Skip to main content

हिंदू खतरे में

हिंदू खतरे में

Published on 25/09/2018 - 20:39 प्रकाशित मुखपृष्ठ
बाकी कुठलाही देश नसेल पण भारत हा एक असा देश आहे की जिथे हिंदू खतरे में आहे. हिंदूंना हिंदू म्हणून जगणे या देशामधे मुश्किल झालेले आहे. गणपतीचा उत्सव आला की स्पीकर्स लावायचे नाहीत. रस्त्यावर खड्डे खणायचे नाहीत. रस्त्याच्या मधे मांडव घालायचे नाहीत. अशी अनेक बंधने हिंदूंवर घातली जातात. आता थोड्या दिवसात नवरात्र येईल. नवरात्रीच्या वेळेलासुद्धा हिंदूंच्या व्यक्त होण्यावर, अभिव्यक्तीवर बंदी येईल. नऊ दिवस हिंदूंनी दांडिया खेळायचा नाही. पुन्हा एकदा आवाज करायचा नाही वगैरे वगैरे सुरू होईल. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमधे काही गणपती मंडळांनी स्पीकर्स डॉल्बी लावल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याउलट अहिंदूंच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय लावला जातो. ते कित्येक आठवडे त्यांचे सण साजरे करतात. मोठ मोठ्याने लाऊडस्पीकर लावून गाणी म्हणतात, आठवडेच्या आठवडे ढोल ताशे वाजवून सण साजरे करतात. त्या पूर्वी कित्येक महिने ते ढोल-ताशांची प्रॅक्टिस सुरु असते. दुसरी गोष्ट म्हणजे हे अहिंदू लोक आपल्या मोठ-मोठ्या मिरवणुका हिंदूंच्या वस्तीतूनच काढतात आणि हिंदी चित्रपटातली गाणी मोठ-मोठ्याने लावतात. त्यावर नाचतात सुद्धा. त्यांच्या रस्त्यात चालणार्‍या अशा नाचाने ट्रॅफिक जाम होतो. हिंदूंना कामावर जायला उशीर होतो. तेव्हा मुद्दाम हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी कामावर जायला उशीर झायलाsss हे गाणे वाजवले जाते. याउलट हिंदूंना मात्र आपले सण समारंभ साजरे करण्यावर अगदी अगदी बंदी आहे. केले तरी अगदीच लपून-छपून करावे लागतात. माध्यमेसुद्धा हिंदूंच्या भयंकर विरोधात आहेत असे दिसते. कुठेतरी एखादा स्पीकर लावलेला असेल तर स्पीकरच्या भिंती म्हणून वर्णन केले जाते. हिंदूंच्या विरोधात सगळ्यांचाच हा दुष्टपणा कमी आहे की काय म्हणून दिवाळीमधे सुद्धा अभिव्यक्तीवर पुन्हा एकदा घाला घातला जातो. दिवाळीमधे फटाक्यांचा आवाज करायचा नाही, धूर करायचा नाही असे ऐकवले जाते. वास्तविक पाहता धर्मामधे जे जे सांगितलेले आहे त्याचे पालन झालेच पाहिजे. मग फटाके का बरे नकोत ? कुणीही हिंदू मनुष्य स्वतःच्या हौशीसाठी फटाके उडवीत नाही. केवळ धर्माचरण हेच एकमेव कारण असते. खरं तर फटाक्यामुळे समाजामधे आनंद, चैतन्य उत्साह पसरतो. वाजवतो एक जण पण आजूबाजूचे अनेक जण आनंदित होऊन जातात. पण तसे न करता फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराच्या राईचा पर्वत केला जातो. जणू काही अहिंदूंच्या वाहनांचा धूर होतच नाही. त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातल्या गिरण्यांचा धूरही होतच नाही ? मग हिंदूंच्याच धुरावर आक्षेप का ? हिंदू कुठेही सण साजरे करायला लागले की सुरुवातीला पोलीस हस्तक्षेप करतात त्यानंतर मग न्यायव्यवस्था. एकूण काय तर हिंदूंवर या देशातला प्रत्येक घटक अन्याय करण्यासाठी टपून बसलेला दिसून येतो. तसं पाहायला गेलं तर हिंदू सोडून बाकीच्यांचे सण वर्षभर सुरू असतात. त्यांचे लाऊड स्पीकर्स सतत सुरू असतात आणि फटाके उडवून रस्त्यावर कचरा करणे, वायु प्रदूषण करणे हेही इतरांचे नेहमीच चालू असते पण त्याकडे डोळेझाक केली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू जेव्हा जेव्हा सण साजरे करतात तेव्हा लाऊडस्पीकर हिंदू वस्तीत कधीच लावले जात नाहीत. स्पीकर्स नेहमीच अहिंदूंच्या कानाखाली वाजवले जातात. फटाक्यांचा त्रास सुद्धा हिंदूंना कधी होत नाही कारण हिंदू हे नेहमी आपली वस्ती सोडून आपल्या शत्रूच्या वस्तीत जाऊन फटाके उडवतात आणि त्या वस्तीला त्रास देऊन आपला हिशोब चुकता करून येतात. आणि म्हणूनच हिंदू फटाके उडवत असताना दुसरा हिंदू कधीही कुरकुर करीत नाही. फटाक्यांच्या कागदांचा कचरा आणि धूर याचा त्रास हिंदूंना कधीच होत नाही. जुन्या काळी ज्या ज्या वेळी हिंदूंच्या अहिंदूंविरुद्ध लढाया झाल्या, हिंदूंवर आक्रमणे झाली त्या त्या वेळी हिंदूंनी अहिंदू आक्रमकांच्या शिबिरात जाऊन मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावले. त्यांच्या वस्तीत फटाक्यांचा कचरा केला. परिणामी मनोधैर्य खचल्यामुळे अहिंदू आक्रमक हिंदूंविरुद्धच्या लढाईत पराभूत झाले. आजही हिंदूंना ही संधी दिली तर नव्याने इतिहास घडेल. पण हे सारे लक्षात न घेता हिंदूंच्या व्यक्त होण्यावर बंदी घातली जाते. म्हणूनच म्हणावेसे वाटते हिंदू खतरे में
लेखनप्रकार

याद्या 9828
प्रतिक्रिया 29

क्षमस्व संपादक मंडळी पण , येत्या निवडणुकीचा प्रचार करण्याची प्रतिसादातून सुरुवात झालीच होती पण भाबडेपणाच्या पांघरुणाखाली इतकं थेट पोलरायझेशन करणारा धागा म्हणजे अवघड आहे. ह्या आयडीचे "सवंग धागे काढून प्रतिसाद वाढवणे " केवळ हेच काम आजवरच्या वाटचालीत दिसले आहे. थोड्याच दिवसांपूर्वी मिपावर लावलेल्या सूचनेचा काहीही उपयोग अथवा परिणाम जाणवत नाहीये उलट नवनवीन आयडीच्या बुरख्याखाली प्रचारमोहिमा शिस्तीत राबवल्या जात आहेत.

In reply to by अभ्या..

तुमच्या भावना दुखावल्या असतील तर स्पष्ट तसे सांगा. संपादक मंडळींना उगाच भावनिक आवाहने करू नका. मिसळपाव पोर्टलची चिंता तुम्ही वाहू नका.
प्रचारमोहिमा शिस्तीत राबवल्या जात आहेत
धाग्याबद्दल बोला नुसतंच वरवरचं बोलताय आणि संपादक धागा वाचतील तेव्हा काय ते मत बनवतीलच. तुम्ही ते पूर्वग्रह दूषित करण्याचे काम करू नका. धाग्याबद्दल काही असेल तर सांगा

उपहास असेल तर थोडा गंडला आहे उपहास नसेल तर कठीण आहे. प्रतिक्रिया द्यावी तरी कशी! पण -
त्यांच्या रस्त्यात चालणार्‍या अशा नाचाने ट्रॅफिक जाम होतो. हिंदूंना कामावर जायला उशीर होतो. तेव्हा मुद्दाम हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी कामावर जायला उशीर झायलाsss हे गाणे वाजवले जाते. हिंदूंवर आक्रमणे झाली त्या त्या वेळी हिंदूंनी अहिंदू आक्रमकांच्या शिबिरात जाऊन मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावले. त्यांच्या वस्तीत फटाक्यांचा कचरा केला. परिणामी मनोधैर्य खचल्यामुळे अहिंदू आक्रमक हिंदूंविरुद्धच्या लढाईत पराभूत झाले. आजही हिंदूंना ही संधी दिली तर नव्याने इतिहास घडेल.
हे आवडलं.

मस्त.. मी हा शुद्ध उपहास म्हणून वाचला.
त्यांच्या रस्त्यात चालणार्‍या अशा नाचाने ट्रॅफिक जाम होतो. हिंदूंना कामावर जायला उशीर होतो. तेव्हा मुद्दाम हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी कामावर जायला उशीर झायलाsss हे गाणे वाजवले जाते.
हे लै लै थोर आहे..

"उपहास असेल तर थोडा गंडला आहे" या भृशुंडी यांच्या विधानाशी सहमत. बाकी ........
मुंबई : 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष केल्याबद्दल माफ करा असं म्हणत एका पक्षाचे मा. आमदार यांनी त्यांच्या समाजाची माफी मागितलीय... यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. काही दिवसांपूर्वी मा. आमदार एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला होता. बाप्पाने तुमची सर्व विघ्ननं दूर करावीत, तुमच्या मार्गातले अडथळे दूर व्हावेत, सगळ्यांना आनंद घ्यावा, असं मा. आमदार म्हणत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळतंय. एका समोर आलेल्या एका व्हिडिओत मा. आमदार या समाजाची माफी मागताना दिसत आहेत.
गणपती बाप्पा मोरया !

या लेखाचं नाव हिंदू खतरे में असं ना लिहिता " गणपती बाप्पा खतरे में " असं लिहिलं असत तर जास्त समर्पक वाटलं असतं . कारण सध्या जे काही त्याच्या अगंणावरून आणि विसर्जनावरून चालले आहे ते योग्य नाही . तिथे कुणाचाच कंट्रोल नाही आहे . छोटीमोठी अपघाताची प्रकरण तर येताच नाहीच छापून . एकंदरीत या उत्सवात जर हानी पोहोचलेल्या भाविकांची संख्या बघितली किंवा मृतांचा आकडा व्यवस्थित तपासून पहिला तर या उत्सवाचे लोकांनी त्यांच्या खिसे भरण्यासाठी मातेरे केल्याचे आढळते . जर ज्या उत्सवामुळे कुण्या समाजाची पाळेमुळे उखडली जात असतील तर असे उत्सव ना झालेलेच बरे , मग ते हिंदू असो वा कुणी और ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

2019 ला भाजप येण्याची शक्यता अजिबात नाही !!! ममता, मायावती,शरद,नायडू,नितीश,लालू,केजरीवाल, उद्धव,स्टॅलिन, कुमारस्वामी, हे सगळे उदारअंतकरणाने पंतप्रधान पदाच स्वप्न बाजूला एकत्र येणार . देशा साठी त्यांनी केलेला त्याग बघून सामान्य जनता हुरळून जाणार आणि नवीन सरकारने वाढवलेले पेट्रोलचे दर ,आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताची उतरलेली पत , पाकिस्तान चीन चे भारतावर डोळे वटारून पाहणे या कडे दुर्लक्षित करणार .

>> वास्तविक पाहता धर्मामधे जे जे सांगितलेले आहे त्याचे पालन झालेच पाहिजे. मग फटाके का बरे नकोत ? कुणीही हिंदू मनुष्य स्वतःच्या हौशीसाठी फटाके उडवीत नाही. केवळ धर्माचरण हेच एकमेव कारण असते. ह ह पु वा

दिवाळीत पणती, आकाशदिव्याने घर सुशोभित करणे, फराळ बनवणे, रांगोळ्या काढणे, नवीन कपडे खरेदी करणे , अभ्यंग स्नान , लक्ष्मीपूजन ह्या सगळ्यांपेक्षा फटाक्यांचेच खूप जास्त धार्मिक महत्व आहे का की जे वाजवू नका म्हंटलं की काहीना ते धर्मावरचे आक्रमण वाटावे.

कुणीही हिंदू मनुष्य स्वतःच्या हौशीसाठी फटाके उडवीत नाही. केवळ धर्माचरण हेच एकमेव कारण असते. खरं तर फटाक्यामुळे समाजामधे आनंद, चैतन्य उत्साह पसरतो. वाजवतो एक जण पण आजूबाजूचे अनेक जण आनंदित होऊन जातात. हा निष्कर्ष कसा काय काढला? लेख उपहासात्मक आहे की नाही ते माहित नाही पण ही विधाने अत्यंत विनोदी आहेत एवढे नक्की

हिंदु खतरे मे है !! हे काही बरोबर नाही, ह्या सगळ्या अफवा आहेत. मग बरोबर आहे ? बरोबर अस आहे की हिंदु हेच अतिरेकी आहेत. हिंदु धर्मावर काही झाल की आपल्या घरात दडुन बसतात धर्माच रक्षण करायला शिवाजी हा दुसर्याच्या घरात जन्माला यायला हवा असतो , स्वतः व स्वतःची मुले ही आपापली काम बरी की आपण बरे. काही वर्षांपुर्वी (२०११ साली) दिल्ली युनिव्हर्सीटी मध्ये बीए च्या अभ्यासक्रमात रेफेरंससाठी एक पुस्तक रेक्मेंड केलेल होत. ए के रामानुजन ह्यांनी लिहीलेल रामायणावरचा निबंध ३०० रामायण ! त्यात अतिशय सुंदर उपमा राम , सीता , हनुमान, दशरथ , रावण ह्यांच्यावर दिलेल्या होत्या. हिंदु समाजाला आपल्या देवी देवता बद्दल घृणा कशी उत्पन्न होईल ह्या बद्दल खुप चांगला प्रयत्न केलेला होता. हे पुस्तक दुसर कोणी नाही श्री मनमोहन सिंग ह्यांच्या सुपुत्री उच्च विद्या विभुषीत उपींदर सींग ह्यानीच सुचवलेल होत. ह्या निबंधात खालील वाक्ये होती. १. सीता ही रावणाची मुलगी होती. २. लक्ष्मण व सीतेचे अनैतिक संबंध होते. ३. हनुमान हा लंकेत रात्री हवेत उडुन घरा घरातल्या शयनघरात काय चालल आहे ते बघत असे. ही फक्त उदा दिलेली आहेत. मग काही नतद्रष्ट लोकांनी ह्यात खोडा घातला व कोर्टात , सुप्रिम कोर्टात गेले, तेथे काही झाल नाही. मग दिल्ली युनिवर्सीटीच्या चांस्लर व वाईस चांस्लर ना पकडल. ते कुठे ह्या हिंदु लोकांना घाबरतात. जेंव्हा दिल्लीत लोकांना ह्या बद्दल समजल व मोठा राडा व्हायला लागला मग दिल्ली युनिवर्सीटीने लगेच हा निबंध वापस घेतला . दिल्ली युनिवर्सीटीने निबंध करिक्युलम मधुन काढुन टाकला न टाकला तोच बीबीसी . सी एन एन, च्या रिपोर्टरचा फोन आला व विचारल की हा निबंध का काढुन टाकला ? का भारतात असहिष्णुता पसरली आहे. भारत देशाची व त्याच बरोबर हिंदु धर्माची वाट जगाच्या पटलावर कशी वाट लावली जात आहे हे जर अभ्यासायच असेल तर श्री राजीव मलहोत्रा ह्यांचे यु ट्युब वरचे व्हिडीयो बघावेत.

बिस्कुट या हिंदुंच्या !!! सारखं काय खतर्यात राहायचं कधीतरी हिंदुस्थान मध्ये पक्षी देशात रहावा की !!!! बाकी कोणी कुठे रहायचं हा व्यक्तिस्वातंत्र्य मुद्दा आहे आपण आपलं मिपास्तानात रहावं (नारळ देत नाहीत तोपर्यंत) इतकेच माहीत असलेला किरकोळ वाचकांची पत्रेवाला नाखु

उपहासात्मक असेल तर चाम्गले आहे. अन्यतः एक विनोदी लेख चाम्गला जमलाय. पुढच्या लेखात गोमुत्र कोला आणि गोमय पास्ता याबद्दल ल्ह्यावे ही इणंती.

गणपती बाप्पा मोरया, गरब्याला डी.जे. लावूया... दिवाळीत फटाके फोडूया अन दसर्‍याला आपट्याची झाडे तोडूया... वडाच्या डहाळीची करू या पुजा अन दहीहंडी रात्री फोडू या.. होळीला लाकडे जाळू या आणि धुळवडीत पाणी नासू या. सणांना प्रदूषण करू या, गणपती बाप्पा मोरया...

In reply to by नर्मदेतला गोटा

जाऊ दे .... हिंदू खतरे में म्हणून प्रदूषण तर, इस्लाम खतरे में म्हणून मशीदी वर भोंगे. दोष तरी कुणाकुणाला देणार? लहानपणी, बजबजपूरी नामक शहर (दूरून) बघायची इच्छा होती , सध्या अनुभवत आहे. मग ती डोंबोली असो की ठाकुर्ली.सगळी कडे तीच बोंब... शहरात तरी थोडी स्थिती बरी आहे, "खेरशेत" नामक खेडे गावात तर भयाण ध्वनी प्रदूषण आहे. सकाळी ६ वाजता जे लाऊड स्पीकर चालू होतात ते रात्री १२ वाजे पर्यंत चालूच असतात.हनुमान सप्ताहात तर सातही दिवस-रात्र ..... स्वगत : भारतात फक्त ३ प्रकारची माणसेच राहू शकतात, जी आंधळी, मुकी आणि बहिरी असतील.आमच्या सारख्या अशिक्षित माणसांचे ह्या सुसंस्कृत मनुष्य जमातीत राहणे कठीणच. (आंधळा, बहिरा आणि मुका व्हायचा प्रयत्न करणारा) मुवि

In reply to by नर्मदेतला गोटा

वैचारिक प्रदूषण, हे मुलभूत आहे आणि त्याचा दृष्य परिणाम म्हणजे, ध्वनी, वायू आणि पर्यावरण प्रदूषण. असो, जर मी पापच करत नसेन, तर मला देवाची गरज काय? आणि जर मी पाप करत असेन, तर मला देवाने का वाचवावे?......मी पाप करून पण देव मला वाचवणार असेल, तर त्याला देव तरी का म्हणावे? आमचे बाबा महाराज म्हणतात, "घरापुरता धर्म पाळावा आणि घरा बाहेर, समाज धर्म. पण मुळात आपल्याला, भारतीयांना, एकत्र रहायची सवय नाही.त्यामुळे समाज-धर्म, ही संकल्पना, भारतीयांच्या मनांत रुजणार नाही.....ज्या देशांतील जनतेला, "व्यक्तीपुजा" आवडते, त्या देशांत असेच होणार...गाडगे बाबा आणि तुकडोजींना पण ह्या समाजाला "असंख्य-देवांच्या" स्तोमातून बाहेर काढणे जमले नाही..आपण अरण्यरूदन करण्यात अर्थ नाही....तस्मात...आलीया भोगासी, असावे सादर...." भोगा आपल्या पापाची फळे.....

In reply to by मुक्त विहारि

आवडले घरापुरता धर्म पाळावा आणि घरा बाहेर, समाज धर्म पण दुर्दैवाने आणि घराबाहेर या उत्तरार्धात असलेला"स"लुप्त झाला आणि दिखाऊ, बीभत्स ओंगळवाणे रूपं घेऊन समोर आला आहे. नित वाचकांची पत्रेवाला नाखु