मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप हाय मी

अभ्या.. · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"बरं मग वकीलसाहेब, आलं समदं ध्यानात? ह्येच्यापुढं मी काय सांगू नये, तुमी इचारु नये" "लका, वकीलसाहेब झालो नंतर, आधी जिगरयार हौत. चड्डी घालता येत नव्हती तवापासून दोस्ती आपली" "म्हणूनच. म्हणूनच... चल लाग आता कामाला, लै लेट बी झालाय, वैनीसाब वराडतील" "झोप तू बी. डोळे लेन्स लावल्यागत झालेत लालभडाक" "झोपेचं तेवढं सोडून बोल. ती ग्येली आता कायमची, निघ तू" ................. "नाग्या, सगळं घीवून ये बे वर" "मालक, वैनीसाब येते म्हणतेत वर, कसं करु?" "झोपा म्हनाव त्येंना. तू ये घीवून. च्यायचं आकरामाशी" ************************** तिज्यायला कोनाय बे आकरामाशी. कोन म्हणतंय? समोर ये उंडग्या. नाही उभा जाळला तर पाटलाचं रगात नाय सांगणार. ए नाग्या.... कुठं पळाला? आकरामाशी औलाद पळालीच का अशी? आनतो का आता? आन आन. भर नीट. नीट भर आयगल्या. नीट. हां. चल निघ. भईर थांबायचं. चल. .... .रामराम पाटील. कसं चाल्लंय? लै भारी वाटतंया आं बसून दारु प्याया? प्या...प्या. आपल्याच कारखान्याची गेलेली आसंल तिकडं. तितंबी रिमिक्स करतील आयगले. तसं न्हवं..कलर लैच उतरल्यासारका वाटतय. कुनाचा? आं? कुनाचा? न्हाई म्या म्हणलो ओ...माननीय माजी आमदार श्री. तात्याराव पाटील. कसं वाटतंय? आँ.... माजी. थुततिच्यायला. फुकाट नाय झालो भौ आमदार. लगी माजी? चौथीला होतो तवा जप्ती आलेली डीसीसीची शेतावर. आजा पाया पडायलेला साह्यबाच्या. आदी शेत खायला समदे आलेले आता भावकीतला एक किडा उठला नाय तिज्यायला. आकरामाशी म्हणत व्हती त्या टायमाला आमच्या आज्याला. त्येनं कवा कुटं शेण खाल्ल्यालं पण डाग पडलेलाच. तवाच बाप उठला तिरीमीरीत. धरला हाताला आन म्हनला चल दाखवू पाटलाचं रगात कसं घट्ट हाय ते. पंध्रा वर्स राबला कुत्र्यागत तवा १० एकराचा तुकडा कोरा झाला. शिकिवला मात्र नेटानं आमाला. तालुक्याला कॉलेज केलं संगाट राजकारण बी केलं. खानदानी रक्तय आपलं एवढं कधी इसारलो न्हाय. रुप आन जिगर बघून साह्यबानी घेतलाच ग्रामपंचायतीवर. सदस्याचा सरपंच झालो आन सरपंचाचा आमदार. फुकाट नाय झालो. पानी केलो रक्ताचं पानी. ************************** "नाग्या............पानी आन बे" "मालक, बघवंना ओ मला. काय एकटाच बसला बोलत आरश्याम्होरं?" "ए...चल नीघ, एकटाच है आपण. बास्स्स्स. एकटाच. चल नीघ तू" ************************** हां तर पाटील. काय सांगत होतो म्या? ते आमदारकीचं. कारखाना उभारला की तेच्या आधी. इक्रमी येळेत हां..इक्रमी येळेत. साहेब आलेले उद्घाटनाला. तात्या एकटाच तरणाबांड वाघंय इलाक्यातला म्हणलेले. हायंच आपण. आपली सोयरीक बी बापानं अशी धरली की नादच करायचा न्हाइ. शाण्णव मंजी शाण्णव. बापानं कधी राजकारण न्हाई केलं आपल्या पन आडा़खे न्हाई चुकले. लग्नाला सोता शीएम, बारा कॅबिनेट आन चाळीस आमदारं जेवून गेलेली. नंतर बी तीनचार येळेला आलेलं साह्यब. रातच्याला हितंच फार्म हाउसावर बसायची मिटींग. शीएम तर आपल्या फडावर आन केळ्याच्या बागंवर काय खुश लका. आर्ची बारकी व्हती तवा. सोता साहेब म्हणलेले. आगामी मिनिस्टर हायेत ह्या. च्यायला तवा बी शीएमची कॉलर पकडलेली आर्चीनं. रक्तातंच व तिच्या. पायजेल ते मिळीवणारच. जन्मली तवा लै तरास दिली. रातरातभर आमदारकी इसरुन खांद्यावर खेळवलेलं आर्चीला. तवापासून राहयली न्हाय कधी सोडून मला. खरंच राह्यली न्हाई माझ्याबिगर. तिच्यानंतर पोरगं झालं पण जिगर म्हणली तर आर्चीच. फार्महाउसला तिचं नाव दिलं तवा कसली नाचली. वरची रुम पार फॉरीनगत सजवून दिलेली. सोताबी पाउल न्हाय टाकलं तिच्या परमीशनबिगर. बुलेट दिलेली प्रिन्श्याला पण चलवायची हिच. ट्र्याक्टर बी चलवली तरी आपला फुल्ल पाठिंबा व्हता ओ. ....................... तिच्यायला पलटलं कुटं? कुटं कमी पडलाव आमी? व्ह्य गं आर्चे...आं? कमी पडलाव का कधी कशात? मी म्हणतो केल्या का कधी तुझ्या बापानं अपेक्षा? तू जे करंल ते खरं म्हणलं ना नाय? सगळ्याच्या अपेक्षाच पूर्ण करत चालली ओ जिंदगी. ह्ये तुझ्या परशाचा बाप. जिंदगीभर झटला आसता तरी मिळाला असता का ठेका धरनाचा? हितं बंगल्यावर येऊन पाय धरला तवा मच्छीमार सोसायटी काढून नाव घीवून दिली. ती नाव घीवूनच उडला का नाय आमच्यावर? तू म्हणली शिकती. आडिवली का तुला? नसंना का मार्क? डीग्री तर व्हतीच की हक्काची. कॉलेज आपलंच होतं की. आं. प्रिन्सराजेनी वाजवली त्या मास्तराला. बोललं का कुणी त्येन्ला? तू मंग्याला आडवली. पोरांना बी नडायची. काय झालं का कदी? कशाला बी न्हाइ म्हनलं न्हाइ पोरी तुला..........एकदा तर इचार करायचा बापाचा. काय मिळीवणार हुतीस आं? बापाची मान खाली गेली की लै सुख लागतं का? आगं ही मान वर करायला चाळीस वर्श खपलाय हा बाप. हेच्या पुढच्या इलेक्शनला महिला राखीवची हवा होती. सगळ्यात तरुण आमदार म्हणून थाटात विधानसभेत गेली आसती. हायेच तेवढी पुण्याई आपली. तुला तेवढीच जड झाली व्हय? आं. राजवर्धनराजेंचं स्थळ तर फक्त तुझ्यासाठी थांबलेलं. दहांदा इचारलेलं. म्या म्हणलं आमदार अर्चना पाटील होणार आन मगच समदं. कुटं लागावा तुझा परश्या त्येंच्यापुढं. तरी घरच्याना दहांदा सांगितलेलं. लक्ष असुंद्या, लक्ष असुंद्या. घरचा भेदी निघाला तिज्यायला मंग्या. बापाचा हुंदे येळ्कोट. भावाकडं तरी बघायचं. भैन सांभाळता येईना आन तालुका काय संभाळनारे म्हनून शेण खायची येळ आनली. तू कसाबी कर गं संसार. पण सोताच्या घरावर का निखारा ठेवतीस आं. न्हाई चलायचं. डोळ्यात तेल घालून राखलेली येल आपली. कुठला काटा खुपला ग तुला. फुलून डोलायलीस त्येचा अभिमान करस्तवर आल्लाद खूडून घेउन गेला त्ये कडू. म्या तर म्हणतो तुलाच कसं काय न्हाय वाटलं? आं. समदं इसरली? न्हाई चलायचं अज्याबात. तुला नाही ना किंमत आमची आर्चे? नाही ना कळत आयबापाचं काळीज? असुंदे. कळंल ना एकदिवस. राहतीस न्हवं सुखानं? राहा. पण एक घर इस्कटून दुसरं न्हाई उभं करायचं. मला चलणार न्हाई ते. माझ्या घरावर नांगर फिरीवला तर त्येला उखडून काढनारच. कोन का आसंना. आं.. काय म्हंतीस? तुमचंच रक्त? हॅटतिज्यायला. तू इसरलीस रक्ताला. आमी न्हाय. ................ लै तरास दिला गं आर्चे. लै जळला बघ जीव. टाकलं संपवून एकदाचच. न्हाई जळनार आता. माफ कर बापाला तुझ्या. जमलं तेवढं केलं. सोताच रक्ताचा खेळ मांडला बी आन इस्कटला बी सोताच. तुझा भाव हाय रक्ताचा. जमल तसं करंल आन निस्तरल. म्या लावली बघ सगळी सोय. सगळं आगदी रितीरिवाजानं केलंय बरका. आपला खानदानी रिवाज न्हाई इसरायचा. घेतला बरका सगळा गुन्हा, सगळा घेतला अंगावर. तुझ्या भावावर कायबी येणार न्हाई. सगळं केलय सेटींग. तुझं लेकरु बी राहील त्येच्या नशीबानं. त्येचं जेवढं त्येवढं आपलं वकीलकाका पोहोच करतील. म्या काय न्हाय थांबत इथं. इस्काटलं बघ सारं हातानीच. जगणं संपलं ह्या पाटलाचं. वेव्हार निस्तरला, जीव अडकलेला तुझ्यात. नाही जमत माझी माय. न्हाई जमत. बाप हाय गं मी. ************************** (समाप्त) .................. .................. .................. (समदी पात्रं ओळखीची वाटली असली तरी खेळ सारा मनाचा. इस्कटलेल्या खेळाच्या ह्या कहाणीला कुठलाबी खुलासा न्हाई की समर्थन न्हाई)

वाचने 14528 वाचनखूण प्रतिक्रिया 82

In reply to by टवाळ कार्टा

जव्हेरगंज 16/06/2016 - 19:28
+१ आर्चीला पायपुसणीची किंमत होती त्या घरात. फार्महाऊसला नाव दिलं तो केवळ दिखावा. खाली नीमो म्हणतात तसं, एवढंच सहन होत नव्हतं तर स्वतःला गोळी घालून घ्यायची होती, मग म्हटलं असतं, "बाप होता तो..."

In reply to by जव्हेरगंज

धनंजय माने 16/06/2016 - 20:03
जव्हेरगंज भो, काहीही कसं काय बोलताय ? पायपुसणी? जिला गावात बुलेट/ट्रॅक्टर/घोडा चालवत गावभर उंडरायला परवानगी आहे ती पायपुसणी? तुमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता आपल्याला मनुष्य स्वभावाची आणि एकंदर गावकीची ओळख आहे असं वाटत असल्याने आपल्या या तुलनेबाबत 'आच्छर्य' वाटले

In reply to by धनंजय माने

जव्हेरगंज 16/06/2016 - 21:31
बुलेट?? असा कसा घोळ करता. बुलेट तर प्रिन्सदादाची. एक दिवस घेऊन गेली तर भडकले ना प्रिन्सदादा. गावभर उंडारते मान्य. पण परवानगी होती म्हणून नाही. तर लक्ष नव्हते तिच्याकडे कोणाचेच (आई सोडली तर) पाटलाचे म्हणाल तर चित्रपटातला पाटील अस्सल आहे. वादच नाही. त्याचे कृष्णकृत्य त्याच्या स्वभावानुसार. फुल मान्य. पण लेखातल्या पाटलाला उगाचच भावनिक केलंय. ते काय पटलं नाही.

In reply to by जव्हेरगंज

धनंजय माने 16/06/2016 - 22:19
भाऊ भाऊ भाऊ, अहो एकदा नाही बुलेट नेत आर्ची. 2 3 वेळा तरी नक्की आहे. याउप्पर तिच्यासाठी घेतलेली गाडी बघितली का? वेस्पा आहे वेस्पा. (85 90 च्या घरातली गाडी) बापाच्या गळ्यात पडून त्याचा गालगुच्चा घेणारी पोरगी पायपुसणी असत नाही. बाकी आर्ची गेल्यानंतर त्या बाईंचा सत्कार होतानाची बॉडी लॅंग्वेज पाटलाचि मन:स्थिति नक्की दाखवून देते. 97% तरी असाच विचार पाटील करेल.

In reply to by जव्हेरगंज

सतिश गावडे 16/06/2016 - 22:23
पण लेखातल्या पाटलाला उगाचच भावनिक केलंय. ते काय पटलं नाही.
पाटील कसा मर्दासारखा रांगडा वाटायला हवा होता. हा पाटील बाईसारखा हळवा झाला आहे.

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. 17/06/2016 - 15:11
गावडेसाहेब आजून कसला रांगडेपणा अपेक्षित आहे हो. पूर्ण वाचला आहात ना नक्की? पूर्ण लेखात हळवेपणा दिसतोय का बघा जरा. सुरुवातीच्या वकीलमित्रासमोर सुध्दा कामाच्या गोष्टी बोलून नंतर एकटाच आरश्यासमोर बसलाय. आर्ची त्याचा हळवा कोपरा हाय जरुर पण तेवढेच हळवेपण आलंय अगदी शेवटी. आक्ख्या बोलण्यात त्याचा झाल्या गोष्टीविषयी विखार, स्वकर्तुत्वाचा माज आणि स्वसमर्थन आहे. कुठेच हळवेपणा नाहीये. शेवटी शेवटी झाल्या गोष्टीची हताशा आहे आणि पश्चातापाचा जर्रासा सल म्हणून स्वतःला संपवायची भाषा आहे. बाकी कुठेही हळवेपणा नाही की भावनिक केलेलं नाही. . आणि हे माझ्या लेखनातले आहे. अ‍ॅक्चुअली काय कसे हे मी नाही सांगू शकणार. सैराटवर लिहिलेल्या अनुभवात शेवटी
मनासारखे वागले नाहीतर आपल्याच किंवा कुणाच्यातरी औलादीला संपवायचे चक्क? कशाचा हा हक्क? बर यातून साध्य होते काय? कष्टाने उभारलेला संसार क्षणात मातीमोल? कायद्याच्या कचाट्यात सापडतील किंवा ज्या प्रतिष्ठेपायी हे खून होतात त्याच प्रतिष्ठेचा वापर करुन सुटतीलही. पण जीवच घ्यायचा ही मानसिकता अनाकलनीय आहे.
हे मीच लिहिलेल्या प्रतिसादातील मानसिकतेचा उलगडा करायचा प्रयत्न केला. बस्स. इत्ताइच

In reply to by अभ्या..

धनंजय माने 17/06/2016 - 15:19
लेखकानं जास्त स्पष्टिकरण देण्याच्या भानगडित पडू नये असं म्हणतात. पाटील रांगडा च आहे, पण त्याचाही एक पॉलिटिकल अप्प्रोच एजेंडा आहे, पोराकडं ताकद/समज नाही जी पोरीमध्ये आहे तिच्याकडं बघून आपली राजकीय वारसदार तिला ठरवण्याच्या आधीच पोरीनं घात केल्याचं दुक्ख आहे. अभ्या.. बरोबर ल्हिवलाय.

In reply to by धनंजय माने

अभ्या.. 17/06/2016 - 15:27
देणारच नव्हतो मानेसाहेब. शक्यतो देतही नाही पण काय करणार? गावडेसर आमचे जिगर दोस्त. त्यांच्याशी संवाद म्हणजे आम्हाला जगण्याचा एक नवीन दृष्टीकोन मिळतो सदैव. मानसशास्त्रांचा एवढा दांडगा अभ्यास राखणार्‍या गावडेसरासाठी फक्त लिहिले.

In reply to by जव्हेरगंज

अभ्या.. 16/06/2016 - 20:08
आन्ना, पाटलाच्या मनातलं लिव्हलय ओ. बाकी तिला काय किंमत होती ती दोनचार परसंगातच दाखवलीया जणू. पायपुसणीचे मोठमोठाले फोटो घरात लावत नसतेत सगळीकडं. तिचा वावर बघा घरातला आन मग सांगा. . वरलं लिवलेले सगळं पाटलाच्या गोळी घालून घ्यायच्या आदीचंच हाये ओ. नीट वाचा की जरा शेवटच्या ओळी. फरक फक्त तात्या पाटील असल्यानं मारुन मग मरणार इतकंच.

माननीय अभ्याजी, आपले लेखन अवडले. असेच अजुन दोन चार स्वगत आणि संवाद लिहिलेत तर अप्रतिम एकांकिका होवु शकेल :) असेच लिहित रहा. (तुमच्या) फ्यॅन हाय मी ! कळावे लोभ असवा आपला विनम्र मार्कस ऑरेलियस vi veri veniversum vivus vici

सिरुसेरि 16/06/2016 - 17:19
सैराट इफेक्ट अजुन सर्वत्र टिकुन आहे . बहुतेक १०० कोटी पार करणारच . बाहेरही बरेचदा लोकं एकमेकांना सहजच "परश्या , ए परश्या , आरं आर्ची आली आर्ची " , " ए मंग्या हु बाहेर " , "ए अंबादासा" अशा हाका मारताना ऐकु येते .

नीलमोहर 16/06/2016 - 17:20
कशासाठी बाप म्हणायचं याला? फक्त जन्म दिल्याने अन लाड केल्याने बाप होत नाही, ते नातं निभवायला नको शेवटपर्यंत? एवढंच सहन होत नव्हतं तर स्वतःला गोळी घालून घ्यायची होती, मग म्हटलं असतं, "बाप होता तो..."

In reply to by नीलमोहर

अमित भोकरकर 19/06/2016 - 13:15
नात फक्त बापानीच निभवायच. आपली जवाबदारी पार पण पाडायची. आणी मुले चुकली तरी स्वताच गोळी घालुन घ्यायची. आणी पोराना वाटल परत याव तर ते पण त्यांना परत स्विकारायच.

In reply to by अमित भोकरकर

धनावडे 27/06/2016 - 04:55
भोकरकर साहेब खुप गहन प्रश्न आहे हा आणि याच्यावर बऱ्याच सपट महाचर्चा सुद्धा होतात/झाल्यात पण हाती काहीच लागत नाय

नाखु 16/06/2016 - 17:22
७५ पेक्षा जास्त मार्क दिन
पण बाप असला तर पोरीसाठी देणारा पाय्जे पोरीचा जीव घेणारा नको
असं वाटतं खरं पाटलीण बाई (आईची) बाजू पण येऊ द्या की समोर (आप्लया आडून )कसा खेळ केला ते कळू दे जरा पीटातला आणि पट्ट्यातलाही नाखु

धनंजय माने 16/06/2016 - 17:39
असंच काहिसं! पटतंय. जीवं मारणं नसलं पटत तरी थोडंसं पटत राहतं च. कोणी काळं किंवा पांढरं नसतंय. सगळ्या करड्या छटा.

असो, सिनेमा जास्त मनावर घेवू नये. स्वगत : सामना आणि सिंहासन, हे खरे मराठीतील हिरे बाकी सगळेच खडे, असे माझे मत.असो, सिंहासन मधील रावसाहेब टोपल्यांच्या मुलाच्या ऐवजी, रावसाहेब टोपल्यांची मुलगी, इतकाच बदल काढून केलेला सिनेमा म्हणजे "सैराट."

शरभ 16/06/2016 - 18:55
एखादा सिनेमा एखाद्याच्या इतका डोक्यात घुसतो की सर्व विचार त्याच्या भोवताली घुटमळतात. असो. प्रत्येकाचा डोक्यात घुसणारा सिनेमा वेगळा. - श

In reply to by शरभ

अभ्या.. 16/06/2016 - 19:20
हेहेहेहे. अज्याबात नाही हो. मी एकदाच पाहिला चित्रपट. आवडला. बस्स. माझे विचार लिहिण्याविषयी फिरत असतात फक्त. इथे मिपावरच लिहायला सुरुवात केलेली. लिखाणातले जेवढे जमते तेवढे प्रयोग करतोय झालं. लघुकथा लिहून बघितली, विनोदी लिहून बघितली, व्यक्तीचित्रे लिहिली, विडंबन झाले. संवादात्मक कथा लिहिली, थोडे माझ्या व्यवसायातले लिहिले. स्पर्धेमुळे शशक आणि आत्मकथाही लिहिली. बळंच एक चित्रपट परिक्षण पण लिहिले. सहज वाटलं दुसर्‍या एका व्यक्तीच्या मनाचे खेळ कसे मांडू शकतो. विशेषतः ज्याविषयी तो कधी स्वतः बोलायची शक्यता नाही. आपल्यासमोर एक चित्र असते उभे केलेले. एक बाजू त्याची असावी एवढी व्हिज्युलाइज तरी करुन बघावी. दोन फॉर्म लिहिले काल. एक ऑस्कर पिस्टोरिअस आणि एक सैराटचा पाटील. दोघांच्या बी कथा घडल्या, गाजल्या. एकजण खरा एक जण पिच्चरमधला. दोघेही कसे विचार करतील एवढे तरी अनुभवायला मिळणे हाच माझ्या डोक्यात घुसलेला इचार होता. लिहिल्यावर विचार केला पाटील जास्त अपील होइल. दिला टाकून. बस्स्स. बाकी चित्रपटाने येडा होणार्‍यातला मी नाही. (मुविकाकांना पण हेच उत्तर बरं का. काय मुविकाका...सैराट कट्टा करायचा का? ;) )

सुबोध खरे 16/06/2016 - 19:43
बापाची व्यथा चांगली रंगवली आहे. तरीही जीव घेणे पटत नाही. आमच्या माहितीतील एक एम बी बी एस मुलगी पानवाल्या बरोबर पळून गेली. आई बापानी नाव टाकले ते टाकलेच. परत कधीही तिला घरात घेतले नाही. नंतर तिच्या आयुष्याची फार परवड झाली. नंतर नवऱ्याचा इगो पुढे येऊ लागला. जिथे तिथे तिच्या शिक्षणाचा उद्गार करत असे. शेवटी मुलीला घेऊन तिने वेगळे घर केले. एकटीच्या जीवावर नोकरी करून घर चालवते. आयुष्य रखडत खुरडत चालू आहे.

विवेकपटाईत 16/06/2016 - 19:54
कालेजच्या पोट्टे पोट्टीनां सिनेमातला पहिला अर्धा भाग जास्ती आवडला. गाणे आवडले. वर्गात प्रेम करणे, विहिरीत उडी मारणे, इत्यादी. बाकी कहाणी जुनीच आधी मिल मजदूर मुलगा, मालकाची पोट्टी, नंतर गावातला गरीब आणि शहरातील श्रीमंत, आता गावातच एक पाटलाची कन्या आणि मुलगा दलितच. काळानुसार पात्र बदलले पण कहाणी तीच. हिट फार्मुला ...

In reply to by टवाळ कार्टा

हा हा हा का नाही येवु शकत हिटलर चे मनोगत . मी आत्ता पर्यंत मृयुंजय पाहिलंय , दुर्योधनाचे आत्मवृत्ता पाहिले आहे , कैकयीच एपाहिले आहे इतकेच काय तर नुकतेच शुर्पणखेचे मनोवृत्तही मार्केट मध्ये आलेले आहे असे ऐकुन आहे !! योग्य अयोग्य हे सगळे कालसापेक्ष असते , सत्य न्याय्य असे काही नसते टका राव !

In reply to by प्रसाद गोडबोले

मी आत्ता पर्यंत मृयुंजय पाहिलंय
कर्णाला दुष्टांच्या क्याट्यागरित बसवताय?? कोणत्या तर्काने?? जात्यांध लोकांनो निदान आता तरी कर्णाचा रिस्पेक्ट करा रे!!!

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

काय जो शी कसे आहात ? जरा महाभारत वाचा आणि मग बोला कर्णावर . उगाचच दुसर्‍यांच्या धाग्यांवर तुम्ही अवांतर स्कोर सेटलिंग करणार आणि मग तुमचे प्रतिसाद उडणार .... असे उगाचच किती वेळा तोंडावर पडणार तुम्ही?

In reply to by टवाळ कार्टा

त्यो जिवंत असतानाच आले की महाराजा, मनोगत म्हणा वा आत्मचरित्र म्हणा 'माईन काम्फ' उर्फ 'माझा लढा' ह्या नावाने !! गंमत म्हणजे आपल्या देशातली काही माणसे ते चवीचवीने वाचतात सुद्धा!!

In reply to by टवाळ कार्टा

धनंजय माने 17/06/2016 - 13:35
देखो वत्स, प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कृतिमागे काही ना काही कारणमीमांसा असते. ती समजून घेण्याचा विचार करु लागलात तर ती पटायला लागते. कळत नकळत समर्थन देखील होतं. केलं जातं. दृष्टिकोन.नवीन नाही काही!

In reply to by धनंजय माने

नीलमोहर 17/06/2016 - 14:03
जिहादी जॉन वा इसिसच्या कोणत्याही सदस्याकडे त्यांच्या हिंसक, निर्घृण कृत्यांच्या समर्थनार्थ काही कारणमीमांसा असेलच, तीही समजून घेण्याचा विचार केला पाहिजे मग, आणि एकदा समजून घ्यायचे म्हटल्यावर काहीही चालून जाईल, नाही का?

In reply to by नीलमोहर

धनंजय माने 17/06/2016 - 14:22
जरा गोंधळ होतोय का काकी? आय एस पर्यन्त का जाताय? मारण्याचं समर्थन करतंय कोण इथे? आम्ही मानसशास्त्रीय विचार मांडलाय फ़क्त.

In reply to by धनंजय माने

धनंजय माने मानसशास्त्रीय बोलत आहेत:-( आधी माझे तुमच्या इस्त्रायलच्या मित्राने घेतलेले सत्तर रूपये द्या.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

धनंजय माने 17/06/2016 - 15:46
तुम्ही टकले आहात ते आधी सिद्ध करा. तुमचा बंगला अजून शिल्लक आहे का ते सांगा आणि सगळ्यात आधी तुम्ही जिवंत आहात का ते कळवा आणि नंतर...... वाट बघा!

In reply to by धनंजय माने

नीलमोहर 17/06/2016 - 15:27
'प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कृतिमागे काही ना काही कारणमीमांसा असते. ती समजून घेण्याचा विचार करु लागलात तर ती पटायला लागते. कळत नकळत समर्थन देखील होतं. केलं जातं.' - हे तुमचे शब्द, इथे कृती आहे, मुलीला अणि जावयाला संपवणे, त्यानंतर स्वतःला (तेही संदिग्ध आहे). या कृतीमागील कारण समजून घेण्याचा विचार करु लागलात तर ती पटायला लागते. हे समर्थन नाही तर काय म्हणायचं. 'मानसशास्त्रीय विचार मांडलाय फ़क्त' - मीही तेच तर म्हटलेय, कोणाही मारेकर्‍याच्या कृतीमागे काही मानसशास्त्रीय कारण असणार, उगाच थोडी न कोणी कोणाचा जीव घेईल. इथे पाटलाचं म्हणणं आणि कृती त्याच्या दृष्टीने बरोबर, हाच विचार आहे ना.

In reply to by नीलमोहर

धनंजय माने 17/06/2016 - 15:37
अहो पण, एखादी भावनेच्या भरात केली गेलेली कृती आणि well planned brain wash which is seen in these fundamentalists may it be ISIS or any other right extremist organisation like S.P. (नवं नाव जोडलं गेलं आहे) कसं तुलना करणार आहात? काही संबंध आहे का दोन्ही तर्कमध्ये. इथे वैयक्तिक सूड आहे तिकडे वेगळं कारण दिसतंय. हिटलरच्या हातात अमर्याद सत्ता आणि हजारो अनुयायी होते. राजा तारतम्य बाळगनारा नसला की काय होतं त्याचं उदाहरण आहे. अग्नीसाक्षि नावाचा नाना पाटेकर, मनीषा,जॅकी चा चित्रपट होता. (त्या काळात असलेच तीन चार आले होते) नानाच्या भूमिकेचा राग येन्या ऐवजी शेवटी वाईट वाटतं कारण त्याची मानसिकता आपल्याला उलगडत जाते. वाईट ते वाईट च. पण ते 'सुरुवातीला' समजून घेतलं आणि त्याला मुळातनं उखडलं तर काही चांगलं होऊ शकतं एवढंच.

In reply to by नीलमोहर

एखाद्या किलरचे किंवा अपराध्याचे मानसिक विश्लेषण करणे किंवा 'तो त्या क्षणी किंवा तो वादळी क्षण येऊन गेल्यावर काय विचार करत असेल' ह्यावर विचार करून एक काल्पनिक क्रम लिहिणे मला नाही वाटत त्या विचारांचे उदात्तीकरण म्हणवेल, उदाहरणादाखल आपण आपल्याच मिपावर प्रसिद्ध झालेले अन मोसाद फेम बोक्याभाऊ ह्यांनी केलेले मायकल कोनेलीच्या 'द स्केरक्रो'चं भाषांतर/भावंतर पाहू शकू त्यात MIT चा पासआऊट असलेला खुनी का खुनी होतो त्याला असलेल्या आवडीनिवडी का विकसित होतात ह्याची सुद्धा चर्चा आहे , अर्थात त्याला आपण त्या खुन्याचे उदात्तीकरण तर नक्कीच म्हणणार नाही असे वाटते मला

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नीलमोहर 17/06/2016 - 16:00
थोडा गैरसमज होतोय, इथे लेख वा लेखनाबद्दल काही म्हणायचे नाही, पाटलाच्या डोक्यात शिरून तिथे काय विचार चालले असतील ते शोधून काढून हे असे मांडण्याचे अवघड काम अभ्या यांनी केले आहेच. फक्त त्या संदर्भात वरती आलेले हे वाक्य खटकले. 'प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कृतिमागे काही ना काही कारणमीमांसा असते. ती समजून घेण्याचा विचार करु लागलात तर ती पटायला लागते. कळत नकळत समर्थन देखील होतं. केलं जातं.' त्यासाठी माझा वरील प्रतिसाद होता.

In reply to by नीलमोहर

धनंजय माने 17/06/2016 - 16:12
एखादी कृति केली गेली ती का केली गेली हे समजलं की आपला दृष्टिकोन बदलतो. त्याच्या वरती भावनांना किंमत न देता नीति, समाज, कायदा यायाच्या चौकटित काय घडतं किंवा घडायला हवं हे मुद्दे येतात. पाटील अंगावर गुन्हा घ्यायला सिद्ध होतोय कारण त्याला प्रिन्स नंतर काय करणार आहे हे माहिती आहे, आपल्या घराचं काय होणार आहे हे माहिती आहे आणि हे सगळं आपल्याला बघवणार नाही हे ही माहिती आहे. आता गुह्याच्या समर्थनाचा विषय. वैयक्तिक पातलीवर गुन्हा होतो तेव्हा त्या गुह्यामागे तात्कालिक राग किंवा आणखी काही कारणं असतात. बऱ्याच वेळा काही कालानंतर गुन्हे होतात, तेव्हा गुन्हा घडण्यापूर्वी मानसिक पातळीवर तो गुन्हा अनेक वेळा घडून गेलेला असतो. 'मनातल्या मनात'- बॉस ला 100 वेळा दोन दोन लगावुन झालेले असतात. एखाद्याचा खून 5 10 वेळा केलेला असतो.-'मनातल्या मनात' एखादा ते का करतो हे समजलं की त्या बद्दल कदाचित सहानुभूति वाटते, त्याचं समर्थन होतं. यात खटकन्या सारखं काय आहे???

In reply to by सूड

स्रुजा 16/06/2016 - 20:58
+१ , असेच म्हणते. सैराट एकदाचा पाहिला. मला त्याचा शेवट माहिती नव्हता ( बरेच परिक्षणं म्हणुन आधी वाचलीच नाही) , पटला की नाही भाग पुढचा पण कथेच्या ओघात तो आला नाही. कलम लावल्यासारखा वाटला. उत्तरार्धात आर्ची आणि परशाची जगण्याची धडपड, परश्यामधला समजुतदारपणा, असुरक्षितपणा वगैरे जमुन आलंय. आर्चीची अस्वस्थता पण सुरेख जमलीय. पण या सगळ्यात त्यांचा शोध चालू आहे की संपला हे दिसत च नाही. त्यामुळे ४-५ वर्षं सगळं नीट चालू असताना, यांचे पगार वाढलेले असताना अचानक येऊन असं काही तरी हे थोडं उगाचच द्यायचा म्हणुन धक्का दिल्यासारखं वाटलं. शेवटपर्यंत त्यांचा होणारा शोध जर दिसत राहिला असता तर त्याचं सावट आणि रागाची तीव्रता पण कळली असती. थोडा ओव्हर रेटेड वाटला मात्र सिनेमा. असो, या धाग्यावर हे अवांतर च आहे तसं.

भावा ही पोचपावती आमची!पाटील खासा उतरवला आहेस लगा!! लहानपणी झालेला अन्याय मरमर मेहनत करून अंगात कायमस्वरूपी आलेली रग, कर्तृत्वाचा माज बाप म्हणून पोरीला लाडात ठेवणे ते शेवटी पोरगी जिवं मारल्यावर स्वतःचेच मनोगत स्वतःच स्वतःला आरश्यासमोर सांगून खेळ संपवणे ह्याहून चांगला पडदा टाकला गेला नसता रे अभ्या! लैच खास!

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 16/06/2016 - 23:40
बापूसाब, सगळं कसं बेजवार उलगडलं बघा तुम्ही, ते बी इतक्या कमी शब्दात. पावलं भरून. आन किसनराव शिंदे पाटील, धन्यवाद बरका.

चेक आणि मेट 17/06/2016 - 10:44
पटलं, गावखेड्या मध्ये स्वतःचा मान अन् घराण्याची अब्रू फार महत्वाची असते अणि ती जोपण्यासाचा प्रयत्न गावखेड्यातील उच्चभ्रू कुटूंबे करीत असतात,आत्मसन्मान ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असते,एखाद्याची पोरगी पळाली कि गावभर कशी उलटसुलट चर्चा रंगते आणि त्यातून त्या सन्मानणीय व्यक्तीचे कसे हसे होते हे गावखेड्यातले लोकच सांगू शकतील.

rahul ghate 17/06/2016 - 11:54
भारी रंगवलाय पाटील, थोड आधी लिवला असता तर नागराज ने पण शिनेमा चा एंड बदलला असता येवढा जबरी जमलाय झक्कास !

महासंग्राम 17/06/2016 - 15:27
अभ्या पाटील, एका बापाची तगमग मस्त उतरवलीत लेखणीतून सलाम सलाम सलाम. बाकी ते ऑस्कर पिस्टोरियस म्हणालात त्याची लिंक द्या की जरा की जरा.

अशोक पतिल 26/06/2016 - 23:26
अभिजित , काय लिहलेय तुम्ही !!! एखाद्याच्या अंतंरंगात जावुन तन्मय झाल्यावरच असे लिखान जमू शकते. पाटील असला म्हणुन काय झाले. आहे तो शेवटी एक बापच ! त्याच्या काळजाची कालवाकालव अचुक पणे शब्दबध्द केलेय राव !!! सैराट हा चित्रपट यात काही तरी खास आहे. सपुंर्ण महाराष्ट्र भर याने मोहुन टाक्लेय. चित्रपट इतिहासात पुर्वी हे फक्त आणी फक्त शोले च्या बाबतित घडलेय .खुप सिनेमे आले आनी गेले. परंतु मनाच्या इतके पार जानारे हे मोजकेच सिनेमे. एक एक फ्रेम मनामध्ये खोलवर रुतलेली.

अशोक पतिल 27/06/2016 - 18:55
धन्यवाद ! @ खा मु पा. मी फार पुर्वी मिपा नोदंनी केली तेव्हा मराठी टायपिंग माहीत नव्हती. ते नंतर अनुभवाने जमायल लागले.