मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१६

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मागिल भाग-१५ आणि श्टेजवरून खर्‍या अर्थानी एक्झिट होतात... पुढे चालू... =========================== मग सुरु होतो एक छोटा खेळ..सूनमुखाचा.पण हा ही तयार-झालेला एक विधी आहे. हल्ली एक भलामोठ्ठा आरसा(मंगल-कार्यालयातूनच!) दिला जातो. मग सासूबाई अगदी हौसेनी त्यात आपल्यासह मुलाचा सुनेचा चेहेरा बघतात.फोटुवाले त्यांच्या मागनं खास कलात्मक फोटु घेतात. यात आम्हा गुरुजी लोकांचा पार्ट फक्त मार्गदर्शन करण्याचाच असतो.मग त्यात आधी सासूला,फक्त सुनेला अगदी जवळ घेऊन आरश्यात निरखायला लावणे..कंगव्यानी तिचा भांग पाडल्यासारखं करायला लावणे. भांगात कुंकू भरवणे..इत्यादी गोष्टी पार पडतात. मग आंम्हिही आधिचा झालिचा ताण उतरवायला .." सासूबाई...सूनबाईंना नविन हेअरश्टाइल करवून द्या हं...पहिली न मोडता! " इत्यादी माफक विनोद-टाकतो. वातावरण जरासं हलकं होतं आणि नंतर सासारा सुनेला मुलाला पेढा भरवू लागला..की आंम्ही मधे बसलेल्या सासूकडे निर्देश करत "एक पेढा तिकडेही चालेल हं!" असा अजुन एक बाण सोडतो. या बाणानी मात्र मंडळी खळखळून हसतात. आणि मग यानंतर वधूला गौरीहंरंपूजना पाठवली की तिथून चक्र फिरायला लागतात..ती रुखवताच्या भोजनाची! रुखवतांचें भोजन हा तर एक संपूर्ण कालविसंगत विधी आहे. वधुच्या दारी लग्न लाववून घ्यायला, दमूनभागून आलेल्या वराकडल्या वर्‍हाडाला आल्या आल्या द्यायचा श्रमपरिहारी साध्या जेवणाचा बेत-म्हणजे रुखवताचं भोजन! (हो... हे सांगायलाच हवं! नाहितरी आमचा काका म्हणतोच :- "आत्मू..श्टेजवर आपण त्यांचे कलाकार,तिकिटाला साजेसा खेळ करणारे..पण एकदा खाली उतरलो,की हल्ली तुमचं ते कायसं म्हणतात..ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य!!!! ते आपल्यालाही जपांयलांच हंवें हों!" ) पण एकदा का साध्या साध्या गोष्टींचे विधी झाले,की त्याच्यासाठी पुरोहितही आले..धर्म/संस्कृती..सारे काहि आले. आणि एकदा का हे सारे आले , की त्यासाठी त्या सार्‍याचे सारे करणेही आलेच! तेंव्हा चालू नाटकातला हा ही एक (भरीला पडलेला!) प्रवेश आपण पाहू या
या रुखवतासाठी
मग आंम्हाला सासूबाईंना.... "सासूबाई हे बघा ..आता आपल्या कडली ज्येष्ठ मंडळी,आणि तुम्ही तिघे अशी एकंदर १०/१५ लोकं मुलाचा पोषाख अवरला की रुखवता'ला यायचं बरं का" हे सांगून लगेच मुलिच्या आइला "तुम्हीपण त्या मंडळींना रुखवताला बोलावून आणायच बरं का!" अश्या सूचना देतो. मग मुलाकडच्या निरनिराळ्या जागी विखुरलेल्या मंडळींना विशिष्ट राजदूत पाठवून आणि त्यांना आणवून,त्या रुखवताच्या सुबक पदार्थांनी सजलेल्या ताटांच्या पंगतीसमोर आणून भो जनास बसवावे लागते. हा ही विधी फोटोंचाच असल्यामुळे,मग वधूमातापित्यांकडून वराला केळं अर्धं आणि वाटीतलं दूध अर्ध द्यायला लावणे,तेच(उष्टं) दूध/केळं वधूला देण्यासाठी गौरीहंरंपूजनाला जवळ पाठविणे. मग वराच्या हतावर वधूमातेकडून तूपाची आपोष्णी घालायला लावणे.(यातल्या हरएक वाक्याबरोबर फोटोचे ५/५ क्लिक स्मरा हो वाचकांनो.....!!! ) आणि सगळ्यांना "सावकाश जेवा हो..थकून भागून आलात!" असा संपूर्ण धर्म-शास्त्री'य्य ड्यायलॉग वधूच्या बापाकडनं मारविणे... हे सारं पार पाडवावं लागतं. आणि मग जेवणाचे फोटो (किंवा फोटोंचं जेवण.. ;) ) सुरु झालं,की मधेच आपला मोर्चा त्या गौरीहंरं पूजनाकडे वळवावा लागतो. तिथे ती वधू चेहेर्‍यावर किमान एकदिडकिलोचा (मेकपवालीनी दिलेला :-/ ) मेकप-घेऊन पाटावर फोटूवाल्यांनी-दिलेल्या पोझ मधे बसलेली असते. आणि कुणीतरी दुष्टपणानी तीला -"आता असच बसायचं...उठायचं नाही!" असं सांगितलेलं असतं. मी तर तिथे गेल्या गेल्या भटजी आणि मेकप-परिश्रमीत वधुला "चहा द्यायचा-विधी*" करवून घेतो. (मग...??? आम्हाला थोडीपण सोय* नको का??? :D ) मग आमचा 'चा' झाला,की वधूला आंम्ही:- "हे बघ ह्या अक्षता घे..आणि मुहुर्ताला ५ मिनिटं र्‍हायली की मग इथे बसून त्या गौरीहर देवतेवर वहात बस.आणि वाहाताना काय म्हणाशील?" वधू:- "काय???" (इथे तिच्या काहि दुष्ट मैत्रिणींचा :-/ हशा! ) आंम्ही:- "गौरी गौरी सौभाग्य दे ..आरोग्य दे.. असं म्हण..त्याच बरोबर मनात,नवर्‍याला नीट वागायची बुद्धी दे...आणि नै वागला तर मला(त्याच्याशी) भांडायला शक्तिही दे! असं म्हणलीस तरी चालेल हो! फक्त जे मागायचं ते चांगल्या संसाराविषयी माग,म्हणजे झालं!" असं सांगतो. या डालॉगनंतर सगळ्यांचाच हशा होतो. आणि हे होतं ना होतं..तेव्हढ्यात तिकडच्या सीमेवरून "रुखवताचं भोजन अवरलं..अता पुढे काय?" अश्या निरोपाचे खलिते घेऊन त्यांचे (तेच मगाशी पाठविलेले..) राजदूत येतात. मग पुन्हा आपला मोर्चा त्या आघाडीकडे वळवावा लागतो.तिकडे जाऊन त्यांचे जेवलेले हात पेश्शल गरम पाण्यानी धुववून घेणे. त्यांना हात पुसायला नॅपकिन देणे. नंतर विडा देणे. ताटाखाली वाढप्यांचा "मान" - ठेवायला सांगणे.. हे वधु मातापित्यांकडून करवून घ्यावं लागतं. आणि मग पुन्हा वराला वेगळ्या खुर्चीत-टाकुन त्याला हाराफुलांनी सजवून हातात मोत्याचा नारळ देववून. (फोटो-क्लिक स्मरण चालू ठेवा हं!!!) त्याच्या करवलीकडे करा आणि सौवाष्ण बहिणीकडे दिवा असे देववून, ते जाणार असतील तर(वाजत/गाजत) मारुतीला/ग्रामदेवतेला दर्शनाला पाठविणे. आणि नसतील जाणार तर कार्यालयातल्या अ‍ॅरेंजमारूतीचं दर्शन करवून आणणे..हे करावं लागतं. नंतर मंडळींना ''अत्ताच थकूनभागून आलेल्या" वर्‍हाडासारखं,कार्यालयाच्या दारातून आत-आणावं लागतं.तिथे दारावर आपण, आल्या आल्या हातपायतोंड धुवायला पाणी द्यायचो..त्या साध्या प्रथेचा वर्‍हाड्यांच्या पायावर मुलिच्या आईवडिलांकडनं दूध/पाणी घालवून घेऊन,करवायचा विधी - झालेला असल्यामुळे तो करावा लागतो. [या जागी,,, आदल्या दिवशी मुलिच्या घरी...(म्हणजे तसं लग्न लागायचं ..तेंव्हा) सीमेवर आलेल्या वराचं सीमान्तपूजन करत असतं..आणि त्याच्या आधी हे पायधुणं आणि त्यानंतर रुखवत भोजन असायचं. जे सयुक्तिकही होतं..पण त्यातलं ते सीमांत्पूजनही हल्ली सोय म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळी कार्या-लयातच करतात... आणि त्या-नंतर वांड्गनिश्चय (म्हणजे विवाहनिश्चिती) हा "विधी" करतात. जो खरं तर सारखरपुडा करतात,त्या जागी आणि त्या वेळी(च) करायला हवा! ..पण हे सर्व आलटापालट पाहिल्यानंतर परत आमच्या त्या काकाची वाक्यें आठवतात,आणि आमच्यातला बंडावलेला आत्मूभटजी थंडावतो. काका:- "अरें मेंल्या आत्मू...उखडतोस कांय असां तत्वविसंगत..तत्वविसंगत म्हणून! तुलां सांगितलें नां एंकदां,आपण मंजे ह्या धर्मव्यवस्थेतलें वाढपी म्हणून! मग खाणार्‍यानी दहीभांत आधीं खाल्लां आणि वरणभात शेवटीं,तर चिडांवयांचें कशांलां? मांगतील तें हसतमुखानें वांढांयचें आणि - पुढें व्हांयचें...कसें!??? ] तर...एकदाचे त्या वर्‍हाड्यांना पायधुणीचे/दहीभात ओवाळणीचे/औ'क्षणा चे फोटो काढवून झाले...की वधूच्या वडिलांना "जावयाला श्टेजवर घेऊन या हं आता!" असा डायलॉग मारून आंम्ही थेट पळतो ते श्टेजवर... कारण तिथे कार्यालयाच्या नोकरांनी आणून ठेवलेले(किंवा लावलेले)पाट/लग्नमाळा/हार इत्यादी तयारी कितपत आणि कुठे कशी आहे? हे पहावे लागते. नंतर तो मंगलाष्टकं म्हणायला ठेवलेला माइक,त्याच्या आवाजाची चाच(प)णी हे चेक करून पहिल्यांदा "मुलिचे मामा..मुलिला घेऊन या!" हा काहि शे वर्षांचा पारंपारिक डायलॉग बोलावा लागतो. नंतर श्टेजसमोरिल जमलेल्या आप्तेष्टांना त्या शुभमंगलासाठी एक छोटेखानी भाषण देऊन सावधान करावं लागतं. हे होता होता (मुहुर्त चुकला/र्‍हायला असला तरी..) वधू "येताना" दिसली की लग्गेच "ज्यांना मंगलाष्टके म्हणायची असतील त्यांनी आमच्यापाशी येऊन थांबा!" अशी सूचना २/३ वेळा द्यावी लागते. आणि वधू एकदा श्टेजवर येऊन वरासमोरच्या पाटावर उभी राहिली,की मग सुरु होतो एक अत्यंत गंभीर (आणि तेव्हढाच इनोदी :D ) असा कार्यक्रम.... तो म्हणजे

मंगलाष्टकांचा!

========================================== क्रमश: ==========================================

वाचने 9877 वाचनखूण प्रतिक्रिया 19

आदूबाळ Fri, 10/17/2014 - 02:18
"रुखवताच्या जेवणाच्या वेळेला भरपेट जेवून घे, मित्रा. नंतर किती उशीर होईल सांगता येत नाही. भुकेलाच उभं रहावं लागेल" हाही एक अनुभवसिद्ध सल्ला नवर्या मुलाला देत जा. मंग-लाष्ट-का वरील भागाची प्रतीक्षा.

In reply to by आदूबाळ

@एक अनुभवसिद्ध सल्ला नवर्या मुलाला देत जा.>>> सल्ला विचारार्ह आहे. @मंग-लाष्ट-का ???? >>> :-D

जेपी Fri, 10/17/2014 - 05:26
सुनमुख पाहताना वधुवराचे डोके धरुन का आपटतात हे आजपर्यंत कळाले नाही.झाली सारखाच हा सोहळा पण देशस्थाकडे लांबलचक असतो.

In reply to by जेपी

@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके धरुन का आपटतात>>> हे जास्ती करूं सप्तपदी नंतर जो मंगलाभिषेक (डोक्याला डोक लाऊन) होतो,तेंव्हा घडतं. पण तुम्ही म्हणता तसंही होतं,अगदी क्वचित प्रसंगी!

In reply to by जेपी

@सुनमुख पाहताना वधुवराचे डोके धरुन का आपटतात>>> हे जास्ती करूं सप्तपदी नंतर जो मंगलाभिषेक (डोक्याला डोक लाऊन) होतो,तेंव्हा घडतं. पण तुम्ही म्हणता तसंही होतं,अगदी क्वचित प्रसंगी! आणि हे सगळं विधी एंजॉय करण्याच्या मानसिकतेतुन होतं . बाकी काहीही नाही. :)

घालून घरी जायची तयारी केलीच होती... दुसर्या गुरूजींनी पाहिलं म्हणून बचावलो.... एक हृद्य आठवण !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

@दुसर्या गुरूजींनी पाहिलं म्हणून बचावलो....>>> मग तुंम्ही त्या दुसर्‍या गुरुजिंना हाताशी धरून, त्या पहिल्या गुरुजिंना काहि (कायदेशिर) अद्दल घडविलित कि नाही? तुंम्ही यजमानांनी ती घडवायला हवी,असं आंम्हाला मनापासून वाटतं.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

रेवती Fri, 10/17/2014 - 17:36
बापरे! काय हे! त्यावेळी भांडत बसण्याची वेळही नसते. श्श्या!