवस अस्वस्थ होतो. ह्या माझ्या अत्यंत लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली ! मतकरी पर्व झाकोळले.

In reply to by मदनबाण

गहिरे पाणी अतिशय सुंदर मालिका होती. खेकडा (जे पुण्यातल्या साहित्य संमेलनात घेतलं होतं) मधल्या कथा अगदी धरपांसारख्या भीतीदायक नसल्या तरी आतून ढवळणाऱ्या होत्या. त्यांच्या गुढकथांची जातकुळी वेगळीच होती. रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली..

सिरुसेरि 18/05/2020 - 16:43
रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली..! __/\__ . नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. +१००

गामा पैलवान 18/05/2020 - 21:20
एकंदरीतच मी मराठी साहित्य फारसं वाचलेलं नाही. मतकरींचं काही वाचलेलं लेखन आठवंतही नाही. पण एक गोष्ट मात्र मनात पक्की रुतून बसली आहे. ती म्हणजे : रत्नाकर मतकरी = उत्तम दर्जा आदरांजली! -गा.पै.

रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रध्दांजली!!!!! जेवणावळ वाचली होती तेव्हा शेवटच्या ओळीत बसलेला धक्का अजुनही विसरलेलो नाही आहे. जौळचा पगडा ही बरेच दिवस डोक्यावर होता. अतिशय उत्तुंग प्रतिभेचा लेखक गेला.

हेमंतकुमार 20/05/2020 - 19:12
आदरांजली! त्यांच्या ‘अस्पर्श’ या कथेतील एक सुंदर वाक्य: आपण केलेला स्पर्श आणि आपल्याला झालेला स्पर्श यात महदंतर असतं. पहिलं आपलं कर्तृत्व असतं, दुसरं आपलं भाग्य असतं.

शशिकांत ओक 22/05/2020 - 20:13
'जौळ' या त्यांच्या कादंबरीच्या फॉर्मचा प्रभाव माझ्या मनांवर पडला असावा. कारण नंतर बऱ्याच वर्षांनी माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या "अंधारछाया" कांदंबरीत तोच आत्मनिवेदनाचा फॉर्मॅट वापरला गेला.