Skip to main content

शिक्षणाच्या आई चा घो !

लेखक मीउमेश यांनी बुधवार, 04/11/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मुलीच्या शाळेतून फोन आला. आमच्या चिऊताई च्या टिचर नी आम्हा उभयतांना शाळेत बोलावले होते. शनिवारी शाळेला सुटी होती तरी आम्हाला बोलावले. मी जरा आमच्या कन्ये बद्दल सांगतो, येत्या शुक्रवारी ३ वर्षाची होइल. सौभाग्यवती खूपच काळजी करू लागली. काय झालं असेल, मुलीने काही पराक्रम तर नाही केला शाळेत. ( पूर्वी एकदा असंच एकदा शाळेतून बोलावणं आलं होतं , आमच्या कन्येने टिचर च्या कानाखाली गणपती काढला होता … ती कहाणी नंतर कधी तरी ) दोन दिवस सौभाग्यवती नीट झोपली नाही. सारखी काळजी. एकदाचा तो दिवस उगवला. आम्ही शाळेत पोहोचलो. बरोबर मुलगी आणि आम्ही दोघ शाळेत पोहचलो. नमस्कार चमत्कार झाल्यावर लगेच मुद्यावर हात घातला. टीचर : तुमची मुलगी साधारण आहे, तिच्यात काही असाधारण असं काहीच नाही, तुम्ही दोघा हि सुशिक्षित आहात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. या स्पर्धेच्या युगात तुम्ही मुलांना तयार केले पाहिजे, तुमची मुलगी कोणत्याही स्पर्धेत भाग नाही घेत. जेवढा विचारले जाते तेवढंच उत्तर देते. स्वताहून काही करायला मागत नाही. मी टीचर शी चर्चा( वादविवाद ) करण्यास सुरुवात करताच बायको नि आम्हालाच तंबी दिली. बरोबर बोलताहेत टीचर. मी उद्या पासून अजून जास्त अभ्यास घेत जाईन. मला खरच कळत नव्हत मी हसू कि रडू, काय चाललाय हे , ३ वर्षाच्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवायच्या. त्यांनी सर्धेत भाग घ्यायचा. आणि या स्पर्धा म्हणजे कसल्या ड्रोईग आणि स्टोरी टेलिंग, क्राफ्ट आणि बडबड गीते. या पूर्वी जिंगल स्पर्धेत मुलीने जॉनी जॉनी म्हटलं तर बाई म्हणल्या हि प्ले ग्रुप मधली कविता आहे, नर्सरी ला याहून अधिक आलं पाहिजे. या पूर्वीच्या मीटिंग मध्ये बाईनी नी सांगितल ज्या मुलांच्या घरात मराठी मध्ये बोललं जातं त्या मुलांना फोनिक्स च्या क्लास ला घाला, त्याचं इंग्लिश लवकर सुधारतं म्हणे, उच्चार स्पष्ट होतात … मग काय लगेच आमच्या सौ गुगल करून कुठे चांगला फोनिक्स क्लास बघून अडमिशन करून आली मुलीसाठी ( फी महिना २२०० ), मी शाळेत बाकी पालकांसोबत चर्चा केली, सगळी कडे हेच …. मुलांना आता पासूनच आता पासूनच रेस मध्ये पाळण्यासाठी तयार केलं जातंय. सकाळी शाळा, दुपारी शिकवण्या, संध्याकाळी आई घरी अभ्यास घेणार, शनिवारी ड्रोईग किंवा कत्थक…. सगळ्या पालकांना आपल्या मुलांना सुपरमेन बनवायचं. दहावी बारावी चे निकाल ऐकावे तर ९९% एवढे मार्क एका मुलाला ?? , गरिबाचे दोन तीन पोरं पास होतात तेवढ्या मार्कात. मला कळतंय स्पर्धेचं युग आहे पण किती आणि कधी पासून…. लहान लहान मुलांचं बालपण हरवत चाललय. काय हा अनाठाई हट्ट, काय साध्य करतोय आपण. मला आठवतंय मला ५वीत इंग्रजी विषय पहिल्यांदा आला तेव्हा परीक्षेत माय नेम इस उमेश असा लिहिताना may name is umesh असा लिहिल होतं , भोपळा मिळाला होता त्या प्रश्नाला, ५वीत इंग्रजी विषयाला सुरुवात करूनही आमचं काही बिघडलं नाही, ३ वर्षांच्या मुलांकडून काय आणि किती अपेक्षा ठेवायच्या. ३ वर्षाची असताना जर तिला नाही कळाला कि भेंडी ला लेडी फिंगर म्हणतात तर कुठे बिघडलं.शिकेल ती आज नाही तर उद्या, भेंडी ला लेडी फिंगर नाही म्हटलं तरी भेंडीच राहणार, त्याचा बटाटा नाही होणार. संध्याकाळी मी बाहेरच्या खोलीत काहीतरी काम करत होतो , कन्या बाहुबली चित्रपट बघत होती , अचानक धावत आली म्हणाली " बाबा बाहुबली नि त्या काकुंचे कपडे काढले " ( चित्रपटात एक गाणं आहे त्यातला काही रोमेंटिक सीन सुरु होता ) मी तिच्या चेहर्याकडे एकटक बघत राहिलो. काय बोलावं काही सुचेना. माझं मन म्हणत होतं अजून आभाळ फाटायचं बाकी आहे. !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23042
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

माफ करा, पण ह्या स्पर्धेत मुलीला तुम्हीच ढकलेले आहे. आधीच नीट चौकशी करुन शाळा ठरवायची होती. रादर, मी तर म्हणतो, पोरांना शाळेत घालायचीच गरज नाही. काय भैताड शिकणारेत तिथे? त्यापेक्षा घरी राहू दे, काय मनाला येईल ते अभ्यासू दे. बाहेरुन बसवा दहावीला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

+ १ हेच म्हणते . शाळा किती काँपोटिटीव आहे हे आधीच बघा आणि हवं असेल तर अजुन ही बदला . सगळ्याच शाळा इतक्या असंवेदनशील नसतात. काही मराठी आणि ईंग्रजी शाळा देखील मुलांच्या कलाने घेत त्यांच्या शिकण्यावर भर देतात स्पर्धेवर नाही.

In reply to by जव्हेरगंज

नमस्कार मंडळी, बाहुबली घटनेचा उल्लेख या लेखात केलाय कारण त्या ३ वर्षाच्या मुलांमधला निरागस पणा मला यात मुद्दाम अधोरेखित करायचा होता. त्यांचा वर असणारा ते अभ्यासाच आणि स्पर्धेचं प्रेशर आणि त्या कोवळ्या मुलींची कोवळी मानसिकता या बद्दल काहीतरी

In reply to by मीउमेश

बाहुबली घटनेमधुन लहान निरागस मुलांवर टिव्ही , सिनेमा यांचा कसा दुष्परिणाम होउ शकतो हा धोक्याचा इशारा दिसतो .

स्वताहून काही करायला मागत नाही. ???? त्या बाईंनाच पाठवा मराठीच्या क्लासला.

In reply to by प्रभाकर पेठकर

>> त्या बाईंनाच पाठवा मराठीच्या क्लासला. पेठकरकाका -- सहमत :)

मला कळतंय स्पर्धेचं युग आहे पण किती आणि कधी पासून…. लहान लहान मुलांचं बालपण हरवत चाललय.
. शहर सोडा आणि खेड्यात या,निवांत वाटतयं

ओके.

माझ्या घराच्या अगदी जवळ एक इंग्रजी शाळा आहे . तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय पाहता वाटायला लागले आहे कि लवकरच "क्लासेस फॉर बेबीज इन वॉम्ब" चालू होणार आहेत. ;-)

In reply to by उगा काहितरीच

एप्रिल-मे मध्ये एक फ्लेक्स पाहिला होता खराडी बायपासच्या चौकातः ३०*४० आकाराचा. कोणतं तरी विंटरनॅशनल स्कूल... अ‍ॅडमिशन ओपन फोर एज ग्रुप ६ मंथ्स टू ४ यीअर्स. तुम्ही म्हणता तो एजग्रुप पण ऑन द वे असेल बहुतेक.

माझ्या मैत्रिणीने तिच्या वरिष्ठ बिगरीतल्या मुलीला 'ग्रॅमर' साठी शिकवणी लावली आहे - आठवड्यातून दोन वेळा. वार्षिक खड्डा रु. ३५०००.ऊ मात्र! तुमची कन्यका जरा मोठी होउ दे. मग प्रकल्प (मराठीत प्रोजेक्ट) सुरू होतील. मुलांना त्या वयात करता येण्याची सुतराम शक्यता नसलेले प्रकल्प तयार करायला सांगतात. माझा मुलगा लहान असताना मी त्याच्या एकदा शिक्षिकेला विचारले होते की मुलांना न झेपणारे प्रकल्प जर आई वडील करणार हे माहित आहे, तर ते देण्याचे कारण काय? बाई म्हणाल्या 'काय करणार? माझ्या मुलाचे त्याच्या शाळेत सांगितलेले प्रकल्प मीच करुन देते' बिच्चारी मुलं. अभ्यास. शिष्यवृती व अन्य परिक्षा, एखादा खेळ, वाद्य, कला आणि शाळेचा अभ्यास यात पार चेपून जातात. हे सर्व करणं भागच असतं कारण आपलं पाल्य कशात कमी पडलेलं पालकांना चालत नाही. जणु आई वडीलांची प्रतिष्ठा मुलांपायी पणास लागलेली आहे. एका घरगुती समारंभात बळे बळे भरीला घालुनही आपल्या मुलाने कविता म्हणुन दाखवली नाही म्हणुन अपमानित झाल्यागत तरातरा उठुन गेलेली आई मी पाहिली आहे.

तुमचा लेख जणु मीच लिहिला आहेअसे वाटत होते. आमची कन्या आता ११ महिन्यांची होईल. त्यामुळे शाळा या प्रकरणा कडे वेगळ्या द्रुष्टीने बघायला लागलो आहे. साधारणतः सर्व शाळांमधे कमीअधिक प्रमाणात परिस्थिती आहे/असते. आपले पाल्य एकाच वेळेला सचिन तेंडुलकर, झाकिर हुसेन, मेस्सी, सानिया मिर्झा आणि बिल गेटस ( अजुन काही राहिले का?) व्हावे असे पालकांना वाटत असते. यापाठीमागे हव्यास हे एकच कारण मला दिसते. जास्त लिहित नाही. भ्रमणध्वनी वरुन टंकायला फार वेळ लागतो

3 वर्षाची पोर शाळेत जाते हेच क्रूर आहे. माझा बाळ्या काल च 3 वर्षाचा झालाय. शाळेत घालायचा विषय डोक्यात आला तरी वैताग येतोय. जीवन शिक्षण मन्दिर शाळा नंबर १ ला टाकावं म्हणतो.

In reply to by प्यारे१

बेस्ट. नो क्लास अन नो झंझट. घरी बसून शिकिव वाटल्यास. मी तर आताच होम स्कूलींगची माहीती काढायलोय. ;)

In reply to by अभ्या..

आम्हीपण आमच्या मुलीचं होमस्कुलिंग करायचा विचार करतोय. भारतातही काही लोक होमस्कुलिंग करतात. जालावर त्यासंबधी माहिती उपलब्ध आहे. त्याबद्दल बद्दल वाचा. तोपर्यंत ज्या शाळेत मुलांवर हेच केलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे अशी बंधन नसतील त्या शाळेत घाला. आणि जरा टोकाचं वाटेल पण इतक्या लहान वयाच्या मुलांना टिव्ही नका दाखवु. तिला भरपुर पुस्तकं आणा ,छोटी खेळणी, छोटी सायकल,या वयातल्या मुलांसाठी मिळणारी पझल्स आणा. तिला तुमचा भरपुर वेळ द्या. बाहेर फिरायला घेउन जा शक्यतो रोज मैदानात किंवा बागेत घेऊन जा. तुम्ही तुमचे १००% द्या मग कसली काळजी करायची गरज नाही.

निवांत राहा. या वयात मुलीला खेळूदेत. शाळेत सांगून टाका सध्या आम्हाला तिने कमी गुण मिळवलेले चालताहेत. शाळेला चालत नसेल तर शक्य असल्यास शाळा बदला. " बाबा बाहुबली नि त्या काकुंचे कपडे काढले " हा हा हा, हे बाकी लै भारी आहे!! ;) (चांदोबाकथाप्रेमी)रंगा

In reply to by चतुरंग

>>शाळेत सांगून टाका सध्या आम्हाला तिने कमी गुण मिळवलेले चालताहेत. शाळेला चालत नसेल तर शक्य असल्यास शाळा बदला. तिथे तू आहेस (देअर यू आर!)

मधेच बाहुबली कसा आले ते कळले नाही. शिकतील मुल ती त्यांच्या वयानुसार. माझ्या मुलाच्या शाळेत कसलातरी कार्यक्रम होता.मुलांना नेता वगेरे बनून दोन वाक्ये बोलायची होती. स्टेजवरही मोठमोठ्या नेत्यांचे फोटो होते. आमचा मुलगा बोलनार नाही हे दोघांनाही माहीत होते. तसेच झाले तो गुड मॉर्निंग आणि जय हिंद सोडून काही बोलला नाही. नाही म्हटले तरी बायकोला वाईट वाटले. मी तिला म्हटले इथे स्टेजवर जेवढे फोटो आहेत ना त्यातला कुणीही लहानपणी स्टेजवर जाऊन बोलला नव्हता. गंमतीने म्हटले तरी तेच खरे आहे.

In reply to by मित्रहो

बाहुबली घटनेचा उल्लेख या लेखात केलाय कारण त्या ३ वर्षाच्या मुलांमधला निरागस पणा मला यात मुद्दाम अधोरेखित करायचा होता.

In reply to by संदीप डांगे

अशीच जर का नॉर्मल शीफ्ट झाली तर आमच्यासारखे आजचे नॉर्मल उद्या अॅबनॉर्मल होतील मग आम्ही कुठे जायचे. नागपूरच्या इस्पितळात.

माझा मुलगा आता ५ वर्षाचा झाला आहे या ऑक्टोबरमधे, शाळा योग्य पद्धतीने शिकवते म्हणून टेन्शन नाही. मुलगा ह्या वर्षात मुळाक्षरे व अंक शिकला आहे. महिन्याला चार-पाच ह्या गतीने पण प्रचंड कल्पकतेने. त्याच्या शाळेत अभ्यास-वैगेरे काय नाही. फक्त मजा आणि मस्ती, मस्तीतून शिक्षण. वर्गातील इतर मुले त्याच्यापेक्षा ८ ते १२ महिन्यांनी मोठी आहेत म्हणून तो त्यांच्यापेक्षा कमी हुशार वाटतो. पण तशी त्याची बुद्धीमत्ता उत्तम आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की त्याला पुढील वर्षीसुद्धा बालवाडी २ (मराठीत केजी २) मधेच ठेवायचं. सहा वर्षे वय पुर्ण झाल्यावरच पहिल्या वर्गात टाकायचं. नको ते ताण नको त्या वयात नकोच. आम्ही त्याला 'शोपीस' बनवण्याच्या सक्त विरोधात आहोत. त्यामुळे त्याने कुणासमोर कथा-कविता नाही म्हटल्या तरी चालतील. त्याच्या शाळेने त्याला अशी काही वाचनाची गोडी लावली आहे की आजकाल सकाळचा पेपर स्वत: घेऊन एक एक अक्षर वाचतो. अजून काना-मात्रा-वेलांटी कळत नाही पण वाचनाची आवड, अक्षरे शोधण्याची आवड शाळेने कल्पकतेने निर्माण केली. लिहिणे-वाचणे शिकवण्याचे शाळेने टप्प्याटप्प्याचे एक तंत्र तयार केले आहे. जे अतिशय सुंदर व परिणामकारक आहे. मुलगा शाळेत जायला सदैव उत्सूक असतो. शाळेत कायम आनंदी असतो. दप्तरात फक्त डबा, बाटली आणि पाटी-पेन्सिल असते. पुस्तके-बह्या, लिखाणकाम, घोकंपट्टी अजिबात नाही. मुलगा आनंदात आहे, शिवाय स्वतःचे स्वतः शिकत आहे ह्याबद्दल समाधान आहे. त्याच्या शाळेबद्दल एक सविस्तर लेख लिहायचा होता. दिवाळीअंकानिमित्त पण वेळ मिळाला नाही. इच्छुकांनी तोवर संस्थळ बघून घ्यावे. http://anandniketan.ac.in/

अशा शाळेत टाकतात, तर विचार करण्याची सवय मुलांना लागलेलीच नसते. मग बीई, बीटेक करतात. मग (पाट्या टाकणारं काम करताना) हामेरिकेला जायची स्वप्नं असतात. त्यासाठी आयटी मधे प्रवेश करून (आमच्या बीई-बीटेक नसलेल्या) डोस्क्याला त्रास करतात. एक साधं लॉजिक सांगितलं तर तीन तीन दा विचारून घेतात. तरी सुद्धा कळत नाही ते नाहीच. मग त्यांच्या बरोबर बसून त्यांना समजवायचं. जॅक अ‍ॅन्ड जिल कवितेचा आणि माय फेवरेट हॉबी वाल्या पोपटपंचीचा बिझनेस अ‍ॅनॅलिसिस करताना उपयोग नसतो ना!

लेख आवडला. विषय उत्तम आहे. आजकाल सगळीकडेच शाळा अतिशय कॉंपिटेटिव झाल्या आहेत . या रेस मधे इच्छा असो नसो पालक आणि मुलं नकळत ओढली जातात. बाहुबलीचा किस्सा मजेदार आहे.

प्रामाणिकपणं सांगायचं झालं तर आपलं मूल म्हणजे आपण मिळवलेली एखादी गोष्ट जसं की माझी पोजीशन, माझं घर, माझी गाड़ी, (इथवर येइस्तोवर पक्का समज झाल्यानं) माझा नवरा/बायको, माझ्या विदेश टूर यांबरोबर येणारी एक दाखवायची वस्तू हां दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. मूल ही आपल्याला मिळालेली एक अमानत आहे. त्याचं नशीब घेऊन तो जन्माला आलेला आहे, त्याला ट्रस्टीशिप च्या भावनेनं वाढवायचं. त्यात आपलेपणा असायला हवा, मालकी नको. माझं असताना त्याचं यश माझं तसं अपयश देखील, कौतुक माझं मग स्तुति देखील माझीच. कळीचं फूल होइस्तोवर जपायला हवं. फूल आपसुक फुलतं, त्या फुलाचंच फळ होतं. कशाला त्रास करुन घ्यायचा? माझ्याकडं सांभाळायला आलेलं एक ईश्वरी देणं हीच भावना मुलाबद्दल असली की त्यातल्या आपलेपणा सोबत त्याबद्दलची अकारण असलेली असुरक्षिततेची भावना निघून जाते. बोनसाय आवडणारे कदाचित हे समजू शकतील की नाही ठाऊक नाही. असो!

In reply to by प्यारे१

या सगळ्यांशिवाय 'आपण त्याच्या भवितव्याचे शिल्पकार' ही भावना/भूमिका फार टोचक असते. ती सोडायला शिकलं पाहिजे. ..तेच जमणं कठीण जातंय ना !

In reply to by चांदणे संदीप

कित्येक प्रतिसाद पण सुरेख असतात. बूकमार्कची सोय हवी.

२०२५, एक नवरा बायको फॅमिलीमधे नवा मेंबर अ‍ॅडवायचा विचार करत आहेत. त्यांच्या आसपासच्या शाळा वर्षादोनवर्षांनी होणार्‍या बाळासाठी प्रीबर्थ अ‍ॅडमिशन प्लान करत आहेत. तो / ती पुढे जाउन काँपेटिटिव्ह बनावी म्हणुन गर्भसंस्कार वाले, कस्टमाईझ्ड डीएनए वाले वगैरे थैमान घालत आहेत. जन्म झाल्या झाल्या प्रीस्कुल मधे अ‍ॅडमिशन मिळावी म्हणुन ती होणारी आई डोक्याला हेडसेट लाउन ए फॉर अ‍ॅपल, बी फॉर बॉल्स, सी फॉर कॅट वगैरे गोष्टी करतीये. ९ महिने ९ दिवसांनी बाळ जन्माला येतं. आईबाप थेट प्रीस्कुल चे डाक्युमेंट्री घेउन त्य त्या शाळेत बाळाला त्याचं दिवशी सोडुन येताहेत. त्या प्रीस्कुलांमधे स्कुल अ‍ॅडमिशन साठी २५१ वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्टची तयारी करुन घेतली जात आहे. हे रम्य दृष्य डोळ्यासमोर येते आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चहूकडे असेच लोक्स पैदा होऊन मग त्यांमधूनच थोडेसे मॉर्फियस, निओ त्यांमधून थोडेसे....

In reply to by बॅटमॅन

थांब वंडर वूमनला सांगतो, मग बस बोंबलत :) बॅटकेव म्हणू नको वॉच टॉवर म्हणू नको, दिसलास कि फटके. खरं बदवून घ्यायला लासो ऑफ ट्रुथ आहेच.

In reply to by बॅटमॅन

लेका दोन असल्या तर बिघडलं कुठं? वंडरवुमन मेगन फॉक्स असं गुगलवं. =)) (हाले बेरीच्य्या क्याटवुमनचा पंखा)

In reply to by बॅटमॅन

कॅटवूमन कुणाची न्हाय रे बाबा. वं. वू. आपली साधी भोळी, घरगुती हाय. त्यात चालायला कंटाळा आला असेल आणि बॅटपॉड रिजर्वला असेल तर कडेवर घेऊन बाई उडतही जाईल. विचार कर पुन्हा.

In reply to by आदिजोशी

वंवु साधी भोळी घरगुती असेलही पण ती एक बाई आहे हे कसं विसरता जोशीबुवा. नै म्हणजे घरी जाउन टाळकं सरकलं तर बॅट्याच्या टाळक्यात लाटणं, मेस (गदा) वगैरे घातली तर बॅटसुटाच्या हेल्मेटाचं कै खरं नाही. उगीचं रिस्क का घ्या. मांजरबाईंना जरा ओंजारलं गोंजारलं तरी पुरे =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मांजरबाईसुद्धा बाईच की बे. बाकी ती वंडरवुमन वैग्रे काय झेपणार नाय, क्याटवुमन आवाक्यातली आहे. =))

In reply to by बॅटमॅन

हसुन फुटलो =)) बाकी एनजीओंना होणारा अर्थपुरवठा आणि त्यांच्या कारवाया बघता अल कायदा बरी म्हणायची. चुकीच्या तत्वांना का होईना पण नं बदलता पाळायची तरी. हे एनजीओ म्हणजे रंगबदलु सरडे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणराव, कुठल्याही एनजीओत काम केलंय का कधी? की बास, दिला सरसकटीकरणाचा बार उडवून....?

In reply to by संदीप डांगे

केलेलं नसलं तरी बघण्यामधे आहे. एक नव्हे दोन नव्हे तर चक्क ७ एन.जी.ओ. अश्या माहितीमधल्या आहेत की तिथे गैरप्रकार चालतात. चालु दया बाकी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्यासारख्या आयडीकडून पिंकटाकू लोकांसारखे प्रतिसाद अपेक्षित नाहीत, तेवढं खटकलं. बाकी कै नै.

In reply to by संदीप डांगे

पिंकटाकु प्रतिसाद नाहिये. मी स्वतः नियमितपणे पहातोय एकेकाची थेरं म्हणुन बोलतोय. साला अंध-अपंगांसाठी चालणार्‍या एन.जी.ओं ना पंचतारांकित हाटेलात कशाला सेमिनार लागतात म्हणे? हे उदाहरण प्रातिनिधिक झालं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आता स्पष्ट बोललाच आहात तर थोडा ह्यामागचा अँगलही सांगतो. आपण सामान्य मध्यमवर्गीय जे आयुष्य जगतो तेच नियम अक्ख्या जगाला लावायला जातो. ह्या एनजीओजना डोनेशन देणारे बडे खिसे पंचतारांकितमधेच मिळतात. देणगी मिळवण्यासाठी बरेच उद्योग करायला लागतात एनजीओजना... प्रत्येक गोष्ट आपल्याला कारणासहित माहित असेलच असे नाही. बाकी तुमच्य अनुभवाबद्दल व निरिक्षणाबद्दल अजिबात संशय नाही. काळे-पांढरे सगळीकडे असतेच.

अगदी फोनेटिक्स करायचं झालं तर- स्मार्टफोनात वाचणारे अॅपस आहेत.नोटसमध्ये कॅापी पेस्ट करून टाकलेले अॅपस आहेत.तुमचे धडे टाका आणि ऐका.स्त्री आणि पुरुषांच्यया तसेच UK ,USAअकसेंट हे पर्याय आहेत .

शाळेत जे सजेस्ट करतील ते आपण करणं कंपल्सरी थोडंच आहे ? माझा मुलगा लहान असताना शाळेत केजीच्या मुलांना वेगवेगळे सण,घरं असं माॅडेल बनवून आणणे वगैरे प्रोजेक्ट होते.तेव्हा शाळेला पत्र लिहुन भांडले होते. साडेतीन वर्षाचे मूल हा प्रोजेक्ट करेल असे वाटते का.म्हणजे तो पालकांसाठी उपक्रम आहे आणि त्याला मार्क ठेवुन तुम्ही पालकांची परीक्षा घेताय.मुलांच्या मनात निष्कारण तुलना तयार करताय ,कोणाचा प्रोजेक्ट त्याच्या पालकांनी छान बनवला आहे.वापर थर्माकोलचा.शाळा प्रदर्शन करुन सरळ हा थर्माकोल मागे नाल्यात फेकत असे.आईवडिलांची मेहनत नाल्यात.त्याच्या फोटोसकट पत्रव्यवहार केल्यावर सर्व वर्गांना थ्रिडी प्रोजेक्ट बंद झाले .आता नेटवरून माहिती काढून ग्रूपने मुलं करु शकतील असे प्रोजेक्ट दिले जातात. सांगण्याचा उद्देश हा की आपणही वेळीच या गोष्टींना विरोध करून शाळेला असल्या चक्रात ढकलण्यापासून रोखु शकतो.

माझ्या मुलीच्या शाळेत घरी इंग्रजी बोला वगैरे सांगत होते. मी त्यांना इंग्रजीतच सांगून आलो, "आम्हालाच इंग्रजी येत नाही तर काय बोलणार? काय ते तुम्ही शिकवा आम्ही मराठी शिकवतो." शिक्षिकेचा विश्वास बसला नाही पण काही बोलूही शकली नाही. माझा मित्र दुसरी पद्ध्त वापरतो. वर्गात जायच्या आधी संडास्/मुतारी वगैरे पाहून जातो. जनरली तितक्या स्वच्छ नसतातच. मग "हायजीन" त्याचे महत्व वगैरे इंग्रजीत चालू करतो. ह्यावर शाळावाले डिफेन्सिव होतात व मिटींग लवकर संपते. हा नाहीतर शाळेतील पंखे चालू नाहित वगैरे तक्रारींचा पाढा वाचावा.

लेख आणि पटला सुद्धा. बाहुबलीचा किस्सा मस्त :)

सगळ्यात पहिल्यांदा, तुम्हाला तुमच्या मुलीने शिक्षकांना उलट मारलं ह्याचा अभिमान वाटतो का? नाही म्हणजे तुम्ही "कानाखाली गणपती काढला" हे शब्द वापरलेत म्हणुन विचारतेय. कानाखाली आवज काढणे, जाळ काढणे, मुस्काटात मारणे इ इ शन्द लहान मुल जेव्हा उलटं मारतं तेव्हा वापरत नसतात असा माझा समज आहे. दुसरं असं की काय हरकत आहे मुलीने स्पर्धांमध्ये भाग घेतला तर? आयुष्य म्हणजे एक स्पर्धाच तर आहे. Survival of the fittest. आपण जन्मभर आपल्या पोरांना पंखाखाली घेऊन बसणार का? मग अशा वेळी स्पर्धांसाठी तयार करायचं की उलट त्यापासुन दुर ठेवायचं. तुम्ही शिकवाना मुलांना की हरणं-जिंकणं चालुच रहातं. part of the game... तयारी करुन स्पर्धेत उतरणं जास्त महत्वाचं. शिकु दे तिला की जिंकलं की कसं वाटतं.. हरलं की कसं वाटतं.. शिकुन देत ना की हरलं म्हणजे सगळं संपलं नसतं.. त्यातुन कसं उभं रहायचं हे शिकु देत.. इतक्या लहान मुलांच्या स्पर्धा तशाही बक्षिंसाठी नसतातच. ह्या निमित्ताने मुल एखादी नवी कविता शिकतं किंवा कुणाच्याही मदती शिवाय चित्र रंगवतं.. चार लोकांसमोर स्टेजवर उभं रहातं.. माईक कसा असतो ते हाताळुन पहातं.. लोक आपल्याकडे बघत आहेत, हसत आहे, टाळ्या वाजवत आहेत.. हे सगळं नको अनुभवायला? तुम्ही फार तर नका अट्टाहास करु पहिलंच येण्याचा.. पण म्हणुन सरसकट स्पर्धाच बाद?? मला सांगा.. तुमची मुलगी बाहुबली बघुन "काका काकुचे कपडे काढतोय" हे शिकतेय तर ते ठिके एकवेळ.. पण जॉनी जॉनी च्या पुढे जाऊन नवीन कविता शिकुन स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणलं तर अचानक तिचं बालपण आठवतय? माफ करा.. फार स्पष्ट आहे.. पण बाहुबलीचा संवाद आणि कानाखाली गणपती हे जास्त गंभीर मुद्दे वाटले मला. असो.. तुम्ही सुज्ञ आहातच.. धन्यवाद!

In reply to by पिलीयन रायडर

पिरा - उत्तम प्रतिसाद. पालकांनी स्वता च्या बालपणाची तुलना करुन बघु नये. आपल्याला मध्यमवर्गीय आर्थिक स्थितीमुळे आणि घरातल्या शीस्ती मुळे परीस्थितीची जाणीव कायम असायची. सध्याच्या जमान्यातल्या मुलांना घरातल्या सुखवस्तू आणि संपंन्नते मुळे ( आणि छोट्या कुटुंबा मुळे )कशासाठीच स्पर्धा करावी लागत नाही. त्यामुळे शाळा वगैरे मधे स्पर्धेत ढकलणे भाग आहे. थोडातरी रीयालिटी चेक राहील .

In reply to by पिलीयन रायडर

पिराताई, थोड्डासा असहमत. वय वर्षे तीन हे कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्याचं वय आहे का? स्पर्धेपेक्षा उपक्रम असेल तर समजू शकतो, स्टेजवर जाणे, माईक हाताळणे, नवीन अनुभव घेणे यासाठी स्पर्धाच आवश्यक आहे का? टीचर काय बोलली हे माझ्यासाठी बाहुबली व गणपतीपेक्षा जास्त गंभीर आहे. "तुमच्या मुलीत असाधारण असे काहीच नाही" हे ठरवायचा अधिकार टीचरला कुणी दिला? तीन वर्षांची मुलगी स्पर्धेत भाग घेत नाही, काहीच करत नाही हे तीला खूप भयावह वाटतंय यात काहीच गंभीर नाही? कुणीही मुलांना आयुष्यभर पंखाखाली ठेवत नसतं. प्रत्येकाला आपलं मुल स्वयंपूर्ण, धैर्यशील व्हावं असंच वाटेल, पण म्हणून तीन वर्षाच्या मुलांना अनैसर्गिक स्पर्धा, ताणतणावांमधे का ढकलायचे? मान्य की ह्या स्पर्धा बक्षीसांसाठी नसतात. पण स्पर्धा हा शब्दच इतर अनेक गोष्टींना जन्म देतो. जसे पुढे-मागे, कमी-जास्त तुलना. माझ्या मुलाच्या वर्गात अनेक उपक्रम चालू असतात. त्यामधे मण्यांची माळ ओवणे, कात्रीने कागद कापणे, गोष्ट सांगणे, गाणी म्हणणे, ठोकळे जोडणे, अक्षरे ओळखणे. त्याचा दैनिक अहवालही तयार होतो. त्यात वर्गातल्या सगळ्या मुलांची प्रगती दिसते. त्यात आम्हाला मागच्या वर्षी असे आढळले की आमचा मुलगा इतर मुलांपेक्षा कमी पडतो, इतर मुले त्याच्यापेक्षा ह्या उपक्रमांमधे बरीच पुढे असतात. आता इथे एक गंमत झाली. घरी आमच्या समोर किंवा असाच तो खूप हुशार, तल्लख, बुद्धिमान भासतो, पण इतर मुलांशी तुलना झाली की 'ढ' वाटतो. त्यावर आम्ही विचार केला असता आढळले की तो त्याच्या वर्गातल्या इतर मुलांपेक्षा वयाने कमी आहे, त्याची आकलनक्षमता त्याच्या वयानुसार परफेक्ट असली तरी इतर मोठ्या मुलांपेक्षा कमीच असणार. आता हे सापेक्ष झाले ना..? पण आमच्या मनात थोड्या काळासाठी का होईना असे विचार आलेच की बाप रे आपला मुलगा खरंच 'ढ' तर नाही ना.. पुढील आयुष्यात आता त्याचं काय होणार वैगेरे. मुलांना तुलना करण्याच्या वातावरणात ठेवले तर साधारण-असाधारण हे शिक्के/गृहितकं येणारच. तीन वर्षाचं मूल साधारण की असाधारण आहे त्याला त्याचा उपयोग काय? मी स्वतः ह्या अवस्थांतून गेलोय. ग्रॅज्युएशनच्या अगदी पहिल्या वर्षापर्यंत मी कुठल्याही स्पर्धेत, नाटकात, स्टेजसंबंधीत कुठल्याच कार्यक्रमात कधीच भाग घेतला नव्हता. अगदी प्रचंड भित्रा आणि मागे-मागे राहणारा, अगदी बुळा होतो. पण ग्रॅज्युएशनच्या दुसर्‍या वर्षी माझ्या कॉलेजमधे मी एकूण एक स्पर्धा गाजवली, नृत्य, गायन, वादन, वक्तृत्व, नाटक, दिग्दर्शन, नियोजन, कुठलेही क्षेत्र असे नव्ह्ते जिथे मी नव्हतो. अगदी कॉलेजमधल्या वीस दिग्गज विद्यार्थ्याच्या राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेण्यास गेलेल्या संघाचे नेतृत्वही मी केले. हा प्रचंड बदल फक्त एनएसएस शिबिराच्या दहा दिवसात झाला. मला सुप्त गुणांचा शोध तिथल्या उपक्रमांमुळे लागला. ह्या झालेल्या बदलांचा आजवर मला प्रचंड उपयोग झाला आहे. प्रत्येक मूल वेगळ्या पद्धतीने वाढतं, त्याच्या योग्य वाढीसाठी पोषक वातावरण आवश्यक आहे. स्पर्धा, शर्यती, जबरदस्ती नव्हे .

In reply to by संदीप डांगे

मला पिलीयन रायडर ह्यांचा मुद्दा पटतो. स्पर्धेत वाईट काय आहे? मुलांना, स्पर्धेकडे विधायक नजरेने पाहायला शिकवा. त्यांच्यात सकारात्मकता बाणवली तर स्पर्धा ही प्रगतीसाठी पोषक घटक ठरू शकते. आता तिसर्‍या वर्षी कुठली स्पर्धा घ्यावी आणि कुठली टाळावी हे शिक्षकांना समजले पाहिजे. पालकानी आपल्या पाल्ल्याची स्पर्धेसाठी मानसिक तयारी करून घ्यावी. घरातही आपण मुल नीट खात नसेल तर 'बघ..बघ ताईने/दादाने संपवलं. तू संपव ताई/दादाच्या आधी' असे सांगून ताई/दादाला दामटून लहान मुलाला जिंकून देतो. दैनंदिन जीवनात घरात भावंडांमध्ये असे अनेक प्रसंग असतात ज्या योगो आपण ३ वर्षा आधीपासूनच घरातूनच स्पर्धेचे बाळकडू पाजत असतो. त्यात गैर कांहीच नाही. पहिल्या वर्षापर्यंत मी कुठल्याही स्पर्धेत, नाटकात, स्टेजसंबंधीत कुठल्याच कार्यक्रमात कधीच भाग घेतला नव्हता. अगदी प्रचंड भित्रा आणि मागे-मागे राहणारा, अगदी बुळा होतो. तुम्ही नशिबाने ह्या नकारात्मकतेतून बाहेर पडलात. प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. तुमचे मुल मोठे झाल्यावर तुम्ही कितीही कानीकपाळी ओरडलात, उदाहरणे दिलीत तरी त्यातून बाहेर पडू शकेलच असे नाही. मग त्यावेळी त्याचे बालपण परत येणार नाही आणि झालेलं नुकसान (कदाचित तुमच्या मुळेच) भरून येणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

स्पर्धेला ना नाहीये कुणाची. आधी न्यूनगंड तयार करायचा आणि नंतर त्यातनं बाहेर काढायचं आणि त्याची भरभक्कम फि घ्यायची ही 'सेना'नीति कशासाठी?

In reply to by प्यारे१

प्यारे भाऊ, पण स्पर्धा हा शब्दच इतर अनेक गोष्टींना जन्म देतो. जसे पुढे-मागे, कमी-जास्त तुलना. हे विधान त्यांच्या प्रतिसादात आहे. शिक्षिकेने न्यूनगंड कोणाच्या मनांत तयार केला? पालकांच्या. न्यूनगंड तयार होणे ह कमकुवत मनाचे लक्षण आहे. आपण तो तयार होऊ देऊ नये. प्रश्न मिटला. पण स्पर्धाच नको म्हणणं मला जरा पटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरकाका, स्पर्धाच नको म्हणणं मला जरा पटत नाही. स्पर्धा ही 'स्पेसिफिक रीजल्ट ओरियेंटेड' आहे. उपक्रम 'डेवलपमेंट ओरियेंटेड' आहे. स्पर्धा आणि उपक्रम यातला हा फरक महत्त्वाचा आहे. तीन वर्षांच्या मुलांसाठी हे फार काळजीपुर्वक आखल्या गेलं पाहिजे असं मला वाटतं. स्पर्धा नकोच असे मी म्हणत नाही तर स्पर्धेपेक्षा उपक्रम जास्त चांगले आहे. स्पर्धेपेक्षा 'उपक्रम' मुलांमधले गुण बाहेर काढतात. माझ्या मुलाच्या शाळेत स्नेहसंमेलनात वर्गातल्या प्रत्येक मुलाला स्टेजवर जावंच लागतं. मुलंच संचलन करतात, नाटकं रचतात, दिग्दर्शित करतात, कविता, भाषणं करतात. अगदी कितिही छोटा असेल तरी त्याला स्टेजवर जावंच लागतं. हा उपक्रम आहे. स्पर्धेतून जी गोष्ट होण्याबद्दल आपण बोलत आहोत ती उपक्रमातल्या सहभागातून सहज होते. त्यात अनैसर्गिक ताण न राहता खेळीमेळीचे वातावरण राहून "एखादी गोष्ट आपण करणे" ह्या गोष्टीला महत्त्व येतं. त्यातून कलागुणांना बाहेर पडण्यास योग्य वातावरण मिळतं असं माझं मत आहे. एनएसएस चे शिबिरात माझ्यासोबत हेच झाले. तिथे कंपलसरी सर्व गोष्टी करायच्याच होत्या. त्यातूनच कळले मी काय करू शकतो. स्पर्धा असती तर मी भागच घेतला नसता कधी. मग मला कसे कळले असते? त्याच शिबिरातून बर्‍याच मुलांना आपआपल्या क्षमता मर्यादा कळल्या, पुढील आयुष्यात त्याचा त्यांना फायदा झाला. स्पर्धेतून ह्या गोष्टी होतीलच असे नाही. स्पर्धांची आवश्यकता योग्य वयामधे, योग्य कारणांसाठी आहेच. ह्या स्पर्धा तुल्यबळांमधे व्हाव्या, त्या ऐच्छिक असाव्यात असे माझे मत आहे. नाचाचं अंग नसलेल्या मुलाला भरतनाट्यम सादर करू शकणार्‍या मुलांसोबत, गायनाचं अंग नसलेल्याला शास्त्रीय गायन करणार्‍या मुलांसोबत जबरदस्ती स्पर्धेला पाठवणे त्यांच्या मनावर खोल परिणाम करणारं असू शकतं.

In reply to by संदीप डांगे

संदिप डांगे, शाळेतून (माझ्या काळातील शाळांबाबत मी बोलतो आहे.) स्पर्धा आणि उपक्रम दोन्ही असतात. वक्तृत्व स्पर्धाही असतात आणि टिळक जयंती, गांधी जयंती आदी महत्त्वाच्या दिवशी भाषणेही असतात. वार्षिक स्नेहसम्मेलनात शाळेच्या नाटकांंमध्ये- एकांकीकांमध्ये काम करण्यात कुठली स्पर्धा नसते. आंतरशालेय वक्तृत्त्वाच्या स्पर्धा होतात. कुठल्याही स्पर्धेत उपक्रमात भाग घेण्याची जबरदस्ती नसते. आपल्या पाल्ल्याला त्यात सहभागी होऊ द्यायचे की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. त्याच्या शिक्षिकेला तुम्ही सांगायला हवे होते की 'माझा मुलगा स्पर्धेसाठी योग्य होईल तेंव्हा तो स्वतःहून भाग घेईल. तसे नाही झाले तरी मला चालेल.' विषय संपला.

In reply to by प्रभाकर पेठकर

लेखकाच्या मुलीची शिक्षिका काय बोलली यावर आपण चर्चा करत आहोत. त्यांच्या "ती स्पर्धेत भागच घेत नाही, तीच्यात असाधारण असे काहीच नाही" ह्या वक्तव्यावर आक्षेप आहे. ज्या दृष्टिकोनातून, विचारसरणीतून ही वाक्य आली ती त्या वयाच्या मुलांसाठी योग्य आहे का यावर मी माझे विचार मांडले. बाकी दोन्ही गोष्टी आपआपल्या ठिकाणी योग्यच आहेत.
त्याच्या शिक्षिकेला तुम्ही सांगायला हवे होते की 'माझा मुलगा स्पर्धेसाठी योग्य होईल तेंव्हा तो स्वतःहून भाग घेईल. तसे नाही झाले तरी मला चालेल.' विषय संपला.
आपला अंमळ गैरसमज झालेला दिसतोय. माझ्या मुलाबद्दल मला काहीही समस्या नाही. त्याचं योग्यच चाललंय.

In reply to by संदीप डांगे

नाचाचं अंग नसलेल्या मुलाला भरतनाट्यम सादर करू शकणार्‍या मुलांसोबत, गायनाचं अंग नसलेल्याला शास्त्रीय गायन करणार्‍या मुलांसोबत जबरदस्ती स्पर्धेला पाठवणे त्यांच्या मनावर खोल परिणाम करणारं असू शकतं. असं करणार्‍या शाळा चुकीचे वागत आहेत. शैक्षणिक बोर्डाकडे लेखी तक्रार करा.

In reply to by प्रभाकर पेठकर

माफ करा पण मला हे झेपतच नाहीये कि ३ वर्षांच्या मुलांसाठी स्पर्धा कशी चांगली आणि व्यक्तिमत्व विकास वगैरे गोष्टींची चर्चा सुरु आहे! खरच? ३ वर्ष? अरे त्यांना थोडे दिवस तरी मजा करू द्या, स्पर्धेशिवाय गम्मत म्हणून गोष्टी करू द्या... ३ वर्षांच्या मुलांना चित्रकला, बडबडगीत वर्गात शिकवता येतात स्पर्धा कशाला हवी आहे? त्यांना आधी ते स्वतः कोणीतरी आहेत हे तरी कळू देत मग करा व्यक्तिमत्व वगैरे! मी आजिबात मुद्देसूद लिहू शकलेलो नाही कारण मला कळतच नाहीये कि काय लिहावं...

In reply to by शब्दबम्बाळ

मी उमेश ह्यांनी इथे हा लेख लिहीला म्हणून मी माझे विचार मांडले. बाकी आपापल्या मुलांना कसे वाढवावे हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न असतो. तुम्हाला नसेल पटले तर सोडून द्या.