Skip to main content

आंतरजालावरचा भेंडीपणा !!

लेखक इरसाल यांनी सोमवार, 12/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारण कोणा एका मित्राने, ओळखीच्याने तो आधीच कार्यरत असलेल्या एखाद्या मराठी संस्थळाची माहिती दिली आणी आपणही त्यात सामील व्हावे अशी गळ घातली की "त्या" लाही वाटते की बघुया तरी की ही आभासी दुनिया आहे तरी कशी ? हो नाही करता करता "तो" सगळे सोपस्कार पार पाडुन या लोंढ्यात एकदाचा सामील होतो. रंगीबेरंगी असणारी ही दुनिया त्याच्या मनाला, मनात येणार्‍या लेख्/कविता/विचारांना कधी एकदा जालावर ओसंडुन वाहु ह्याच्या कळा द्यायला सुरुवात करते. जर आधीच कोणी सखा/मित्र/पाठीराखा असेल तर हा प्रवेश सुकर ठरतो. "त्या"च्या आलेल्या नव्या लेख/कविता/विचारांवर प्रोत्साहन मिळते मग "त्या"चा वारु चौफेर दौडु लागतो (वारं प्यायल्यागत). बाकीच्या नवलेखकांना येणारी हलकी फुलकी किंवा आंतर्जालावरुन डेब्यु मॅचमधेच रिटायर्मेंट देणारी रॅगिंग "त्या"च्या वाट्याला येत नाही. खरंतर ही मिळणारी ट्रीटमेंट म्हणजे (जो पर्यंत "तो" विहीरीत पडत नाही तोपर्यंत "त्या"ला विश्वास होत नाही की तो विहीरीच्या काठावर बसलेला आहे) एक सुरुवात असते, आभासी जगाला वास्तव मानुन त्यात होणार्‍या प्रसंगांना स्वताच्या जीवनात आणुन मनस्ताप करुन घेणार्‍या मालिकेची. मनुष्याचा स्वभावच आहे, ( इन जनरल) आपल्या परिघातुन बाहेर पडला की तो शोधतो आपला समविचारी. जसा मराठी दुसर्‍या राज्यात गेला तर आधी मराठी शोधणार, मग त्यात आपला समाजवाला मग आपला जातवाला. इथेही त्याचे तसेच होते. आधी कोणत्या आयडीशी आपले जुळते याची चाचपणी (काही वेळेस आधीच ठरलेले असते मी ह्या गृपमधेच, कारण ईथे आणणारा गॉडफादर) मग हळु हळु विचार, कार्य, गाव भाषा वगैरे वगैरे. सुरुवातीला सगळं कस आलबेल असत, आधीच असलेल्या गृपचा पाठिबा यामुळे सगळ फुलपाखरी असतं, कुठे कट्टे, ट्रेक, चर्चा, खाणे पिणे यांना अगदी उधाण येते. गृपने ज्याला टारगेट केलेय त्याला सुरुवातीला नॉर्मल टाँटिंग मग हळु हळु खतरनाकरित्या विरोध, लायकी काढणे, पर्सनल होणे, आंतर्जालीय हेवेदावे, उणे दुणे सुरु होते. अशातच असणार्‍या गृपमधे काही विचारी मतभेद व्हायला सुरुवात होते. (अति परिचयाने अवज्ञा). मग सुरु होते "शीतयुद्ध". काही कारणाने गृप सोडता येत नाही आणी खुलेपणाने बोलुही शकत नाही. (तोंड दाबुन बुक्क्याचा मार). मग वास्तविक स्वभाव किंवा खुमखुमी उमाळुन येते. मग वापरले जातात शब्द जे दुधारी तलवारीचे काम करतात. आतापर्यंत चांगले मित्र असं चित्र दिसणारे जालावर एकमेकांचे वाभाडे काढायला सुरुवात करतात. काही त्याही परिस्थितीत टिकुन राहुन निकराने किल्ला लढवतात बाकीचे किल्लाच सोडुन पळतात, मधे मधे येतात ट्रेक केल्यासारख, पण त्यात पुर्वीचे प्रेम, जिव्हाळा आत्मीयता नसते. मी सगळ्यात पुढे किंवा माझे तेच खरं किंवा मला सगळचं माहित आहे असं मानुन चालणार्‍यां "त्या"च्या फाजील आत्मविश्वासाला तडा जातो. आणी मग सुरु होतो असलेले/नसलेले ज्ञान, किंवा स्वतःविषयीचा तो अहं टिकवण्याचा अट्टाहास. ज्यांना कधी पाहिले नाही किंवा ज्यांच्या येण्या जाण्याने आपल्या खाजगी जीवनात काडीमात्र फरक पडणार नाही अश्यांसाठी आपला झेंडा फडकवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात काय हशील ? लेख तितकासा व्यवस्थितपणे मांडलेला नाहीये किंवा मला मांडता आला नाही त्याबद्दल क्षमा !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7245
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

संक्षी हा आयडी प्रत्यक्षात भेटला तर हाय ह्यालो करून आपली वाट धरणार. जोपर्यंत कोणी प्रत्यक्ष भेटल्यावर नीट वागत असेल तोपर्यंत काय फरक पडतो? तसेही एका ठिकाणचे भांडण दुसरीकडे नेणार्‍यांची मला गंमत वाटते. आणि ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसलेच वाद झाले नाहीत त्या लोकांशी केवळ इरसालनी म्हटले तसे जालीय मित्राच्या सांगण्यावरून शत्रुत्व घेणार्‍यांची तर दयाच येते. त्यांना मी हल्ली जव्हेरगंजाच्या कथेवरून प्रेरणा घेऊन बादलीचोर म्हणते. =))

In reply to by पैसा

ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसलेच वाद झाले नाहीत त्या लोकांशी केवळ इरसालनी म्हटले तसे जालीय मित्राच्या सांगण्यावरून शत्रुत्व घेणार्‍यांची तर दयाच येते.
परफेक्ट!

In reply to by पैसा

ज्यांचे आपल्याशी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कसलेच वाद झाले नाहीत त्या लोकांशी केवळ इरसालनी म्हटले तसे जालीय मित्राच्या सांगण्यावरून शत्रुत्व घेणार्‍यांची तर दयाच येते
अगदी अगदी!!

In reply to by पैसा

शत्रुत्व घेणे, ते शत्रुत्व जस्टिफाय करण्यासाठी सगळ्या गोष्टी वैयक्तिक करणे वगैरे अनेक गोष्टी करणार्‍यांसाठी खाली कुणी तरी म्हणलंय तसं एक च मेसेजः गेट अ लाईफ !! बाकी टक्या, काही ही कारण नसताना अनाहितांना मध्ये आणण्याची तुझी सवय काही जाता जात नाही. इथे वावरणार्‍या स्त्री आयडी इतरांइतक्याच मिपा आयडी आहेत.

In reply to by पैसा

तसेही एका ठिकाणचे भांडण दुसरीकडे नेणार्‍यांची मला गंमत वाटते.
गॉसिपिंग करणार्‍यांची या दुनियेत काहीही कमी नाही.अनेक मिपाकर मिपा आणि इतर ठिकाणी काय लिहितात यावर चेपुवर एके ठिकाणी अगदी गरमागरम चर्चा चालू असते.इथलेच आजीमाजी मिपाकर त्या चर्चेत सहभागी असतात.मग ते रहस्यकथा लिहिणारे असोत की सतत णकारघंटा वाजवणारे असोत की कुठलेकुठले काका असोत. इतर लोक काय करतात यात इतका इंटरेस्ट घेणारे आणि त्यावर घालवायला इतका वेळ असणारे लोक बघितले की गंमत वाटते. आणि वरकरणी सोज्वळ वाटणार्‍या अनेकांचा खरा चेहरा वेगळाच असतो हे पण सत्य त्या निमित्ताने कळले. असो. लेख आणि पैसाताईंची प्रतिक्रिया आवडली हे वेगळे सांगायलाच नको.

In reply to by गॅरी ट्रुमन

तसेही एका ठिकाणचे भांडण दुसरीकडे नेणार्‍यांची मला गंमत वाटते.
काय मस्त वाक्य आहे ना? पण असे ज्यांनी केलेय त्यातले एक उदाहरण इथेच मिपावर मी डोळ्यांनी बघितले आहे...अभ्या आहे साक्षीला :)

In reply to by पैसा

तुम्हाला पण बर्‍याच जणी भेटल्या आहेत की! काही प्रॉब्लेम झाला होता का? =)) समोरासमोर सगळेच छान वागतात.
=)) नै तर काय!! इथे बोलललेल्या, न बोललेल्या, भांडण केलेल्या, जानी दोस्ती असलेल्या वगैरे वगैरे सर्व प्रकारच्या आयडींना मी प्रत्यक्षात भेटलेले आहे. पैसाताईतर माझ्याहुन किमान चौपट मिपाकरांना भेटली असेल. अगदी संक्षींना सुद्धा कुणीतरी अनाहिता नक्कीच भेटलेली असु शकते. (यु नेव्हर नो!!) मिपावर आपलं पटत नाही म्हणुन समोर कुणी नीट वागत असताना त्याला उगाच हुडतुड करणं शक्य नाही. जे करत असतील त्यांनी डोकी तपासुन घ्यावीत..

In reply to by पिलीयन रायडर

दोन्हीही पार्टीज अत्यंत शांत,सभ्य आणि कुलीनपणे वागल्या - फोटोआधी, फोटोत आणि फोटोनंतरही. सुरंगीताईंनी फोन करुन ते कुणाला तरी कळवलं पण. कुणाला ते माहित नाही ;). खोटं वाटत असेल तर आमच्या महाकट्ट्यातला तो ऐतिहासिक फोटो पाहा!

In reply to by पिलीयन रायडर

मिपावर आपलं पटत नाही म्हणुन समोर कुणी नीट वागत असताना त्याला उगाच हुडतुड करणं शक्य नाही. जे करत असतील त्यांनी डोकी तपासुन घ्यावीत..
उलट झालंय का हो कधी? म्हणजे प्रत्यक्षात पटत नाही आणि मिपावर हुडतुड?

In reply to by बोका-ए-आझम

तुम्हाला "प्रत्यक्षात तर पटतंय पण मिपावर मात्र हुडतुड" असं म्हणायचय का? तर नाही बाबा.. असं कुणी भेटलं नाही अजुन!

In reply to by पिलीयन रायडर

ओ मला अचानक आठवलं! मी प्रत्यक्ष भेटलेले नाही पण असे काही आयडी आहेत ज्यांच्याशी माझी मुख्य बोर्डावर अनेकदा जुंपलेली असली तरी व्यनि / खव मध्ये अगदी मस्त गप्पा झालेल्या आहेत. अजुनही होतात. अगदी जाहिर वैचारिक मतभेद असुनही आणि त्यावर मेगाबायटी भांडण असुनही बॅडबुकात नसणारे लोक आहेत. आणि आता विचार केला तर वाटतंय की असेच लोक जास्त सोपे असतात. जिथले वाद तिथेच ठेवणारे!

"ज्यांना कधी पाहिले नाही किंवा ज्यांच्या येण्या जाण्याने आपल्या खाजगी जीवनात काडीमात्र फरक पडणार नाही अश्यांसाठी आपला झेंडा फडकवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात काय हशील?" + १ पण.... इथे असे बरेच मिपाकर असे आहेत की, ज्यांना भेटल्यामुळे किंवा त्यांच्याशी व्यनि तून विचारमंथन केल्यामुळे, मला तरी वैयक्तिक फायदा बराच झाला.

पैसा (तुज आज्जी म्हणु की ताई गं) जी आणी मुवि, लेख पुर्ण लिहील्यानंतर मी खाली लिहीले की, अस नाहीये की सगळचं वाईट घडत आंतर्जालावर, काही जिवाभावाचे सवंगडी, कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे, सल्ला देणारे, पाठिंबा देणारेही असताताच पण ते बोटावर मोजण्याईतपत आणी वरच्या या गदारोळात कुठे झाकोळले जातात ते तर समजतही नाही. म्हटलं दिशा बदलतेय लेखाची म्हणुन खोडले परत.

In reply to by इरसाल

तेही बरोबर आहे, असेही मित्र जालावर मिळतात. पण त्याचे प्रमाण खूप कमी असेल. बाकी इथे जालावर आज्जी म्हणा की पणजी. काय फरक पडतो! =))

In reply to by इरसाल

.....कसलीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे, सल्ला देणारे, पाठिंबा देणारेही असताताच पण ते बोटावर मोजण्याईतपत" + १ आपल्या आजूबाजूला पण असेच असते... शळेतील १०० मुलांपैकी ४-५ जणच आपले सवंगडी असतात आणि नातेवाईकांपैकी २-३ जणांशीच आपले सूर जुळतात.

In reply to by मुक्त विहारि

शाळेत जा, कॉलेज मध्ये जा, ऑफिस मध्ये जा, एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जा ..असा अनुभव येताच राहणार. जालावर येण्याचा आपला उद्देश सफल होतोय का ते महत्वाचे ...बाकीचे काय चालूच राहणार.

हा अनुभव तर आपल्याला कुठेही येतो. अलीकडे व्होट्सअप वर देखील ग्रुप झाला की हळू हळू विचारांची देवाण-घेवाण कधी एकमेकांची टिंगल-टवाळी करायला लागतात ते कळत नाही. मग ग्रुप सोडून जाणे, वाद वाढणे, भांडण होणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे केवळ आंतरजालावरचा भेंडीपणा म्हणण्यापेक्षा एकूणच इंटरनेटचा परिणाम म्हणू शकतो.

In reply to by ज्योति अळवणी

+१ अतिपरिचयात अवज्ञा. बाकी आंतरजाल आणि इंटरनेट एक च. मला वाटतं तुम्हाला संस्थळ म्हणायचे असावे.

अंतर्जालाला किती गंभीरपणे घ्यायचे याच्या रेषा ठरवलेल्या हव्यात हेच खरं. काही लोकांची गम्मत वाटते. कंपूबाजी, ठरवून विरोध या इथल्या गोष्टी कधी कळाल्याच नाहीत. कदाचित इथे येऊन वाचणे जास्त आणि लिहिणे कमी यामुळे असावं.

प्रस्थापितांना काहीजण टक्कर द्यायला जातात अथवा काहीजणांचा अगोदरचा ग्रुप असतो ( कंपू )त्यात घुसायला बघतात आणि वांधा होतो.आपल्या शाण'पणात कंपू नसेल तर कोणाला पडायचे नसते.

बाकी आंजा हे रिकामा (आणि कामाचाही)वेळ घालवायचे झकास साधन आहे !

जबरदस्त लिहिलंय ! एकाला असाच अनुभव आलाय, ग्रुप तयार केल्यावर भरपूर संख्या झाली. नंतर मात्र हेवेदावे, उणीदुणी आणि काहीबाही कारणांनी लोक दुखावले आणि सोडून गेले ! पण मला वाटतं कि निर्मात्याने त्याची काळजी करू नये ! आओ तो वेलकम और जाओ तो भीड कम !