Skip to main content

भक्त आणि त्याचा देव!

प्रकाशित मुखपृष्ठ
शाळकरी वयात असतानाच कधीतरी तो एका देवळात गेला. शांत, सुंदर संध्याकाळ... झांजांची किंकिण, मृदंगाचा मंजुळ नाद आणि भक्तीने भारावलेले सूर... त्या क्षणाची त्याच्या मनावर जादू झाली, आणि तो कृष्णमय झाला. त्याची कृष्णावर भक्ती जडली, आणि त्याने आपले सारे जगणे कृष्णार्पण करावयाचे ठरविले. आता आपण आपले उरलो नाही, आपल्या हातून जे काही घडेल त्याचा करविता तो कृष्णच असल्याने, आपला सांभाळही तोच करेल अशी त्याची भावना झाली आणि तो आपल्या देवाच्या भक्तीत बुडून गेला. त्याचा समर्पणभाव पाहून लोक अचंबित होऊ लागले. धन्य तो भक्त आणि धन्य तो त्याचा देव... त्याला आपल्या देवापलीकडे कशाचेही भान उरले नाही. आपल्याला तोच तारेल, तोच मारेल... जे काही होईल ते तो आपल्या भल्याचेच करेल अशी त्याची अपार श्रद्धा होती. दिवसेंदिवस ती अधिकच गहिरी होत होती. आता तर, तो स्वत्व विसरून आपल्या देवाच्या चरणी विलीन झाला होता. एकदा अचानक आभाळ भरून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला. वादळी वारे सुटले. गावकऱ्यांना संकटाची चाहूल लागली आणि सर्वांनी सुरक्षित जागी स्थलांतर करायचा निर्णय घेतला. निघताना सारेजण यालाही म्हणाले, हे भक्ता, इथे आता राहणे सुरक्षित नाही. तू आमच्यासोबत सुरक्षित स्थळी चल! भक्ताने ठाम नकार दिला. ‘तो कृष्ण, माझा देव, माझ्यासोबत आहे. तो मला वाचवेल!’ भक्त म्हणाला, आणि कृष्णभजनात रममाण झाला. पाऊस कोसळतच होता. गावातल्या नदीने विक्राळ रूप धारण करून गावाला वेढा घातला. हा भक्तिगीते गात घरातच बसला होता. गावातल्या मच्छिमारांनी आपल्या होड्या काढल्या. चुकून मागे राहिलेल्यांना सुरक्षित जागी हलविण्याची घाई सुरू झाली. ते याच्याकडेही आले. ‘चल’ म्हणाले. पण याचा त्याच्या देवावर पूर्ण विश्वास होता. त्याने पुन्हा नकार दिला, आणि भजनात दंग झाला. पाऊस कोसळतच होता. आता प्रलय होणार आणि नदीचा महापूर गावाचा घास घेणार अशी परिस्थिती ओढवली. प्रशासनाने लष्कराला पाचारण केले. हेलिकाॅप्टर गावावर घिरट्या घालू लागले. एक अधिकारी याच्याजवळ आला, आणि घर सोडून सुरक्षित जागी यावे यासाठी गयावया करू लागला. याचे एकच पालुपद होते. ‘माझा देव मला या संकटातून नक्की वाचवेल! तुम्ही जा!’ लष्करी जवान नाईलाजाने निघून गेले. पुढच्या काही वेळातच, प्रलयाने याचा घास घेतलाच! ... अत्यंत अस्वस्थ होऊन त्याने स्वर्गाचे प्रवेशद्वार ओलांडले. आत प्रवेश केला. इंद्राच्या दरबारात सारे देव समोरच बसलेले होते. त्यात कष्ण-याचाही देव- होताच. हा कृष्णासमोर गेला. हात जोडून देवापुढे झुकला. पण बेचैन होता. ‘देवा, किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर... त्या भक्तीपायीच मी समोरच्या संकटालाही य:कश्चित मानलं. पण तू मला वाचवलंच नाहीस...’ काहीशा नाराजीनेच भक्ताने देवाला सुनावले. कृष्ण नेहमीसारखा गालात हसला. ‘मूर्ख भक्ता, मी तुला वाचविण्यासाठी किती वेळा आलो होतो. एकदा गावकरी झालो, मग मच्छीमार झालो, नंतर लष्करी अधिकारीही झालो. पण तुला माझी ओळखच पटली नाही. तू भक्तीने अंध झाला होतास. असे अंधभक्त असाच आत्मघात करून घेतात. सावध व्हा, डोळस भक्ती करा, मी त्याच्यासोबतच असेन. नाहीतरं अंधभक्त म्हणून तुमची तर खिल्ली उडेलच, पण माझीही नाहक नालस्ती होईल...’ असे बोलून त्याचा देव तिथून निघून गेला. इकडे, भक्ताला आपली चूक उमगली होती. पण वेळ निघून गेली होती!!

याद्या 2281
प्रतिक्रिया 6

लेखनप्रकार

दिनेशदा, काय करायचं मग? मोदींना मत द्यायचं की नाही? ;-) आ.न., -गा.पै.