मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाज २

अबोली२१५ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गाज१ http://www.misalpav.com/node/41462 विश्वा आता हाताशी आला हाय. आता त्याच लगीन करून दिल पाहिजे. म्हणजी तो वाया जाणार नाय, आजकाल काही चांगल्या लोकांशी संगत नाय हाय. तो आजकाल अण्णा मलबऱ्याशी संग करतु. विश्वला फकस्त त्याच्या अंगावरच दागिनं आणि त्याचा पैका दिसतु. त्यो अण्णा कुठं कुठं फिरत असतोय. कधी तालुका, कधी मुंबई, कधी मद्रास भिंगरीचं अस्तेय त्याच्या पायाला. एक दोन वेळा पोलीस पण आल्ती होती त्यांचा घरला. गंणप्याची विचारांची लडी तात्यांच्या हाळीने तुटली "काय र ! कधी पासून हाका देतुया पण, लक्ष कुठं हाय तुज" "आर ! मी वाडीच्या ह्या टोकास्नी . कशी हाक ऐकू येईल." "बरं राहील , चल तुला कांता ने बोलावलं" "कशापाई बोलवलंय, काय काम हाय त्याचं ? तुला ठाव हाई काय ?" "मला कायबी बोलले नाय, मला बोलून घेतलं अन सांगितलं जा गणप्याला बोलावं." "चल !" लगबगीने तात्या मागून गणप्या धावत होता. तात्याचं चालणं म्हणजे गणप्याच धावणं, गणप्याला मध्येच धाप लागत होती ते दोघे विहरीपर्यंत पोहोचले गणप्याने तात्याला हाक दिली, अरे ! थांब कि रे तुझ्या मागून चालणं म्हणजे धवन हाय र माझं." विहिरीतून पाणी काढून त्याने हात पाय धुतले. हात पुसता पुसता तो तात्याजवळ आला "अरे काय लफडं तर नाही ना. तात्याने त्याच्याकडे पाहून खांदे उडवले. श्रीकांत बर्वे झोपाळ्यावर बसून सुपारी कातरत होता. गणप्याने उंबरठ्याच्या बाहेरूनच म्हटलं "व्हाय जी कांता बोलवलास." श्रीकांतनी सुपारी कातरत वरती न बघत म्हटलं "गणप्या मी काय आता लहान नाही राहिलो आहे." गणप्या चमकला, श्रीकांतच्या आवाजातली जबर त्याला जाणवली. त्याने हातातल्या कापडाची चुळबुळ केली आणि आवंढा गिळला. हळू आवाजात म्हणाला " तस नाही जी धाकला मालक, तुम्ही बोलावलं होत." श्रीकांतनी मान वरती उचलली आणि त्यांच्याकडे नजर रोखत "म्ह.... " केलं. गणप्या अजूनही घराबाहेर बाहेरच होता. त्याच बुद्धी त्याला घराच्या आत जाऊ देई ना आणि मन घराबाहेर पडू देईना. तो विचित्र अवस्थेत सापडला. शेवटी त्याने अंगणातच बैठक केली. तस श्रीकांतने त्याला म्हंटल "अरेरे! गणप्या तू आत ओसरीवर ये !" तसा गणप्या उठून आत ओसरीवर आला. त्याच्या मनात अशुभ विचारांची पाल चुचुकत होती. पण, त्याने ते विचार झटकून टाकले. श्रीकांतने घसा खाकरत गणप्याकडे रोख वळवला, "गणप्या पाट पाडायचं काम किती दिवसापासून चाललं आहे ? जास्त दिवस झालेत " गणप्याने जराशी चुळबुळ केली आणि म्हटलं " व्हय.... झालेत असतील २०-२५ दिवस " "२०-२५ दिवस नाही गणप्या महिना उलटून गेलाय, मे सुरु झालाय आणि अजून अर्ध्या वाडीच्या पाटाचं काम नाही झालाय, अळी खोदून नाही झाली, झावळी तशीच पडून आहेत, सुपाऱ्या सुकत चालयात." मानेवर जणू जोखड ठेवल्यागत गणप्याची अवस्था झाली होती. श्रीकांत त्याच्या कामाचा पाढा वाचत होता. आता गणप्याच वय राहील नव्हतं जेव्हा तो तरुण होता तेव्हा मे महिना सुरु होण्याच्या आत तो काम संपवायचा. "मी काय बोलतोय गणप्या" श्रीकांतच्या या बोलण्याने गणप्याच्या विचारांची तार तुटली. तो त्याच हळू आवाजात श्रीकांतला बोलला "तुमचं बी खर हाय धाकल मालक पर ..... " "पण काय गणप्या तुला जर काम होत नसेल तर...." "तर काय जी..... " "तर उद्यापासून तू कामावर येऊ नकोस..... " श्रीकांतचा आवाज चढलेला ऐकून विनायकराव बैठकीच्या खोलीतून बाहेर ओसरीवर आले. गणप्या बाहेर ओसरीवर उभा होता, मोठे मालक बाहेर आलेले पाहून गणप्याला हुरूप आला पण, तो जसा आला तसा तो गेला कारण विनायकराव काहीही न बोलता गप्प बसले. "कामावर येऊ नगस, आता जी आम्ही काय खानार, आणि माझा सारा जलम गेला ह्या घराची सेवा करता करता." "मग तुम्हाला काय फुकट पोसायच....?" "नाय जी असं बोलू नका मालक" गणप्या काळकुळीतीला येऊन बोलत होता. "अरे सुपारी सम्राट होण्याची लायकी असताना, आम्ही रस्त्यावर वाडगे घेऊन फिरायचे काय?" श्रीकांतच्या बोलण्याची धार वाढतच चालली होती आणि गणप्याची अवस्था कोडग्यासारखी झाली होती "तुम्हीच असं वागलात तर आम्ही लोकांनी कोनाकडे पाहायचं." ह्यावर श्रीकांत थोडा हडबडला पण त्याच्या जिभेची धार काही कमी झाली नाही. "अरे ! तू नको करुस काम पण विश्वाला तर पाठवशील " गणप्या भोळा होता, त्याला श्रीकांतने टाकलेला डाव काही कळला नाही. गणप्याची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली होती "नायजी ! तो उनाडया काय काम करतू या... " गणप्या विश्वाला कामावर पाठवायला तयार नव्हता आणि श्रीकांत आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. "ठीक आहे गणप्या उद्यापासून तू काही कामावर येऊ नकोस " असं म्हणून श्रीकांत तिरीमिरीने घरात निघून गेला

वाचने 3749 वाचनखूण प्रतिक्रिया 2