मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यशस्वी माघार

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
1
. खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे... या गोष्टी मी करते - मला पटत नाहीत तरी त्या क्षणी मनापासून करते. वास्तविक माझ्या घरात एकाही देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. मी नवे घर घेतले तेंव्हा कोणताही मुहूर्त न पाहता माझ्या सोयीने मी येथे राहायला आले. ’वास्तुशांत’ नावाचा प्रकार मी केला नाही, की जाणतेपणाने मी कसली पूजा केली नाही. मग तरीही सार्वजनिक कार्यक्रमांत मी अशा पूजा का करते? कारण बहुसंख्य लोकांच्या भावना अशा कृतींशी जोडल्या गेलेल्या असतात. ’त्या कृती निरर्थक आहेत’ असे म्हटले तर संवाद सुरू होण्यापूर्वीच थांबतो, अशा अनुभवातून पोळले गेल्यानंतर मी ही तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे. ज्या कोणाला लोकांबरोबर काम करायचे आहे, परिवर्तनाचे काम करायचे आहे, त्या व्यक्तीला सतत एका संघर्षाला सामोरे जावे लागते. आपले मत, आपले विचार यांच्याशी बेईमानी न करता, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा बेताने मध्यम मार्ग काढत राहावा लागतो. यातून कदाचित ’व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) अशी एक 'सोयीची' विभागणी अनेक कार्यकर्ते करताना दिसतात. मला अशी विभागणी मान्य नाही. प्रत्येक गोष्ट - अगदी आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते अशी माझी धारणा आहे. आपल्या भावना, आपली मूल्ये, आपले विचार यातूनच आपल्या बाह्य कृतींना वळण आणि दिशा मिळते. पण सार्वजनिक जीवनात देवदेवतांच्या, धार्मिक श्रद्धांच्या बाबतीत ही विभागणी पटत नसली तरीही मी मान्य केली आहे. एका अर्थी समाजाने 'माघार कशी घ्यायची असते’ याबाबत माझे केलेले दीर्घकाळचे हे शिक्षणच आहे म्हणा ना! समाजात वावरताना ’धार्मिकता’ अनेक अंगांनी सामोरी येते. स्त्रिया धार्मिक असतात, पुरूष धार्मिक असतात, लहान मुले-मुलीही धार्मिक असतात. श्रद्धा फक्त गरीब आणि ग्रामीण भागातल्याच लोकांच्या असतात असे नाही. नावाजलेल्या संस्थेत शिकलेल्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या कामात रमणा-या लोकांच्याही श्रद्धा असतात. काही पुराणातील देवांना भजतात तर काही ऐतिहासिक माणसांना देवासमान मानतात. काहींनी माणसांना जिवंतपणीच देवत्व बहाल केलेले असते. प्रत्येकाची देवता वेगळी, प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगळे आणि प्रत्येकाची आपल्याकडून असणारी अपेक्षाही वेगळीच! काहींची धार्मिकता सहिष्णू असते, तर अनेकांची आक्रमक; काहींची सौम्य असते, तर काहींची धगधगती; काहींची भयातून आलेली असते तर काहींची समजण्यातून. शिवाय व्यक्तीची धार्मिकता आणि सामूहिक धार्मिकता यांतही एक सूक्ष्म पण सतत जाणवणारा भेद असतो. जीवनाच्या सर्वांगाला व्यापून असणा-या धार्मिकतेला स्पर्श न करता काम करणे अवघड; आणि तिला छेद देऊन काम करणेही तितकेच अवघड! काही अनुभव मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील एक छोटे गाव. आमचा एक प्रकल्प तेथे चालू होता. परसबाग लागवड हा त्यातील एक उप-कार्यक्रम. घराच्या अंगणात, परसात सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला लावायचा असा हा अगदी साधा आणि छोटा कार्यक्रम. स्त्रियांमधले कुपोषण कमी करण्यासाठी परसबाग उपयोगी पडते असा आजवरचा अनुभव. पण परसबागेचा उपक्रम तेथे काही केल्या नीट चालत नव्हता. फक्त पावसाळ्यात चार महिने परसबाग असायची आणि नंतर ती नाहीशी व्हायची. स्त्रियांच्या एका समूहाबरोबर याच विषयावर बोलायला मी आले होते. ’पावसाळ्यानंतर पाणी नसते आणि म्हणून परसबाग मरते. पिण्याच्या पाण्यासाठीच मग वणवण असते, झाडांना कोण पाणी घालणार?’ असे स्त्रियांचे मत पडले. परसबागेला वेगळे पाणी घालण्याची गरज नाही असे मी त्यांना समजावून सांगत होते. आम्ही बसलो होतो त्या पडवीतून मला समोर एक अर्ध्या भिंतीची मोरी दिसली. 'या मोरीतल्या आंघोळीच्या पाण्यावरही भाज्या वाढतील’ असे मी म्हटल्यावर बैठकीत क्षणभर सन्नाटा पसरला. एक तरूण स्त्री तिचे हसू काबूत राखू शकली नाही, ती खुदकन हसली. अनेकींच्या चेहर-यावर स्मित झळकले. “दीदी हमको बच्चा कम करनेका तरीका बता रही है", असे एकीने मोठयाने म्हटल्यावर त्या सगळ्याजणी खिदळायला लागल्या. माझ्या बोलण्यामुळे नेमका काय विनोद झाला हे मला समजले नव्हते. त्यांच्या शेरेबाजीचा संदर्भ मला कळत नव्हता. “मी काही चुकीचे बोलले का?” या माझ्या प्रश्नावर हसण्याची आणखी एक जोरदार लाट आली. एका प्रौढ स्त्रीने मग मला ओढत एका कोप-यात नेले आणि ती मला रागावून म्हणाली, “औरतोंकी माहवारी के नहाने के पानीपर उगी सब्जिया हमारे मर्द खायेंगे, तो उनकी मर्दानगी कम नही होगी क्या? तुम शहरके लोग कुछ समझते नही हो, और आते हो हमे पढाने के लिये! यहा तुम्हारा यह कार्यक्रम नही होगा, अभी दुसरा कुछ बताना है तो बताओ, नही तो मीटिंग खत्म करके मेरे घर चाय पीने चलो". प्रजननात्मक आरोग्यावर काम केल्याशिवाय परसबाग यशस्वी होणार नाही हा त्या स्त्रियांनी मला शिकवलेला एक धडा! विकास कार्यक्रमाचा जीवनविषयक दृष्टिकोनाशी - त्याला मी अंधश्रद्धा नाही म्हणणार – संलग्न असलेला हा पैलू तोवर माझ्या कधी ध्यानातच आला नव्हता. जे करायचे ते संदर्भ लक्षात घेऊन, लोकांच्या विचारांना सामावून घेऊन करायला शिकणे भागच असते अशा वेळी. कधी कधी मनात असलेले सगळे करायला जमत नाही, याचाही स्वीकार करावा लागतो. खूप वर्षांपूर्वी अरूणाचल प्रदेशात गेले होते. गावात गेले की एखादे घर गाठायचे आणि बैठक मारायची. हळूहळू इतर माणसे जमा होत. पुरूष येत तशा स्त्रियाही येत, मुले मुली तर अगणित जमा होत. माझी भाषा त्यांना कळत नसे आणि त्यांची मला. सहकारी कार्यकर्ता दुभाषाचे काम करे, त्यामुळे संवादाची गती आपोआप कमी राही. मला शांतपणे निरीक्षण करायला भरपूर वेळ मिळत असे. अगदी मजेदार दिवस होते ते. पहिल्या बैठकीत माझ्यासमोर एका पेल्यात पेय आले. माझ्या खाण्यापिण्याच्या फारशा आवडीनिवडी नाहीत. जेथे जाईन तेथले पदार्थ खाऊन बघायचे, त्याबद्दल जरा माहिती घ्यायची अशी माझी साधारण पद्धत. त्यानुसार मी त्या समोर आलेल्या पेयाचे नाव विचारले. त्यावर ’अपांग’ असे उत्तर आले, ज्यातून मला काहीच अर्थबोध झाला नाही. मी ते पेय घेणार तेवढयात माझ्या सहका-याचा चेहरा मला दिसला आणि मी पेला खाली ठेवला. 'कडू काढा वगैरे आहे की काय?’ असे मी त्याला गंमतीने विचारले. तो भयंकर गंभीरपणे मला म्हणाला, “दारू आहे ती". आता नेमके काय करावे हे मला सुचेना. त्या आदिवासींनाही काही सुचेना. जमलेल्या सगळ्यांचे डोळे एका वृद्ध माणसाकडे वळले. वातावरणातील ताण हलका करण्यासाठी मी 'अपांग कशी करतात?’ असा प्रश्न विचारला, त्यावर एका युवकाने मला उत्साहाने दहा मिनिटे माहिती दिली. मी मग त्यांना शांतपणे म्हटले, “अपांग घ्यायला आवडली असती मला, पण आज ती मी नाही घेतली तर चालेल का तुम्हाला?” तो वृद्ध गृहस्थ त्याच्या भरदार आवाजात म्हणाला, “ ती दारू आहे म्हणून तू ती घेणार नाहीस हे माझ्या लक्षात आले आहे. पण तुला एक घोट तरी घ्यावाच लागेल. आलेल्या पाहुण्याला अपांग नाही पाजली तर आमचे पूर्वज कोपतील आणि आमच्या गावावर संकटे कोसळतील.” मी बराच वेळ त्याच्याशी बोलत होते. पण त्याने अखेर निर्वाणीचा इशारा दिला, “ तुला जसा तुझा धर्म आहे, तशी आम्हालाही आमची परंपरा आहे. आमच्या गावात तुला आमची परंपरा पाळावी लागेल. ही परंपरा न पाळण्याने तुझे काही नुकसान नाही होणार, पण आमचे होईल. यासाठीच तू आमच्याकडे आलीस का?” दुस-या बाजूने मी अपांगला स्पर्शही करू नये असा माझ्या सहका-याचा आग्रह. अपांगचा एक घोट घेऊन मी त्या समुहाच्या भावनेचा मान राखला खरा....पण त्या बदल्यात मी माझे अनेक सहकारी गमावले. काही राखायचं तर काही गमवावं लागतं --- हा मला मिळालेला आणखी एक धडा. भारतीय रेल्वेची मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे गाडयांची नावे. पुष्पक, ज्ञानगंगा, झेलम, इंद्रायणी, राप्ती सागर ….अशा नावांच्या गाडयांतून प्रवास करताना जणू तो इतिहास आणि भूगोल आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. जम्मू ते कन्याकुमारी या गाडीचेही 'हिमसागर एक्स्प्रेस’ असे अत्यंत समर्पक नाव आहे. कार्यकर्त्यांच्या एका समूहात या गाडीला ’विवेकानंद एक्स्प्रेस’ असे नाव देण्याबाबत, तसा विनंतीअर्ज रेल्वेकडे पाठवण्याबाबत अत्यंत गंभीरपणे चर्चा चालू होती. मी ’हिमसागर’ हे नाव कसे अधिक चांगले आहे, व्यक्तीचे नाव गाडयांना न देण्याची रेल्वेची भूमिका कशी योग्य आहे, विवेकांनंदाचे मोठेपण असल्या भौतिक गोष्टींवरून ठरत नाही ….असे अनेक मुद्दे मांडले. पण मला आठवते तसे त्याही चर्चेची सांगता 'हिला विवेकानंदबद्दल काही आदर नाही’ अशीच झाली होती. तुमच्या श्रद्धा तुम्हाला बाजारात विकता आल्या तरच तुम्ही त्या विचारांचे खरे पाईक असता, हे मार्केटिंगचे तत्त्वज्ञान आजही मला समजत नाही, पण ते तसे आहे खरे! काल्पनिक देवता एक वेळ परवडल्या, पण माणसांना देवाचे स्थान दिले की बुद्धी गहाण ठेवणॆ अपरिहार्य बनते, हे न पचणारे सत्यही या प्रसंगाने मला दिले. कर्नाटकमध्ये बचत गटाची बैठक एका देवळात ठेवली म्हणून गटाची अध्यक्षच बैठकीला येऊ शकली नाही - कारण त्यावेळी तिची मासिक पाळी चालू होती. राजस्थानमधील एका छोटया गावातील प्रशिक्षणात 'मुलगा व्हावा’ म्हणून उपवास करणारी सहा महिन्यांची गर्भवती, सातपुडयच्या अक्राणी परिसरात अश्वत्थामा दिसल्याचे सांगणारा आदिवासी म्हातारा, बाळाला लस टोचली तर देवतेचा कोप होईल म्हणून घरात लपून राहणारे आदिवासी....असे कितीतरी प्रसंग आठवतात. या सगळ्यातून वाट काढत चालायचे तर दमछाकही होते. सकारात्मक बाजू पण देवदेवतांवरील लोकांच्या श्रद्धेबाबत केवळ एवढेच लिहिणे एकांगी होईल. कोणाला पटो अथवा ना पटो, पण या सगळ्याला एक सकारात्मक बाजू आहे. भले ती विचारांनी स्वीकारलेली जीवनशैली असेल किंवा नसेल, पण याच श्रद्धेतून समाजात काही चांगले बदलही होताना दिसतात. उदाहरणार्थ, शहरांत दारू पिण्याला प्रतिष्ठा मिळताना दिसते आहे. पूर्वी गावाच्या वेशीवर मंदिर असायचे; आता कोणत्याही गावात प्रवेश करताना दारूचे दुकान दिसते - अगदी सरकारमान्य दुकान! अशा परिस्थितीत एखादा आदिवासी पाडा जेंव्हा "आमच्या गावात दारू अजिबात नाही बरं ताई, आम्ही माळकरी आहोत" असे अभिमानाने सांगतो, तेंव्हा दूरच्या त्या विठोबाला 'अशीच कृपा राहू दे बाबा यांच्यावर’ अशी प्रार्थना मनात आपोआप उमटते.. घर सोडून दहा मैलांच्या पलिकडे न गेलेल्या स्त्रियांच्या समुहात जेंव्हा कोणीतरी ’त्रिंबकपर्यंत’ किंवा ’प्रयागपर्यंत’ जाऊन आल्याचे कौतुकाने सांगते तेंव्हा कुंभमेळ्याचा सामाजिक पैलूही समोर येतो. पूर्वजांची पूजा करणारे, त्यांच्या अधिभौतिक शक्तींवर विश्वास ठेवणारे लोक नकळत समाजाचा इतिहास जपत असतात. देवाच्या आवारातली झाडे तोडायची नाहीत, अशा पारंपरिक नियमातून मोजक्याच ठिकाणी का होईना ’देवराई’ आत्ताआत्तापर्यंत जगली आहे. विशेषतः हिंदू धर्मातले बरेच सण निसर्गाची जाणीव करून देणारे आहेत. - त्यामुळे झाडे, डोंगर, नद्या, पशु, पक्षी.. … अशा निसर्गातल्या अन्य घटकांशी माणसांचे नाते जुळलेले आहे. प्रवासात वाटेत दिसणा-या नदीत पैसे टाकण्याची लोकांची लगबग मजेदार वाटली तरी एखाद्याच्या मनात ते करताना सर्वस्व अर्पण करण्याची भावना असू शकते हेही लक्षात घ्यावे लागते. समाजातील सगळी माणसे ज्ञानाच्या अथवा जाणीवेच्या एका पातळीवर एका वेळी पोचतील, असतील असे कदाचित कधीही घडणार नाही. हा प्रत्येकाचा एक स्वतंत्र प्रवास आहे. पण रस्ता परंपरेने, अनुभवाने आखलेला आहे, म्हणून वरवर पाहता, सगळ्यांचा प्रवास सारख्याच गतीने आणि एकाच दिशेने चालला आहे असे वाटते. पण तसे नसते. देवदेवतांच्या या सकारात्मक बाजूच्या मोहात पडून याच मार्गाने समाजपरिवर्तनाचे काम करावे असे काहींना वाटते. पण यातून समाज बदलण्याऐवजी बहुसंख्यांच्या दबावाला बळी पडून आपणच बदलण्याचा धोका असतो. दुस-यांच्या भावनांचा आदर करता करता आपण स्वत:च्या भावना आणि विचारांना कमी तर लेखत नाही ना, हेही सतत तपासून पाहावे लागते. ध्येय साधण्यात अडसर ठरत नाही तेंव्हा माघारही यशस्वी ठरते – अशी आपली मी माझ्या मनाची वेळोवेळी समजूत घालत असते! (अन्यत्र पूर्वप्रकाशित)

वाचने 35757 वाचनखूण प्रतिक्रिया 164

नगरीनिरंजन 11/05/2016 - 08:57
लेख आवडला. आयुष्यात पदोपदी आपण गेम थिअरीचं प्रॅक्टिकल करत असतो. डोंगर चढायचे अनेक मार्ग असतात आणि त्यातला एखादा दरीत उतरुन जात असू शकतो. बहुतेक वेळा ज्याला काहीतरी दूरचं करायचं आहे तो अमुक एक गोष्टच का करु? किंवा अमुक एक मीच का करु? असा अडेलतट्टूपणा करताना दिसत नाही. शिवाय अंधश्रद्धा किंवा मूर्खपणावर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही. त्याची लागण आपल्यालाही झालेली नाही ना ह्याची सतत तपासणी करत राहावे लागते. त्यामुळे "एम्पथी" निर्माण होते आणि ती फार महत्त्वाची. तुमच्या लेखातून मला ती एम्पथी दिसते. बाकी, दारु वाईट असते म्हणून एकही घोट अजिबात कधीच कशासाठीही प्यायचाच नाही अशी कट्टर भूमिका घेणार्‍या सुशिक्षित माणसांपेक्षा बर्‍याचदा अडाणी अंधश्रद्धाळू माणसे जास्त सुसह्य असतात.
हा लेख वाचल्यावर प्रस्तुत लेखिकेचा अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकाच परखड परीक्षण करणारा त्यांच्या ब्लॉग वरील हा लेख आठवला. त्यातील काही विधाने चिंतनीय आहेत. उदा. गोडबोले बोर्डात आले; गोडबोले आयआयटीत होते; गोडबोले संगीतप्रेमी आहेत, गोडबोलेनी शहाद्यात आदिवासी लोकांसाठी एक वर्ष काम केलं; इन्फोटेकमध्ये गोडबोले यांचं नाव आहे; गोडबोले ब-याच नामांकिंत पुस्तकाचे लेखक आहेत – हे सगळं लक्षात घेता या पुस्तकाने घोर निराशा केली. स्वत:च्या आयुष्यातल्या घटना सांगताना उगाच सिद्धांत मांडत बसायची लेखकाची हौस काही काळाने कंटाळवाणी होत जाते. उदाहरणार्थ गोडबोले दहा दिवस धुळ्याच्या तुरुंगात राहिले (आदिवासी चळवळीत गोडबोले सक्रीय होते). आता शहरातला मध्यमवर्गीय मुलगा, आयआयटीचा पदवीधारक पहिल्यांदा तुरुंगाचा अनुभव घेताना त्याची मन:स्थिती कशी असेल? (या अनुभवानंतर ते काम सोडून मुंबईत परतले.) गोडबोले मात्र आपण जणू काही अध्ययनासाठी तुरुंगात गेलो होतो अशा थाटात त्याबद्दल बावीस पानं मजकूर लिहितात. तिथं उगाच क्वालीन विल्सन, विजय तेंडुलकर, जिअम जेन .. अशी नावं. माहितीचा भडीमार करण्याचा गोडबोलेंचा सोस हास्यास्पद होऊन जातो. वरील दोन्ही ठळक केलेली विधाने प्रस्तुत लेखीकेने चिमट्यात पकडलेली गोडबोलेंची अपात्रता दांभिकता नाटकीपणा अहंगंड अचुक दर्शवितात. याशिवाय वरील लेखातही अनेक मार्मिक विचार लेखीकेने मांडलेले आहेत. त्यांनी समाजासाठी अपांग प्राशन करुन जो त्याग केला आहे त्याच मोल होऊ शकत नाही. हे हलाहल पचवण सोप नाही. उदा वरील लेखातील ही वाक्ये १- खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. २-वास्तविक माझ्या घरात एकाही देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. मी नवे घर घेतले तेंव्हा कोणताही मुहूर्त न पाहता माझ्या सोयीने मी येथे राहायला आले. ’वास्तुशांत’ नावाचा प्रकार मी केला नाही, की जाणतेपणाने मी कसली पूजा केली नाही. मग तरीही सार्वजनिक कार्यक्रमांत मी अशा पूजा का करते? ३-ज्या कोणाला लोकांबरोबर काम करायचे आहे, परिवर्तनाचे काम करायचे आहे, त्या व्यक्तीला सतत एका संघर्षाला सामोरे जावे लागते. आपले मत, आपले विचार यांच्याशी बेईमानी न करता, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा बेताने मध्यम मार्ग काढत राहावा लागतो. प्रस्तुत लेखीकेची ही चिंतनशील स्वानुभवातुन आलेली वाक्ये समाजासाठी मोलाचा ठेवा आहे. या लेखातुन त्यांचा संघर्ष तात्विक तडजोडीतुन येणारी तगमग तरलतेने मांडलेली आहे. त्यांनी स्वतःला विचारलेले मार्मिक प्रश्न हे स्वगत शेक्सपीअर्स च्या नायकाच्या टु बी ऑर नॉट टु बी सारख वैश्विक आहे. त्याला दिलेली उत्तरे जनतेस दिशादर्शकच आहेत गोडबोले व अतिवास दोघांचाही मी डायहार्ड फॅन आहे. दोन्ही माझ्या साठी अनटचेबल आहेत.

In reply to by मारवा

प्रसिद्ध संगीतकार अनिल बिश्वास मोहम्मद रफींना ' आवाज नसलेला गायक ' म्हणाले होते. अनिल बिश्वास ग्रेट, रफीही ग्रेट. अशा वेळी ' जाऊ दे. प्रत्येकाचं मत ' असं म्हणावं आणि पुढे जावं.

In reply to by मारवा

विवेक ठाकूर 11/05/2016 - 11:32
वरील दोन्ही ठळक केलेली विधाने प्रस्तुत लेखीकेने चिमट्यात पकडलेली गोडबोलेंची अपात्रता दांभिकता नाटकीपणा अहंगंड अचुक दर्शवितात. याला म्हणतात ज्याच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात ! त्यांनी समाजासाठी अपांग प्राशन करुन जो त्याग केला आहे त्याच मोल होऊ शकत नाही. हे हलाहल पचवण सोप नाही सॉल्लीड ! प्रस्तुत लेखीकेची ही चिंतनशील स्वानुभवातुन आलेली वाक्ये समाजासाठी मोलाचा ठेवा आहे. या लेखातुन त्यांचा संघर्ष तात्विक तडजोडीतुन येणारी तगमग तरलतेने मांडलेली आहे. त्यांनी स्वतःला विचारलेले मार्मिक प्रश्न हे स्वगत शेक्सपीअर्स च्या नायकाच्या टु बी ऑर नॉट टु बी सारख वैश्विक आहे. हा शेवट तर खासच!

In reply to by विवेक ठाकूर

आणि प्रशंसकांनी उगीच झक मारली हे उमजून.... `यशस्वी माघार' घेतलेली दिसते!

In reply to by विवेक ठाकूर

कीव आलेली असेल. राग, तिरस्कार यापेक्षा कीव हा फार मोठा अपमान आहे. अर्थात ज्याला मान असतो, त्याचाच अपमान होतो म्हणा.

In reply to by मारवा

वैभव जाधव 11/05/2016 - 12:26
जेवढं दाखवलं जात आहे तेवढं पहावं असा लेखिकेचा जनरल उदात्त दृष्टीकोन असावा. बाकी अनटचेबल असल्यास इथे लिहिण्याचे प्रयोजन देखील समजले नाही.

In reply to by वैभव जाधव

विवेक ठाकूर 11/05/2016 - 13:29
जेवढं दाखवलं जात आहे तेवढं पहावं असा लेखिकेचा जनरल उदात्त दृष्टीकोन असावा. म्हणजे गोडबोल्यांबद्दल बाई जे लिहीतात ते त्यांच्याच लेखनाला लागू होतं पण तसं म्हणायची चोरी! आणि यांच्या कर्तबगारीपुढे गोडबोले म्हणजे किस झाडकी पत्ती . कारण लोखाला इथल्या विव्दानांनी दाद दिलीये ना .

In reply to by मारवा

आबा 11/05/2016 - 13:27
"अपांग प्यावी की न प्यावी?" हा मुख्य प्रश्न नाही अपांग न घेऊन ज्यांच्यासाठी काम करतो; त्या आदीवासींना दुखावावं? की अपांग घेऊन ज्यांच्यासोबत काम करतो; त्या सहकार्यांना दुखावावं? हा मुख्य प्रश्न आहे... जो ऊत्तर घ्यायला अवघड आहे

अनुप ढेरे 11/05/2016 - 12:19
लेख खूप आवडला. आपणच आपणावर घालून घेतलेली तत्व/बंधनं स्थलकाल सापेक्ष असतात आणि यात बदल झाल्यावर बर्‍याचदा बिनकामाची असतात असं तुमच्या अनुभवांतून दिसलं. आपल्या प्रायॉरिटी काय आहेत याची क्लॅरिटी असली की झालं 'सर्वज्ञ' माण(सा)सांकडे दुर्लक्ष करून लिहीत रहा!

पैसा 11/05/2016 - 12:25
उत्तम लेख. तुमचे छोटे मोठे अनुभव वाचकापर्यंत जसेच्या तसे पोचवायची तुमची शैली मला खूप आवडते. अगदी खरेखुरे, जिवंत आणि स्वतः:शी प्रामाणिक राहून केलेले लिखाण फार कमी वाचायला मिळते. वाचणारा सहज त्यात आपला आरसा पाहू शकतो. आयुष्य हीच एक लढाई असते तेव्हा प्रत्येक पाऊल हा एखादा छोटासा विजय पराजय किंवा अशी माघार असू शकते. त्यातही काही चांगले शोधण्याची तुमची वृत्तीही मला आवडते. दुसऱ्याचा इतका साधा सरळ अनुभव पचवणेही सगळ्यांना जमते असे नाही. धाग्याला दृष्ट लागू नये म्हणून काळी तीट लावणाऱ्याना शतशः धन्यवाद! त्यांच्यामुळे आतिवास यांच्या धाग्यावर इतर लोकांनी आळस झटकून लिखाण आवडल्याचे प्रतिसाद आवर्जून दिले!

पिलीयन रायडर 11/05/2016 - 12:25
ताई.. तुम्ही फार सुरेख लिहीले आहे. तुमचा मुद्दा पटला. जेव्हा एवढे मोठे सामाजिक कार्य हाती घेतलेले असताना लोकांना दुखवुन, त्यांना दुर सारुन त्यांचा सहभाग मिळवता येत नाही. आपले तत्व जपणे हा उद्देश नसुन समोरच्यांच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करणे हे जास्त महत्वाचे असते. अशा वेळेस आपण आपल्या तत्वांना मुरड घालणे हेच जास्त संयुक्तिक. इथे ह्या धाग्यावर आपण कोणतेही स्पष्टीकरण देण्यासही वेळ दवडला नाहीत याचे कौतुक वाटले. इथे शहाजोगपणे लोकांच्या अकला काढण्या पलीकडे काहीही कर्तुत्व नसताना, आपल्या सारख्या अनुभवी व्यक्तिंवर असे आरोप केले जातात ह्याचा खेद वाटला.

In reply to by पिलीयन रायडर

बाळ सप्रे 11/05/2016 - 12:44
इथे ह्या धाग्यावर आपण कोणतेही स्पष्टीकरण देण्यासही वेळ दवडला नाहीत याचे कौतुक वाटले
+१००००००००

In reply to by पिलीयन रायडर

तर्राट जोकर 11/05/2016 - 12:50
लाखो वेळा सहमत. फालतू कर्तृत्वहिन लोकांच्या फालतू 'पिंकटाकू-मजाबघू' प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करणेच आवडले.

आतिवास 11/05/2016 - 13:02
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. नावानिशी आभार मानत नाही, त्यासाठी क्षमस्व :-)

मधुरा देशपांडे 11/05/2016 - 14:00
लेख खूप आवडला. कुठेही उपदेशाचे डोस न पाजता, हेच बरोबर, तेच चूक अशी कुठलिही भाषा न वापरता, अतिशय संयत शब्दात मांडलेले तुमचे अनुभव खूप काही शिकवून जातात. धन्यवाद.
अपांगचा एक घोट घेऊन मी त्या समुहाच्या भावनेचा मान राखला खरा....पण त्या बदल्यात मी माझे अनेक सहकारी गमावले.
एवढ्याने सहकारी गमावले? आँ? दुर्दैवीच. बाकी अपांग प्यायला त्या गावांत जाणे आले. प्रथा वगैरे म्हणून नेहमी पाहुण्यांना दिली जात असेल तर निवृत्तीनंतर तिथेच स्थायिक व्हायला हरकत नसावी. ह.घेणे. लेख चांगला आहे. फक्त सुरुवातीला थोडीश्शी जर्राशी "माझ्या झ्युरिचहून आणलेल्या दोन हजार युरोच्या स्पेशल एडिशन स्विस घड्याळात दोन वाजले होते" (मुख्यतः किती वाजले एवढाच मुद्दा असताना) सदृश शैली जाणवते पण तेवढं सगळ्यांचं नॅचरलही एक्स्प्रेशन असतंच. शेवटचा भाग जास्त आवडला. अनुभवकथन खासच.

In reply to by गवि

बाळ सप्रे 12/05/2016 - 11:00
फक्त सुरुवातीला थोडीश्शी जर्राशी "माझ्या झ्युरिचहून आणलेल्या दोन हजार युरोच्या स्पेशल एडिशन स्विस घड्याळात दोन वाजले होते" (मुख्यतः किती वाजले एवढाच मुद्दा असताना) सदृश शैली जाणवते
असं खरच नाही जाणवलं लेखात.. आणि माघार म्हणताना कुठुन माघार ते समजण्यासाठी स्वतःची वेगळी वैचारीक बैठक सांगणे आवश्यकच आहे.

In reply to by गवि

बेकार तरुण 12/05/2016 - 12:05
शांत पणे दुसर्‍याचे म्हणणे ऐकुन घ्यायची तयारी दाखवली तर (आणी आपल्या स्वरचित मीच एकला भारी स्वप्नातुन बाहेर आलं तर) त्याच म्हणणहि पटु शकत कधी कधी, आणी अतिशय प्रामाणिकपणे ते कबुलहि केलत तुम्ही !! अतिशय (मिपावर) दुर्मिळ होत चाललेले गुण तुमच्यात आहे गवि साहेब म्हणुनच आम्ही तुमचे पंखे आहोत

In reply to by गवि

गामा पैलवान 12/05/2016 - 18:09
गवि,
>> "माझ्या झ्युरिचहून आणलेल्या दोन हजार युरोच्या स्पेशल एडिशन स्विस घड्याळात दोन वाजले होते"
अहो, इथेच तर इंडिया मार खाते ना! स्वित्झर्लंडमध्ये आजूनतरी स्विस फ्रँकच चालतात. ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गवि 14/05/2016 - 18:06
नक्की? अगदीच येडे नाय हो आम्ही. अनेक गाफील क्षणी चक्क आम्हालाही व्हिसे दिलेत शेंगेनवाल्यांनी. परतीचे सुट्टे पैसे युरोत मिळत नाहीत फ्रँकांत मिळतात इतपतच मान्य.

In reply to by गवि

नंदन 15/05/2016 - 14:33
>>> परतीचे सुट्टे पैसे युरोत मिळत नाहीत फ्रँकांत मिळतात इतपतच मान्य. --- चेंज अवघड आहे हो! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

होय हो काका. माहीतीये. अगदी बरोबर आहे. स्विस फ्रँक हेच अधिकृत चलन आहे. पण युरो पूर्णपणे आणि सर्वार्थाने चालतो हे मी खास सांगावं लागेल असं वाटलं नव्हतं. युरोपच्या अन्य देशांत पर्यटन, कामं वगैरे करुन झ्युरिवरुन परतणारे लोक्स अत्यंत सहजतेने युरोत शॉपिंग करतात. सर्व मुख्य शॉपिंग प्लेसेसना युरो आणि स्विस फ्रँक अशा दोन्ही चलनांत किंमती डकवलेल्या असतात. किमान तीनचार दिवस स्वित्झर्लंडच्या हद्दीत मुक्काम असेल तरच लोक फ्रँक्स सोबत घेतात. अन्यथा युरोतच खरेदी चालते. अर्थातच याचा स्वित्झर्लंडच्या अधिकृत चलन फ्रॅन्क असण्याशी संबंध नाही. प्रत्येक फेरीत (एक वगळता) खुद्द अस्मादिकांनीही युरोतच खरेदी केली आहे. अगदी र्हाईन फॉल्सच्या वडापावापासून झ्युरिकच्या चाकलेटांपर्यंत युरोच वापरलेत. युरोची नाणी न स्वीकारणे आणि परतीचे सुट्टे युरोत न देणे इतकीच मर्यादा आहे. हे अर्थात तुमच्यासारखा फ्रीक्वेंट ट्रॅव्हलर मजहून जास्त जाणून असेल. मुळात मी युरोप, युरोपियन युनियन, शेंगेन इ.इ.चं जनरल नॉलेज म्हणून म्हटलंच नव्हतं. जे साहजिक आणि खरोखर दिसतं तेच उदाहरण दिलं होतं. युरोच्या जागी फ्रँक शब्द वापरुया. सिंपल.

In reply to by गवि

गामा पैलवान 15/05/2016 - 18:29
गवि, >> मुळात मी युरोप, युरोपियन युनियन, शेंगेन इ.इ.चं जनरल नॉलेज म्हणून म्हटलंच नव्हतं. हाहाहा! इथेच तर मार खाते ना इंडिया. खिशात युरो आहेत तर मग प्यारीसला जायचं ना घड्याळ खरेदी करायला! तिथेपण स्विस घड्याळं मिळतात की! ;-D आ.न., -गा.पै.

सतिश गावडे 12/05/2016 - 00:47
लेख आवडला. खुपच सुंदर लिहीलं आहे.
समाजातील सगळी माणसे ज्ञानाच्या अथवा जाणीवेच्या एका पातळीवर एका वेळी पोचतील, असतील असे कदाचित कधीही घडणार नाही. हा प्रत्येकाचा एक स्वतंत्र प्रवास आहे. पण रस्ता परंपरेने, अनुभवाने आखलेला आहे, म्हणून वरवर पाहता, सगळ्यांचा प्रवास सारख्याच गतीने आणि एकाच दिशेने चालला आहे असे वाटते. पण तसे नसते.
अप्रतिम !!! काही प्रतिसादकांनी लिहील्याप्रमाणे लेखाला थोडी आत्मस्तुतीची झालर जाणवते. मात्र तेव्हढा स्वतःबद्दल अभिमान असायलाच हवा. हा अभिमानच काहीतरी भव्य दिव्य करायला माणसाला प्रवृत्त करतो.

In reply to by सतिश गावडे

शाम भागवत 12/05/2016 - 10:03
हा अभिमानच काहीतरी भव्य दिव्य करायला माणसाला प्रवृत्त करतो.
तसेच आपण निवडलेल्या रस्त्यावरून आपली वाटचाल पुढेही चालू ठेवतो.

In reply to by सतिश गावडे

पैसा 12/05/2016 - 10:07
आत्मस्तुती वाटत नाही. आपण अमूक एका परिस्थितीत असे का वागलो आणि आपल्याला त्यात काय वेगळे वाटले हे सांगण्यासाठी ती पार्श्वभूमी आवश्यक होती असे मला वाटते. आतिवास ताईंना आत्मस्तुती करायची असती तर इतर अनेक धाग्यांवर याहून जास्त स्कोप होता आणि ते तिथे कोणाला आत्मस्तुतीपर आहे असेही वाटले नसते. प्रयोग म्हणून पहिला भाग वगळून उरलेला धागा वाचून बघा. अपूर्ण वाटेल.

In reply to by पैसा

सतिश गावडे 12/05/2016 - 11:06
आपण अमूक एका परिस्थितीत असे का वागलो आणि आपल्याला त्यात काय वेगळे वाटले हे सांगण्यासाठी ती पार्श्वभूमी आवश्यक होती असे मला वाटते.
धिस मेक्स सेन्स.

माहितगार 12/05/2016 - 12:44
धागा लेख आवडला का ? उत्तर होय असेच आहे. अर्थात काही बाजू निसटताहेत का काय अशी जराशी साशंकता शिल्लक राहिली असे वाटते. त्यातील व्यक्तिगतता आणि व्यावसायिकता यांचे नाते हा स्वतंत्र मोठा विषय असल्यामुळे वेगळा धागा काढला. दुसरी गोष्ट धर्म आणि संस्कृती यांची गल्लत केवळ आस्तीकच करतात असे नाही नास्तीकही करु शकतात, अंधश्रद्धा दूरकरणे आणि सांस्कृतीक दमन करणे यात फरक असावा, केवळ माझी संस्कृती बरोबर अथवा श्रेष्ठ आणि समोरच्यांची संस्कृती चूक हा अट्टाहास मनाच्या पाठीमागे नसेल तर दुसर्‍यांची संस्कृती समजून घेणे सोपे जाते-या बाबतीत लेखिकेची भूमिका समंजस दिसते-, द्विधा मनस्थिती होण्याची शक्यता कमी होण्यास अधिक वाव असावा.
तुमच्या श्रद्धा तुम्हाला बाजारात विकता आल्या तरच तुम्ही त्या विचारांचे खरे पाईक असता, हे मार्केटिंगचे तत्त्वज्ञान आजही मला समजत नाही
अ‍ॅडव्होकसी (अ‍ॅडव्होकेट लोकांची!) असो वा मार्केटींग असो दिलेल्या अथवा घेतलेल्या व्यावसायिक जबाबदार्‍या ज्याच्या त्याला पारपाडावयाच्या असतात यात त्या विचारांशी पाईक असले पाहीजे असे नसावे. सोशल अ‍ॅड्व्होकसी करणार्‍यांचे मार्केटींगला नावे ठेवण्याच्या नादात सेल्स-मार्केटींगच्या उजव्या बाजू खासकरुन कौशल्य आत्मसात करण्याचे राहून जात असेल का अशी बर्‍याचदा शंका वाटते. साधारणपणे वेल ट्रेण्ड मार्केटींगचा माणूस विचारांशी पाईक होण्याची काळजी न करता श्रद्धा विकूनही देईल तसे विश्वास श्रद्धा यातले फरक समजून घेत विश्वास श्रद्धा सामाजिक चाली रिती सोशल अ‍ॅडव्होकसी वाल्यांपेक्षा यशस्वीपणे बदलूनही देईल. भारतीय आहारात चहाची सवय लावणे ते पाणि विकणे विकत घेऊन पिणे या सवयी सेल्स, बिझनेस डेव्हेलेपमेंट, मार्केटींग च्या लोकांनी अधिक यशस्वीपणे बदललेल्या दिसून येतात. यात समोरच्या व्यक्तिला/ समुहाला चूक न म्हणता ऑब्जेक्शन हँडलींग शंका निरसन पण त्याही आधी आपण ज्या व्यक्ति अथवा समुहाला भेटणार आहोत त्यांचा पुर्वाभ्यास स्ट्रॅटेजी मेकींग यातही सेल्स, बिझनेस डेव्हेलेपमेंट, मार्केटींग ची ट्रेण्ड मंडळी बर्‍यापैकी पुढे असतात त्या स्टेप्स घेण्यासाठी अ‍ॅडव्होकसीचीं मंडळी जरा अधिक वेळ घेतात. बाकी व्यक्तिपेक्षा समुहाला एकत्रित एकाच वेळी संबोधन करुन आपला विचार विकणे सेल मार्केटींग ते अ‍ॅडव्होकसी दोघांनाही तेवढेच कठीण असते, फरक अ‍ॅप्रोच मध्ये पडत असावा.
..काल्पनिक देवता एक वेळ परवडल्या, पण माणसांना देवाचे स्थान दिले की बुद्धी गहाण ठेवणॆ अपरिहार्य बनते, हे न पचणारे सत्यही या प्रसंगाने मला दिले.
अंशतः सहमत, व्यक्ती प्रामाण्य प्रेरणेपर्यंत ठिक पुढे ते त्यांच्या पुस्तकाचे प्रामाण्य त्यांच्या शब्दांचे प्रामाण्य हे अधिक त्रासदायक या पेक्षा त्यांचे नवसाला पावणारी देवता करुन दैवत प्रामाण्य बरे पडते नवस पुजा प्रसाद दाखवून आपण आपले काळासोबत बदलण्यासाठी मोकळे होतो काय म्हणता ? :)

पिलीयन रायडर 12/05/2016 - 13:32
देवदेवतांच्या या सकारात्मक बाजूच्या मोहात पडून याच मार्गाने समाजपरिवर्तनाचे काम करावे असे काहींना वाटते. पण यातून समाज बदलण्याऐवजी बहुसंख्यांच्या दबावाला बळी पडून आपणच बदलण्याचा धोका असतो. दुस-यांच्या भावनांचा आदर करता करता आपण स्वत:च्या भावना आणि विचारांना कमी तर लेखत नाही ना, हेही सतत तपासून पाहावे लागते. ध्येय साधण्यात अडसर ठरत नाही तेंव्हा माघारही यशस्वी ठरते – अशी आपली मी माझ्या मनाची वेळोवेळी समजूत घालत असते!
इतकं स्पष्ट लिहीलेलं असतानाही का एवढा गदारोळ व्हावा? ताईंनी एक काम हाती घेतलेले आहे. नोकरी की स्वांतसुखाय? पैसे मिळतात की नाही? वगैरे प्रश्नांचा इथे का उहापोह व्हावा? सर्वसाधारण समाजात लोक आपल्यापुरता विचार करुन आपल्या पुरते जगतात. भले ताई मानधन घेऊन अथवा सरकारतर्फे त्यांच्या नोकरीचा भाग म्हणुन हे काम करत असतील, पण म्हणुन त्याने कामाचे स्वरुप आणि परिणाम बदलतो का? त्यांचा संघर्ष बदलतो का? त्यांचे अनुभव बदलतात का? माणुस अनुभवातुन शिकत जातो.. मत बनवत जातो. समोर एखादा प्रसंग आला तर त्याला जे त्यावेळी योग्य वाटतं ते तो करत जातो. ताईंसमोर जे प्रसंग आले ते त्यांनी जे योग्य वाटेल त्या हिशोबाने हाताळले. त्या फक्त अनुभव आणि त्यामगची विचारप्रक्रिया मांडत आहेत. बहुसंख्य वाचकांना त्यात आत्मस्तुती वगैरेही दिसली नाही. आपण घेतलेल्या निर्णयांचे चांगले वाईट दोन्ही परिणाम त्या जाणुन आहेत. अशी तडजोड केल्याने होणारे तोटेही त्यांनी मांडले आहेत. आपण जे करतो, ते आणि तेच सर्वोत्तम असाही काही त्यांचा दावा नाही. आपण जे करतोय ते शेवटी ध्येयापर्यंत पोहोचायलाच आहे. तत्वांना घातलेली मुरड ही जर त्या ध्येयापर्यंत पोहचायला मदत करणार असेल तर ती माघार असली तरी यशस्वी आहे. पण तरीही त्या असे म्हणत नाहीत की हाच मार्ग बरोबर आहे. "हा मार्ग योग्य निघावा" अशी त्यांची इच्छा आहे. आणि तो कदाचित निघणार नाही ही धाकधुक सुद्धा. तरीही इतक्या प्रांजळ लेखनाला स्पष्टीकरण द्यायला लागावं? दुर्दैव....

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर 12/05/2016 - 13:59
देवदेवतांच्या या सकारात्मक बाजूच्या मोहात पडून याच मार्गाने समाजपरिवर्तनाचे काम करावे असे काहींना वाटते. पण यातून समाज बदलण्याऐवजी बहुसंख्यांच्या दबावाला बळी पडून आपणच बदलण्याचा धोका असतो. विचार पक्का असेल तर मग आरती करण्यात माघार का वाटली ? दुस-यांच्या भावनांचा आदर करता करता आपण स्वत:च्या भावना आणि विचारांना कमी तर लेखत नाही ना, हेही सतत तपासून पाहावे लागते हाच तर नैतिक गोंधळ आहे ! ध्येय साधण्यात अडसर ठरत नाही तेंव्हा माघारही यशस्वी ठरते – अशी आपली मी माझ्या मनाची वेळोवेळी समजूत घालत असते! पुन्हा घूमफिराके भोपळे चौक! एकदा व्यक्ती मनोभावे पूजा-आरती करते म्हटल्यावर लोकांच्या अंधश्रद्धा (जसे की पूर्वज कोपतील, पुरुष नामर्द होतील वगैरे) जोपासणं आलंच. मग अपांग प्यायली तर एवढा गहजब कशाला ?

In reply to by विवेक ठाकूर

पिलीयन रायडर 12/05/2016 - 14:30
विचार पक्का असण्याचा आणि माघार वाटण्याचा काय संबंध आहे? मी पक्की नास्तिक आहे. पण माझ्या घरातला एकही व्यक्ति नाही. माझ्या घरात पुजा होते. त्यात घरातला सदस्य म्हणुन मला सहभाग घ्यावाच लागतो. मी नास्तिक आहे म्हणुन इतरांनीही तसंच असावं असा काही माझा आग्रह नसल्याने मी त्यांना पटवायला जात नाही. पण घरातल्यांचे मन दुखवु नये म्हणा किंवा आपणच एकटे फटकुन वागु नये म्हणा किंवा आरती करताना जोरजोरात टाळ्या पिटल्या तरी त्याने काही फायदान तोटा म्हणुन टाईमपास म्हणुन म्हणा.. पण "देव नाही म्हणुन त्याची पुजा-अर्चाही नाही" ह्या तत्वाला मुरड घालुन मी सहभागी होते. ह्या मुरड घालण्याला माघारच म्हणतात. इथे प्रश्न माझा विचार पक्का असण्याचा नसुन त्या प्रसंगी जे महत्वाचे आहे त्याला प्राधान्य देण्याचा आहे. जिथे मेजोरिटीने आनंदात एकत्र रहाणे हे ध्येय असेल तर दोन पावलं मागे जायला काही हरकत नाही. पण असे करता करता जर माझ्या घरचे किंवा अजुनच वाईट.. मीच... विसरुन गेलो की हे तात्पुरते आहे. थोडे थोडे करता करता आपण "आता आरती केली तर अभिषेक का नको?" अशा गुंत्यात अडकत जातो आणि मग गोष्टी तात्पुरत्या रहात नाहीत. ह्याचा सुवर्णमध्य शोधणे सोप्पे नसते. मग अशा सीमारेषा आखुन, स्वतःचे आणि इतरांचे मत जपत "कोएक्झिस्ट" करुन, ध्येयप्राप्त करणे तारेवरची कसरत आहे. ह्याची जाणीव असणे ह्याला नैतिक गोंधळ म्हणत नाहीत. आणि मुळात नैतिक गोंधळ असणे हे मला तरी काही वाईट गोष्ट आहे असे वाटत नाही. नेहमी काळे - पांढरे असेच नसते आयुष्य. निर्णय एवढे सोप्पे नसतात. तेव्हा नैतिक गोंधळ उडणारच की. अर्थात आपल्याला अजुन पुष्कळ काही समजत नाही, आपण अजुनही अज्ञानी आहोत आणि आपण जे काही करु ते चुक असण्याचीही शक्यता आहे हे फक्त डोक्यात असावे लागते. अपांग प्यायलाचा गहजब एक तुम्हीच करत आहात. ताईंनी ती घेऊन लोकांचा मान राखला आणि जे काम करायला त्या गेल्या ते केलंही. त्यातुन त्यांना सहकारी गमवावा लागला असेल किंवा टिका सहन करावी लागली असेल, तेच त्या "मांडत" आहेत. त्यांनी इतक्या प्रसंगात तो ही एक प्रसंग लिहीलाय, तुम्हाला का सारखी अपांगच दिसतेय ठाऊक नाही. आणि बादवे.. त्या स्त्रियांचा तो गैरसमज कुरवाळत त्या काम करत बसल्या नसाव्यात. उलट आपण ह्यांना परसबागेबद्दल शिकवतोय पण (खरं तर बादरायण संबंध नसतनाही) तो प्रकल्प यशस्वी व्हायचा असेल तर आधी स्त्रियांना प्रजननाबद्दल शिकवणे आवश्यक आहे ही त्यांनी घेतलेली नोंद आहे. ह्याला अंधश्र्द्धा जोपासणे म्हणत नाहीत. विश्वास ठेवा अथवा ठेवु नका विवेक ठाकुर, पण लोक खरंच अज्ञानी असतात. मी टिकली आनि मंगळसुत्र घालत नाही तर माझ्या आजीला ते सहन होत नाही. तिला ते पटवणं मला अत्यंत अवघड वाटतं. तिच्याकडुन मला खरं तर कुठल्याही सहकार्याची अपेक्षाही नाही. शिवाय ती एक शिकली सवरलेली बाई आहे. इथे अतिवास ताई अदिवासी लोकांसोबत काम करत आहेत ज्यांच्यासाठी परंपरा महत्वाच्या असतात. त्यांच्या सहकार्याने एखादे कार्य तडीस न्यायचे असेल तर तुम्ही मुर्ख आहात आणि तुमचे सगळे विचार चुकच आहेत असा पवित्रा घेऊन ते काम करता येत नसते. त्यांच्या कलाकलाने घ्यावे लागणारच. पण हे करताना जे मला तत्वतः मान्य नाही (पुजा करणे, दारु पिणे) ते करावे लागते ह्याची चुटपुट लागणे मानवी स्वभावाचे लक्षण आहे. पण आपण जे करतो ते वैयक्तिक स्वार्थासाठी नसुन आपल्या तत्वाहुनही जास्त मोठ्या आणि महत्वाच्या कामासाठी केलेली तडजोड आहे हे समजुन ताई काम करत आहेत. तुम्ही ह्या धाग्यावर प्रचंड बाष्कळ बडबड केलेली आहे. तुम्ही इतर कुणाचाही केलेला "अभ्यास" सोडुन स्वतः ग्राऊंड लेव्हलला काही काम केलेले असल्यास "अनुभवाने" प्रतिवाद करावा. पण अर्थातच तुम्ही तुमच्या कामवालीला RTE मधुन प्रवेशास केलेली मदत ह्या अनुभवाला एक्स्ट्रॉपोलेट करुन संपुर्ण समाजकार्य करणारे कार्यकर्ते ह्या विषयावर वाट्टेल ते बोलु शकताच. तेच आपण नेहमी करता. प्रत्येक विषयात. पण किमान चांगल्या लेखनाला तरी गालबोट लावु नकात असं सांगुन पहाते. बाकी आपण एकमेव सुज्ञ आहातच...

In reply to by पिलीयन रायडर

बोका-ए-आझम 12/05/2016 - 14:51
पण हे पालथ्या घड्यावर पाणी आहे पिराताई. लोकशाहीचा दुष्परिणाम म्हणा आणि सोडून द्या. इंग्लिशमध्ये अशा लोकांना Bigots असा चपखल शब्द आहे.

In reply to by पिलीयन रायडर

विवेक ठाकूर 12/05/2016 - 15:11
हेतू ग्रेट असेल तर 'माघार घेतली' असं वाटतंच नाही. विषय तिथेच संपतो. तुम्ही स्वतः बाष्कळ विचार करता त्यामुळे असे प्रतिसाद लांबतात .

In reply to by विवेक ठाकूर

पिलीयन रायडर 12/05/2016 - 15:16
एकदा तुम्ही ठरवलं ना मग खरं तर इतरांनी विषय सुरु करायचाच नसतो. प्रतिवाद नाही करता आला की लांबण लावली म्हणणं फार सोप्पं आहे. लेखिका तुमच्या नादाला लागत नाहीये म्हणुन मग नैतिक गोंधळ आणि आत्मस्तुती वगैरे सुचतं. पण मग त्यावर उत्तरं दिलं तर ती लांबण वाटते. आणि स्वतःच निर्णय देऊन विषय संपतो! तुम्हीच आरोप करा आणि तुम्ही निर्णय लावा! आणि तुम्ही प्रतिसादांच्या लांबीबद्दल बोलणे म्हणजे =))

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 12/05/2016 - 16:10
तरीही इतक्या प्रांजळ लेखनाला स्पष्टीकरण द्यायला लागावं? दुर्दैव....
पिरातै, तुमचा प्रतिसाद बहुतांश पटला, अतिवासांचे लेखन प्रांजळ आहे हे ही मान्य, पण एकदा तुम्ही तुमचा अनुभव पब्लिक डॉमेनमध्ये टाकला की त्याची चिकित्सा होणारच आणि अतिवास सामाजिक कार्य करतात म्हणून त्यांचे दैवतीकरण करुन त्यांच्या वैचारीक भूमिका आणि दृष्तीकोणांबद्दल शंका उपस्थित करु नयेत असे कदाचित त्यांनाही वाटणार नाही असे वाटते. विवेक ठाकुरांशी सहमत नसलो तरीही अतिवासांच्या मनाला जी चुट्पूट लागून गेली ती त्यांच्याच जागी इतरांना कदाचित पैरातैंना पण लागणार नाही कारण बहुसंख्य लोक अशा गोष्टी व्यक्तिगत घेत नाहीत अथवा मनाला लावून घेत नाहीत, ते तसे करु शकतात कारण व्यक्तिगत विश्वास आणि व्यावसायीकता तसेच समाजात वावरताना केलेल्या तडजोडी यात इतर बहुसंख्य लोक फरक करत असावेत किंवा कसे.

प्रचेतस 12/05/2016 - 14:35
छिन्द्रान्वेशी प्रतिसादांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल धन्यवाद आतिवास. आपण आपले लेखन सुरुच ठेवावे. अनुभवांची खूप मोठी पोतडी तुमच्याकडे आहे.

पिशी अबोली 12/05/2016 - 16:04
एक इतका वाचनीय धागा गरळ ओकणार्‍या प्रतिसादांनी सतत मुख्य बोर्डावर ठेवला. चिखलफेकीच्या अनिष्ट प्रवृत्तीला सुधारण्यात वेळ आणि शक्ती वाया न घालवता आतिवासताईंनी इतकं शांत राहून, 'यशस्वी माघार' घेण्याचा समाजात काय फायदा असतो, ते सोदाहरण या धाग्यातच सिद्ध करून दिलं.. :)

In reply to by पिशी अबोली

स्वधर्म 12/05/2016 - 16:15
“’यशस्वी माघार' घेण्याचा समाजात काय फायदा असतो, ते सोदाहरण या धाग्यातच सिद्ध करून दिलं.. :)”
या वाक्याशी अंशत: सहमत, परंतु वर मारवा यांनी सोदाहरण लेखिकेच्या ब्लाॅगचा दाखला देऊन जी विचारणा केली अाहे, त्याला जर लेखिकेने प्रत्युत्तर दिले असते, तर जास्त चांगले झाले असते.

गामा पैलवान 12/05/2016 - 18:24
विवेक ठाकूर, तुमचा मुद्दा काय आहे ते थोडंथोडं ध्यानी येऊ घातलंय. तुमच्या मते अपांग पिणे ही काही फार मोठी तत्त्वच्युती नव्हे. म्हणून यांस यशस्वी माघार घेणे असेही म्हणणे अवघड पडते. साहजिकंच लेखिका ठसवू पाहणारा यशोमाघारीचा मुद्दा तुच्छीकृत (trivialise) होतो. याच धर्तीवर असंही म्हणता येईल की लेखिकेने दारू न पिण्याचं अवडंबर माजवलंय. हे मी बरोबर बोललो का? आवश्यकता पडल्यास कृपया दुरुस्ती करणे. नंतर माझा मुख्य प्रतिसाद देईन म्हणतो. आ.न., -गा.पै.

विकास 12/05/2016 - 19:52
लेख आत्ता वाचला आणि आवडला देखील. फक्त याला मला "यशस्वी माघार" म्हणणे तितकेसे पटले नाही. यात संबंध तयार करून पुढे नेण्यासाठी यशस्वी (चांगल्या अर्थाने) धोरण नक्की आहे. "मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, तैसे जनांसी शिकवावे हळूहळू" ह्या समर्थ रामदासांच्या उक्तीमधे जे मुलांच्या बोलीचालीनुसार वागावे लागते असे म्हणले जाते त्याला माघार समजू नये असे वाटते.

विवेकपटाईत 12/05/2016 - 21:56
ताई आपले लेखन मला नेहमीच आवडते. बाकी अंतर्जालावर लेख टाकला कि लोकांच्या प्रतिक्रिया येतातच. प्रत्येक व्यक्ती आपल्या चष्म्याने पाहते.

वैभव जाधव 12/05/2016 - 22:09
वि ठा यांना घ्याव्या लागलेल्या अपरिहार्य माघारीबद्दल आम्ही या धाग्यावर दोन पानं मौन बाळगत आहोत. धन्यवाद!

माहितगार 12/05/2016 - 22:57
धागा लेखात नव्याने जोडलेले शीर्षक चित्र अस्मादीकांकडून अनवधानाने 'यशस्वी मी घार' असे वाचले गेले :) (ह.घ्या)

ईश्वरसर्वसाक्षी 13/05/2016 - 21:37
लय दिस झाले आली नाहि ते. कुठ गेलिया आंजी

आरोह 13/05/2016 - 23:34
मॅडम तुमची अफगाणिस्तान ची डायरी खुप आवडली होती...

समीरसूर 17/05/2016 - 15:35
नेहमीप्रमाणे मुद्देसूद आणि हटके. आवडला.