मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाबुल मोरा

अत्रन्गि पाउस · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें मोरा अपना बेगाना छुटो जाए आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश जे बाबुल घर आपना मैं पीया के देश |धृ | कुंदनलाल सैगल जगजीत सिंग पुरुषांना माहेर नाही आणि म्हणून त्यांना त्या हळव्या जखमेचे फार कौतुक नाही असे कुणीसे म्हटले आहे कि नै माहित नै पण असतेच तर बाबुल मोरा हे त्याला दिलेले आर्त उत्तर आहे ... लखनौतून परागंदा होत असतांना वाजीद अलींनी लिहिलेली हि आर्त रचना भैरवीत गायली जावी हा तर एक नैसर्गिक योगायोग मानला जावा ... लहानपणी सुट्टीमध्ये बाकीचे समवयस्क सिनेमा बघायला जायचे तेव्हा त्या खून मारामार्या ह्यांची नावड असल्याने मी घरी राहायचो आणि मग माझे चुलत आजोबा आणि मी सैगल, बालगंधर्व ह्यांच्या एल पीज ऐकायचो ...त्यात बाबुल मोरा लागले कि साठीतले माझे आजोबा डोळे पुसायचे आणि जेमतेम १० १२ वर्षांचा मी कावरे बावरे होऊन ते सगळे आर्त अनुभावायचो... अलीकडेच अरविंद गजेंद्रगडकर ह्यांच्या पुस्तकात वाचलेला ह्याचा एक किस्सा ... जालंधर संगीतसभेसाठी जमेलेले सर्व प्रथितयश कलाकार, गुणीजन .. एका सकाळी फिरत फिरत भीमसेन, गजेंद्रगडकर आणि माधव गुडी रेल्वे स्टेशनवर गेले समोर एक आगगाडी निघायच्या बेतात .. भीमण्णा समोरच्या डब्यात शिरले मागून हे दोघे ... गाडी सुटल्यावर आजूबाजूला बघितले तर लक्षात आले कि संपूर्ण डबा एका वऱ्हाडाने व्यापला होता ..मध्य लयीत गाडी चाललेली आणि भीमण्णा गुणगुणू लागले 'बाबुल मोरा'... बाजूचा माहोल ..भीमण्णा मुडात आलेले ..लागलेला स्वर आणि त्यांची तंद्री .. हळू हळू बाजूचा कोलाहल कमी कमी होत बंदच कि ... आधीच माहेरच्या आठवणींनी त्या वधूच्या डोळ्यांना खळ नसावा.. त्यात हे स्वर ...मुसमुसून रडणारी ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली आणि बघता बघता संपूर्ण वऱ्हाड गहिवरले .. अगदी त्या नवरदेवासकट ..

वाचने 4346 वाचनखूण प्रतिक्रिया 16

अनुप ढेरे 25/02/2015 - 20:05
छान लिहिलय. सैगलचं बाबुल मोरा प्रचंड आवडतं. डीडी वरचा वर्जीनल महाभारतात कृष्ण मथुरेला जायच्या आधी राधेला भेटतो असा प्रसंग दाखवलाय. त्यात बॅकग्राऊंडला बासरीवर हे गाणं वाजतं. तेही कमाल!!

आदूबाळ 25/02/2015 - 20:33
नवाब वाजिद अली शाहला १८५६ मध्ये लखनौमधून कलकत्त्याला तडीपार करण्यात आलं. (ही ब्रिटिशांची नेहेमीची क्लृप्ती होती. दुसरे बाजीराव पेशवे यांना कानपूरजवळ बिठूरला तडीपार करण्यात आलं होतं. ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला.) असं म्हणतात की वाजिद अलीने आपल्या प्रिय लखनौच्या वियोगात हे काव्य लिहिलं. त्यातला "चार कहार"चा निर्देश तिरडीला खांदा देणार्‍या चार खांदेकर्‍यांकडे आहे. लखनौचं आजचं दर्शनही अत्यंत लोभस आहे. तिथलाच नवाब असलेल्या वाजिदचं दु:ख समजू शकतो.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 26/02/2015 - 09:59
त्यातला "चार कहार"चा निर्देश तिरडीला खांदा देणार्‍या चार खांदेकर्‍यांकडे आहे.
सगळी कविता मृत्युला सामोरे जाणार्‍या व्यक्तिच्या दृष्टीकोनातून लिहिल्या सारखी वाटते.

वाटाड्या... 25/02/2015 - 21:43
काय आठवण काढलीत महाराजा....आण्णांचा लागलेला कोमल निशादाला घेउन लागणारा धैवत...अक्षरशः डोळ्यात पाणी उभं रहातं....अक्षरशः आर्त अशा स्वरांमधुन चपखल बसणारे शब्द...गड्या गाणं गानं ते हेच... कुंदनलाल सैगलचंसुद्धा छानच आहे. जगजीतसिंगचं आपलं नेहेमीच्याच खासीयतचं शायरी ढंगातुन... आता परत एकदा ऐकणं आलं .... - (गाण्यातला) वाट्या..

वाटाड्या... 25/02/2015 - 22:45
किशोरीताईंचे ऐका.... https://www.youtube.com/watch?v=o9PRkIZFLuY वेगळं गाणं.... बापरे....अप्रतिम... - वाट्या... *music2* [:-} [:} [:-}

In reply to by वाटाड्या...

एस 25/02/2015 - 23:25
भीमसेन जोशींपाठोपाठ हेही ऐकलं. भारीच. भीमाण्णांचं मात्र कानांत अजूनही रुंजी घालतंय.

In reply to by वाटाड्या...

रमेश आठवले 26/02/2015 - 10:40
आग्रा घराण्याचे मरहूम आफ्ताबे मौसिकी ( संगीताचा सूर्य) फैयाज खान यांनी आपल्या साथीदारा बरोबर अनोख्या ढंगात गायलेली ही बाबुल मोरा भैरवी मला खूप आवडली . त्या मधील अंतरा बाकीचे गवई गात नाहीत असा आहे . http://www.parrikar.org/music/bhairavi/fhk.mp3

रमेश आठवले 26/02/2015 - 05:17
शेवटचा मुगल बादशाह बहादुरशाह हा 'जफर या टोपण नावाने शायरी लिहीत असे . त्यालासुद्धा इंग्राजांनी ब्रह्मदेशात तडीपार केले होते. त्याने वाजिदलि शाह सारखी एक गझल लिहिली त्यात तो विलाप करतो कि त्याला मरणा नंतर दफन करण्यासाठी दोन वार जमीन सुद्धा त्याच्या वतनात मिळू शकणार नाहि. हि प्रसिद्ध गझल मोहम्मद रफी यांनी गायली आहे . https://www.youtube.com/watch?v=KiAfTauealQ

तिमा 26/02/2015 - 19:11
साधारण साठ-बासष्ट सालच्या सुमारास, भीमसेन यांचा एक अप्रतिम कार्यक्रम स्पूलवरुन आमच्या घरी पोचला. रेकॉर्डिंग काही खास नव्हते. सुरवात एकदम द्रुत लयीतील 'झनक मितवा' ही दरबारीतील चीज, त्यानंतर ते त्रितालात म्हटलेलं अद्वितीय 'चंद्रिका ही जणु' आणि ते संपत असतानाच अचानक त्यातूनच सुरु केलेलं ते अजरामर बाबुल मोरा! पहिल्यांदा ऐकल्यावरच माझ्या आणि वडिलांच्या डोळ्यांतून अश्रुंच्या धारा लागल्या. त्या कार्यक्रमाची असंख्य पारायणे झाली.पुढे ते कॅसेटवर उतरवेपर्यंत स्पूल खराब होऊन बाबुल मोरा निवर्तले. तरी त्याची आठवण म्हणून आधीची दोन्ही गाणी साठवून ठेवली. ते 'बाबुल मोरा' ऐकल्यानंतर , कोणाचेही बाबुल मोरा, मला आवडले नाही. तो कार्यक्रम कोणाकडे सुस्थितीत असल्यास मी ऐकण्यास उत्सुक आहे.

तिमा 26/02/2015 - 20:09
चुकून झनक मितवा लिहिले.