Skip to main content

दुनिया

लेखक तमराज किल्विष यांनी रविवार, 25/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी नेहमी अनेक म्हणी रोजच्या बोलण्यात सहजच बोलून जायची. " दुन्या ही दिल्या घेतल्या ची आहे " , "उसनं मांडं नी उसनं दांडं ", "दिलं तर गोड नाहीतर दोड" अश्या अनेक म्हणी आपोआप तिच्या बोलण्यात यायच्या. लहानपणी मला तिच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ लागायचा नाही. माझं बालपण खेड्यात गेले. कोणत्याही सुविधा त्या काळात नव्हत्या. तंगडतोड करतच तालुक्याच्या गावाला जाऊन दवाखाना, भाजीपाला बाजार, म्हटलंच तर सिनेमा बघणे या गोष्टी कराव्या लागायच्या. माझ्या प्राथमिक शाळेतील वर्गमित्र व मी सर्वच शेतकऱ्याची मुले होतो. काही शेतमजुरी करणारांची होती. सगळ्यांची घट्ट अशी मैत्री होती. शाळेत आणि शाळेबाहेर एकमेकांवाचून अजिबात करमायचे नाही. आमच्या बालपणी टिव्ही, मोबाईल नसल्यामुळे अनेक मैदानी खेळ, चल्लसपाणी सारखे बैठे खेळ व भरमसाठ गप्पा मारणे, पोहायला जाणे या गोष्टींत वेळ कसा जाई हे लक्षातही येत नसे. बोअर होणं काय हे माहित सुध्दा नव्हतं. हळूहळू बालपण सरले, जो तो पोटापाण्याच्या उद्योगाला लागला. मी शहरात गेलो. नशिबाने चांगले शिक्षण घेतले व चांगली नोकरी मिळाली. शहरात स्थाईक झाल्याने अनेक आर्थिक संधी मिळाल्या. उत्तरोत्तर प्रगती होतच गेली. बऱ्यापैकी मालमत्ता, गाडी बंगला सर्व गोष्टी लाभल्या. इकडे माझ्या बालमित्रांपैकी आम्ही चार पाच जणच असे बाहेर पडलो. बाकीचे खेड्यात राहिले. कुणी शेती, दूधधंदा , कुणी गवंडीकाम, कुणी अशीच पाच दहा हजार रुपये पगाराची नोकरी शेती करत करू लागले. प्रपंचाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना काहींनी चांगलं नियोजन करून प्रगती साधली. काहींची फरपट झाली तर दोन-चार व्यसनाधीन होऊन पार मागे पडले, लोकांच्या टिंगल टवाळीचे साधन बनले. दिवस असेच जात राहिले. होता होता मी पण सेवानिवृत्त झालो. शहरात मुलं वगैरे सेटल झाले. पण मला मात्र गाव खुणावत होते. रिटायर झाल्यावर खऱ्याखुऱ्या आपल्या लोकांत रहायला मिळावं म्हणून गावाला रहायला आलो. शेतात छोटासा बंगला बांधला. हळूहळू बालमित्रांच्या भेटी चालू झाल्या. पण पुर्विचे बंध आता काही दिसेना. मला फार कोणी जवळ करत नव्हते. एक प्रकारचा अलिप्तपणा , तुटकपणा जाणवत होता. काही बालमित्र गरज असेल तरच माझ्याकडे येऊ लागले. दोघे तिघे उसने पैसे मागत. मी आनंदाने द्यायचो. एका जणानं पैसे परत केलेच नाही पण अजून पैसे मागत होता. शे पाचशे द्यायला काही वाटत नव्हते पण एके दिवशी इतके इतके पैसे उसने घेतलेस परत कधी देणार असे विचारले तर गडी बोलायचाच बंद झाला. हळूहळू माझ्या लक्षात आले की परिस्थितीचे चटके सोसल्यानं या लोकांना माझ्या श्रीमंत असण्याची मनात कुठेतरी असुया वाटते आहे, आपण प्रगती करू शकलो नाही हे मनात कुठेतरी शल्य त्यांच्या मनात असावं का असे विचार माझ्या मनात यायला लागले. काळ इतका बदलला की भौतिक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आलं. सायकल चालवणारा मोटार सायकल नाही म्हणून आतल्या आत झुरू लागला. सायकलवर मित्र समोरून आला की तो मान खाली घालून बाजूने जातो हा मला अपमान वाटायला लागला आहे. आजकाल लोक माणूस नाही तर त्याच्या पासून होणाऱ्या फायद्याला मान देतात. मला आता आजीच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ कळायला लागला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4485
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मानवी संबंधाचे अनेक कंगोरे असतात . प्रत्येकाला वाटत समोरचा चुकीचा वागत आहे आणि आपण स्वतः नाती जपायचे महान काम इमाने इतबारे करत आहे पण बाकी लोकांना त्याची किंमत नाही . असे प्रत्येक व्यक्तीला वाटत . माझे काही तरी चुकतंय किंवा चुकलं असेल ही भावना मानवी मनात तयारच होत नाही . त्या मुळे सर्व घोळ होतो

In reply to by Rajesh188

तुमच काय चूकते तुम्ही इथे कन्फेस करा. मी ही सामिल होइन म्हणतो. बघू किती मिपाकर चुका कबूल करतात ते

In reply to by जॉनविक्क

त्यांना काय म्हणायचं नाय जॉनअण्णा, राजेशभाव हे टेनिसचे हंपायर हैत, ते उंचावर बसून फक्त सुविचाराचे पाम्प्लेट फेकतात, चर्चा काय, कुणाला सांगतोय, काय सांगतोय, ते कुणी ऐकताय का ह्याच्याशी त्यांचे देनेघेणे नसते. ते प्रचंड आदर्श स्थितीत, आदर्श वातावरणात, आदर्श संस्कार घेऊन, आदर्श संस्कारांचे वाटप करत असतात. द्या सोडून.

In reply to by तमराज किल्विष

सोन्याची बाहुलीच म्हणाना. कृपया सोन्या कोण हे विचारू नये. (ह.घ्या. गम्मत म्हणून लिहलेय, गंभीर विधान स्वीकार उत्तरदायित्व नकार लागू.)

मानवी संबंधाचे अनेक कंगोरे असतात . प्रत्येकाला वाटत समोरचा चुकीचा वागत आहे आणि आपण स्वतः नाती जपायचे महान काम इमाने इतबारे करत आहे पण बाकी लोकांना त्याची किंमत नाही . असे प्रत्येक व्यक्तीला वाटत . माझे काही तरी चुकतंय किंवा चुकलं असेल ही भावना मानवी मनात तयारच होत नाही . त्या मुळे सर्व घोळ होतो

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा : ग दि मा हे व्यावहारीक दृष्य रुपात जेवढे सत्य आहे, तेवढेच ते मानवी मनांच्या बाबतीतही सत्य आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या ओळी मी दहावीला असताना मराठीच्या पेप्रात निबंध लिहीताना वापरल्या होत्या, त्या ही विषय "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" नसताना :)

हल्ली बरेच लोक 'रूट्स' शोधायचे म्हणून परत शहरातून गावाकडे किंवा 'बाहेरून' भारतात येतात. हाती पैसा खुळखूळत असतो. ज्या वयात जी ओढ असते ते सगळं मिळालेलं असतं. पण एक गिल्ट असतो की जुनं सगळं सोडून आलो याची. ते सुख परत खुणावत असतं. खरंतर मैत्री आणि नाती जपणं ही चालू वर्तमान काळासारखी असतात. चला, जे पाहिजे होतं ते सगळं झालं आता हे मिळवू असं म्हणून होत नाही. ती जुनी मंडळी आपापल्यात खूष असतात तुम्हीच उपरे ठरता. तुमच्याकडे जे आहे तेच मागतात, म्हणजे पैसे.