मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोहली आणि भारतीय मानसिकता

रुस्तुम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
थोडा है थोडे की जरुरत है जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है ऐकायला खूप छान वाटतं पण मानवी प्रवृत्ती ह्याच्या अगदी विरुद्ध असते, जरा काही कमी असलेलं चालत नाही. भारतीय क्रिकेटमधली तज्ज्ञ मंडळी तरी सध्या हे अनुभवत आहेत. आणि हे जरूरत असलेलं थोडं त्यांना डोंगऱ्याएवढ्या दुःखाइतकं भासतंय पण डोंगराएवढे सुख त्यांना जवाइतकं हे वाटत नाहीये. पण खरं पाहता त्या सुखामुळे क्रिकेट परत खूबसूरत वाटतंय. तर जरुरत असलेलं थोडं म्हणजे रहाणेचं सध्याचं अपयश. कारण ही तसेच आहे म्हणा, रहाणे हा भारतातील मध्यम वर्गाला सध्याच्या भारतीय संघातला जवळचा वाटणारा खेळाडू आहे (ह्याची कारणीमिमांसा मी करत नाही, ज्याने त्याने आपल्या वाकुबी प्रमाणे ह्याचा अर्थ समजून घ्यावा). रहाणेचं अपयश त्यांना खुपतंय स्वतः रहाणेपेक्षा ही कदाचित जास्त. विराट, पुजारा , विजय , धवन हे एवढे अफलातून खेळत आहेत पण ह्यांना चिंता लागून राहिलीय ती रहाणेच्या अपयशाची. त्यामुळेच सर्व मीडियामध्ये (इलेक्ट्रॉनिक म्हणा प्रिंट म्हणा किंवा सोशल म्हणा) सगळीकडे चर्चा आहे ती रहाणेच्या अपयशाची आणि त्यापेक्षाही त्याला डिफेन्ड करायची!! वर्तमानपत्रांचे, वेब साईटसचे रकाने आणि facebook वरचे uploads हेच सांगतायत की आफ्रिकेत रहाणे किती गरजेचा आहे? पण मुळात हा प्रश्न आहे की रहाणेला येवढं डिफेन्ड करायची गरज का लागतेय आणि कोणापुढे डिफेन्ड करायचंय? निवडसमितीकडे की कर्णधार आणि प्रशिक्षकांकडे की फक्त आत्मसमाधानासाठी? निवडसमिती म्हणाल तर कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या शब्दाबाहेर नाही. कर्णधाराचा तर त्याला किती पाठिंबा आहे हे त्याने करुण नायरच्या त्रिशतकानंतरही त्याला डच्चू देऊन रहाणेला संघात जागा देऊन दाखवून दिले होते. तो संघाचा उपकर्णधारही आहे. हे सगळे असताना त्याला काढण्याची भीती का? बरं प्रेक्षक/रसिक कोणाकडून ही राहणेला काढा अशी मागणी होत नाही मग ही सगळी आकडेवारी आणि हे समर्थनाचे लेख का? दुसरा प्रश्न असा की धवन, विजय अन राहुल हे चांगली कामगिरी करत आहेत. त्यातला धवन वगळता बाकीचे दोघं व्यायवस्थित तंत्र असलेले फलंदाज आहेत जे कुठल्याही खेळपट्टीवर उभे राहू शकतात, पुजारा ज्याला 'वॉल'च बिरुद चिटकवलं गेलंय तो द्रविडप्रमाणेच सातत्यपूर्ण कामगिरी करतोय आणि खुद्द विराट ज्याने सचिनची जागा कधी भरून काढली हे कळलं देखील नाही, तो दृष्ट लागावी अशी कामगिरी करत असताना, ते आफ्रिकेत अपयशी ठरतील अशी भीती का? की ते अपयशी ठरावेत ही सुप्त भावना आहे? आणि ह्या सगळ्यात आपण विराटवर अन्याय करतोय ही जरा ही भावना नाही का? एवढे तो विक्रमांवर विक्रम रचतोय, वामनाप्रमाणे दोन पावलात त्याने सचिनचे विक्रम जवळजवळ पादाक्रांत केलेत त्याची दखल नाही (का हेच जास्ती दुखतंय). त्याची फलंदाजी बघत राहावी अश्या खेळी करतोय पण त्याविषयी कौतुकाचे चुकून माकून एकाद दुसरे शब्द. बरं ते ही मुक्तकंठाने नाहीत. त्यात ही इंग्लंड, न्यूजीलँड, आफ्रिकेत खेळू देत मग त्याच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब होईल वगैरे वगैरे. काय तथ्य आहे त्यात? पॉन्टिंग भारतात यशस्वी नव्हता म्हणून तो उत्कृष्ट फलंदाज नाही? कोहलीला तशी अन्यायाची सवय आहेच म्हणा. त्याच्या पदार्पणापासूनच त्याला सचिन सारखं सहज स्वीकारलं गेलं नाहीच. कधी त्याच्या आक्रमक वृत्तीवर कधी अनुष्काला दिलेल्या फ्लायिंग किस वरून तर अगदी ताजं म्हणजे कुंबळे वादावरून त्याला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय. एवढे बोल तर तारे जमीन पर मध्ये ईशानच्या बापाने ईशानला हे लावले नसतील. भारतीय मानसिकतेला दुसऱ्याने वागण्यात दाखवलेली आक्रमकता आवडते पण आपण आक्रमकता दाखवली की पोटात दुखतं. ऑस्ट्रेलिया , पाकिस्तानी खेळाडूंच्या आक्रमक वागणं,स्लेजिंग आवडतं पण तेच आपल्या खेळाडूने केलं की कशाला हवंय, आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावं, आपल्या खेळाने प्रत्युत्तर द्यावं वगैरे शेलक्या प्रतिक्रिया तयार. अरे पण का ऐकून घ्यावं समोरच्याचं?? किंवा समोरच्याला त्याचाच डोस व्याजासकट परत दिल्यास काय बिघडतं? कोहली हे सगळं करतोच आणि यशस्वीही होतो हे आपल्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे म्हणून कदाचित खुपत असावा. कुंबळे प्रकरणात ही चूक नक्की कोणाची होती हे काही समोर नाही आलं किंबहुना विराटने स्वतःची बाजू मांडलीच नाही पण कुंबळेच्या धीरगंभीर, सद्गृहस्थ ह्या प्रतिमेमुळे सहानुभूती सगळी त्यालाच. कुंबळे चुकू शकत नाही? पण आपल्या मालिकांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे मॉडर्न कपडे घालणाऱ्या स्त्रिया कुटील, कारस्थानी आणि साडीतल्या सोज्ज्वळ , त्याप्रमाणे फ्लॅशी राहणारा/वागणारा विराट चूक. (ह्या मालिका बघणं सोडलं पाहिजे). हर्षा भोगले म्हणतो त्याप्रमाणे कोहली खरंच 'फेरोशीअस' (Michael Atherton used the word "ferocity" to describe the Aussies. It is a word that goes well with Kohli too. It is a state of mind where you are constantly attacking the opponent and not conceding that inch.- हर्षा भोगले) अत्ता अत्ता पर्यंत आपण ऑस्ट्रलियन क्रिकेटचं उदाहरण द्यायचो आणि आता तशाच पद्धतीने विराट खेळतोय तर लागलं पोटात दुखायला? वास्तविक पाहता कंमिटमेण्टच्या बाबतीत विराटचा हात धरणारा कोणीही नाही (कदाचित राहणेही नाही). टेम्पेरामेन्टची तुलना सचिनशीच होऊ शकेल कदाचित!!! (सहसा कोहली एकाच चुकीची पुनरावृत्ती करत नाही). फिटनेस म्हणाल तर आजच्या घडीला फिट क्रिकेट विश्वात अजून कोणी असेल असे वाटत नाही. त्याच्या अंगावर चरबीचा 'च' ही दिसत नाही एवढेच नव्हे तर फिटनेस बाबतीत जागरूकता आणण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे म्हटल्यास वावगे ठरू नये. एवढा सगळं असताना फक्त आणि फक्त तो आक्रमक आहे किंवा एक्सप्रेससिव्ह म्हणून त्याला नावडतीचे नजरेने बघत राहण्यात काय अर्थ आहे? सहसा आपला तो बाब्या दुसऱ्याचंते कार्ट असा प्रकार असतो (आमच्या घरी वगळता :)), आपण कोहलीला आपला समजलोच नाही. मजरूह सुल्तानपुरींनी म्हटल्याप्रमाणे नेहमीच 'सदा तुमने ऐब देखा, हुनर तो ना देखा'. आजच्या घडीला जगातल्या सर्वोत्तम फलंदाजाच्या त्याची तुलना होते. शॉर्ट फॉरमॅट मधला तर तो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेच पण कसोटी क्रिकेट मध्ये ही तो त्याच मार्गाने चाललाय, चाललाय म्हणण्यापेक्षा धावतोय. त्याचे कर्तृत्व खरं पाहता त्याच्या खेळातूनच स्पष्ट होतंय (जसं आपल्या लोकांना हवं तसं, बॅट बोलतेय) पण ते स्वीकारण्याची आपली तयारी आहे का? राहणे विषयी माझ्या मनात आकस नाही किंबहुना तो मुंबईचा म्हणून असलाच तर एक सॉफ्ट कॉर्नरच आहे पण उद्या चुकून कोहली अपयशी ठरलाच (तो ठरणार नाहीच हा ठाम विश्वास आहे तरी एक शक्यता म्हणून) तर ही तज्ज्ञ मंडळी विराटच्या किती पाठी उभी राहतील? मला राग आहे ह्या दुटप्पी वागणुकीचा आणि टिपिकल मानसिकतेचा बाकी काही नाही! तसं ही कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं राहत नाही.

वाचने 8278 वाचनखूण प्रतिक्रिया 19

अमोल खरे 31/12/2017 - 22:26
अजिंक्य रहाणे त्याच्या नम्र स्वभावामुळे मला आवडतो. सचिन पण ह्याच कारणाने आवडायचा. आक्रमकता ही नेहेमी चांगली दिसत नाही, म्हणुन सचिन रिटायर झाला तेव्हा सर्व हळहळले, पण गांगुली कधी रिटायर होणार हे सारखे विचारले गेले. जो पर्यंत रिझल्ट मिळत आहेत तो पर्यंत कोहली आहे, नंतर तो कुठे फेकला जाईल ते कळणार पण नाही.

In reply to by अमोल खरे

विशुमित 01/01/2018 - 16:11
कोणतीही गोष्ट अति प्रमाणात असली तर ती कधीच चांगली नसते. सदा न कदा नम्र स्वभाव असणाऱ्याला आमच्याकडे शाम्ब्लू म्हणतात. प्रत्येक वेळेस त्याचा फायदा होत नाही. रिझल्ट यायचे बंद होईल तेव्हा कोहली स्वतःहून संघातून बाजूला होईल असे वाटते. तो म्हणणार नाही माझे २०० व शतक बाकी आहे अजून २-४ सामने खेळू द्यात हो.

पगला गजोधर 01/01/2018 - 16:02
विराट सारख्या असर्टीव्ह वृत्तीच्या खेळाडूंचीच भारताला गरज आहे. सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला दाखवून दिलं की आक्रमकता कशी असते, त्याचं नेतृत्व उजवे वाटते... काही भक्त लोकच सौरव निवृत्त कधी होणार म्हणून डराव डराव करत असतील, पण विजिगिशु वृत्तीची ज्याला समज आहे, त्यालाच सौरव व विराट यांच्या योगदानाचे महत्व कळेल... कप्तानसीची जबाबदारी घेऊनही उत्कृष्ठ कामगिरी करणारे सौरव व विराट व महेंद्रसिंग .. दुसऱ्या कुठल्या शेंबड्याकडे भारतीय नेतृत्व असते तर 20-20 व वन डे विश्वचषक भारताकडे आला नसता....

कपिलमुनी 01/01/2018 - 17:26
निवृत्त न्यायाधीशांची एक उच्चस्तरीय समिती नेमून याचा तपास करायचे आश्वासन देण्यात आले आहे

In reply to by कपिलमुनी

नाखु 01/01/2018 - 22:43
त्यांची काही कालमर्यादा निश्चित करण्यात आली नाही. तेंव्हा निश्चिंत राहा मुदलात धागा गुगलीने स्वयं चित फलंदाजांना अपिलात पाहणारा नाखु

फारएन्ड 02/01/2018 - 01:19
उगाच सचिन वर पिंका टाकायची गरज नाही. विराट कोहली जबरी आहे. तुफान खेळतो आणि नुस्ता "फ्लॅट ट्रॅक बुली" नाही. आता प्रचंड फॉर्म मधे आहे. बघायला मजा येते. त्याला मोठा करायला सचिन ची रेघ लहान करायची गरज नाही. गावसकर->सचिन->विराट अशी चढत्या क्रमाने आक्रमकता, फिटनेस भारतीय क्रिकेट मधे आली आहे. ती एऩ्जॉय करावी. बाकी सचिन च्या २० वर्षांच्या कारकीर्दीतून ज्यांना शेवटचा ड्रॅग केलेला भागच लक्षात ठेवायचा असेल त्यांना तो ठेवू दे. तसेच ज्यांना सचिन सचिन कायम उगाळत धोनी ने गेल्या काही वर्षांत काय धमाल उडवली आणि आणि कोहली अजूनही ते करत आहे त्याची दखलच घ्यायची नाही किम्वा त्यात काड्या घालायच्या आहेत त्यांनाही ते करू दे. या दोन्ही लोकांचे क्रिकेट प्रेम हे हीरो वर्शिप वर किंवा द्वेषावर आधारित असते. ते कशाला मुकत आहेत त्यांना माहीत नाही. अस्सल क्रिकेट फॅन्स सचिन चे ड्राइव्ह्ज, द्रविड चे बोलर ला विकेट "अर्न" करायला लावणे, लक्ष्मण ची आर्टिस्ट्री, सेहवाग चे कट्स, गांगुली चे फ्लिण्टॉफ ला लॉर्ड्स च्या गॅलरीत दिलेले जोरदार प्रत्युत्तर आणि ऑफ साइडचे तितकेच नजाकत वाले ड्राइव्ह्ज, धोनी ची वेळोवेळी केलेली जबरदस्त बॅटिंग, हेलिकॉप्टर शॉट्स, आणि कोहली चे अफाट ड्राइव्ज, धोनीबरोबरचे जबरी रनिंग बिट्वीन द विकेट्स, एकूण फिटनेस - हे सगळेच आवडते. तेव्हा कोहली फॉर्म मधे आहे तर ते एन्जॉय करा. धोनीचे हेलिकॉप्टर अजून किती दिवस दिसले माहीत नाही, ते बघा. रोहित शर्मा जेव्हा झोपेतून जागा होतो आणि क्लासिक खेळून जातो, तेही चुकवू नका.

फारएन्ड 02/01/2018 - 01:23
रुस्तुम - ही वरची प्रतिक्रिया जनरल चर्चांचा पॅटर्न पाहिला आहे त्यावरून आहे. तुमचा लेख आवडलेलाच आहे. रहाणे बद्दलचे माझे जनरल मत म्हणजे त्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो पूर्ण त्याचे सोने करतो असे नेहमी दिसत नाही. अगदी बॅटिंग ट्रॅक वर सुद्धा अनेकदा ३०-४० मारून बाद होतो. तरीही एकूण टीम मॅनेजमेण्ट चा भरवसा दिसतो आहे त्याच्यावर आणि त्यामुळे पुढेही संधी मिळतीलच. तसेच एकदा तो कप्तान होता तेव्हा त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. कसोटीकरता कोहली नंतर तोच लाइन मधे असेल.

In reply to by फारएन्ड

फेरफटका 03/01/2018 - 00:58
फा, तुझे दोन्ही प्रतिसाद, स्पॉट ऑन आहेत. गावसकर ला लाईव्ह बघितलं ते त्याच्या शेवटच्या काळात आणी तेव्हा क्रिकेट ईतकं कळायचं नाही. पण सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, गांगुली, कुंबळे, कोहली, पुजारा हे सगळे बघता आले, ह्या बाबतीत मी स्वतःला सुदैवी समजतो. उगाच तुलना करून स्वतःला त्रास देण्यात काय हशील? रहाणे ने पण चांगलं खेळावं. तुफान क्षमता असलेला, स्वतःला वेळोवेळी सिद्ध केलेला, गुणी खेळाडू आहे तो. चांगला खेळला तर भारतीय संघाचा च फायदा होणार आहे.

In reply to by फेरफटका

नाखु 03/01/2018 - 20:59
ह्या बाबतीत मी स्वतःला सुदैवी समजतो. उगाच तुलना करून स्वतःला त्रास देण्यात काय हशील? रहाणे ने पण चांगलं खेळावं. तुफान क्षमता असलेला, स्वतःला वेळोवेळी सिद्ध केलेला, गुणी खेळाडू आहे तो. चांगला खेळला तर भारतीय संघाचा च फायदा होणार आहे.
तथास्तु म्हणत आहे.